Tuesday, January 26, 2016

विश्‍वबंधुत्व यांचेही ठायी ?

सध्या देशात म्हणजे टीव्ही, सोशलमीडिया यावर एकाच प्रश्‍नाच्या उपप्रश्‍नावर चर्चा (!) घडवून आणली जात आहे. ते थोडक्यात असे. या देशात ‘न्याय’ मिळेल का? विदेशात पळालेल्या गुन्हेगारांना भारतात परतावे, असा विश्‍वास वाटेल का? आंतरराष्ट्रीय समुदाय काय म्हणेल? मानवतेच्या दृष्टिकोनातून गुन्हेगारांमध्येसुद्धा भारताची विश्‍वासार्हता वाढेल का?

बाकी देशात कुठे हल्ले झाले, अपघात झाला, थोर-मोठे गेले, शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या, यात विशेष वेगळे काय? आला जीव जाणारच! पण लाखोंचे पोशिंदे मात्र वाचलेच पाहिजेत, होय ना?

त्या याकुबने १९९३ मध्ये बॉम्बस्फोटासाठी फक्त पैसे वगैरे दिले म्हणतात. यात एवढं काय? शिवाय (देशप्रेमामुळे) स्वतःहून तो भारताच्या स्वाधीन झाला असं म्हणतात. मोठ्या धीराचा हो! यापूर्वीही त्याने अनेक संस्था, व्यक्ती, कार्य, उलाढाल्या या सर्वांसाठी कित्येकदा तरी पैसे दिलेच असतील ना? मुळात ‘देण्याची’ दानत हवी त्यासाठी. आता त्याने अखिल विश्‍वातून स्वतःच्या विश्‍वासार्हतेवर करोडो रुपये गोळा करून इथल्या मंडळींना पैसे वाटले. आता त्यातून त्या मंडळींनी बॉम्बस्फोट केला. यात त्याचा दोष तो काय? पण अशा लोकांची ‘आंतरराष्ट्रीय’ विश्‍वात केवढी पत आहे, याचा संकुचित लोक विचारच करीत नाहीत.

खरं तर दाऊदचाही तसा दोष नाही. एक तर संपूर्ण चित्रपटसृष्टीला ग्लॅमर, झगमगाट मिळाला तोच तर या महापुरुषामुळे (!) दादासाहेब फाळके असतील चित्रपट संस्थापक. पण इंडस्ट्रीला चारचांद लावले ते साऊदसदृश्य लोकांनीच ना!
पूर्वी गावाकडे, स्टुडिओत, काश्मीर, सिमला, कोडाईकॅनल इत्यादी ठिकाणी शुटिंग करणार्‍या इंडस्ट्रीला एकदम फॉरेनची लोकेशन सहज परवडायला लागली. शोलेमध्ये गब्बरचा डायलॉग आहे ‘कितना इनाम रखा है रे सरकारने हमपर?’ सांबा उत्तरतो, ‘पुरे पचास हजार!’ तीस चाळीस वर्षात केवढा बदल झाला पाहा. याच फिल्म इंडस्ट्रीत आता करोडो रुपये मेहनताना घेतात हिरो-हिरोईन. हा सर्व बदल परिवर्तन, विकास, प्रगती, कोणामुळे? वर उल्लेखलेल्या प्रगतिशील लोकांमुळेच. बॉलीवूडला जनसामान्यांच्या डोळ्यात, मनात, चिंतनात, आचरणात आणण्याचे महान कार्य यानेच तर केलेय्! अतिशय परोपकारी जीव, दुसरे काय? बरं हा जिकडे हात टाकतो तो व्यवसाय फळफळतो, यात त्याचा काय दोष?
त्याने बांधकाम व्यवसाय सुरू केला. त्या धंद्याला ‘अच्छे दिन’ आले. ‘बिल्डर’ लोकांना ‘सोन्याचे दिनु’ अनुभवायला मिळाले.

