Sunday, April 26, 2020

#सहजोक्त.

#शब्दचिंतन .
कुठेतरी वाक्य ऐकलें , " That's my bundle of joy."  वाक्यातील शब्द डोक्यात घोळत होता ,"बंडल अॉफ जॉय" ,  कारण शब्दांचा विचार करण्याची जुनी सवय ! मग या शब्दाचं मराठीकरण काय होईल ? याचा विचार करू लागली.

मराठीत या शब्दाशी मिळते जुळते  एकाहून एक खास शब्द आहेत , ज्यांचा आशय वा अर्थच्छटा जरा जराशा वेगळ्या आहेत.
जसे , आनंदनिधान , आनंदसागर ,आनंदमूर्ती , आनंदकारण वगैरे वगैरे . पण मनात हे शब्द भरत नव्हते. मग शब्द आठवला , "आनंदकंद" . किती सुंदर शब्द आहे ना ?  बंडल अॉफ जॉय या शब्दाहून अधिक मार्मिक ! 


बंडल मग ते कशाचेही असले तरी ते चैतन्य़युक्त नसते. बहुतेक वेळी वस्तुंचे बंडल असते. न् बंडल कितीही मोठं असलं तरी ते संपतेच .आनंदाचे बंडल म्हटले की त्याला मर्यादा येणारच.

उलट "कंद" म्हणजे जमिनीच्या आत दडलेला , वर न दिसणारा , झाडाचे उत्पत्तिकारण असून  सहसा कधीच  नष्ट होत नाही. आनंद नेहमी असाच कंदरूपाने मिळावा नाही कां ?   कोणाच्या आनंदाचे बंडल होऊन कधीतरी संपण्यापेक्षा चैतन्ययुक्ततेने  नवनिर्मितीला करण होणारं आनंदाचं कंद कां न व्हावे ?


इथे मला कोणत्याही भाषेला कमी लेखायचे नाही , उलट काही शब्द हे काही भाषांत अधिक  खुलून येतात.
असे बरेच शब्द मराठी-हिंदी-इंग्रजी-संस्कृत इत्यादी भाषांमध्ये आहेत , की जे असेच त्या भाषेत  खास ठरतात.
असे शब्द शोधणे ही बौद्धिक पर्वणी नव्हे कां ?
जर असे शब्द तुमच्या संग्रही असतील तर मला नक्की कळवा.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Saturday, April 25, 2020

#सहजोक्त.

#अक्षय-तृतीया
आज अनेक महिन्यांनी नव्हे वर्षांनी माझा हात बागकामाला लागला.
बागेचं काम शरद करतात . तर  मी फुलं तोडणे न्  फोटो काढणे , इतकंच काम करते.
काही महिन्यांपूर्वी कुठेतरी मिळालेलं , गुलाबाचं रोपटं बगिच्याच्या कॅरीत त्याच्या प्लास्टिकबॅग सह ठेवलं होतं . ते रोपटं वाढत होतं , त्याला फुलं येत होती . पण ते जमिनीत रुजवायचं मुहूर्तच मिळत नव्हतं. रविवारी हे काम करायचेच  असं ठरवलं होतं. न् त्यानुसार मी कॅरीत जरा मोकळ्या जागेत बरासा खड्डा खणला. गुलाबाच्या रोपाचा पुडका फाडला .  ते  रोप उचलायला गेली तर लक्षात आलं की त्याचं एक मूळ बरेच खोलवर रुजलंय. ते रोप हालवणं अवघड आहे.  मग शेवटी त्याच जागी जरासं खणलं न् उथळ खड्ड्यात ते झाड स्थापलं .
 आजकाल  वादळवा-यात  उभीच्या उभी झाडं धडालं कोसळतात . कारण वृक्षारोपण करताना ३*३ चा खड्डा , पुरेसे खत ,पाणी , भरपूर निगा र‍ाखल्यामुळे ही झाडं डेरेदार वाढतात . यांच्या मुळांना खोल खोल जमिनीत रुजायची गरजच उरत नाही . जे खाद्य हवं ते सहज तीनचार फुटात उपलब्ध असते. यामुळे ते झाड वरून खूपच सुदृढ दिसतं. झाडांच्या मुळांचे मुख्य काम जमिनीत कष्टपूर्वक  खोल रूजून झाडाला हवे असलेले पाणी , पोषणद्रव्य मिळवणे  तसेच भक्कम आधार देणे हे आहे. आयत्या मिळणा-या पोषणामुळे सखोल रुजून घट्ट आधार देणं नेमकं  विसरली ही झाडं  आजकाल !  मानवांच्या संगतीत त्यालाही  वाण नाही पण ऐदीपणाचा गुण लागला. मूळांना खोलवर न रुजवता झाडंही वरवर तगायला न जगायला लागली !!
 नेमकं माझ्या बागेतलं रोप या सगळ्यात वेगळं वाटलं .  त्याने नुसतं स्वतःला रुजवलं ; इतकंच नाही तर  "जगा न् जगवा " ह्याचे मूर्तिमंत उदाहण सादर केले . त्याच्याच प्लास्टीक-पिशवीत आपोआप उगवलेलं कर्दळीचं टुमदार रोप छान बाळसं धरत होतं. 
असं  हे गुलाबाचं झाड ,  *कोणत्याही परिस्थितीत अक्षय-जगण्याचा मंत्र* अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर देऊन गेलं.
 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Wednesday, April 22, 2020

