Tuesday, January 26, 2016

नव्या सुराज्याची नांदी

मंत्रिमहोदयांनी स्वत:च्या भाषणात मुद्दा उपस्थित केला की, शिक्षक आमदार शिक्षकांच्या खूप तक्रारी घेऊन आले. त्यातील ८० टक्के पगारविषयक होत्या, उरलेल्या शिक्षकांवरील अन्यायविषयक होत्या. ‘शिक्षण’विषयक एकही नव्हती! मला प्रश्‍न पडला की, मी शिक्षकांचा आमदार आहो की शिक्षणाचा? शिक्षकांना समस्या असतात हे मान्य, पण त्यासाठी म्हणून शिक्षक आमदार नाही. असे असते तर डॅाक्टर आमदार, इंजिनीयर आमदार असे पद नसते काय? शिक्षक आमदार करण्यामागे घटनाकारांचा फार मोठा उद्देश हा होता की, शिक्षक प्रगल्भ, सुज्ञ असतो; तो स्वत:च्या पलीकडे जाऊन समाजाच्या भल्याचा तटस्थपणे विचार करू शकतो. म्हणून शिक्षक आमदार असायलाच हवेत. आज शिक्षक स्वत:चे ‘गुरुपद’ हरवून बसले आहेत, त्याला अनेक कारणे असतील. पण, आपल्याला ते परत मिळवायचे आहे. त्यासाठी आपण सर्व जण प्रयत्न करणार आहोतच.

गणितीय संकल्पनेत बिंदू एका प्रकारे रेखाटले की, त्यातून रेष तयार होते, असे म्हणतात. गणित हा माझा विषय नव्हे, पण असाचा काहीसा अनुभव ३ ते ५ ऑगस्टला ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’ येथे आला आणि हा कालखंड अनेक प्रकारे लाभदायी ठरला. कारण यात ‘वर्तनबदल’, ‘व्यक्तिमत्त्व विकास’, ‘आत्मबल वाढीस लागणे’, ‘संवदेनशीलता वाढीस लागणे’ या सवार्र्ंहून विशेष म्हणजे कोणत्याही घटनेकडे ‘आव्हान’ म्हणून न बघता ‘संधी’ म्हणून बघावे, ही सकारात्मक मानसिकता तयार झाली. चांगुलपणा, सचोटी, देण्याची इच्छा वास्तवात असू शकते, याची प्रचीती आली. जेव्हा मंत्री, वरिष्ठ अधिकारीवर्ग, सहायक अधिकारी, तज्ज्ञ, चर्तुर्थश्रेणी कर्मचारी एकाच ध्येयाने झपाटून कृतिप्रवण होतात, तेव्हा काय चमत्कार होऊ शकतो, हे या तीन दिवसांत अनुभवायला मिळाले. आनंद याचाच आहे की, मीसुद्धा या सोहळ्याचा एक भाग नव्हे, सन्माननीय भाग होती. असं काय घडलं या तीन दिवसांत?

‘सरकारी उद्बोधन’ आहे, आता जावेच लागणार, या मानसिकतेतून महाराष्ट्रातील ऑनलाईन फॉर्म भरून दोन चाचण्या पार करून, पारदर्शक पद्धतीने २१५ विषयतज्ज्ञ रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत कसेबसे पोहोचले. परिसर पाहताच शरीराचा ‘प्रवासी थकवा’ दूर झाला. अतिशय नम्र, प्रसन्न स्वरात कर्मचार्‍यांनी नाव नोंदणी करून, निवासकक्ष उपलब्ध करून दिला. मग एक कर्मचारी आमचे सामान खोलीपयर्र्ंत घेऊन आला. काही हवे असेल तर या या क्रमांकावर संपर्क साधा, असे सांगून तो गेलाही. सुसज्ज, नेमक्या, मोजक्या, विचारपूर्वक तयार केलेल्या एसी रूम होत्या. महिलांची व्यवस्था अतिशय देखण्या वास्तूत- जिचे नावही तितकेच सार्थ ‘एकलव्य’- येथे होते. प्रत्येक कक्षात तीन महिला अशी व्यवस्था होती. योगायोगाने आम्ही तिघी विदर्भाच्या म्हणजे नागपूर-अकोला-भंडारा अशा होतो. दोन तारखेला दुपारी पोहोचल्यामुळे परिसर न्याहाळण्यास व निसर्गरम्यतेचा आस्वाद घेण्यास बरीच सवड असल्यामुळे, आम्ही तेथे फेरफटका मारू लागलो. चर्चा सुरू झाली की, काय होणारय उद्या? कसा असेल तीन दिवसांचा कार्यक्रम? सवार्र्ंच्या मनात उत्सुकता होती. सकाळी वेळेत सर्व जण तयारी करून ‘दीनदयाल उपाध्याय सभागृहात’ पोहोचलो. कुठलीही औपचारिकता न होता प्रथम सत्र सुरू झाले. वक्त्यांनीच स्वत:चा परिचय सुरुवातीला करून दिला. त्या सत्रापासूनच आजवरच्या ‘सरकारी कार्यक्रमांपेक्षा’ हा काही वेगळा आहे, याची जाणीव व्हायला सुरुवात झाली. मध्ये चहा/कॉफी जागेवरच मिळाले. प्रथम सत्रानंतर लगेच दुसरे सत्र ‘ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी’ प्राची साठे यांनी घेतले. या सत्रातच सर्व तज्ज्ञांना ‘आपल्याला विद्यार्थ्यांसाठी काय व कसे शिक्षण द्यायचे आहे, याची उद्दिष्टे उमगण्यास सुरुवात झाली.

वेगवेगळ्या प्रभाग, स्तर, विषय, विचारप्रवाह, जातधर्म, पंथ, लिंग या सर्वांच्या पलीकडे जाऊन ‘शिक्षक’ नव्हे, शिक्षणाची तळमळ असलेले शिक्षणाचे अग्रदूत, या भूमिकेत आम्ही अलगद कसे आलो, हे आम्हाला कळलेही नाही. ‘शिक्षक’ म्हणून एक वर्ष अनुभव असलेल्यांपासून ते सेवानिवृत्त होऊन बरीच वर्षें झालेल्या, अशा सर्व वयोगटातील शिक्षकांसाठी हा पहिला अनुभव होता. ज्यातून ‘आपण’ या नव्या धोरणाचा महत्त्वाचे घटक आहोत, असा सन्मानजनक दिलासा त्या भाषणातून मिळाला. ‘जबाबदारी ही घेण्याची नसून ढकलण्याची बाब आहे,’ असा सरकारी खाक्या आजवर अनुभवलेले अनेक जण अचंबित झाले.

प्राची साठे एक पॉवरफुल अधिकारी, महिला अधिकारी, सक्षम महिला अधिकारी. या पलीकडे जाऊन उत्तम संयोजक, एक व्यक्ती, एक उत्तम सुज्ञ, सुजाण शिक्षणतज्ज्ञ, एक मातृहृदयी शिक्षक, आपल्यातील एक, अशी प्रतिमा सर्वांच्याच मनात घर करून गेली. प्राची साठेंचे विचार हे निव्वळ ज्ञानातून होते असे न वाटता अनुभवातून, तळमळीतून होते, याची जाणीव झाली. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे ८० टक्के लोक प्रत्येक बाबींचा सकारात्मक विचार करू लागले.