चित्रपटसृष्टी, बांधकाम व्यवसाय, मग समाजसेवा, सेवाभावी संस्था, कार्यकर्ते, नेते इत्यादींशी त्याचे जवळचे संबंध जुळले. शेवटी मोठ्या मनाचा, ऍडजस्टिंग नेचरचा, मनमिळावू, सुस्वभावी असा हा दाऊद. पूर्वी तो घोड्यांच्या रेसवर पैसे लावी. मग त्याला कंटाळा आला. आता कोणावर पैसे लावावे? असा विचार करताना सुचले. क्रिकेट प्लेअर वा मॅचवर! हाडाचा ‘आंतप्रिनर’ काही स्वस्थ बसत नसतो. मग काय? लावले पैसे क्रिकेटवर, क्रिकेटला छान दिवस आले. बाकी खेळ रांगत होते. क्रिकेट मात्र कोटीच्या कोटी उड्डाणे घेत होते.

बाकीचे क्रीडापटू आवड म्हणून खेळत आणि पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून नोकरीधंदा करीत, त्यावेळी क्रिकेटपटू, क्रिकेटसंघटना करोडोंच्या उलाढाल्या सहज करीत होते. हे सर्व कोणामुळे? हे सांगायची गरज काय? आम खानेसे मतलब रखो, पेड गिननेसे क्या? हेच खरं!

अशाप्रकारे बांधकाम व्यवसाय, चित्रपट व्यवसाय, जाहिरात क्षेत्र, क्रिकेट, दूरदर्शन वाहिन्या इत्यादी सर्वांना नवसंजीवनी दिली ना या थोर उद्योजकाने! त्याचाच परिणाम अनेक असल्याप्रकारचे उद्योजक वेगवेगळ्या आयामांना समृद्ध करू लागले. कोणी हवाला, कोणी स्टॅम्प घोटाळा, कोणी काही, तर कोणी काही. देश प्रगतीवर नेण्याची अहमहमिकाच लागली ना!

पूर्वापार भारतात असले थोर महात्मे होतेच पण यासम हेच. कारण शार्विलक, अंगुलिमाल, वाल्याकोळी नंतर नंतर बहकले. मूळ उद्योजकतेचा वारसा सोडून दिला चक्क त्यांनी कोणाकोणाच्या बहकाव्यात येऊन. पण आजकालचे हे देशोत्थापक कोणाच्याही सांगण्याला फसत नाहीत. उलट त्यांच्याच विचार, व्यूह, कृती, योजना यांचा प्रभाव संपूर्ण समाजमनाला गुंडाळून ठेवतो. हेच त्यांचे खरे मोठेपण होय.

पूर्वी नाही का देवाधिदेव स्वर्गात अमरावतीत बसून पृथ्वीवर कोण काय करतोय्? कोणाचे पुण्य किती वाढले? याचा हिशेब ठेवायचे आणि कोणी डोईजड झाला की त्याला योग्य ती जागा दाखवून द्यायचे. आता ही थोर मंडळी सुद्धा जगात कुठेतरी गुप्त रूपाने राहतात. त्यांची कृपादृष्टी कायम भारतावर आहेच. समाजकरण म्हणू नका. राजकारण म्हणू नका, फिल्म इंडस्ट्री म्हणू नका, क्रिकेट म्हणू नका, जाहिरात क्षेत्र म्हणू नका, मीडिया म्हणू नका, बुद्धिजीवी म्हणू नका, एकही लोकोपयोगी लोकोपकारी क्षेत्र त्यांच्यापासून अस्पृष्य नाही. कोणाला उठवावे, कोणाला बसवावे, कोणाला पाळावे, कोणाला टाळावे हे सर्व नियोजन ते बसल्या जागी करतात. इथे ते आपल्याला फलद्रूपच झालेले दिसते. खरंच सर्वव्यापी सर्वज्ञ, सर्वसंचारी असे म्हटले तर वावगे ठरू नये. देव सर्वसंचारी, सर्वव्यापी असूनही पृथ्वीवरील कार्य करण्यासाठी देवदूत वा अवतार पाठवीत असतात. तद्वतच ही थोर मंडळी सुद्धा मानवतावादी, बुद्धिवादी, अभिव्यक्तिवादी, पुरोगामी, सेक्युलर, संवेदनशील, स्वधर्मी इत्यादी प्रकारच्या संघटना वा व्यक्तींकडून कार्य घडवून आणत असतात.

