Tuesday, August 15, 2017

# सहजोक्त.

#सहजोक्त

धार्मिक साहित्य.

भाषा म्हणजे संवाद साधण्याचे महत्त्वाचे साधन.
"पिंडे पिंडे मतिर्भिन्ना" असे म्हणतात.
म्हणजे प्रत्येक जीव हा त्याच्या त्याच्या नुसार वेगळा असतो. मग भाषा जिने संवाद साधायचा ती सुद्धा प्रत्येकासाठी  वेगळी होते ना !

 वाङ्मय (वाक्+मय) म्हणजे वाणीचे साम्राज्य .
जे जे म्हणून शब्द ,संकेत,चिन्ह,ध्वनी व्यक्त केल्या जातात ते सर्व वाङ्मयच होय . यालाच साहित्य असेही म्हणतात . साहित्य हे मौखिक  वा लिखित असते . ललित चे लालित्य तसे सहित चे साहित्य .
कशाच्या सहित तर संस्कार-संस्क्रृति-परंपरा-रूढी इत्यादिं सह असलेले ते साहित्य मानवी बुद्धी जशी विविधांगी असते तशीच त्याची अभिव्यक्तीही विविधांगी असते . समाजाचा अारसा म्हणजे साहित्य . साहित्यात नऊ रस असतात . मानवी जीवनातही
हे नऊ रस असतातच . रस उत्तम प्रकारे आस्वादणारे ते रसिक. हे नऊ रसही माझ्या जीवनात असावे असे कोणीही इच्छित नाही. तरी वाङ्मयात मात्र नऊ रस असायलाच पाहिजे . या सर्व रसांमध्ये सामान्यांना साधारणत: आवडीचा रस म्हणजे श्रुंगार . श्रुंगार रसाचा मूळ भाव रती हा आहे , हाच रतिभाव
 भक्ती-वात्सल्य या ही रसात आढळतो . जेव्हा देवता ,गुरुजन , देश इत्यादी ज्येष्ठ ,उदात्त,अमूर्त संकल्पनांवर रतिभाव जडतो तेव्हा तेथे भक्तिरस निर्माण होतो . या  भक्तिरसाचे प्रकटीकरण धार्मिक वाङ्मयातून लीलया होत असते. "भाव तसा देव" असे म्हणतात ते खोटे नाही . देवते विषयी भाव-भक्ती मनात ठेऊन निर्माण केलेले मोठ्ठे समृद्ध असे वाङ्मय दालन मराठी भाषेला . श्रीमंत करीत आहे , यात शंकाच नाही.
या वाङ्मयाकडे केवल भक्तिरस युक्त , श्रद्धायुक्त साहित्य अशा संकुचित दृष्टिकोणातून न बघता मानवी भावभावनांचे समृद्ध -निरागस-लाघवयुक्त लालित्यपूर्ण रूप म्हणून पहावे .
विपुल शब्दसंग्रह ,अलंकार ,भाषाशैली ,भावरस इत्यादींचा अगाध खजिना या साहित्यात आहे . मुळात हे साहित्य प्रासादिक शैलीत असल्यमुळे मनाला निर्मळ करते . असे म्हणतात ,
न कळता पाय अग्नीवर पडे
न करी दाह असे कधी न घडे
अजीत नाम वदो भलत्या भीसे
सकल पाप भस्म करितसे ॥

एकूणच धार्मिक वाङ्मय केवळ धार्मिक परिप्रेक्ष्यातून न बघता ,बोलीभाषांची समृद्ध अभिव्यक्ती मराठीची
अलौकिक श्रीमंती या ही दृष्टीने  त्याकडे पहावे .
या सर्व साहित्यात एक लय-ठेका-सहजता-लावण्य-लालित्य असते. हळूहळू व्यक्तीची भाषिक समज यातून वृद्धींगत होते यात दुमत नाही.

धार्मिक साहित्य आपण म्हणतो त्यात अनेक
प्रकार -उपप्रकार  आहेत. जसे कथा , कहाण्या, अभंग , अोवी , दोहे , आरती , शेजारती ,भूपाळी ,
पाळणा,भारूड ,पत्र, धार्मिक लावणी , गौळण , विरहिणी , स्तोत्र , मंत्र ,आळवणी,
श्लोक , पद , कवन ,पोथी ,गोधळ , विडा, नैवेद्याची आळवणी , विविध भक्तिगीते , भावगीते इत्यादी इत्यादी अनेक प्रकार त्यात येऊ शकतात . हे वाङ्मयाचे प्रकार व त्यांची नावे यांच्या नामकरणात एक मोठी संकल्पना ,सार्थभाव असतो . हे सर्व प्रकार  रचण्याचे अतिशय काटेकोर भेद वा नियम असतात असे नाही पण कळत नकळत ते प्रकारभेद आता विशिष्ट नियमांनी बांधले गेले अाहेत.

शब्द हे गणेशाचे रूप अाहे, असे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात . शब्द ही शक्ती आहे , ती व्यर्थ घालवू नये ; असेच आपले धार्मिक वाङ्मय आपल्याला सुचवते . म्हणूनच म्हटले आहे ,"एकेक अोवी अनुभवावी "।
आजकाल तंत्रज्ञानाची क्रांती झाल्यामुळे धार्मिक वाङ्मयाला मोठ्ठी "मार्केट व्हॅल्यू" पण लाभली आहे ,
हे ही विसरून चालणार नाहीय . आज बाजारात ना धार्मिक वाङ्मयाचे हजारो टंकित , मुद्रित , ध्वनिमुद्रित , दृक्श्राव्य मुद्रित असे अनेक प्रकार दिसून येतात. सोशलमिडिया हे सुद्धा मोठे व्यासपीठ आहे . साधी गणपतीची आरती म्हटली  तर उत्तमोत्तम
गायक-गायिका , वेदशास्त्रसंपन्न गुरुजन इत्यादींच्या अावाजात आज उपलब्ध  आहे .
या लेखमालेत मला आवडलेला  वाङ्मयप्रकार घेऊन त्याच्यातील मला भावलेले भाषिक भावभावनांची वैशिष्ट्ये वा स्पंद माझ्या आकलनानुसार टिपण्याचा प्रयत्न करणार आहे.ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलेच आहे ना !
          राजहंसाचे चालणे ,भूतळी जालिया शहाणे
          आणिक काय कोणे चालावेची ना ?
  भाषेचा अनमोल वारसा माझ्या परीने उलगडून दाखवीत भाषेच्या या ज्ञानकुंडात ही लेखमाला   रूपी वागाहूती अर्पण करते आहे.
डॉ. प्रज्ञा देशपांडे.

5 comments:

  1. छान,प्रज्ञा!

    ReplyDelete
  2. अप्रतिम सहजपणे लिहितात तुम्ही... आरती म्हणतांना दृष्टीकोन बदलल्याने भक्तिरसाची वेगळीच अनुभुती मिळाली..
    आता अशीच तुमच्याकडून अपेक्षा येत्या नवरात्रात सुध्दा.

    ReplyDelete
  3. अप्रतिम सहजपणे लिहितात तुम्ही... आरती म्हणतांना दृष्टीकोन बदलल्याने भक्तिरसाची वेगळीच अनुभुती मिळाली..
    आता अशीच तुमच्याकडून अपेक्षा येत्या नवरात्रात सुध्दा.

    ReplyDelete