Thursday, July 30, 2020

#सहजोक्त.


#दोन  श्रुतकथा . 
(१) एकदा मराठीच्या अध्यापकांच्या समोर प्राचार्य राम शेवाळकर उद्बोधन करीत होते.  एका अध्यापिका ने प्रश्न विचारला की ," मराठीमध्ये डिस्टिंक्शन कां मिळत नाही ?"  त्यावर शेवाळकरांनी उत्तर दिले, " तुम्ही देत नाहीत म्हणून !" 

(२) दुसरी घटना अशी आहे की नागपूर विद्यापीठात बरेच वर्ष मराठी  MA ला बी प्लस ग्रेड ने उत्तीर्ण झालेल्या व्यक्तीला विशिष्ट  पुरस्कार मिळायचा.  अनेक वर्ष तो पुरस्कार मिळविणारी व्यक्ती   विद्यापीठाला लाभत  नव्हती. 
नंतर काही वर्षांनी यूजीसीचे नियम बदलले . 55 टक्के च्यावर गुण असल्याशिवाय नेट सेट परीक्षेला पात्र ठरणार नाही . ही अट आली आणि कशी काय जादू झाली , माहिती नाही . पण 55 च्या खाली गुण मिळविणारे आताशा कमी झालेले आहेत. किंबहुना  ७५% च्या वर अधिक आढळतात. 


या दोन घटना ! यावर भाष्य काय करायचे ?

 एकंदरीतच   फक्त बोर्डाचे  रिझल्ट ,  इतकच नाही  तर  केजी टु पीजी अशा सर्वच परीक्षांचे रिझल्ट याकडे फार वेगळ्या पद्धतीने बघाणे गरजेचे होत आहे.  किमान  शिक्षकांनी तरी गुणवत्ता  ही फक्त मार्क ओरिएंटेड राहणार नाही ,  याची दक्षता घ्यावी की काळाचा महिमा म्हणून सोडून द्यावे ?    ज्याचे त्याच्या परी . नव्या धोरणाकडे आशेने बघावे. आशा बलियसी ! 
 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Sunday, July 26, 2020

#सहजोक्त ~

शब्दचिंतन .

काल  एका समूहावर "कलदार" या शब्दावरून  चांगलीच  चर्चा रंगली  होती . सकाळी एकत्र वाचून बौद्धिक चालना मिळाली. बरेचसे शब्द संस्कृत-शब्दकोषात  सापडतात , असा अनुभव आहे. 
मला संस्कृत , मराठी , पाली शब्दकोषांतून शब्द  बघायला आवडतात. 

कलदार हा शब्द प्रत्यय घटित प्रकारातील पण मिश्र प्रवृत्तीचा आहे असे वाटते. "द‍ार" हा प्रत्यय  खचितच पाली , मराठी वा संस्कृत नाही. खबरदार , चौकीदार  वगैरे वरून तो फारसी किंवा अरबी असावा .( मला या भाषांची माहिती नाही. )


निरुक्तकार यास्काचार्यांच्या मते कोणताही शब्द हा धातूजन्यच असतो. म्हणजे प्रत्येक शब्द हा कुठल्यातरी मूळधातू पासूनच तयार होतो. काळाच्या अोघात शब्द-निर्मितीची प्रक्रिया लुप्त होते. पुढे त्या शब्दाचा असा भाषिक प्रवास ( विकार ,आगम ,विपर्यय आदींनी ) होतो की मूळ रूप व प्रचलित रूप वेगवेगळेच वाटते.  असो.

कोषांमध्ये मला  "कल" या शब्दासाठी अनेक अर्थ दिसले .  जसे मधुरध्वनी , सालवृक्ष ,कोलिवृक्ष , शुक्र , अजीर्ण  (इति राजनिर्घण्टः । कलयति मान्द्यं नयति जाठराग्निम् ।) , अस्पष्ट आवाज ,  गोंगाट  आदी.   याच कल पासून कलकलाट , कलरव कलकल अादी  आहेच.  [ हंसे मुक्ता नेली मग केला कलकलाट काकांनी !, अशी काव्यपंक्ती आहे. इथे काका म्हणजे कावळा असा अर्थ आहे ].

शिवाय  "कल्ल"  हा शब्द   'अव्यक्त शब्द ' या अर्थाने योजतात . यापासूनच  कल्लोळ  हा शब्द तयार होतो.  पुढे याचेच समुद्रकल्लोल , संशयकल्लोळ आदी तयार होतात.  आमच्या नागपुरी ग्रामीण भाषेत "कल्ला करणे " (गोंधळ , गोंगाट करणे  या अर्थी ) असाही वाक्प्रयोग आहे. 


कल् हा मूळ धातू  (गतौ , सङ्ख्याने , क्षेपे , शब्दे)  गतिवाचक , मोजमापीसाठी , क्षेपणासाठी व शब्द या अर्थाने  योजतात.  (कलते आकलते, सङ्कलते, परिकलते, प्रत्याकलते, विकलते।)

कल् याच धातूपासून  "काल" (काळ)  हा शब्द तयार झाला आहे.
शिवाय  कलन , संकलन  , विकलन , आकलन  हे ही त्याच्याच पासून शब्द आहेतच .

शब्दांचा प्रवास एकाच भाषेतून जरी झाला तरी  काही काळाने अोळखेनासा होतो , त्यात इतर भाषांतून आलेले शब्द मिसळले की मग विचारायलाच नको. 
 
