दिवस उजाडतो मालवतो , काळ समोर जातो , कालगणना माणूस करतो , ना सूर्याला त्याचे भान ना पृथ्वीला खंत-खेद ! त्यांच्या गतीत खंड नाही , त्यांच्या मनात बंड नाही , कारण त्यांना मुळात सिद्धच करायचे नाही !
नदी उगमापासून ते मिलनापर्यंत वाहत असते अखंड सदोदित .
तिच्या गावीही नसते कोणत्या गावातून , कोणत्या प्रदेशातून ती जातेय , कोण्या भागाला ती समृद्ध करून सोडतेय. कोसळते , अडखळते , खोल गर्ता निर्माण करते , डोहात सामावते , बागबगिचे फुलवते कधी , वाळवंटही करते कधी .
लोकं मोजतात लांबी-रुंदी आणि तिची खोली. धरणे-बांध-बंधारेही बांधून करतात विकास स्वतःचा , रोखून नैसर्गिक मार्ग तिचा . थबकते , बदलते तरी वाहतेच वाहते , नव्या रूपात न् स्वरूपात. नदी म्हणूनच नदी असते कारण तिला कुठे काय सिद्ध करायचे असते ?
झाडही तसेच माळावर , बांधावर , रस्त्याच्या काडेवर उगवते , जगते , येण्या-जाण्या-यास समाधान देते. कोणी तोडले तरी परत जगते. किती अवर्षण किती अतिवर्षण सहज पचवून परत जगते. फुले देते , फळे देते , बसाल छायेत तर ती ही देते. आपल्याच गतीने न् यथेच्छ मतीने झाड बहरते , वठते. उपेक्षेने खंगत नाही , कौतुकाने पुष्ट होत नाही. सिद्ध करायची गरजच नसते कारण झाड , झाडासारखेच असते.
"आमची काळजी घेते , आमची विचारपूस करते , स्वयंपाक छान बनवते , घराला घरपण देते , शिकलेली असून मर्यादेत रहाते , कमावती असूनही माज नाही" , या सगळ्या अोझ्यात "ती" मात्र अभिमन्यू होते.
जरा कुठे चुकली की माहेरपासून , अकलेपर्यंत उद्धार हा ठरलेलाच . डिग्रीवरही प्रश्नचिह्न कायमच रोखलेले .
तिची इच्छा असो नसो , तिलाच सर्व जोखत असतात ,पारखत असतात , पदोपदी अग्निपरीक्षा तिलाच तिलाच द्यायला सांगत असतात . तिच्या अस्तित्वासाठी प्रत्येक गोष्ट , प्रत्येक क्षण सिद्ध करायला भाग पाडत असतात.
समाजाने चौकटीची मखर पूर्वापार केलीय , त्यात मातृशक्ती ,नारायणी म्हणून तिला बसवली आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत तिला सिद्धच करायचे आहे , नवे नवे उच्चांक तिने सतत गाठायचे आहे , आदर्शाचे अोझे तिनेच वाहायचे आहे , स्त्रीत्वाची अनमोल किंमत तिला नेहमीच चुकवायची आहे.
"तू चांगली मुलगी आहेस , चांगली बहीण , चांगली पत्नी आहेस , चांगली मैत्रिण आहेस न् चांगली आई आहेस ,
एक कर्तृत्ववती स्त्री आहे , बुद्धि-सौंदर्याने युक्त आहेस , गृहकृत्य दक्ष आहेस , उत्तम बॉस आहेस , सर्वच क्षेत्रात अव्वल आहे."
या सर्व अपेक्षा वजा आज्ञा त्यांच्या असो वा तिच्या ; पाळता पाळता ती मूळात उरलीच कुठे ?
सतत समज आल्या पासून केवळ 'त्यांना' चांगले वाटावे म्हणून सारखी धडपडते आहे .
#आताशा ना मला सिद्ध करायचा कंटाळा आला आहे . म्हणजे काय समजू मी ? माझा जगायचा अधिकार संपलाय ?
छे ; अजिबात नाही. ब्रह्मदेवाला बाजूला सारून मी परत जोमाने नवसृष्टीची रचना करायची वेळ आता आली आहे !
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
No comments:
Post a Comment