मंत्रिमहोदयांनी स्वत:च्या भाषणात मुद्दा उपस्थित केला की, शिक्षक आमदार शिक्षकांच्या खूप तक्रारी घेऊन आले. त्यातील ८० टक्के पगारविषयक होत्या, उरलेल्या शिक्षकांवरील अन्यायविषयक होत्या. ‘शिक्षण’विषयक एकही नव्हती! मला प्रश्न पडला की, मी शिक्षकांचा आमदार आहो की शिक्षणाचा? शिक्षकांना समस्या असतात हे मान्य, पण त्यासाठी म्हणून शिक्षक आमदार नाही. असे असते तर डॅाक्टर आमदार, इंजिनीयर आमदार असे पद नसते काय? शिक्षक आमदार करण्यामागे घटनाकारांचा फार मोठा उद्देश हा होता की, शिक्षक प्रगल्भ, सुज्ञ असतो; तो स्वत:च्या पलीकडे जाऊन समाजाच्या भल्याचा तटस्थपणे विचार करू शकतो. म्हणून शिक्षक आमदार असायलाच हवेत. आज शिक्षक स्वत:चे ‘गुरुपद’ हरवून बसले आहेत, त्याला अनेक कारणे असतील. पण, आपल्याला ते परत मिळवायचे आहे. त्यासाठी आपण सर्व जण प्रयत्न करणार आहोतच.
गणितीय संकल्पनेत बिंदू एका प्रकारे रेखाटले की, त्यातून रेष तयार होते, असे म्हणतात. गणित हा माझा विषय नव्हे, पण असाचा काहीसा अनुभव ३ ते ५ ऑगस्टला ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’ येथे आला आणि हा कालखंड अनेक प्रकारे लाभदायी ठरला. कारण यात ‘वर्तनबदल’, ‘व्यक्तिमत्त्व विकास’, ‘आत्मबल वाढीस लागणे’, ‘संवदेनशीलता वाढीस लागणे’ या सवार्र्ंहून विशेष म्हणजे कोणत्याही घटनेकडे ‘आव्हान’ म्हणून न बघता ‘संधी’ म्हणून बघावे, ही सकारात्मक मानसिकता तयार झाली. चांगुलपणा, सचोटी, देण्याची इच्छा वास्तवात असू शकते, याची प्रचीती आली. जेव्हा मंत्री, वरिष्ठ अधिकारीवर्ग, सहायक अधिकारी, तज्ज्ञ, चर्तुर्थश्रेणी कर्मचारी एकाच ध्येयाने झपाटून कृतिप्रवण होतात, तेव्हा काय चमत्कार होऊ शकतो, हे या तीन दिवसांत अनुभवायला मिळाले. आनंद याचाच आहे की, मीसुद्धा या सोहळ्याचा एक भाग नव्हे, सन्माननीय भाग होती. असं काय घडलं या तीन दिवसांत?
‘सरकारी उद्बोधन’ आहे, आता जावेच लागणार, या मानसिकतेतून महाराष्ट्रातील ऑनलाईन फॉर्म भरून दोन चाचण्या पार करून, पारदर्शक पद्धतीने २१५ विषयतज्ज्ञ रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत कसेबसे पोहोचले. परिसर पाहताच शरीराचा ‘प्रवासी थकवा’ दूर झाला. अतिशय नम्र, प्रसन्न स्वरात कर्मचार्यांनी नाव नोंदणी करून, निवासकक्ष उपलब्ध करून दिला. मग एक कर्मचारी आमचे सामान खोलीपयर्र्ंत घेऊन आला. काही हवे असेल तर या या क्रमांकावर संपर्क साधा, असे सांगून तो गेलाही. सुसज्ज, नेमक्या, मोजक्या, विचारपूर्वक तयार केलेल्या एसी रूम होत्या. महिलांची व्यवस्था अतिशय देखण्या वास्तूत- जिचे नावही तितकेच सार्थ ‘एकलव्य’- येथे होते. प्रत्येक कक्षात तीन महिला अशी व्यवस्था होती. योगायोगाने आम्ही तिघी विदर्भाच्या म्हणजे नागपूर-अकोला-भंडारा अशा होतो. दोन तारखेला दुपारी पोहोचल्यामुळे परिसर न्याहाळण्यास व निसर्गरम्यतेचा आस्वाद घेण्यास बरीच सवड असल्यामुळे, आम्ही तेथे फेरफटका मारू लागलो. चर्चा सुरू झाली की, काय होणारय उद्या? कसा असेल तीन दिवसांचा कार्यक्रम? सवार्र्ंच्या मनात उत्सुकता होती. सकाळी वेळेत सर्व जण तयारी करून ‘दीनदयाल उपाध्याय सभागृहात’ पोहोचलो. कुठलीही औपचारिकता न होता प्रथम सत्र सुरू झाले. वक्त्यांनीच स्वत:चा परिचय सुरुवातीला करून दिला. त्या सत्रापासूनच आजवरच्या ‘सरकारी कार्यक्रमांपेक्षा’ हा काही वेगळा आहे, याची जाणीव व्हायला सुरुवात झाली. मध्ये चहा/कॉफी जागेवरच मिळाले. प्रथम सत्रानंतर लगेच दुसरे सत्र ‘ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी’ प्राची साठे यांनी घेतले. या सत्रातच सर्व तज्ज्ञांना ‘आपल्याला विद्यार्थ्यांसाठी काय व कसे शिक्षण द्यायचे आहे, याची उद्दिष्टे उमगण्यास सुरुवात झाली.
