Wednesday, July 15, 2020

सहजोक्त.

#कृष्णकथा .
कृष्ण मग तो कोणत्याही रूपातील असू दे , मनमोहनच ठरतो. आबालवृद्धांना कृष्णाच्या कथा आवडतातच . अशीच एक कृष्णकथा. 
इंद्राच्या नंदनवनात असलेल्या या झाडाच्या फुलांच्या सुगंधाने मोहून जात कृष्ण ती फुले वेचतो , द्वारकेत येतो रुक्मिणीच्या महाली न् सहज तिच्या हातात ती स्वर्गीय सुगंधी फुले  देतो ,सहाजिकच ती मोहरून जाते. कृष्ण निघून गेल्यावर शेजरच्या सगळ्या सवती गप्पा मारायला जमतात.  नव-याचे आपल्यावर प्रेम आहे ह्याची फक्त जाणीव बायकोला पुरेशी नसते तर चारचौघात त्याचे प्रदर्शन करणे आवडत असते. रुक्मिणी स्त्रीसुलभ भावनेने ती फुले सगळ्या जणींना दाखवते . इतर  सर्व सवती तिच्या आनंदात सहभागी होतात.  वरवर दाखवले नाही तरी सत्यभामेला आतून प्रचंड राग येतो. मुळात सत्यभामा अतिशय रूपगर्विता असते . शिवाय तिच्याकडे स्यमंतक मणी असतो ,जो रोज आठ भार सोनं देत असतो. (स्यमंतकाची कथा पुढे कधीतरी .) ती फारच श्रीमंत असते . कृष्णाने फक्त न् फक्त माझ्याचकडे जास्त लक्ष द्यावे असे तिला कायम वाटत असते. 'कृष्णाने रुक्मिणीला फुले दिली म्हणजे माझ्या सौंदर्याचा न् प्रेमाचा अपमान झाला, मी हरली' असे ती मानून घेते.  जेव्हा कृष्ण तिच्या महाली येतात , तेव्हा ती फारच रुसलेली असते. तिला समजवण्यासाठी कृष्ण बरेच प्रयत्न करतात . 'न च सुंदरी करू कोपा  मजवरी धरी अनुकंपा' अशा प्रकारे लाडीगोडी लावू लागतात. पण स्त्रीहट्ट सोपा नाही. तिचा एकच हेका , 'तिलाच कां फुले दिलीत , मग मी कोण? माझं स्थान काय ? वगैरे वगैरे '  शेवटी कृष्ण तिला म्हणतात , "अग बाई नको अशी रागावू , तिला दिली फुलं ,चुकलंच माझं !पण तुला झाडच आणून देतो , मग तर तू खूश होशील ना ?" झालं बाई जरा खुलतात. पण विसरत नाहीत. कृष्ण परत नंदनवनात जातात न् इंद्राला मागून त्या स्वर्गीय वृक्षाचे रोपटे आणतात, द्वारकेत सत्यभामेच्या अंगणात लावायला. बाईंची कळी खुलते . बालकवी या प्रसंगाचे वर्णन 'श्रावणमासी' कवितेत करतात की ," पारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळला" . अंगणात कुंपणाच्या कडेला लावलेले ते झाड छान मोठे होते , फुलांनी बहरून येते. पण जास्ती फुले नेमके शेजारी असलेल्या रुक्मिणीच्या घरी पडतात ,असे नारद तिच्या लक्षात आणून देतात. मग काय ? "फुले कां पडती शेजारी?" असा भुंगा हिच्या डोक्यात लागतो. (त्यावरूनही पुढे कथा घडते ,ती पुढच्या भागात.) 
तर कथेचा मथितार्थ असा की कृष्णासारखा द्वारकाधीश बायकोच्या  नखरे व संशयातून सुटला नाही , तर बाकीच्या पामरांनी ,"आलीया भोगासी असावे सादर" , कायम रहावे , हेच बरे ! 
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

No comments:

Post a Comment