Saturday, May 27, 2017

सहजोक्त

#सहजोक्त



संकटेपण मला तसे फार घाबरतात,
एकटे न येता समूहाने वार करतात॥

कधी दोस्त बनून गळा कापतात,
तर कधी दुश्मनगिरी पार निभवतात॥

न डगमगता धीराने मी चालत राहते,
उपेक्षा अपमान टोमणे निमूट झेलत जाते ॥

 आतून  तोडण्याचा अनेकदा प्रयत्न करतात ते,
पण तितक्याच ताकदीने ऊर्मी मला उभी करते ॥

कितेकदा कोलमडून पडतेय असे वाटते ,
पण कुठून ही आंतरिक हाक मला साद देते ॥

तीच मला वाट दाखवून खळग्यातून बाहेर काढते ,
तीच मला पुन्हा रुजण्यास समर्थपणे मदत करते ॥

©डॉ. प्रज्ञा देशपांडे
नागपूर.

Friday, May 26, 2017

सहजोक्त

#सहजोक्त

जेव्हा खुप घाई असते
तेव्हाच नेमके पाहूणे येतात.

जेव्हा गाढ झोप लागते
तेव्हाच नेमका फोन वाजतो

जेव्हा नेमकी कामं असतात
तेव्हाच हमखास कोणी टपकते.

जेव्हा परीक्षेची वेळ असते
तेव्हाच आयपिएल् मॅच असते

जेव्हा विचारात गर्क असतो
तेव्हाच दारावर कर्कश घंटी वाजते.

जेव्हा सगळे हवे असतात
तेव्हा नेमकं आपण एकटे असतो

जेव्हा पूर्ण कोशात जायचं असतं
तेव्हाच कोणाला तरी महत्त्वाचं काम आठवतं .

जेव्हा जे हवं असतं तेव्हा ते का मिळत नाही?
किंवा जेव्हा ते मिळत नसतं तेव्हाच ते कां हवसं वाटते?

@डॉ. प्रज्ञा देशपांडे
नागपूर

Monday, May 22, 2017

सहजोक्त

#सहजोक्त

            आराम: कल्पवृक्षाणां
            विराम: सकलापदाम्
            अभिराम: त्रिलोकाणां
            राम: श्रीमान् स न: प्रभु:॥
         
    सायंकाळी श्रीरामरक्षास्तोत्र म्हणतांना आज अचानक या श्लोकावर थबकली.
 
    किती सुंदर रचना आहे ही.आराम-विराम-अभिराम-राम ..किती  सुंदर शब्द.एकाच मूळधातूपासून तयार झालेले कृदन्तरूपे.
 
    पहिले श्लोकाचा अर्थ बघू. श्रीरामाचे गुणवर्णन करतांना बुधकौशिक ऋषी म्हणतात , कल्पवृक्षांचे जणु आराम (उद्यान) ,सगळ्या संकटांच्या विलयाचे स्थान ,तीनही लोकात देखणा ,तो श्रीमान (श्री =लक्ष्मी युक्त) राम आमचा प्रभू ,स्वामी,मालक आहे.
 
    राम शब्दच मुळात रम् (मुळधातू) रमणे या अर्थी असलेल्या धातूपासून बनवला आहे. ज्यात रमण्यासारखा आहे असा तो राम.बाकी कशात राम नाहीच.
 
    आ+राम= उद्यान  .मराठी /हिंदीत  आराम म्हणजे विश्रांती असा अर्थ घेतात. तसेही बगिच्यात मनाला आराम मिळतोच निसर्गाच्या रमणीयतेने.
 
    विराम म्हणजे विश्रांती . संकटे टाळत नाही तर हा त्या  संकटांचा विलय / लोप करतो.
 
    अभिराम .हा माझा आवडता शब्द .सर्व बाजूने ( व्यक्तिमत्वाच्या सर्वांगाने) जो रमणीय आहे तो अभिराम. तीन्ही लोकांना ज्याने रमवले ,गुंतवले स्वत:त तो राम ,अभिराम असणारच.

    श्लोकात या चारही शब्दांचा किती सुरेख वापर केलाय ना!

    ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
    नागपूर .