सर्वसामान्यांचा हिरो (?) दबंग नायक (?) स्टारांचा स्टार, महान भाईजान हे त्यापैकी एक देव (?) दूत होत. मुळात त्यांचे कर्तृत्व महानच आहे. पडद्यावर ते फार प्रेमळ, समजुतदार दिसतात. ‘जो बात तुझमें है, तेरी तसबीर में नही’ हे त्यांना शंभर टक्के लागू पडते. पडद्यावरील या प्रेमळ गृहस्थाने गंमत म्हणून एक हरीण मारले. जुन्या काळात राजेरजवाडेही शिकार करायचे. मग भाईजानपण जनता जनार्दनाच्या हृदयसिंहासनावर आरूढ अनभिषिक्त सम्राट नव्हते का? पण कोण्या बिज्जोई नामक जमातीने आक्षेप घेतला. त्याने फरक काय पडला म्हणा? उलट पिक्चर अधिक चालायला लागले ना भाईजानचे. अशीच हिंमत वाढून गेलेले भाईजान एकदा सोमरसास्वाद भरपूर करून ‘आजकल पाव जमींपर नही पडते मेरे’ अशा अवस्थेत गाडी चालवत असताना त्यांच्या गाडीखाली काही लोक चिरडल्या गेले. त्यात भाईजानची काय चूक? फुटपाथ झोपण्यासाठी असतो का? एक तर या देशात बेसुमार लोकसंख्या आहे. जेथे तेथे लोंढेच्या लोंढे. शुटिंगमुळे एक तर जाम थकायला होतं. ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’ अशा प्रवृत्तीला हा प्रेमळ जीव जातिभेद-धर्मभेद न पाळता अनेक ललना, रमणींवर निरपेक्ष (?) प्रेम करतो, त्यामुळे त्याचा प्रचंड शारीरिक मानसिक वेळ त्यात जातो. परिणामी थकवा हा येणारच. त्यासाठी सोमपान असलेच पाहिजे. अशा अवस्थेत गाडी रस्त्यावरून फुटपाथवर आली. त्याला तो बिचारा काय करणार? प्रत्येकाला अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहेच की. मग गाडीला का नको? गेली ती फुटपाथवर. घर सोडून हे फालतू लोक तेथे झोपले होते. त्याला ती गाडी काय करेल? यात भाईजानचा दोष? काहीही हं...

भाईजान अनेक उत्तमोत्तम पिक्चर करू लागले. कर्तव्यदक्ष, प्रेमळ, देशभक्त, तारणहार अशी प्रतिमा अधिकच दृढ झाली. असे हे गणपतीभक्त भाईजान याकुबची बाजू घेण्यासाठी नाही तर आंतरराष्ट्रीय समुदायासमोर भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी चिवचिवले (ट्विट केले) काय बिघडलं तर त्याने? कोणी उघड बोलतं, कोणी मनात घोकतं, कोणी कृती करतो, कोणी विकृती करतो. भारतात लोकशाही आहे. ही मतमतांतरे त्या प्रगल्भ (?) लोकशाहीचेच फळ नव्हे का? देशप्रेम, देशप्रेम म्हणून ऊर बुडविणार्‍या ‘संकुचित’ लोकांना कसे समजवावे की याकुब, दाऊद, टायगर, छोटा शकील इत्यादी महात्म्यांची शरीराने भारतात राहणारी, सर्व क्षेत्रांत पसरलेली अनुयायी मंडळी विशालहृदयी असल्यामुळे विश्‍वबंधुत्व जोपासतात, ‘हे विश्‍वची माझे घरं’ असं नुसते बोलत नाहीत, तर वागतानाही दिसतात.

एकूणच ‘कुणी निंदा कुणी वंदा आमचा स्वहिताचा धंदा’ अशा निरलस प्रवृत्तीने सतत कार्यरत असलेली ही मंडळी अशा महान लाखोंच्या पोशिंद्यांच्या मागे नेहमीच ठामपणे उभी राहणार यात शंकाच नाही. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ असले मोठे ध्येयच गाठायचेय् ना त्यांना!

- डॉ. प्रज्ञा शरद देशपांडे
९३७१५७४३३०

No comments:

Post a Comment