जेवणाच्या सुटीनंतर प्रधान सचिव नंदकुमार यांचे भाषण, नव्हे संवाद होता. आमच्यातील काही जण त्यांना ओळखत होते म्हणे. अनेकांच्या व्हॉट्स ऍप ग्रुपवर ते आहेत असे कळले. नुसते असून नसल्यासारखे नाहीत, तर ऍक्टिव्हपण आहेत. बर्‍याच ग्रुपवर हेही कळले. असो. एक अति उच्चपदस्थ अधिकारी कुठलीही अधिकारशाही न गाजवता सहज संवाद साधत ‘या हृदयीचे त्या हृदयी’ सहजपणे करीत होता. हेही इतक्या वर्षांत पहिल्यांदा अनुभवायला मिळाले. हे सर्व अधिकारी अतिशय ‘टेक्नोसॅव्ही’ आहेत. टेक्नॉलॉजीचा छान वापर करून, वेळेेसे सुनियोजन करतात, याचे प्रात्यक्षिक अनुभवायला मिळाले. त्यांनी मोजक्या मुद्यांवर आमच्याशी प्रश्‍नोत्तरांच्या चर्चेच्या माध्यमातून संवाद साधला.

सूर्य-पृथ्वी, प्रोटॉन-इलेक्ट्रॉन्स यांच्या गतीचे प्रात्यक्षिक, आमच्यातील भूगोल व विज्ञान तज्ज्ञांपैकी प्रत्येकी दोघांकडून करवून घेतले. ‘पृथ्वी-सूर्य, इलेक्ट्रॉन्स-प्रोटॉन्स या दोघांच्याही कक्षा भिन्न असतात, दोघेही परिक्रमण-परिभ्रमण करीत असतात. एकमेकांवर आदळत नाहीत, आदळले तर स्फोट, सर्वनाश होऊ शकतो.’ हे सर्व संवादात्मक पद्धतीने करवून दिल्यावर त्यांनी प्रश्‍न केला की, ‘पती-पत्नी’ संबंध कसे असावेत? प्रश्‍न ऐकताच थोडे विचित्रच वाटले. त्यांनी विचारले, कुणी पती-पत्नी येथे आहेत का? नाही, असे उत्तर आल्यावर ते म्हणाले, यांनीसुद्धा आपापल्या कक्षेत स्वतंत्र का राहू नये? एकमेकांवर का कुरघोडी करावी? घटस्फोट का व्हावेत? लिव्ह इन रिलेशनशिप का असावी? प्रत्येक मानव आपल्या कक्षेत न राहता दुसर्‍याच्या कक्षेत का डोकावतो? या वृत्तीमुळे आज कुटुंब, समाज, पर्यायाने देश अस्थिर झालाय्. कुणावर ‘विजय’ का मिळवावासा वाटतो? त्याला त्याच्या परीने जगू द्या.

तुम्ही ‘श्रेष्ठ’ हे सिद्धच का करावेसे वाटते? अशी मौलिक विचारपरंपरा प्रत्येकाच्या डोक्यात सुरू झाली. ती त्यांच्या मननीय प्रश्‍नमालिकेमुळेच. पुढे ते म्हणाले, ‘इतिहास’ का शिकवायचा? इतिहास शिक्षक उत्तरले, गतकाळाच्या इतिहासावरून पुढचे भविष्य अवलंबून असते म्हणून- मग पुन्हा प्रश्‍न आला, ‘महायुद्ध का झाले?’ उत्तर आले, ‘सत्ता, अर्थकारण व पुढे महायुद्ध पाण्यासाठी होईल.’ असे ऐकल्याबरोबर त्यांनी प्रश्‍न केला, हे असे भविष्य घडविण्यासाठी हा असा इतिहास तुम्ही का सांगता. युद्ध होणार नाहीच, असे का शिकवीत नाही? सर्व जण गोंधळून गेले. त्यांना काय म्हणायचे तेच कळेना. मग ते म्हणाले, शिवाजी महाराजांचा युद्धाचा इतिहास शिकवा, पण शिवाजींचे सुराज्य, जलव्यवस्थापन, किल्ले स्थापत्य, सुशासन का शिकवीत नाही? इतिहास सकारात्म्कपणेही शिकविता येतो की. तुम्ही ‘वाईट होईल’ असेच गृहीत धरून का लिहिता? चांगले राहायला तुम्हालाच नकोय् का? तुम्ही स्वत: भन्नाट विचार करा.

तुमचे विद्यार्थी भन्नाट उत्तरे देतील, त्यांना स्वीकारा. विविध शक्यता, विचार यांचे स्वागत करा. अट्टहास, आडमुठेपणा सोडा, जगा व जगू द्या. याच अर्थाचा संवादात्मक सुंदर संवाद त्यांनी आमच्याशी साधला. सकाळपासून ते सायंकाळी सातपर्यंत प्रोटोकॉल, अधिकार, आदेश, बॉस इज ऑलवेज राईट, याचा लवलेशही कुठेही कोणाच्याही बोलण्यात, वर्तनात, कृतीत आढळला नाही. उलट, आपण सर्व एकाच ध्येयाचे पाईक आहोत, हे अधिकाधिक दृढ होत गेले. या दिवशी सर्वांना ‘होमवर्क’ होते- ‘उद्दिष्ट व अपेक्षित बदल’ यावर चिंतन करून विचार लिहून आणा. शॉर्ट असायन्मेंट दिले होतेच. शिवाय एका पुस्तकाचे काही मुद्यांवर सकारात्मक परीक्षण करून या. अशा प्रकारे पहिला दिवस भरगच्च, भारावलेला, भरभरून मिळालेला असा गेला.

दुसरा दिवस सकाळी ९ पासून सुरू झाला. तोच प्राची साठेंच्या अभ्यासपूर्ण प्रगल्भ जाणिवेच्या मांडणीनेच. कोठारी कमिशनपासून ते आजवर शिक्षणक्षेत्रात काय झाले? योजना व प्रत्यक्ष अंमलबजावणी यात नेमके काय, कुठे, कसे आपण वागलो? झालेल्या गोष्टींपासून पुढे आपल्याला अधिक चांगले कसे काय करता येईल? याची सुंदर उलगड त्या करीत होत्या. दोन कधी वाजले ते कळलेच नाही. जेवणानंतर विषयवार बैठक होती. एक धडा नव्या युगानुरूप नव्या उद्दिष्टांसह तयार करण्याचे ‘टास्क’ आम्हाला दिले गेले.

प्रत्येक ग्रुप कामाला लागला. ८.३० वाजता नाइलाजाने जेवायला जाणे भाग पडले. पुन्हा उरलेले ‘टास्क’ पूर्ण करता करता रात्रीचे अकरा कधी वाजले कळलेच नाही. दुसरा दिवस अतिशय बिझी, पण छान गेला.