Saturday, May 20, 2017

सहजोक्त

#सहजोक्त

काल "माऊलींचे हरिपाठ" वाचत होती.
दोन शब्द विशेष लक्षात राहिले.
त्यातला एक 'वाउगा ' . आजच्या प्रचलित मराठीत वावगे.
शब्द किती सहज अंतरबाह्य कूस पालटतात ना !

'वा'  हे अव्यय आहे. अथवा ,किंवा यात ते आहेच . वा हे पर्यायदर्शक अव्यय आहे.
'उगा' म्हणजे  व्यर्थ,अकारण,अहेतुक . "वा-उगा" म्हणजे "किंवा अकारण" . वा उगा चे झाले वावगे ! त्यात वावगे काय?

दुसरा शब्द आवडला "समरस" .
आजकाल "समरसता" हा परवलीचा शब्द झालाय.
सम म्हणजे  समान ,सारखे.  "परि या सम हा " प्रमाणे.
रस शब्दाचे अनेक अर्थ आहेत.
काव्यातील नऊ रस,म्हणजे भाव.
जेवणातील सहा रस म्हणजे चव.
रस म्हणजे सार ,अर्क गाभा,आकर्षण,आवड .
जो रस घेण्यात सक्षम आहे तो रसिक.
 ज्याची आवड असेल ते सरस ठरते.
 नाही आवडत त्यात रस नसतो,नीरसच ते.
तर असा हा रस शब्द.
 त्याला  "सम" उपसर्ग लावला नि समरस झाले.
समदु:खी
सम+अन्वय =समन्वय
समतल
सम+आधान= समाधान
समभाव
सम+आन =समान
समदृष्टी
असे अनेक शब्द आहेत.

जेव्हा जीवनदृष्टी ,जीवनार्क ,जीवनसार एकवटतो तेव्हा खरी समरसता होते.
बाकी शब्द म्हणजे हवेचे बुडबुडेच ना !

©डॉ. प्रज्ञा देशपांडे
नागपूर.


Friday, May 19, 2017

सहजोक्त

#सहजोक्त ~संवादकाव्य.

कोणी तरी विचारले ,,"  आवडती  भाषा       कोणती ?"
मी म्हटले,"संवादाची ,मनाला मनातून जोडणारी ,
एकदा "आपली"म्हटले की सर्वार्थाने स्वीकारणारी".

पुन्हा कोणी तरी म्हटले ,"प्रमाण की बोली ?"
उत्तरले मी ,"तारतम्याचे प्रमाण मानून हृदयाची बोली.".

"शुद्धतेचे काय ?" पुन्हा गहन प्रश्न !
"शब्दांच्या पलीकडले भाव आकळणारे मन हवे रे शुद्ध !!"

"मग काय ,व्याकरणाचे  नकोच बंधन ?"
"अरे बंध जपा मानवीनात्यांचे .तुझा-माझा संवाद नव्हे शर्यतीचे मैदान !"

"मग नेमकी आवडते कोणती भाषा ?"
"ये हृदयीचे ते ह्रदयी करीत चराचराला पसायदान देणारी माऊलीची वात्सल्यभाषा !"

©डॉ. प्रज्ञा देशपांडे
नागपूर.

Thursday, May 18, 2017

सहजोक्त.

#सहजोक्त.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
नागपुर.
साहित्यकार विश्वनाथाने म्हटलेय की ,''वाक्यं रसात्मकं काव्यम्"। म्हणजे रसयुक्त वाक्य म्हणजे काव्य होय.
संस्कृतमध्ये गद्य-पद्य-नाट्य-मिश्र आदि सर्व प्रकारांना काव्य असेच म्हणतात. आकारानुसार काव्याचे लघुकाव्य -दीर्घकाव्य-खंडकाव्य- महाकाव्य असे भेद पडतात.

विश्वनाथाची वरील व्याख्या विशेष मननीय आहे. त्यांच्या मते "एका" वाक्याचे सुद्धा काव्य होते पण त्या वाक्यात "रस" हवा.नवरसांपैकी कोणतातरी एक रस टाकला की काव्य झाले ,इतके सोपे नाही.