शब्दकोषांच्या वाचनानी बरीच माहिती मिळते. कोणत्याही भाषेचा विशेष लोभ वा द्वेष न करता  शब्दांचा तर्कसंगत समूळ प्रवास उलगडण्याकडे माझा 'कल' असतो. 

या सर्व शोधाशोधीत  "कलदार" शब्द अगदी  तसाच्या तसा मिळाला नाही. लहानपणी चांदीचा अंश असलेल्या रुपयाला कलदार म्हणायचे , बंदा रुपया म्हणायचे.  नंतर नंतर सर्वच नाण्यांना (खणखणीत  आवाज करणारी ) कलदारच म्हटल्या जायचे.  

तसं बघता रुपया ( रुपे= चांदी) या पासून तयार झालेला शब्द असून कालांतराने अॅल्युमिनियम , पितळ , तांबे , निकेल आदी कोणत्याही धातूपासून तयार झाल्यावरही रुपयाच ठरला , तसं इथे झालं असणं शक्य आहे.  
असा हा शब्दाचा कलदार प्रवास खाचखळग्यांसह जाणून घ्यायला हवा. 
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

#सहजोक्त.


.
आमच्या हडस शाळेचे माजी विद्यार्थी म्हणजे खासच रसायन असतात. ते ज्या ज्या क्षेत्रात जातात , तेथे  विशेष स्थान प्राप्त करतात. शिवाय कितीही ज्येष्ठ-श्रेष्ठ झाले तरी शाळेशी जुळूनच असतात. हे शाळेचे भाग्य न् विद्यार्थ्यांच्या संस्कारी व्यक्तिमत्वाचे दर्शन होय. शाळेला आता ७८ वर्षे झालीत पण माजी विद्यार्थ्यांच्या मनातील तिचे मानाचे हार्द स्थान तसेच आहे.
हडसचे विद्यार्थी सर्वोत्तम कार्य करत त्या त्या क्षेत्राला मोठे करत आहेत. आज भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वात आमच्या शाळेची ही नररत्ने विखरून चमकत असतात. असे एकही क्षेत्र नाही ज्यात आमचे विद्यार्थी नाहीत !
देशाविषयी कृतज्ञता , अभिमान दर्शवण्यासाठी काही दिनविशेष असतात . त्यापैकी एक म्हणजे कारगील-विजय-दिन. कारगील हे सर्वोच्च उंचीवरील युद्ध-क्षेत्र आहे. 
या निमित्ताने आठवले की , "भारतात लडाख प्रदेशात सर्वोच्च उंचीवरील धावपट्टी आहे. या धावपट्टीला  पुनरुज्जीवित करून  लढावू विमान उतरवण्याचे विक्रमी कार्य केलेले महान देशभक्त व शूर सैनिक आमच्याच शाळेचे माजी विद्यार्थी  एअर व्हाईस मार्शल (सेवानिवृत्त) सूर्यकान्त चाफेकर हे आहेत.
"प्रतिपक्ष" नावाचे मराठीतील गाजलेले न् लाखांच्यावर प्रेक्षक लाभलेले युट्य़ूब चॅनेल आहे. त्यात श्री. चाफेकरांची मुलाखत दोन भागांतून प्रकाशित झाली आहे. त्यांच्या या अतुलनीय पराक्रमाची दखल तत्कालीन राष्ट्रीय व अांतर्राष्ट्रीय  माध्यमांनी घेतली होतीच . पण इतके वर्षांनंतरही त्यांच्या पराक्रमाची उपयुक्तता व महत्व  तसुभरही कमी झालेले नाही.
ती मुलाखत बघतांना  श्री. चाफेकरांचे व्यक्तिमत्व प्रकट होते.  देशप्रेम , आत्मविश्वास , हटके विचार करण्याची वृत्ती , मराठीवरील प्रभूत्व , विनम्रता न् मुख्य म्हणजे निगर्वीपणा आदी गुण , त्यांच्या विषयीचा  आदर  वाढविणारे ठरतात.
श्री . चाफेकर यांच्या बद्दल आवर्जून  सांगण्यासारखं म्हणजे मला मराठी शिकविणा-या आवडत्या चाफेकर बाईंचे ते सुपुत्र होत.  ' चाफेकर बाई म्हणजे मराठीच्या सर्वोत्तम शिक्षिका'  , हे माझेच नाही तर लोकांच्या शाळेत शिकलेल्या सर्वच विद्यार्थीनींचे निश्चित मत  आहे.
भारतीय वायुदालातील सांस्कृतिक व भाषिक दृष्ट्या संमिश्र वातावरणात  अनेक वर्षे र‍ाहूनही श्री. सूर्यकांत चाफेकरांची मराठी भाषा आजही उत्तम असण्याचे कारण म्हणजे चाफेकर बाईच ! श्री. चाफेकरांची मराठी ही   शब्दशः व व्यावहारिक अर्थानेही मातृभाषा आहे , हा विलक्षण योगच आहे.
आपण सुखाने जगत आहोत , त्यासाठी कितेक ज्ञात-अज्ञात  शास्त्रज्ञ , शेतकरी , सैनिक , समाजसेवक  आदी अखंड राबत असतात , याची जाणीव ठेवून वागण्यासाठी असे दिनविशेष  साजरे करणे गरजेचे आहे. 
या छोटेखानी माहितीवाजा लेखनासह कार्यक्रमाची लिंक पाठवत आहे. सर्वांनी नक्कीच बघावी . 
https://youtu.be/2FXbKhny8ag

तुमच्या प्रतिक्रियांच्या अपेक्षेत...
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Friday, July 24, 2020

#सहजोक्त.