वेगवेगळ्या प्रभाग, स्तर, विषय, विचारप्रवाह, जातधर्म, पंथ, लिंग या सर्वांच्या पलीकडे जाऊन ‘शिक्षक’ नव्हे, शिक्षणाची तळमळ असलेले शिक्षणाचे अग्रदूत, या भूमिकेत आम्ही अलगद कसे आलो, हे आम्हाला कळलेही नाही. ‘शिक्षक’ म्हणून एक वर्ष अनुभव असलेल्यांपासून ते सेवानिवृत्त होऊन बरीच वर्षें झालेल्या, अशा सर्व वयोगटातील शिक्षकांसाठी हा पहिला अनुभव होता. ज्यातून ‘आपण’ या नव्या धोरणाचा महत्त्वाचे घटक आहोत, असा सन्मानजनक दिलासा त्या भाषणातून मिळाला. ‘जबाबदारी ही घेण्याची नसून ढकलण्याची बाब आहे,’ असा सरकारी खाक्या आजवर अनुभवलेले अनेक जण अचंबित झाले.
प्राची साठे एक पॉवरफुल अधिकारी, महिला अधिकारी, सक्षम महिला अधिकारी. या पलीकडे जाऊन उत्तम संयोजक, एक व्यक्ती, एक उत्तम सुज्ञ, सुजाण शिक्षणतज्ज्ञ, एक मातृहृदयी शिक्षक, आपल्यातील एक, अशी प्रतिमा सर्वांच्याच मनात घर करून गेली. प्राची साठेंचे विचार हे निव्वळ ज्ञानातून होते असे न वाटता अनुभवातून, तळमळीतून होते, याची जाणीव झाली. त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे ८० टक्के लोक प्रत्येक बाबींचा सकारात्मक विचार करू लागले.
जेवणाच्या सुटीनंतर प्रधान सचिव नंदकुमार यांचे भाषण, नव्हे संवाद होता. आमच्यातील काही जण त्यांना ओळखत होते म्हणे. अनेकांच्या व्हॉट्स ऍप ग्रुपवर ते आहेत असे कळले. नुसते असून नसल्यासारखे नाहीत, तर ऍक्टिव्हपण आहेत. बर्याच ग्रुपवर हेही कळले. असो. एक अति उच्चपदस्थ अधिकारी कुठलीही अधिकारशाही न गाजवता सहज संवाद साधत ‘या हृदयीचे त्या हृदयी’ सहजपणे करीत होता. हेही इतक्या वर्षांत पहिल्यांदा अनुभवायला मिळाले. हे सर्व अधिकारी अतिशय ‘टेक्नोसॅव्ही’ आहेत. टेक्नॉलॉजीचा छान वापर करून, वेळेेसे सुनियोजन करतात, याचे प्रात्यक्षिक अनुभवायला मिळाले. त्यांनी मोजक्या मुद्यांवर आमच्याशी प्रश्नोत्तरांच्या चर्चेच्या माध्यमातून संवाद साधला.
