Monday, October 17, 2022

#सुभाषित-सहजोक्त..

 


यस्यास्ति वित्तं सः नरः कुलीनः, 

सः पण्डितः सः श्रुतवान् गुणज्ञः ।

सः एव वक्ता सः च दर्शनीयः,

 सर्वे गुणाः काञ्चनम् आश्रयन्ते ॥

 

या श्लोकाचा भावार्थ थोडक्यात असा -  ज्या व्यक्तीजवळ पैसा आहे तोच कुलीन  , तोच विद्वान् , तोच ज्ञानी , तोच वक्ता , तोच दिसायलाही उत्तम कारण सर्वेच सद्गुण सोन्याच्या (श्रीमंतीच्याच) आश्रयाने रहातात.  


"असेल  पैसा , तोवर  बैसा" , 

"दाम करी काम , बिबी करे सलाम" 

 'बाप बडा न भय्या , सबसे बडा रुपय्या' 

 असे अनेक  वाक्प्रचार समाजात प्रसिद्ध आहेत .

त्याला कारणही तसेच आहे. जनसामान्यांना तसाच अनुभव असतो. 

सुभाषितेही समाजातील वास्तव आपल्या समोर उलगडतात. सुभाषिते समाजनीती शिकवतात. समाजाची रीतभात द‍खवितात तसेच  समाजवृत्तीचेही सामान्यीकरण दर्शवितात.  


ह्याच श्लोकाच्या समर्थनार्थ अजून एका श्लोकाचा दाखला देता येईल. 

किं वाससा तत्र विचारणीयम् 

वासः प्रधानं खलु योग्यतायाः । 

पीताम्बरं वीक्ष्य ददौ स्वकन्याम् 

दिगम्बरं वीक्ष्य विषं समुद्रः ॥

समुद्राने विष्णुने नेसलेले रेशमी पीतांबर बघून त्याच्या सांपत्तिक स्थितीचा अंदाज घेऊनच आपली कन्या लक्ष्मी त्याला दिली. या उलट दिगंबरावस्थेतील शंकराला पाहून विष  दिले .  श्लोक जरी गमतीदार पद्धतीने मांडला असला तरी लग्नाच्या बाजारात आजही  स्वभाव- कुलीनतेपेक्षा पॅकेजचे पारडे जड नाही ; असं कोण म्हणेल ? 

  "पैसा" महत्त्वाचा नाही , असे म्हणणारे एकतर स्वतःचे पोट पूर्ण भरलेले असल्यामुळे  वास्तवापासून अनभिज्ञ असतील किंवा पक्के दांभिक असतील किंवा ठार व्यवहारशून्य तरी असतील. 

 फक्त लग्नाच्याच बाजारात ,'बडा रुपय्या' असे चित्र आहे कां ?  नाही . साधारणपणे नातेवाईकांत , समाजातही हेच दिसते की मोठे पद , मोठी संपत्ती वगैरे असेल तर मानसन्मान मिळतो. गरीब नातेवाईक असेल तर आला काय गेला काय ? कोणी फारशी दखल घेतच नाही. श्रीमंतांचा जन्मदिवस , छोटी-मोठी अचिव्हमेंट भरभरून साजरी केल्या जाते. या उलट गरीबाचे होते.

गरीबाचे  सद्गुण लपतात , न् श्रीमंताचे दुर्गुण!  गरीबाचे अल्पसे न्यूनही  मोठ्ठ्या स्कॅमसारखे बढवून चढवून सांगितले जाते तर श्रीमंताचे भले मोठे लफडेही , त्याची कौतुक-लीला ठरते.   पैसा समाजात प्रतिष्ठा मिळवून देतो , हे त्रिवार सत्य आहे.  दोन्हीही श्लोक समाजमानसिकता विशद करतात , यात शंकाच नाही.  

आजकाल तर या मानसिकतेला संघटितपणाची  जोड मिळाली आहे. म्हणजे जे कोणी एकदा उच्चभ्रू-स्तरात गेले की त्यांचा गट तयार होतो.  ते अशा गटात सहसा कोणाला प्रवेश देत नाहीत , उलट एखाद्यामध्ये समोर येण्याची चुणूक दिसली तर मुळापासून त्याला हतोत्साही वा मार्गविचलित करायची कुठलीच संधी सोडत नाहीत. यातूनही तो  प्रगती करू लागला तर कुभांड , बदनामी , कुटाळक्या करून  समाजात त्याच्या लौकिकावर लांछन आणतातच आणतात.  (सुशात सिंह राजपूत , हे थोडे याच प्रकारातील उदाहरण होते.)  या मानसिकतेवरही  सुभाषित असेलच असेल.  शोधावे लागेल. 

सुभाषित-भांडागारातील अनेक श्लोक आजही कालसुसंगत आहेत.  ह्यातून संस्कृतसुभाषितांची महती आधोरेखित होते.

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.


 

Monday, October 10, 2022

#सहजोक्त.

.


तुकोबांच्या अभंगांचे मनन करताना , 'कसं वागावं?' ह्याचं  अवचित मार्गदर्शन घडते. आपलं वागणं , परत सुधरवण्याची  बुद्धी होते. दुसऱ्यातील न्यून बघण्यापेक्षा आपल्या स्वतःला घडविण्यासाठी हे अभंग अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत.

संत तुकाराम महाराज म्हणजे  त्रिकालदर्शी , सर्ववंद्य , जगद्गुरु  आहेत ;  यात शंकाच नाही.  

आता हाच अभंग बघा ना . 

૪९ ) ढालतलवारें गुंतले हे कर ! 

म्हणे मी जुंझार कैसा झुंजो !!१!!

पेटी पडदळे सिले टोप ओझे ! 

हे तो जाले दुजे मरणमूळ !!२!!

बैसविले मला येणें अश्वावरी !

 धावू पळू तरी कैसा आता ? !!३!!

असोनि उपाय म्हणे हे अपाय !

 म्हणे हायहाय काय करू !!४!!

तुका म्हणे हा तो स्वयें परब्रह्म ! 

मूर्ख नेणे वर्म संतचरण !!५!!

 (अभंग क्र. ४३४८)

  स्वतः विषयी भयंकर अभिमान असलेल्या सैनिकाला युद्धावर पाठवण्यासाठी ढाल , तरवार ,  पेटी-पडदळे ,  सिलेटोप वगैरे  घालून घोड्यावर चढवूनही दिले .  त्याला या सर्व साधनांचे ओझे वाटू लागले.  जे जे उपाय सांगितले ते सगळे त्याला अपाय वाटू लागले.   तो सारखा  नाराजी द‍ाखवू लागला  व  तक्रारी करू लागला की ,  "मी झुंजार आहो पण लढूच कसा?" 

  या सैनिकासारखेच ,  जीवनात बरीचशी सुखं मिळाली असूनही आपल्या तक्रारी कमी होत नाहीत.   दुसऱ्याला काय चांगलं मिळालं  न्  आपल्याला काय कमी मिळालंय ,  ह्याच्याच संशोधनात  आपली आपल्या आयुष्यातील सुख उपभोगण्याची क्षमता संपते. 

   तुकाराम  महाराज म्हणतात ,  खरे तर  'आपण परब्रह्म आहोत' ,  ह्याची जाणीव होण्यासाठी सद्गुरुला शरण जायची बुद्धी असावी लागते.  

  जिज्ञासा , समर्पण , विनम्रता , कृतज्ञता  तसेच सातत्य  हे दैवी गुण आहेत.   हे गुण जिथे , ज्याच्यात आढळतील त्या व्यक्तीला उपरोल्लिखित सैनिकासारखा अनुभव येणारच नाही. 

  हा अभंग वाचल्यावर साधारणतः आपल्या अवती भवती अशा प्रवृत्तीचे कोण कोण आढळतात ,  हेच बघण्यात वेळ जातो.  पण जरा स्वतःतच सखोल बघितले तर ? कितेक प्रसंगी आपण असे वागतो ना ?  असं नेमकं केव्हा वागतो  ?  असे परखड निरीक्षण केले तर ?  

 आपलच आयुष्य सुखावह , समाधानकारक होईल  हे निश्चितच . 

  संतसाहित्य वाचण्यापेक्षा वागण्यासाठी आहे, होय ना ?

  ©डॉ. प्रज्ञा देशपांडे . 

Friday, October 7, 2022

#सहजोक्त-सुभाषित.


विपदि धैर्यमथाभ्युदये क्षमा  

सदसि वाक्पटुता युधि विक्रमः ।

यशसि चाभिरुचिर्व्यसनं श्रुतौ

 प्रकृतिसिद्धमिदं हि महात्मनाम् ॥

  महात्मा कोणाला म्हणावं ? महात्मा नेमका कसा असावा ? यावर चर्चासत्र घडू शकतील आजकाल. 

  संस्कृत सुभाषिते म्हणजे व्यक्तिमत्त्व विकासाची गुरुकिल्लीच असतात.   मानवी बुद्धी , वर्तन व भावना यांचे व्यक्तिसापेक्षता बघून त्या त्या स्तरावर उन्नयन करण्याची विलक्षण क्षमता सुभाषितांमध्ये आहे. 

  आता वरचाच श्लोक बघा ना ! 

   "महात्मा"  होण्याची नैसर्गिक , स्वाभाविक लक्षणे या श्लोकात सांगितली आहेत. 

   संकटात  धैर्य (धीर धरण्याची क्षमता) 

   भरभराटीच्या काळात क्षमाशीलता ,

   सभेमध्ये वाक्पटुत्व , 

युद्धप्रसंगी पराक्रम  गाजवणे , 

 यश मिळाल्यावर अभिरूचीसंपन्नता ,  ज्ञानसंपदानाचेच व्यसन अथवा छंद

  हे गुण ज्याच्यात उपजत वा सहज अंगीकृत आहेत , तोच महात्मा. 

   संकट म्हणजे अस्मानी-सुलतानीच नाही 

तर  व्यक्तिगत-कौटुंबिक-सामाजिक किंवा 

आर्थिक-शारीरिक-मानसिक वगैरे कोणतेही कां असेना ?  'धीर सोडू नये',  कळत  असून वळत नाही ;  असे सामान्य लोकं. तर अशाही परिस्थितीत स्वतःला शांत ठेवू शकणारे दृढसंकल्पित लोकं , नक्कीच महान असतात.  

   (डाऊन फॉल) अडचणीच्या  काळात  निरुपायाने समायोजन करणारे अनेक सामान्यजन असतात. पण परिस्थिती अनुकूल असून , सत्ता हाती असल्यावरही दुसऱ्यांविषयी  क्षमाशीलता , थोरपणाचेच लक्षण आहे. 

   चारचौघांमध्ये  वा जाहीर कार्यक्रमात , आपले मत वा भूमिका संयत शब्दांतून ठामपणे मांडण्यात थोरवी आहे.

    युद्धासाठी  शत्रुदेशच हवा असे नाही. सामान्यांच्या संसारात युद्धप्रसंग नेहमीच येतात.   आपल्या मानसिकतेच्या बाहेरची कोणतीही विचारधारा , आपल्याला युद्धप्रवण करते. वेगळ्या विचारधारेचा आपण (अज्ञान-अहंकार) नेहमीच विरोध करतो. मानसिक-कायिक-वाचिक विरोध कायमच सुरु असतो आपला मनातल्या मनात.  या मानसिक-युद्धात सर्वात जास्त खच्चीकरण होते ते आपल्याच स्वास्थ्य व  सर्जनशीलतेचे!  हेच जिंकणे इथे विक्रम या शब्दांतून अभिप्रेत आहे. 

     यशस्वी (सक्सेसफुल) व्यक्ती सदभिरुचिपूर्ण असाव्यात.  "पद राजाचे न् डोहाळे भिकेचे" असं व्हायला नको. 

     ज्ञानार्जनाचे व्यसनच हवे. कोणत्याही वयात औपचारिक वा अनौपचारिक शिक्षण , हे वृत्तीतच असायला हवे.  

     

वर सविस्तर सांगितलेले गुण ज्याच्यात आहेत (उपजत अथवा अर्जित, संपादित)  तोच खरा महात्मा. 


आता  हे डोक्यात ठेऊन  किती महात्मे वा किती टक्के महात्मपणा ,आपल्या आजूबाजूला शोधा बरं  दिसते  ?  आले कां कोणी डोक्यात /डोळ्यासमोर ?  शोधा शोधा ....

आता जरा स्वतःला शोधा . यातले किती गुण आपल्यात आहेत ? किती सहजसाध्य आहेत न् किती कष्टसाध्य आहेत ?  याचा प्रामाणिक विचार करा. 

महात्मा होणं आता आपल्याच हातात आहे , नाही कां ?

©डॉ. प्रज्ञा देशपांडे. 

 

Tuesday, October 4, 2022

सहजोक्त.

 #सहजोक्त 

नको खंत बाळगू , जगात सुवर्णाचीच परीक्षा केली जाते !

 सतत लोखंड-पितळ बाळगण्याचीच हैसियत आहे त्यांची

 कदाचित म्हणून संशय घेतात तुझ्यावर ।

 ‎खरे तर तुझ्यावर अविश्वासाचा विषयच नाही ,

 ‎ त्यांच्याच लायकीवरचा त्यांचा संशय आहे तो.

 ‎इतकं चांगलं अापल्याला मिळेलच कसे ?   याच्याच खात्रीसाठी काढलेले हे चिमटे आहेत ते !

 ‎म्हणून खंत नकोच बाळगू ,परीक्षा 

 ‎घेणा-यांची , 

सोनंच आहेस तू, हे तुलाही माहितच आहे !!

 ‎©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

 ‎

Thursday, August 25, 2022

#सुभाषित-सहजोक्त.

 

संपूर्णकुम्भो न करोति शब्दम् 

अर्धो घटो घोषमुपैति नूनम् ।

विद्वान्कुलिनो न करोति गर्वं

जल्पन्ति मूढास्तु गुणैर्विहिनः ॥

पाण्याने पूर्ण भरलेला घडा , आवाज करत नाही. अर्धवट रिकाम्या घड्यातून आवाज येतो.  विद्वान , कुलीन लोकं कधीच गर्व करीत नाहीत मात्र मूर्ख , गुणहीन लोकं उगाच प्रौढी मिरवतात. 

याच अर्थाची मराठीत नेहमी प्रचलात  असलेली म्हण , "उथळ पाण्याला खळखळाट भारी"  सर्वांच्याच कानावर पडलेली आहे.  त्याच अर्थाची इंग्रजी म्हण  , "empty vessal make much noice." 

याच आशयाचा हिंदी शेर  मध्यंतरी वाचनात आला. 


झूठी शान के परिंदे ही ज्यादा फड़फड़ाते हैं.!! 

बाज़ की उडान में कभी आवाज़ नहीं होती ॥ 

तोच आशय वेगवेगळ्या भाषेत किती वेगवेगळ्या शब्दांतून न्  कल्पनेतून व्यक्त झाला आहे ना ?

संस्कृत श्लोकांतून घट हे उदाहरण दिलंय तर मराठीत नदीचे उथळ पात्र  सांगितले आहे. इंग्रजीत साधारण पात्र सांगितले आहे. हिंदीत मात्र , बहिरी ससाणा व सामान्य पक्षी यांच्या तुलनेतून स्पष्ट केले आहे.

गर्व करणं , माजणं हे कुलीन व्यक्तिमत्त्वाला शोभत नाही.  जे घरंदाज नसतात , त्यांना लवकरच गर्व होतो. 

साधारणपणे  अशा आशयाचे अनेक संस्कृत सुभाषितं आहेत.

आता हेच बघा 


शरदि न वर्षति गर्जति,

वर्षति वर्षासु नि:स्वनो मेघ:।

नीचो वदति न कुरुते, 

न वदति सुजन: करोत्येव॥

शरद ऋतुतील ढगं नुसते गर्जतात पण बरसत नाहीत. वर्षाऋतुतील ढगं बरसतात पण आवाज करत नाहीत. नीच (कमस्सल, निम्न विचारांचे लोक)  नुसते बोलतात ,  वागणुक मात्र नसते.  हेच सज्जन घरंदाज बोलत नाहीत पण कृती मात्र नक्की करतात.  "गर्जेल तो बरसेल काय ?" या मराठी म्हणीची आठवण होते.


अगाधजलसञ्चारी गर्वं नायाति रोहितः।

अङ्गुष्ठोदकमात्रेण शफरी फर्फरायते ॥

अथांग खोल पाण्यात संचारणारा मासा कधीच गर्व करत नाही.  उथळ पाण्यातली शफरी ( मासोळीचा एक प्रकार)  मात्र फर्फर आवाज करते. म्हणजे तिला गर्वाची बाधा होते. 

    अर्धा हळकुंडाने पिवळे होणारे अनेक असतात.  पण जे "लंबे रेस  के घोडे"    असतात ,  त्यांनी समोर समोर उधळणाऱ्या वरातीच्या घोड्यांकडे लक्ष देऊ नये. 

    ©डॉ. प्रज्ञा देशपांडे. 



Monday, August 22, 2022

#सहजोक्त.

 

आईन्स्टाईनची आई. 

जगद्विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन , सर्वज्ञात आहेतच . त्यांचा सापेक्षता सिद्धांत विज्ञानापासून , सामान्यव्यवहार तसेच आध्यात्म वगैरेतही लागू पडतो.  आधुनिक विज्ञानातील त्यांचे योगदान अद्वितीय आहे. 


भारतात वैज्ञानिक व मूलसंशोधक ,  चिकित्सक अभ्यासक कां तयार होत नाहीत ?  याची अनेक करणं अतिशय परखड तार्किकतेने अनेक जण मांडतांना दिसतात. 

 रूढीवाद ,  गतानुगतिकता ,  अतिश्रद्धा , देवलासीपण  वगैरे वगैरेंवर  (विशेष करून हिंदुंच्या अस्मितेवर ) ठपका ठेवला जातो.   यात अजिबातच तथ्यांशच नाही , असे नाही. पण याच कारणांनी वैज्ञानिक मानसिकता घडत नाही , हे मात्र धादांत खोटे आहे.   गेल्या ७६ वर्षांत आपण वैज्ञानिक मानसिकता निर्माण करू शकलो नाही आणि त्याचे खापर हजारो वर्षांच्या बऱ्या-वाईट सवयींवर फोडणे  , योग्य नाहीच. 


'महान् विभूती जन्माला यावेत पण ते शेजाऱ्याच्या घरी' कारण त्यासंबंधीची तोशीष , कष्ट , हाल-अपेष्टा किंवा अपमान सहण्याची ताकद गमावून बसलो असतो , आपण.  

म्हणून वैज्ञानिक , मूलभूत चिंतक आपल्या देशात कमी प्रमाणात असतात. आहेत त्यांचाही सन्मान रखण्यात आपली दानत कमी पडते. असो.

मध्यंतरी कुठेतरी वाचलेली कथा थोडक्यात अशी - 

ख्यातकीर्त व लब्धप्रसिद्ध झाल्यावर आईंन्स्टाईन आपल्या आईच्या घरी येतो.  त्याची लाडकी आई स्वर्गवासी झालेली असते.  आईचे कपाट आवरताना त्याला त्याची शाळा सोडल्याचा दाखला व हेडमास्तराचे पत्र दिसते. तो पत्र वाचतो व  डोळ्यातून घळघळ पाणी यायला लागते.  त्याला सारं बालपण लख्ख आठवतं.  लहानपणी त्याची शाळा सुटते. आणि आई त्याला घरी शिकवते.  'आई , मी शाळेत कां नाही जायचं ?' हे विचारणाऱ्या बाल-आईन्स्टाईनला आई नेहमी समजावत असते की ,' बेटा , तुझ्या हेडमास्तरांनी सांगितले की तू विशेष बुद्धिमान आहेस आणि सामान्य मुलांसारखे सर्वसामान्य शिक्षण तुला नको द्यायला. म्हणून तुझी विशेष तयारी मीच करून घेते.'  छोटा अल्बर्ट विश्वास ठेवतो व आईच्या मार्गदर्शनात प्रगती करतो. पुढे विख्यात विद्यापीठातून उच्चशिक्षण घेतो...... हातातील चिठ्ठी गळून पडलेली असते. चिठ्ठीत लिहिले असते की , ' इतक्या निर्बुद्ध मुलाला आम्ही शिकवू शकत नाही'. 