कविता.

नागोबाला गर्व झाला
म्हणे मीच भयंकरा
बाधे माझे विष ज्याला
नाही उपाय जीविताला ।१।

गेला मानवा डसाया
पण  वार हो चुकला
स्वतः वेगे  गवसला
सर्पमित्राच्या हो जाळ्या ।२।

विष काढूनि विकले
नागाला सोडून दिले 
  विषाची केली लस
नसे भीती लवलेश  ।३।

जरी असे मी विषारी
मानव महाभयंकारी
हालाहलही बापुडे
त्याच्या वासनेच्या पुढे ।૪।

काय माझा लागे पाड
मानवी लालसा द्वाड
तृष्णेच्या ह्या कुबुद्धीने
ठरे  क्रौर्य दीनवाणे ।५।

पुन्हा नको वाटी जाणे
मानवाच्या संग रहाणे
निसर्गाचे हो हत्यारे
मानव दुरून साजिरे ।६।
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.







Wednesday, July 22, 2020

सहजोक्त.


देवा तुझा रे लहरी ,
 खेळ उन्ह-पावसाचा 
शेतक-याच्या मनात 
पिंगा आशा-निराशेचा ॥१॥
धोका देण्याचे कसब 
शिकविले मानवाने 
गुरुनिसर्गाला जणु
 केले बाधित संसर्गाने ॥२॥
सत्ता गाजवण्याची हाव,
कशाला तू बाळगतो?
यादवी मानवातील 
कां निसर्गात घडवीतो ॥३॥ 

मानवाचे कोतेपण
 स्वार्थी सुखाची तहान ।
अंगीकारोनी  कशास 
 करी स्वतःला लहान ?॥૪॥
बापा निसर्गा नको रे 
वागू मानवासारखा ।
माणुसकीच्या सद्गुणाला
 नको होऊ तू पारखा ॥५॥
©डॉ. प्रज्ञा देशपांडे

Monday, July 20, 2020

सहजोक्त.





दिवस उजाडतो मालवतो , काळ समोर जातो , कालगणना माणूस करतो , ना सूर्याला त्याचे भान ना पृथ्वीला खंत-खेद ! त्यांच्या गतीत खंड नाही ,  त्यांच्या मनात बंड नाही , कारण त्यांना मुळात सिद्धच करायचे नाही !  

नदी उगमापासून ते मिलनापर्यंत वाहत असते अखंड सदोदित .
तिच्या गावीही नसते कोणत्या गावातून , कोणत्या प्रदेशातून ती जातेय , कोण्या भागाला ती समृद्ध करून सोडतेय.  कोसळते , अडखळते , खोल गर्ता निर्माण करते , डोहात सामावते , बागबगिचे फुलवते कधी , वाळवंटही करते कधी . 
लोकं मोजतात लांबी-रुंदी आणि तिची खोली. धरणे-बांध-बंधारेही बांधून करतात विकास स्वतःचा , रोखून नैसर्गिक मार्ग तिचा . थबकते , बदलते तरी वाहतेच वाहते , नव्या रूपात न् स्वरूपात. नदी म्हणूनच नदी असते कारण तिला कुठे काय सिद्ध करायचे असते ? 

झाडही तसेच माळावर , बांधावर , रस्त्याच्या काडेवर  उगवते , जगते , येण्या-जाण्या-यास  समाधान देते. कोणी तोडले तरी परत जगते. किती अवर्षण किती अतिवर्षण सहज पचवून परत जगते. फुले देते , फळे देते , बसाल छायेत तर ती ही देते.  आपल्याच गतीने न् यथेच्छ मतीने झाड बहरते , वठते.   उपेक्षेने खंगत नाही , कौतुकाने पुष्ट होत नाही.  सिद्ध करायची गरजच नसते कारण झाड , झाडासारखेच असते. 

"आमची काळजी घेते , आमची विचारपूस करते , स्वयंपाक छान बनवते , घराला घरपण देते , शिकलेली असून मर्यादेत रहाते , कमावती असूनही माज नाही" ,  या सगळ्या अोझ्यात  "ती" मात्र अभिमन्यू होते. 
जरा कुठे चुकली की माहेरपासून , अकलेपर्यंत उद्धार हा ठरलेलाच . डिग्रीवरही प्रश्नचिह्न कायमच रोखलेले . 
तिची इच्छा असो नसो , तिलाच सर्व जोखत असतात ,पारखत असतात , पदोपदी अग्निपरीक्षा तिलाच तिलाच द्यायला सांगत असतात . तिच्या अस्तित्वासाठी प्रत्येक गोष्ट , प्रत्येक क्षण  सिद्ध करायला भाग पाडत असतात. 

समाजाने चौकटीची मखर पूर्वापार केलीय , त्यात मातृशक्ती ,नारायणी म्हणून तिला बसवली आहे.  जन्मापासून मृत्यूपर्यंत तिला सिद्धच करायचे आहे , नवे नवे उच्चांक तिने सतत गाठायचे आहे , आदर्शाचे अोझे तिनेच वाहायचे आहे , स्त्रीत्वाची अनमोल किंमत तिला नेहमीच चुकवायची आहे.

