Tuesday, January 26, 2016

सद्वृक्षाची ‘कलम’

‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ अशी एक म्हण आहे. दुदैवाने शिक्षण क्षेत्राला ती लागू होत नाही. कारण स्वातंत्र्यानंतर शिक्षण क्षेत्रातून जे निर्माण झालंय् त्याला रसाळ, गोमटी म्हणणं धारिष्ट्यच ठरेल नाही? शिक्षणाने स्वयंपूर्णता, आत्मनिर्भरता, देशप्रेम विकसित व्हावयास हवे. पण भारत आज जगाच्या दृष्टीने ‘मार्केट’ बनलाय्. ‘और धंदेमे सब कुछ जायज है’|

शेतकरी आत्महत्या करताहेत, तरुण-शिक्षित नक्षलवादी बनत आहेत. सोबतच धर्मांध, मूलतत्त्ववादी आणि संवेदनशील (?)
होत आहेत. जाती-पातीच्या राजकारणात लोकांना लोटायला अनेक संघटना, ब्रिगेड, सेना, मूलनिवासी वगैरे सामाजिक संस्था
तयार होताहेत. बाबा, फकीर, आश्रम, दर्गा, मठ, स्पिरिच्युअल मास्टर इत्यादी समाजमनाला प्रभावित करताहेत. बेरोजगारांच्या
झुंडीच्या झुंडी प्रचंड प्रमाणात वाढताहेत्. अधिकृत-अनधिकृत घुसखोर देशाची साधन-संपत्ती लुटत आहेत. सगळ्याच ठिकाणी लाचलूचपत, फसवेगिरी वाढलीय्. सहा दशकांच्या स्वतंत्र भारतातील शिक्षण प्रणालीचे हे ‘फळ’ नव्हे का? कोणतीही उत्कृष्ट गोष्ट निकृष्ट पद्धतीने राबवली की तिचा कचरा होणार. किंवा कोणतीही निकृष्ट गोष्ट उत्कृष्टपणे राबविली तर ‘कचर्‍यातून कला’ होईल. पण टिकावू, दमदार, अमूल्य, दर्जेदार असणार नाहीच. दुदैवाने आज तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे.

मुळात ‘बीज’ सुद्धा हवे. ‘वातावरण’ सुसंगत हवे, ‘मशागत’ सजग हवी. वेळीच ‘कीड’ निपटून टाकावी. मग ‘डेरेदार
फलवान वृक्ष’ हमखास होणारच. समजा चुकून ‘जंगली वृक्ष’ वाढला तर त्यावर सद्वृक्षाची ‘कलम’ करावी लागते. शिवाय
जंगली वृक्ष मध्येच फोफावू नये म्हणून छाटत रहावा लागतो.
शिक्षण क्षेत्रालाही वरील संपूर्ण दृष्टान्त जसाच्या तसा लागू पडतो. चांगला शेतकरी हे सर्व कसोशीने करतो. कुठे ‘गाफिल’ राहिलाच तर आत्महत्येशिवाय पर्याय नाहीच. खरेच हा दृष्टांत आज देशाला, शिक्षण क्षेत्राला लागू पडत नाही का?

डॉ. प्रज्ञा देशपांडे
९३७१५७४३३०

No comments:

Post a Comment