तिसरा समारोपीय दिवस. आज संपतेय ही सुंदर पर्वणी, याचा खेद प्रत्येकाच्या मनात होताच. मंत्रिमहोदय वेळेचे पक्के. त्यांनी म्हटल्याप्रमाणे ९ वाजता ते परिसरात हजर होते. सर्वांमध्ये ‘विदाऊट सिक्युरिटी’ सहज वावरत होते. कुठे अभिनिवेष, तोरा, डामडौल नव्हता. सेल्फी, फोटोसेशन, सिंगल फोटो अगदी सहज, उत्स्फूर्त उत्साहाने देत होते. अगदी दूर असलेल्यांनाही आवाज देऊन, या की ग्रुप फोटोत, अशा सहजतेने ते वावरत होते. तेव्हा जाणवला फरक. कार्यक्रमसुद्धा अगदी अनौपचारिक पण संवादात्मक होता. त्यांच्या सुंदर अनुभव कथनातून त्यांनी थोडक्यात ‘धोरण’ मांडले. दोन दिवस ‘होमवर्क’ केलेले आम्ही सर्व जण त्या धोरणाचा अविभाज्य, सन्माननीय घटक झालेलो होतोच. पुढे त्यांनी प्रश्‍नोत्तरे घेतली. काळाची पावले ओळखून वागणारे ते ‘जाणते मंत्री’ म्हणून निश्‍चितच सर्वांच्या आपुलकीचे वाटले. जाताना त्यांनी प्रत्येकाला उत्तम पुस्तकांची भेट दिली. वर राजकीय टपली दिलीच- ‘‘मी घेणारा मंत्री नाही हं, देणारा आहे.’’

स्वत:चा फोन नंबर व ई-मेल आयडी सर्वांना उपलब्ध करून दिला. शिवाय तुम्ही शिक्षक वा तुमचा पगार हा आमच्यावर बोझा नसून ही विद्यार्थ्यांच्या भविष्याची गुंतवणूक आहे, असा त्यांनी दिलासा दिला. इतकेच नव्हे, तर कृतिशील शिक्षकांची बरेचदा शालेय अधिकारी अडवणूक करतात, याची मला पूर्ण कल्पना आहे, असेही ते म्हणाले. यावर लवकरच उपाययोजना होईल. शिक्षणक्षेत्रात काम करणार्‍या प्रत्येकाला सुयोग्य काम, आदर मिळेल, याची ग्वाहीच त्यांनी जणू दिली.

त्यांच्यानंतर शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर बोलण्यास उभे झाले. खरे तर दोन दिवसांत आम्ही धोरण, आयोग, नीती जाणू लागलोय. आता हे आणखीन काय वेगळं मांडतील? असा विचार डोक्यात आला. पण, त्यांनी सुरुवातच अतिशय सुंदर, सुबद्ध पद्धतीने केली.

काय हवे? कसे हवे? कशासाठी हवे? हे कळलेच होते. आता कशा पद्धतीने व केव्हा हवे, हे त्यांच्या बोलण्यातून कळले. विद्यार्थी निव्वळ बुद्धिमान असून चालणार नाही, तर शक्तिमान, बलवान, नीतिमान असावा, असा आग्रह त्यांनी मांडला. आपल्या छोट्याच पण व्यासंगी, काव्यपूर्ण, शैलीत त्यांनी सर्वांची मनं जिंकून घेतली. अशा प्रकारे समारोपाचा कार्यक्रम संपला. चहापानानंतर प्रत्येक गटाने तयार केलेले पाठ सादरीकरण सुरू झाले. दोन वाजेपर्यंत पहिल्या गटातील सर्व विषय आटोपले. नव्या दृष्टीने उत्तमोत्तम सादरीकरण झाले. जेवणानंतर दुसर्‍या गटाचे सादरीकरण झाले. ते सादरीकरण पाहताना खात्रीच पटली की, ‘आनंददायी’ शिक्षण मिळणारच! शिक्षणक्षेत्रातील कोणताही घटक उत्कृष्ट शिक्षणापासून वंचित राहणार नाही. प्रत्येकाला सन्मानासह ज्ञान, कौशल्य प्राप्त होणारच. एकूणच काय, महाराष्ट्राचे आधुनिक सक्षमीकरण खर्‍या अर्थाने सुरू होण्याची ही नांदी या उद्बोधन वर्गाने झाली, यात शंकाच नाही.

- डॉ. प्रज्ञा शरद देशपांडे
९३७१५७४३३०

विश्‍वबंधुत्व यांचेही ठायी ?

सध्या देशात म्हणजे टीव्ही, सोशलमीडिया यावर एकाच प्रश्‍नाच्या उपप्रश्‍नावर चर्चा (!) घडवून आणली जात आहे. ते थोडक्यात असे. या देशात ‘न्याय’ मिळेल का? विदेशात पळालेल्या गुन्हेगारांना भारतात परतावे, असा विश्‍वास वाटेल का? आंतरराष्ट्रीय समुदाय काय म्हणेल? मानवतेच्या दृष्टिकोनातून गुन्हेगारांमध्येसुद्धा भारताची विश्‍वासार्हता वाढेल का?

बाकी देशात कुठे हल्ले झाले, अपघात झाला, थोर-मोठे गेले, शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या, यात विशेष वेगळे काय? आला जीव जाणारच! पण लाखोंचे पोशिंदे मात्र वाचलेच पाहिजेत, होय ना?

त्या याकुबने १९९३ मध्ये बॉम्बस्फोटासाठी फक्त पैसे वगैरे दिले म्हणतात. यात एवढं काय? शिवाय (देशप्रेमामुळे) स्वतःहून तो भारताच्या स्वाधीन झाला असं म्हणतात. मोठ्या धीराचा हो! यापूर्वीही त्याने अनेक संस्था, व्यक्ती, कार्य, उलाढाल्या या सर्वांसाठी कित्येकदा तरी पैसे दिलेच असतील ना? मुळात ‘देण्याची’ दानत हवी त्यासाठी. आता त्याने अखिल विश्‍वातून स्वतःच्या विश्‍वासार्हतेवर करोडो रुपये गोळा करून इथल्या मंडळींना पैसे वाटले. आता त्यातून त्या मंडळींनी बॉम्बस्फोट केला. यात त्याचा दोष तो काय? पण अशा लोकांची ‘आंतरराष्ट्रीय’ विश्‍वात केवढी पत आहे, याचा संकुचित लोक विचारच करीत नाहीत.

खरं तर दाऊदचाही तसा दोष नाही. एक तर संपूर्ण चित्रपटसृष्टीला ग्लॅमर, झगमगाट मिळाला तोच तर या महापुरुषामुळे (!) दादासाहेब फाळके असतील चित्रपट संस्थापक. पण इंडस्ट्रीला चारचांद लावले ते साऊदसदृश्य लोकांनीच ना!
पूर्वी गावाकडे, स्टुडिओत, काश्मीर, सिमला, कोडाईकॅनल इत्यादी ठिकाणी शुटिंग करणार्‍या इंडस्ट्रीला एकदम फॉरेनची लोकेशन सहज परवडायला लागली. शोलेमध्ये गब्बरचा डायलॉग आहे ‘कितना इनाम रखा है रे सरकारने हमपर?’ सांबा उत्तरतो, ‘पुरे पचास हजार!’ तीस चाळीस वर्षात केवढा बदल झाला पाहा. याच फिल्म इंडस्ट्रीत आता करोडो रुपये मेहनताना घेतात हिरो-हिरोईन. हा सर्व बदल परिवर्तन, विकास, प्रगती, कोणामुळे? वर उल्लेखलेल्या प्रगतिशील लोकांमुळेच. बॉलीवूडला जनसामान्यांच्या डोळ्यात, मनात, चिंतनात, आचरणात आणण्याचे महान कार्य यानेच तर केलेय्! अतिशय परोपकारी जीव, दुसरे काय? बरं हा जिकडे हात टाकतो तो व्यवसाय फळफळतो, यात त्याचा काय दोष?
त्याने बांधकाम व्यवसाय सुरू केला. त्या धंद्याला ‘अच्छे दिन’ आले. ‘बिल्डर’ लोकांना ‘सोन्याचे दिनु’ अनुभवायला मिळाले.

