Thursday, July 16, 2020

सहजोक्त


अौचित्यहीन.
काही कारणाने काही काही गोष्टींचे औचित्य नष्ट होते. औचित्य नष्ट होण्याची अनेक कारणे असू शकतात. पण परिणाम मात्र एकच की गोष्ट असूनही औचित्य संपलेले असते.
काही परंपरा , रूढी  , कर्मकांड यांना जसे लागू पडते तसे वस्तु , प्रसंग , साहित्य , व्यक्ती यांनाही ते लागू पडते. 
औचित्यहीन गोष्टी अप्रासंगिक , संदर्भहीन सुद्धा ठरतात. 
आता हेच बघा ना. पूर्वी पत्रलेखन ही कला होती.  पुराणकाळापासून ते दशकापूर्वी पर्यंत तिचे महत्त्व होतेच. शालेय शिक्षणात अौपचारिक न् अनौपचारिक पत्रलेखन पाठ्यक्रमाचा भाग होते. पुराणात रुक्मिणीने श्रीकृष्णाला पत्र लिहिले होते. इतिहासात संयोगितेने पृथ्विराजाला पत्र लिहिले होते. चाचा नेहरुंनी तुरुंगातून छोट्या इंदिरेस लिहिलेल्या पत्रांचे पुस्तकरूप आज उपलब्ध आहे.  पत्रातून इतिहास कळतो , तसा पत्राने इतिहास घडवलाही आहे. जसे  'ध'चा 'मा' पत्रातूनच झाला.  
अनेक दिवस डोक्यात विचार घोळवून , पत्र लिहायला घ्यायचे , कितेकदा खोडतोड करीत कच्चे लिहायचे मग ते एकदाचे फेअर उतरवायचे. पोस्टात टाकायचे , खूप दिवसांनी पत्र मिळायचे . मग पत्राचे पहिले वाचन मग आवर्तन मग त्याच्या उत्तरासाठी केलेली तजवीज .   मग उत्तर लिहून पाठविण्यासही  तसेच सायास करायचे. असा एकूण पत्रांचा प्रवास असायचा. 
साधे पोसचटकार्ड , इन्लँड , लिफाफा वगैरेंसह गुलाबीपत्रे इत्यादी सर्वच पत्रप्रकार आपापले महत्व टिकवून होते. 
पण हाय रे दैवा. इंटरनेट , डिजिटलायझेशन , स्मार्ट फोन आदी मंडळी आल्या नि बिनबोभाट चालणारा पत्रव्यवहार ठप्प पडला. 
परिणामी आज पत्रलेखन-प्रकार अप्रस्तुत , अप्रासंगिक  झाला. "पत्र" प्रकारच अौचित्यहीन  झाल्यामुळे  "पत्र"
विषयक  सर्वच साहित्य बादच झाले ना ! 
कितेक हिंदी/मराठी सिनेमाची गाणी खत , चिठ्ठी , पत्र यावरून आहेत . जसे
•लिखे जो खत तुझे जो तेरी याद में हजारो रंग के सितारे बन गये...
•ये मेरा प्रेमपत्र पढकर कि तुम नाराज ना हो ना ...
•चिठ्ठी अायी है , आयी है चिठ्ठी आयी है....
•आपका खत मिला आपका शुक्रिया ....
•हम दोनो मिलके चाहत से खिलके चिठ्ठी लिखेंगे जबाब आयेगा...

असे बरेच गाणे , प्रसंग ; जरी आज औचित्यहीन वाटत असले तरी अविस्मरणीय ठरलेले होते.
असे प्रसंग वा गाणे तुम्हाला आठवत असतील तर कॉमेंट-बॉक्स मध्ये कळवा. 
©डॉ. प्रज्ञा देशपांडे. 

No comments:

Post a Comment