आज एकूणच भारतात कृतीपेक्षा उक्तीला जास्त प्रसिद्धी मिळताना दिसतेय्. शिक्षण क्षेत्रही त्याला अपवाद नाही. शिक्षणाने काम साध्य व्हावे म्हणून बोलणे, लिहिणे, चर्चा करणे यावर प्रचंड मंथन चालू आहे. अतिआदर्शवादी शिक्षण योजना आखल्या जातायत्. पण कृतीतून फलद्रूप किती झाल्या? याचा हिशोब करायलाही कोणालाच वेळ नाही.
पूर्वी ११ मॅट्रिक होते. आता १० वी मॅट्रिक. आता १० वी नंतर विषय निवडीचे स्वातंत्र्य आहे. पूर्वी ८ वी पासून विषय निवडीचे स्वातंत्र्य होते. पूर्वी १० वी नंतर बीएएमएस हा सात वर्षांचा डिग्री कोर्स, तर ३ वर्षांचा इंजिनीअरिंगचा डिप्लोमा कोर्स होता. १२ वी नंतर पाच वर्षांच्या इंटरर्नशिपसह एमबीबीएस करता येत होते. चार वर्षांच्या इंजिनीयरिंगनंतर एमबीए न करताही चांगल्या नोकर्या मिळत व आता १२ वीनंतर एंटरन्स, मग प्रवेश. केवळ एमए करून सिनिअर कॉलेजात प्राध्यापक झालेले आजही समाजात ज्येष्ठ नागरिक आढळतील. आता मात्र एमए, पीएचडी शिवाय नेट, सेट करूनही नोकर्यांची वानवा. नुसत्या बीएड. डीएडने नोकरी लागण्याचा जमाना गेला. आता नोकरीसाठी पण पुन्हा परीक्षा.
खरंच आता ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्याय् की काय? पूर्वी साक्षरता एवढी नव्हती म्हणून नोकर्या लागायच्या. हा एक लाडका समज. आता मात्र नोकर्या कमी झाल्याय् का? पूर्वी एवढी बेकारी नव्हती. आताच एवढे बेकारीचे पीक कसे काय आले?
आज जिकडे पहावे तिकडे भ्रष्टाचार बोकाळलाय्. भ्रष्टाचार करणारे कोणी अशिक्षित नाही तर उलट शिक्षित, उच्चशिक्षित आहेत. मग खरंच ‘शिक्षण म्हणजे मानवी उन्नयनाचे साधन.’ असे म्हणता येईल का?
अशा पुस्तकी व्याख्या शब्दांचे बुडबुडेच नव्हे का? आज सर्व क्षेत्रात ‘सॅचुरेशन’, सर्व क्षेत्रात आंतरिक असंतोष आढळून येतो. प्रत्येक ज्ञानक्षेत्र दुसर्याच्या ज्ञानक्षेत्रात घुसखोरी करतायत्. इंजिनीअर मॅनेजमेंट कोर्स करतो, बँकेत लागतो. डॉक्टर मॅनेजमेंट कोर्स करतो हॉस्पिटल चालवायचा ठेका घेतो.
डी फॉर्म झालेला उमेदवार लायसन्स भाड्याने देऊन अजून एखाद्या डिप्लोमाच्या आधारे दुसरीकडे नोकरी करतो. शिक्षक नोकरीसह ट्युशन घेतात. नाही तर विमा पॉलिसीज् काढतात. गुंडा ठेकेदार होतो. ठेकेदार बिल्डर होतो, बिल्डर लिडर होतात, लिडर हिरो होतात, हिरो समाजसेवक होतात, समाजसेवक बिझनेसमॅन होतात. एकूणच काय तर कुणीही, केव्हाही, काहीही होतो. बक्कळ पैसा कमावतो आणि सफल ठरतो. जणू त्याच्याचसाठी शिक्षण घेतात सर्वजण, अशी स्थिती आहे.
एकूणच सद्य:परिस्थिती पाहता शिक्षणाच्या व्याख्या, थोर शिक्षणशास्त्रज्ञांचे शैक्षणिक विचार हे फक्त परीक्षेत मार्क मिळण्यासाठी पाठ करावे लागतात किंवा भाषण लेखनात उल्लेख करायला कामी येतात, असे सामान्यांना वाटले तर गैर काय?
- डॉ. प्रज्ञा देशपांडे
९३७१५७४३३०
No comments:
Post a Comment