ये नाम केचिदिह न प्रथयन्त्यवज्ञां
जानन्ति ते किमपि तान् प्रति नैष यत्नः।
उत्पत्स्यते तु मम कोऽपि समानधर्मा
कालो ह्मयं निरवधिः विपुला च पृथ्वी।।
भवभूतीच्या उत्तररामचरितम् मधील हा श्लोक निराश परिस्थितीतही आशावाद जागवणारा विचार मांडतो. श्लोकाचा अर्थ असा की जे कोणी आमचा अवमान करतात त्यांनी हे समजून घ्यावे की त्यांच्यासाठी आम्ही हे करीतच नाही अाहोत. काळ अनंत आहे न् पृथ्वी विपुल आहे.नक्कीच माझ्या सारखा समानधर्मी उत्पन्न होईलच.
भवभूती सारख्या महाकवीला असं कां म्हणावेसे वाटले असेल ??
नागपुरात जुन्या पिढीत डॉ.ब.स.येरकुंटवार नावाचे प्रखर विद्वान होते. विद्वत्ता न् लोकप्रियता नेहमीच समप्रमाणात असेल असे नाही . किंबहुना व्यस्तप्रमाणात अधिक असते. ब.स. येरकुंटवारांच्या विद्वत्तेच्या पासंगालाही न पुरणारे अनेक जण त्याकाऴी विद्वत्प्रिय होते.
अंबादास शास्त्री पांडे म्हणजे पांडे गुरुजी,गाढे वैय्याकरणी. कोणत्याही संस्कृत विद्वानाने नतमस्तक व्हावे असे व्यक्तिमत्व. विद्यादान(कोणतेहि शुल्क न घेॆता) करण्याचे व्रत त्यांचे. सायंकाळी चार ते सहा कोणीही विद्यार्थी आला तर त्याला समभावाने शिकवणार. नुकतेच संस्कृत शिकणा-या लहानग्यापासून तर सेवानिवृत्तीला आलेल्या प्राध्यापकांपर्यंत कोणीही आले तरी तितक्याच जिव्हाळ्याने शिकवणार. निस्पृह न् प्रसिद्धी पराङ्मुख ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व . कधीच कोण्या विद्वत्सभेत वा चर्चासत्रात गेले नाहीत.
असे अनेक सरस्वतीपुत्र अज्ञात राहून ,लक्ष्मीकडे पाठ करून केवळ ज्ञानसाधना करीत असतील ; माहित नाही.
आज सोशलमिडियामुळे व्यासपीठांचा सुकाळू झाला आहे. जेवढे बहुसंख्य व्यासपीठं त्याहून अधिक शब्दप्रभू ,महाकवी ,रससिद्ध लेखक ,युगातील थोर कलाकार ,नटसम्राट वगैरे वगैरे निर्माण झाले आहेत.अनेक समूह ,मंच ,संस्था सुरू होऊन सुजाण ,संवेदनशील ,रसिक ,दर्दी श्रोते ,प्रेक्षक ,प्रोत्साहन देणारे ,दाद देणारे आश्रय दाते तयार झाले आहेत. हे सारे असून देखील काही तरी कमी आहे.
गट-तट ,कळप-कोंडोळे करून ,"अहो रूपम् अहो ध्वनिः ।" करत असतात. अशा व्यासपीठांच्या ठेकेदाराशी जुळून घेतले तर मग तुम्ही महान् ! नाही तर कस्पटासमान !! मानव हा सामुहिक प्राणी आहे. त्याचा हा परिणाम असेल काय ? ठेकेदारांना अमान्य असलेल्यांमध्ये प्रतिभेचा दुष्काळ असतो कां? सतत झगमगाटच दिपवण्यास हवा कां ? संथ ,सोज्वळ,मंद ज्योत कुचकामीच ठरावी कां ? प्रश्न.प्रश्न .प्रश्नमालिका !!!
भवभूतीच्याही वेळी असेच असेल कां ??
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.