चित्रपटसृष्टी, बांधकाम व्यवसाय, मग समाजसेवा, सेवाभावी संस्था, कार्यकर्ते, नेते इत्यादींशी त्याचे जवळचे संबंध जुळले. शेवटी मोठ्या मनाचा, ऍडजस्टिंग नेचरचा, मनमिळावू, सुस्वभावी असा हा दाऊद. पूर्वी तो घोड्यांच्या रेसवर पैसे लावी. मग त्याला कंटाळा आला. आता कोणावर पैसे लावावे? असा विचार करताना सुचले. क्रिकेट प्लेअर वा मॅचवर! हाडाचा ‘आंतप्रिनर’ काही स्वस्थ बसत नसतो. मग काय? लावले पैसे क्रिकेटवर, क्रिकेटला छान दिवस आले. बाकी खेळ रांगत होते. क्रिकेट मात्र कोटीच्या कोटी उड्डाणे घेत होते.

बाकीचे क्रीडापटू आवड म्हणून खेळत आणि पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून नोकरीधंदा करीत, त्यावेळी क्रिकेटपटू, क्रिकेटसंघटना करोडोंच्या उलाढाल्या सहज करीत होते. हे सर्व कोणामुळे? हे सांगायची गरज काय? आम खानेसे मतलब रखो, पेड गिननेसे क्या? हेच खरं!

अशाप्रकारे बांधकाम व्यवसाय, चित्रपट व्यवसाय, जाहिरात क्षेत्र, क्रिकेट, दूरदर्शन वाहिन्या इत्यादी सर्वांना नवसंजीवनी दिली ना या थोर उद्योजकाने! त्याचाच परिणाम अनेक असल्याप्रकारचे उद्योजक वेगवेगळ्या आयामांना समृद्ध करू लागले. कोणी हवाला, कोणी स्टॅम्प घोटाळा, कोणी काही, तर कोणी काही. देश प्रगतीवर नेण्याची अहमहमिकाच लागली ना!

पूर्वापार भारतात असले थोर महात्मे होतेच पण यासम हेच. कारण शार्विलक, अंगुलिमाल, वाल्याकोळी नंतर नंतर बहकले. मूळ उद्योजकतेचा वारसा सोडून दिला चक्क त्यांनी कोणाकोणाच्या बहकाव्यात येऊन. पण आजकालचे हे देशोत्थापक कोणाच्याही सांगण्याला फसत नाहीत. उलट त्यांच्याच विचार, व्यूह, कृती, योजना यांचा प्रभाव संपूर्ण समाजमनाला गुंडाळून ठेवतो. हेच त्यांचे खरे मोठेपण होय.

पूर्वी नाही का देवाधिदेव स्वर्गात अमरावतीत बसून पृथ्वीवर कोण काय करतोय्? कोणाचे पुण्य किती वाढले? याचा हिशेब ठेवायचे आणि कोणी डोईजड झाला की त्याला योग्य ती जागा दाखवून द्यायचे. आता ही थोर मंडळी सुद्धा जगात कुठेतरी गुप्त रूपाने राहतात. त्यांची कृपादृष्टी कायम भारतावर आहेच. समाजकरण म्हणू नका. राजकारण म्हणू नका, फिल्म इंडस्ट्री म्हणू नका, क्रिकेट म्हणू नका, जाहिरात क्षेत्र म्हणू नका, मीडिया म्हणू नका, बुद्धिजीवी म्हणू नका, एकही लोकोपयोगी लोकोपकारी क्षेत्र त्यांच्यापासून अस्पृष्य नाही. कोणाला उठवावे, कोणाला बसवावे, कोणाला पाळावे, कोणाला टाळावे हे सर्व नियोजन ते बसल्या जागी करतात. इथे ते आपल्याला फलद्रूपच झालेले दिसते. खरंच सर्वव्यापी सर्वज्ञ, सर्वसंचारी असे म्हटले तर वावगे ठरू नये. देव सर्वसंचारी, सर्वव्यापी असूनही पृथ्वीवरील कार्य करण्यासाठी देवदूत वा अवतार पाठवीत असतात. तद्वतच ही थोर मंडळी सुद्धा मानवतावादी, बुद्धिवादी, अभिव्यक्तिवादी, पुरोगामी, सेक्युलर, संवेदनशील, स्वधर्मी इत्यादी प्रकारच्या संघटना वा व्यक्तींकडून कार्य घडवून आणत असतात.

सर्वसामान्यांचा हिरो (?) दबंग नायक (?) स्टारांचा स्टार, महान भाईजान हे त्यापैकी एक देव (?) दूत होत. मुळात त्यांचे कर्तृत्व महानच आहे. पडद्यावर ते फार प्रेमळ, समजुतदार दिसतात. ‘जो बात तुझमें है, तेरी तसबीर में नही’ हे त्यांना शंभर टक्के लागू पडते. पडद्यावरील या प्रेमळ गृहस्थाने गंमत म्हणून एक हरीण मारले. जुन्या काळात राजेरजवाडेही शिकार करायचे. मग भाईजानपण जनता जनार्दनाच्या हृदयसिंहासनावर आरूढ अनभिषिक्त सम्राट नव्हते का? पण कोण्या बिज्जोई नामक जमातीने आक्षेप घेतला. त्याने फरक काय पडला म्हणा? उलट पिक्चर अधिक चालायला लागले ना भाईजानचे. अशीच हिंमत वाढून गेलेले भाईजान एकदा सोमरसास्वाद भरपूर करून ‘आजकल पाव जमींपर नही पडते मेरे’ अशा अवस्थेत गाडी चालवत असताना त्यांच्या गाडीखाली काही लोक चिरडल्या गेले. त्यात भाईजानची काय चूक? फुटपाथ झोपण्यासाठी असतो का? एक तर या देशात बेसुमार लोकसंख्या आहे. जेथे तेथे लोंढेच्या लोंढे. शुटिंगमुळे एक तर जाम थकायला होतं. ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’ अशा प्रवृत्तीला हा प्रेमळ जीव जातिभेद-धर्मभेद न पाळता अनेक ललना, रमणींवर निरपेक्ष (?) प्रेम करतो, त्यामुळे त्याचा प्रचंड शारीरिक मानसिक वेळ त्यात जातो. परिणामी थकवा हा येणारच. त्यासाठी सोमपान असलेच पाहिजे. अशा अवस्थेत गाडी रस्त्यावरून फुटपाथवर आली. त्याला तो बिचारा काय करणार? प्रत्येकाला अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहेच की. मग गाडीला का नको? गेली ती फुटपाथवर. घर सोडून हे फालतू लोक तेथे झोपले होते. त्याला ती गाडी काय करेल? यात भाईजानचा दोष? काहीही हं...