जगाला महान् वैज्ञानिक लाभला , तो नक्कीच त्याच्या बुद्धी, चिकाटी , कष्ट व धैर्यामुळे ;  यात शंका नाहीच .  पण विचार करा , हेडमास्टरांच्या शेऱ्याने आई खचून गेली असती किंवा निराशेतून समोर शिकणं बंदच केलं असतं किंवा मुलावर वैतागून त्याला सरळ कामधंद्याला लावलं असतं तर ?   

 शिक्षण, विज्ञान, देवतावाद वगैरे वगैरेंच्या पलीकडे आहे मानवी संवेदना.  संवेदनेतून  समोरच्यामध्ये सर्जकता , अभियोग्यता निर्माण करणे म्हणजे खरी अध्यापन प्रक्रिया आहे. बाकी शाळा, ट्यूशन , पुस्तके,  गॅजेट्स वगैरे  साधनं आहेत.  

   आईन्स्टाईन घडवणारे शिक्षण देण्यापेक्षा  घरोघरी , प्रत्येकाची 'आईन्स्टाईनची आई' ही मानसिकता घडवली तर ?   

   विचार करा व प्रतिक्रिया द्या. 

   ©डॉ. प्रज्ञा देशपांडे. 


Saturday, August 20, 2022

#सुभाषित-सहजोक्त.


अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च 

अजापुत्रं बलिं दद्यात्  , देवो  दुर्बलघातकः॥ 

एक भक्त होता. 'माझं कामं करून दे , मग तुला हवं ते बळी देईल' असं देवाला कबुल करतो. काम झाल्यावर देवाला विचारतो ,

भक्त =  'तुला बळी कशाचा देऊ? घोडा देऊ कां ?' 

देव =  नको .

भक्त = हत्ती देतो.

देव= नको, नको.

भक्त= मग वाघ  देऊ कां ?

देव =  नको रे बाबा , अजिबात नको.

भक्त = मग काय द्यावं बळी म्हणून ?

देव = शिंगही नसलेलं बकरीचे पिलू दे. 

यावरून सुभाषितकार म्हणतात की देव हा दुर्बलांचा घातक असतो. 

'God helps those who help themselves' अशी इंग्रजी म्हण आहे. 

स्वतःच स्वतःचे रक्षण करणाऱ्याचे रक्षण देव करतो . 'दे गा घरी ,खाटल्यावरी' म्हणणाऱ्याला देव काहीच देत नाही.  

आत्मरक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. 'शरीरम् आद्यं खलु धर्मसाधनम् ।'  म्हणजे  'याचि दही याचि डोळा' सर्व प्राप्त करायचे असेल तर  स्वतःवरच निर्भर रहावे. आत्मनिर्भरता फारच महत्त्वाची.     स्वतःचे आत्मरक्षण ,  आत्मसन्मान वगैरे  आपल्यालाच करावे लागते.  देवही ते  करू शकत नाही मग ग्रह-तारे वगैरें फारच दूरचे आहेत.  

मग ? देव आहे की नाही ? जगात चांगुलपणा नाहीच कां ?  कोणावरच विश्वास ठेवू नयेच कां ? असे विचार आणू नये मनात.  

देव आहे  व त्यानेच सर्वोत्तम रचना म्हणून आपल्याला मानवी देह-बुद्धी दिली.  त्या बुद्धीचा वापर करून , शरीराने कष्ट करून  हवं  मिळवायला देवानेच सक्षम बनवले आहे. 

  जगात सर्वत्र चांगुलपणा आहे पण त्यासाठी  आपण फारच चांगले असणं गरजेचे आहे. 'जैसी दृष्टी , वैसी दृष्टी'  हेच खरे. 

  आत्मविश्वास  ठासून भरला असेल तरच दुसऱ्यावर विश्वास ठेवावा पण विसंबून राहू नये , कारण 'जो दुसऱ्यावरी विश्वासला , त्याचा कार्यभाग बुडाला' हे खरेच आहे.

"Survival of the fittest"  हे  जगाचे तत्त्व आहे. याबाबत जग फारच निष्ठुर असते.  म्हणून 

"ख़ुदी को कर बुलंद इतना 

कि हर तक़दीर से पहले 

ख़ुदा बंदे से ख़ुद पूछें 

बता तेरी रज़ा क्या है।" 

जगाच्या या विशाल पसाऱ्यात आपलं अस्तित्व देवाने निर्माण केलं . आता ओळख निर्माण करणे हे आपल्याच हातात आहे.  आपल्या कर्तृत्वाने असे कार्य करायला हवे की देवालाही त्याची दखल घेणं भाग पडेल.  

©डॉ. प्रज्ञा देशपांडे. 


 

 


Friday, August 19, 2022

#सुभाषित-सहजोक्त.


ईक्षणं द्विगुणं प्रोक्तं भाषणस्येति वेधसा।

अक्षिणी द्वे मनुष्याणां  जिव्हात्वेकैव निर्मिता॥

दोन-दोनदा नीट बघावे. (परिपूर्ण विचार करून मगच)  बोलावे. यासाठीच ब्रह्मदेवाने मानवाला डोळे दोन दिलेत पण जीभ मात्र एकच दिली. 

सध्याचा जमाना स्मार्ट व फास्ट आहे.  या सुभाषितालाही काळानुरूप स्पष्ट करणं गरजेचं आहे.

कानांनी ऐकणे , डोळ्यांनी पहाणे ,  वाणीने  बोलणे , नाकाने सुंघणे , त्वचेने स्पर्शणे ही सर्व ज्ञानप्राप्तीची साधनं आहेत. यासर्वांच्या यथायोग्य  मदतीने मन+बुद्धी यांच्याद्वारे  अनुभवसंपन्न व्यक्तिमत्व विकसित होते.   

दिसलं काही , वाचलं काही , कोणाचं ऐकलं की चट्दिशी आपली एक्सपर्ट कॉमेंट ठोकणं वा (शब्द वा कृतीतून) भडक प्रतिक्रिया देणे अजिबात योग्य नाही.  पाचही ज्ञानेंद्रियांच्या प्रक्रियेतून बुद्धीने निर्णय घेवून बोलले , वागले  तरच सार्थक होतं . नाही तर , 'बोल बोल नाऱ्या........' अशी अवस्था होते.  


 दोन हात , दोन पाय  ,  उपस्थ (जननेंद्रिय)  , पायु( गुदद्वार)   आणि जीभ   हे  पाच कर्मेंद्रियं आहेत. मुखातील वाणी जशी ज्ञानेंद्रिय आहे तशी मुखातील जीभ कर्मेंद्रिय आहे.

 जीभने चव कळते , उच्चारण नीट होण्यासाठी जीभ हवीच हवी.  तर ही जीभ एकच असून कधी कधी  बत्तीशीला पुरून उरते.  कधी ?  जेव्हा ,"क्रियेविण वाचाळता" घडते तेव्हा. 

 हातांनी सतत कार्यरत रहावे . म्हणजे कार्यकुशलता , कार्यमग्नता अत्यावश्यक आहे. ज्याचे पाय स्थिर  (म्हणजे नुसते बसून रहातात),  त्याचं मन सतत फिरत रहाते (अस्थिर असते) .  म्हणून पायांनी  सतत फिरत रहावे.  मन भिरभिरण्यापेक्षा हात-पाय जास्त क्रियाशील ठेवावे.

असे वागले तर जीभ योग्य प्रमाणातच उचकटेल ; नाही तर ठरलंच आहे ,' उचलली जीभ लावली टाळ्याला'! 


बत्तीशी जबड्यात घालाणे , बत्तीशी दाखवणे  वगैरे लीला जीभेच्या फाजीलतेने घडून निष्क्रिय माणसाची फजिती होऊ शकते. 

म्हणून , दोन-दोनदा पहा , विचार करा , पहिले कृती करा मगच बोला.  "आधी केले , मग सांगितले" , हेच वागणं योग्य.

'बोलून विचारात पडण्यापेक्षा  विचार करून बोलावे' हे सतत ध्यानात ठेवावे. 

 समर्थांनी सांगूनच ठेवलंय , "केल्याने होत आहे रे , आधी केलेची पाहिजे". 

 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे. 

Friday, August 5, 2022

#सुभाषित-सहजोक्त.



विद्या ददाति विनयं 

विनयाद् याति पात्रताम् । 

पात्रत्वात् धनमाप्नोति

 धनात् धर्मं ततः सुखम् ॥

 सुभाषिते जितकी वाचत जावीत , तितके त्यांच्या अर्थच्छटा  अधिकाधिक भावतात न्  नकळत मनात घर करतात , पुढे कृतीतही उतरतात . 'जसे मनी तसे वर्तनी'!  म्हणून शालेय क्रमिक पुस्तकांत संस्कृत सुभाषितांचे संग्रह दिले आहेत.

 आता हेच सुभाषित बघू या. 

 शालेय स्तरावर या सुभाषिताचा अर्थ अतिशय सोपा वाटतो. 

 विद्येने विनम्रता मिळते , विनम्रतेने पात्रता लाभते . पात्रतेमुळे धनलाभ होतो. धनलाभामुळे धर्मलाभ व त्यातूनच सुख लाभते.   

   विद्या म्हणजे नुसत्या पदव्या हा अर्थ अपेक्षित नाही. बुद्धिमत्ता वाढविणारे शिक्षण घेणे म्हणजे विद्याभ्यास होय. आज मानसशास्त्राचा भरपूर विकास झाला आहे. आजकाल मानवी बुद्धिमत्ता फक्त  बुद्ध्यांकाने(IQ)  ठरत नाही.  (EQ ) भावनांक , ( SQ ) सामाजिक-संवेदनशीलत्व (AQ ) आपत्ति-समायोजकत्व उत्तरोत्तर महत्त्वाचे असतात. 'मेरीटवीर' म्हणजे उच्च बुद्ध्यांक असलेली मंडळी बरेचदा उत्तम (एंप्लॉई) नोकरदार  होतात . तर EQ, SQ , AQ   उत्तम असलेली मंडळी  उद्योजक , लोकनायक वगैरे होतात.  

   जी ह्यासर्व स्तारांतील बुद्धिमत्ता वाढवते तीच खरी विद्या. अशी विद्या प्राप्त केलेली व्यक्ती नेहमीच विनयी असते.  व्यक्ती विनयी म्हणजे 'फक्त अंगी नम्रता असलेला' , इतका संकुचित अर्थ नाही.  

   यथा “ जितेन्द्रियत्वं विनयस्य कारणं गुणप्रकर्षो विनयादवाप्यते । गुणप्रकर्षेण जनोऽनुरज्यते जनानुरागप्रभवा हि सम्पदः ॥ “ इत्युद्भटः ॥अथ विनयप्रशंसा । “  विद्येमुळे विनम्रता अंगी बाणली की मन-भावना-शरीरावर नियंत्रण करता येते. मन व भावनांवर ताबा मिळाला की सुप्त गुण वाढतात.  गुणांमुळे लोक आकर्षित होतात. लोक प्रभावित झाले की संपत्ती सहज मिळते.  

 अशी विनयशील व्यक्ती "पात्र" ठरते. पात्रतेमुळेच धनलाभ होतो. समाजधारणेसाठी धर्म असतो. धन मिळाले की समाजाच्या भल्यासाठी उपयोगी होते. फक्त स्वतःपुरता किंवा स्वतःच्याच कुटुंबा पुरता  जगणाऱ्याला कधीच आंतरिक समाधान-सौख्य लाभत नाही.  म्हणून कमावलेल्या संपत्तीचा मोठा हिस्सा  परोपकारासाठी खर्चावा. त्यातच खरे सुख असते.  

 हा श्लोक व त्याचा अर्थ समजून-उमजून यथाशक्ती कृतीत आणला तर 'उद्धरेदात्मना आत्मा' नक्कीच साधेल. 

 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे. 

Wednesday, August 3, 2022

#सुभाषित-सहजोक्त .


यद्यपि खदिरारण्ये 

गुप्तो वस्ते हि चम्पको वृक्षः ।

तदपि च परिमलमतुलं

दिशि दिशि कथयेत् समीरणस्तस्य ॥

 सुभाषिते ही संस्कृतभाषेने दिलेली अनमोल संपत्ती आहे. मानवी व्यक्तिमत्त्वाला निव्वळ परिपूर्त करते असे नाही तर समृद्धही करते.  जीवनाला आवश्यक परंतु नगण्य अशा अनेक छोट्या छोट्या पैलुंवर अत्यल्प शब्दांतून मार्मिक भाष्य करण्याचे कसब सुभाषितात असते.  या मार्मिक भाष्यातून आपलं जीवन समृद्ध करावं की वाचून सोडून द्यावं , हे पात्रावर अवलंबून आहे.

 आता वरचेच सुभाषित बघा ना !

 खैराच्या (ज्याच्यापासून काथ/कात बनवतात ते झाड) जंगलात चाफ़्याचे झाड लपून जरी बसले तरी त्याच्या फुलांचा अतुलनीय  सुगंध , वारा दिशा दिशांना सांगत सुटतो. 

 चाफ्याच्या झाडाला फुले येई पर्यंतच ते झाड गुप्त राहू शकते. कारण त्याच्या  पाने-शाखा वगैरेंना सुवास नाही. पण फुले बहरली की त्याचा वनवास , अज्ञातवास संपतोच संपतो. मग त्याला लोकमान्याता , लोकप्रियता मिळते . चाफ्याला फूलं तर येणारच ना !   मग 'तावत्काल प्रतीक्षस्व'। 

  फुलं येण्या इतपत पोषण स्वतःचे स्वतः मिळवावेच लागते , फुले येण्या इतकी प्रौढता लाभावी लागते  आणि हे सर्व होण्यासाठी  बरेच वर्ष  धीर-शांततेने काळ जाऊ द्यावाच लागतो. 

 संत कबीराचा दोहा आहे -

 धीरे-धीरे रे मना, धीरे सब कुछ होय, माली सींचे सौ घड़ा, ॠतु आए फल होय।

 शंभर  घागरी पाणी टाका , खत टाका , वज करा पण झाडाला फळ त्याचा ऋतु आल्यावरच येईल.  त्यामुळे शांत समाधानाने वाट बघत स्वतःला कणाकणाने समृद्ध करत राहणे , योग्य ठरते.     

 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

 

Monday, August 1, 2022

सहजोक्त.

 श्रावण महिना सुरु झाला.  'यंदा शंकराची स्तोत्र वाचावी' , असे मनात आले.  घरी संग्रहात असलेल्या स्तोत्ररत्नावलीत  आदि शंकराचार्य विरचित अकरा स्तोत्र आहेत.  

शंकराचार्यांच्या  सर्वच  रचना अत्यंत प्रासादिक आहेत.  या श्रावणात मूळ संस्कृत-स्तोत्र , अर्थ   व जिथे योग्य वाटेल   तिथे   टिपण्णीसह लिहाव्या , असे मनात आले. त्यानुसार आज पहिले स्तोत्र , " शिवमानसपूजा"  याबद्दल लिहीत आहे. 

  लहानपणीच ऐकून ऐकून  हे स्तोत्र पाठ केले आहे , पुढे अर्थ कळल्यावर तर अत्यंत आवडीच्या पैकी एक आहे. 

  " मानसपूजा"  हा प्रकारच  रमणीय आहे. एका स्थानी बसून मनापासून मनातल्या मनात  षोडशोपचारी पूजा करणं , ही कल्पनाही किती रंजक आहे ना !  देवतेशी मानसिक-सायुज्यता मिळाल्याशिवाय  अशी रचना शक्यच नाही.  म्हणूनच ही रचना पूर्णपणे समजून उमजून म्हणायला हवी.   तादात्म्य ठेवून जर ही मानसपूजा केली तर खरी-खुरी पूजा केल्याचे समाधान व इप्सित फळ नक्कीच मिळते.

 

शिवस्तोत्राणि  – शिवमानसपूजा


रत्नैः कल्पितमासनं हिमजलैः स्नानं च दिव्याम्बरं 

  नानारत्नविभूषितं मृगमदामोदाङ्कितं चन्दनम् । 

  जातिचम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पं च धूपं तथा 

  दीपं देव दयानिधे पशुपते हृत्कल्पितं गृह्यताम् ॥ १॥

  शिवशंभूची मानस पूजा करताना शंकराचार्य  म्हणतात -

  रत्नजडित  आसन , हिमजलाने स्नान , नेसायला विविध- रत्नांनी  विभूषित दिव्य वस्त्र ,   कस्तुरीच्या सुगंधाने युक्त चंदन लेपन ,   जातिपुष्प (जाई-जुईची फुले) , चाफा , बेलाची पाने  यांच्या सह विविध फुलांच्या रचना   तसेच धूप व दीप वगैरे सर्वच गोष्टी , हृदयातून कल्पिल्या आहेत .   हे देवा , हे  दयानिधे , हे पशुपते ,    तू या सर्वांचा स्वीकार कर.  


सौवर्णे नवरत्नखण्डरचिते पात्रे घृतं पायसं भक्ष्यं पञ्चविधं पयोदधियुतं रम्भाफलं पानकम् |

 शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलं

 ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरु ।। २ ।

नवरत्न-खचित सुवर्णपात्रात तूप , खीर  ,  दूध-दही युक्त पाच प्रकारचे खाद्य  , केळी (रम्भाफल) , सरबत (पानक)  , (वाळा वगैरे सारख्या)  शाकयुक्त  तसेच  कापूर व खडीसाखर घातलेले रुचिकर पाणी , तांबूल  वगैरे सर्वच मी माझ्या मनातून रचले व अर्पण केले आहे . हे प्रभो , कृपया स्वीकार कर.. 


छत्रं चामरयोर्युगं व्यजनकं चादर्शकं निर्मलं वीणाभेरिमृदङ्गकाहलकला गीतं च नृत्यं तथा । साष्टाङ्ग प्रणतिः स्तुतिर्बहुविधा ह्येतत्समस्तं मया सङ्कल्पेन समर्पितं तव विभो पूजां गृहाण प्रभो ॥ ३ ॥ 

छत्र ,   दोन चामर (चँवर)  , छोटा पंखा ,  स्वच्छ आरसा ,  वीणा-भेरी-मृदंगादींचा  गोंगाट   , शिवाय गीत आणि नृत्य तसेच साष्टाङ्ग नमस्कार , विविध प्रकारे स्तुती  आदी सर्व मी  संकल्पपूर्वक समर्पत करत आहे.   हे सर्वव्यापी  प्रभो  शंभो , तू  ह्या सर्वांचा स्वीकार कर.


आत्मा त्वं गिरिजा मतिः सहचराः प्राणाः शरीरं गृहं ।

पूजा  ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः । 

सञ्चारः पदयोः प्रदक्षिणविधिः स्तोत्राणि सर्वा गिरो।

 यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनम् ॥ ४ ॥

हे शंकरा ,  माझा आत्मा म्हणजेच तू. माझी बुद्धी म्हणजेच पार्वती , माझे पंचप्राण म्हणजेच तुझे सहचरगण होय. माझं शरीर म्हणजेच तुझे घर होय.  विषयभोगांच्या रचना,  केवळ तुझी पूजा होय.  माझी झोप म्हणजे समाधीस्थिती होय.  मी पायांनी जोही संचार करतो , तो सर्वच तुझी प्रदक्षिणा होय. माझ्या  वाणीतून स्फूट होणारं सारं सारं , तुझेच स्तोत्र होय. मी जी जी  कर्मे करतो , ती सगळी तुझीच आराधना आहे. 