राजाभोज-कालिदासाची कथा सांगतात .ती अशी .....
तीन नवकवी भोजराजाकडे पारितोषिकाच्या आशेने जातात. प्रवासात जातांना त्यांना कळते कीराजाला काव्य आवडते म्हणून ते ताजे-प्रासंगिक  काव्य रचून नेतात. प्रसंग असा असतो की ते नदी काठी जेवायला बसतात. त्याच वेळी नदीकाठच्या जांभळाची पिकलेली फळे पाण्यात पडतात नि तरंग उठत "डुबुक्" असा आवाज होतो,पण मासोळ्या ते खात नाहीत.
हे तिघे एकेक  ओळ चरतात.शेवटची अोळ मिळून रचतात.
पक्वानि जम्बुफ़लानि
पतन्ति जलमध्ये
मत्स्या: तानि न खादन्ति
जलमध्ये डुबुक् डुबुक् ॥
अर्थ असा ......जांभळाची फ़ळे पिकली ,
ती पाण्यात पडली
पण मासोळ्या खात नाहीत
पाण्यात "डुबुक्" असा आवाज येतो.
 आपण छान कविता केली ,सरस केली या भावनेने आनंदून ते धारानगरी (भोजराजाची राजधानी) कडे निघतात.
 वाटेत त्यांना सुदैवाने कविकालिदास दिसतात. हे तिघे नमस्कार करून ती कविता दाखवतात. कालिदास म्हणतात ,"वा ,वा! काव्य छान आहे ,फक्त एकच दुरुस्ती आहे !" त्यांनी 'कोणती?' विचारल्यावर ...
 पक्वानि जम्बुफ़लानि
पतन्ति जलमध्ये
मत्स्या: तानि न खादन्ति
जालगोलकशंकया ॥
अर्थात ..जांभळाची फ़ळे पिकली ,
ती पाण्यात पडली
पण मासोळ्या खात नाहीत
कारण जाळ्याची आशंका.
असे लिहून काव्य परत करतात.
हे तिघे राजसभेत जातात. राजा त्यांना पारितोषिक देतो.

 वरील कथेचे सार म्हणजे शेवटच्या अोळीत काव्यगुण आहे .शेवटच्या अोळीमुळेच काव्य झाले .
 शब्दाला शब्द ,चमत्कृती ,रसपोष सगळे असूनही "प्रतिभा-लावण्य" नसेल तर ते काव्य बाळसेदार न होता सूज ठरते.
 सिक्सवर्ड स्टोरी असो ,हायकू असो ,चारोळी असो ,शेर असो वा लघुकविता काहीही असो .काव्यगुण असला तर ते अप्रतीम ठरते.
 उलट जितके छाटे वाक्य तितका प्रतिभेचा कस जास्त लागतो.
  अन्यथा.......आनंदीआनंद.......
  ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
  नागपुर.



Wednesday, May 17, 2017

कविता

#कविता

जेव्हा मला तुझी खूप सय येते ना देवा
नसतोस  तू जवळ मग तुझा करते मी धावा

किमान तुझ्या ह्रदयात दे अढळस्थान
सतत ठेव मनात," मी तुझीच" याचे भान

करू नकोस उपेक्षा आता तू उगाच
सत्वर पाव देवा रे जन्मामध्ये याच.

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
नागपुर

Monday, May 15, 2017

कविता

सगळं जाणून मुद्दाम छळणे
क्षमा मागूनी  सांगी कारणे
देवा,असे कसे रे थंड जगणे ?
तसे तुझे हे नेहमीचे वागणे
बरे नव्हे......

कुठल्या जन्माचा हा दावा
लुबाडशी तू बुद्धीचा ठेवा
किती करावा देवाचा धावा
दगडा, कधी तू होशील देवा.?
बरे नव्हे........

©डॉ.प्रज्ञा देशपांडे.
नागपूर

Friday, May 12, 2017

तुू.......