"तू चांगली मुलगी आहेस , चांगली बहीण , चांगली पत्नी आहेस , चांगली मैत्रिण आहेस न् चांगली आई आहेस ,
एक कर्तृत्ववती स्त्री आहे , बुद्धि-सौंदर्याने युक्त आहेस , गृहकृत्य दक्ष आहेस , उत्तम  बॉस आहेस , सर्वच क्षेत्रात अव्वल आहे." 
या सर्व अपेक्षा वजा आज्ञा त्यांच्या असो वा तिच्या  ; पाळता पाळता ती मूळात उरलीच कुठे ? 
सतत समज आल्या पासून केवळ 'त्यांना' चांगले वाटावे म्हणून सारखी धडपडते आहे .     

#आताशा ना मला सिद्ध करायचा कंटाळा आला आहे .  म्हणजे काय समजू मी ? माझा  जगायचा अधिकार संपलाय ? 
छे ; अजिबात नाही.  ब्रह्मदेवाला बाजूला सारून मी परत जोमाने नवसृष्टीची  रचना  करायची वेळ आता आली आहे !  
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Sunday, July 19, 2020

#सहजोक्त.


एक दिवस कोरोना सा-या जगावर रुसला ।
म्हणे कां उगाच बागुलबुवा तुम्ही मला केला ?
चायनीज माल कधी टिकाऊ असत नाही।
आता पर्यंत अनेकदा सिद्ध केलय , नाही ?
मी काही यमाचा होलसेलर दूत नाही ।
आलो उगा घाबरवायला मला कामं नाही ।
वेगवान चालत्या गाडीला बघा मी खिळ घातली।
जगाच्या विकासचक्राची गती मी थांबवली ।
तुम्ही सगळ्यांनी माझ्या नावानी  व्यापार केला भीतीचा ।
असले नसले सारे प्रयोग खपवताय नावे माझ्या ।
 सुखी कितीतरी जंतू न् विषाणु मानवी देहात नांदतात ।
मग माझ्याच छोट्या अस्तित्वाचा किती बवाल करतात ?
विविध रोगांनी पोखरलेल्या शरीरात मी जातो ।
त्याच्या लवकर मुक्तीसाठी मीच कारण ठरतो ।
कँसर , टिबी , हार्टप्रॉब्लेम आणि  वार्धक्यरोग ।
किडनी  ,डायबेटिस , बिपी आदी इतर गुप्त रोग ॥
कावळा बसायला न् फांदी तुटायला एकच पडली गाठ।
तसेच माझ्या प्रवेशाचे निमित्त झाले अफाट ॥

व्यायाम , शुचिता , शिस्त, नियम सारे धु-यावर बसवले ।
जीर्ण रोगी शरीर गेले, बिल माझ्या नावे फ़ाडले ।
 निसर्गावर कुरघोडी करण्यात अख्खी हयात गेली ।
 समस्त मानवांनी पहा  दुनिया वेठीस धरली ॥
 आलो मी , गाजलो मी , जरी नाही पूर्ण कळलो ।
हाव सोडा,  निसर्गाकडे वळा न्  सुधरा रे मानवांनो ॥
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Thursday, July 16, 2020

सहजोक्त


अौचित्यहीन.
काही कारणाने काही काही गोष्टींचे औचित्य नष्ट होते. औचित्य नष्ट होण्याची अनेक कारणे असू शकतात. पण परिणाम मात्र एकच की गोष्ट असूनही औचित्य संपलेले असते.
काही परंपरा , रूढी  , कर्मकांड यांना जसे लागू पडते तसे वस्तु , प्रसंग , साहित्य , व्यक्ती यांनाही ते लागू पडते. 
औचित्यहीन गोष्टी अप्रासंगिक , संदर्भहीन सुद्धा ठरतात. 
आता हेच बघा ना. पूर्वी पत्रलेखन ही कला होती.  पुराणकाळापासून ते दशकापूर्वी पर्यंत तिचे महत्त्व होतेच. शालेय शिक्षणात अौपचारिक न् अनौपचारिक पत्रलेखन पाठ्यक्रमाचा भाग होते. पुराणात रुक्मिणीने श्रीकृष्णाला पत्र लिहिले होते. इतिहासात संयोगितेने पृथ्विराजाला पत्र लिहिले होते. चाचा नेहरुंनी तुरुंगातून छोट्या इंदिरेस लिहिलेल्या पत्रांचे पुस्तकरूप आज उपलब्ध आहे.  पत्रातून इतिहास कळतो , तसा पत्राने इतिहास घडवलाही आहे. जसे  'ध'चा 'मा' पत्रातूनच झाला.  
अनेक दिवस डोक्यात विचार घोळवून , पत्र लिहायला घ्यायचे , कितेकदा खोडतोड करीत कच्चे लिहायचे मग ते एकदाचे फेअर उतरवायचे. पोस्टात टाकायचे , खूप दिवसांनी पत्र मिळायचे . मग पत्राचे पहिले वाचन मग आवर्तन मग त्याच्या उत्तरासाठी केलेली तजवीज .   मग उत्तर लिहून पाठविण्यासही  तसेच सायास करायचे. असा एकूण पत्रांचा प्रवास असायचा. 
साधे पोसचटकार्ड , इन्लँड , लिफाफा वगैरेंसह गुलाबीपत्रे इत्यादी सर्वच पत्रप्रकार आपापले महत्व टिकवून होते. 
पण हाय रे दैवा. इंटरनेट , डिजिटलायझेशन , स्मार्ट फोन आदी मंडळी आल्या नि बिनबोभाट चालणारा पत्रव्यवहार ठप्प पडला. 
परिणामी आज पत्रलेखन-प्रकार अप्रस्तुत , अप्रासंगिक  झाला. "पत्र" प्रकारच अौचित्यहीन  झाल्यामुळे  "पत्र"
विषयक  सर्वच साहित्य बादच झाले ना ! 
कितेक हिंदी/मराठी सिनेमाची गाणी खत , चिठ्ठी , पत्र यावरून आहेत . जसे
•लिखे जो खत तुझे जो तेरी याद में हजारो रंग के सितारे बन गये...
•ये मेरा प्रेमपत्र पढकर कि तुम नाराज ना हो ना ...
•चिठ्ठी अायी है , आयी है चिठ्ठी आयी है....
•आपका खत मिला आपका शुक्रिया ....
•हम दोनो मिलके चाहत से खिलके चिठ्ठी लिखेंगे जबाब आयेगा...