करचरणकृतं वाक्कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधम् ।विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व

जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो ||५|

 हात-पायांद्वारे , शरीराद्वारे ,  कर्मांद्वारे , श्रवण-नयनाद्वारे वा मानसाद्वारे घडलेले विहीत असो किंवा अविहित , सर्वच प्रकारच्या अपराधांना तू क्षमा कर. करुणेच्या सागरा , हे महादेवा  , हे शंभो , तुझा जय जयकार असो.

॥इति श्रीमच्छङ्कराचार्यविरचिता शिवमानसपूजा समाप्ता॥

   पंचज्ञानेंद्रिये आणि पंचकर्मेंद्रिये यांच्यामध्ये मन हे उभयात्मक मानले गेलेले अकरावे इंद्रिय असते.  मनाच्या आदेशानुसार ही पाच कर्मेंद्रिये आपले काम पार पाडीत असतात. "मानसपूजेचा" मुख्य आधार मनच आहे.  मनाच्या संकल्पाने जे जे केले जाते ते सर्व फलद्रूप  होतेच  . म्हणून  मानसपूजा करणे हे सध्याच्या वेगवान युगात फारच सुलभ व समाधानदायक आहे. 

  ©डॉ. प्रज्ञा शरद देशपांडे. 





Monday, July 25, 2022

चिंतनात्मक लेख.

 


१   वनस्पती  

यस्यां समुद्र उत सिन्धुरापो 

नानावीर्या अौषधीर्या बिभर्ति ।

गिरयस्ते पर्वता हिमवन्तोऽ-रण्यं 

ते पृथिवी स्योनमस्तु॥

 अशा प्रकारचे समुद्र ,पर्वत ,वनस्पती जंगल युक्त पृथ्वीचे वर्णन  ऋषींनी अथर्ववेदात (१२।१।३,२,११)  केले आहे. 

'अन्न-वस्त्र-निवारा', ह्या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत असे समाजशास्त्र म्हणते. वरील तीनही गरजा वनस्पतींशिवाय अपूर्ण आहेत , असे म्हटले तर वावगे ठरू नये. मानवी अन्नाचा मोठा भाग वनस्पतीजन्य आहे जसे भाजी ,फळे ,धान्य आदी . वस्त्र ही गरज सुद्धा वनस्पतींपासूनच पूर्ण होते  बव्हंशी. कापुस ,ताग ,बांबु इत्यादी झाडांपासून पूर्वापार वस्त्र निर्माण केल्या जातात. मानवी उत्क्रांतीपासून ते आज वर मानवाने निवारा म्हणून वृक्षांचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष उपयोग केला आहे ,भविष्यातही  करणारच आहे.  अशा प्रकारे सर्व प्रकारे वनस्पतींवर आधारलेले  मानवी जीवन वनस्पतींनी सांभाळले ,जोपासले व भरभराटीला नेले आहे ,यात दुमत नाही. 


 अश्मयुगापासून ते आताच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगापर्यंत मानव आणि वनस्पती यांचा अतिप्राचिन  परस्पर संबंध विविध आयामांतून अभ्यासण्या सारखा आहे.  

 १) वैज्ञानिक आयाम  

 विज्ञानयुगाच्या सुरुवाती पासून वनस्पतींचा अभ्यास करणा-या विद्याशाखेला "वनस्पती शास्त्र" असे म्हणतात. या विद्या शाखेत वनस्पतींचे वर्गीकरण पासून ते अंतररचना ,कार्य ,उपयोग इत्यादींचा अभ्यास होतो .विज्ञानाच्या प्रगतीसह या शाखेचाही विकास झाला व पुढे त्याच्या अनेक शाखा-उपशाखा विकसित झाल्या. आजमितीला त्यांची संख्या डझनाहून अधिक असण्याची शक्यता आहे.  "वनस्पतींना जीव असतो ,त्यांनाही भावभावना असतात" हा वनस्पतीशास्त्रातील मूलभूत सिद्धांत डॉ. जगदीशचंद्र बसु या भारतीय शास्त्रज्ञानी १८९७ मध्ये मांडला. आजही जागतीक स्तरावर वनस्पतीशास्त्र व त्याच्या सर्व शाखांमधील भारतीय शास्त्रज्ञांचे योगदान उल्लेखनीय व महत्वपूर्ण आहे. 

 

 २)पर्यावरणीय आयाम  

 विज्ञानयुगाचा एक नकारात्मक परिणाम म्हणून मध्यय़ुगाच्या उत्तरकाळी भौतिक सुबत्ता वाढीमुळे वसाहतवाद ,यांत्रिकीकरण,युद्ध ,स्पर्धा आदी मानवी दोष उद्भवले. याच मानवी दुर्गुणांमुळे वृक्षतोड,निर्वनीकरण आदी वाढीला लागले . परिणामस्वरूप प्रदूषण ही समस्या निर्माण झाली.  याच समस्येवर मात करण्यासाठी मग पर्यावरण शास्त्र निर्माण झाले. वृक्षसंवर्धन ,संरक्षण हा पर्यावरणशास्त्राचा एक महत्वपूर्ण भाग आहे.

 आदीम काळापासून अनेक वर्षांपर्यंत भारतीयांच्या अंगवळणी असलेला  "इकोफ्रेंडली" हा शब्द  सध्याच्या काळात परवलीचा झाला. विविध देशांतील सांस्कृतिक ,पारंपारिक मनोभूमी लक्षात घेऊन जनजागृती करून  वृक्ष-संवर्धानाचे कार्य याच विद्याशाखेच्या प्रगत शाखांद्वारे सुरु आहे. 

 

 ३) सामाजिक आयाम .

 मानवी समूह देश-काल-परिस्थितीत स्वतःचे जीवनमान सांभाळत काही रुढी-परंपरा जपतात. या सामजिक रूढीपरंपरांतून सभोवतालच्या मानवी जीवनासह वृक्ष-पशु-पक्षी आदी मानवेतर जीवने देखील समृद्ध होतात. अनेक सामाजिक मान्यतांमुळे बरेचदा पर्यावरणावर बरावाईट परिणाम होतो.  भारत हा विविधतेने नटलेला समृद्ध देश आहे.  येथे सामाजिक विविधता विपुलतेने आढळते तद्वत् वृक्षादी पर्यावरणाचे रक्षणासंबंधी सुद्धा वैविध्य आढळते. भारतातील अनेक आदीम जमातींमध्ये झाडांचे महत्व आढळून येते. तुळस ,दुर्वा ,बेल ,पळस ,केळ ,आंबा ,नारळ,कमळ ,नागवेल  आदी वनस्पती त्यांच्या धार्मिक महत्वामुळे समाजमान्य व संरक्षित आहेत.

 "शेतातील पहिले पीक देवतेला समर्पित करून सृष्टी देवतेविषयी कृतज्ञता दर्शविणे " हीच भावना भारताच्या विविध भागात वेगवेगळ्या नावांने उत्सवस्वरूपात साजरी केली जाते. जसे आसामात बिहू ,केरळात अोणम ,महाराष्ट्रात दिवाळी व अक्षय तृतीया इत्यादी. या उत्सवांच्या निमित्त्याने वनस्पतींचे महत्व जाणून घेणे इष्ट . 

 भारतात ऋतु-काळ-स्थानानुसार अनेक सणसमारंभ समाजात रूढ झाले आहेत. जसे होळी ,संक्रांत ,पोळा , हादगा-भुलाबाई-भोंडला ,दसरा ,नवरात्र ,दिवाळी  , पीकपेरणीचा सण इत्यादी.कृषिसंस्कृतीशी निगडित असलेल्या या सर्व सणांमधून मानवाचे निसर्गाशी असलेले मुळ बंध जाणून घेणे आजच्या आधुनिक युगात जास्त गरजेचे आहे. या सर्व सणांद्वारे समृद्ध पर्यावरण,खाद्यसंस्कृती ,मानवाचा मानवांशी आंतरसंबंध निकोप वाढावा हेच या सणांचे मुळ उद्दिष्ट असावे. पुढे पुढे या सणांना  विशिष्ट धर्माशी जोडण्याचा प्रयत्नातून मूळ उद्दिष्ट हरवल्या सारखे झाले . 

 महाराष्ट्रात " देवरायी " नावाचा पर्यावरणरक्षक असा अद्वितीय सामाजिक उपक्रमही धर्माशी जोडल्या गेला. महाराष्ट्राच्या काही भागात देवासाठी मोकळी जागा सोडली जायची . अशा जागांवर विविध वृक्ष उगवायचे ,वृक्षांमुळे पशु-पक्षी-किटक यांचा अधिवास तयार होई. मानवाला प्रतिबंधित केले असल्यामुळे अशा देवरायी ह्या सर्वोत्तम पर्यावरणीय अधिवास व जैवविविधतेची उदाहरणे ठरत होत्या. "देवाची भूमी "या सामाजिक भावनेमुळे तिचे रक्षण आपसूक होत असे. अशा देवरायींमुळे स्वाभाविकच आजुबाजुचे मानवी जीवन निरोगी व निसर्गसंपन्न होत असे. 

 ૪) आर्थिक आयाम .

 जीवन जगण्यासाठी "आर्थिक गरज" महत्वपूर्ण आहे. वनस्पतींमुळे आर्थिक हित जोपासल्या जाते. शेती ,फळबागा ,उपवन ,वन यांच्या द्वारे माणसाला जीवनमान उंचावणारे धन-पैसा प्राप्त होतो. वृक्ष-वनस्पती हे जवळ जवळ सर्वच भारतीयांचे आर्थिक उलाढालीचे प्रत्यक्ष स्रोत आहेत. 

 ५) धार्मिक आयाम 

 धारणात् धर्मः  म्हणजे समाजाला धारण करणारा धर्म . मानवी समाजाला ऐहिक व पारलौकिक सुख मिळवून देणारा ,मानवाची मानसिक-भावनिक जडण-घडण करणारा धर्म . जगात अनेक धर्म आहेत. ऋग्वेदात (,"एकं सद्विप्राः  बहुधा  वदन्ति ।"१।१૪६।૪६) म्हटल्या प्रमाणे सर्वच धर्म वनस्पतींचे रक्षण करावे अशीच शिकवण देतात.  भारतातील काही प्रमुख धर्मांत वृक्ष-संरक्षण विषयक काय दृष्टीकोण आहे ,याचा थोडक्यात धांडोळा घेऊ या. (येथे धर्माचा क्रम अकारविल्हे नुसार दिला आहे. )

 अ) इस्लाम  धर्म 

भारताबाहेर उगम पावलेला आणि आता भारतातही प्रस्थापित झालेला  इस्लाम धर्माचा पवित्र धर्मग्रंथ कुराण (२२।१८) मध्ये  "सूर्य ,चंद्र,तारे ,पर्वत ,झाडे व चरजीव ,अल्लाने निर्माण केले " ,  असे म्हटले आहे. मुहंमद पैगंबरांच्या अनेक उद्धरणांतून  वृक्षांचे महत्व सांगितलेले दिसून येते.  हजरत मुसाला पैगंबरांच्या शुभ सूचना  वृक्षामार्फत मिळाली असा उल्लेख आहे. हादिस अल् बुखारी यात "पैगंबरांनी स्वतःला खजूरवृक्ष म्हटले आहे".   तुळस या झाडाला रेहान म्हणतात व जो 'जन्नत का पौधा' आहे असे मानतात. 

 आ) ख्रिस्ती धर्म 

युरोपात उद्गम पावलेला ख्रिस्ती धर्माचा बायबल हा पवित्र धर्मग्रंथ आहे. जगभरात पसरलेल्या या धर्माचा ख्रिस्मस हा सण जगभरात साजरा होतो.या सणात सजविला जाणारा ख्रिसमसट्री भारतातही सर्वज्ञात  आहे.   बायबलच्या न्यायिनो ९.८ NHT  यात "सर्व झाडांनी अॉलिव्हच्या झाडाला राजेपद दिले" असा उल्लेख आहे.  यहोवाच्या यशयाहमधील अनेक भजनांत वृक्षांचा सन्मानपूर्वक उल्लेख आहे. 

ई) जैन धर्म 

भारतीय विचारपरंपरेत भारतभूमीतून निर्माण झालेला जैन धर्म अहिंसावाद ,अनेकान्तवाद इत्यादी सद्ययुगाला उपकारक अशा अनेक सिद्धांतांचा जनक आहे. जैनांचे चोवीस तीर्थंकर होऊन गेले . या चोवीस तीर्थंकरांचे  वृक्ष चिह्न म्हणून चोवीस झाडांचा उल्लेख आहे.आद्य तीर्थंकर ऋषभदेव यांचे वटवृक्ष हे चिन्ह आहे तर अंतीम तीर्थंकर महावीर यांचे सालवृक्ष हे चिन्ह आहे.  मुळातच अहिंसावादी अशा या धर्मात वृक्ष संवर्धन वेगळा सांगायची गरजच नाही. 

उ) बौद्ध धर्म 

 संपूर्ण जगाला अहिंसेचा आर्य अष्टांगिकमार्ग दाखविणारा अस्सल भारतीय मुशीतून निर्माण झालेला  धर्म म्हणजे बौद्ध धर्म . गौतमाला प्रथम ध्यान ,द्वितीय ध्यान शेतात जांभळाच्या झाडाखाली  व अंतीम संबोधी पिंपळाच्या झाडाखाली मिळाली. पालीभाषेतील *त्रिपिटक* ग्रंथांमध्ये भगवान बुद्धांचे उपदेश संग्रहित केले आहेत. भगवान गौतम बुद्धाचा जन्म लुंबिनी वनात झाला.   त्यांचे सर्व जीवनयापन  धर्म-प्रसार करताना वन-उपवनातून प्रवास करीत संपूर्ण प्रांतात ,नगरांत झाले. त्रिपिटकांमध्ये विशेषतः मझ्झिम निकायात अौषधी वनस्पतींचे वर्णन आले आहे. राजा बिंबिसार व भगवान बुद्ध यांचा राजवैद्य असलेला जीवक-कुमारभृत्य हा वनस्पतींपासून अौषधे तयार करण्यात अतिशय निष्णात होता. याच्या ज्ञानाचा सन्मान म्हणून अष्टांग-आयुर्वेदातील बालरोग-शाखा  ,कौमारभृत्य नावाने अोळखल्या जाते. चक्रवर्ती सम्राट अशोक यांचे शिलालेख इतिहासात प्रख्यात आहेत. त्यातही अनेक ठिकाणी वृक्षारोपण व संगोपनासाठी राजाज्ञा दिलेली आढळते.  

   अशा प्रकारे निसर्गासह नेहमीच साहचर्य बाळगणारा हा धर्म , वृक्ष-वनस्पतींसाठी उदारमतवादीच राहिला आहे. 

   ए) हिंदु धर्म 

  "आ नो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतः" 


, जगात जे जे मंगलमय आहे ते माझ्यात येऊ दे ,अशी मूळभावना घेत जगणारे भारतीय बहुसंख्य लोक हिंदु-आचार- पद्धतीचा स्वीकार करतात. निरीश्वरवादी ते अनेकेश्वरवादी , सगुणसाकार ते निर्गुण निराकार  इत्यादी  प्रकार-उपप्रकार या धर्मात सामावले आहेत. या धर्मांत अनेक देवता व त्यांचे आराध्य वृक्ष विख्यात आहेत, जसे शंकराला बेल ,गणपतीला दुर्वा ,विष्णुला तुळस इत्यादी. या धर्मात नित्यनैमित्तिक उपसनांमध्ये वृक्षाला अतिशय महत्वपूर्ण स्थान आहे. 

  भगवद्गीतेत स्वतः भगवान कृष्ण म्हणतात ,"मासानां मार्गशीर्षोऽहम् ऋतूनां कुसुमाकरः"। अर्थ असा की "मी  महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना आहे (यात वनसृष्टीला नवजीवन लाभते ) तर ऋतुंमध्ये फुलांना  बहर येणारा वसंतऋतू मी आहे." 

  हिंदूधर्मातील कोणतीही पूजा-व्रतवैकल्ये फुले-फळे-पाने यांच्या शिवाय पूर्ण होत नाही. सुपारी ,नारळ ,केळ,आंबा ,तुळस ,बेल ,दुर्वा याशिवाय अनेक वनस्पतींचा उपयोग वेगवेगळ्या पूजांमध्ये केल्या जातो. अर्थात पूजा नीट करण्यासाठी ही सर्व वृक्षराजी परिसरात असायलाच हवी. अशा प्रकारे वृक्षाला स्वतःच्या सामाजिक-धार्मिक-कौटुंबिक जीवनात महत्वपूर्ण स्थान देणारे हिंदु हे नेहमीच वनस्पती-संगोपकच असतात. 

  ६)सांस्कृतिक आयाम 

" जगा व जगू द्या"  हे सर्वसमावेशक तत्व प्रत्यक्षात आचरणात आणणारे आम्ही भारतीय ,संपूर्ण विश्वात आमच्या एकमेवाद्वितीय संस्कृतीमुळे विशेष ठरतो.

जगातील विविध  धर्म निर्माण होण्यापूर्वी पासून  गंगा-यमुना-सरस्वती-गोदावरी-नर्मदा-सिंधु-कावेरी आदी नद्यांच्या काठी उगम पावलेली आपली भारतीय संस्कृती तिच्या समृद्ध व वैविध्यपूर्ण  वारश्यामुळे जगात आदरणीय ठरली आहे. 

 आसेतु-हिमाचल पसरलेला आपला देश, या संस्कृतिक बंधामुळे एकसंध आहे. 

 एखाद्या देशाचा सांस्कृतिक वारसा जाणून घ्यायचा असेल तर तेथील लोककला , पुरातत्व-स्थळे , गड-किल्ले-लेणी-वास्तु-मंदीर आदी बघणे जसे गरजेचे आहे तसेच साहित्य मग ते मौखिक वा लिखित स्वरूपात असो यांचाही विचार करायला हवा. 

 भारतातील अनेक मंदिरे- लेण्या येथे वृक्षाचे शिल्प आहेतच , अजिंठा आदी लेणींमध्ये रंग तयार करण्यासाठी वनस्पतींचा स्रोत उपयोगात आणला होता असे म्हणतात. 

 भारतात अनेक प्रकारच्या लोककला आहेत.वादन-नर्तन-चित्रकला आदी अनेक कलांमध्ये वनस्पतींचा उपयोग वेगवेगळ्या पद्धतीने कसा होतो हे बघणे फार रंजक ठरेल. 

 भारतातील अनेक प्रांतात पारंपरिक पध्दतीने वस्त्र निर्माण करणे व त्याला रंगवणे हे सारे वनस्पतींच्या सहायानेच केले जाते. 

 मौखिक  वाङ्मयातून मानव-वनस्पती यांचे संबंध दर्शवणारे विपुल साहित्य आढळून येते. यांचे संकलन करणे सुद्धा मनोरंजक उपक्रम ठरेल. 

 लिखित साहित्यातून तर वनस्पतीसृष्टीच्या मनोरम वैविध्याचा परिचय होतो.  

 संपूर्ण भारताच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा विचार करता ,सांस्कृतिकसंपन्नतेत आपण काकणभरसरस आहोत यात शंका नाही.महाराष्ट्रात होऊन गेलेल्या  रामदेवराय-कृष्णदेवराय ,वाकाटक ,सातपर्णी आदी राजवटींनी महाराष्ट्राची भूमी सुजल-सुफल व सस्य श्यामल केली. शिवरायांनी तर कृषिक्षेत्र ,सिंचनक्षेत्र ,वनक्षेत्र यांच्यासाठी विशेष धोरणच राबवले होते. 