तू म्हणजे फ़ॅक्टचा पुतळा
तू म्हणजे वास्तवाचा मेळा
मी काय फँटसीची माळा
मी स्वप्नांचा पसारा ॥१॥

तू अफाट कर्तृत्ववान्
तू आहेस रे महान्
मी फावल्या वेळेचा मान
मी रिकामी नि लहान॥२॥

तू अथांग आकाश अनंत
तू दयाळू कृपावंत
मी क्षणिक सुखाची उसंत
मी शांत ,निवांत ,संथ ॥३॥

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

शब्दचिंतन..

#शब्दचिंतन..
(हिंदी चित्रपटगीताबरहुकूम/नवतरूणाईच्या विशेष संदर्भात)

क्रेझी हा मराठीत रुळलेला एक शब्द आज "त्या" अर्थाने कानावर पडला. शब्दांवर विचार करायची सवय .स्वस्थ बसवेना. अनेक मराठी शब्द आठवून पाहिले.
 शेवटी एक सुंदर-अधिक समर्पक शब्द आठवला. ..."अनुराग".
 बरेचदा कोणाचे नाव असू शकेल. किंवा हिंदीगाण्यामध्ये ऐकला असेल.(यूँ हि महके प्रीत पिया की मेरे अनुरागी मन मे ) असो.

एक मस्तच शब्द हाती आला.
राग मराठी माणसाला दोनच माहिती . रागावण्याचा किंवा गाण्याचा. तसे रागरंग अोळखून वागण्यात आम्ही तरबेजच हो !

अनुराग शब्द दैनंदिन मराठीत तितकासा रुजला नाही ,कारण काय ते कळायला मार्ग नाही.
 हा मूळात संस्कृत शब्द. हिंदीत श्रुंगाररस-संदर्भाने तो योजतात.
या अनुराग शब्दाला एक रम्य  -नादमाधुर्य आहे. शिवाय त्यात एक नर्म(काहीसे लाजाळू)श्रुंगारिक छटा आहे.
राग या शब्दाच्या अनेक अर्थच्छटा आहेत. जसे
राग= रंग ,प्रेम ,वात्सल्य,स्नेह ,अोढ ,अनिवार अोढ ,मर्मातीत गुंतणे ,गाण्याचा राग ,प्रेमात आकंठ बुडण्याची भावना  इ. इ.
याच राग शब्दाला 'अनु' हा उपसर्ग लागला नि अनुराग तयार झाला.

अनुकरण, अनुशीलन,अनुशासन,अनुभव ,अनुभूती ,अनुवाद,अनुक्षण,अनुनय(हा पण गोड-श्रुंगारिक शब्द बरे!!) ,अनुयायी.......यादी बरीच लांबू शकते.

अनु  हा उपसर्ग साधारणपणे मागाहून जाणे (to follow ) या अर्थी घेतात.
राग-अनुराग. म्हणजे कोणाच्या तरी मनात 'ती' भावना पहिले येते मग त्या भावनेचे संक्रमण
दुस-यात झाले तर तेव्हा  ते अनुराग होते.
अनुराग निर्माण झाला की ती व्यक्ती अनुरागी (पुरुष) वा अनुरागिणी (स्त्री) होते. त्यांचे मन एकमेकांशी अनुरक्त होते.
एकूणच क्रेझी शब्दामागे पागलपन ,दिवानगी दिसते तर अनुराग मध्ये या छटांसह हळुवार -सातत्य-जपणूकही असते.
अगदी यथार्थ-सार्थ शब्द आहे अनुराग.

यापुढे " crazy किया रे! " विचारण्यापेक्षा "अनुरागिणि केलेस रे !" असं कृतककोपाने कटाक्ष टाकून,लडिवाळ स्वरात म्हणील ना ; कि माझे "अहो" सारं विसरून अनुरक्त होतीलच पहा!!!😎😎
मग......
अनुरागाचे थेंब झेलती प्रीत लतेची पाने
तुझ्या नि माझ्या भेटी मधूनी फुलती रम्य तराणे.......😍😍😍😍

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
नागपूर
१२.०५.२०१७.