असे बरेच गाणे , प्रसंग ; जरी आज औचित्यहीन वाटत असले तरी अविस्मरणीय ठरलेले होते.
असे प्रसंग वा गाणे तुम्हाला आठवत असतील तर कॉमेंट-बॉक्स मध्ये कळवा. 
©डॉ. प्रज्ञा देशपांडे. 

Wednesday, July 15, 2020

सहजोक्त.

#कृष्णकथा .
कृष्ण मग तो कोणत्याही रूपातील असू दे , मनमोहनच ठरतो. आबालवृद्धांना कृष्णाच्या कथा आवडतातच . अशीच एक कृष्णकथा. 
इंद्राच्या नंदनवनात असलेल्या या झाडाच्या फुलांच्या सुगंधाने मोहून जात कृष्ण ती फुले वेचतो , द्वारकेत येतो रुक्मिणीच्या महाली न् सहज तिच्या हातात ती स्वर्गीय सुगंधी फुले  देतो ,सहाजिकच ती मोहरून जाते. कृष्ण निघून गेल्यावर शेजरच्या सगळ्या सवती गप्पा मारायला जमतात.  नव-याचे आपल्यावर प्रेम आहे ह्याची फक्त जाणीव बायकोला पुरेशी नसते तर चारचौघात त्याचे प्रदर्शन करणे आवडत असते. रुक्मिणी स्त्रीसुलभ भावनेने ती फुले सगळ्या जणींना दाखवते . इतर  सर्व सवती तिच्या आनंदात सहभागी होतात.  वरवर दाखवले नाही तरी सत्यभामेला आतून प्रचंड राग येतो. मुळात सत्यभामा अतिशय रूपगर्विता असते . शिवाय तिच्याकडे स्यमंतक मणी असतो ,जो रोज आठ भार सोनं देत असतो. (स्यमंतकाची कथा पुढे कधीतरी .) ती फारच श्रीमंत असते . कृष्णाने फक्त न् फक्त माझ्याचकडे जास्त लक्ष द्यावे असे तिला कायम वाटत असते. 'कृष्णाने रुक्मिणीला फुले दिली म्हणजे माझ्या सौंदर्याचा न् प्रेमाचा अपमान झाला, मी हरली' असे ती मानून घेते.  जेव्हा कृष्ण तिच्या महाली येतात , तेव्हा ती फारच रुसलेली असते. तिला समजवण्यासाठी कृष्ण बरेच प्रयत्न करतात . 'न च सुंदरी करू कोपा  मजवरी धरी अनुकंपा' अशा प्रकारे लाडीगोडी लावू लागतात. पण स्त्रीहट्ट सोपा नाही. तिचा एकच हेका , 'तिलाच कां फुले दिलीत , मग मी कोण? माझं स्थान काय ? वगैरे वगैरे '  शेवटी कृष्ण तिला म्हणतात , "अग बाई नको अशी रागावू , तिला दिली फुलं ,चुकलंच माझं !पण तुला झाडच आणून देतो , मग तर तू खूश होशील ना ?" झालं बाई जरा खुलतात. पण विसरत नाहीत. कृष्ण परत नंदनवनात जातात न् इंद्राला मागून त्या स्वर्गीय वृक्षाचे रोपटे आणतात, द्वारकेत सत्यभामेच्या अंगणात लावायला. बाईंची कळी खुलते . बालकवी या प्रसंगाचे वर्णन 'श्रावणमासी' कवितेत करतात की ," पारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळला" . अंगणात कुंपणाच्या कडेला लावलेले ते झाड छान मोठे होते , फुलांनी बहरून येते. पण जास्ती फुले नेमके शेजारी असलेल्या रुक्मिणीच्या घरी पडतात ,असे नारद तिच्या लक्षात आणून देतात. मग काय ? "फुले कां पडती शेजारी?" असा भुंगा हिच्या डोक्यात लागतो. (त्यावरूनही पुढे कथा घडते ,ती पुढच्या भागात.) 
तर कथेचा मथितार्थ असा की कृष्णासारखा द्वारकाधीश बायकोच्या  नखरे व संशयातून सुटला नाही , तर बाकीच्या पामरांनी ,"आलीया भोगासी असावे सादर" , कायम रहावे , हेच बरे ! 
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

#सहजोक्त.