 महाराष्ट्रातील लोकहितदक्ष राजवटीं शिवाय  इथल्या संतपरंपरा ,विविध सांप्रदाय आणि वारकरी पंथ आदींमुळे साहित्यातून तर वृक्षप्रेम दिसतेच शिवाय वर्तणुकीतूनही वृक्षप्रेम दिसून येते.  "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे "म्हणणारे तुकोबा काय किंवा "कांदामुळा भाजी अवघी विठाई माझी" म्हणणारे  संत सावता महाराज काय ; पर्यावरणाशी एकरूप झालेली थोर मंडळी होती. 

अशा प्रकारे सांस्कृतिक आयामामुळे वृक्ष-संवर्धन होण्यास सहाय्य होते. 


वर आपण विविध आयामांमुळे वनस्पती-विश्वावर काय परिणाम होतो  हे थोडक्यात पाहिले.

आधुनिक विज्ञान जसे वनस्पती विषयक अभ्यास करते तसाच अभ्यास आपल्या पूर्वजांंनी अनेक वर्षांपूर्वी करून ठेवला आहे. या दोहोंचा दृष्टिकोण जरी भिन्न असला तरी दोहोंच्याही अभ्यासाचे महत्व कमी  होत नाही.

प्राचीन भारतीयांचे हे ज्ञान मुख्यतः संस्कृत ,पाली ,प्राकृत आदी भाषांमध्ये आहे. आता आपण थोडक्यात काही ग्रंथाचा परिचय करून घेऊ .ह्या पैकी ब-याचशा  ग्रंथांचा आधारभूत विषय वनस्पती हा नसून इतर विषय आहेत , हे लक्षात घेतले पाहिजे . 

१) वेद वाङ्मय=  वेद ,हे जगातील प्राचीन ज्ञानग्रंथांपैकी एक आहेत. वेद हा भारतीयांचा  मूळ  सांस्कृतिक-ठेवा आहे. 

प्राचीन ऋषी-मुनी वनात राहून निसर्गचिंतन करीत असत. त्यातून त्यांनी निसर्गपोषक-पूरक अशी जीवनशैली विकसित केली होती.  वेदांचाच एक भाग म्हणजे आरण्यके होत ,जी अरण्यात राहूनच शिकावी असा दंडक होता.  वेदांत अनेक ठिकाणी वनस्पतींचा आदराने उल्लेख केलेला आढळतो. 

ऋग्वेदात अश्वत्थ वृक्षापासून भांडे बनविणे ,अन्न प्रक्रिया ,प्रकाश संश्लेषण आदींचा उल्लेख आहे.वेदांमध्ये  पिंपळ ,सोमलता,अपामार्ग ,पाटा,पृश्निपर्णी,ऋषभ,मधुला,शमी,गुग्गुळ ,उदुंबर ,दर्भ ,अश्वत्थ,शतावर,

अजश्रुंगी ,आदी वृक्षांही उल्लेख आहे. 

 "नमः वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यः (यजु.१६।१७)" 

"अौषधीरिति मातरस्तद्वो देवीरूपब्रुवे (यजु.१२।७८)

"अतस्त्वं देव वनस्पते शतवल्शो विरोह ।

सहस्रवल्शा वि वयं रुहेम ॥ (यजु.५।૪३)  [हे वनस्पती  अौषधी , आम्ही तुमचा प्रभाव जाणतो, तुम्ही शेकडो शाखांनी वाढा , ज्यामुळे आम्ही हजारो शाखांमध्ये वाढू .] 

अथर्ववेदात अौषधी-वनस्पती ,कृषी विषयक माहिती आहे. 

ऋग्वेदात वृक्ष ,अोषधी (अौषधी वनस्पती) व वेली असे तीन प्रकारात वनस्पतींचे विभाजन  केले आहे . 'करीर' नावाचा निष्पर्ण वनस्पतींचा विशेष वर्ग दिला आहे. अथर्ववेदात हेच आठ वर्गात विभाजन केले आहे.

"वेद व वेदांग हे सर्व विश्वाचे ज्ञानभंडार आहे," अशी परंपरावाद्यांची श्रद्धा आहे. आज आधुनिक परिप्रेक्ष्यातून या प्राचीन विद्यांचा पुनर्विचार व मांडणी होणे गरजेचे आहे. 

२)अमरकोश =  समानार्थी शब्दांचा हा प्राचीन कोश आहे. यात वृक्षासाठी काही पर्यायी शब्द दिले   वरवर वाचताना ते समानार्थी वाटतात .पण या प्रत्येक शब्दातून झाडाचा एकेक गुण दिसून येतो. जसे पादप (मुळांनी पाणी पिणारा ), महिरूह (जमीनीवर उगवणारा) ,शाखी (फांद्या असलेला) ,विटपी (कक्षीगत कोंब असलेला) , तरु ((जमीन फोडून बाहेर येणारा) ,वृक्ष( छाटल्या जाणारा) . म्हणजे त्याकाळी साहित्यातूनही वनस्पतींचे गुणधर्म मांडलेले आढळतात .

३)महाभारत = श्रीव्यासांनी रचलेले हे महाकाव्य. याचा मुख्यविषय जरी पांडव विजय असला तरी  यातील काही भागांमध्ये (भीष्मपर्व ,शांतिपर्व , अनुशासनपर्व आदी)  वनस्पतींविषयी मार्गर्शनपर  भरपूर साहित्य आहे.  

वक्त्रेणोत्पलनालेन यथोर्ध्वं जलमादते ।

तथा पवनसंयुक्तः पादैः पिबति पादपः ॥(महाभारत-शांतिपर्व-अध्याय१८૪, श्लोक १६) यात  मुळांद्वारे वा-याच्या सहायाने वृक्ष पाणी पितात असे स्पष्ट  सांगितले आहे . आधुनिक वनस्पतीशास्त्रात याला *अॉस्मॉसिस* म्हणतात.

याच अध्यायात १८ व्या श्लोकात प्रकाशसंश्लेषणाची प्रक्रिया ध्वनित होते. 

"तेन तज्जलमादत्तं जरयत्यग्निमारुतौ ।

आहारपरिणामाच्च स्नेहो वृद्धिश्च  जायते ॥" 

वृक्ष व जलाशयांचे महत्व जाणून युधिष्ठिराला पितामह भीष्म सांगतात ,

"तस्मात् तडागे सद्वृक्षा रोप्याः श्रेयोऽर्थिना सदा ।

पुत्रवत्परिपाल्याश्च पुत्रास्ते धर्मतः स्मृताः ॥" 

भीष्मांनी वृक्षांना धर्मपुत्र मानले आहे.  

वनस्पतींना जीव आहे , त्या श्वास घेतात ,त्यांना भावना आहेत असे महाभारताच्या शांतिपर्वात सुचवले आहे. 

૪) वृक्षायुर्वेद =  पांडुलिपीत उपलब्ध झालेला हा  ग्रंथ  सुरपाल यांनी रचला आहे असे म्हणतात. त्यांच्या विषयी याहून अधिक माहिती उपलब्ध नाही. या ग्रंथात साठ पृष्ठ असून  ३२५ श्लोकामधून  वृक्ष संबंधी महत्वपूर्ण माहिती सांगितली आहे. या ग्रंथात १७० वृक्षांचे सविस्तर-सांगोपांग विवरण केले आहे. या ग्रंथात बीज निर्मिती ,खरेदी ,रक्षण ,रोपण ,जमिनीचे प्रकार ,मशागत ,सिंचन व त्याचे प्रकार ,उद्यान विद्या  आदींवर प्रकाश टाकला आहे. 

५) बृहत्संहिता =  वराहमीहिर हे थोर शास्त्रज्ञ भारतात (५०५इ.स.)  होऊन गेले.  त्यांचा १०६ अध्यायांचा बृहत्संहिता हा ग्रंथ  विश्वकोशा सारखा असून विख्यात आहे.यात खगोल ,गणित , पर्जन्यमान ,वास्तुशास्त्र ,या शिवाय अत्तर निर्मिती , रत्न -मोती , लग्न-परिवार व परस्पर संबंध आदीं शिवाय  वृक्षसंबंधीही माहिती दिलेली आहे. बृहत्संहितेच्या ५५व्या अध्यायातील सहाव्या श्लोकात कलम करण्याचे तंत्र सांगितले आहे. 

"अजातशाखान्  शिशिरे ,जातशाखान् हिमागमे ।

वर्षागमे च सुस्कंधान् , यथा दिक्स्थान् प्ररोपयेत् ॥"  

याचा अर्थ असा की शाखाहीन वृक्षावर शिशिर ऋतुत ,नुकत्याच शाखा तयार झालेल्या झाडावर शीतकाळी तर परिपूर्ण वाढलेल्या शाखांच्या झाडावर पावसाळ्यात कलम करावी.

६) शारंगधर पद्धती = तेराव्या शतकात शारंगधर रचित भल्या मोठ्या ग्रथाचे नाव शारंगधर पद्धती हे आहे. १६३ विभागांमध्ये विभागलेल्या ६३०० श्लोकांचा हा ग्रंथ आयुर्वेद शाखेचा प्रमुख ग्रंथ आहे. यातील एक भाग म्हणजे "उपवनविनोदः" हा होय.  या अध्यायात वृक्षचिकित्सा व उपचार हा मुख्य विषय आहे. या अध्यायाच्या १७५व्या श्लोकात असे म्हटले आहे की , 

"नराणामिव वृक्षाणां वातपित्तकफ़ाद्गदाः ।

सम्भवन्ति निरूप्यातः कुर्यात्तद्दोषनाशनम् ॥" मानवांप्रमाणेच झाडांमध्येही वात-पित्त-कफ-दोषांमुळे रोग निर्माण होतात ,हे जाणून उपचार करावेत . 

७) मझ्झिम निकाय =  पाली त्रिपिटकाचा महत्वाचा भाग म्हणजे मझ्झिमनिकाय. यात अनेक ठिकाणी भगवान बुद्धांनी अौषधी वनस्पतींची उपयोगिता सांगून त्यांचे रक्षण करावे , हे सांगितले आहे.

८)स्फूट ग्रंथ =  सुभाषितरत्नभांडागार , पंचतंत्र ,जातककथा ,  पुराणवाङ्मय ,मनुस्मृती ,अभिजात संस्कृत साहित्य आदी विविध ग्रंथातूनही वृक्षांसंबंधी माहिती मिळते.


वर उल्लेखलेल्या ग्रंथांशिवाय  आयुर्वेदाचे अनेक ग्रंथांमध्ये वनस्पतींविषयी भरपूर माहिती आलेली आहे. मानवी आरोग्यासाठी वृक्ष उपयुक्त असल्यामुळे वृक्षांना आयुर्वेदात महत्वाचे स्थान दिले आहे. 

या शिवाय 

• पाराशर संहिता 

• कश्यपीयकृषिसूत्र

• पराशर तंत्र 

• कृषितंत्र 

आदी अनेक ग्रंथ वृक्ष विषयक माहिती देतात.

"छायामन्यस्य कुर्वन्ति तिष्ठन्ति स्वयमातपे ।

फलान्यपि परार्थाय वृक्षाः सत्पुरुषाः इव ॥" 

स्वतः उन्हात राहून दुस-यांना सावली व फळे देणारे वृक्ष हे सत्पुरूषच आहेत. 

अशा प्रकारे  मानवांचे मानवत्व सर्व प्रकारे जोपासणारे वृक्षवनस्पतींचा  भारतीय दृष्टिकोणातून अभ्यास  करणे गरजेचे आहे. 

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.











#सहजोक्त.

 



भवानि त्वं दासे मयि वितर दृष्टिं सकरुणामिति स्तोतुं वाञ्छन् कथयति भवानि त्वमिति यः । 

तदैव त्वं तस्मै दिशसि निजसायुज्यपदवीं मुकुन्दब्रह्मेन्द्रस्फुटमुकुटनीराजितपदाम् ॥


माझ्या आईच्या तोंडून मी हा श्लोक अनेकदा ऐकला होता. नेमकं सौंदर्यलहरी  चाळताना हा श्लोक   वाचला न् आईच्या तोंडातून ऐकलेला श्लोक परत जाणवला. 


  आदि शंकराचार्यांनी रचलेल्या सौंदर्यलहरी या काव्यातील बावीसवा श्लोक आहे हा.  शंकराचार्यांचे  काव्य प्रासादिक न् दिव्य  होय.  जगदंबेची आळवणी करणारे हे काव्य छानच आहे असे या काव्याचे उपासक म्हणतात.  

  मला मात्र हा श्लोक आईचा आशीर्वादच वाटतो.    

 

 =>> श्लोकाचा अन्वय  व शब्दार्थ =>  

  भवानि  => हे भवानि 

  त्वं => तू 

  दासे मयि  => तुझा द‍ास असलेल्या माझ्यावर 

  सकरुणां दृष्टिं   =>  करुणामय दृष्टी 

   वितर => ठेव .

इति => असे 

स्तोतुं वाञ्छन् => स्तुती करू इच्छिणारा 

यः => जो (कोणी) 

भवानि => "हे भवानी

 त्वम् = तू"  

 इति =>  (फक्त  इतकेच ) असे  

कथयति  =>   म्हणतो .

 तदैव => त्याच वेळी 

तस्मै => त्या ( म्हणणाऱ्यास )   मुकुन्दब्रह्मेन्द्रस्फुटमुकुटनीराजितपदाम् =>  मुकुंद -ब्रह्मदेव-इंद्रादींच्या तेजस्वी मुकुटांनी जिच्या पावलांचे नीराजन केले आहे  अशी

निज सायुज्य पदवीम् =>  स्वतःची खास आंतरिक जवळीकीची पदवी  

त्वं => तू 

दिशसि => निर्माण करून देतेस . 


ह्या श्लोकाचा अर्थ  'अप्रबुद्ध' श्री. अण्णासाहेब पाळेकर यांच्या पुस्तकातून घेतला आहे , तो असा - 

 =>  हे भवानी ! तू मज दासावर करुणार्द्र दृष्टि टाक अशी स्तुती करण्याच्या इच्छेने 'हे भवानी ! तू' ,  इतके शब्द म्हटले नाही तोच तू इंद्र , ब्रह्मदेव, विष्णु ह्यांच्या भास्वर मुकुटांनी ज्याची पावले देदीप्यमान झाली आहेत असे आत्मसायुज्यपद त्याला अर्पण करतेस. 

  असं म्हणतात की ,श्रीविद्येच्या उपासकांच्यासाठी हा ग्रंथ  आहे. या ग्रंथाच्या प्रत्येक श्लोकावर एक यंत्र आहे. तसे याही श्लोकावर 'श्रीयंत्र' आहे.

 अर्थात   श्रीविद्येच्या उपासकांचा तसा अनुभव असेल.  हा सर्वस्वी श्रद्धेचा विषय आहे. दुसऱ्यांच्या श्रद्धेचा आदर करावा , असे आई सांगायची .  

 श्रीविद्या-उपासना हा माझा प्रांत नाही. 

  केवळ माझी आई म्हणायची म्हणून  हा श्लोक माझ्यासाठी तिचे 'वात्सल्यरूप' आहे .    याच   भावनेने  श्लोकावर लिहिले आहे.

  ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

 


Sunday, July 17, 2022

सहजोक्त.

 

नर्मदेतील गोटा.

"अहो , तो नर्मदेचा गोटा आहे . तुम्ही कितीही छान शिकवा , याच्या डोक्यावरूनच जाणार !" असे

 वाक्प्रचार  व्यवहारात कानी पडतात. 

 नर्मदा नदीतील गोटे बहुधा  गुळगुळीत वाटोळे असतात.  त्यामुळे त्यांस खांचाकोपरे काही नसल्यामुळे चिखल , रेती वगैरे काही चिकटत नाही .  शिवाय पाण्यात असेपर्यंत ओला, बाहेर  काढल्यावर ठणठणीत कोरडा असतो. 

म्हणजे नर्मदेतील दगडा प्रमाणेच एखादी व्यक्ती  सल्लामसलत (उपदेश) ऐकेपर्यंत मनप्रवृत्ति एक प्रकारची (पण) मागाहून त्यांतील काही  शिल्लक न राहणारी .  त्याला सांगितलेली गोष्ट कधीच  मनात साठवत  , गुंतवत नाही नाही तसेच त्याला काही कळतही नाहीं .  एकंदरित 

'नर्मदेतील गोटा' ,  या वाक्प्रचाराचा अर्थ , निर्बुद्ध , काहीही  समजून घेण्यास अपात्र' असा जरासा नकारात्मक अर्थ आहे.  

  हा वाक्प्रचार कसा बर रूढ झाला असावा ? कारण तो गोटा   नर्मदेच्या पात्रात  असे पर्यंतचे हे सर्व वर्णन बरोबरच आहे. 

  पण  पात्रातून बाहेर आल्या नंतर ?

   त्या टणक , गुळगुळीतपणा , काहीही झिरपू न देणे तसेच  लिप्त न होणे या सर्व 'गुणांमुळे'  नर्मदेतील गोट्यांचे बाण (शिवाचे बाण)  किंवा मूर्त्या बनवतात. 

   

"नर्मदेतील गोटा"  हा वाक्पचार न समजता , दृष्टान्त समजावा की काय ? 

१) एखाद्या क्षेत्रात तुम्ही "दगड" असाल पण दुसरी कडे "देव"  ठरू शकता.     

२) नदीला प्रतिसाद न देणारा , तिच्या पाण्याला सतत अवरोध करणारा दगड . नदीही जुमानत नाही , तिचा वेग कमी करत नाही . हळूहळू दगडाचे खाचकोपरे याच सतत घर्षणाने झिजतात. गुळगुळीत गोटा होऊन पुढे देवत्व  पावतो. म्हणजे विरोध त्यांचाच करा की ज्यांच्या विरोधातूनही तुमची प्रगती होईल. 


३)  नर्मदेतील अति पाषाणांनी तिचा वेग सतत प्रवाही व आवेगी असतो. अखंड  उत्साही प्रवाहिततेमुळे नदीला तीर्थाचे महात्म्य लाभते.   

 अ) म्हणजे पाषणमनोवृत्तीचे कोणी सहवासात असतील तरी तुमचे कार्य अखंड सुरूच ठेवा. त्यांच्या अवरोधाने तुमच्या गतीला आवेग येईल . न् अखंड गतिशील , प्रवाहिततेने  तुमचा महिमा वाढेल. 

ब) आपल्या वागण्यातून विरोधकालाही असं घडवा की तोही थोर व्हावा.  आपण मात्र परत आपल्या सहजप्रवृत्तीने निरालस वागत रहावे.

 तर अशी  ही नर्मदा न् असा हा  दगड! 

 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे. 

 

 


Wednesday, May 25, 2022

#सहजोक्त.

 #तोच चंद्रमा नभात.....

मराठी साहित्य त्याच्या उत्तम साहित्यगुणांनी कायमच श्रेष्ठ ठरले आहे.  मराठी कविता सुद्धा याच साहित्याची देण आहेत. काही काही कवितांचे भावगीत म्हणून ध्वनिमुद्रण झाले न् त्या कविता अक्षरशः अजरामर झाल्या. मराठीत अशा अनेक कविता आहेत.  

आता हेच बघा ना . शांता शेळके यांनी लिहिलेले , सुधीर फडके यांनी  यमन-रागात गायलेले व संगीत दिलेले   विख्यात मराठी भावगीत . हे भावगीत न ऐकलेला मराठीमाणूस विरळच असेल.  


तोच चंद्रमा नभात, तीच चैत्रयामिनी एकान्ती मजसमीप तीच तूही कामिनी !

नीरवता ती तशीच, धुंद तेच चांदणे छायांनी रेखियले चित्र तेच देखणे जाईचा कुंज तोच, तीच गंधमोहिनी ॥१॥

सारे जरी ते तसेच धुंदी आज ती कुठे? मीही तोच, तीच तूही, प्रीति आज ती कुठे? 

