शिक्षणावर बोलू काही
शिक्षण क्षेत्र म्हणजे देवघरातील समईची ज्योत असे म्हणतात. आज सिंगल / डबल / ट्रिबल बेडरूमचा फ्लॅट असू दे, देवघराची जागा, स्वयंपाक घरातील सिंकच्या वरच्या रॅकमध्ये, फारच झाले तर
एखाद्या कोपर्यात, नाहीतर खचक्यात केली जाते. देवाजवळ समई लावूनही मोठा इलेक्ट्रिक दिवा, विद्युत माळा हव्यातच. आजच्या संपूर्ण शिक्षण क्षेत्राचे असेच झाले आहे ‘असून अडचण, थांबून खोळंबा.’
पूर्व प्राथमिकपासून तर संशोधनपर शिक्षण क्षेत्रात शिक्षक वर्ग असतो. अनुदानित/विना अनुदानित संस्था असतात. सर्व आहे पण... सरकारी दृष्ट्या शिक्षकांचे पगार व त्यांचे कामकाजाचे तास
व्यस्त प्रमाणात आहे. मग शिक्षण सेवक, कॉण्ट्रॅक्ट पद्धतीचे प्राध्यापक पद इत्यादी शैक्षणिक रोजंदारी याच क्षेत्रात खपते आहे. शिवाय उन्हाळा-दिवाळीच्या सुट्या सवार्र्ंच्याच डोळ्यात सलतात. अनेक कारणांनी ‘शिकविणे’ हे प्राथमिक कर्तव्य फक्त कागदापुरतेच उरते. मग शिक्षकांना शिक्षणेतर इतर कामी लावले जाते. काही शिक्षकही थोड्या मोबदल्यासाठी अशा कामी स्वत:ला गुंतवून घेतात. जनगणना, बीएलओ, निवडणूक शिवाय सरकारी गरजेनुसार इतर कामं. प्राचीन काळी म्हण होती ‘मागता येत नाही भिक, तर मास्तरकी शिक.’ आजही सो कॉल्ड सन्मान सोडला, तर शिक्षकी पेशाची अवस्था तशीच आहे. का? याला कोण जबाबदार?
शिक्षक? व्यवस्था? नेत्यांच्या संस्था? या सर्व प्रश्नांकडे नको वळायला. पण... ही सत्य परिस्थिती आहे की शिक्षण क्षेत्राची अवस्था आजकालच्या फ्लॅटमधील देवघरांसारखी झाली आहे. ड्राईंगरूम, बेडरूम, टॉयलेट्स यावर वारेमाप इंटेरियर खर्च होतो. बाल्कनीसुद्धा ‘प्रसन्न’ ठेवतात. डायनिंग हॉल सुद्धा स्पेशियस हवा. मग स्वयंपाकघरातील छोटा कोपरा देवांच्या नशिबी.
खरे तर सर्वच क्षेत्राला ऊर्जा देणारे क्षेत्र म्हणजे शिक्षण क्षेत्र. प्रश्न नुसत्या बाह्य देवघराचा नाही, तर आतील देवाचा पण आहे. गेल्या काही वर्षांत खरोखर सन्माननीय शिक्षकांचे दाखले वानगीदाखल दुर्मिळ झाले आहेत. प्राचीन काळातील गुरू-शिष्य परंपरेलाच अजून पुढे ठेवावे लागते. चाणक्य, द्रोणाचार्य, दादोजी कोंडदेव इत्यादींवर बॅनच आहे. ‘आदर्श’ पुरस्कार प्राप्त शिक्षक तरी आदरणीय ठरतात का? ज्या समाजात घोटाळे सुद्धा ‘आदर्श’ आहेत तेथे कोणता पेशा आदर्श ठरू शकेल का, हा प्रश्नच आहे. जोपर्यंत देवाला देवत्व मिळत नाही, घरात देवघराला मध्यवर्ती स्थान मिळत नाही तोपर्यंत घराचे मांगल्य अनुभवता येणार नाही. आजकाल प्लास्टिकचे हार, रेडिमेड धुपबत्ती, रेकॉर्डेड पूजा विधी, मंत्रआरतीमुळे ‘इन्स्टण्ट’ मंगलमय वातावरण तयार होते, पण ते हृदयाच्या मुळापर्यंत भिडत नाही. तद्वत शिक्षक-शिक्षण क्षेत्रासाठी मुळापर्यंत पोहोचणारे उपाय केल्या जाणार नाहीत, तोपर्यंत ‘सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना’ शक्य नाही.
- डॉ. प्रज्ञा देशपांडे
९३७१५७४३३०
No comments:
Post a Comment