Tuesday, May 9, 2017

#सहजोक्त

#सहजोक्त
१०.५.२०१७
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे "इतिहासाची सहा सोनेरी पाने" लहानपणी वाचली होती. भारताचा महान गौरवशाली इतिहास कायम मान ताठ ठेवायला मदतच करतो.
इस्लामच्या उदयानंतर सारे जग इस्लाममय करण्यासाठी निघालेल्या अनुयायांना युरोप ते मध्यपूर्व आशिया जिंकायला फक्त १०० वर्षे लागलीत तर भारतात प्रवेश करून भारत जिंकायला ७०० वर्ष प्रयत्न करावे लागले तरीही संपूर्ण भारत इस्लाममय झाला नाही. उलट भारतीयांच्या सहिष्णुतेचा परिणामस्वरूप आक्रमक-कट्टर इस्लाम थोडा मवाळ झाला अशी ही भारतभूमी .
(जिज्ञासुंनी  नरहर कुरुंदकरांची जागर, आकलन, मनुस्मृती, धार आणि काठ ही पुस्तके वाचावीत. तसेच धर्मपालजींची "अठराव्या शतकातील भारतीय शिक्षण _रमणीय वृक्ष"  सुद्धा .)

हे सारं आठवायचे कारण आज वैशाख पोर्णिमा म्हणजे बुद्धपोर्णिमा. जगात अहिंसा-प्रेम-समानता-स्वातंत्र्य यांचे संस्कार करणा-या भगवान् बुध्दाच्या संबोधीचा दिवस.
भारतात जेव्हा सुवर्णकाल होता त्यावेळी अफ़गणीस्थानअहिगण स्थान होते,कंदाहर गंधारदेश होता,कुबला नदी काठी काबुल होते (असे वैदिक उल्लेख आहेत)
 स्थैर्य-शांती सर्वत्र नांदत होती. मानवीसंस्कृतीची परमावधी साहित्य-संगीत-कलेतून चराचरात प्रगट होत होती. त्यावेळी गंधारदेशात शिल्पकला चरमोत्कर्षावर होती. अप्रतीम स्थापत्य-शिल्पे आदी जागोजागी होते.
इस्लामिक आक्रमणाच्या काळात गंधारदेशात बुद्धमूर्त्या बाहुल्याने होत्या. आजही अरबी-फारसी भाषेत "बुत" (बुद्ध शब्दाचा अपभ्रंश) शब्द मूर्तीला पर्यायवाची म्हणून योजतात.
तालिबानी माथेफिरूंनी जागतिक वारश्याच्या बुद्धलेण्या बॉम्ब टाकून उध्वस्त केल्या आजही तेथे ध्वस्त खंडहर त्याचे साक्षिदार आहेत.
अफगणीस्थानात मिळालेली सध्या पाकिस्तानी पुराणवस्तुसंग्रहालयात असलेली प्राचीन बुद्धमूर्तीचा फोटो पाहिला. .(मू्र्तिशास्त्राचे अभ्यासक ,माझे मित्र श्री प्रवीण योगी यांनी फोटो पाठवलाय)

 . पुन्हा सा-या जगात मानवी सुसंस्कृतता चरमोत्कर्षाला येईल असा अढळ विश्वास बाळगत ,
 बुध्दपोर्णिमेच्या दिवशी, बुद्धाने प्रत्येक व्यक्तीला जे "अत्त दीपो भव" सांगितले; त्याचे निरालस अाचरण करून अभिवादन करू या.
 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे
 नागपुर.

Saturday, May 6, 2017

सहजोक्त

#सहजोक्त

"कोई जब तुम्हारा हृदय तोड दे
तडपता हुआ जब कोई छोड दे
तब तुम मेरे पास आना प्रिये
मेरा घर खुला है खुलाही रहेगा तुम्हारे लिये "......

मुकेशचे निराश मनाचे गाणे कानावर पडले.
विचार आला की या गाण्यातून पुरुषी अहंकार सहज दिसतोय.
"मी तुझ्यावर निस्सीम प्रेम करतो , पण तुझी पहिली पसंती मी नाही ही बाब मला खटकते शिवाय मी तुझ्या प्राधान्यक्रमातही नाही हे पण असहनीय आहे. या उपर तू दुस-यात गुंतली आहे हे तर मला पार हताश निराश करणारे दुश्चिन्ह आहे. त्यावर मी काहीही इलाज करू शकत नाही ही माझी अगतिकता. शेवटी सदिच्छा देण्याच्या निमित्ताने मनातले विचार वर व्यक्त झाले. तू माझ्याशिवाय कायम सुखी असूच शकणार नाही अशी ठाम भावना तो व्यक्त करतोय. म्हणजे तिला जे प्रेम
दुस-यापासून मिळतय ,ती खुलतेय ,ती बहरतेय हे त्याला झेपत नाहीय. "