ती न आर्तता उरात, स्वप्न ते न लोचनी॥२॥

त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणावाळल्या फुलांत व्यर्थ गंध शोधतो पुन्हा गीत ये न ते जुळून भंगल्या सुरांतुनी॥३॥

 

  सुधीर फडकेंच्या आवाजातील तपःपूत आर्तता , पार्श्वसंगीताच्या कातर सुरावळी आणि गीतातील शब्द , या तिघांचाही मेळ असा काही जुऴला आहे की आंतरिक एकात्म सहज साधलंय त्यातून !   

  श्रुंगार हा रसांचा राजा म्हटल्या जातो . श्रुंगार रसाचा स्थायी भाव "रती" म्हटल्या जातो.  श्रुंगार रसाचे दोन भेद आहेत . (१) संयोग श्रुंगार  म्हणजे ज्यात दोहोंचे मिलन वर्णिल्या जाते. (२) विप्रलंभ श्रुंगार म्हणजे ज्यात वियोग  दर्शविला जातो. 

  हे गीत श्रुंगार-रसाचे आहे असं सामान्यतः मानतात. पण खरेच ते तसे आहे कां ?  

   शांताबाईंच्या उत्तमोत्तम काव्यांपैकीचे हे एक काव्य !  या गीतात , नायिकेला उद्देशून नायकाच्या भावना  शब्दातून व्यक्त झाल्या आहेत . शब्द आणि  भावनांची सुबक गुंफण यात दिसते.  

   काव्यप्रकाश नामक ग्रंथात एक श्लोक आहे , तो असा - 

 ‘यः कौमारहरः स एव हि वरस्ता एव चैत्रक्षपास्ते चोन्मीलितमालतीसुरभयः प्रौढाः कदम्बानिलाः ।

सा चैवास्मि तथापि तत्र सुरतव्यापारलीलाविधौ रेवारोधसि वेतसीतरुतले चेतः समुत्कण्ठते॥  

या श्लोकात -चैत्ररात्री ,  उमलत्या मालती फुलांचा सुगंध  , तो घनदाट कदंबवृक्ष  , तीच नायिका आणि नायक , त्याच त्यांच्या श्रुंगारलीला  वगैरे असूनही नायिकेला नर्मदेतीरीचे त्यांचे मीलन स्मरत आहे - असे वर्णन आहे. 

या श्लोकाचा विस्तारित , सुसंस्कृत आणि कुलीन भावानुवाद , या गीतातून आपल्याला अनुभवायला मिळतो.  बरीच उदाहरणे अशी आहेत की संस्कृतसाहित्यातून कल्पना / प्रसंग घेऊन त्यावर संस्कृत साहित्यापेक्षाही सरस  मांडणी मराठीत आढळते. (जगद्विख्यात उदाहरण आपल्या ज्ञानेश्वरीचेच आहे.) हे गीतही त्याच पठडीतले !  

 

 काव्यप्रकाशात नायिका धीटपणे व्यक्त होतेय तर शांताबाईंच्या घरंदाज काव्यात नायक  धीटाई करतोय. 

 

तोच चंद्रमा नभात, तीच चैत्रयामिनी एकान्ती मजसमीप तीच तूही कामिनी !

या दोन पंक्तीतही वरील श्लोकाप्रमाणे  चंद्र , चैत्राची रात्र  , एकांत आणि संगतीला नायिका आहे.  

पण काव्यात प्रणयी-शब्द-साज चढवावा तो शांताबाईंनीच !   चैत्रयामिनी व कामिनी हे शब्द  यमक जुळवायलाच घेतले , असे नाही .  यामिनी म्हणजे रात्र . पण अर्थच्छटा अशी की  जिच्यातून प्रहर सहज सरतात ती म्हणजे यामिनी.  सहाजिक आहे , प्रेयसी सह एकांतात असता रात्र भरकनच सरणार ! इथे 'यामिनी' शब्दाहून समर्थ-समर्पक शब्द अशक्यच !   तसेच सहचरीसाठीही "कामिनी" शब्द केवळ यमक जुळवायला नव्हे !   [अतिशयेन कामः अस्या अस्ति इति । काम + इनिः + ङीप् । ) अतिशयकामयुक्ता नारी । इत्यमरः]   जिची  स्वतःची कामेच्छा जागृत आहे अशा मनस्थितीतील पत्नी  म्हणजे कामिनी.  इथे काव्याची सरसता , शब्दांची श्रीमंती  , शब्दांतील अर्थांचे ऐश्वर्य वगैरे दीपवून जाते. 


नीरवता ती तशीच, धुंद तेच चांदणे छायांनी रेखियले चित्र तेच देखणे 

जाईचा कुंज तोच, तीच गंधमोहिनी ॥१॥

प्रणयी जीवांना जे जे हवं ते सारं यात वर्णिलं आहे. नीरवता  , धुंद चांदणं , सावल्यांची सुरेख रेखाचित्रे  , तोच जाईचा मांडव न् तीच त्या फुलांच्या सुगंधाची मोहिनी !    संस्कृतश्लोकात "मालती" म्हटले आहे. इथं या काव्यात फक्त एकच छोटीशी चूक आहे .  चैत्रात जाई उमलत नाही , फार फार मोगरा असू शकतो.  पण हरकत नाही , वनस्पतीशास्त्राच्या दृष्टीने अचूक नसेल तरी प्रणयीभावनांच्या दृष्टीने अतिशय अलवार वर्णन ठरतेय. जाईची फुलं नाजुक व मंद-धुंद सुवासिक असतात. त्यांचे उमलणे आणि कामिनीचे उमलणे यातील मदधुंदता  सुंदरच टिपली आहे शांताबाईंनी ! 

इथंवर हे काव्य हळुवार प्रणयी विकसित होतय आणि......  

सारे जरी ते तसेच धुंदी आज ती कुठे? मीही तोच, तीच तूही, प्रीति आज ती कुठे? 

ती न आर्तता उरात, स्वप्न ते न लोचनी॥२॥

 सारं सारं तसेच , अगदी तसेच आहे.  नायकही तोच नि नायिकाही तीच आहे. पण कां बरे ती धुंदी , ती  प्रीती दिसत नाहीय ? ती आर्तताही नाही न् उघड्या डोळ्यांनी बघावं असं हे स्वप्नही नाही . 

 कां ? कां ?  कां ? 

  वरच्या श्लोकातील संयोग श्रुंगार इथे संपलाय . पण विप्रलंभ श्रुंगारही स्पष्ट नाही.  

  मानवी वर्तनाची मानसिकता या कडव्यात व पुढच्या कडव्यात अधोरेखित होते. 

  

  त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा

 वाळल्या फुलांत व्यर्थ गंध शोधतो पुन्हा गीत ये न ते जुळून भंगल्या सुरांतुनी॥३॥

 नायक-नायिकेचे  मन जुळलेलेच आहे. दोघेही एकांती जवळच आहेत. सारं वातावरण प्रणयी आहे. परंतु नवथरतेची नाविन्यता आता संपली आहे. सरावाने नवतेवर मात केली आहे.  हेही मान्यच ! असा अनुभव सर्वच दंपतींना येतो. 

  "भंगल्या सुरातून  गीत व सुकलेल्या फुलातून गंध कधीच मिळत नाही." असे म्हणत शांताबाईंना नेमकं काय सुचवायचे आहे ?   सर्व काही स्वाधीन , स्वामित्वातील असूनही कां असा विसंवादी सूर ?  

   शेवटच्या दोन ओळींतून केलेला अनपेक्षित रसभंग , या काव्याला वेगळ्याच उंचीवर नेतो की हळुवार उमलणाऱ्या संवेदनेचा व्यावहारिक मनोभंग करतो ? हे ज्याचे त्यानेच ठरवावे.

   ©डॉ. प्रज्ञा देशपांडे. 

 






  



















#सहजोक्त.

 बालयोगिनी मुक्ताबाई.

 "निवृत्ति-ज्ञानदेव-सोपान-मुक्ताबाई-एकनाथ-नामदेव-तुकाराम" , या गजरात टाळ-मृदंगाच्या संगतीने  वारकरी पंढरपुरास जातात. संतांच्या मंदियाळीत स्त्री-संत तसेही कमीच , त्यातही नाम-गजरांमध्ये स्थान मिळविलेल्या मुक्ताबाई , या अद्वितीयच होय. 

 पैठण जवळील आपेगावच्या  कुळकर्णी  विठ्ठलपंत नि रुक्मिणीदेवी यांच्या पोटी चार अलौकिक  संतरत्ने निर्माण झाली. उच्च-अध्यात्मिक साधक असलेल्या मायबापाच्या पोटी जन्माला आलेली ही चारही भावंडे , जन्मजात विवेकी सिद्ध अशीच होती.  अपत्यांच्या नामकरणातूनही आई-बाबांचा अध्यात्मिक-अधिकार उमजतो. साधकाला सातत्यपूर्ण उपासनेतून संसारातील मायारूपी फोलपणा समजला की 'निवृत्ती' लाभते , निवृत्तीनंतर दृढोपासनेने 'ज्ञान'प्राप्ती होते. निवृत्तिपर आचरणासह परिपूर्ण ज्ञानाने  साधक मोक्ष'सोपाना'रूढ होतो , अशी सर्वांगिण तयारी झालेला साधक जीवन'मुक्त' होतो .  विठ्ठलपंत-रुक्मिणीबाई यांनी  अपत्यांची नावे अनुक्रमे  निवृत्ति-ज्ञानदेव-सोपान-मुक्ता अशी ठेवली. 

  अभंग-आख्यान-कीर्तन-प्रवचने तसेच संत-अभ्यासकांचे साहित्य इत्यादींतून  कवडश्याप्रमाणे  "मुक्ताबाई" यांचे चरित्र  वाचकांना कळते.  नावाप्रमाणेच मुक्ताबाई जीवनमुक्त बालयोगिनी होत्या.  

  


यावनीसत्तेची नांदी सुरु होण्यापूर्वीचा तो काळ! यच्चयावत् जनता अनिष्टरूढी , गतानुगतिक कर्मकांडीय संभ्रमात  वावरत होती.  ख-या ज्ञानाला अोहोटी लागली होती. भक्तीचा बाजार भरला होता. विवेकी-सामंजस्य जणु लोप पावले होते.  अशा कालावधित गुरुच्या आज्ञेने सन्यासवृत्ती सोडून गृहस्थाश्रमात परतलेले थोर साधक विठ्ठलपंत व त्यांची तितकीच साध्वी पतिव्रता पत्नी रुक्मिणीबाई यांच्या पोटी 

अनुक्रमे शके   ११९५ , ११९७ , ११९९ व १२०१ मध्ये ही चार भावंडे जन्माला आली.   तीन भावंडांची लाडकी बहिण मुक्ताबाईं शके १२०१ म्हणजे इ. स. १२७९ (काहींच्या मते १२७७) मध्ये जन्मली .    

तत्कालीन समाजाच्या भ्रामक रुढीप्रियतेने विठ्ठलपंत व रुक्मिणीबाईंना  छळ-छळ छळले होते. संन्याश्याची पोरे म्हणून या भावंडांनाही समाज त्रास देत असे. समाजाने जणू वाळीतच टाकलेले हे कुटुंब ! अपत्यांना संस्कार व ज्ञान देण्यास दोघेही माता-पिता जागरुक होते. मुलांचे वडिलांजवळ शिक्षण सुरुच होते. सर्व कुटुंबीय मिळून त्र्यंबकेश्वराला प्रदक्षिणा घालण्यास जात असत. त्याच काळात निवृत्तीनाथांना गहनीनाथांचा गुरुमंत्र मिळाला. निवृत्तिनाथ आठ वर्षांचे होत आले तसे  आई-बाबांना त्यांचा उपनयन संस्कार व्हावा असे वाटू लागले. पण आळंदीतील कोणीच ब्रह्मवृन्द यासाठी तयार होई ना .  अनेक धर्मसभांमध्ये विठ्ठलपंत विनविण्यास जात. पण कोणीही होकार देत नसत. त्यातच आळंदीच्या ब्रह्मवृंदांनी देहान्त प्रायश्चित्त घेण्यास सांगितले , त्यानुसार दोहोंनी इंद्रायणीत देहत्याग केला न् चारही भावंडं अनाथ झाली. त्यावेळी त्यांची वयं अनुक्रमे १० , ८ , ६  व ૪ होती . मातृपितृच्छत्र विरहित कोवळ्या बालकांनी एकमेकांना सांभाळले.  या सगळ्यांची अध्यात्मिक योग्यता तत्कालिन सगळ्या धर्ममार्तंडांहून अधिक होती  यात शंका नाही.  

सर्वात लहान , लौकिक-व्यवहारात अजाण , अबोध अशा मुक्ताबाई  जनरीतीच्या वणव्याने  लवकरच प्रगल्भ व परिपक्व झाल्या , त्यांचे बालपण संपूनच गेले.  निवृत्तिनाथांनी तिन्ही भावंडांना गुरुदीक्षा दिली. 

 वारकरी-संप्रदायाचा पाया रचणारे , भागवत्धर्म-पताका रोवणारे , ज्ञानेश्वरीकार  ज्ञानियांचा राजा , संत ज्ञानेश्वर या सर्व भावंडांहून  अधिक प्रख्यात  वाटतात. परंतु संत ज्ञानेश्वरांच्या तीनही भावंडांची योग्यता त्यांच्याच तोडीची होती , यात शंका नाही. या भावंडांनी ज्ञानेश्वरांना पूरक नि आश्वासक वातावरण अवती-भवती  सतत ठेवले , शिवाय पाठीमागे वा सोबत राहून स्वतःच्या आत्मिक प्रगतीसह समाजाच्या अाध्यात्मिक प्रगतीची कास धरली.  

 बालयोगिनी मुक्ताबाईंनी वयाने लहान असूनही आपल्या मोठ्या भावंडांना मायेने सांभाळले. मुक्ताबाईंचे अवघे आयुष्य जेमतेम   अठरा वर्षांचे होते.  विविध अभंग , संतसाहित्यातून वेचून बघितल्यास मुक्ताबाईंचा जीवनपट अंदाजे थोडक्यात असा मांडता येईल. (घटनाक्रम आणि वय ऐतिहासिक सत्य पुराव्यांवर आधारित असेलच असे नाही .) साधरणपणे  वयाच्या चौथ्या वर्षी आई-वडिलांचा मृत्यू , वयाच्या साडेचार-पाचव्या वर्षी पैठणच्या धर्मपीठासमोर काही कूट अभंग  रचून म्हटले ,वयाच्या सहाव्या वर्षी ज्ञानदेवांच्या पाठीवर मांडे भाजून निवृत्ति दादाला खाऊ घालणे , विसोबा खेचरांचे गर्वहरण ,  वयाच्या   आठव्या वर्षी ताटीचे अभंग सांगून ज्ञानदेवांना लडिवाळ उपदेश ,   नऊ ते अकरा वर्षे पर्यंत भावंडांसह  वारी न्  पंढरपुरात संतमेळाव्यात नामदेवांना उपदेश , गोरोबा काकांकडून भक्तसाधकांच्या तयारीची परीक्षा करवून घेतली ,   बाराव्या वर्षी चांगदेवांचे गर्वहरण व मुक्ताईंनी  त्यांचा शिष्य म्हणून  स्वीकार करणे , चांगदेवांना  उपदेश करणे.  पुढे ज्ञानदेवांनी भावार्थदीपिका व अमृतानुभवाची रचना करणे , नंतर नामदेवांसह तीर्थाटनास जाणे .  ज्ञानेश्वरांनी आळंदी येथे एकवीसावे वर्षी संजीवन समाधी घेतली  ,  त्यानंतर  काहीच दिवसांत   सोपानदेवांनी 'सासवड' येथे तर मुक्ताईंनी अठराव्या वर्षी 'मेहूण' येथे  वैशाख कृष्ण दशमी , रविवार शके १२१९ मध्ये तापी-नदीकाठी समाधी घेतली.  तीनही भावंडांना समाधी देऊन मग गुरु निवृत्तिनाथांनी  शके १२१९ ज्येष्ठ वद्य द्वादशीला  ब्रह्मगिरी पर्वतावर 'त्र्यंबकेश्वर'  येथे समाधी घेतली.  

 काय विलक्षण योग म्हणावा !  एका वर्षांमध्ये  चारही भावंडांनी  योगबलाने संजीवन समाधी घेतली. मुक्ताबाईंच्या  सदेह-मुक्त-समाधीचे वर्णन संत नामदेवांनी स्वतःच्या गाथेत असे केले आहे ,

 

 "कडाडली वीज निरंजनी जेव्हा l

मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली l

वैकुंठी लक्ष घंटा वाजती एक घाई l

झाली मुक्ताबाई स्वरूपाकार l

एक प्रहर झाला प्रकाश त्रिभुवनी l

जेव्हा निरंजनी गुप्त झाली l

गेले निवारुनी आकाश आभुट l

नामा म्हणे कोठे मुक्ताबाई l"


अशा प्रकारे बालयोगिनी मुक्ताई यांचा जीवनपट छोटासा पण विलक्षण असाच आहे.  


श्रीकृष्णाची अत्यल्पजीवी बहिण योगमाया जशी  ज्ञानयोग-सौदामिनी होती , तद्वत  अत्यल्प साहित्य-निर्मिती , अल्पायुषी जीवन असूनही मुक्ताईने  संपूर्ण वारकरी सांप्रदायात  अढळ गुरुपद स्वतःच्या कर्तृत्वाने प्राप्त केले आहे , यात शंका नाही. 

मुक्ताबाईंच्या जीवनातील चार प्रसंग त्यांच्यातील तेजस्वी-योगिनीचा सविस्तर परिचय  करून देतात . ते चार प्रसंग पुढील प्रमाणे , 

प्रसंग १ =>  आई-वडिलांच्या मायेला पारखे झालेली ही भावंड , एकमेकांना सावरत होती. भावंडांमधील वडिलभाऊ निवृत्तिदादाला एकदा मांडे खायची इच्छा झाली . साधक-योगी जरी असले तरी वय तसे कोवळेच होते ना त्या भावंडांचे ! मुक्ताबाई लागली मांड्याच्या तयारीला , त्यासाठी हवा होता खापराचा तवा . मग काय ? बिचारा छोटा जीव  गावात ,"सगळीकडे खापराचा तवा देता कां ?" विचारत फिर-फिर  फिरला . कोणालाही साधी कीव आली नाही. उलटपक्षी विसोबा चाटी यांनी  , या भावंडांना  तवा मिळूच नये अशी सोय केली . आता कसे मांडे खातात , बघू या गंमत!  म्हणून  लपून पाहू लागले. इकडे मांडे करता येणार नाही म्हणून मुक्ताबाई रडू लागली.  तेव्हा ज्ञानदादा मदतीला धावला. त्याने मुक्ताबाईला मांडे करायला सांगितले न् ते योगबलाने स्वतःच्या पाठीवर भाजायला सांगितले.  सर्व भावंडे आनंद‍ाने मांडे खाऊन तृप्त झाली. इकडे गावातील विघ्नसंतोषी लोकं स्तंभित झाले.  भावंडांची योगसिद्धता पाहून विसोबा शरण आले. ज्ञानेश्वरांनी त्यांना उपदेश केला . सोपानदेव व मुक्ताबाईंनी त्यांना 

बोध केला. संतसाहित्याच्या एका मतप्रवाहानुसार  विसोबा खेचर  हे सोपानदेवांचे शिष्य , तर  दुस-या मतानुसार  मुक्ताबाई या विसोबांच्या गुरु होत.  