एक लबाड कोल्हा असतो. तो तळ्याच्या काठाने शिकार शोधत फिरत असतो. तळ्यात एक करकोचा असतो. कशी काय माहीत ? पण दोघांची मैत्री होते. करकोचा कोल्ह्याला तलावातील माश्या पकडून देत असतो. रोज रोज चवदार माश्यांचा पाहूणचार खाणारा कोल्हा , एकदा  आपल्या मित्राला अगत्याने घरी बोलावतो.  म्हणतो ,"मित्रा , तुझ्या स्वभावावर भाळलेला मी , तुझा उत्तम पाहूणचार करून जराशी उतराई होऊ इच्छितो. तर कृपया माझ्या घरी ये."   साधा-भोळा करकोचा निमंत्रण स्वीकारून कोल्ह्याकडे जातो.
कोल्ह्याच्या गुहेत. जंगी पार्टी असते. खास पाहूणा अर्थात करकोचा असतो.
जेवणात खीर बनवलेली असते. जेव्हा दोघेही जेवायला बसतात , कोल्हा दोन थाळ्या घेतो न् खीर वाढतो. करकोच्याची चोच लांब असते. त्याला थाळीतून खाणे जमत नाही. इकडे कोल्हा (हे सगळं लक्षात येऊनही) त्याला आग्रह करत असतो. "मित्रा , इतक्या मेहनतीने खास तुझ्यासाठी सारं केले. पण तू नीट जेवतच नाहीस . मी नाराज होईल अशाने !" वगैरे वगैरे.
करकोचा म्हणतो ,"अरे खातोच आहे मी , बघतोय ना तू ".
झालं .करकोचा उपाशीच घरी परततो.
#बालवाङ्मयातील ही कथा ,आजही बोधप्रद आहे.
• समाजात विविध लोकं र‍हतात. मदत केल्याचे दाखवून स्वतःचेच हित साधतात.
•  मैत्री आहे ,असे भासवून शत्रुवत् वागतात.
• शब्दाला जागण्याचा दिखावा करतात न्  शब्द फिरवतात.
• विश्वासु म्हणवतात न् नेहमी विश्वासघात करतात.
 •स्वतः मूळे व्यवस्थेत प्रचंड गोंधळ उडवून द्यायचा न् मीच कसा सांभाळतो हेच सांगत सुटायचे .

ही तर मोठमोठी उदाहरणं झालीत. दैनंदिन जीवनातही छोट्या छोट्या गोष्टींतून लबाडीचा गुणधर्म लपता लपत नाही काही जणांचा.


जसं
•फोन करीन म्हणायचं न् फोनच नाही करायचा.
•नक्कीच येतो सांगायचं न् यायचेच नाही.
•फोन ब्लॉक करायचा न् नेटवर्क इश्यू सांगायचे.
•भरपेट खाऊन यायचे न् खुशाल उपास आहे म्हणायचे.
• एखादा पदार्थ आवडतो  म्हटलं की नेमकं त्याची अॅलर्जी आहे म्हणायचे.
• आपण रीतसर निमंत्रण दिल्यावरही  , मिळाले नाही /अोहो उशीरा पाहिले / घरातील लहानग्यांनी फोन बिघडवला/ नेटवर्क इश्यू आहे अशा सबबी द्यायच्या.
• काँन्टॅक्ट लेन्स लावायचे न् डोळ्याला चष्मा नाही सांगायचे.
• चिल्लर पैसे नाहीत , झाली की परत करतो ,असे नेहमीच सांगायचे.
 इत्यादी इत्यादी

तुमच्या अवती भवती असे लबाड-कोल्हे (इथे स्त्री व पुरुष असा भेद नाही) असतील तर आठवा न् तुम्हाला नेमकं काय सबबी सांगितल्या वा कशा टोप्या घातल्या ते आठवून मेसेज बॉक्समध्ये कळवा .😊
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Tuesday, July 14, 2020

सहजोक्त.



#शब्दचिंतन.
मनस्वी , मनसोक्त , मनःपूर्वक, मनापासून.
आजकाल शुभेच्छा देताना 'मनस्वी शुभेच्छा वा अभिनंदन'  असं म्हणण्याचा प्रघात पडू लागला आहे. "भारी शब्द" वापरून  समोरच्यांना प्रभावित करण्याच्या हौसेतून अश्या  अनेक शब्दांना योजल्या जाते. 
पण हे शब्द नेमके कोणता अर्थ व्यक्त करतात ? असे बघणे गरजेचे आहेच. त्याही पलीकडे शब्द कसे तयार झाले ? हे ही विचारात घ्यायला हवे. 

मनस्वी =  मनस्विन्  या    पुल्लिंगी विशेषणाचे प्रथमा एकवचन आहे. "मन (ताब्यात) आहे असा".  याचेच स्त्रीलिंगी रूप 'मनस्विनी' , असे होते. मनस्विता  हेही भाववाचक रूप आहे. याला तद्धित-रूप  असे म्हणतात.  मनस्विता या शब्दाचा अर्थ मनस्वीपणा हा होईल. 