असूया आहेच. असूया हा काही स्त्रीचा कॉपीराईट नाही. अनेक पुरूष संशय-असूया-द्वेषाने दिवसरात्र जळत असतात.
निस्सीम प्रेम असलेला हा तिची अनंतकाळ वाट पाहायला तयार आहे. कोणत्याही परिस्थितीत तो तिला स्वीकारणार आहे.
म्हणूनच विचार येतो की 'इतका महान आहेस तर तिला ज्यात सुख वाटेल त्यास  तुझा मनापासून पाठिंबा सदिच्छा कां नाहीत ?
माझ्याशिवाय ती इतरत्र सुखी राहूच शकणार नाही असा अहंभाव की सुप्त आसुरी इच्छा ??
वस्तुंसारखीच व्यक्तींवरही मालकी असावी कां??
आवडणे >प्रेम>ममत्व>स्वामित्व> हे स्वकेंद्रित मनोवृत्तीचे परिमाण असतात कां?

मला नेहमी प्रश्न पडतो .नातं कोणतंही असो, जर आपण मनापासून त्यावर प्रेम करत असू तर त्याला परिपूर्ण मोकळिक दिलीच पाहिजे. सहज-स्वाभाविक-स्वातंत्र्य जिथे जपल्या जाते तेच खरे नाते. बाकी सारे सोयीचे-गैरसोयीचे लादणे-सहणेच असते.

हेच जास्त दिसल्यामुळे कवी म्हणतो.
"सुख पाहता जवापाडे
दु:ख पर्वया एवढे "...

©डॉ. प्रज्ञा देशपांडे
नागपूर
७.५.२०१७

Monday, May 1, 2017

#चिंतन

#चिंतन
भारतीय संस्कृती मध्ये 'तीन 'या अंकाला फार महत्व आहे. त्रि>त्रय>तृतीय>ततीय>तीज>त्रिक>तीन
म्हणजे ३.
मधल्या मध्ये "तीन तिघाडा काम बिघाडा" कधी झाले कळलच नाही.
पण तीन हा भारी आकडा आहे.
त्रिदेव =ब्रह्मा- विष्णू-महेश
त्रिकाल=दिवा-निशा-सायम्
त्रिनेत्र =सूर्य-चंद्र-अग्नी
त्रिलोक=स्वर्ग-मृत्यु-पाताळ
त्रिवेणी= गंगा-यमुना-सरस्वती
त्रिदोष=वात-पित्त-कफ
त्रिगुण =सत्व-रज-तम
त्रि-अवस्था =घन-द्रव-बाष्प
त्रिगण= देव-मनुष्य-राक्षस
प्रस्थानत्रयी= उपनिषद्- गीता-ब्रह्मसूत्र
वेदत्रयी=ऋग्वेद-यजुर्वेद-सामवेद
वर्णत्रय=कषाय-शुभ्र-हरित
त्रिफ़ळा= हरितकी-बिभितकी-आमलकी (हिरडा-बेहडा-आवळकठी)
त्रिपिटक= सुत्तपिटक-अभिधम्मपिटक-विनयपिटक
त्रिताप =आधिदैविक-आधिभौतिक-अध्यात्मिक
त्रिमुर्ती= ब्रह्मा-विष्णु-महेश
त्रिपीडा= पत्निपीडा-पुत्रपीडा-संपद्गणनपीडा
त्रिहट्ट=राजहट्ट-स्त्रीहट्ट-बालहट्ट
त्रिदशा=बाल्य-तारुण्य-वृद्ध
त्रिबंध= उड्डियान-जालंधर- मूलबंध
त्रिरत्न= बुद्ध-धर्म-संघ
अजून त्रिके आठवले तर सांगा..
©डॉ. प्रज्ञा देशपांडे
नागपुर.