प्रसंग २=>   पैठणचे  धर्मपीठ गाजवून  परत येताना भावंडांनी गावोगावी कीर्तन-प्रवचने केली. पुणतांबे गावी आले असता , चौदाशे वर्षांचे  सिद्धयोगी  चांगदेव , गुहेमध्ये ध्यानस्थ होते. समाधीतून बाहेर आल्यावर हे योगी  कलेवरांना जीवदान देत असत. त्यानुसार  गुहेच्या बाहेर अनेक कलेवर  ठेवलेली होती. ज्ञानेश्वरांच्या सांगण्याहून  मुक्ताबाईंनी ती कलेवर जीवंत केली. आणि ती भावंडं पुढील मार्गाला निघाली.  समाधी संपल्यावर चांगदेवांना शिष्यांकडून सारे कळले.  बालवयात चारही योगी भावंडांची साधना बघून चौदाशे वर्षांचे चांगदेव मनातून चांगलेच स्तिमित झाले. इतक्या अधिकारी पण लहान वयाच्या ज्ञानदेवांना नेमकं काय मायना लिहावा , असा संभ्रम पडून कोरेच पत्र पाठविले. ते कोरे पत्र पाहून भावंडांचा अभिप्राय होता की , इतकी तपश्चर्या करूनही चांगदेव कोरेच राहिले. मग ज्ञानदेवांनी पासष्ट श्लोकांची रचना करून त्यांना धाडली, तीच चांगदेव-पासष्टी होय. त्या पासष्ट श्लोकांचा अर्थ चांगदेवांना कळाला नाही.  या भावंडांना भेटायला ते निघाले . 'आपण मोठे योगी' , या भावनेने वाघावर बसून आले. तीनही भावंडांसह भिंतीवर बसलेले ज्ञानेश्वर योगदृष्टीने  त्यांचे हे भाव जाणून भिंतीला 'चल' म्हणतात. ती निर्जीव भिंत भावंडांना घेऊन  चालू लागते. चांगदेवांना हे सर्व पाहून भावंडांच्या योग्यतेची न् स्वतःतील न्यूनाची जाणीव होते .  ते ज्ञानदेवांना शरण येतात. ज्ञानदेवांच्याच  मतानुसार ते मुक्ताबाईंकडून अनुग्रह घेतात.  मुक्ताईने त्यांना पासष्टी  समजावून सांगितली. चौदाशे वर्षे योगतपस्या करून जे साध्य झाले नाही , ते गुरु मुक्ताई यांच्या उपदेशाने क्षणात आकळले. ज्ञानचक्षु उघडले , जणु नवा जन्म झाला . 

याचे वर्णन करताना  चांगदेव म्हणतात ,


"चांगा जन्मला माध्यान्ह काळी ।

मायबापे दोन्ही नाहीशी जाली ॥१॥

मुळीच चांगा नाहीसा जाला ।

मुक्ताई म्हणे चांगया भला भला ॥२॥

वटेश्वर चांगा मुळी लागला ।

पोसणा घेतला मुक्ताईने ॥३॥"

चौदाशे वर्षांचे चांगदेवांना  , दहा-अकरा वर्षांच्या मुक्ताईने  आईसारखे सांभाळले , मुक्तिमार्गावर गतिमान केले , ते चांगदेवांच्या अभंगातून  आपल्याला कळते ; 

 "निर्गुणाचे डाहाळी पाळणा लाविला ।

 तेथे सुत पहुडला मुक्ताईचा ॥१॥

 निज निज बाळा न करी पै आळी ।

 अनुहात टाळी वाजविते ॥२॥

 तेथे निद्रा ना जागृती भोगी पै उन्मनी ।

 लक्ष तो भेदुनि निजणा तो ॥३॥

 निभ्रांत पाळी पाळणा विणवुनी ।

 मन हे बांधोनि पवन दोरा ॥૪॥

 एकविस सहस्र सहाशे वेळे बाळा ।

 तोही डोळा स्थिर करी ॥५॥ 

 निद्रा ना जागृती निजसी काई ।

 परियेसी चांगया बोले  मुक्ताबाई ॥६॥ 

 अतिबालवयातच जिचे बालपण संपले ,  सुख-दुःख , मानापमान या सर्वांच्या पलीकडे ती कधीच गेलेली होती , म्हणूनच चांगदेव-मुक्ताई संवादात सांगतात  ,

 "सुखाचे शेवटी दुःख आले भेटी ।

 भेटलियासाठी तेही नुरे ॥१॥

 सुख ते कवण  दुःख ते कवण ।

 दोन्ही अज्ञान करी पारे ॥२॥

 मुक्ताई म्हणे चांगया चेई ।

 स्वयंभू चेईला वटेश्वरी ॥३॥ "

   बालयोगिनी मुक्ताबाई या जन्मजात योगिनीच होत्या  हेच त्यांच्या  अभंगातून  जाणवते.

   चांगदेव हे निर्विवाद  मुक्ताईचे शिष्य होते , तसे  विसोबा खेचरही होते कां ? याबद्दल  संतसाहित्यिकांमध्ये दुमत आहे. चांगदेवांचा एक अभंग  नेमकं काय ध्वनित करतो ? 

   "अविनाश पाळणा अव्यक्ते विणीला ।

   तेथे पहुडला योगिराज ॥१॥

    जो जो जो जो म्हणतसे माया ।

    साकारातीत निजरे चांगया ॥२॥

    सोहं सोहं षट्चक्रन्यासे ।

    तुज परिसे देता , मीच न दिसे ॥३॥

    ऐसी निद्रा तुज लागो दे पुत्रा ।

    मुक्ताई खेचरा उपदेशी मंत्रा ॥૪॥ 

    

    प्रसंग ३ => 

    संत , सिध्द ,योगी  जरी असले तरी ही भावंडं अतिशय कोवळ्या मनाची न् सात्विक होती. तत्कालीन समाजाच्या विखारी असहिष्णुतेने कधीतरी त्यांची मनं पोळली जात. सा-या जगासाठी ज्ञानीयांचा राजा ठरलेले ज्ञानेश्वर एकदा भीक्षा मागण्यास गेले. दूषणे , हलके शब्द , कुटाळक्या आजवर  ते सहनच करीत होते. पण यावेळी आईवरूनही कोणीतरी अपमान केला. वैरागी पण मातृहृदयी ज्ञानदेव खोलवर दुखावले न् तडक कुटीत येऊन ताटी बंद करून स्वतःला कोंडून घेतले. तिघेही भावंडं गोंधळली , दुःखी झाली. त्यावेळी मुक्ताबाईंनी बेचाळीस अभंग रचून ज्ञानेश्वरांना त्यांच्या उद्विग्न मानसिकतेतून बाहेर काढले , इतकेच नाही तर पुढील अजरामर साहित्य-लेखनाची त्यांची मनोभूमी तयार केली.  हेच अभंग पुढे ताटीचे अभंग म्हणून ख्यात पावले. 

    


चिंता क्रोध मागे सारा

ताटी उघडा ज्ञानेश्वरा

योगी पावन मनाचा

साही अपराध जनाचा ।

विश्व रागें झाले वन्ही

संती सुखें व्हावें पाणी॥

शब्द शस्त्रें झालें क्लेश

संती मानावा उपदेश।

विश्व पट ब्रह्मदोरा

ताटी उघडा ज्ञानेश्वरा॥

ब्रह्म जैसें तैशा परी

आम्हा वडील भूतें सारी।

अहो क्रोधें यावें कोठे

अवघे आपण निघोटे॥

जीभ दातांनी चाविली

कोणें बत्तीशी तोडीली।

मन मारुनी उन्मन करा

ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥ 

 शोषित-पीडित-वंचित बालकांच्याच काय मोठ्यांच्याही तोंडी इतकी समंजस-विवेकी-भाषा अशक्य वाटते , ही भाषा केवळ सिद्धयोगी , पूर्णब्रह्मस्वरूपी विभूतींचीच असणे स्वाभाविक आहे ! 

 प्रसंग ૪ => "नामदेव गाथा"   हा ग्रंथ तत्कालिन समाजाचे , व्यक्ति-विशेषांचे ,  स्थानांचे यथार्थ चित्रण करणारा  प्रामाणिक ग्रंथ आहे.  नामदेवांनी स्वतःचे सुद्धा अतिशय परखड व वास्तविक वर्णन केले आहे. स्वतः नामदेवांनी अभंगांतून मुक्ताईंच्या अधिकाराविषयी अभंग लिहिले आहेत. एकदा ज्ञानेश्वरादी भावंडे तत्कालिन प्रसिद्ध संतांच्या मेळाव्यात भेटले. प्रथम-दर्शनीच निवृत्तिनाथांनी संत नामदेवांना नमस्कार केला. मग ज्ञानेश्वरांनी व सोपनादेवांनीही केला . कोणी नमस्कार केला की आपणही त्यांना नमस्कार करायचा , अशी वारकरी-सांप्रदायात रीत आहे. नामदेवांनी या तिघांनाही नमस्कार केला नाही , उलट मुक्ताबाई नमस्कार करेल अशी वाट पाहू लागले. निवृत्तिनाथांनी देखिल मुक्ताबाईंना नमस्कार करायला सांगितले. परंतु त्यांनी नमस्कार तर केला नाही , पण सगळ्यांसमोर  जे काही सुनावले ते नामदेवांनी अभंगात मांडले ,


अखंड जयाला देवाचा शेजार l

कारे अहंकार नाही गेला ll

मान अपमान वाढविसी हेवा l

दिवस असता  हाती घेसी दिवा  l

परब्रह्मासंगे नित्य तुझा खेळ l

आंधळ्याचे डोहाळे का बा झाले l

कल्पतरू तळवटी इच्छिती ते गोष्टी l

अद्यापि नरोटी राहिली का l

घरी कामधेनु ताक मागू जाय l

ऐसा द्वाड आहे जगा माजी l

म्हणे मुक्ताबाई जाई ना दर्शना l

आधी अभिमाना दूर करा ll  


संत नामदेवांना बहुतेक सर्व संत मान देत असत. अखंड हरिसंकीर्तनात दंग असलेले नामदेव स्वतःला श्रेष्ठ भक्त समजत होते. त्यांचा अहंकार मुक्ताईंच्या लक्षात आला. अजूनही संत नामदेवांवर गुरुकृपा झाली नव्हती. ही बाब त्यांच्या संतपदासाठी न्यूनत्वाची होती. हे जाणून मुक्ताईंनी योजना केली. संत गोरा कुंभार हे सर्व मंडळीत वयाने नि अधिकाराने थोर . मुक्ताबाईंनी त्यांना सर्व विठ्ठलभक्तांची योग्यता तपासायला सुचवले.  हातात उलथणं घेऊन गोरोबाकाका सर्वांच्या डोक्यावर थापटत होते. जेव्हा नामदेवांची वेळ आली तेव्हा त्यांनी अोरडणे सुरु केले , ते पाहून गोरोबा म्हणाले , 

"गोरा म्हणे कोरा राहिला गे बाई ।

सुन्नेभरि नाही भाजियेला ॥" (ना. गा. १३३३.८)

 हे सर्व अपमानास्पद वाटून नामदेव तेथून पळाले , 

 " मागे पुढे पाहे पळत तातडी ।

 आला उठाऊठी पंढरीसी ॥" (ना. गा. १३३६.२)

" नामदेव म्हणे देवा कवणा शरण जाऊ।

कोणा मी होऊ शरणागत ॥" (ना.गा. १३૪७.५) अशी नामदेवांची अवस्था झाली.  ज्ञानदेवांच्या सल्ल्याने विसोबा खेचर यांच्या शरण गेले.  पुढे याच  नामदेवांनी भागवद्धर्म पताका पंजाबा पर्यंत रोवल्या . 

वरील चार प्रसंगातून मुक्ताईंचे स्वतंत्र , मातृहृदयी , कणखर  , धैर्यशील व्यक्तिमत्त्व अधोरेखित होते. कर्तृत्ववान् भावंडांची तितकीच ताकदीची सक्षम बहीण आपल्याला यातून उमजते. 


स्वतः विषयी न सांगणे ,  तत्कालिन समाजाची रीत होती.  त्यामुळे प्रकाशित साहित्याद्वारे प्रख्यात संत  सोडले तर  इतर संत व त्यातही स्त्रीसंत यांच्या विषयी लोक-कथा , संप्रदाय-मान्य वदंता यातूनच माहिती मिळते. कधी कधी ती फारच धूसर असते.  

ज्ञानेश्वरांनी वा सोपानदेवांनी मुक्ताईचा उल्लेख आपल्या अभंगातून केलेला दिसत नाही. निवृत्तिनाथांच्या तुरळक अभंगातून (सकल संत गाथा , निवृत्तिनाथांचे अभंग २६ ,२९ ,३०) मुक्ताईं विषयी थोडेसे कळते. 

 योगी चांगदेव व संत नामदेवांच्या अभंगातून आपल्याला मुक्ताई अधिक उलगडते. 

  सकल संत गाथेतील मुक्ताई-विरचित अभंगातूनही त्यांचे व्यक्तिमत्व जरासे आकळते. 

  उत्तरवर्ती संतसाहित्य-संशोधकांनी अशा संतांवर अधिक अध्ययन करणे सुरू ठेवले आहे , ही एक जमेची बाजू होय.  उत्तरवर्ती अभ्यासकांपैकी एक 

  वामन दाजी ओंक यांनी मुक्ताबाईचे एक हिंदी पद संकलित केले आहे ते असे –

वाहवा साहेबजी l सद्गुरुलाल गुसाईजी

लाल बीज मो उदीला काला, औठ पिठसो निला l

पीत उन्मनी भ्रमर गुंफा रस झुला बाला l

सहस्त्र दल मो अलख लिखाये, आज लौ परमाना l

जहां तहा साधू, दसवा आप ठिकाना l

सदगुरु चेले दोनो बराबर, येक देशमो भाई l

एकसे ऐसे दरसन पायो महाराज मुक्ताई l

 वरील अभंगावरून , मुक्ताबाईंनी मराठी अभंगरचनेबरोबरच काही हिंदी पदेही रचली असावीत  , असे म्हणण्यास वाव आहे.

 संत म्हणजे खरेतर जीवनमुक्त सिद्ध योगीच असतात. संतांना जातीपातीतच काय स्त्री-पुरुष-आदी भेदांमध्ये गोवणे  म्हणजे  बुद्धीभेद करणे होय. वारकरी सांप्रदायातील श्रेष्ठ संतांच्या मांदियाळीतील , मूर्धन्य व  ललामभूत संत बालयोगिनी मुक्ताबाईंचे चरित्र वाचनीय तर आहेच , मननीय व आचरणीयही आहे . 

 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे

 नागपूर .

 

 


 



 






     

   

 

 





 

Sunday, May 15, 2022

#सहजोक्त.

 

#बघ हं , हेही दिवस जातील !


काही दशकांपूर्वी समाजसेवक , स्वातंत्र्यसैनिक मोतिलाल छल्लाणी (बाबुजी)   ,  नागपूरात प्रसिद्ध होते. स्वातंत्र्यसैनिकांना सन्मान व पेंशन मिळवून देण्याच्या चळवळीतील हे प्रख्यात नाव होते.


 छल्लाणी काकांचा मुलगा उत्तम चित्रकार , छायाचित्रकार अविनाशदादा म्हणजे शरदचा (माझे पती) मित्र. अविनाशदादा ह्यांनी आईवडिलांचा समाजसेवेचा व सामाजिक संवेदना-सौहार्द्राचा वसा शेवट पर्यंत निभवला. 


अविनाशदादांचे म्हणजेंच बाबुजींचे घर केळीबागरोडवर होते. घरी आरशावर  "बघ बरं , हेही दिवस जातील!" हे वाक्य सुवाच्य अक्षरात लिहिले होते. अविनाशदादाचीच ही कलाकारी होती. 

मला आठवतं की बाबुजींनी त्या वाक्याच्या मागचे तत्त्वज्ञान उलगडून सांगितले होते. 


प्रत्येकाने आरश्यावरच हे वाक्य लिहावं , असं त्यांचं मत होतं .  जेव्हा आपल्या मनात गर्व , माज , अहंकार  येतो व आपण आढ्यतखोर होतो तेव्हा हे वाक्य चेतावणीचे वाक्य ठरते. बघ , जास्त ऊतमात करू नकोस , सर्वांशी माणुसकीने वाग कारण , हे दिवस  जास्त काळ रहाणार नाहीत.  हे दिवसही  नक्कीच निघून जातील . 


तर हेच जेव्हा आपण न्यूनगंडात , निराशेत व दैन्यावस्थेत  असतो तेव्हा हेच वाक्य दिलासा देणारे असते.  बघ बरे ,  हे वाईट दिवसही निघूनच जातीलच . कारण जीवनात कोणतीच गोष्ट स्थिर , चिरंतन  नाही , मग तुझी दयनीय परिस्थितीही पालटणारीच आहे म्हणून नैराश्य झटकून टाक  न्   हातात आलेलं कर्तव्य मनापासून कर . 


तेव्हा त्या वाक्याचे न् त्या मागील तत्त्वाचे गांभीर्य कळत नव्हते. पण आज अनेक उन्हाळे-पावसाळे बघितल्यावर वाटते की खरोखर  वैयक्तिक ,कौटुंबिक , सामाजिक , आर्थिक वा कोणतीही   परिस्थिती असो , ती चिरंतन नाहीच नाही . परिवर्तन हाच सनातन नियम आहे.

 

सखोल विचार केला तर "बघ बरे , हेही दिवस जातील!"  असा अनुभव सर्वांनाच वेगवेगळ्या टप्प्यात आलेलाच असतो , नाही कां ?

 कविकुलगुरु कालिदासाच्या त्रिकालाबाधित श्लोकाचा उल्लेख इथे समर्पक ठरेल.

 कालक्रमेण जगतः परिवर्तमाना । चक्रारपंक्तिरिव गच्छति भाग्य-पंक्ति ।।

(स्वप्नवासवदत्तम्   /१  / ४)

समय के साथ-साथ संसार परिवर्तनशील है । पहिये के अरों के समान भाग्य भी निरन्तर बदलता रहता है । 


बाबुजी छल्लाणीं व अविनाशदादाच्या स्मृतींना विनम्र अभिवादन .  

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Wednesday, April 27, 2022

#सहजोक्त.

 

सुभाषिते कालातीत असतात. मानवी प्रवृत्तींचे , भावनांचे प्रकटीकरण करणारी  अनेक सुभाषिते आहेत.  

खरा श्रीमंत कोण ?  यावर भरपूर चर्चा , लेखन वगैरे घडू शकते. पण अत्यल्प शब्दात समजावण्याची सुभाषितांची शैली खासच असते.

 आता हेच सुभाषित  बघा ना !

वयमिह परितुष्टा वल्कलैस्त्वं दुकूलैः 

सम इह परितोषो निर्विशेषो विशेष:

 स तु भवति दरिद्रो यस्य तृष्णा विशाला मनसि च परितुष्टे कोऽर्थवान् को दरिद्रः ॥   

शतक-त्रयी रचणारे भर्तृहरी हे प्राचीन काळातील प्रतिष्ठित व सदा विजयी  सम्राट होते.  राजपद सांभाळणारे  भर्तृहरी  व्याकरण , साहित्य विषयांतील तज्ज्ञ रचनाकार होते. "भारतीय शिक्षणातून सर्वांगीण व्यक्तमत्त्व विकास साधायचाच" , सिद्ध करणारे  हे उदाहरण आहे. असो.

"वैराग्यशतकम्" मधला हा श्लोक आहे. 

श्लोकाची पार्श्वभूमी थोडक्यात  अशी -   एक संन्याशी व राजा यांच्यात घडलेला हा प्रसंग . तो राजा खूप दानी व न्यायी असतो.  तर हा संन्याशी देखील आत्ममग्न , संतृप्त व  अतिशय वैराग्यमूर्ती असतो. ऐहिक दृष्ट्या अतिशय दारिद्यावस्थेत असलेल्या या वैराग्याला  सत्पात्री दान करावे , अशी राजा   इच्छितो. तुम्हाला काय हवे ते मागा , मी देतो. असे राजा म्हणतो. त्यावेळी संन्याशी , वरील श्लोक म्हणतो.  श्लोकाचा भावार्थ थोडक्यात असा -  

हे राजा , तू तुझ्या रेशमी वस्त्रांमध्ये खुश आहेस ,  तसा  मी वल्कले घालूनही संतुष्ट आहे.  संतुष्टीचा स्तर  दोघांमध्ये समानच आहे.  त्या संतुष्टीत काहीही भेद नाही. मग दरिद्री कोण ?  तर  ज्याची  हाव मोठी आहे तो.   आत्मतृप्त , आत्मसंतुष्ट , समाधानी व्यक्तींमध्ये  दरिद्री  वा श्रीमंत असा भेद  कसा  बरं असेल ? (कारण समाधानी वृत्ती  ही मनाची अवस्था आहे . )


वरील श्लोकात गरीबीची भलामण केलेली नाही , तसेच श्रीमंतीचा द्वेष केलेला नाही.