भाईजान अनेक उत्तमोत्तम पिक्चर करू लागले. कर्तव्यदक्ष, प्रेमळ, देशभक्त, तारणहार अशी प्रतिमा अधिकच दृढ झाली. असे हे गणपतीभक्त भाईजान याकुबची बाजू घेण्यासाठी नाही तर आंतरराष्ट्रीय समुदायासमोर भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी चिवचिवले (ट्विट केले) काय बिघडलं तर त्याने? कोणी उघड बोलतं, कोणी मनात घोकतं, कोणी कृती करतो, कोणी विकृती करतो. भारतात लोकशाही आहे. ही मतमतांतरे त्या प्रगल्भ (?) लोकशाहीचेच फळ नव्हे का? देशप्रेम, देशप्रेम म्हणून ऊर बुडविणार्‍या ‘संकुचित’ लोकांना कसे समजवावे की याकुब, दाऊद, टायगर, छोटा शकील इत्यादी महात्म्यांची शरीराने भारतात राहणारी, सर्व क्षेत्रांत पसरलेली अनुयायी मंडळी विशालहृदयी असल्यामुळे विश्‍वबंधुत्व जोपासतात, ‘हे विश्‍वची माझे घरं’ असं नुसते बोलत नाहीत, तर वागतानाही दिसतात.

एकूणच ‘कुणी निंदा कुणी वंदा आमचा स्वहिताचा धंदा’ अशा निरलस प्रवृत्तीने सतत कार्यरत असलेली ही मंडळी अशा महान लाखोंच्या पोशिंद्यांच्या मागे नेहमीच ठामपणे उभी राहणार यात शंकाच नाही. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ असले मोठे ध्येयच गाठायचेय् ना त्यांना!

- डॉ. प्रज्ञा शरद देशपांडे
९३७१५७४३३०

सद्वृक्षाची ‘कलम’

‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ अशी एक म्हण आहे. दुदैवाने शिक्षण क्षेत्राला ती लागू होत नाही. कारण स्वातंत्र्यानंतर शिक्षण क्षेत्रातून जे निर्माण झालंय् त्याला रसाळ, गोमटी म्हणणं धारिष्ट्यच ठरेल नाही? शिक्षणाने स्वयंपूर्णता, आत्मनिर्भरता, देशप्रेम विकसित व्हावयास हवे. पण भारत आज जगाच्या दृष्टीने ‘मार्केट’ बनलाय्. ‘और धंदेमे सब कुछ जायज है’|

शेतकरी आत्महत्या करताहेत, तरुण-शिक्षित नक्षलवादी बनत आहेत. सोबतच धर्मांध, मूलतत्त्ववादी आणि संवेदनशील (?)
होत आहेत. जाती-पातीच्या राजकारणात लोकांना लोटायला अनेक संघटना, ब्रिगेड, सेना, मूलनिवासी वगैरे सामाजिक संस्था
तयार होताहेत. बाबा, फकीर, आश्रम, दर्गा, मठ, स्पिरिच्युअल मास्टर इत्यादी समाजमनाला प्रभावित करताहेत. बेरोजगारांच्या
झुंडीच्या झुंडी प्रचंड प्रमाणात वाढताहेत्. अधिकृत-अनधिकृत घुसखोर देशाची साधन-संपत्ती लुटत आहेत. सगळ्याच ठिकाणी लाचलूचपत, फसवेगिरी वाढलीय्. सहा दशकांच्या स्वतंत्र भारतातील शिक्षण प्रणालीचे हे ‘फळ’ नव्हे का? कोणतीही उत्कृष्ट गोष्ट निकृष्ट पद्धतीने राबवली की तिचा कचरा होणार. किंवा कोणतीही निकृष्ट गोष्ट उत्कृष्टपणे राबविली तर ‘कचर्‍यातून कला’ होईल. पण टिकावू, दमदार, अमूल्य, दर्जेदार असणार नाहीच. दुदैवाने आज तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे.

मुळात ‘बीज’ सुद्धा हवे. ‘वातावरण’ सुसंगत हवे, ‘मशागत’ सजग हवी. वेळीच ‘कीड’ निपटून टाकावी. मग ‘डेरेदार
फलवान वृक्ष’ हमखास होणारच. समजा चुकून ‘जंगली वृक्ष’ वाढला तर त्यावर सद्वृक्षाची ‘कलम’ करावी लागते. शिवाय
जंगली वृक्ष मध्येच फोफावू नये म्हणून छाटत रहावा लागतो.
शिक्षण क्षेत्रालाही वरील संपूर्ण दृष्टान्त जसाच्या तसा लागू पडतो. चांगला शेतकरी हे सर्व कसोशीने करतो. कुठे ‘गाफिल’ राहिलाच तर आत्महत्येशिवाय पर्याय नाहीच. खरेच हा दृष्टांत आज देशाला, शिक्षण क्षेत्राला लागू पडत नाही का?

डॉ. प्रज्ञा देशपांडे
९३७१५७४३३०

भाषेचे वैशिष्ट्य

शिक्षणावर बोलू काही

जगात असंख्य भाषा आहेत. प्रत्येक भाषेचे आपले एक वैशिष्ट्य असते. भारतीय भाषांचे खास वैशिष्ट्य आहे ते म्हणजे स्पष्ट उच्चारण. प्राचीन काळी यवनादी परकीय लोकांना ‘म्लेंच्छ’ म्हणत असत. त्याला कारण होेते. म्लेंच्छ् हा मूळ धातू असून ‘त्याचा अर्थ अस्पष्ट उच्चार’ असा आहे. म्हणजे जे अस्पष्ट उच्चार करतात ते म्लेंच्छ, हा अर्थ होता. याचाच अर्थ असा अभारतीय विशेषत: ‘यवन’ अस्पष्ट उच्चार करायचे. असो. हे सर्व सांगायचे कारण उच्चार ज्या तोंडावाटे म्हणजे कण्ठ, तालू, मूर्धा, दन्त, ओष्ठ यांच्या सह जिभेच्या साहाय्याने होतो तिचे वळण बालवयात संस्कारक्षम, वयातच लागायला पाहिजे. जसे मराठी बालकं ‘ळ’ चा उच्चार करू शकतात. पंजाबी उत्तरप्रदेशी प्रौढ तो उच्चार करू शकत नाहीत. कारण उच्चारणाचे संस्कार. मग बालवयात कोणते वर्ण उच्चार शिकवायला हवे? याचे नि:संदिग्ध उत्तर आहे ‘भारतीय’ भाषेचे. कारण इंग्रजीत अइउऊ इत्यादी २६ मुळाक्षरे म्हणजे ‘उच्चारण ध्वनी’ आहेत तर कोणत्याही भारतीय भाषांमध्ये इंग्रजी पेक्षा जास्त ध्वनी म्हणजे (वर्ण उच्चारण) आहे. पुढे भाषा व त्यातील वर्णसंख्या म्हणजे ध्वनी संख्या दिलेली आहे.

टेबलवरून सिद्ध होते की कोणतीही भारतीय भाषा इंग्रजीपेक्षा वर्णोच्चाराच्या बाबतीत श्रीमंत आहे. शिवाय उच्चार स्पष्टता ही भारतीय भाषांची खासीयत आहेच. जिभेचे वळण बालवयातच लागते हा सर्वांचा अनुभव आहेच. मग ग्लोबलायझेशनच्या क्रेझ मुळे इंग्रजी उच्चारण बालकाला शिकविणे हे कितपत योग्य आहे? याचा विचार इतरांचे जाऊ द्या पण पालक म्हणून आपण करणे जरुरीचे नाही का? लहानबालकांना भारतीय भाषांमधील अक्षरज्ञान वा वर्णमाला शिकविणे बालकाच्या दृष्टीने अधिक लाभदायी नव्हे का?

