Monday, April 20, 2020

#सहजोक्त

*चिंतनात्मक लेख*

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
सध्या दूरदर्शनवर रामायण सुरु आहे. र‍ामायण धारावाहिकात दाखवल्यानुसार दंडकारण्यात रामावर मोहीत होऊन शूर्पणखा येऊन त्याला मागणी घालते. राम एकपत्नीत्व पाळणारा असतो, म्हणून तिला नकार देतो. मग ती लक्ष्मणाकडे मोहरा वळवते. तोही नकार देतो. म्हणतो मी दास माणूस , माझ्याशी लग्न करून तू दासी होशील. तिलाही पटतं. ती परत रामाकडे जाते न् म्हणते, "तुझ्या बायकोला मी खाऊन टाकते, म्हणजे तुझं व्रत भंगणार नाही. मग माझ्याशी लग्न कर", असं म्हणून ती सीतेवर झडप घालते.

त्या क्षणी 'स्त्रीहत्या-पाप' घडू नये म्हणून धर्माचारी राम तिचे नाक कापायला सांगतो. न् लक्ष्मणही तसं करतो. अपेक्षाभंग न् अपमानित झालेली ती शूर्पणखा 'खर' नामक भावाकडे जाऊन गाऱ्हाणं सांगते. वरून त्याला लालच म्हणून सीतेच्या सौंदर्याचं वर्णन करून तिला तू पळव असंही सांगते. खर व त्याच्या सैन्याचा सर्वनाश रामलक्ष्मण करतात.

सुडानी पेटलेली शूर्पणखा रावणाकडे जाऊन अतिरंजित कथन करते. स्वतःचा दोष सांगतच नाही न् सर्व खापर राम-लक्ष्मणांवर फोडते. वरून त्याची बायको तू उचलून आण न् माझ्या अपमानाचा बदला घे, तसेच "सीतेसम सुंदर स्त्रीरत्न जगात नाही, तुझा महाल तिच्याशिवाय शून्य आहे" अशी वकिली करते. मग पुढचे रामायण घडते.

पण तिथून पुढे कुठे शूर्पणखा रामायणात दिसलीच नाही. यावरून मी फेसबुकवर प्रश्न विचारला, "ती सध्या काय करते?" त्यावर अनेक उत्तरं आलीत. सध्याचे लॉकडाऊन ते राजकारणापर्यंत, अनेकविध उत्तरे त्यात होती. पण शूर्पणखेची बाजू मांडत ,  लक्ष्मण कसा दुष्ट आहे, असाही एक ठाम प्रतिवाद आला. 
    तितक्यात  एकाने त्यांना उत्तर दिले  की , "राम न् लक्ष्मण समजाऊन सांगतात, पण ती सुडाने पेटून सीतेला खायला निघते म्हणून नाईलाजाने लक्ष्मण तसे करतात."       वर सल्लाही  दिला की ," वाल्मिकींचे  मूळ रामायण वाचा." 
मी देखिल पहिल्या अनपेक्षित प्रतिक्रियेला काय उत्तर द्यावे याचा विचारच करीत होती.

एकंदरीत ते अभ्यासू महाशय मागे हटायला तयार नव्हते.  यांच्या मते जगविख्यात  विश्लेषणात्मक ग्रंथाच्या सारांशरूपावरून त्यांचे ठाम मत तयार झालेले व तेच खरे कसे हे सर्वांना पटवून देण्यास ते तत्पर होते जरी त्यांच्या मांडणीत  कोणतीही तार्किक संगती वाचकांना आढळली नाही.

कालपरवाचे हे फेसबुकीय विचारमंथन झाले न् डोक्यात सारखे विचार येऊ लागले.
"रामायण" हे मुळात वाल्मिकींनी संस्कृत भाषेत लिहिलेले आदिकाव्य. सर्वांना कळावे म्हणून वेगवेगळ्या भाषेत त्याचे भाषांतर झाले. तसेच वेगवेगळ्या प्रांतातील प्रख्यात रचनाकारांनी त्या त्या भाषेत र‍ामकथा गुंफली, जसे मराठीत संत एकनाथांनी.
मधल्या काळात (म्हणजे १८ व्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते आता आता पर्यंत) भारतीयांच्या मूळ-ग्रंथांवर स्वतःच्या मानसिकतेने, दृष्टीकोणातून समीक्षण करणे, या ग्रंथांतील पात्रांना मध्यवर्ती कल्पून कहाण्या-कादंबरी लिहिण्याचे फॅड आले.  प्रत्येक  मूळ-रचनाकाराचं त्याचं असं स्व-तंत्र-अस्तित्व असते ना ? "ते वाईट, ते चूक", हे सरळ शिक्के तुम्ही त्यांच्या कलाकृतीवर कसे मारू शकता?  व्यवहारात दिसते की अभिव्यक्ति-स्वातंत्र्य या गोंडस नावाने बरेचदा "सुतावरून स्वर्ग" गाठण्याचे कसब  कुशल-रचनाकारांनी साधले असते.

उत्तरोत्तर काळात मूळ बाजूलाच राहते न् ही असली कल्पनाविलसित प्रतिभा तळागाळापर्यंत पोहचते . एक साधं उदाहरण बघा. राजमहाला पासून ते झोपडी पर्यंतचे, ज्याचे त्याचे घर , त्याच्यासाठी आपली जागा असते, ती त्यानी स्वतःला हवी तशी सजवली असते. आपण त्याच्या घरात ढवळाढवळ करू नये, हा साधा सद्सद्विवेक !   त्याला आपण बदलू शकत नाही, बदलणे अपेक्षितही नाही.

हीच गोष्ट जुन्या, शाश्वत समृद्ध वारश्यावर प्रतिभा-रंजन करताना लक्षात घ्यायला हवे. तेव्हाच्या प्रथा-परंपरा तुमच्या सोईने हव्या तशा बदलणे, पात्रांची उलथापलथ करणे, ही विकृती आहे. जर समीक्षण करायचे तर मूळ लेखकाची मनोभूमिका, त्याचा काळ, त्याची सांस्कृतिक धाटणी यांचा सर्वांगीण विचार करून मगच आपली  सादरक-बाधक मते मांडावीत.
मूळ रचनेशी प्रतारणा करून त्यातील पात्रांना हवं तसं रंगवणं, हे मुळात वाङ्मयचौर्याहूनही भयंकर
क्रौर्य आहे.  मूळ लेखकाचा तो अपमान न् मूळ पात्रांचा खून करणं आहे.

प्राचीन अभिजात-रचनाकारांच्या लेखनकृतींशी बौद्धिक-शाब्दिक-विकृत कुस्ती करण्यापेक्षा या नव्या लेखकांनी स्वप्रतिभेने नवीन पात्र व कथावस्तु घेऊन स्वतंत्र रचना करावी.

एकवीसाव्या शतकात , तंत्रज्ञान विकसित झालेय तद्वत आपणही प्रगल्भ न् विकसित होऊ या. जे जसे आहे ते तसेच ठेऊ या न्
त्या   चांगल्या-वाईट-अनुभवांतून सुंदर-शाश्वत नवनिर्मिती  स्वतः करू या.

 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

No comments:

Post a Comment