आजकाल ब्रँडेड वस्तु , हॉटेलिंग , शॉपिंग करणारी हायफाय जीवनशैली  वगैरे वगैरे असणे म्हणजे सुखी ,  प्रतिष्ठित समजतात.  पण दुर्दैवाने ,"समाधान, संतुष्टी" कोणत्याच मॉलमध्ये विकत मिळत नाही. भौतिक परिस्थिती काहीही असली तरी  मनातून समाधानी , संतृप्त असणे ही  दुर्लभ देणगी आहे. अर्थात , समाधानीवृत्ती  कष्टसाध्य सद्गुण आहे. 

श्रीमंत असो वा गरीब ;   समाधानी  व  निरोगी जीवन जगण्याचे सद्भाग्य विरळांच्याच नशिबी असते.    विकसित  , संपन्न देशात आजकाल satisfaction index मोजण्याचा प्रघात रूढ होत आहे.  भारतीय संस्कृती वा विचारसरणी पहिले पासूनच प्रगत होती , हेच वरील सुभाषित आपल्याला सांगते. नाही कां ? 

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

 



 

Sunday, April 10, 2022

सहजोक्त.

#राम राम . 

राम  शब्दात एक न्यारीच खुमारी आहे. 

त्रेता युगात झालेला राम  हा सर्व भारतीयांना आदर्शवत् राजा होता. मानवी मूल्ये , मर्यादा , पराक्रम  , व्यवस्थापन , नेतृत्व  आदी सर्व गुणांच्या समुच्चयाचे  एकत्र  मूर्त रूप म्हणजे  त्रेतायुगातील  सीताराम !   

त्रेतायुगातील रामाला आप्तांमुळे   वा परक्यांमुळे   अनेक संकंटांचा सामना करावा लागला होता.  प्रत्येक कसोटीच्या वेळी रामाचे धैर्य , विनम्रता , सातत्य , समाधानीवृत्ती आदी  गुण  अनुकरणीय आहेत . इतकेच  नाही तर संकट समयी  गुरुजन , मित्र वा स्नेहीजनांशी परामर्श करण्याचा , सांगितलेल्या मार्गावर चिकाटीने चालण्याचा  तसेच  सर्वांना घेऊन काम करण्याचा रामाचा स्वभाव म्हणजे सुसंस्कृत-यशस्वी व्यक्तिमत्वाचे  अनुसरणीय दर्शन होय . 

 विश्व विजेत्या बलवान रावणाशी  लढताना रामचे मनोधैर्य किंचित खचणं अगदी स्वाभाविक होते. त्यावेळी प्रत्यक्ष सूर्याने  देखिल त्याला प्रोत्सहित केले.

"राम राम महाबाहो 

शृणु गुह्यं सनातनम्।

येन सर्वानरीन् वत्स 

समरे विजयिष्यसि ॥"

 वेळोवेळी गुरुजनांचे मार्गदर्शन मिळणे  व त्याबरहुकूम  वागण्याची बुद्धी मिळणे , यासाठी देवाची कृपा जबरदस्त   हवीच हवी. 

 विष्णुचा अवतार राम  भारतीय संस्कृतीला भारतीयत्व प्रदान करतो , करत राहील. पण त्यासाठी प्रत्येक भारतीयाने स्वतःतील "राम" जपला पाहिजे.  "राम" समजून घेणे व रामत्व अंगी बाणणे या  प्रगत अवस्था आहेत. 

 

 फक्त त्रेतायुगातील रामच  "राम"  आहे , असे नाही. 

तर  राम म्हणजे  रमते इति ।  रम् + णः ।  किंवा  रम्यते अनेन इति । रम् + घञ्  ।  म्हणजे  मनोज्ञ > मनाला उमजणारा /रमवणारा  असा र‍ाम . 

 राष्ट्र , समाज , नातेसंबंध या सर्वांमध्ये रमता येणे , रममाण होणे म्हणजे खरे "राममय होणे"!   असा राम प्रत्येक मनात जिवंत राहिला तर  "यावच्चंद्रदिवारकौ" , आपण भारतीय  "सर्वेऽपि सुखिनः" होऊ यात शंका नाही.

जुन्या काळापेक्षाही आज अशी  रामोपासना करणे व्यष्टी  व समष्टी  दोहोंसाठी आवश्यक व अनिवार्य आहे.   शुद्ध पाण्याला दूषविण्यास थेंब भर गढूळ पाणी कारण ठरते. तद्वत् आपले भारतीयपण काही विखारी/विकारी मतांनी दूषित  होतात. 

 ते होऊ नयेत , यासाठी  रामदासांच्या शब्दांनुसार  रामालाच शरण जाणे इष्ट होय.

 

युक्ति नाही बुद्धि नाही। 

विद्या नाही विवंचिता॥

 नेणता भक्त मी तुझा।

  बुद्धी दे रघुनायका॥१॥


मन हे आवरेना की।

 वासना वावडे सदा॥ 

 कल्पना धावते सैरा। 

 बुद्धी दे रघुनायका॥२॥


बोलता चालता येना। 

कार्यभाग कळेचिना॥

 बहुत पीडिलो लोकी।

  बुद्धी दे रघुनायका॥३॥


तुझा मी टोणपा झालो। 

कष्टलो बहुतापरी॥

 सौख्य ते पाहता येत नाही। 

 बुद्धी दे रघुनायका॥४॥


नेटके लिहीता येना। 

वाचिता चुकतो सदा॥

 अर्थ तो सांगता येना।

  बुद्धी दे रघुनायका॥५॥


प्रसंग वेळ तर्केना।

 सुचेना दीर्घ सूचना॥

  मैत्रिकी राखता येना। 

  बुद्धी दे रघुनायका॥६॥


संसारी श्लाघ्यता नाही।

 सर्वहि लोक हासती॥

  वीसरु पडतो पोटी। 

  बुद्धी दे रघुनायका॥७॥


चित्त दुश्चित होता हे।

 ताळतंत्र कळेचिना॥ 

 आळसू लागला पाठी।

  बुद्धी दे रघुनायका॥८॥


कायावाचामनोभावे। 

तुझा मी म्हणवितसे॥

 हे लाज तुजला माझी। 

 बुद्धी दे रघुनायका॥९॥


आशा हे लागली मोठी।

 दयाळुवा दया करी॥

  आणीक नलगे काही।

   बुद्धी दे रघुनायका॥१०॥

   

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.


Saturday, March 19, 2022

सहजोक्त.

 #दंतकथा.

बुलबुलशा नावाचा बादशाह असतो. बादशाही पद्धतीने राज्य कारभार हाकत असतो. मनमर्जी , मनमौजी , मनस्वी असा बादशाह न् त्याचे झेलू सहकारी यांचे प्रचंड गुळपिठ असतं. 

प्रजेतील बुद्धिमान जनता , अलिप्त न्  जवळजवळ निष्क्रिय असते. सर्जनशील व उद्योगी जनला "दोन दे , चार काढ" , प्रकाराने राजाच्या सहकारीवर्गाशी जुळवून जगत असते. झुंडप्रिय न् सुकुमार बुद्धीची प्रजा  फसफसणाऱ्या फेसाप्रमाणे राजस्तुती करत असतात.   एकूण सर्व राजकारभार  आलबेल सुरळीत सुरु असतो.

एकदा बंडू नावाचा बारा-पंधरा वर्षाचा  मुलगा राजवाटिकेतील फुलं चोरताना पकडल्या जातो.  बादशाह समोर हाजीर केल्या जातो. बंडू पुजारी कुटुंबातील आहे , कळल्यावर बुलबुलशा आदेश देतो ,' पाच हजार फटके खा किंवा आमच्यावर काव्य लिही' . बंडू म्हणतो की , 'मला कविता नाही रचता येत' . त्यावर बादशाह म्हणतो ,  पंडिताच्या कुळात जन्मला तर कविता रचता आलीच पाहिजे' .  

 फटके खाण्यापेक्षा कविता जुळवून बघू , असा विचार करतो.  रचना करायला  वेळ द्या अशी विनवणी करतो.  बादशाह पण वेळ देतो.

  'ट' ला 'ट' ,  नि  'र' ला 'र' करत कसा बसा बंडू शब्द जुळणी करतो.  न् दरबारात म्हणतो. 

  दिसतो सगळी कडे सूर्यप्रकाशा

  आमचा बुलबुलशा बुलबुलशा  ॥ 

जिकडे  तिकडे सुखाची वर्षा

 आमचा बुलबुलशा बुलबुलशा ॥ 

 आता तरी येशील का रे पावसा

 आमचा बुलबुलशा बुलबुलशा ॥ 

 झाडाझुडांवर बहर खाशा

 आमचा बुलबुलशा बुलबुलशा ॥ 

 बंडू करी काव्य कसाबसा 

 आमचा बुलबुलशा  बुलबुलशा ॥ 

 कवितेत  अनेकदा आलेलं स्वतःचं नाव  ऐकून बुलबुलशा अतिशय खूश होतो. न् स्वतःच्या गळ्यातील नवरत्न हार  व वरतून हजार सुवर्णमुद्रा देऊन त्याचा सत्कार करतो. आणि पालखीतून त्याच्या घरी पोहचवून  देण्याचा  आदेश देतो.

 बंडूची आई अत्यंत खूश होतो. शेजारी एक महाविद्वान् पंडीत रहात असतो. त्याच्या पत्नीला बंडूच्या सत्काराची गोष्ट कळते. 'यथातथा बुद्धीचा बंडू इतकी कमाई करू शकतो तर माझ्या नवऱ्याची तर सुपिक बुद्धी व प्रचंड विद्वत्ता आहे. त्याला तर नक्किच अधिक मिळेल' , असा विचार करून ती  नवऱ्याच्या मागे लागते. 'पुस्तकं वाचन , ग्रंथलेखन सोडा. आजकाल कविता रचून जास्त मिळकत होते.  राजावर कविता रचा ना ! '  शेवटी तो विद्वान प्रौढ-शैलीत एक प्रदीर्घ काव्य रचतो.  नि राजदरबारात जातो.

 बादशाहा समोर स्वतःचे काव्य अस्खलित म्हणून दाखवतो.  बादशाह  ते काव्य ऐकतो. अर्थात काव्य समजण्याची ना बादशाहाची पात्रता असते ना दरबाऱ्यांची !  बादशाह  त्या विद्वानाच्या काव्याची यथेच्छ निंद‍ा करतो , 'म्हणतो इतक्या शंभर ओळींमध्ये फक्त एकदाच , तेही  शेवटी आमच्या नावाचा उल्लेख आला. हे काय काव्य आहे कां ? यापेक्षा तर बंडूचे  काव्य कितीतरी सरस आहे.'  आणि त्या विद्वानाला शंभर फटक्यांची शिक्षा सुनावतो. 

 तर असा असतो बादशाही न्याय ! 

 #तात्पर्य ? अर्थात तुमच्या अनुभवाने , कल्पनेने सुचवाल तेच ! 

 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

 

 


Wednesday, March 2, 2022

#सहजोक्त.


 सावनेर-काटोल रस्त्यावर माझं माहेर म्हणजे लोहगड नावाचं छोटं खेडेगाव आहे. आजपासून  चाळीस-पंचेचाळीस वर्षे आधी केवळ नऊशे लेकसंख्येचे आदिवासीबहुल ,कृषिसंपन्न असं ते गाव होतं. सांस्कृतिक व नैसर्गिक  दृष्ट्या श्रीमंत असं गाव आजही स्मरणात आहे.

 दिवाळीच्या पाडव्या नंतर गावातील  समूह  पंचक्रोशीत गायी नाचवत फिरायचे . सोबत किसनाचे सोंग असायचे. (म्हणजे त्यांच्यातील एक जण कृष्णाच्या वेषात असायचा. )  गावाच्या बोलीभाषेतील अनेक गाणे म्हणत , बासरी वाजवत ती मंडळी  गावोगावी फिरायची. 

 गावात गोधन विपुल प्रमाणात होते. डोंगरावर न् माळरानात हिरवा चारा होता. तेव्हा टिव्ही ,मोबाईल वगैरे नसल्याने आम्हा मुलांजवळ वेळच वेळ असायचा. आई-मंडळीही  भरपूर कामांमध्ये गुंतायला मोकळ्या असायच्या. वडिलमंडळी शेतात जायची. 

 त्याच काळात जवळच्या खेडेगावातून  एक वृद्ध जोडपं आमच्या गावात वरचेवर यायचे. त्या आजी अतिशय सुरुकुतल्या चेहराच्या न् दोरी लावलेला चष्मा असलेल्या होत्या. आजोबा अंध होते.  दोघांनाही दात नव्हते . त्यामुळे त्यांचे उच्चारण जरासे तोतडे होते. आजोबांच्या एका हातात काठी न् एक हात आजीच्या हाती असाचा.  एक फुटकं ढोबर (भांडं)  , कपड्याची वळकटी , टाळ न् चिपळ्या इतके साहित्य त्यांच्या जवळ असायचे. 

 गावात आल्यावर हे जोडपे  घरोघरी जाऊन भजन ऐकवायचे न् मंडळी खुश होऊन जेवण , शिधा-आटा , चिल्लर पैसे या आजी-आजोबांना द्यायचे. 

 हे आजी-आजोबा एका सुरात व लयीत  एकच लोकगीत (कारण रचनाकार माहीत नाही) म्हणायचे.  तेव्हा त्या गाण्याचा अर्थ कळायचा नाही. पण या आजी-आजोबांच्या गळ्यातील गोडवा न् आर्तता नक्कीच जाणवायची.  बालसुलभ अनुकरणातून आम्ही ते गाणं तसंच गुणगुणायचो. तेव्हा जर सोशल मिडिया असता तर आजी-आजोबांचं गाणं मिलेनियम हीट झालं असतं , हे नक्कीच.

 

ऱ्हायबा किशना धली या टाली

आमी नाय येत तुया संग ले बा ॥धृ॥

कोन्याक दिवशी येशोदा मायनं

 केल्या व्होत्या पुरनपोल्या

 साऱ्यायला दिल्या दोनदोन पोल्या 

 न् मलेच काऊन बा येकच  बा ॥१॥

 [प्रमाण भाषेत >>  पेंद्या कृष्णाला तक्रार करतोय .

  राहू दे  बा , असू दे बाबा  कृष्णा

  धर वा टाळ  पण 

  मी तुझ्या सह आता येतच नाही.

  कोण्या एका दिवशी  (कधीतरी)  यशोदा आईनी  पुरणाच्या पोळ्या केल्या होत्या 

  सगळ्यांना दोन दोन पोळ्या दिल्या  खायला 

  न् मला मात्र एकच दिली. ] 

  

  आजही डोळ्यासमोर ते  दोघे गातानाचे दृष्य जसेच्या तसे उभे राहते. पण नेमकं  चिपळी-टाळाच्या तालावर  गायलेलं ते भजन पूर्ण आठवत नाहीय. 

जसं कानावर पडायचे तसं ते भजन  जितकं आठवतय ते इथं लिहितेय. 

जर कोणाला ते भजन पूर्ण येत असेल तर कृपया मला कळवावे. 

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.


Friday, January 28, 2022

#सहजोक्त.

 

 संवाद.

 लेकरू  = झोपू दे ना आई अजून फक्त पाच मिनिटे ।

आई = पाऊण तासापासून सरली नाही पाच मिनिटे॥ १॥

ले = बघ जरा खिडकीत अजून अंधार दाटलेला।

आ = चाहूल ऐक किलबिलाटाची , उठले पक्षी मुला ॥ २॥

ले = अशी ग काय करते , बघ ना तो सूर्य पेंगुळलाय ।

आ = उगवून सुद्धा या धुक्यांनी बघ त्याला  दडवलाय  ॥ ३॥

ले = त्याची आई बघ किती छान रेंगाळूदेते त्याला ।

आ = नियमिततेचे दुसरे नाव म्हणतात दिनकर त्याला ॥ ૪॥

ले =  वेलींवरच्या कळ्याही अजून उमललेल्या नाही ।

आ=  त्यांच्या मागे कुठे असते कामाधामाची घाई ?॥  ५॥

ले=  शाळासुद्धा नाही अगं , अॉनलाईन क्लास सारा ।

आ = लवकर तयार होऊन , फुलांनी  देवपूजा कर जरा ॥ ६॥

ले = मित्रांसंगे खेळायलाही नाही म्हणते मला । 

आ=  मदत कर ना घरातील कामामध्ये मला॥ ७॥

ले = तीच कामे , तेच रुटिन, आता  कंटाळलो बुवा ।

आ= सूर्यानेही असेच म्हटले काय होईल बाबा ? ८॥

ले=  नियमित रहाणं कां गं इतकं जरुरी असावे ?

आ=  निसर्गाचे घटक आपण , निसर्गनियमित रहावे ॥ ९॥

आ =  निसर्गासम नित्यनूतन जगावे सर्जक होऊन ।

ले =  करतो नक्की चांगली सुरुवात आजपासून ॥ १०॥

आ=  शहाणं माझं बाळ ते सद्गुणी तेजस्वी सूर्य ।

आ=  सातत्य नियमितता हेच चिरंतन यशाचे गुह्य ॥ ११ ॥

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

 

 

 















#सहजोक्त.

.

शब्दकळा.

 शब्द निर्मिती  हा  भाषेचा स्वतंत्र आयाम  आहे.  बऱ्याचशा भारतीय भाषा भाषाशास्त्रीय दृष्ट्या  संस्कृतोद्भव आहेत  , यात शंका नाही.  संस्कृतातून जशेच्या तसे (अर्थासह) घेतलेले शब्द म्हणजे तत्सम शब्द होय. तर बदल होऊन तयार झालेले शब्द तद्भव म्हटल्या जातात. 

 शब्दांच्या मूळात शिरण्याची  व शब्दनिर्मिती प्रक्रिया जाणून घेण्याची संस्कृतभाषेची प्रवृत्ती आहे. हीच प्रवृत्ती विविध ग्रंथांतून प्रकट होत विकसित झालेली आहे.  व्याकरणशास्त्र , निरुक्त ,  छंदशास्त्र , न्यायशास्त्र, वाक्यपदीयम्  वगैरे मूळ व मौलिक ग्रंथ त्याचेच प्रमाण आहेत. 

ज्या प्रमाणे नवा जीव हा त्याच्या मातृ-पितृकुळातील सात पिढ्यांपैकी कोणाचे तरी गुणसूत्र घेतो. त्याप्रमाणे आजच्या भारतीय भाषासुद्धा संस्कृतसह त्या त्या काळातील प्राकृतादी भाषांच्या सरमिसळीतून तयार  झालेल्या असू शकतात.  भाषेचा उद्गम व विकास मोठा रंजक असतो.

सद्यकालीन मराठीभाषा  ही स्वतंत्र भाषा आहे. प्राचीन वाङ्मयीन साहित्यापासून  आजच्या दैनंदिन मराठीभाषेपर्यंतचा  प्रवास अभ्यासणे नक्कीच भाषाशास्त्रीय दृष्ट्या  रोचक ठरते .

