कोण कोणापासून काय प्रेरणा घेईल ,हे सांगता येत नाही. गेले अनेक वर्षे मी लिहिते आहे. खरं मी आधी लिहीत नव्हते. एक दिवस अचानक मराठी भाषा या विषयावर लिहून काढलं . तरूण भारतात पाठवलं . चक्क छापून आलं . डॉ. के.रा.जोशींसारख्या विद्वानांनी कौतुक केलं ,हुरुप वाढला न् लिहिती झाली. बरेच वर्षे व विविध नियतकालिकांतून दैनिकातून लेखन केले आहे ,करते आहे. संस्कृतची पुस्तके लिहिली.
एक दिवस सागरने मला ब्लॉग सुरु करून दिला न् मी ब्लॉग लेखक झाले. दैनिकात देण्यापेक्षा ब्लॉगवर प्रकाशित करणं सुटसुटीत वाटू लागले.
सहजोक्त , शब्दचिंतन ,चिंतन ,चित्रकविता या अशा शीर्षकांतर्गत लेखन करू लागले.
लेखन ही माझी ऊर्मी आहे. जेव्हा जसं सुचलं तसं लिहिते. फार ठरवून नसते. अगदी सहज ,आतून आलं की लिहिते.
माझ्या लेखनाने मला तर अभिव्यक्त होण्याचा आनंद मिळतो. वाचकांनाही लेख वाचून आनंद होतो. माझं लेखन वाचून अनेक जणं लिहिती झाली ,ही गोष्ट अधिक आनंद देणारी आहे. काही जणं ब्लॉगही लिहू लागले. काही जणांनी ते मोकळेपणाने मान्य केले .तो त्यांच्या मनाचा मोठेपणा. मला आनंद यातच की लेखन-वाचन संस्कृतीला जरा हातभार लावण्याचे भाग्य मला मिळाले.
काल सुखद धक्का मिळाला ;जेव्हा मी फेसबुक बघत होते...सहजोक्त शीर्षक दिसले !!! माझी मैत्रिण न् नियमित वाचक सुनिता हिने छोटंसं ललित मनोगत लिहिलं ; तेही सहजोक्त शीर्षकाने ! कॉमेंटमध्ये तिने सांगितलेही की तुमच्याच प्रेरणेने !!!
कल्पकतेचे,शैलीचे ,आशयाचे ,विचारांचे,लेखनाचे ,शीर्षकाचे , कौतुक होणं ,प्रसार होणं ,अनुकरण होणं ही खचितच गौरवास्पद बाब आहे.
अन् याबाबतील मी फारच सुदैवी आहे.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
No comments:
Post a Comment