मनस्वी हा शब्द एका विशिष्ट प्रक्रियेने झाला आहे. मनस् + विनिः = मनस्विन् हे तद्धित-रूप आहे. 
 विनि प्रत्ययाचा अर्थ "असलेला , झालेला , मिळालेला" वगैरे होतो. 
 याच शब्दासारखे आणि व्यवहारात प्रचलित असलेले अनेक शब्द आहेत. जसे तपस्विन् (तपस्वी/तपस्विनी ) , यशस्विन् (यशस्वी/यशस्विनी) , तेजस्विन् (तेजस्वी/तेजस्विनी) , ओजस्विन् (ओजस्वी/अोजस्विनी)  .
 मूळात मनस्विन् हे विशेषण आहे. त्याचा प्रचलित अर्थ-  मन-मानेल तसा वागणारा , स्वैर वागणुक असलेला , मोकाट - आदी अर्थच्छटेने घेतल्या जातो . 
शुभेच्छा किंवा  अभिनंदन मनस्वी कसे काय असेल बरे ?  

मनसोक्त =  प्रचलित भाषेत मनमुराद , मनाप्रमाणे , मन मानेल तसं  आदी अर्थाने हा शब्द आहे. 
पण हाही शब्द जरा वेगळा आहे . मनसा + उक्तम् = मनसोक्तम्  असा संधी सह असलेला शब्द आहे तो. मनसा म्हणजे मनाने . उक्तम् म्हणजे सांगितलेले. मनसोक्त म्हणजे मनानी सांगितलेले.
या प्रकारातीलही अनेक शब्द भाषेत आढळतात. जसे शास्त्रोक्त (शास्त्रात सांगितलेले/म्हटलेले)  , वेदोक्त (वेदांत सांगितलेले/म्हटलेले) , श्रुतिस्मृतिपुराणोक्त , उपरोक्त ( वर सांगितलेले /म्हटलेले)   वगैरे . 
आपण मात्र  रूढं अर्थानुसार "मनसोक्त" वागावे ! 

मनःपूर्वक = मनापासून या अर्थाचा  हा शब्द. अभिनंदन , शुभेच्छा , सदिच्छा  इत्यादी  मनापासूनच करायला पाहिजे  , होय ना ? मनस्वी म्हणजे मनमानेल तशा नकोत . 

मनापासून = हा शब्दाचा अर्थ इतका स्पष्ट आहे की याला स्पष्टीकरण कशाला हवे ना ?  

आपला भाषिकस्तर  उंचावण्यासाठी शब्दांचे कोशातील अर्थ बघणे , या पलीकडे शब्दांच्या व्युत्पत्ती देखील लक्षात घ्यायला हव्या. 
©डॉ. प्रज्ञा देशपांडे. 





 
  

Wednesday, July 8, 2020

#सहजोक्त







*उपकार घ्यायला शिका*. 

लॉकडाऊन पूर्वी पर्यंत ब-याचशा सामान्य लोकांचीही जीवनशैली अत्यंत वेगवान् आणि गरजेपुरता संबंध अशी झाली होती. समाज विकसित होत होता पण भौतिक-सुबत्तेतच . एकाएकी  ही अनन्यसाधारण स्थिती उद्भवली न् विचार करण्याची वेळ आली .
 
फार वर्षापूर्वी मध्यमवर्गीय घरांघरांतून सहज उसन्या वस्तु आणल्या जायच्या . अगदी बुटली भर दूध , अर्धी वाटी साखर पासून ते सणावरी भारी कपडे वा दागिणे यांची हमखास देवाणघेवाण चालत असे. त्यात फार वावगं कोणालाही वाटत नसे.  देणाराही उपकाराच्या नव्हे तर मैत्रीच्या संबंधाने देई न् घेणाराही तसाच असे. प्रत्येकालाच एकमेकांची गरज पडे . या देवाण-घेवाणीमुळे आडनिडीला धावून जाण्याचे संस्कार घरातूनच होत असे. "पैश्यापेक्षा माणसं जोडावी" , हे पुढच्या पिढ्यांना स्वतःच्या उदाहरणातून द‍ाखवणारी पिढी नामशेष होत आहे , आताशा.  