सहजोक्त.

पुस्तके आणि माणूस
पुस्तके असतात आपले दोस्त ।
माणसाचं कधीही खरं नसतं ॥
पुस्तकांचे  विषय असतात ठरलेले ।
माणसांचे तसे असते किंवा कधी नसते॥
एकदाचे पुस्तक तयार झाले की
त्यात बदल होत नाही ॥
माणसांत नेमकं बदलच होतो नक्की काय ते ठरत नाही ॥
पुस्तकं शिकवू शकतात जर मनात ठरवलं कोणी ।
माणसं मात्र धडाच देतात , मग तयार नसेना कां कोणी ?।
प्रचारकी ,वैचारिक ,विनोदी ,वर्णनपर
 विषय ठामपणे मांडतात पुस्तके !
एकाच वेळी अनेक विषय सोयीने हाताळणे कसब माणसाचे ॥
पुस्तकाचा विषय होतो एखादा माणूस
पुस्तकाहून भयंकर असतो हा माणूस ॥
भयकथा-सूडकथा देखिल फिक्य पडतात ।
जेव्हा माणसं स्वार्थासाठी सारं जग वापरतात ॥
मानते पुस्तकांची निर्मिती केलीय माणसाने।
माणसांनाही घडवले वा बिघडवले पुस्तकाने ॥
पुस्तकांचे न् माणसाचे नाते आहे गमतीदार न् विचित्र ।
जाळायला , मिरवायला , रद्दीत टाकायला हवे हक्काचे पात्र ॥
पुस्तकाने समृद्ध होणारी माणसं असतात ।
समृद्ध-मानवी-जीवन रेखाटणारी पुस्तके असतात॥
पुस्तके पुस्तकेच आहेत म्हणून बरे आहे।
माणसाचं कळत नाही मुखवटा की खरा आहे ॥
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
#पुस्तकदिनाच्या शुभेच्छा .





Monday, April 20, 2020

#सहजोक्त

*चिंतनात्मक लेख*

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
सध्या दूरदर्शनवर रामायण सुरु आहे. र‍ामायण धारावाहिकात दाखवल्यानुसार दंडकारण्यात रामावर मोहीत होऊन शूर्पणखा येऊन त्याला मागणी घालते. राम एकपत्नीत्व पाळणारा असतो, म्हणून तिला नकार देतो. मग ती लक्ष्मणाकडे मोहरा वळवते. तोही नकार देतो. म्हणतो मी दास माणूस , माझ्याशी लग्न करून तू दासी होशील. तिलाही पटतं. ती परत रामाकडे जाते न् म्हणते, "तुझ्या बायकोला मी खाऊन टाकते, म्हणजे तुझं व्रत भंगणार नाही. मग माझ्याशी लग्न कर", असं म्हणून ती सीतेवर झडप घालते.

