Wednesday, July 8, 2020

#सहजोक्त







*उपकार घ्यायला शिका*. 

लॉकडाऊन पूर्वी पर्यंत ब-याचशा सामान्य लोकांचीही जीवनशैली अत्यंत वेगवान् आणि गरजेपुरता संबंध अशी झाली होती. समाज विकसित होत होता पण भौतिक-सुबत्तेतच . एकाएकी  ही अनन्यसाधारण स्थिती उद्भवली न् विचार करण्याची वेळ आली .
 
फार वर्षापूर्वी मध्यमवर्गीय घरांघरांतून सहज उसन्या वस्तु आणल्या जायच्या . अगदी बुटली भर दूध , अर्धी वाटी साखर पासून ते सणावरी भारी कपडे वा दागिणे यांची हमखास देवाणघेवाण चालत असे. त्यात फार वावगं कोणालाही वाटत नसे.  देणाराही उपकाराच्या नव्हे तर मैत्रीच्या संबंधाने देई न् घेणाराही तसाच असे. प्रत्येकालाच एकमेकांची गरज पडे . या देवाण-घेवाणीमुळे आडनिडीला धावून जाण्याचे संस्कार घरातूनच होत असे. "पैश्यापेक्षा माणसं जोडावी" , हे पुढच्या पिढ्यांना स्वतःच्या उदाहरणातून द‍ाखवणारी पिढी नामशेष होत आहे , आताशा.  

जसे जसे समाजात पैसा येऊ लागला , वस्तुंची सुबत्ता वाढली तसं तसे "शक्यतो दुस-यांची मदत घेऊच नये" , असे वागणे वाढू लागले.  
पूर्वी लग्नकार्य असले की गोतावळा जमा होऊन कामात मदत करीत असत. कधी त्या कामात हातभार लागे कधी मनाजोगं काम होतही नसे. पण कोणालाही दीर्घ काळ वाईट वाटून घ्यायची सवय नसे. 
आता मात्र "सारं कसं पर्फेक्टच झाले पाहिजे" , या हट्टाने इव्हेंट मॅनेजमेंट, कॅटरिंग वगैरे बोलावतात . तेही ठिक,  पण बोलताना वर ऐकवतात की "आम्हाला कोणाचे उपकार घ्यायची गरज काय ? पैसा फेकला की सारं मिळतेच आजकाल" . 
 "कोणाची" हा शब्द इतका  सापेक्ष आहे की यात शेजारी , मानलेले नातेवाईक ,  चुलत घराणं , सासर-माहेर इतकेच काय तर सख्खे जन्मदाते , वेळ प्रसंगी जोडीदार  इत्यादीही असू शकतात.  पराकोटीचा "आत्मनिर्भर" (की धननिर्भर) पणा आजकाल समाजात दिसतो.
 पैशांमुळे  "अहं" पराकोटीचा वाढलाय की कोणीही  कोणाला सहनच करत नाही . निखळ प्रेमानी स्वीकारणं फारच दूर राहीले.  त्यामुळे पैसा हे सुखी जीवनाचे  साधन न र‍हता साध्य होऊन बसले . तर  नातेवाईक , मित्रमंडळ हे  साध्य न होता साधन झाले जीवन जगण्याचे. 
 यातून प्रचंड घोळ झाला आहे. आज कोणीच समाधानी दिसत नाही. मनापासून संतुष्ट , सुखी असा कोणीच  नाही.  'असं असं घरात असेल तरच सुख' ,  'हे हे वागलं , केलं की सुख' अशा  सुखकल्पनांच्या अोझ्यांसह धापा टाकत पाय-या चढण्यात जो तो मश्गुल. 
 
  पैसा-सत्ता-अहंपणा यांच्याच प्रभावात जगण्याची धूंद चढली आहे.  अमुक एका उंचीवर चढायची प्रत्येकाची अोढ . आणि तिथे दुसरा नसावाच याची सर्व प्रकारे खबरदारी घेणे सुरु. (इथेही दुसरा ही सापेक्ष संज्ञा आहे , ज्यात 'मी' सोडून सर्व जगच असू शकते)  मग चढून गेल्यावर एकाकी पोकळी असणारच . ती एकाकी पोकळी दूर करण्यासाठी मग "षौक"  पोसणे वा आभासी जगात जगणे हे अोघाने आलेच . 
  या दुष्टचक्रात आज बरेचजण अडकलेले दिसतात.  वास्तवात सुखी-समाधानी  असण्यापेक्षा , दाखविण्याकडे जास्त कल आहे समाजाचा. सुखाचा आभास करीत  "निर्लेप"(काहीही लावूनच न घेण्याची वृत्ती)  जगण्याची वेगवान घोडदौड सुरु झाली आहे.  सुखांची मृगजळे सर्वत्र फैलले ,  संतृप्ती न् संतुष्टी मात्र दिसत नाही. 
  या दुष्टचक्रातून निसटायचे असेल तर माणसं  रुजवायला , कमवायला , जोपासायला , वाढवायला  शिकावेच लागेल .   छोट्या छोट्या गोष्टींचे उपकार करण्या-घ्येण्याचे संस्कार प्रयत्नपूर्वक  स्वतःवर  करायला हवे .  न्  त्या उपकारांची परतफेड  कोण्या दुस-यांवर  जास्त उपकार  करून फेडत जावे . उपकार-रूपी चलन समाजात मोकळेपणानी रुळू द्या.  पैशापेक्षा हे चलन जास्त प्रभावी न् समाधान देणारे नक्कीच ठरेल. 
 समाज निर्लेप नको तर निकोप हवा .  त्यासाठी "उपकार करण्याचा वसा " घेऊ या.   जशी "गुरुच्या वस्याची परतफेड पुढील  पिढीला ज्ञानदान करून होते" , तसेच उपकाराचेही होऊ द्यावे .  
 "उपकार घ्यायला , न् रुजवायला शिका."   हा नवा मंत्र  नव्या जीवनमानाची सुरवात ठरेल यात शंका नाही. 
 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे. 
  
  
  
 
  
 
 

6 comments:

  1. खुप छान लिहिलंय.... वास्तववादी चित्र

    ReplyDelete
  2. खूपच अप्रतिम लिहिलंस ताई बालपणीच्या सर्व शेजारच्या जिव्हाळ्याच्या लोकांची आठवण करून दिलीस.

    ReplyDelete