जसे जसे समाजात पैसा येऊ लागला , वस्तुंची सुबत्ता वाढली तसं तसे "शक्यतो दुस-यांची मदत घेऊच नये" , असे वागणे वाढू लागले.  
पूर्वी लग्नकार्य असले की गोतावळा जमा होऊन कामात मदत करीत असत. कधी त्या कामात हातभार लागे कधी मनाजोगं काम होतही नसे. पण कोणालाही दीर्घ काळ वाईट वाटून घ्यायची सवय नसे. 
आता मात्र "सारं कसं पर्फेक्टच झाले पाहिजे" , या हट्टाने इव्हेंट मॅनेजमेंट, कॅटरिंग वगैरे बोलावतात . तेही ठिक,  पण बोलताना वर ऐकवतात की "आम्हाला कोणाचे उपकार घ्यायची गरज काय ? पैसा फेकला की सारं मिळतेच आजकाल" . 
 "कोणाची" हा शब्द इतका  सापेक्ष आहे की यात शेजारी , मानलेले नातेवाईक ,  चुलत घराणं , सासर-माहेर इतकेच काय तर सख्खे जन्मदाते , वेळ प्रसंगी जोडीदार  इत्यादीही असू शकतात.  पराकोटीचा "आत्मनिर्भर" (की धननिर्भर) पणा आजकाल समाजात दिसतो.
 पैशांमुळे  "अहं" पराकोटीचा वाढलाय की कोणीही  कोणाला सहनच करत नाही . निखळ प्रेमानी स्वीकारणं फारच दूर राहीले.  त्यामुळे पैसा हे सुखी जीवनाचे  साधन न र‍हता साध्य होऊन बसले . तर  नातेवाईक , मित्रमंडळ हे  साध्य न होता साधन झाले जीवन जगण्याचे. 
 यातून प्रचंड घोळ झाला आहे. आज कोणीच समाधानी दिसत नाही. मनापासून संतुष्ट , सुखी असा कोणीच  नाही.  'असं असं घरात असेल तरच सुख' ,  'हे हे वागलं , केलं की सुख' अशा  सुखकल्पनांच्या अोझ्यांसह धापा टाकत पाय-या चढण्यात जो तो मश्गुल. 
 
  पैसा-सत्ता-अहंपणा यांच्याच प्रभावात जगण्याची धूंद चढली आहे.  अमुक एका उंचीवर चढायची प्रत्येकाची अोढ . आणि तिथे दुसरा नसावाच याची सर्व प्रकारे खबरदारी घेणे सुरु. (इथेही दुसरा ही सापेक्ष संज्ञा आहे , ज्यात 'मी' सोडून सर्व जगच असू शकते)  मग चढून गेल्यावर एकाकी पोकळी असणारच . ती एकाकी पोकळी दूर करण्यासाठी मग "षौक"  पोसणे वा आभासी जगात जगणे हे अोघाने आलेच . 
  या दुष्टचक्रात आज बरेचजण अडकलेले दिसतात.  वास्तवात सुखी-समाधानी  असण्यापेक्षा , दाखविण्याकडे जास्त कल आहे समाजाचा. सुखाचा आभास करीत  "निर्लेप"(काहीही लावूनच न घेण्याची वृत्ती)  जगण्याची वेगवान घोडदौड सुरु झाली आहे.  सुखांची मृगजळे सर्वत्र फैलले ,  संतृप्ती न् संतुष्टी मात्र दिसत नाही. 
  या दुष्टचक्रातून निसटायचे असेल तर माणसं  रुजवायला , कमवायला , जोपासायला , वाढवायला  शिकावेच लागेल .   छोट्या छोट्या गोष्टींचे उपकार करण्या-घ्येण्याचे संस्कार प्रयत्नपूर्वक  स्वतःवर  करायला हवे .  न्  त्या उपकारांची परतफेड  कोण्या दुस-यांवर  जास्त उपकार  करून फेडत जावे . उपकार-रूपी चलन समाजात मोकळेपणानी रुळू द्या.  पैशापेक्षा हे चलन जास्त प्रभावी न् समाधान देणारे नक्कीच ठरेल. 
 समाज निर्लेप नको तर निकोप हवा .  त्यासाठी "उपकार करण्याचा वसा " घेऊ या.   जशी "गुरुच्या वस्याची परतफेड पुढील  पिढीला ज्ञानदान करून होते" , तसेच उपकाराचेही होऊ द्यावे .  
 "उपकार घ्यायला , न् रुजवायला शिका."   हा नवा मंत्र  नव्या जीवनमानाची सुरवात ठरेल यात शंका नाही. 
 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे. 
  
  
  
 
  
 
 

Thursday, July 2, 2020

सहजोक्त.


#चित्रकविता
*स्त्रीभ्रूणाचे बीज*

अोसाड माळरानी,
 शुष्क धरा उललेली
  दगडी कपारित,
   बीज पडले कधी तरी
नाही ऊब ना माया
निसर्गाची हो करणी
जीव बिजाने धरला,
 कोणाच्या नसे गावी ॥१॥
बीज अंकुरले अहा ,
इवलीशी पाती पहा
कोवळा जीव तान्हा
 सुकुमार कोमलसा
किती छोटीशी नाजूक
त्याची इवलीशी काया 
कसं पेलावे आव्हान
 दुष्ट जगाचे या सा-या ?॥२॥
वरी टणक जमीन
आणि मोठाला हा धोंडा
कसा साहवे हा भार
अंकुराचा जीव तान्हा
 विपरित परिस्थिती ,
 विरोधी हा उन्हवारा
 देवा कसा तुझा न्याय ,
  कां बा घेतो रे परीक्षा ?॥३॥
 अहो आश्चर्य जाहले !
 अंकुरे दगड भेदिले
 कठोरत्व दगडाचे
 न् कोमलपण अंकुराचे
 स्वभावाला न च त्यागिले ,
  तरी जीवनी जिंकले
  दगडाला भेदूनिया
  बीज-अंकुर टरारले ॥૪॥
बीजासम स्त्रीभ्रूण
माते उदरी अंकुरते
नकुशीच्या पोटी बघा
 नकुशीच चाहूलते
जरी जग तिचे वैरी
जन्माच्याही आधी होते
दोन्ही घरा उजळून
क्षमाशील धरणी होते ॥५॥
© *डॉ.प्रज्ञा देशपांडे*.
नागपूर