त्या क्षणी 'स्त्रीहत्या-पाप' घडू नये म्हणून धर्माचारी राम तिचे नाक कापायला सांगतो. न् लक्ष्मणही तसं करतो. अपेक्षाभंग न् अपमानित झालेली ती शूर्पणखा 'खर' नामक भावाकडे जाऊन गाऱ्हाणं सांगते. वरून त्याला लालच म्हणून सीतेच्या सौंदर्याचं वर्णन करून तिला तू पळव असंही सांगते. खर व त्याच्या सैन्याचा सर्वनाश रामलक्ष्मण करतात.

सुडानी पेटलेली शूर्पणखा रावणाकडे जाऊन अतिरंजित कथन करते. स्वतःचा दोष सांगतच नाही न् सर्व खापर राम-लक्ष्मणांवर फोडते. वरून त्याची बायको तू उचलून आण न् माझ्या अपमानाचा बदला घे, तसेच "सीतेसम सुंदर स्त्रीरत्न जगात नाही, तुझा महाल तिच्याशिवाय शून्य आहे" अशी वकिली करते. मग पुढचे रामायण घडते.

पण तिथून पुढे कुठे शूर्पणखा रामायणात दिसलीच नाही. यावरून मी फेसबुकवर प्रश्न विचारला, "ती सध्या काय करते?" त्यावर अनेक उत्तरं आलीत. सध्याचे लॉकडाऊन ते राजकारणापर्यंत, अनेकविध उत्तरे त्यात होती. पण शूर्पणखेची बाजू मांडत ,  लक्ष्मण कसा दुष्ट आहे, असाही एक ठाम प्रतिवाद आला. 
    तितक्यात  एकाने त्यांना उत्तर दिले  की , "राम न् लक्ष्मण समजाऊन सांगतात, पण ती सुडाने पेटून सीतेला खायला निघते म्हणून नाईलाजाने लक्ष्मण तसे करतात."       वर सल्लाही  दिला की ," वाल्मिकींचे  मूळ रामायण वाचा." 
मी देखिल पहिल्या अनपेक्षित प्रतिक्रियेला काय उत्तर द्यावे याचा विचारच करीत होती.

एकंदरीत ते अभ्यासू महाशय मागे हटायला तयार नव्हते.  यांच्या मते जगविख्यात  विश्लेषणात्मक ग्रंथाच्या सारांशरूपावरून त्यांचे ठाम मत तयार झालेले व तेच खरे कसे हे सर्वांना पटवून देण्यास ते तत्पर होते जरी त्यांच्या मांडणीत  कोणतीही तार्किक संगती वाचकांना आढळली नाही.

कालपरवाचे हे फेसबुकीय विचारमंथन झाले न् डोक्यात सारखे विचार येऊ लागले.
"रामायण" हे मुळात वाल्मिकींनी संस्कृत भाषेत लिहिलेले आदिकाव्य. सर्वांना कळावे म्हणून वेगवेगळ्या भाषेत त्याचे भाषांतर झाले. तसेच वेगवेगळ्या प्रांतातील प्रख्यात रचनाकारांनी त्या त्या भाषेत र‍ामकथा गुंफली, जसे मराठीत संत एकनाथांनी.
मधल्या काळात (म्हणजे १८ व्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते आता आता पर्यंत) भारतीयांच्या मूळ-ग्रंथांवर स्वतःच्या मानसिकतेने, दृष्टीकोणातून समीक्षण करणे, या ग्रंथांतील पात्रांना मध्यवर्ती कल्पून कहाण्या-कादंबरी लिहिण्याचे फॅड आले.  प्रत्येक  मूळ-रचनाकाराचं त्याचं असं स्व-तंत्र-अस्तित्व असते ना ? "ते वाईट, ते चूक", हे सरळ शिक्के तुम्ही त्यांच्या कलाकृतीवर कसे मारू शकता?  व्यवहारात दिसते की अभिव्यक्ति-स्वातंत्र्य या गोंडस नावाने बरेचदा "सुतावरून स्वर्ग" गाठण्याचे कसब  कुशल-रचनाकारांनी साधले असते.