मराठीभाषेच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे  तिचे  शब्द.  काही मराठी शब्दांचे मूळ शोधताना संस्कृतच्या व्याकरण , निरुक्त  वगैरेंचा उपयोग होतो. संस्कृतशब्दांशी पूर्णपणे साधर्म्य बाळगणारे काही मराठी शब्द कधी कधी  वेगळ्याच अर्थाचे वा रचनेचे दिसतात. शब्द निर्मिती करण्याची मराठी प्रवृत्ती अनेकदा बुचकळ्यात पाडते. 

उदाहरणार्थ काही शब्द बघा. 

 घोर , अघोरी  , अहिल्या , अनुसया , परोक्ष , अपरोक्ष ,  प्रगट    वगैरे  वगैरे. 

 आता या शब्दांविषयी जाणून घेऊ .

 घोर => मराठीत हा शब्द अनेकदा , अनेक संदर्भात वापरतात. जसे घनघोर वर्षाव , घोर अन्याय. घोर अंधार . घोर लागून राहणे. बिनघोर झोपणे .  वगैरे  वगैरे. घोर  या शब्दाचा अर्थ  भयानक , भयंकर  . संस्कृतनुसार घाताला किंवा मराला कारण असलेला म्हणजे  घोर. 

 अघोरी =>   घोरच्या विरुद्ध म्हणजे अघोर.  संस्कृतनुसार  अघोरी शब्दाचा अर्थ  सौम्य , भीतिदायक नसलेला , असा होतो. पण  अधोरीबाबा , अघोरीकृत्य , अघोरी उपाय , अघोर तंत्र वगैरेने या शब्दाला  मराठीत मात्र भयंकर केलं आहे. आणि अशा प्रकारे विशिष्ट संदर्भात घोर व अघोर  मराठीत समानार्थक ठरले.

 अहिल्या , अनुसया , प्रगट  =  

  हल म्हणजे नांगर . अहल्या  म्हणजे  नांगरणी न झालेली जमीन . 

  असूया म्हणजे 'जेलसी',  नजर , जळणं द्वेष वगैरे. अन् +असूया म्हणजे अनसूया म्हणजेच जिला द्वेष नाही ती. 

   मूळात  कट् हा धातू  गतिवाचक आहे . प्रकट म्हणजे स्पष्ट .

   संस्कृतच्या मूळ सार्थ शब्दांना मराठी  अशी वळवून बदलते ना  की मूळ शब्द सांगितला तरी  तो  बरोबर वाटेनासा होतो , नाही कां ? 

   परोक्ष , अपरोक्ष =   संस्कृतमध्ये (अक्ष्णोः परम् = परोक्षम् । अप्रत्यक्षम् ।  असाक्षात् ।) दृष्टीच्या पलीकडचे म्हणजे परोक्ष होय.  तर  अपरोक्ष म्हणजे नजरे समोर घडलेले.  पण हे शब्द वापरण्यातही  मराठीची बातच न्यारी !

म्हणजे मराठीतील शब्द चूक आहेत , असं म्हणायचे कां ? तर नाही. भाषेचा गुणधर्म प्रवाही असणे असा असतो.

संस्कृतच्या शास्त्रशुद्धरूपांना मराठीने आपलंसं करीत मरठमोळं केलं.  नातवंडं/पणतवंडं आपल्या आजी/पणजीचे काही काही गुण घेतात , सर्वच गुण घेत नाहीत. तसेच  काहीसे आधुनिक  भारतीय भाषांचे आहे. संस्कृतशी साधर्म्य बाळगत आपलं विशिष्ट हळूच खुलवतात या भाषा.

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.


   

Monday, January 17, 2022

#सहजोक्त.

 #माफीवीर ? होय माफीवीरच !

 शब्द कसे तयार होतात ? हे न समजल्याने अनेक शब्द अनर्थक ठरतात. उदाहरणार्थ हाच बघा ना ; माफीवीर  शब्द ! 

 मूळ अरबी भाषक असलेला मुआफ़  हा शब्द , हिंदीत - "छोड़ा गया, मुक्त किया गया, क्षमा किया गया ,मुक्त, आज़ाद" , या अर्थाने आहे.  मुआफ चे माफ होऊन मराठीकरण झाले.   म्हणजे हा शब्द "परकीय" प्रकारातील आहे.    


वीर  हा शब्द मात्र संस्कृत आहे . मराठीत तो तत्सम  प्रकारातील शब्द  ठरतो. वीर या शब्दाची  व्युत्पत्ती अशी

(वीरयतीति ।  वीर विक्रान्तौ + पचाद्यच् ।  

यद्वा   विशेषेण ईरयति दूरीकरोति शत्रून् ।  

वि + ईर + इगुपधात् कः । 

 यद्वा  अजति क्षिपति शत्रून् । 

 अज + स्फायितञ्चीत्या दिनारक् ।  अजेर्व्वीः । )  शौर्य्यविशिष्टः ।  तत्पर्य्यायः ।  शूरः २ विक्रान्तः ३ ।  इत्यमरः ।  २ ।  ८ । ७७

अर्थात  जो शत्रूंना विशेषत्वाने दूर करतो   , तो  वीर.  

संस्कृतकुलातील भाषांच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे सामासिक शब्द तयार करण्याची वृत्ती. दोन वा अनेक अर्थपूर्ण शब्द  एकत्र येऊन सामासिक शब्द  निर्माण होतो.

 या सामसिक शब्दांना विशेष अर्थ असतो. उदा. "चंद्रमुखी" हा सामासिक शब्द चंद्र  व मुख या दोन अर्थपूर्ण शब्दांपासून निर्माण झाला.

 पण त्याचा अर्थ चंद्रासम मुख असलेली ती सुंदरी , असा होतो. 

सामासिक शब्द व समासाचा विग्रह  करायला भाषेच्या मूळप्रवृत्तीची जाण असायला हवी.   

नाही तर    "अर्धवट ज्ञान......." अशी अवस्था होते.

 माफी शब्द माफ याच शब्दापासून आहे.

  माफी  म्हणजे क्षमा.

 वीर शब्दाचा अर्थ - विक्रांत , शूर , शत्रूंना संपवणारा - असा होतो.  

  या दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून, उथळपणे कुठल्याशा विद्वेषातून , 'माफीवीर',  हा सामासिकशब्द घाईने तयार केल्या गेला. 

 न् "माफी मागणारा वीर" असा त्याचा अर्थही तितक्याच  निर्बुद्धपणे सर्वत्र पसरल्या गेला.   

 जराशी तर्कशक्ती वापरली तरी लक्षात  येईल की  वीर असणारा व्यक्ती माफी कां मागेल ?   माफी मागेल तर तो  वीर  कसा असेल ?  

 माफी म्हणजे क्षमा . "क्षमा वीरस्य भूषणम् ।"   

 कवी रहीम म्हणतात ,

 "क्षमा बड़न को चाहिए, छोटन को उत्पात।  रहीम हरी का घट्यो, जो भृगु मारी लात।।" 

 क्षमा करणे , हा महापुरुषांचा गुणधर्म आहे.  माफीवीर या सामासिक शब्दाचा अर्थपूर्ण विग्रह , "सर्वांना माफी देणारा (क्षमा करणारा) वीर ", असाच  होतो.  

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे काव्य म्हणजे प्रतिभा व खडतर वास्तव यांच्या सर्जनातून जन्मलेले शब्दबद्ध अनुभव आहेत. 

 पुढील कविता वाचा.


कीं घेतले व्रत न हे अम्ही अन्धतेने 

लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्गमाने 

जे दिव्य-दाहक म्हणोनी असावयाचे 

बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे ll ९ ll

हे मातृभूमि तुजला मन वाहियेले  

वक्तृत्व वाक्-विभव ही तुज अर्पियेले 

तुंतेंची अर्पिली नवी कविता वधूला 

लेखां प्रति विषय तूची अनन्य झाला ll १६ ll

त्वत्-स्थंडिले ढकलिले प्रिय मित्र-संघा 

केलें स्वये दहन यौवन देह-भोगा 

त्वत्कार्य नैतिक सुसंमत सर्व देवा 

तत्सेवनीच गमली रघुवीर सेवा ll १७ ll

त्वत्-स्थंडिली ढकलली गृह-वित्त-मत्ता 

दावानालात वहिनी नव-पुत्र-कांता 

त्वत्-स्थंडिली अतुल-धैर्यनिष्ठ बंधू 

केला हवि परम कारुण पुण्यसिंधू ll १८ ll

त्वत्-स्थंडिला वरी बळी प्रिय बाळ झाला 

त्वत्-स्थंडिला वरी अता मम देह ठेला  

हे काय बंधू असतो जरी सात आम्ही 

त्वत्-स्थंडिलीच असते दिधले बळी मी ll १९ ll

संतान ह्या भारतभूमिस तीस कोटि 

जे मातृभक्ति सज्जन धन्य होती 

हे आपुले कुल ही तय मध्ये ईश्वरांश  

निर्वंश होउनी ठरेल अखंड वंश ll  २० ll

कीं ते ठरों ही अथवा न ठरो परंतु 

हें मातृभू अम्ही असो परिपूर्ण हेतु 

दीप्तानलात निज मातृ-विमोचनार्थ   

हा स्वार्थ जाळुनि अम्ही ठरलो कृतार्थ ll २१ ll


  सूर्याच्या प्रखरतेला दिवाभीत जाणू शकत नाही व सहनही करू शकत नाही .  

ती  दिवाभीताची लायकी  असते. 

स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे  स्वातंत्र्यसूर्य होय ; ज्याच्या मनातून, भावनांमधून  , कृतीतून  केवळ  देशभक्ती  प्रसवते .  

 केवळ सावरकरच   ह्या असल्या निकृष्ट दर्जाच्या (सडक्या)  विचार-कृतींना माफ करू शकतात.  कारण  कुजके असले तरी  ते विचार व  त्या कृती  भारतीयांच्या  आहेत .  

आणि भारतमाता ही सावरकरांची श्रेयस व प्रेयस सर्वस्व आहे!  तर  माफीवीर म्हणजे बाष्कळ , दर्जाहीन कृती-विचारांना माफ करणारा  शूरवीर . 

  

   आजकाल कोर्टाचा बडगा आला की माफी मागायची   न् परत  चुकीचे वागायचे , अशी फॅशनच आली आहे. आदमखोर, नशाखोर, रिश्वतखोर, हरामखोर  , दंगलखोर , दरोडेखोर  वगैरे सारखा माफीखोर हा शब्द

 या नव-जमातीला  शोभून दिसतो.

   दुखावलेल्या सावरकरवादींनी  अशांना माफीवीर म्हणून  शब्दाचा दुरुपयोग करू नये .     

   

   तर माफीवीर  व माफीखोर यात सामासिक विग्रहाचा तसेच  वैचारिक सिद्धांताचा फरक असून या शब्दांची  गल्लत करू नये. 

   ©डॉ. प्रज्ञा देशपांडे

   नागपूर 



 

Tuesday, January 11, 2022

 सहजोक्त.


फळे मधुर खावया , असती नित्य मेवे तसे ।

हिरे-जडित-सुंदरी कनक-पंजरीही वसे ॥

अहर्निश तथापि तो शुक मनात दुःखे झुरे।

स्वतंत्र-वन-वृत्तीच्या घडी घडी सुखाते स्मरे ॥

कृष्णशास्त्री चिपळूणकरांची पृथ्वी वृत्तातील  ही अन्योक्ती.  जुने लोकं , जुने तत्त्व न् जुने विचार ! 

आता काळ बदलला . समाजमान्यता बदलल्या. 

आता या शुकान्योक्तीला  बदलावेच लागेल ना ?  "कष्टाची भाकरी" फक्त कथेतच छान..   चिपळूणकर शास्त्रींची क्षमा मागून  नव-अन्योक्ती रचते आहे.


फळे मधुर खावया , असती नित्य मेवे तसे ।

हिरे-जडित-सुंदरी कनक-पंजरीही वसे ॥

अहर्निश सुखासनी शुक मजेत ऐदी फिरे ।

स्वतंत्र-वन-वृत्तीला कधीहि तो पुन्हा ना स्मरे ॥


©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Monday, January 10, 2022

सहजोक्त.

 पञ्चकन्या !

 अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा ।

पञ्चकं ना स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।।

हा श्लोक अतिशय प्रसिद्ध आहे. 

या श्लोकाचे अनेक  पाठभेद प्रचलित आहे. "पञ्चकन्याः स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।" असाही श्लोकार्ध प्रसिद्ध आहे. या श्लोकात पाच स्त्रियांची नामे आहेत म्हणून पाचकन्या असा शब्द श्लोकात  असावा असा समज होतो.  पण संस्कृतमध्ये "कन्या" कोणाला म्हणावे यावर विचार केला आहे.   जी दशवर्षिया कुवारी  असते ती कन्या.  

(कन् दीप्तौ + अघ्न्यादित्वात् यक् इत्युणादौ ४ । १११ । कन्यायाः कनीन् चेति निर्द्देशात्  पाणिनिमतानुसारेण न ङीष् अतष्टाप् ।) कुमारी । इत्यमरः ॥ २ । ६ । ८ । सा तु दशमवर्षीया । इति स्मृतिः ॥ (यथा महाभारते     वनपर्ब्बणि । “यस्मात् कामयते सर्व्वान् कमेर्धातोश्च भाविनि ! । तस्मात् कन्येह सुश्रोणि ! स्वतन्त्रा बरवर्णिनि !” ॥) 

वरील श्लोकात उल्लेखलेल्या सर्व महिला विवाहिता असून त्या कन्या नक्कीच नाहीत. 

श्लोकात "पंचकं" असा शब्द जास्त अर्थवाही आहे. पंचक म्हणजे पाचांचा समुद‍ाय. श्लोकात ज्या पाचांचा उल्लेख आहेत , त्यात विविध कुलातील महिला आहेत. 

जसे 

अहल्या =  ही  मेनका-भद्राश्व राजा यांची कन्या व ऋषिपत्नी होती.   द्रौपदी= याज्ञसेनी  ही  द्रुपदराजाला यज्ञातून लाभलेली तेजस्वी कन्या होती. सीता = ही जनकराजाने सांभाळलेली  भूमिकन्या होती. 

तारा =  ही वानरकुलातील होती.   मंदोदरी= ही ऋषी काश्यप यांचा पुत्र मयासुर व अप्सरा हेमा यांची  कन्या होती.   

या श्लोकात  जो "ना" शब्द दिसत आहे  तो   नृ (मानव) या मूळ शब्दाचे प्रथमेचे एकवचन आहे.  "पञ्चकं ना स्मरेत् नित्यम्"  या  वाक्याचा अर्थ असा की ,

" या पाचांच्या समूहाला मानवाने नेहमी स्मरावे".  

 मनात एखादी विकृती येणे वा   समाजमान्य वागणुकीनुसार चुकीचे वर्तन घडणे  ,  एखाद्या  व्यक्तीकडून    घडू शकते.  ही  मानवी प्रकृती आहे.   मानवी मन , बुद्धी  व वर्तन कधी कधी समीक्षेबाहेर असू  शकते.  अशा वेळी त्या व्यक्तीला (१)  परत  चुकीच्या मार्गावर न ढकलता , 

 किंवा (२) चुकीचे समर्थन करायला भाग न पाडता, 

  किंवा (३)  चुकीचे गौरवीकरण न करता ,

   किंवा (૪)  चुकीमुळे आयुष्यातून न उठवता  , 

    सामान्य व्यक्ती म्हणून जगण्यास बळ देणे ;  ही खरी  संस्कृती .

 वरील सर्व स्त्रियांचे उदाहरणं आपल्याला हाच दाखला देतात. वरील महिला  मोहाने , अज्ञानाने , अगतिकतेने , सूडभावनेने वा  समाजबंधनाने पतित झाल्या.  तरीही  त्यांच्या स्पष्ट , दंभहीन व  निखळ वागणुकीमुळे समाजाला  त्या वंदनीय  झाल्या.

  हा श्लोक  केवळ मानवी भावभावनांचे व्यवस्थापन कसे करावे ? यासाठी आहे कां ?  नाही.  हा श्लोक दुसराही महत्त्वाचा संदेश देतो. 

  

  माती हा अत्यंत महत्त्वाचा पण नेहमीच दुर्लक्षित राहिलेला स्त्रोत आहे. या घटकाकडे जगभरातील लोकांचे लक्ष वेधणे तसेच मातीच्या संवर्धनाची असलेली गरज याबाबत जनजागृती करणेसाठी 5 डिसेंबर हा 'जागतिक मृदा दिन' म्हणून साजरा करण्यात येतो.

हा श्लोक जमिनीचे संवर्धन व व्यवस्थापन नि  उत्पादकता  कशी  वाढवावी ?  या विषयीचाही आहे.

  अहल्या = म्हणजे ज्या जमिनीवर कधीच "हल" (नांगर) चालवला नाही. म्हणजे जंगलातील , न कसलेली जमीन.

  द्रौपदी = दुबार पेरणी करण्याजोगी सुपिक जमीन.

  सीता = पांढरी माती असलेली भूमी.

  पांढरी माती काही जुन्या लोकांच्या मतानुसार ही पूर्णपणे नैसर्गिक माती आहे. यात कुठल्याही घटकाच मिश्रण नाही. किंवा कुठलेही घटक एकत्र करून ही माती बनवली गेलेली नाही. ही माती बहुधा राजस्थान, हरीयाणा, पंजाब या भागात आढळते. पूर्वी वाडे, गढी बांधण्यासाठी वापरली जायची .

  तारा = म्हणजे पानथळ जमीन  जिच्यात आकाशातील तारामंडळ प्रतिबिंबित होते.

  भूगर्भातील पाण्याचे पुनर्भरण करण्याचे काम या पाणथळ जमीनी करतात. पाणथळ जागी वाढणाऱ्या वनस्पती या प्रदूषित पाणी आणि इतर हानीकारक घटकांना गाळण्याचे काम करून पाणी शुद्धा करतात. अलिकडच्या काळात असेही आढळून आले आहे की पाणथळ प्रदेशात वाढणाऱ्या काही वनस्पतींच्या मुळांपासून थेट वीजनिर्मितीही करता येते. भातखाचरे आणि मत्स्यबीज उत्पादनासाठी बनवलेली तळी हे देखील पाणथळ प्रदेशातच समाविष्ट होत असल्याने त्यातून जगभरातील लोकांना त्यांचे दररोजचे अन्न खायला मिळते.

  मंदोदरी =  नांगर न चालवताही ,  न कसताही  भरपूर उत्पादन देणारी  मऊ , भुसभुशीत  व  सुपिक  जमीन .  

आरोग्यदायक माती हा आरोग्यदायक अन्न निर्मितीचा पाया आहे. विविध पिके आणि शेती यांचा पाया माती आहे. अन्नधान्याच्या 90 टक्के गरजा मातीद्वारेपूर्ण होतात.                  जंगले वाढविण्यासाठी मातीचीच आवश्यकता असते. पृथ्वीचा एक चतुर्थांश भाग विविध जीवांनी व्यापला असून ही जैव विविधता टिकवून ठेवण्यात मातीचा मोलाचा वाटा आहे. मातीमध्ये पाणी अडविण्याची, साठविण्याची आणि शुद्ध करण्याची क्षमता आहे. माती अमूल्य आहे. अन्न, वस्त्र व निवारा या आपल्या मूलभूत गरजा मातीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आधुनिक युगात मातीविना शेती यासारख्या संकल्पना उदयास आल्या असल्या तरी जगातील महाकाय लोकसंख्येचे पोट भरण्याचे सामर्थ्य यामध्ये नाही. या सर्व बाबींचा सूक्ष्म विचार करून सहज व्यवहारात त्याचा उपयोग करून घेण्याची हातोटी हीच आपल्या भारतीय संस्कृतीची महती आहे.

वरील श्लोक म्हणूनच प्रत्येकाने मनन व चिंतन करून  आचरणात आणावा , हेच संस्कृतिरक्षण होय.

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.