Tuesday, March 27, 2018

#सहजोक्त.


पंचतंत्र .भाग २
मागच्या भागात पंचतंत्राची थोडक्यात अोळख करून दिली होती. या भागात  त्यात थोडी भर घालू या."पंचतंत्र" हा सामासिक शब्द आहे. पांच तंत्रांचा समुदाय .द्विगू समास आहे हा. पंचतंत्रमध्ये एकूण ६૪ कथा आहे. पंचतंत्रात नीतिशास्त्राची तत्त्वे कथारूपाने सांगितली आहेत. ग्रंथाच्या स्वरूपाबद्दल स्वतः रचयिता विष्णुशर्मा म्हणतात.
"यन्नवे भाजने लग्नः संस्कारो नान्यथा भवेत् ।
कथाच्छलेन बालानां ,नीतिस्तदिह कथ्यते ॥"
अर्थ असा की - नव्या भांड्यावर पडलेला पोचा कायम रहातो ,जात नाही. ह्याच दाखल्यानुसार बालकांना कथेच्या माध्यमातून  राजनीति-व्यवहारनीति-युद्धनीती सांगण्यात आली आहे.
 आजकालचा ज्ञानरचनावाद माहित नसतानाही प्राचीन -भारतात सरस कथांमधून मोठमोठे शास्त्र उलगडून सांगत असत.याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा ग्रंथ होय.
या ग्रंथातातील कथा पांच भागात म्हणजे तंत्रात विभागल्या आहेत.  या भागांची नावं आणि त्यातील कथांची संख्या  याची माहिती अशी...
१) मित्रभेदः = यात दोन मित्रंमध्ये कसे भांडण झाले ? त्याचा लाभ कोणी घेतला? अशी कथा आहे. या कथेशिवाय इतरही कथा आहेत.

२)मित्रसंप्राप्तिः = यात मित्र असण्याचे फायदे व मित्र कसा लाभला अशी कथा व याशिवाय इतर कथाही आहेत.

३)काकोलुकीयम् = काक म्हणजे कावळा तर उलुक म्हणजे घुबड,उल्लू.  कावळा व घुबड यां पात्रावर आधारलेल्या कथा आहे.

૪) लब्धप्रणाशः = हाता तोंडाशी आलेलं नष्ट होणे. याही भागात प्राण्यांच्या रूपकातून मनोवैविध्याच्या कथा सांगितल्या आहेत.

५) अपरीक्षित  कारकम् = न पारखता पाऊल टाकले तर वाईट परिणामांना सामोरे जावे लागते.अशा आशयाच्या कथा मानवी उदाहरणांतून दिल्या आहेत.

या ग्रंथाची रचना अतिशय रोचक पद्धतीने केली आहे. कथा व त्या कथेतून दुसरी कथा . कथेच्या आशयाला गभीरपणा (खोली देणारा) श्लोक वा अनेक श्लोक त्या त्या प्रसंगी त्या त्या पात्राच्या तोंडी दिले आहेत.
पुढील भागात पाचवे तंत्र म्हणजे अपरीक्षित कारक याचा विचार करू.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

 ‎

4 comments: