Friday, March 24, 2017

#सहजोक्त.......


#सहजोक्त......
कथाकथन ,एक सुंदर कला. कथाकथनातून सहज संस्कार होतात. इतक्यात वेगवेगळ्या संदर्भात दोन सत्यकथा ऐकल्या.  मला खूप आवडल्या.
 पहिली कथा अशी आहे थोडक्यात...

मनोहर.पर्रिकरांच्या लहानपणी गावातील श्रीमंत शेतकरी, गावकरी मुलांसाठी त्याच्याच शेतात फुकट टरबूज खाण्यची स्पर्धा दरवर्षी घेत असतो. अट एकच की बिया तेथेच टाकाव्यात. दरवर्षी मुले आनंदाने भाग घेत असतात. पुढे तो शेतकरी मरण पावतो. त्याचे वारस ही प्रथा पुढे सुरु ठेवतात.काही काळानंतर त्यांची टरबूजाची शेती नष्ट होते. शोध घेतल्यावर कळते की आजोबा मुलांना खाऊ घालायला उत्तम-रसदार टरबुजे काढत असत.

 पुढे पुढे त्यांच्या वारसांनी परंपरेचे कर्मकांड जपले पण त्यांना वर्म कळले नाही. त्यामुळे "गावाला फुकट वाटायचे " या भावनेतून निकृष्ट टरबुजे देत असत. त्यांच्याच बिया तिथे पडत. वाण तसे फळ. पुढे पुढे फलसंधारण न करू शकणारी वाण आले नि टरबूज शेती बसली.
 ही एक कथा .आता दुसरी कथा पुढे...

 नागपुरच्या *मॉरिस कॉलेजचे*(आताचे वसंतराव नाईक समाजविज्ञान संस्था) प्रथम भारतीय प्राचार्य़  श्री. ताम्हण होते. त्यांची कथा अशी ,की ते  दीक्षित गुरुजी -प्रख्यात वैयाकरणी(व्याकरणज्ञ)- यांचे शिष्य होते. पुढे पारंपारिक वेदाध्ययनाने वृत्ती मिळणार नाही .असे लक्षात आल्यावर ते कलकत्ता येथे शिकण्यासाठी गेले.तेथे एम्ए सुवर्णपदक प्राप्त करून नागपुरला परतले.
त्यावेळी  मॅट्रिक होणे कठीण तेथे हे पदव्युत्तर शिक्षण तेही सुवर्णपदकासह प्राप्त करून आले होते. तत्कालीन समाजात सगळीकडे त्यांचे फार कौतुक झाले होते.
अतिशय आनंदाने ते आपल्या गुरुच्या दर्शनाला गेले. त्यांना अभिमानाने सांगितले की,' मी पहिला अालोय'. गुरुने कौतुकाने विचारले ",होय रे . काय होती परीक्षा?" ह्यांनी सांगितले की दहापैकी आठ प्रश्न लिहायचे होते. मला १०० पैकी ९८ गुण मिळाले ."(हा कलकत्ता विद्यापीठाचा तेव्हाचा उच्चांक होता ) जस्सं दीक्षित गुरुजींनी ऐकले तस्से ते आपल्या प्राचार्य झालेल्या शिष्याला अोरडले ,"अरे पूर्ण लिहिलेही नाही, वर दोन गुण कमी आहेत नि कोण्या गाढवाने तुला उत्तीर्ण केले ?" त्याकाळी उत्तीर्ण म्हणजे १००%  परिपूर्ण अशीच मान्यता होती.


दोन सत्यकथा ............आजची शिक्षणक्षेत्राची  व्यथा ???आज ३५% म्हणजे पास म्हणजेच ६५ % नापास, अशी अवस्था आहे, मग गुणवत्तेची काय कथा ? गुण 'मार्क' करायचे की आत्मसात हे ठरवावे ना प्रत्येकाने !

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Thursday, March 23, 2017

माणसाला जीवन जगण्यासाठी काय लागते ? निस्संशयपणे----अपूर्णता , अज्ञान,गैरसमज,स्वप्न------हेच खरे आहे.  स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा ,गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा.-----कित्तेकदा हे गाणे ऐकले अन् अचानक अर्थ गवसला , की मानवी सुखाची परिसीमा अपूर्णता,अज्ञान,गैरसमज,स्वप्न यातच सामावलेली आहे.
             अपूर्णता हीच पूर्णता
मानवी जीवनात एवढेच कशाला संपूर्ण विश्वात अपूर्णते एवढे पूर्ण काहीही नाही.निसर्गाने सृष्टीतील कोणताही जीव परिपूर्ण बनविलेला नाही . जीवसृष्टी स्त्रीलिंगी,पुल्लिंगी यात विभागलीय. जेथे उभयलिंगी वा नपुंसकलिंगी जीव आहे तेथे अपरिहार्यपणे पूर्णत्व आहे असे म्हणू शकतो.पण उत्क्रांत होताना उभयलिंगी जीव अल्पतर होत गेले . म्हणजे पूर्णत्वापासून अपूर्णत्वाकडेच वाटचाल दिसतेय.          
असे म्हणतात कि मानवीमेंदू 1/6 टक्केच कार्यरत असतो.म्हणजे अपूर्णमेंदुच मानवीजीवन चालवतो.आजवर कोणत्याही मानवाने 100 टक्के मेंदूचा वापर करून जीवन व्यतीत केलेय असे सिद्ध झाले नाही.जगद्विख्यात नोबेल पारितोषिकविजेते भौतिकशास्त्रज्ञ आईनस्टाईन म्हणतात,माझ्या कार्यक्षम मेंदूचा फक्त 25 टक्के उपयोग मला करता आला.म्हणजे अपूर्णता जीवनसाफल्याची पूर्णता होय. अपूर्णतेमुळेच एक जीव दुस-या जीवाचा आसरा,सहारा घेत असतो.एक प्रजाती   दुस-या प्रजातीला पूरक ठरते म्हणजे कोणताच जीव परिपूर्ण नाही हेच खरे.         दुनियेत आढळणारी विविधता,जैवविविधता ही अपूर्णतांची विविधरूपे वा आविष्कार नव्हेत का?गुलाबाला सुगंध,रंग दिला पण काटेही दिले. मोग-याला रंग नाही,विड्याच्या पानाच्या वेलीला(नागवेलीला) फुले नाहीत ,चंदनाला फळे नाहीत,हत्तीला चपळता नाही ,सशाला शिंग नाही,हरिणाला भारदस्तपणा नाही, मोराला आवाज नाही,कोकिऴेला रूप नाही;खरंच अपूर्णतेमुऴे सृष्टी किती परिपूर्ण,उपयुक्त,मोहक,रमणीय झालीय ना। पूर्णता असती तर दुस-या कशाचीही गरजच नसती ना।    
फूल उमलते,भुंगे येतात,परागकण त्यांच्या पायाला लागतात.भुंगे इकडून तिकडे मधासाठी फिरतात,त्यांच्या फिरण्याने परागकण या फुलांवरून त्या फुलांवर जातात.फुलांची फळे होतात.फळे पिकतात.पक्षी येतात.ते खातात.बिया जमिनीवर पडतात .ऊन्ह-पावसाने त्या रुजतात.त्यातल्या काही जगतात,त्यांची झाडे होतात.पुन्हा फूले,पुन्हा फळे-------अशाप्रकारे या निसर्गचक्रामध्ये नुसते झाड स्वतःला पुन्हा पुन्हा रुजवू शकत नाही,त्यासाठी भुंगा,पक्षी,प्राणी,सूर्यप्रकाश,जमीन,  पाणी,वारा हवेतच.कोणीही स्वयंपूर्ण नाही.म्हणूनच तर विविधतेने नटलेल्या या सृष्टीत रमणीयता आहे.
मानवी जीवन तर अतिशय अपूर्ण असल्यामुऴेच कुटुंब,समाज,राष्ट्र इत्यादिंच्या मदतीने त्याचे जीवन पूर्ण होते.
अपूर्णता हीच खरी पूर्णता होय ,नाही का?

     अज्ञान हेच मोठे ज्ञान आहे ।
असे म्हणतात कि,अज्ञानात सुख आहे.तिस-या टप्प्यात पोहचलेल्या दुर्धर आजाराने व्यक्तीला त्याच्या आजाराचे खरे ज्ञान झाले असेल तर उमेद खचून तो वेळे आधीच मरण पावतो.हेच त्याला आजाराबद्दल पहिलेपासून अज्ञानी ठेवले तर जगण्याचे दिवस वाढतात,त्रास जरी झाला तरी उमेद संपत नाही.रुग्णाचे सोडा,परीक्षार्थी बद्दल बघू या.परीक्षाजवळ आल्यावर ,"माझा अभ्यास पूर्ण झालाय"असा विश्वास ज्याच्यात असेल तो सुखाने परीक्षेला सामोरा जातो,मग भलेही त्याचा अभ्यास अपूर्ण असेल. म्हणजे अज्ञान असूनही त्याला समाधान असते म्हणून तो संकटांना सामोरा जातो.लहान,निरागस बालक सहजपणे वडिलांच्या बॉसशी बिनधास्तपणे बोलतो.अज्ञानामुळेच ना.! आजवरचा इतिहास सांगतो कि, किशोरवयीन बालके मोठमोठे पराक्रम करू शकले परिणामाबद्दल अज्ञान ,दुसरे काय? स्वतःची कुवत,शक्ती,ताकद,बल पूर्ण ओऴखलेली व्यक्ती अभेद्य,अदम्य,अशक्यप्राय पराक्रम करूच शकत नाही.असले पराक्रम करण्यासाठी "अज्ञानी जिगरच "कामी येतो."मला हे सर्व येते"या (गैर का असेना)समजातूनच कोणतीही व्यक्ती कार्य करू शकते. या जगात ज्ञानापेक्षा अज्ञानामुऴे जास्त शोध लागले आहेत.भारतासाठी जगभ्रमण करायला निघालेली वास्कोदगामाची स्वारी दक्षिण अफ्रिकेच्या टोकाला पोहचली,मग कळले हा भारत नाही तर त्याने त्या भूभागाला "केप ऑफ गुड होप" म्हटले. भारत शोधायला निघालेला अमेरिगो अज्ञानामुळेच अमेरिकेत पोहोचला,अज्ञानामुळे नवी भूमी मिळाली.स्वतःच्या भूमीत पराभूत झालेला सिकंदर केवळ अनभिज्ञेमुळे स्वतःला जगज्जेता म्हणवून घेऊ शकला ना!
आता हेच बघा ना,डिग्री रूपी ज्ञान घेतले तरी जगरूपी पुस्तक ज्ञात होईल असे नाही.डिग्री मिळाल्यामुळे मी 'ज्ञानी'झालोय ही भावना होणे हेही अज्ञानाचे प्रगटीकरणच नव्हे का? " पोथी पढे पढे पंडित हूआ न कोई"असे कबीर उगीच म्हणाले असतील काय? उलट डिग्री घेणे म्हणजे विशिष्ट विषयांचे मर्यादित ज्ञान कमावणे अन् अमर्याद अज्ञानात खुश होणे असा अर्थ होत नाही काय? उलटपक्षी कोणतीही डिग्री न घेणे म्हणजेही विशिष्ट ज्ञानापासून वंचित राहाणे,म्हणजे अंशतः अज्ञानीच राहाणे ,होय ना!एकूण काय,शिका किंवा नका शिकू 'अज्ञान'चिरंतन आहे.
उद्या काय होणार याचे ज्ञान नाही म्हणून आज आपण सुखाने स्वप्न बघू शकतो ना !आशा, अपेक्षा,स्वप्न जागविणारे अज्ञान हेच मोठे ज्ञान नव्हे का?"
"गैरसमज" समाजधारणेचा पाया!
समज ही ज्ञानातून उपजते तर गैरसमज हा अज्ञानातून! जेवढा मोठा गैरसमज तेवढा सुखी समाज.अख्ख्या गावात माखनचोर,नटखट म्हणून गाजलेला कान्हा यशोदेसाठी साधाभोळाच होता, का?यशोदेचा गैरसमज दुसरे काय!आजही मातृत्वाच्या चष्म्यातून बघताना होणा-या (गैर)समजामुळे अख्ख्या आऴीत गाजलेलं बाळं, त्याच्या आईसाठी गुणी श्रावणबाळच असतो.गैरसमजावर आधारित समाजधारणेमुळेच" आपला तो बाब्या दुस-याचा तो कारटा" ही म्हण रूढ झाली ना! माझ्या सासुपेक्षा तिची सासू प्रेमळ आहे,किंवा उसकी साडी मेरी साडीसे सफेद कैसी, किंवा other's garden are always green, किंवा (स्वतःची)पत्नी ही क्षणाची एम्टिव्ही अन् आयुष्यभराची डिडिमेट्रो असते किंवा गर्लफ्रेंड वा लिव्हीनपार्टनर बायकोपेक्षा समजदार असते, किंवा आमच्या ह्यांच्यापेक्षा तिचा नवरा जास्त केअरींग आहेत किंवा मराठी शाळांपेक्षा इंग्रजी शाळा गुणवत्तापूर्ण असतात किंवा सरकारी इस्पितळांपेक्षा खाजगी इस्पितळे चांगली सेवा देतात किंवा देशी वस्तुंपेक्षा विलायती वस्तू दर्जेदार असतात किंवा या राजकीयपक्षापेक्षा तो राजकीयपक्ष चांगला आहे,हे सर्व गैरसमज भारतीयांना दररोज जगण्याची नवी उमेद देतात हे सत्य नव्हे का? कुठल्याही क्षेत्रात जा वास्तवापेक्षा प्रतिमा मोठी ठरत नाही का?प्रतिमेच्या प्रेमात पडून(म्हणजे गैरसमजामुळेच)लोकं कोणा कोणाला डोक्यावर घेतात ना! म्हणजे जगण्यासाठी,समाजधारणेसाठी गैरसमज गरजेचे असतात. "तो माझ्यापेक्षा जास्त नशीबवान आहे,त्याला काहीही न कष्टता आयते मिळाते" अशा गैरसमजातून लोकं स्पर्धा,ईर्षा वगैरे करतात,समाज गतिमान होतो. "मी म्हणून सहन करते,दुसरी कोणी असती तर----" ,मी फार सरळ आहे,माझ्यासारख्या सरळ लोकांची दुनियेला कदरच नाही,माझ्यावाचून पान नाही हालत इ.इ गैरसमजुतींमुळे लोक संसार करतात,पुढे पुढे करतात,प्रगती करतात.एखादा रंग,खडा,वस्तु,क्रमांक वगैरे माझ्यासाठी "लकी" आहे.अमुक एका महाराजांचे म्हणणे अगदी खरे होते.अमुक ठिकाणचा ताबीज"पॉवरफूल" आहे,अमक्या-तमक्याच्या प्रेअरने रोग दूर होतो अशा अनेक गैरसमजुतींमुळे समाजात हवा,फॅशन,फॅड पसरतात.त्यातून काहींना पोट भरायचा धंदा मिळतो तर काहींना प्रतिष्ठा मिळते तर काहींना मानसिक बळ.मिळो बापडे,जो जे वांछील तो ते लाहो-------.अशाप्रकारे गैरसमज हा समाजजीवनाचा मोठ्ठा आधारस्तंभ आहे हे सिद्धच होते ना!
स्वप्न-एक रम्य वास्तव-----
स्वप्न म्हणजे सत्यात न आलेले वास्तवच होय ! शेखचिल्ली,मुंगेरीलाल कां आवडतात?त्यांच्या स्वप्नाळूपणामुळेच.स्वप्न नसते तर क्षणोक्षणी आत्महत्याच झाल्या असत्या.डोळ्यात स्वप्न, मनात इच्छा,भावनांवर ताबा,हातात ताकद,डोक्यात ध्येय कृतीत सातत्य असेल तर"करलो दुनिया मुठ्ठी मे" सहज होते.डोके,शरीर जे करु शकत नाहीत ,ते केवळ स्वप्नांमुळे पूर्ण होऊ शकते.ज्या डोळ्यात स्वप्न नसतात ते डोळे मृतप्रायच ठरतात.झोपेत,जागेपणी केव्हाही स्वप्न पाहाणे उत्तमच.स्वप्न पहाण्यासाठी झोपलेच पाहिजे,असेही नाही.उलट झोप उडवते तेच खरे स्वप्न.स्वप्न पहाणे व ते प्रत्यक्षात साकारणे यात महद् अंतर आहे.आपापल्या ठिकाणी दोन्हीही चांगलेच.स्वप्न पाहिली नाहीत तर साकारणार कशी? अन् साकारली तर ती स्वप्न कशी? ते तर वास्तव होईल.वास्तवापेक्षा स्वप्न जास्त रिझवतात.स्वप्न साकार करण्यासाठी केलेला प्रवास अधिक उत्कण्ठावर्धक,सजग,जिवंत,रोमांचक असतो तेवढे वास्तव मनाता भिडत नाही.
आधुनिक शिक्षण पद्धतीत खरे तर असे धोरण असावे की, विद्यार्थ्याला काही नाही शिकवले तरी चालेल,जो तो आपापल्या अज्ञान,गैरसमज,अपूर्णता यातून शिकूनच घेईल पण प्रत्येक बालकाला भरपूर स्वप्न पहायला शिकवा.मोठमोठी स्वप्न त्यांच्या डोळ्यात,डोक्यात जागवा.आजूबाजूला अखंड,निरंतर,अविरत स्वप्नरंजन होऊ द्या.विद्यार्थीच कशाला,संपूर्ण देश स्वप्नमय करा.खरेच,स्वप्ना एवढे रम्य,मनोहर या विश्वात काहीही नाही.खरय ना?
एकूणच काय? मानवाला जगण्यासाठी अन्नवस्त्रनिवा-या पेक्षाही अपूर्णता,अज्ञान,गैरसमज,स्वप्न हेच जास्त उपयुक्त असतात.या चौघांचे कवच लाभलेला माणूस जास्त सकारात्मक,जास्त सुखी असतो.कमतरता,न्यून,उणीव याची जाणीव अजून काही नवे शोधायला प्रेरक ठरते.
                                          डॉ.प्रज्ञा देशपांडे
                                            484 प्राध्यापकनगरी
                                            हनुमान नगर
                                               नागपूर 440009
                                               

अक्षर-शब्द-अर्थ-उच्चार वगैरे.

#अक्षर-शब्द-अर्थ-उच्चार वगैरे.

भाषा म्हणजे बोलण्याचे साधन.याचा सरळ अर्थ ध्वनि हे भाषेचे प्राथमिक रूप आहे. उच्चारण म्हणजे ध्वनिप्रकटीकरणाचे साधन .
जगात अनेक भाषा आहेत म्हणजे जगात अनेक उच्चारण पण आहे.हे उच्चारण कसे असावे? हेच  त्या त्या भाषेचे वैशिष्ट्य ठरते.

ध्वनीच्या चिन्हांना लिपी म्हणतात. कोणता ध्वनी कसा असावा ,याचे निकष ठरले आहेत.
कोणी ठरविले ? याचे उत्तर ,परंपरेने ,हेच येईल. लिपीद्वारे अक्षर दर्शविल्या जातात.

स्वर-व्यंजन असे अक्षरांचे मुख्य भेद आहेत.भाषेसाठी महत्त्वाचे ठरते ते उच्चारण.  अक्षरांचे उच्चारण करण्याचेही संकेत त्या त्या भाषेचे असे निश्चित असतात. व्यंजनांचे उच्चारण अर्धमात्र ,स्वरांचे पूर्ण उच्चार असतात.

स्वरांचे तीन प्रकारचे उच्चार असतात .(१)-हस्व ,(२)दीर्घ,(३)प्लूत .याचे उदाहरण देतांना कोंबड्याच्या आरवण्याचे उदाहरण देतात.
जसे कु कू कू Sss ,यातील पहिला कु -हस्व ,दुसरा कू दीर्घ नि तिसरा कू SSS प्लूत असतो.

याही पेक्षा वेगळा भेदप्रकार आहे. तो म्हणजे उदात्त-अनुदात्त-स्वरित.
गाण्याच्या पेटीतून तारसप्तक-मंद्रसप्तक-मध्यसप्तक असतात ना तसे.साध्या भाषेत वरची-खालची-मधली पट्टी म्हणजे उच्चारण स्थान जरी तेच असले तरी प्रत्येकाची पट्टी वेगळी असते.


 या शिवाय कोणी सानुनासिक(म्हणजे नाकातून) उच्चार करतो तर कोणी अननुनासिक (साधा) उच्चार करतो.
गवयांचे उदाहरण बघू त्याने लवकर स्पष्ट होईल. पंडित नरेंद्र चंचल यांचे "चलो बुलावा आया है माता ने बुलाया है....."गाणं आठवा. ते उदात्त उच्चाराचे उदाहरण म्हणता येईल . गझल मध्ये वा शास्त्रीय संगीतात खालची पट्टी येते. मुकेश वा हिमेश रेशमिया ,बेगम अख्तर ,सलमा आगा यांचे आवाज सानुनासिक आहेत.

अशाप्रकारे उच्चारणाचे हे भेद तसे ढोबळच म्हणावेत. या पलीकडे प्रत्येकाचे स्वत:चे थोडे थोडे भेद यामुळे उच्चारण वैशिष्ट्यपूर्ण ठरते.

खरं तर जिभेला वळण लागण्याच्या वयात हे बारकावे प्रयत्नपूर्वक ऐकवावेत .त्यामुळे नवी पिढी कान तयार होऊन नीट उच्चारण करतील.
शिक्षणाचे उद्दिष्ट पोटापाण्याची सोय व्हावी हे तर असावेच पण "सत्यं-शिवं-सुंदरम् सुद्धा असावे ना!

-हस्व-दीर्घ हे लिपीत दाखविण्यात येतात. याचे अौचित्य बरेचदा लक्षात येत नाही. वरवर बघता कशाला हवेत असे उच्चारभेद असे वाटणे स्वाभाविक आहे. कारण  पाया पक्का नाही.
-
-उदाहरण बघा. "भीती" हा शब्द समजा  -हस्व उच्चारला तर काय ?संदर्भाने कळतोच ना ! असे म्हणता येईल. पण  उच्चारून पाहिले तर लघु उच्चार केल्यावर ती भावना पोहचत नाही. तसेच  "भूत " याही शब्दाचे आहे. आता "स्वाभिमान"हा शब्द बघू. चार अक्षरी शब्द . पहिला उच्चार दीर्घ ,तिसराही दीर्घ आहे .आता दुसरापण दीर्घ उच्चार केला तर शब्दाचा डौल जातो. अनेक शब्द असे आहेत की -हस्वदीर्घामुळे मराठीत अर्थ बदलत नाही पण नाद-लय-ताल-डौल नक्की बदलतो. नीती ,नीतिमान याही शब्दात तीच गंमत आहे.

खरे उच्चार करणे म्हणजे अक्षरोच्चार नसून त्या अक्षरांतील अवकाश जपणे हे होय. प्रत्येक वर्णामध्ये जो अवकाश असतो तोच त्या वर्णाला सार्थ करतो. संगीताच्या अभ्यासातून हे अगदी स्पष्ट होते. भाषेला नाद-लय-ताल असतोच . आपण अनुश्रवणातून स्वीकारतो. जर चूकच कानावर पडले तर चूक उच्चारण होते.

ज्या ज्या व्यक्तींना तोंड-जीभ-टाळू-मूर्धा-अोठ-नाक आहे ,तो हे उच्चार नीट करूच शकतो.  त्याच्या ध्वनीचा पोत नि पट्टी वेगळी असली तरी साधारणत: उच्चार समान असू शकतो. पण अगदी वेगवेगळाच उच्चार होतो ,असा उच्चार जमत नाही असे म्हणणे अपूर्ण शिक्षणाचे द्योतक आहे.

 संस्कारक्षमवयात उच्चारणशास्त्रचा श्रवणाभ्यास करायला पाहिजे. ते न झाल्याने पलायनवाद वाढतो. याच पलायनवादामुळे आपण ऋ,ऋॄ ,लृ ,ज्ञ,,ङ,ञ इत्यादींचे उच्चार विसरलोय ,गहाळ केलेय. (काय फरक पडतो? याच्या उत्तरासाठी वेगळा लेख लिहावा लागेल.)
कठीण-सोपे असे काहीच नसते.
जर शिकायची संधी मिळाली तर परिपूर्ण- नीट शिकायलाच पाहिजे. "तेजस्विनावधितमस्तु ,मा विद्विषावहै"  ही वृत्ती कायम जपलीच पाहिजे.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.




Tuesday, March 21, 2017

माझ्या मना

माझ्या मना ,
मुळात चैतन्याचा आनंदमय कोष असलेल्या माझ्या मना, कां रे सतावतोस ?
कधी अवचित मी तुझ्या आनंदचैतन्यात समरसून मग्न होणारच तितक्यात एकदम आऊटअॉफरेंज कां रे होतोस??
जीवशास्त्र- अध्यात्म- मानसशास्त्र काहीही म्हणोत बापडे ! तू मात्र माझा असून नेहमीच मला अगम्य-अनाकलनीय-अज्ञातच राहतो, कितीही जाणून घेतले तरी.
व्याकरणाच्या भाषेत तू नपुसकलिंगी आहेस. मग इतकं रसिकत्व कोणी भरलं रे तुझ्यात?
सर्वव्यापी- सर्वग्राही- सर्वगामी-मना किती थकवतोस , फ़रफटवून गुंतवतोस , अडकवतोस ज्यात त्यात मला!! मुळातल्या आनंदावर कशाला असली आवरणं लादतोस ??
तू- मी- चैतन्यमय आत्मा खरेखुरे जिगरीजान दोस्त ना रे? एकमेकांशिवाय आपले अस्तित्वच अधुरे !अधुरे कशाचे ? अस्तित्वहीनच रे पार.
इतके एकजीव, गुरफ़टलोय एकमेकात. शरीर-आत्मा-मन म्हणजे "मी"! मी म्हणजे माझं मन. माझं मन म्हणजेच माझा आत्मा.कुठेय कोणाचे स्वतंत्र अस्तित्व ?? सांग ना? कोणाची सीमा कुठे संपते न् कोणाची सत्ता कुठे सुरु होते : हे कसं समजावं एखाद्याला? त्रिकुट तरी कसं म्हणू ? एकच ना रे आपण !
हॅंडसेट-सिमकार्ड-मेमरीकार्ड यांचा मिळून मोबाईल म्हणतात ना तसं बघ. सिमकार्ड म्हणजे आत्मा , हॅंडसेट म्हणजे शरीर व मेमरीकार्ड म्हणजे मन.हे सगळं मिळून "मी" झालोय ना!
मना
नको ना जुना बोर-रटाळ-चोथा झालेला नकोसा डाटा पुन्हा पुन्हा सावडून आणू. कर ना फॉर्मेट स्वत:ला. तुझ्या या संग्रहीवृत्तीमुळे मला कशाला उगाच नकारात्मक-निराशाजनक चिंतनात गुंगवतोस??राहूदे ना अविचल आनंदमग्न . माझ्यासाठी वेळ दे ना राजा !
बघ ना :किती सुंदर-दिव्य-अलौकिक आहे ना ही सृष्टी?  त्यातलं आपलं अस्तित्व किती सहज-सुरेख-सुरेल ! आपल्या प्रत्येक श्वासात, गतीत , हालचालीत लय आहे ,ताल आहे,सूर आहे,संगीत आहे मुख्य म्हणजे समन्वय आहे ;सह-अनुभूती आहे.
या शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्या लयीत असतात बघ. ह्रदय अखंड ताल धरतं बघ. श्वासात सूर आहे ना .अंगप्रत्यंगात व्यक्ताव्यक्त संगीत अविश्रांत सुरुच असते ना.
मना
थोडं दमाने घे. एकेक कणस्वरही अनुभवू दे मला.नादमय होऊ दे मला. रमू दे .समाधी समाधी काय ती अनुभवू दे .सारं  सारं विसरू दे.  अंतर्नादात अहोरात्र देहभान हरपू दे .
निराशेची बेसूर तान नको छेडू. बेचैनीचा बेताल नको वाजवू. बेसूर वाईट अनुभवाची उजळणी नको ना करू.
मना
तू अखंड -अभंग आनंद आहेस. स्थिर हो. शांत हो. नित्य हो.
निरंतर-निखळ-निरागस सुख-समाधानात न्हााऊन निघ कायमच. अवती-भवती हेच आनंदतुषार फ़ैलू दे.जेथ ेजाशील तेथे आनंदाचे वाण वाट .
मना रे ,
आनंदकंदा-आनंदघना-आनंदसारा  असाच आहेस ना? असाच रहा !!!
  डॉ. प्रज्ञा देशपांडे.
  नागपूर 

Monday, March 20, 2017

कवी ना. वा. टिळक...२

#सहजोक्त ...
कवी ना. वा. टिळक...२

आमच्या शाळेची दैनिक प्रार्थना म्हणजे
 ना .वा . टिळकांची खालील कविता होय. आज जेव्हाही ती कविता वाचते ,त्यातील शब्दवैभवाने बुद्धी दिपून जाते.जातपातधर्माच्या पलीकडे देशभक्ती असते हे त्या कवितेचा आशय सांगतो.मंदारमाला वृत्तातील ही कविता. तशी समजायला सोपी. पण त्यातले काही काही शब्द,श्रद्धा अगदी अजोड आहेत. जसे
निस्तुला =तुलनाच नाही जिला अशी ती. आपण- अतुलनीय-असा शब्द नेहमीच योजतो. हा नवा शब्द.
टिळकांना संस्कृत उत्तम यायचे . त्यांनी मराठीला असे श्रीमंत केले. ते पुढे ख्रिस्ती झाले होते. पण देशाविषयीचा अभिमान व्यक्त करताना -आर्यभूमी,
कामधेनु,कल्पवल्ली,सारस्वत (सरस्वतिपुत्र) ,गुरुस्थान,अमृत - इत्यादी शुद्ध पौराणिक संदर्भातील शब्द सहज योजले त्यांनी. पण कुठेही त्यांच्या धर्मभावना दुखावल्याचा उल्लेख नाही."नमन्ति फलिता वृक्षा: ,नमन्ति च बुधा जना:" हेच सप्रमाण सिद्ध होते त्यातून.
अनेक अनेक धन्यवाद बालभारतीचे की असे श्रीमंत शब्दयुक्त ,आशययुक्त साहित्य आम्हाला क्रमिक पुस्तकातून अभ्यासायची सोय दिली. शतश: ऋण आमच्या गुरुजनांचे की आमच्या सामाजिक-आर्थिक-मानसिक परिस्थिती चा विचार न करता जे जे पाठात होते ते,  शिवाय त्याला पूरक-अवांतर साहित्य ,कोणताही अभिनिवेश न बाळगता शिकविले. आमच्या जन्मदात्यांचे तर अनंत उपकारच म्हणावे की आम्हाला गुणग्राहक( मार्कं मिळविण्याचे गि-हाईक) न बनवता खरं गुणग्राहक ( गुण घेणारे) केले. आम्हाला स्पर्धेचे दडपण दिले नाही. अन् आम्ही फारच नशिबवान की त्याकाळी बालमानसशास्त्र वगैरेंचे ठेकेदार नव्हते ,नाहीतर-" काठिण्यपातळी फारच आहे ,हा आमुकांवर अन्याय आहे-" अशा बोंबा ठोकून चांगल्या अभ्यासक्रमापासून आम्ही वंचित राहिलो असतो.
मला आठवते ,पृथ्वीचे प्रेमगीत ,फुलराणी या कविता हायस्कुलात शिकलो. शिकविणा-यांनी कधी- यात काही "वेगळ"आहे हे जाणवू दिलं नाही,  इतकं सहज आम्ही शिकलो.
व्याकरण ,भाषासौंदर्य असे मोठे मोठे शब्द न वापरता सहज शिकविले नि आम्ही शिकलो.परीक्षेत पैकीच्या गुणपैकी नाही मिळाले,भर वर्गात गुरुजन कमी गुण मिळाले की रागावत ,चुका भरवर्गात सगळ्यांसमोर सांगत पण आमच्या नि घरच्यांच्याही -"हा घोर अपमान आहे ,अशाने समोर शिकायची गोडी रहाणार नाही "-वगैरे मनात आले नाही.  पण मराठीची गोडी पक्की लागली परीक्षेत पैकीच्या पैकी गुण नाही मिळाले पण मराठीची गोडी पक्की लागली.  असो.
आज ही कविता देतेय .उद्या याहून भारी कविता घेईन.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
सृष्टी तुला वाहुनी धन्य! माते, अशी रूपसंपन्न तूं निस्तुला ।
तूं कामधेनू! खरी कल्पवल्ली! सदा लोभला लोक सारा तुला ।
या वैभवाला तुझ्या पाहुनीया, मला स्फूर्ती नृत्यार्थ होते जरी ।
सामर्थ्य नामी तुझ्या आर्यभुमी, तसे पाहिले मी न कोठे तरी ।।१।।

माते! महात्मे तुझे, तत्ववेत्ते, तुझे शूर योद्धे, तुझे सत्कवी ।
श्रेणी ययांची सदा माझिया गे मना पूजनी आपल्या वाकवी ।
यांची यशे ज्या नव्या सद्गुणांना मला अर्पिती, ध्येय ते गे जरी ।
सामर्थ्य नामी तुझ्या आर्यभुमी, तसे पाहिले मी न कोठे तरी ।।२।।

तुझ्या महोदार सारस्वताच्या महासागरीचा जरी मीन मी ।
झालो, तरी गे तृषा मन्मनाची कधीही कधीहीं न होणें कमी ।।
आई! गुरूस्थान अंती जगाचे तुझे! यात शंका न काही जरी ।
सामर्थ्य नामी तुझ्या आर्यभुमी, तसे पाहिले मी न कोठे तरी ।।३।।

वारा तुझ्या स्पर्शाने शुद्ध झाला, मला लाधला! भाग्य हे केव्हढे!
माते! स्वये देशि जे अन्नपाणीं, सुधा बापुडीं कायशीं त्यापुढे ।
तू बाळगींशीं मला स्कंधी-अंकी! सुखाचीं खरीं हींच सींमा पुरीं ।
सामर्थ्य नामी तुझ्या आर्यभुमी, तसे पाहिले मी न कोठे तरी ।।४।।

– रेव्हरंड ना. वा. टिळक

Sunday, March 19, 2017

कवि ना.वा. टिळक....भाग १


#सहजोक्त

कवी नारायण वामन टिळक.-भाग १
पाचवी ते दहावी माझं शिक्षण "लोकांची शाळा"मध्ये झाले. मुलींची शाळा असल्यामुळे संगीत -हस्तकला आदी मुलींना आवडेल असे विषय होते.पाचवीत प्रवेश घेतला ,पहिल्या दिवशी शाळेची प्रार्थना ऐकली. तेव्हा अर्थ वगैरे कळत नव्हता. पण पुढे १०वी पर्यंत थोडा कळायला लागला.ना वा टिळकांच्या दोन कवितांमधून प्रत्येकी दोन कडवे निवडून ती प्रार्थना तयार केली होती. आज ती प्रार्थना ऐकली की गुरुजनांविषयीचा आदर दुणावतो. आई-बाबांमुळे घरातून नकळत भाषिकसंस्कार होत होते. मिडल्स्कूलमध्ये याच कवींची ,
"वन सर्व सुगंधित झाले
मन माझे मोहून गेले
किती तरी...
स्वर्गास दिव्य वृक्षास
बहर ये खास
असे कल्पिले
असे कल्पिले
मन माझे मोहून गेले
 किती तरी......"
ही कविता होती.
जोगळेकरबाईंनी छान शिकवली. घरी बाबांनी
ना. वा टिळकांचे थोडक्यात चरित्र सांगितले.
मग आमच्या शालेय प्रार्थनेचा अर्थ सांगितला.
 नंतर "प्रभु मी उणा ...अजूनहि  पुष्कळ उणा.." ही कविता सांगितली.त्यात शेवटच्या कडव्यात "ख्रिस्ता ख्रिस्ता.....असे शब्द आहेत. मग बहुसंख्य अन्यधर्मिय ते उच्चारणार नाहीत ,शिवाय ना वा टिळक स्वत: पूर्वाश्रमीचे हिंदू होतेच म्हणून त्यानीच स्वत: होऊन तेथे "क्रिष्णा क्रिष्णा" असा पाठभेद केला. ही दंतकथा सांगितली. त्यावेळे पासून मला ना वा.टिळक आवडू लागले.
 पुढे टिव्ही आला, कॉलोनीत दोघांकडे. कोण कौतुक आम्हाला. सगळे कॉलनीवासी दूरदर्शन बघायला सायंकाळी दोन घरी जमत असत. त्यावेळी विजया मेहता यांनी साकारलेली "लक्ष्मीबाई टिळक" स्मृतिचित्रे पाहिले. खूपच भावले. काही काही प्रसंगाने डोळ्यातून पाणी आले. काय बरोबर काय चूक हे सांगायला मी न्यायाधीश नाही. पण जीवनप्रसंगातून माणूस त्याच्या त्याच्या प्रवृत्तीनुसार मार्ग काढतो. "कालाय तस्मै नम:"!
 पुढे आमच्या  कॉलनीच्या ग्रंथालयातून "सृतिचित्रे" आणून पारायण केले. उरलेला रडण्याचा कोटा पूर्ण केला. स्मृतिचित्रेमधून संपादित केलेला "तू तर माझ्याही पुढे गेलीस .." नावाचा धडा अभ्यासाला होता .
 अशा रितीने बालभारती ,जोगळेकर बाई , माझे  बाबा नि स्मृतिचित्रे यांनी ना. वा.टिळक समजायला ,आवडायला मदत केली.
 पुढच्या भागात त्यांच्या कवितांच्या निवडक  कडव्यांचे रसग्रहण लिहीन.
 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

शब्दचिंतन

कालपासून डोक्यात शब्द घोळत आहेत.
तसेही मला शब्द खूप आवडतात.
****©डॉ. प्रज्ञा देशपांडे******
भाषा कोणतीही असो ,,शब्द सार्थ असावेत.
कालिदासाने उगाच नाही ना म्हटले ,,
," वागर्थाविव संपृक्तौ वागर्थप्रतिपत्तये
जगत: पितरौ वन्दे पार्वतीपरमेश्वरौ "॥
शब्द नि अर्थ यांचे अतूट नाते आहे.
काल सहज "हमराज" शब्द आठवला.मग या सारखे कोणकोणते बरं शब्द ?म्हणून आठवत गेली तर .....
हमराज
हमसफर
हमकदम
हमनवा
हमराही
हमनाम
हमउमर
हमनशीन
.........असे शब्द विशेष म्हणजे गाण्यासह आठवत गेले.
'हम'  हा उर्दू उपसर्ग (प्रिफिक्स) आहे. त्याचा अर्थ साधारणपणे "सह" असा होतो. संस्कृतात २२ उपसर्ग आहेत.मराठीत त्यातले बरेच  आले आहेत. शिवाय परक्या भाषेतूनही उपसर्ग घेतले मराठीने.
त्यात हा "हम" .संस्कृतात "सम्" उपसर्गाचा जो अर्थ आहे तोच उर्दू (मूळ पारसी) उपसर्ग "हम" सांगतो.

वर उल्लेखलेल्या शब्दांचे अर्थ उलगडत गेले अन् आनंद होत गेला.
हमराज = गुपिताता भागीदार
हमसफर =सहप्रवासी  (संगच्छध्वम् मध्ये जे अपेक्षित आहे तेच .)
हमकदम= सोबत पायवाट कापणारे .एकाच ध्येयाचे वाटसरू.
हमनवा= एक दृष्टिकोण असलेले  , सहमत ,एकवाक्यता असलेले.(संवदध्वम् मध्ये हेच अपेक्षित आहे
हमराही = सहप्रवासी
हमनाम =एकाच नावाचे .
हमउमर=सवंगडी ,एकावयाचे , संस्कृतात "वयस्य" (एका वयाचे मित्र )
हमनशीन =जोडीदार ,साथी , युगुल
 हे सगळे उपसर्ग घटित शब्द आहेत.
यांचा हिंदीतील "हम"= मी / आम्ही  ; शब्दाशी संबंध नाही.हिंदीतील हम संसकृतातील अहम् / वयम् पासून तयार झालाय.असो.
हमकदम , हमसफ़र , हमराही
हमराज ,हमनवा
हमनशीन ,हमउमर ........
चिंतन करत गेलं की अंतरंगातील खोल खोल अर्थच्छटा उलगडून सांगतात हे शब्द .
मग हिंदीगाणे अजून सार्थ होत हृदयाला भिडतात
१)
ऐ मेरे हमकदम ,मेरे दिल की धडकन मे संगीत तुम्हारा है ....
 २)जब कोई बात बिगड जाये ,जब कोई मुश्किल पड जाये तुम दे ना साथ ओ हमनवा ....
(३) हमसफ़र मेरे हमसफ़र,पंख तुम परवाज हम .......
(૪)हमदम मेरे खेल ना जाने चाहत के ईकरार के ........(५)हमदम मेरे मान भी जाओ ,कहना मेरे प्यार का .....
      आठवा आठवा गाणे अन्  अन् शब्दानंद लुटा ........   (©डॉ.प्रज्ञा ) देशपांडे
शब्दधन आम्हा ,शब्दची सामर्थ्य
शब्दानेच होई जीवन हे सार्थ.......

     *******प्रज्ञा *******

Saturday, March 18, 2017

आयुर्वेद

आज माझा भाचा घरी आला होता. तो आयुर्वेदाचार्य होतोय (BAMS करतोय ). त्याला अचानक -अनपेक्षितपणे पतंजली आयुर्वेद महाविद्यालय हरिद्बार येथे प्रवेश मिळाला.गेल्या वर्षी हा बारावीत असताना मी त्याला संस्कृत शिकवले होते. याला डॉक्टरच (MBBS) व्हायचे होते.बारावीला "आयुर्वेद" नावाचा धडा आहे .मी तो माझ्यापद्धतीने शिकवला होता. प्रवेश झाल्यावर तो मला भेटायला आला नि आवर्जून सांगू लागला की,तू तो धडा शिकवला ना ,तेव्हापासून मला आयुर्वेदच आवडू लागले. मी ठाम ठरवले की आयुर्वेदच शिकायचे." तशी त्याची तिसरी पिढी आहे आयुर्वेद करणारी.
वीस वर्षांपूर्वी मी आयुर्वेदच्या विद्यार्थ्यांना क्लासमध्ये संस्कृत शिकवायचे. माझ्याकडून बारावी शिकलेले अनेकजण आज आयुर्वेदिक वैद्य आहेत. माझे दोन विद्यार्थी आयुर्वेदमहाविद्यालयात प्राध्यापक आहेत. अजूनही कोणी आयुर्वेदातील संस्कृताविषयी अडचण घेऊन आले तर मी तेवढे शिकवते. माझ्या अनेक मुसलमान विद्यार्थ्यांना-ज्यांच्या घरी संस्कृत पार्श्वभूमी  नव्हती व ज्यांचे बारावी पर्यंत संस्कृतचे शिक्षणही नव्हते - उत्तम गुण मिळाले संस्कृतात प्रथम वर्षाला. शिकवताना मी कोणताही पूर्वग्रह ठेवत नाही ना भाषेचा आभिनिवेश बाळगत. जे आहे ते त्याच शास्त्रीय पद्धतीने शिकवायचे. समोरच्याला जी भाषा अवगत आहे त्यातून सुरवात करायची व मग शास्त्रग्रंथ उकलायचे. साहेबा ,सॉलेहा ,अब्दुल अजूनही संपर्कात आहेत.
आयुर्वेद प्रथम वर्षाला संस्कृत आवश्यक आहे.
लघुसिद्धांत- कौमुदी ,हितोपदेश,पंचतंत्र ,आयुर्वेदीयसुभाषितानि इत्यादि त्यांच्या अभ्यासक्रमात आहे.
कधीकधी आयुर्वेदीय विश्वात टुम निघते की संस्कृत काढून टाका. पण मुळात संस्कृत व आयुर्वेदाचा समवाय संबंध तोही अयुतसिद्ध (या शब्दांचा अर्थ सांगण्यासाठी स्वतंत्र शब्दचिंतन लिहीन.)असा  आहे. सर्व  प्राचीन ग्रंथ व टीकाग्रंथ संस्कृतात आहे.त्यामुळे त्याचा पाया तयार करण्यासाठी कौमुदी , मानसिकता तयार करायला सुभाषित नि रूग्णमानसिकता समजण्यासाठी पंचतंत्र आवश्यकच आहे. म्हणून तिथे संस्कृत अनिवार्य आहे.आयुर्वेदाची व्याख्या पुढील श्लोकात  दिली आहे.
हिताहितं सुखं दुःखमायुस्तस्य हिताहितम् ।
मानं च तच्च यत्रोक्तमायुर्वेदः स उच्यते  ॥

(Life is benevolent or Malevolent. Life is Happiness and Sorrow. That (precept) is called as Ayurveda where that (life), its merit, demerit and dimension is mentioned.) थोडक्यात ,ज्याने जीवन कळते, ते आयुर्वेद.
म्हणजे रोग झाल्यावर दुरुस्त करणे हे आयुर्वेदाचे साध्य नाही . मुळात नीरोगी ,निरामय जीवन जगण्यसाठी आयुर्वेद आहे.
खरेतर संस्कृत तज्ज्ञाहूनही अधिक संस्कृत आयुर्वेदाचार्याला यायला हवे. कारण आजही शास्त्राभ्यासात सखोल विद्वत्ता ,प्रचंड अभ्यासाची गरज आहे. निव्वळ भाषांतरावर तगणारे कुडमुडे-पोटभरू बहु असतील.त्यांच्यामुळे नव्हे तर ख-या विद्याव्रतींमुळे आज जगात आयुर्वेद भूषणीय ठरतोय.
दुर्दैवाने गेल्या हजारोवर्षात भारतीयांची ज्ञान-विज्ञान परंपरा खंडलीय. कॉपीपेस्ट ,सर्च-फॉर्वर्ड  यातच कौशल्य मिळवून लोकं समाधानी आहेत.भवभुूति  चे सुभाषित कायम स्मरते जेव्हाही "उत्तमाची" उपेक्षा होते.....
ये नाम केचिदिह नः प्रथयन्त्यवज्ञाम्
जानन्तु ते किमपि तान् प्रति नैष यत्नः
उत्पत्स्यते च  मम कोsपि  समानधर्मा
कालोSह्य़यं निरवधि: विपुलाश्च पृथ्वी......
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

#स्तोत्रचिंतन-૪

१८.३.२०१७
#स्तोत्रचिंतन-૪
अहं निर्विकल्पो निराकाररूपो
विभूत्वाच्च सर्वत्र सर्वेंद्रियाणाम्
न चासङ्गतं नैव मुक्तिर्न मेय:
चिदानन्दरूप: शिवोSहं  शिवोSहं ॥६॥
श्रीमच्छंकराचार्य विरचित आत्मषटकम् मधले हे शेवटचे पद्य.
या आधीच्या पाच श्लोकांमध्ये "मी" कोण नाही? हे सांगितले आहे.
आता या श्लोकात नेमका "मी" कोण ? हे सांगितले आहे.
शंकराचार्य म्हणतात....मी निर्विकल्प आहे. मनाचे दोन गुण असतात ,(१)संकल्प (२)विकल्प. मनात ही दोन द्वंद्वे सतत सुरु असतात.ईशभावनेने संकल्प वाढीला लागतो.
समाधीपण दोन प्रकारच्या असतात ,(१)सविकल्प समाधी (२)निर्विकल्प समाधी
तत् त्वमसि। (ते परम तत्त्व म्हणजे तू आहेस)।अयमात्मा ब्रह्म।(हा आत्मा म्हणजे ब्रह्म होय )
प्रज्ञानं ब्रह्म। (ब्रह्म जाणून घ्यायला हवे )
अहं ब्रह्मास्मि ।(मी ब्रह्म आहे )
या चार वाक्यांना महावाक्य म्हणतात.
पैकी पहिले तीन उपदेशपर म्हणजे गुरुने शिष्याला सांगितलेले आहेत.तर शेवटचे अनुभूतिपर वाक्य आहे.जेव्हा निर्विकल्प समाधीतून वा आत्मसाक्षात्काराने खरे ज्ञान होते तेव्हा
"मी निर्विकल्प ,निराकाररूप आहे" हे समजते.
विभूत्वामुळे ,(विभू म्हणजे शक्तिशाली) सर्व इंद्रियांमध्ये सर्वत्र आहे.
आणि मी असंगत नाही. नेहमी सुसंगत आहे.म्हणजे "मी" उगाच,अकारण नाही .नेहमी योग्यच आहे.वरवर जरी व्यर्थ-फालतू वाटले तरी त्यात संगती आहे.
मला मुक्ती नाही. (जसे ऊर्जा नित्य व स्थिर असते तसेच ब्रह्म स्थिर असते.म्हणून त्याला जन्म-मृत्यू-मोक्ष-मुक्ती नसते.)
मी मेय नाही ,अमेय आहे. जगात ज्या ज्या प्रकारे मोजदाद करतात त्या कोणत्याही  परिमाणाच्या बाहेर मी आहे.
 मेय म्हणजे मोजण्या योग्य . अमेय म्हणजे अगणित,अमर्याद ,अनादि-अनंत .
 मी चित् आनंद रूप शिव आहे.शिव आहे .शिव आहे.
असे हे निर्वाणषटकम् किंवा आत्मषटकम्  यथामती इथे मांडले.🙏🙏🙏
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Friday, March 17, 2017

सहजोक्त..૪

१७.३.२०१७
१७.३.२०१७
#सहजोक्त..૪
भगवान् गौतम बुद्ध ,बौद्ध धर्माची स्थापना करून प्रचार-प्रसार करीत आयुष्यभर फिरत होते.
तत्कालिन बोलीभाषा(मागधी) हीच त्यांची धर्मप्रसाराची भाषा होती.
त्यांनी आपल्या नंतर उत्तराधिकार भीक्खुसंघाला दिले होते. दुर्दैवाने त्यांच्या हयातीतच त्यांच्या धर्माचे अनेक पंथ झाले होते. त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर वेगवेगळ्या भिख्खुंच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या.प्रौढवयात प्रवज्जित झालेल्या एका भिक्खुने तर म्हटले की," बरे झाले गेले ते ,फार कडक नियमांनी जाच करायचे ते".
हे वाक्य भगवान् बुद्धांच्या निस्सीम अनुयायाने ऐकले त्याच्या मनात पुढचे भीषण भविष्य दिसू लागले. त्याने त्यावेळी सगळ्या अर्हतांना एकत्र  बोलावले.आणि भगवान बुद्धाचे जे जे म्हणून उपदेश होते ते सर्वानुमते बहुमताने लिखित स्वरूपात साठवण्याचे काम सुरु केले. यालाच *प्रथमधर्मसंगति* असे म्हणतात.आणि यातून जे साहित्य लिहिल्य गेले ते *त्रिपिटक* होय.
इकडे धम्मसंगायन सुरु होते नि तिकडे एक अर्हत मुक्त फिरत होता. त्याला कोणीतरी सांगितले की ,"तू जा .तिकडे ते काम करत आहेत." त्यावर तो म्हणाला "त्यांना काय करायचे ते त्यांनी करावे .मी मात्र मला जे बुद्ध समजले तसाच आचरण करीन.ते बरोबर असतील पण  मी माझ्याच पद्धतीने वागीन."

इतका मोकळे पणा ,खरे खुरे व्यक्तिस्वातंत्र्य त्या काळी समाजात रुजले होते.
आताही हे शक्य नाही कां?
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Wednesday, March 15, 2017

पंचतंत्र" ~१

१६.०३.२०१७

   #सहजोक्त ३
      पंचतंत्र"  ~१

   "पंचतंत्र"  जागतिक-इतिहासातील एकमेवाद्वितीय संस्कृत ग्रंथ.
आज जगातील अनेक भाषांमध्ये त्याचे भाषांतर झाले आहे.
 पण मुळातून तो ग्रंथ वाचणे जास्त हितवाह आहे.
   प्रत्येक शिक्षकाने , पालकाने आवर्जून वाचायला हवा हा ग्रंथ.या ग्रंथाच्या निर्मितीची कथा पण रंजक आहे.
   अमरशक्ती नावाचा राजा असतो.त्याची मुले उनाड-नाठाळ असतात.त्यांना शास्त्राध्ययनाची आवड नसते.(म्हणजे आजकालच्या मुलांसारखेच ते असतात.) शिकण्याच्या वयात ते शिकत नाहीत. राजाला काळजी वाटते ,यांचे पुढे कसे होईल?
   राजसभेत तो विद्वानांना साद देतो.
"माझ्या मुलांना शिकवा हो" .
कोणीच तयार होत नाही. (शालाबाह्य मुलांना शिकवणे सोपे नाही.)
   पण त्याच सभेत "विष्णुशर्मा" नावाचा विद्वान शिक्षक ते आव्हान स्वीकारतो. मुलांना घेऊन आपल्या आश्रमात जातो. निसर्गाच्या सानिध्यात कथांच्या सहाय्याने त्या -अभ्यासाची नावड असलेल्या,अक्षरशत्रु -मुलांना "राजनीती"पारंगत करतो.
    याच कथा "पंचतंत्र नावाने संकलित केल्या आहेत.
   आज जसे धारावाहिक असते ,त्यात एका भागातून दुसरा भाग निघतो तश्या या कथा आहे. कथामालिका पण प्रत्येक कथा स्वतंत्र.
   ज्ञानरचनावाद-वर्तनवाद  असे कुठलेही वाद न करता मुलांना समजेल ,आवडेल,पटेल या पद्धतीने कथा रचल्या आहेत. मुळात कोणालाच उपदेश आवडत नसतो ,विद्यार्थ्यांना तर अजिबात नाही. या सर्व कथांचे नायक (प्रमुख पात्र) प्राणी आहेत.(वरवर बघता) प्राण्यांचे वर्तन-समस्या-उपाय इत्यादी ,या ग्रंथाचा वर्ण्यविषय आहे.त्यामुळे कथा वाचतांना "मला शिकवतात"हा भाव उत्पन्नच होत नाही. म्हणून विद्यार्थ्यांची जिज्ञासा जागृत होऊन ते त्या कथानकात तत्काळ समरस होतात.
   आजही ,जग-लोकव्यवहार-मानवीवर्तन-समाजवर्तन-राजनीति -व्यवस्थापन आदि शिकायचे असेल तर हा ग्रंथ समूळ वाचावा.
   खरे तर हा ग्रंथ त्याकाळातील बालवाङ्मय होय.पण प्रगल्भ करण्याची त्याची क्षमता अद्भूत आहे.
 
   या ग्रंथावरून  काही तथ्य लक्षात आले . ते असे ........मुलांशी वागताना ,"लहान आहेत ,यांना कळत नाही" असे समजून वागू नये.,सोपं-कठीण अश्या मापात न मोजता जे जसे आहे तसे सांगावे. लहान मुलांची ग्रहण-धारण-स्मरण-क्षमता व कल्पनाशक्ती मोठ्या माणसांपेक्षा तीव्र असते.उलट जगाचा नकारात्मक अनुभव न आल्यामुळे त्यांच्यात प्रचंड सकारात्मक ऊर्जा असते की बरेचदा मोठी माणसं  त्यांच्या समोर तोकडी पडतात.अन् तीव्र निरीक्षणशक्तीमुळे ते मुलांच्या लक्षात येते .मग मुले अशा मोठ्यांची अवाज्ञा करतात.मुलांना त्यांच्या वयापेक्षा मोठे ध्येय द्यावे.इ. इ.
   ही लेखमाला पंचतंत्रासाठी.......
   ©प्रज्ञा देशपांडे.

Tuesday, March 14, 2017

स्तोत्रचिंतन-३

१५.०३.२०१७
#स्तोत्रचिंतन-३
न पुण्यं न पापं न सौख्यं न दु:खम्
न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञा:
अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता
चिदानंदरूप: शिवोSहं शिवोSहं ॥૪॥
न मृत्युर्न शङ्का न मे जातिभेद:
पिता नैव मे नैव माता न जन्म:
न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यं
चिदानंदरूप: शिवोSहं शिवोSहं॥५॥

या दोन श्लोकांचा अर्थ पाहू.
पाप-पुण्य ,सुख-दु:ख
ही द्वंद्वे नेहमीच असतात.
व्यासांनी म्हटलेच आहे ,"परोपकाराय पुण्याय ,पापाय परपीडनम्" परोपकाराने पुण्य तर परपीडनाने पाप होते.
व्याधी म्हणजे दु:ख असे आयुर्वेद म्हणतो.
श्रीमत् शंकराचार्यांच्या मते "मी" या सा-या द्वंद्वाच्या पलीकडे आहे.
 पाप-पुण्य,सुख-दु:ख यांचा हिशेब आला की त्याचे फळ म्हणजे स्वर्ग-नर्क आलेच.
 ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ,"हरि मुखे म्हणा ,हरि मुखे म्हणा; पुण्याची गणना कोण करी?"
मंत्र (मनन करण्याचे साधन) ,तीर्थ(पवित्र स्थान),वेद (सनातन ज्ञान),यज्ञ (ऐहिक-पारलौकिकाच्या प्राप्तीचे साधन) या सगळ्यांच्या पलीकडे "मी" आहे.

भोजन (खाण्याची प्रक्रिया) ,भोज्य (खाण्यास/उपभोगण्यास योग्य),भोक्ता (खाणारा/उपभोगणारा) हे तीनही अन्योन्यसंबंधित शब्द आहे.
 [ज्ञान-ज्ञेय-ज्ञाता ,प्रमाण-प्रमेय-प्रमाता ,दान-देय-दाता, त्यजन-त्याज्य-त्यक्ता इ . इ. प्रमाणे. ]

"जीव: जीवस्य जीवनम्"। या न्यायाने सृष्टीमध्ये प्रत्येक जीव दुस-याचे जीवन-साधन असतो. पण आदि शंकराचार्यांच्या अनुभूतीनुसार "मी"या सगळ्यांच्या पार गेलोय.
सृष्टिनियमानुसार "जातस्य हि धृवो मृत्युः " हे चिरंतन सत्य आहे.
शंकराचार्य म्हणतात ,"पुनरपि जननं पुनरपि मरणं ;पुनरपि जननीजठरे शयनम्"।......
 पण एकदा कां ,"मी शिवतत्त्व  आहे" ही अनुभूती आली की , जन्म-मृत्यु-जाति(८૪लक्ष योनि)  तसेच माता-पिता (जन्म देण्याचे निमित्त कारण) गुरु-शिष्य (विद्या देणे -घेणे करणारे) ,हे सगळे बंध मला गैरलागु ठरतात.

पुढील भागात शेवटचा श्लोक घेऊन लेखमाला समाप्त होईल.

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Monday, March 13, 2017

अभंग

१૪.०३२०१७

# अभंग...
अनेक वर्षांपूर्वी जेव्हा मी क्लासेस घ्यायची ,नोकरी नव्हती.एका विद्यार्थीनीने त्यांच्या घरी जी उपासना चालायची त्यातील एक अभंग मला कॅसेटद्वारे ऐकवला.त्या अभंगाने मला इतके खोलवर भारवून टाकले की आजही ते सूर ,तो अर्थ मला आतून शांत करतो. गणेशपुरी आश्रमाच्या स्वामी चिद्विलासानंदा यांच्या इंग्रजीवळणाच्या उच्चारातून गायलेला तो अभंग. मी तसाच पाठ केला .फार प्रयत्न न करता तो सहज आत्मसात झाला. संत तुकारामांचा फक्त आठ अोळींचा तो अभंग. जेव्हाही मनावर मळभ येतात ,तेव्हा सहज मनातून आळवल्या जातो.
माझी आजी मला तो नेहमी गायला सांगायची.तिच्या मते त्या गायनात अतिशय आर्तता आहे.आजीची माया दुसरे काय?
तो अभंग असा...
 देव माझा मी देवाचा
 हीच माझी सत्य वाचा ॥
 देह देवाचे देऊळ
 आत बाहेर निर्मळ ॥१॥
 देव पाहाया मी गेलो
 तेथे देवच होऊन गेलो ॥२॥
 तुका म्हणे धन्य झालो
 माझे विठ्ठल भेटलो ॥३॥
 शब्द साधे. अर्थ सोपा .चाल बाहेरून आत नेणारी. आशय आचरायला फ़ारच कठीण.
 पण जेव्हाही "देव माझा "  नि "मी देवाचा" हे मनातून  समजते तेव्हा खुप मोकळं ,आनंदी वाटते.
 बरेचदा शब्दार्थ कळतात. पण जितके जितके त्या शब्दांचे सखोल चिंतन करावे तितके नवे नवे काही अनुभूतीला येते की जे व्यक्त करायला शब्द तोकडे पडतात. व्यक्तिमर्यादा.
 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Sunday, March 12, 2017

सहजोक्त.....२

१२.०३.२०११७


#सहजोक्त......२
पंचतंत्रातील एक कथा .......
एका जंगलात अनेक प्राणी रहात असतात. सिंह 🐯 त्यांचा राजा असतो.तो त्याच्याच विश्वात सहज वावरत असतो.
त्याच जंगलात एक रानडुक्कर नुकते वयात येते. नवा माज चढलेला तो ,स्वत:च्या उन्मत्तावस्थेत जंगलात दहशत निर्माण करतो.
सगळेप्राणी त्याला बिचकून वागू लागतात.  छोटे प्राणी त्याची हाजी हाजी करतात. थोडे मोठे प्राणी त्याच्या दूर राहतात. याला वाटू लागते ,"मी सामर्थ्यशाली आहे,मी पराक्रमी आहे ,मीच प्रभावी आहे."
दिवसोंदिवस त्याचे वलय वाढत असते.🐖  कळत्या वयापासून तो सिंहाचा मत्सर करीत असतो.  सिंहासारखा रूबाब,मान त्याला पाहिजे असतो .सिंहाला याची कल्पनापण नसते.
जंगलातील काही ज्येष्ठ मात्र  याचा मूळ वकूब  अोळखून असतात .पण याच्या विरुद्ध कोणीच बोलत नाही. उलट काही जण त्याला प्रोत्साहित करतात. त्यामुळे हा स्वत:ला अनभिषिक्त स्वामी समजू लागतो.
एक दिवस कोल्हा त्याला सल्ला देतो ,"लोकं तुला समोर राजा म्हणतात पण जो पर्यंत सिंह आहे तो पर्यंत तू खरा राजा ठरणार नाही. तू तर पराक्रमी आहेस . सिंहालाच आव्हान दे . हरव त्याला नि हो राजा."! यालाही हे पटते.
हा दुसरे दिवशी सिंहाच्या गुहेसमोर जातो. जोरात अोडून सिंहाला आव्हान देतो ,"खरा राजा असेल तर बाहेर ये ,माझ्याशी युद्ध कर ."
सिंह शांतपणे बाहेर येतो ,पाहतो  की  रानडुकर नि भोवताल अनेक प्राणी झुंडीने आले आहेत.
सिंह त्याला अतिशय शांतपणे म्हणतो ,"गच्छ सुकरं भद्रं ते.... रानडुकरा ,तुझे कल्याण होवो. तू जा . सगळ्यांना सांग की मी सिंहाला आव्हान दिले नि त्याला जिंकले. "
स्वत्वशाली, अनभिषिक्त सिंहराजाने अशा कमी दर्जाच्या प्राण्याशी युद्ध खेळणे हीच त्या सिंहला कमीपणा आणणारी बाब आहे  ,हे सिंह जाणत असतो.  जसे सोन्याला मोजल्या जाण्याचे दु:ख नसते तर गुंजेसोबत तोलल्याचे जास्त वाईट वाटत असते.
त्यामुळे सिंह न युद्ध करतातच " जा रे डुकरा मी हारलो असे सांग सगळ्यांना "! असे म्हणतो. ज्यांना सिंहाची गुणवत्ता माहित आहे ते विश्वास ठेवणार नाहीत. नि जे विश्वास ठेवतील त्याने सिंहाला फरकही पडणार नाही .सिंह सिंहच असतो.
 नेहमी  तुल्यबळ विरोधकाशीच विरोध करावा ,कच्च्याबच्च्यांशी नाही.....
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Saturday, March 11, 2017

स्तोत्रचिन्तन : -२

११.३.२०१७

#स्तोत्रचिन्तन  : -२
न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायु:
न वा सप्तधातु: न वा पञ्चकोश:
न वाक्पाणिपादं न चोपस्थपायु:
चिदानन्दरूप: शिवोSहं  शिवोSहम् ॥२॥
न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ
मदो नैव मे नैव मात्सर्यभाव:
न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष:
चिदानन्दरूप: शिवोSहं  शिवोSहम्॥३॥
अर्थ-
अर्थाच्या दृष्टीने स्तोत्र सोपेच आहे. अनुभूती कठिण आहे ,प्रतीती सोपी आहे.
मी (फक्त) प्राणसंज्ञक नाही.पंचप्राण प्रसिद्ध आहेत.
श्रोत्र-नेत्र-वक्त्र-घ्राण-मन म्हणजेच प्राण .
पंच वायु म्हणजे मी नाही.
 प्राण-अपान-समान-व्यान-उदान हेच ते पाच वायू जे शरीराला सक्रिय ठेवतात.
शरीराला धारण करणारे तत्त्व म्हणजे धातू. ते सात प्रकारचे आहेत.रस-रक्त-मांस-मेद-अस्थी-मज्जा-शुक्र ,  हे  सात धातू म्हणजे मी नाही.
अन्नमय-मनोमय-प्राणमय-विज्ञानमय-आनंदमय- कोश हेच ते पाच कोश. (आधीच्या चिंतनात यावर सविस्तर लिहिलेय.) हे पाच कोश म्हणजे मी नाही.
वाणी-हात-पाय-जननेंद्रिय-गुदद्वार हे पाच कर्मेंद्रिय म्हणजे मी नाही.
श्लोक एक व दोन मध्ये शरीर-इंद्रियादि अवयव म्हणजे मी नव्हे . हे स्पष्ट केलेय.या सगळ्यांच्या पलीकडे जे चिदानंद रूपी परमतत्त्व शिव आहे ,तेच मी आहे.
आता तिस-या श्लोकात मला षड्रिपु नाहीत आणि चार पुरुषार्थ म्हणजे मी (जीवात्मा) नाही .
द्वेष-राग-लोभ-मोह-मद-मत्सर हे सहा शत्रू म्हणजे नकारात्मकभाव यांच्या पार मी आहे.
तसेच धर्म-अर्थ-काम-मोक्ष हे चार पुरुषार्थ म्हणजे मी नाही.
या श्लोकात शरीराच्या आतील मानवीभावना व मानवी कर्तव्य यांच्या पलीकडे "मी" आहे ,हे सांगितले आहे.
ज्यामुळे मानवी जीवन गुंतागुंतीचे ,तणावाचे होते; त्या नकारात्मकभावना म्हणजे मी नाही .हे समजणे व त्यानुसार वर्तन करणे हे महत्वाचे.
 साक्षात् शंकराचार्यांचा हा श्लोक असल्यामुळे  त्यांत त्यांच्या प्रत्यक्ष अनुभूतीचा  भाग आहे. आपण मात्र "काशीस जावे नित्य वदावे" सारखे मनापासून अलिप्त-तटस्थ रहाण्याचा प्रयत्न करावा.
त्याच वेळी  त्या  परमतत्त्वाशी सतत अनुसंधान ठेवावे.
सारखे "चिदानन्दरूप: शिवोSहं  शिवोSहम्" असे मनाला बजावत रहावे.

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Thursday, March 9, 2017

स्तोत्र-चिंतन: भाग-१

९.३.२०७
#स्तोत्र-चिंतन :भाग-१
आदि शंकराचार्यांनी अनेक स्तोत्र लिहिली आहेत. स्तोत्र शब्द स्तु (स्तव्)= स्तुती करणे या मूळ धातू पासून तयार झालाय. स्तोत्र म्हणजे स्तुती करण्याचे साधन.
स्तोत्र ,नेत्र ,गात्र,वक्त्र,जनित्र,यंत्र,मंत्र हे शब्द एका प्रक्रियेने तयार झालेय.यावर मी आधी शब्दचिंतन लिहिलेय. असो.
मला  काही स्तोत्र ,अभंग ,कविता आतून प्रेरणा देतात ,निराशेतून बाहेर काढतात ,किंवा अत्यानंदात सावरतात ,माझ्यातल्या मला चिदानंदित करतात. त्यापैकी आदिशंकराचार्यांचे "निर्वाणषटकम् किंवा आत्मषटकम् " हे एक आहे.
श्री श्री रविशंकरांच्या उपासनापरंपरेत अतिशय आर्त नि हार्द गायलेय हे स्तोत्र.
त्यातील एकेका शब्दात इतका खोल अर्थ आहे किंवा सखोल समजून घेऊन ते स्तोत्र ऐकले तर खरोखर 'ब्रह्मानंदी टाळी' हमखास लागते.
मी जेव्हाही काही लिहिते ते माझ्या आनंदानुभूतीतूनच ."सद्यपरनिवृत्तिये" हाच एकमेव हेतू लेखनाचा. त्यातून इतरांना फायदा झाला तर सोन्याहून पिवळे. बाकी आनंदच आनंद.
या लेखमालेत "आत्मषटकम्" मला जसे समजले ,उमजले ,माझ्यात रुजले ते मांडणार आहे.
श्लोक (१)
मनो बुद्ध्यहंकार चित्तानि नाहं
न च श्रोत्रजिव्हे न च घ्राण नेत्रे
न व्योमन् न भूमिर्न तेजो न वायु:
चिदानंद रूप: शिवोsहं  शिवोsहं  ॥१॥
अर्थ =चार आन्तश्चतुष्टय  म्हणजे  मन ,बुद्धी, अहंकार, चित्त . हे चार इंद्रिय म्हणजे 'मी' नाही.
कान ,जीभ ,नाक, डोळे हे ज्ञानेंद्रिय म्हणजे 'मी' नाही. आकाश -पृथ्वी-तेज-वायु ही महाभूते  म्हणजे 'मी 'नाही . तर 'मी' चित् आनंद रूप शिव आहे. मी शिव आहे.
स्पष्टीकरण..
आध्यात्मिक-आधिभौतिक व ज्ञानेंद्रिय म्हणजे मी नाही .  मी  तर  एक वैश्विक-चिरंतर-चिन्मय  परमात्मा आहे. मी परमतत्त्व शिव आहे.
बस ,या एका अोळीने आपल्यातल्या एकटेपणाची -असहायतेची-मरगळलेपणाची-अगतिकतेची भावना पूर्ण नष्ट होते.त्या वैश्विक शक्तीशी सरळ जोडले जातो. त्याच वेळी वरच्या पंक्तीतींचे मनन केले की उगाचचा वाढलेला अहं नष्ट होतो. "मी" करतो ,माझ्यामुळे हे झालं ,माझ्याशिवाय पान हलत नाही वगैरे वगैरेतील फोलपणा सहज लक्षात येतो. अकारण कर्तृत्वभाव सरतो.तटस्थभाव-साक्षीभाव वाढतो.
पुढचे श्लोक पुढील भागात घेणार.
©DR.PRADNYA DESHPANDE.



Sunday, March 5, 2017

#चिंतन

६.३.२०१७

#चिंतन
भाषा मग ती कोणतीही असो . तिचे स्तर असतात, बाळबोध पासून ते प्रगल्भ पर्यंत. सामान्य लोकं प्रगल्भ भाषेला कठिण-क्लिष्ट-व्याकरण प्रचुर समजतात.मुळात प्रत्येकाने भाषाशिक्षणाची सुरवात    स्वत:च्या स्तरातून करावी नि विकसित होत होत प्रौढभाषा नक्की योजावी. याने मेंदूचा  विकास होतो.
आज टूमच निघालीय की व्याकरण/-हस्वदीर्घ नकोच . संस्कृतप्रवण नको.इतर भाषा चालतील वगैरे.  हा विचार अगदीच चूक आहे असे मला नाही वाटत ,कारण प्रत्येकाचा भाषिकस्तर. प्राथमिकस्तरावरील लोकांना दैनंदिन जीवन जगताना खरोखर प्रौढ भाषेची गरजच नाही.
 त्यांच्यासाठी सोपी ,व‍ाच्यार्थयुक्त ,कमीतकमी व्याकरणाची ,व्यवहाराला सोयीची भाषाच असणे गरजेचे आहे.शेकडा नव्वद टक्के लोकांना अशाच भाषेची आवश्यकता असते .
 दहा टक्के लोकांना प्रौढ-प्रगल्भ भाषा येते ,समजते .ते तीच भाषा योजतात.
 "त्यांनीपण आमच्यासारखे बाळबोध बोलावे ,लिहावे .प्रौढभाषा असूच नये.अमूक एका भाषेच्या प्रभावाने आलेले व्याकरण कठीण म्हणून सरसकट काढूनच टाकावेे " हे म्हणणे अतिरेकीपणा होय.
 व्याकरण ,प्रौढशब्द योजना यामुळे बौद्धिकविकास होतो. लहान वयात उंची कमी असेल तर उंच काठीवर लटकण्याचा व्यायाम सांगतात. ज्याची उंची कमी असते त्याला अशा लटकण्याचा पहिले त्रासच होतो.पण ताणाशिवाय स्नायु ताणले जात नाही नि उंची वाढत नाही. तसेच भाषिकविकासासाठी साध-सोप-सरळ हे सुरवातीला ठिक आहे .बौद्धिकताण देणे भाषिक विकासासाठी अनिवार्य आहे. बौद्धिकताण व्याकरणातून ,भाषाशास्त्रातून येतो. तो गरजेचा आहेच. बरेचदा शिकणारा -शिकविणारा यांच्यातील    अपूर्ण शिक्षणक्रियेमुळे "कठिणता" वाढते.त्याचा दोष सरळ त्या भाषेवर टाकणे समंजसपणाचे लक्षण नाही.
 "व्यक्तीचा परिपूर्ण विकास" हेच शिक्षणाचे ध्येय असावे. पण प्रत्येकाच्या परिपूर्णतेला त्याची वैयक्तिक पात्रता असावी लागते हेही लक्षात घेतले पाहिजे.मला येत नाही मग ते कोणालाच नको ही समता नव्हे .विकासाचे दार प्रत्येकासाठी खुले ठेवावे .कोणी अधिक विकसित असेल तर त्याची प्रगती खटकण्या इतकी मनाची गरीबी नसावी.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Saturday, March 4, 2017

5.3.2017

#चिंतन ~ पंचकोश.




सर्व सजीवांमध्ये मानवा इतकी गुंतागुंत कोठेच आढळत नाही. पंचमहाभूते ,पंचज्ञानेंद्रिये,पंचकर्मेंद्रिये यांनी तयार झालेले पंचकोशयुक्त जीवात्मा म्हणजे मानव.
अन्नमयकोश ,प्राणमयकोश,मनोमयकोश,
विज्ञानमयकोश,आनंदमयकोश हेच ते पाच कोश जे प्रत्येकात असतात. प्रत्येक मानवीचैतन्य  या पाच आवरणांनी झाकले असते.
अन्नमयकोश सगळेच अनुभवतात.
प्राण ,ज्यामुळे आपण जिवंत आहोत,श्वास घेतो त्याची पण जाणीव असते सगळ्यांना .
मन ,जे वढाय वढाय असते ,जे अचपळ असते ,जे मानवीवृत्तीला बहिर्मुखी करते ; त्याचे आवरणही सगळ्यांना सापेक्षतेने पटते. विज्ञानमयकोश यातील विज्ञान हा शब्द आजकालच्या सायंसशी संबंधित नाही. ज्ञान म्हणजे  जाणून घेण्याचे  साधन . परमात्मा हा ज्ञेय म्हणजे जाणण्या योग्य आहे. आपण (जीवात्मा) ज्ञाता आहोत. विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान. ज्ञानाचे फळ म्हणजे विद्या.
आज विद्या म्हणजे ज्ञान म्हणजे डिग्री समजतात तसे इथे  अपेक्षित नाही.
या जगात (भौतिक सुखात) जगण्यासाठी जी लागते ती अविद्या. मात्र जी निर्वाण ,मुक्ती ,मोक्ष म्हणजेच स्थिरशांती देते तीच विद्या होय. अशी विद्या मिळविण्याचे साधन म्हणजे ज्ञान, विशेष रितीने मिळविण्याचे साधन म्हणजे विज्ञान.
तर अशा विज्ञानाचे आवरण सजीव चैतन्याभोवती असते. हे आवरण सगळ्यांना असले तरी त्याची जाणीव बरेच जणांना नसते. त्या पलीकडे आनंदमयकोश आहे. तो तर जाणीवेच्या पलीकडेच असतो ,अनेकांच्या आयुष्यभर.
"तुझे आहे तुजपाशी परि तू जागा चुकलासी "
अशीच सार्वत्रिक अवस्था असते. चिन्मय जीवात्मा सतत आनंदमय कोशाने व्यापला असतो.
जीवसृष्टीचे मूळ आवरण आनंद ,सहजानंद ,नित्यानंद ,पूर्णानंदच असते. संग्रह करण्याच्या ,अहं+काराच्या ,ममत्वाच्या स्वभावामूळे आपण या चिरंतन ,अखंड ,अविरत आनंदाला आपल्यापाशी धरून ठेऊ इच्छितो.
मग तो सापेक्ष होतो ,क्षुद्र होतो,डागाळतो .
जितकं जितकं निखळ ,सरळ, सरस ,उपाधीरहित जगावे तितका  "आनंदमयकोश" अधिक विस्तारतो.
उदाहरण म्हणजे आदरणीय डॉ. ए.पि.जे.अब्दुलकलाम .
इतके उच्चपदस्थ ,जगन्मान्य पण निरागसतेमुळे सतत आनंदी रहात. मोठेपणाची झुल चढूच दिली नाही त्यांनी .
त्यांचा विज्ञानमयकोश व आनंदमयकोश विशेष जागृत असेलच. असाच आदर्श आपणही बाळगावा.
खरे तर प्रत्येकजण स्वत: आतून आनंदीच असतो. मानवीमूळ प्रवृत्ती आनंदाचीच आहे. मन नकारार्थी ,निराशायुक्त विचारांनी प्रदूषित होते .अन् असे प्रदूषित मन आनंदमय कोशाला झाकाळून टाकते.मग वस्तु,व्यक्ती,परिस्थिती यातून आनंद मिळविण्याचा प्रयत्न केल्या जातो. पण अशा आनंदाने समाधान ,शांती मिळत नाही.
भौतिकसुखाचा त्याग करा असा अर्थ नाहीच . पण आतील निखळ आनंदाला जाणा,जपा आणि जगा हेच महत्वाचे.
"लागा चुनरी में दाग ...." किंवा "मैली चादर अोढ के कैसे ..." आदि गाण्यातून हेच ऄनंदाचे तत्त्वज्ञान सहज सांगितले आहे.
कधी हिंदीगाण्यातील आध्यात्मावर चिंतन लिहीन.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Friday, March 3, 2017

अभाव.

#शब्दचिंतन
०૪.०३.२०१७
अभाव म्हणजे नसणे. हाच रूढ ,प्रचलित अर्थ आहे. भाव म्हणजे असणे .
मूळात भू(भव्) असा धातू आहे, होणे (To Be)या अर्थी .
भाव म्हणजे ज्याचे अस्तित्व आहे ,तो.[अस्तित्व शब्द पण चिंतनीयच आहे ] .या "भाव " कृदन्ताचे हे नकारार्थी रूप आहे. म्हणजे  ज्याचे अस्तित्व नाही ,तो अभाव.
नैयायिकांनी या जगाला सात पदार्थात विभागले आहे.त्यापैकी शेवटचा पदार्थ "अभाव"आहे.
 सूक्ष्म अन्वेक्षण ,खोल तर्क हे नैयायिकांचे वैशिष्ट्य होय.त्यांच्या मते ,अभाव ही शुद्ध वर्तमानकाळातील  अवस्था आहे. अभाव हा एक नाही तर तीन प्रकारचा असतो.
(१) पूर्वी होता पण आता नाही.
(२) आता नाही पण पुढे असू/होऊ शकतो.
(३)पूर्वी नव्हता ,आताही नाही ,पुढेपण होणार नाही.

खरेच एखादी गोष्ट आज नाही म्हणजे ती पूर्वी नव्हतीच असे म्हणणे योग्य नाही .तद्वत आज नाही म्हणजे पुढे होणारच नाही याची पण खात्री देता येत नाही.
व्यवहारात "अभाव" हवाच,नाहीतर भाव जातो. शेतक-यांचेच पहा ना.पीक जास्त आले ,,भाव कमी. पीक कमी आले , अभाव दिसला की भाव वाढतो. अतिसुबत्ता योग्यच नाही. अभाव हवाच.
 दुर्मीळ गोष्टीलाच किंमत असते /भाव असतो.

भाव या शब्दाला (कृदन्ताला) वेगवेगळे उपसर्ग वा शब्द  लागले की त्यातून वेगवेगळ्या अर्थाचे अनेक शब्द तयार होतात. जसे सद्भाव ,प्रादुर्भाव ,प्रभाव ,आपपरभाव ,आवश्यंभाव ,भक्तिभाव ,हावभाव,विभाव,अनुभाव ,
स्वामीभाव,दास्यभाव ,वात्सल्यभाव ,प्रेमभाव,
संचारीभाव इत्यादी.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.