सूर्य-पृथ्वी, प्रोटॉन-इलेक्ट्रॉन्स यांच्या गतीचे प्रात्यक्षिक, आमच्यातील भूगोल व विज्ञान तज्ज्ञांपैकी प्रत्येकी दोघांकडून करवून घेतले. ‘पृथ्वी-सूर्य, इलेक्ट्रॉन्स-प्रोटॉन्स या दोघांच्याही कक्षा भिन्न असतात, दोघेही परिक्रमण-परिभ्रमण करीत असतात. एकमेकांवर आदळत नाहीत, आदळले तर स्फोट, सर्वनाश होऊ शकतो.’ हे सर्व संवादात्मक पद्धतीने करवून दिल्यावर त्यांनी प्रश्न केला की, ‘पती-पत्नी’ संबंध कसे असावेत? प्रश्न ऐकताच थोडे विचित्रच वाटले. त्यांनी विचारले, कुणी पती-पत्नी येथे आहेत का? नाही, असे उत्तर आल्यावर ते म्हणाले, यांनीसुद्धा आपापल्या कक्षेत स्वतंत्र का राहू नये? एकमेकांवर का कुरघोडी करावी? घटस्फोट का व्हावेत? लिव्ह इन रिलेशनशिप का असावी? प्रत्येक मानव आपल्या कक्षेत न राहता दुसर्याच्या कक्षेत का डोकावतो? या वृत्तीमुळे आज कुटुंब, समाज, पर्यायाने देश अस्थिर झालाय्. कुणावर ‘विजय’ का मिळवावासा वाटतो? त्याला त्याच्या परीने जगू द्या.
तुम्ही ‘श्रेष्ठ’ हे सिद्धच का करावेसे वाटते? अशी मौलिक विचारपरंपरा प्रत्येकाच्या डोक्यात सुरू झाली. ती त्यांच्या मननीय प्रश्नमालिकेमुळेच. पुढे ते म्हणाले, ‘इतिहास’ का शिकवायचा? इतिहास शिक्षक उत्तरले, गतकाळाच्या इतिहासावरून पुढचे भविष्य अवलंबून असते म्हणून- मग पुन्हा प्रश्न आला, ‘महायुद्ध का झाले?’ उत्तर आले, ‘सत्ता, अर्थकारण व पुढे महायुद्ध पाण्यासाठी होईल.’ असे ऐकल्याबरोबर त्यांनी प्रश्न केला, हे असे भविष्य घडविण्यासाठी हा असा इतिहास तुम्ही का सांगता. युद्ध होणार नाहीच, असे का शिकवीत नाही? सर्व जण गोंधळून गेले. त्यांना काय म्हणायचे तेच कळेना. मग ते म्हणाले, शिवाजी महाराजांचा युद्धाचा इतिहास शिकवा, पण शिवाजींचे सुराज्य, जलव्यवस्थापन, किल्ले स्थापत्य, सुशासन का शिकवीत नाही? इतिहास सकारात्म्कपणेही शिकविता येतो की. तुम्ही ‘वाईट होईल’ असेच गृहीत धरून का लिहिता? चांगले राहायला तुम्हालाच नकोय् का? तुम्ही स्वत: भन्नाट विचार करा.
तुमचे विद्यार्थी भन्नाट उत्तरे देतील, त्यांना स्वीकारा. विविध शक्यता, विचार यांचे स्वागत करा. अट्टहास, आडमुठेपणा सोडा, जगा व जगू द्या. याच अर्थाचा संवादात्मक सुंदर संवाद त्यांनी आमच्याशी साधला. सकाळपासून ते सायंकाळी सातपर्यंत प्रोटोकॉल, अधिकार, आदेश, बॉस इज ऑलवेज राईट, याचा लवलेशही कुठेही कोणाच्याही बोलण्यात, वर्तनात, कृतीत आढळला नाही. उलट, आपण सर्व एकाच ध्येयाचे पाईक आहोत, हे अधिकाधिक दृढ होत गेले. या दिवशी सर्वांना ‘होमवर्क’ होते- ‘उद्दिष्ट व अपेक्षित बदल’ यावर चिंतन करून विचार लिहून आणा. शॉर्ट असायन्मेंट दिले होतेच. शिवाय एका पुस्तकाचे काही मुद्यांवर सकारात्मक परीक्षण करून या. अशा प्रकारे पहिला दिवस भरगच्च, भारावलेला, भरभरून मिळालेला असा गेला.
दुसरा दिवस सकाळी ९ पासून सुरू झाला. तोच प्राची साठेंच्या अभ्यासपूर्ण प्रगल्भ जाणिवेच्या मांडणीनेच. कोठारी कमिशनपासून ते आजवर शिक्षणक्षेत्रात काय झाले? योजना व प्रत्यक्ष अंमलबजावणी यात नेमके काय, कुठे, कसे आपण वागलो? झालेल्या गोष्टींपासून पुढे आपल्याला अधिक चांगले कसे काय करता येईल? याची सुंदर उलगड त्या करीत होत्या. दोन कधी वाजले ते कळलेच नाही. जेवणानंतर विषयवार बैठक होती. एक धडा नव्या युगानुरूप नव्या उद्दिष्टांसह तयार करण्याचे ‘टास्क’ आम्हाला दिले गेले.
