#सहजोक्त
कवी नारायण वामन टिळक.-भाग १
पाचवी ते दहावी माझं शिक्षण "लोकांची शाळा"मध्ये झाले. मुलींची शाळा असल्यामुळे संगीत -हस्तकला आदी मुलींना आवडेल असे विषय होते.पाचवीत प्रवेश घेतला ,पहिल्या दिवशी शाळेची प्रार्थना ऐकली. तेव्हा अर्थ वगैरे कळत नव्हता. पण पुढे १०वी पर्यंत थोडा कळायला लागला.ना वा टिळकांच्या दोन कवितांमधून प्रत्येकी दोन कडवे निवडून ती प्रार्थना तयार केली होती. आज ती प्रार्थना ऐकली की गुरुजनांविषयीचा आदर दुणावतो. आई-बाबांमुळे घरातून नकळत भाषिकसंस्कार होत होते. मिडल्स्कूलमध्ये याच कवींची ,
"वन सर्व सुगंधित झाले
मन माझे मोहून गेले
किती तरी...
स्वर्गास दिव्य वृक्षास
बहर ये खास
असे कल्पिले
असे कल्पिले
मन माझे मोहून गेले
किती तरी......"
ही कविता होती.
जोगळेकरबाईंनी छान शिकवली. घरी बाबांनी
ना. वा टिळकांचे थोडक्यात चरित्र सांगितले.
मग आमच्या शालेय प्रार्थनेचा अर्थ सांगितला.
नंतर "प्रभु मी उणा ...अजूनहि पुष्कळ उणा.." ही कविता सांगितली.त्यात शेवटच्या कडव्यात "ख्रिस्ता ख्रिस्ता.....असे शब्द आहेत. मग बहुसंख्य अन्यधर्मिय ते उच्चारणार नाहीत ,शिवाय ना वा टिळक स्वत: पूर्वाश्रमीचे हिंदू होतेच म्हणून त्यानीच स्वत: होऊन तेथे "क्रिष्णा क्रिष्णा" असा पाठभेद केला. ही दंतकथा सांगितली. त्यावेळे पासून मला ना वा.टिळक आवडू लागले.
पुढे टिव्ही आला, कॉलोनीत दोघांकडे. कोण कौतुक आम्हाला. सगळे कॉलनीवासी दूरदर्शन बघायला सायंकाळी दोन घरी जमत असत. त्यावेळी विजया मेहता यांनी साकारलेली "लक्ष्मीबाई टिळक" स्मृतिचित्रे पाहिले. खूपच भावले. काही काही प्रसंगाने डोळ्यातून पाणी आले. काय बरोबर काय चूक हे सांगायला मी न्यायाधीश नाही. पण जीवनप्रसंगातून माणूस त्याच्या त्याच्या प्रवृत्तीनुसार मार्ग काढतो. "कालाय तस्मै नम:"!
पुढे आमच्या कॉलनीच्या ग्रंथालयातून "सृतिचित्रे" आणून पारायण केले. उरलेला रडण्याचा कोटा पूर्ण केला. स्मृतिचित्रेमधून संपादित केलेला "तू तर माझ्याही पुढे गेलीस .." नावाचा धडा अभ्यासाला होता .
अशा रितीने बालभारती ,जोगळेकर बाई , माझे बाबा नि स्मृतिचित्रे यांनी ना. वा.टिळक समजायला ,आवडायला मदत केली.
पुढच्या भागात त्यांच्या कवितांच्या निवडक कडव्यांचे रसग्रहण लिहीन.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
No comments:
Post a Comment