उत्तरोत्तर काळात मूळ बाजूलाच राहते न् ही असली कल्पनाविलसित प्रतिभा तळागाळापर्यंत पोहचते . एक साधं उदाहरण बघा. राजमहाला पासून ते झोपडी पर्यंतचे, ज्याचे त्याचे घर , त्याच्यासाठी आपली जागा असते, ती त्यानी स्वतःला हवी तशी सजवली असते. आपण त्याच्या घरात ढवळाढवळ करू नये, हा साधा सद्सद्विवेक !   त्याला आपण बदलू शकत नाही, बदलणे अपेक्षितही नाही.

हीच गोष्ट जुन्या, शाश्वत समृद्ध वारश्यावर प्रतिभा-रंजन करताना लक्षात घ्यायला हवे. तेव्हाच्या प्रथा-परंपरा तुमच्या सोईने हव्या तशा बदलणे, पात्रांची उलथापलथ करणे, ही विकृती आहे. जर समीक्षण करायचे तर मूळ लेखकाची मनोभूमिका, त्याचा काळ, त्याची सांस्कृतिक धाटणी यांचा सर्वांगीण विचार करून मगच आपली  सादरक-बाधक मते मांडावीत.
मूळ रचनेशी प्रतारणा करून त्यातील पात्रांना हवं तसं रंगवणं, हे मुळात वाङ्मयचौर्याहूनही भयंकर
क्रौर्य आहे.  मूळ लेखकाचा तो अपमान न् मूळ पात्रांचा खून करणं आहे.

प्राचीन अभिजात-रचनाकारांच्या लेखनकृतींशी बौद्धिक-शाब्दिक-विकृत कुस्ती करण्यापेक्षा या नव्या लेखकांनी स्वप्रतिभेने नवीन पात्र व कथावस्तु घेऊन स्वतंत्र रचना करावी.

एकवीसाव्या शतकात , तंत्रज्ञान विकसित झालेय तद्वत आपणही प्रगल्भ न् विकसित होऊ या. जे जसे आहे ते तसेच ठेऊ या न्
त्या   चांगल्या-वाईट-अनुभवांतून सुंदर-शाश्वत नवनिर्मिती  स्वतः करू या.

 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Friday, April 17, 2020

सहजोक्त.

#संवाद.
 संवादातून प्रश्न हजारो
 सहज सुटती हेच खरे
  कसा नि कां  संवाद खुंटतो
    प्रश्न सद‍ा हा मनात उरे  ॥
  नुसते बोलणे म्हणजे नव्हे
  संवादाचे स्वरूप अहा
  समतल  वैचारिकतेने व्हावे
  मर्म खरे त्यातून पहा ॥
   मनात जागती समानुभूती
  नित्य असावी संवादी
   भावशून्यसे शब्दस्वार्थी
  वाढवती बघ वादावादी ॥
  शब्द फुलोरे आणिक शिल्पे
  फुंकर कोरडी जखमेला
  स्नेहाळ स्पर्श न् भावुकतेने
  संवाद-संत्वना हृदयाला ॥
  संवाद असे हृदयाची कला
  विसंवाद हरी नात्याच्या बला
  जपण्या मनी सुहृदत्वाला
  अहं त्यजुनी संवादू चला ॥
  ©डॉ. प्रज्ञा देशपांडे. 

Thursday, April 16, 2020

#सहजोक्त.

अवकाश.
उच्चारणाचे सौंदर्य नेमकं कशात असतं ?  उच्चारणामध्ये घेतलेल्या अवकाशात !   दोन वर्ण , स्वर वा व्यंजन यांच्या उच्चार करताना जो  छोटा-मोठा श्वास घेतो तोच अवकाश. जितकं सावकाश उच्चरण करू तितकं ते प्रभावी होतं.
हे जसं भाषेसाठी सत्य आहे तसं ज्ञानासाठीही सत्य आहे कां ?  होय . मेंदूवर अखंड माहिती थोपवत राहिले तर मेंदू तिला क्षमतेने साठवू शकतो कां ? नाही . मध्ये विराम दिला की मेंदू तेवढी माहिती साठवतो.
हेच दाखले आयुष्यालाही लागू पडतात ना ! सतत धावत राहणरं , सतत देवाण-घेवाण करणार मन , सतत बहिर्मुखी असलेली मानसिकता , जरा थांबण्याची गरज नाही कां ?  वर्षानुवर्ष घड्याळीच्या काट्यांवर , टार्गेटच्या धाकावर ,कुठल्याशा आशेवर वा पिपासेवर अखंड धावणा-या मनामागे शरीर-क्रियांना अोढणारे आपण !   "जरा विसावू या वळणावर ", म्हणणे सोपे पण जगणे कठिण आहे ना  , आपल्या सारख्या सवयीच्या गुलामांना ?
पण वर दिलेल्या द‍ाखल्यांवरून नक्कीच सांगता येते की जीवनात विराम , अवकाश गरजेचा आहेच . आजवर झालेला प्रवास , पुढे घ्यायची झेप यांच्या मध्ये एक तटस्थ अवकाश मिळतोय सध्या , तर तो मनापासून स्वीकारा. शून्यवत् करा स्वतःच्या मनाला. कुठलंही काहीही चांगलं-वाईट , भलं-बुरं , कामाचं-बिनकामचं असं काहीही न विभागता  फक्त श्वास घ्या . पंचज्ञानेंद्रियांना अंतर्मुखता  अनुभवू द्या.
आजवर देणं-घेणं करीतच आलो.
 " मी अमुक शिकलो , मी अमुक अनुभवलं " , हे ही जगजाहीर करू नका . काही काळ हा फक्त न् फक्त स्वतःचा खास ,"नैज"  असा राखून ठेवा.
  हा विराम , हा अवकाश आपल्याला  आपोआप सखोल , समृद्ध   करील यात शंका नाही.  स्वतःचे अवकाश गाठा न्  पंचज्ञानेंद्रियांना कुठलीही सूचना न देता
"आ नो भद्रा: क्रतवो यन्तु विश्वत:" याचा अनुभव घेऊ द्या.
कशाही कारणाने मिळालेला हा अवकाश नक्की पुढच्या जीवनात समईच्या शांत प्रसन्न ज्योतीसम मार्गदर्शक  ठरेल , यात शंका नाही.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Tuesday, April 14, 2020

सहजोक्त.

#चाफा
चम्पक , चम्पा , चाफा अशा नावांनी प्रसिद्ध असलेला चाफा , देवाचे एक आवडते फुल आहे.
माहेरी अंगणात दोन चाफ्याची झाडं होती. पिवळट पांढरा चाफ़्याचं मोठं झाड न् गुलाबीसर लाल चाफ्याचे लहान झाड होते. लहानपणी आम्ही पांढ-या चाफ्याच्या झाडावर चढायचो. चढून  खाली उडी मारणे हा आमचा खेळ होता.आजी रागवायची , कारण चाफ्याचे झाड मजबूत नसते. पण आम्ही खेळायचोच .
या दोन्ही झाडांचेही वैशिष्ट्य म्हणजे याला जेव्हाही फुलं यायची तेव्हा याची पानं नसायची. " निष्पर्ण होऊनी फुले सन्यस्त चाफा" अशी अवस्था असायची झाडाची. उंच वाढलेले झाड न् त्यावर विपुल पुष्पसंभार. या फुलांचा सुगंध सौम्य न् मनमोहक असतो. जसं जसं उन्ह पसरतं तसं फुलांचा सडा पडायचा अंगणात. ताजी फुलं देवाला वहायला आजीला द्यायचे. फुलांच्या माळा , हार करून देवाला भूषवायचे. मग तुरळक पडलेल्या फुलांच्या अंगठ्या बनवायच्या न् हातात घालून मिरवायचं असा खेळ असायचा.
ही लाल चाफ्याची  फुले कपाटात ठेवली की झुरळ जमत नाहीत असं सांगायचे . मग फुलं गोळा करून झुरळप्रवण भागात ठेवण्याचा उद्योग व्हायचा.
चाफ्याच्या फुलांमध्ये न् पानांमध्येही वैविध्य असते , हे शाळेतील मैत्रिणींमुळे कळाले. तेव्हा फुलांच्या माळा वर्गातील सरस्वतीच्या फोटोसाठी न् गजरे बाईंसाठी आणण्याची फॅशन होती. 
पांढरे स्वच्छ , मोठ्या न् विलग पाकळीचा चाफा , घट्ट पाकळीचा चाफा , लाल चुटूक चाफा , मध्ये पिवळा न् बाजूला लाल चाफा असे प्रकार तेव्हा सहज दिसायचे.
मोठं झाल्यावर सोनचाफा असतो हे कळाले.
असा हा चाफा सध्या बहरला आहे.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Sunday, April 12, 2020

#सहजोक्त.


#स्वतःला राखा न् दुस-याला यश द्या.

महाभारतकाळात कुरुक्षेत्रात युद्ध सुरु होते.  रथी , अतिरथी , महारथी सर्वच धुरंधर . सर्वेजण युयुत्सु-भावनेने लढत होते. हत्ती, घोडे यांच्या सारखे विशालकाय प्राणी देखिल युद्धात बिच्चारे ठरत होते.नेमकं त्यावेळी त्या युद्धभूमीवरील एका झाडावर घरट्यात चिमणी न् तिची दोनतीन पिलं भयभीत अवस्थेत जगत होते.
मनोमन देवाचा धावा करीत होते. इकडे दिवसोंदिवस परिस्थिती विकट होत होती. त्यात दुर्दैवाने ते झाड त्या युध्दातील धुमश्चक्रीत कोसळले . चिमिणीचे घरटे नेमके युध्दस्थळी पडले . कोवळी पिले न् बलहीन चिमणी यांच्या करूण-विलापाकडे कोणाचेही लक्ष गेले नाही. आता आपण वाचू शकत नाही , ही भावना  मनात येत होती. तितक्यात एका महाकाय हत्तीची घंटा गळ्यातून तुटून खाली पडली. नेमकी चिमणीचे घरटे त्या घंटेच्या आत बंद झाले. 
महाभारताचे युद्ध १८व्या दिवशी थांबले. युध्द समाप्तीनंतर  , झालेली पडझड व एकत्रित नुकसान बघायला स्वतः भगवान कृष्ण निघाले .. युध्दभूमीत मध्येच असलेली विशाल घंटा त्यांनी उचलली. बघतात तर काय ? चिमणी व तिची पिले सुरक्षित होती.
 #आजच्या पार्श्वभूमीवर ह्या कथेतून  , काय  बरे बोध घेता येईल ?
 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Friday, April 10, 2020


तशी मी खरोखर भाग्यवान आहे.
सध्या लॉकडाऊन सुरु आहे. घरातच रहायचे आहे. पण बघा दैवाने माझं घर अशा कॉलनीत आहे जिथे बैठी स्वतंत्र्य बंगल्यांची अोळ आहे न् शिवाय कॉलनीच्या मध्ये मध्यम आकाराचं मोकळ मैदान आहे . ज्या मैदानात मोठ-मोठी १९ झाडं आहेत न् यंदा लावलेली १५/ २० छोटी रोप आहेत.
अगदी माझ्या दारासमोर रस्त्याच्या कडेला मोठं बकुळीचं झाड आहे.
लॉकडाऊन असूनही घरासमोरील बकुळीच्या पाराखाली निसर्ग शोभा अनुभवत बसता येतं , हे ही नशीबच .
आज  इथे फिरताना जाणवलं की वा-याला बकुळीचा सुगंध आहे.. सहज वर बघितलं , झाडाकडे तर दाटून लगडलेल्या हिरव्याकंच पानापानातून  पांढरट फुलं भरगच्च लागली , केशरी फळं सुद्धा आहेत मध्ये मध्ये.
बकुळीच्या पाराखाली बसलेय , पुष्पवृष्टी होतेय . फुलं गोळा करतेय.. आता माळ करीन न् रेशमी कपड्यांच्या खणात ठेवीन ..
लॉकडाऊनमुळे अनुभवायला मिळणारे वैभवी क्षण.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे. 

Tuesday, April 7, 2020

सहजोक्त.

#अबोली.
कसं कुणी न् कधी बरं हे नाव त्या फुलझाडाला दिलं असावं , कळत नाही. कुंदा , चाफा , मोगरा , शेवंती इत्यादींचे बरेच बरे आहे . ना त्यांच्या नावाचा  दुसरा अर्थ ना  ज्ञात संदर्भ ! पण अबोली म्हटलं की अबोल कुणी तरी नजरेसमोर येते. अबोली म्हणजे मूक नव्हे. पण भावनांना शब्दातून व्यक्त न करणारी .
तसं पाहिलं तर प्रत्येक कळी , फूल  वगैरे अबोलच असतं ना ? मग ह्याच झाडाला  अबोली  कां बरं म्हणायचे ?
असो , तिच्या जवळ गंध नाही , ना सौंदर्य , ना भारदस्त व्यक्तिमत्व  तसं बघितलं तर रंगही जरा फिका , कमी आकर्षक  , ना चुटुक केसरी ना गडद भगवा ! तिच्यावरून रंगाचेही नाव पडले ना अबोली !
फुलही असं नाजूक , साधं ना दिसणारा परागकण ना रंगांची मिश्रण ...तरी कुठतरी सोज्वळ न् मुलायम असं हे फूल .. चमेली , मोगरा आदी पांढ-या फुलांच्या  संगतीत  खुलतं.  पण अबोलीची जोडी काटेकोरांटी (पिवळी ) सह जास्त खुलते. तो फिका , हलका केसरी अबोलीचा वर्ण न्  सोन्याच्या झळाळीचा काटेकोरांचीचा वर्ण .  असा गजरा कोण्या ललनेच्या केशकुंतलांची शोभा वाढवतो  वा व्यंकटेशाच्या आरासीचे भूषण ठरतो .
अबोली रंगाची अबोली सामान्यतः सर्वत्र पहायला मिळते. लहानपणी माझ्या माहेरी हिरवी अबोली होती. नाजुक , हलकासा हिरवा रंग . सध्या माझ्याकडे पिवळीजर्द अबोली आहे.

अबोली , काहीही खास नसून खास कसं असावं , ह्याचा वास्तुपाठ देते , होय ना ?
अशी ही अबोली , स्वतः न बोलता समोरच्याला मनोमन बोलतं करते , होय ना ?
या छोट्या ललितलेखासह माझ्या अंगणातील पिवळ्या गर्द अबोलीचा फोटो देत आहे.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Monday, April 6, 2020

सहजोक्त.

.................................
#सहजोक्त.
प्रत्येक घरात एक देवघर असेल नसेलही कदाचित , एक कचराकुडी नक्कीच असते.
देवाची साग्रसंगीत पूजा रोजच  किंवा सणावारी केल्या जातेच असे नाही .
पण कचरा मात्र रोज निघतोच निघतो.
देव श्रद्धेचा विषय असतो , कचरा मात्र प्रत्यक्ष अस्तित्वात असतो.
देव असावा की नसावा हे श्रद्धा ठरवते...
कचरा मात्र कोणीच टाळू शकत नाही.
त्यामुळे देवघर ऐच्छिक आहे पण कचराकुंडी अत्यावश्यक...
गरजेचे मिळावं म्हणून देव नावाची श्रद्धा असते .
तर गरज संपल्यावर उरलेलं सारं कचराच ठरते ...

कचरा सर्वत्र स्वतःचे  असदस्तित्व दाखवूनच देतो .
 देवाचं नेमकं उलटं असतं , गरजेच्या वेळी नेमकां डळमळीत करतो , जणु आहे की नाही असा !
 बाहेर जसे देवघर न् कचराकुंडी असते तसेच मानवी मनातही हे दोन्ही असतात , नाही ? 
जितकं जितकं मन-शरीराला निर्मळ करावे तितका तितका कुठंतरी कचरा जमतोच जमतो.
अटळ असा कचरा होऊच नये म्हणून मन निर्मळ करण्यापेक्षा  अलिप्त , निर्लेप , पुनर्वापरयुक्तच कां करु नये ?

म्हणजे देवघरातील देवापेक्षा कचरा ठळक दिसणार नाही न्  निर्लेप मनाहून वेगळा देवच असणार नाही.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.