मग बालकाला ए फॉर ऍपल पेक्षा अ, आ, ई शिकविणे जास्त गरजेचे नाही काय?

संस्कृत (वैदिक) ६४
संस्कृत (लौकिक) ५२
पाली ४३ किंवा ४१
हिंदी ४९
मराठी ४९
बंगाली ५२
तेलगू १६ + ४१
तामिल १३+ १८
गुजराती ४९
उर्दू ३६+१२
फारसी २९
अरेबी ३१
इंग्रजी २६
मल्याळम् १५+४१

- डॉ. प्रज्ञा देशपांडे
९३७१५७४३३०

कालाय तस्मै नम:

शिक्षणावर बोलू काही

एक १२ वी पास झालेला मुलगा इंजिनीअरिंग कॉलेजात जातो, फॉर्म भरतो. परतताना तिथल्या सुरक्षा कर्मचार्‍याला विचारतो, ‘भैया कॉलेज कैसा है?’ तो सांगतो ‘अरे एकदम बढिया. मी याच कॉलेजातून पास झालोय्!’ एक बीटेक् झालेला बेरोजगार इंजिनीअर नोकरीसाठी वणवण भटकतो पण नोकरी मिळत नाही. शेवटी पोटाची भूक भागवायला सर्कशीत भरती होतो. तेथे त्याला माकडाची झूल पांघरून काम करावे लागते. एकदा माकडचेष्टा करता करता तो वाघाच्या समोर निपचित पडतो. त्याला साक्षात मृत्यू समोर दिसू लागतो. सर्व प्रेक्षक श्‍वास रोखून बघत असतात. वाघ जवळ येतो..... आणि.... त्याच्या कानात म्हणतो ‘भिऊ नकोस मी एमटेक्‌‌ आहे.’

१९७० चे दशक इंजिनीयर साहेबांचे घर कोठे आहे? गावातले चार जण नेऊन सोडतात. १९८० चे दशक इंजिनीयर साहेबांचे घर कोठे आहे? या इथून गेल्यावर पलीकडच्या गल्लीत तेथे.... १९९० चे दशक इंजिनीयर साहेबांचे घर कोठे आहे? यावर उत्तर कोणत्या इंजिनीयरचं. इथे चार लोक इंजिनीयर आहेत त्यापैकी कोणते? नंतर २००० चे दशक, प्रश्‍न तोच, इंजिनीयर साहेबांचे घर कोठे आहे? अहो, कोणता इंजिनीयर म्हणताय्? इथं खूप जण इंजिनीयर आहेत. तुम्ही नीट पूर्ण नाव व पत्ता सांगा. २०१० चे दशक ‘काय इंजिनीयर म्हणता काय?’ कोणालाही दगड मारा, ज्याला लागेल तो इंजिनीयरच असेल खात्रीने. इंजिनीयर साहेबांचे घर विचारता का? हा हा हा हा ते तिथे पुलाखाली बसले आहेत ते सगळे इंजिनीयरच आहेत. इंजिनीयरला घर असतं का राजा? हे पुलाखाली बसलेले सर्व इंजिनीयरच आहे.

असे अनेक जोक्स सोशल मीडियावर फिरत असतात. सगळे खळखळून हसतात या जोकवर पण सध्याची शिक्षण क्षेत्राची विदारक परिस्थिती यातून अधोरेखित होते आणि भविष्याचा विचार करताना नुसते अंतर्मुखच नव्हे हताशही व्हायला होते.
पूर्वी इंग्रजी साम्राज्याला हवे असलेले कारकून मिळण्यासाठी ‘शिक्षण’ सुरू झाले. आज कथित समाजसुधारक, शिक्षणमहर्षी, थोर विचारवंत, देशभक्त बिझिनेसमन यांच्या सात पिढ्या सुखेनैव जगाव्यात म्हणून संपूर्ण ‘व्यवस्था’ चालवल्या जातेय्.
चालायचंच!!

‘कालाय तस्मै नम:! मेरा भारत महान्’

डॉ. प्रज्ञा देशपांडे
९३७१५७४३३०

‘तो’ जाणण्याचे शिक्षण

भक्त प्रल्हादाला हिरण्यकश्यपूने विचारले, तुझा ‘तो’ इथे आहे का? प्रत्येक वस्तूत, खांबात, चराचरात ‘तो’ भरला आहे असे छोट्या प्रल्हादाने सांगितले.
‘ओम् पूर्णमद: पूर्णमिदम् पूर्णात् पूर्ण मुदच्यते

पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते!’

या उपनिषदातील प्रार्थनेत सुद्धा चराचरात व्यापूनही ‘तो’ पूर्णपणे उरलेला आहे. असा ‘तो’. प्राचीन काळी संपूर्ण शिक्षण ‘तो’ समजण्यासाठीच असे. ‘त्याला’ समजून घेणे, ‘त्याला’ प्राप्त करणे, ‘त्याच्यात’ समरस होणे ‘त्याच्यातच’ विलीन होणे, ‘तो’ म्हणजे ‘मी’. ‘मी’ म्हणजेच ‘तो.’ ‘तो’ जाणून घे असेच शिक्षण मिळायचे. श्‍वेतकेतूला झालेला स्वशिक्षणाचा गर्व पाहून त्याला विचारले, असे काय आहे ज्याला जाणल्याने हे सर्व आपोआप समजते व ज्याच्या अज्ञानामुळे बाकी सर्व ज्ञान शून्यवत् ठरते, या विषयीचे तुझे शिक्षण झालेय् का? त्याने ‘नाही’ उत्तर दिल्यावर पित्याने ‘त्याच्या’ विषयी ज्ञान दिले.

आजही ‘त्याच्या’ साठीच शिक्षण घेतले जाते. सर्व जीवन ‘त्याच्या’तूनच निर्माण होते. ‘त्याच्यासाठीच’ संसार होतो. ‘त्यातच’ जीवनाचा विलय होतो. आजही ‘तोच’ चराचरात व्यापलाय. व्यापून पुन्हा पूर्णपणे ‘तोच’ उरलाय ‘तो’ असेल तरच ‘व्यक्ती’ ठरतो. ‘तो’ नसेल तर सर्व शून्य. आजच्या विद्यार्थिवर्गासमोरही हाच प्रश्‍न मोठा ठरतोय् की ‘असे काय असेल ज्याच्यामुळे इतर सर्व ज्ञान स्वत:हून कळते किंवा ज्याच्या अभावाने असलेले ज्ञान शून्य होते?’

काय हा योगायोग? वैदिक संस्कृतीतही ‘तो’ आणि आजही ‘तोच’ महत्त्वाचा आहे. प्राचीन काळी भारत ‘सोनेकी चिडिया’, ‘सोन्याचा धूर’ निघणारा देश होता. देशविदेशातील विद्वान ‘ज्ञानगुरू’ म्हणून भारताला मानायचे. मग आज भारताचे ‘ते’ दिवस का नाही?

