भक्त प्रल्हादाला हिरण्यकश्यपूने विचारले, तुझा ‘तो’ इथे आहे का? प्रत्येक वस्तूत, खांबात, चराचरात ‘तो’ भरला आहे असे छोट्या प्रल्हादाने सांगितले.
‘ओम् पूर्णमद: पूर्णमिदम् पूर्णात् पूर्ण मुदच्यते
| पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते!’
या उपनिषदातील प्रार्थनेत सुद्धा चराचरात व्यापूनही ‘तो’ पूर्णपणे उरलेला आहे. असा ‘तो’. प्राचीन काळी संपूर्ण शिक्षण ‘तो’ समजण्यासाठीच असे. ‘त्याला’ समजून घेणे, ‘त्याला’ प्राप्त करणे, ‘त्याच्यात’ समरस होणे ‘त्याच्यातच’ विलीन होणे, ‘तो’ म्हणजे ‘मी’. ‘मी’ म्हणजेच ‘तो.’ ‘तो’ जाणून घे असेच शिक्षण मिळायचे. श्वेतकेतूला झालेला स्वशिक्षणाचा गर्व पाहून त्याला विचारले, असे काय आहे ज्याला जाणल्याने हे सर्व आपोआप समजते व ज्याच्या अज्ञानामुळे बाकी सर्व ज्ञान शून्यवत् ठरते, या विषयीचे तुझे शिक्षण झालेय् का? त्याने ‘नाही’ उत्तर दिल्यावर पित्याने ‘त्याच्या’ विषयी ज्ञान दिले.
आजही ‘त्याच्या’ साठीच शिक्षण घेतले जाते. सर्व जीवन ‘त्याच्या’तूनच निर्माण होते. ‘त्याच्यासाठीच’ संसार होतो. ‘त्यातच’ जीवनाचा विलय होतो. आजही ‘तोच’ चराचरात व्यापलाय. व्यापून पुन्हा पूर्णपणे ‘तोच’ उरलाय ‘तो’ असेल तरच ‘व्यक्ती’ ठरतो. ‘तो’ नसेल तर सर्व शून्य. आजच्या विद्यार्थिवर्गासमोरही हाच प्रश्न मोठा ठरतोय् की ‘असे काय असेल ज्याच्यामुळे इतर सर्व ज्ञान स्वत:हून कळते किंवा ज्याच्या अभावाने असलेले ज्ञान शून्य होते?’
काय हा योगायोग? वैदिक संस्कृतीतही ‘तो’ आणि आजही ‘तोच’ महत्त्वाचा आहे. प्राचीन काळी भारत ‘सोनेकी चिडिया’, ‘सोन्याचा धूर’ निघणारा देश होता. देशविदेशातील विद्वान ‘ज्ञानगुरू’ म्हणून भारताला मानायचे. मग आज भारताचे ‘ते’ दिवस का नाही?
कारण ‘तो’. पण ‘तो’ म्हणजे कोण? वैदिक संस्कृतीत ‘तो’ म्हणजे ब्रह्मम होते. संपूर्ण शिक्षण ब्रह्मपर, आत्मोन्नतिपर होते. ऐहिक व्यवहार सुख हे त्या ज्ञानाचे दुय्यम फळ होते. आजही ‘तो’ आहेच. तो म्हणजेच अर्थ म्हणजेच पैसा; इतकाच काय तो बदल. आजचे शिक्षण केवळ पैसे कमविण्यासाठीच असते. पैसा असेल तर सर्व ‘ज्ञान’ ज्ञान ठरते. पैसे नाही तर खरं ज्ञान असूनही शून्य ठरते. शिक्षण क्षेत्रात झालेल्या या छोट्या बदलामुळे तेव्हाचा भारत आणि आजच्या भारतात एवढा फरक पडलाय्. काय प्रभाव आहे न ‘त्या’चा?
डॉ. प्रज्ञा देशपांडे
९३७१५७४३३०
Khupch chhan.....madam....
ReplyDeleteAdhyatmik shikshan naslyamulech deshat morality kami zaliy.....