प्रत्येक ग्रुप कामाला लागला. ८.३० वाजता नाइलाजाने जेवायला जाणे भाग पडले. पुन्हा उरलेले ‘टास्क’ पूर्ण करता करता रात्रीचे अकरा कधी वाजले कळलेच नाही. दुसरा दिवस अतिशय बिझी, पण छान गेला.
तिसरा समारोपीय दिवस. आज संपतेय ही सुंदर पर्वणी, याचा खेद प्रत्येकाच्या मनात होताच. मंत्रिमहोदय वेळेचे पक्के. त्यांनी म्हटल्याप्रमाणे ९ वाजता ते परिसरात हजर होते. सर्वांमध्ये ‘विदाऊट सिक्युरिटी’ सहज वावरत होते. कुठे अभिनिवेष, तोरा, डामडौल नव्हता. सेल्फी, फोटोसेशन, सिंगल फोटो अगदी सहज, उत्स्फूर्त उत्साहाने देत होते. अगदी दूर असलेल्यांनाही आवाज देऊन, या की ग्रुप फोटोत, अशा सहजतेने ते वावरत होते. तेव्हा जाणवला फरक. कार्यक्रमसुद्धा अगदी अनौपचारिक पण संवादात्मक होता. त्यांच्या सुंदर अनुभव कथनातून त्यांनी थोडक्यात ‘धोरण’ मांडले. दोन दिवस ‘होमवर्क’ केलेले आम्ही सर्व जण त्या धोरणाचा अविभाज्य, सन्माननीय घटक झालेलो होतोच. पुढे त्यांनी प्रश्नोत्तरे घेतली. काळाची पावले ओळखून वागणारे ते ‘जाणते मंत्री’ म्हणून निश्चितच सर्वांच्या आपुलकीचे वाटले. जाताना त्यांनी प्रत्येकाला उत्तम पुस्तकांची भेट दिली. वर राजकीय टपली दिलीच- ‘‘मी घेणारा मंत्री नाही हं, देणारा आहे.’’
स्वत:चा फोन नंबर व ई-मेल आयडी सर्वांना उपलब्ध करून दिला. शिवाय तुम्ही शिक्षक वा तुमचा पगार हा आमच्यावर बोझा नसून ही विद्यार्थ्यांच्या भविष्याची गुंतवणूक आहे, असा त्यांनी दिलासा दिला. इतकेच नव्हे, तर कृतिशील शिक्षकांची बरेचदा शालेय अधिकारी अडवणूक करतात, याची मला पूर्ण कल्पना आहे, असेही ते म्हणाले. यावर लवकरच उपाययोजना होईल. शिक्षणक्षेत्रात काम करणार्या प्रत्येकाला सुयोग्य काम, आदर मिळेल, याची ग्वाहीच त्यांनी जणू दिली.
त्यांच्यानंतर शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर बोलण्यास उभे झाले. खरे तर दोन दिवसांत आम्ही धोरण, आयोग, नीती जाणू लागलोय. आता हे आणखीन काय वेगळं मांडतील? असा विचार डोक्यात आला. पण, त्यांनी सुरुवातच अतिशय सुंदर, सुबद्ध पद्धतीने केली.
काय हवे? कसे हवे? कशासाठी हवे? हे कळलेच होते. आता कशा पद्धतीने व केव्हा हवे, हे त्यांच्या बोलण्यातून कळले. विद्यार्थी निव्वळ बुद्धिमान असून चालणार नाही, तर शक्तिमान, बलवान, नीतिमान असावा, असा आग्रह त्यांनी मांडला. आपल्या छोट्याच पण व्यासंगी, काव्यपूर्ण, शैलीत त्यांनी सर्वांची मनं जिंकून घेतली. अशा प्रकारे समारोपाचा कार्यक्रम संपला. चहापानानंतर प्रत्येक गटाने तयार केलेले पाठ सादरीकरण सुरू झाले. दोन वाजेपर्यंत पहिल्या गटातील सर्व विषय आटोपले. नव्या दृष्टीने उत्तमोत्तम सादरीकरण झाले. जेवणानंतर दुसर्या गटाचे सादरीकरण झाले. ते सादरीकरण पाहताना खात्रीच पटली की, ‘आनंददायी’ शिक्षण मिळणारच! शिक्षणक्षेत्रातील कोणताही घटक उत्कृष्ट शिक्षणापासून वंचित राहणार नाही. प्रत्येकाला सन्मानासह ज्ञान, कौशल्य प्राप्त होणारच. एकूणच काय, महाराष्ट्राचे आधुनिक सक्षमीकरण खर्या अर्थाने सुरू होण्याची ही नांदी या उद्बोधन वर्गाने झाली, यात शंकाच नाही.
- डॉ. प्रज्ञा शरद देशपांडे
९३७१५७४३३०
No comments:
Post a Comment