कारण ‘तो’. पण ‘तो’ म्हणजे कोण? वैदिक संस्कृतीत ‘तो’ म्हणजे ब्रह्मम होते. संपूर्ण शिक्षण ब्रह्मपर, आत्मोन्नतिपर होते. ऐहिक व्यवहार सुख हे त्या ज्ञानाचे दुय्यम फळ होते. आजही ‘तो’ आहेच. तो म्हणजेच अर्थ म्हणजेच पैसा; इतकाच काय तो बदल. आजचे शिक्षण केवळ पैसे कमविण्यासाठीच असते. पैसा असेल तर सर्व ‘ज्ञान’ ज्ञान ठरते. पैसे नाही तर खरं ज्ञान असूनही शून्य ठरते. शिक्षण क्षेत्रात झालेल्या या छोट्या बदलामुळे तेव्हाचा भारत आणि आजच्या भारतात एवढा फरक पडलाय्. काय प्रभाव आहे न ‘त्या’चा?

डॉ. प्रज्ञा देशपांडे
९३७१५७४३३०

असून अडचण, थांबून खोळंबा

शिक्षणावर बोलू काही

शिक्षण क्षेत्र म्हणजे देवघरातील समईची ज्योत असे म्हणतात. आज सिंगल / डबल / ट्रिबल बेडरूमचा फ्लॅट असू दे, देवघराची जागा, स्वयंपाक घरातील सिंकच्या वरच्या रॅकमध्ये, फारच झाले तर

एखाद्या कोपर्‍यात, नाहीतर खचक्यात केली जाते. देवाजवळ समई लावूनही मोठा इलेक्ट्रिक दिवा, विद्युत माळा हव्यातच. आजच्या संपूर्ण शिक्षण क्षेत्राचे असेच झाले आहे ‘असून अडचण, थांबून खोळंबा.’

पूर्व प्राथमिकपासून तर संशोधनपर शिक्षण क्षेत्रात शिक्षक वर्ग असतो. अनुदानित/विना अनुदानित संस्था असतात. सर्व आहे पण... सरकारी दृष्ट्या शिक्षकांचे पगार व त्यांचे कामकाजाचे तास

व्यस्त प्रमाणात आहे. मग शिक्षण सेवक, कॉण्ट्रॅक्ट पद्धतीचे प्राध्यापक पद इत्यादी शैक्षणिक रोजंदारी याच क्षेत्रात खपते आहे. शिवाय उन्हाळा-दिवाळीच्या सुट्या सवार्र्ंच्याच डोळ्यात सलतात. अनेक कारणांनी ‘शिकविणे’ हे प्राथमिक कर्तव्य फक्त कागदापुरतेच उरते. मग शिक्षकांना शिक्षणेतर इतर कामी लावले जाते. काही शिक्षकही थोड्या मोबदल्यासाठी अशा कामी स्वत:ला गुंतवून घेतात. जनगणना, बीएलओ, निवडणूक शिवाय सरकारी गरजेनुसार इतर कामं. प्राचीन काळी म्हण होती ‘मागता येत नाही भिक, तर मास्तरकी शिक.’ आजही सो कॉल्ड सन्मान सोडला, तर शिक्षकी पेशाची अवस्था तशीच आहे. का? याला कोण जबाबदार?
शिक्षक? व्यवस्था? नेत्यांच्या संस्था? या सर्व प्रश्‍नांकडे नको वळायला. पण... ही सत्य परिस्थिती आहे की शिक्षण क्षेत्राची अवस्था आजकालच्या फ्लॅटमधील देवघरांसारखी झाली आहे. ड्राईंगरूम, बेडरूम, टॉयलेट्स यावर वारेमाप इंटेरियर खर्च होतो. बाल्कनीसुद्धा ‘प्रसन्न’ ठेवतात. डायनिंग हॉल सुद्धा स्पेशियस हवा. मग स्वयंपाकघरातील छोटा कोपरा देवांच्या नशिबी.

खरे तर सर्वच क्षेत्राला ऊर्जा देणारे क्षेत्र म्हणजे शिक्षण क्षेत्र. प्रश्‍न नुसत्या बाह्य देवघराचा नाही, तर आतील देवाचा पण आहे. गेल्या काही वर्षांत खरोखर सन्माननीय शिक्षकांचे दाखले वानगीदाखल दुर्मिळ झाले आहेत. प्राचीन काळातील गुरू-शिष्य परंपरेलाच अजून पुढे ठेवावे लागते. चाणक्य, द्रोणाचार्य, दादोजी कोंडदेव इत्यादींवर बॅनच आहे. ‘आदर्श’ पुरस्कार प्राप्त शिक्षक तरी आदरणीय ठरतात का? ज्या समाजात घोटाळे सुद्धा ‘आदर्श’ आहेत तेथे कोणता पेशा आदर्श ठरू शकेल का, हा प्रश्‍नच आहे. जोपर्यंत देवाला देवत्व मिळत नाही, घरात देवघराला मध्यवर्ती स्थान मिळत नाही तोपर्यंत घराचे मांगल्य अनुभवता येणार नाही. आजकाल प्लास्टिकचे हार, रेडिमेड धुपबत्ती, रेकॉर्डेड पूजा विधी, मंत्रआरतीमुळे ‘इन्स्टण्ट’ मंगलमय वातावरण तयार होते, पण ते हृदयाच्या मुळापर्यंत भिडत नाही. तद्वत शिक्षक-शिक्षण क्षेत्रासाठी मुळापर्यंत पोहोचणारे उपाय केल्या जाणार नाहीत, तोपर्यंत ‘सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना’ शक्य नाही.

डॉ. प्रज्ञा देशपांडे
९३७१५७४३३०

शिक्षणाच्या नावाने

आज एकूणच भारतात कृतीपेक्षा उक्तीला जास्त प्रसिद्धी मिळताना दिसतेय्. शिक्षण क्षेत्रही त्याला अपवाद नाही. शिक्षणाने काम साध्य व्हावे म्हणून बोलणे, लिहिणे, चर्चा करणे यावर प्रचंड मंथन चालू आहे. अतिआदर्शवादी शिक्षण योजना आखल्या जातायत्. पण कृतीतून फलद्रूप किती झाल्या? याचा हिशोब करायलाही कोणालाच वेळ नाही.


पूर्वी ११ मॅट्रिक होते. आता १० वी मॅट्रिक. आता १० वी नंतर विषय निवडीचे स्वातंत्र्य आहे. पूर्वी ८ वी पासून विषय निवडीचे स्वातंत्र्य होते. पूर्वी १० वी नंतर बीएएमएस हा सात वर्षांचा डिग्री कोर्स, तर ३ वर्षांचा इंजिनीअरिंगचा डिप्लोमा कोर्स होता. १२ वी नंतर पाच वर्षांच्या इंटरर्नशिपसह एमबीबीएस करता येत होते. चार वर्षांच्या इंजिनीयरिंगनंतर एमबीए न करताही चांगल्या नोकर्‍या मिळत व आता १२ वीनंतर एंटरन्स, मग प्रवेश. केवळ एमए करून सिनिअर कॉलेजात प्राध्यापक झालेले आजही समाजात ज्येष्ठ नागरिक आढळतील. आता मात्र एमए, पीएचडी शिवाय नेट, सेट करूनही नोकर्‍यांची वानवा. नुसत्या बीएड. डीएडने नोकरी लागण्याचा जमाना गेला. आता नोकरीसाठी पण पुन्हा परीक्षा.

खरंच आता ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्याय् की काय? पूर्वी साक्षरता एवढी नव्हती म्हणून नोकर्‍या लागायच्या. हा एक लाडका समज. आता मात्र नोकर्‍या कमी झाल्याय् का? पूर्वी एवढी बेकारी नव्हती. आताच एवढे बेकारीचे पीक कसे काय आले?

आज जिकडे पहावे तिकडे भ्रष्टाचार बोकाळलाय्. भ्रष्टाचार करणारे कोणी अशिक्षित नाही तर उलट शिक्षित, उच्चशिक्षित आहेत. मग खरंच ‘शिक्षण म्हणजे मानवी उन्नयनाचे साधन.’ असे म्हणता येईल का?
अशा पुस्तकी व्याख्या शब्दांचे बुडबुडेच नव्हे का? आज सर्व क्षेत्रात ‘सॅचुरेशन’, सर्व क्षेत्रात आंतरिक असंतोष आढळून येतो. प्रत्येक ज्ञानक्षेत्र दुसर्‍याच्या ज्ञानक्षेत्रात घुसखोरी करतायत्. इंजिनीअर मॅनेजमेंट कोर्स करतो, बँकेत लागतो. डॉक्टर मॅनेजमेंट कोर्स करतो हॉस्पिटल चालवायचा ठेका घेतो.

डी फॉर्म झालेला उमेदवार लायसन्स भाड्याने देऊन अजून एखाद्या डिप्लोमाच्या आधारे दुसरीकडे नोकरी करतो. शिक्षक नोकरीसह ट्युशन घेतात. नाही तर विमा पॉलिसीज् काढतात. गुंडा ठेकेदार होतो. ठेकेदार बिल्डर होतो, बिल्डर लिडर होतात, लिडर हिरो होतात, हिरो समाजसेवक होतात, समाजसेवक बिझनेसमॅन होतात. एकूणच काय तर कुणीही, केव्हाही, काहीही होतो. बक्कळ पैसा कमावतो आणि सफल ठरतो. जणू त्याच्याचसाठी शिक्षण घेतात सर्वजण, अशी स्थिती आहे.
एकूणच सद्य:परिस्थिती पाहता शिक्षणाच्या व्याख्या, थोर शिक्षणशास्त्रज्ञांचे शैक्षणिक विचार हे फक्त परीक्षेत मार्क मिळण्यासाठी पाठ करावे लागतात किंवा भाषण लेखनात उल्लेख करायला कामी येतात, असे सामान्यांना वाटले तर गैर काय?

डॉ. प्रज्ञा देशपांडे
९३७१५७४३३०

कितना बदल गया इन्सान

तारीख: 07 Oct 2015 20:35:11
शिक्षणावर बोलू काही
पूर्वी ‘देव अनादी-अनंत अविनाशी’ आहे असे म्हणायचे. आज देवाचे माहीत नाही पण कचरा, प्रदूषण, भ्रष्टाचार व ट्युशन्स मात्र नक्कीच खात्रीपूर्वक अनादी (म्हणजे यांचा उगम कधी झाला ते माहीत नाही), अनंत (म्हणते यांचा अंत कधी होईल ते सांगता येत नाही), अविनाशी (म्हणजे याचा विनाश अशक्यच आहे) आहेत. कचरा, प्रदूषण, भ्रष्टाचार हा आपल्या सदराचा विषय नाही. मात्र शिक्षणाला पूरक म्हणून सुरू झालेली ‘ट्युशन’ संपूर्ण शिक्षण क्षेत्राला व्यापून पुन्हा शिल्लक उरलीय्, यातच तिची महती सामावलीय. पूर्वी फक्त ‘ढ’ मुलांना ट्युशन होती. पूर्वी शाळेपूर्वी वा शाळेनंतर किंवा सुट्ट्यांमध्ये ट्युशन असायच्या. आता ट्युशनमधून वेळ मिळाला तर शाळा-कॉलेज असू शकते. शाळा-कॉलेजमध्ये सत्रानुसार फी भरावी लागते. त्यातही वेगवेगळ्या आरक्षण, सवलतीनुसार फीमध्ये कन्सेशन मिळते. मात्र ट्युशनमध्ये शिकवणे सुरू होण्याआधी अर्धी रक्कम व शिकवणे सुरू झाल्याबरोबर उरलेली रक्कम भरावी लागते. कोणाला कमी कोणाला जास्त असा भेदभाव येथे नाही. कॉलेज-शाळेच्या बेंचवर धूळ असू शकते पण ट्युशनची बेंचेस गुळगुळीत. शाळा-कॉलेजमध्ये लाईट, पंखे सुद्धा ‘लक्झुरी’ समजावे तर ट्युशनमध्ये एसी, सेंट्रल कुलिंग असणारच. शाळेत गुरुजी घसा खोेकलून फळा-खडूच्या धुळीत शिकवितात येथे मात्र ग्लासबोर्ड, ई-लर्निंग इत्यादींची रेलचेल.

शाळेत, कॉलेजमध्ये उपस्थितीला ‘ढेंगा’ दाखविणारे सर्व विद्यार्थी ट्युशनमध्ये नियमित, दररोज बायोमेट्रिक करवितात. पूर्वी शाळा-कॉलेजमध्ये ऍडमिशन झाल्यावर ट्युशनमध्ये प्रवेश घेतला जाई. आता ट्युशनवाल्यांनी सांगितलेल्या शाळा-कॉलेजात प्रवेश घेतला जातो. शाळा-कॉलेजात पन्नासच्यावर विद्यार्थी संख्या असली तर ‘शिक्षकांचे पुरेसे लक्ष नसते’ अशी तक्रार करणारे पालक दीडशे ते दोनशेच्या ट्युशनला पाल्याला सहज पाठवतात. मुलांच्या वह्या नियमित तपासत नाहीत, अशी शाळेच्या पालकसभेत ओरड करणारे पालक वह्यांवर चेक ऍन्ड सिनचे ठप्पे मारणार्‍या वा सरळ छापील नोट्स देणार्‍या ट्युुशनला ‘ग्रेट’ समजतात. शाळेत कधी कोणत्या कार्यक्रमात ‘अध्यक्षीय भाषण’ लांबले तर उशीर झाला तर ‘अभ्यासाचा बहुमूल्य वेळ फालतू वाया गेला’ अशी ओरड करणारे विद्यार्थी ट्युशन टिचरचे ‘बर्थ डे’ सेलिब्रेशन प्लानिंग आठवड्यापासून ट्युशननंतर तासन्‌तास थांबून करतात. स्वत: पेपर तपासून विद्यार्थ्यांच्या चुका भर वर्गात समजावून दिल्या तर शाळेच्या शिक्षकाने ‘प्रेशर’ दिल्यामुळे विद्यार्थी ‘बरेवाईट’ करण्याची भीती वाटते. पण ट्युशनमध्ये तपासनिकांकडून तपासलेले पेपर सर्वांसमोर दाखवितात, भर वर्गात नापास विद्यार्थ्यांची नाव घेतात तेव्हा हे ‘प्रेशर’ कुठे जाते कळत नाही? परीक्षा शुल्क १०० रुपयांवरून १५० रुपये केले तरी ओरडणारे पालक दरवर्षी हजारोंनी वाढणार्‍या ट्युशन फीबद्दल मूग गिळून गप्प का? पूर्वी ट्युशनचा पत्ता विचारला तर ‘अमुक एका बंगल्याच्या बाजूला’ असा असे. आता मात्र लोक पत्ता सांगताना ‘या प्रख्यात ट्युशन क्लासच्या बाजूला’ असे सांगतात. खरंच! कितना बदल गया इन्सान!!!

- डॉ. प्रज्ञा देशपांडे
९३७१५७४३३०