Sunday, March 12, 2017

सहजोक्त.....२

१२.०३.२०११७


#सहजोक्त......२
पंचतंत्रातील एक कथा .......
एका जंगलात अनेक प्राणी रहात असतात. सिंह 🐯 त्यांचा राजा असतो.तो त्याच्याच विश्वात सहज वावरत असतो.
त्याच जंगलात एक रानडुक्कर नुकते वयात येते. नवा माज चढलेला तो ,स्वत:च्या उन्मत्तावस्थेत जंगलात दहशत निर्माण करतो.
सगळेप्राणी त्याला बिचकून वागू लागतात.  छोटे प्राणी त्याची हाजी हाजी करतात. थोडे मोठे प्राणी त्याच्या दूर राहतात. याला वाटू लागते ,"मी सामर्थ्यशाली आहे,मी पराक्रमी आहे ,मीच प्रभावी आहे."
दिवसोंदिवस त्याचे वलय वाढत असते.🐖  कळत्या वयापासून तो सिंहाचा मत्सर करीत असतो.  सिंहासारखा रूबाब,मान त्याला पाहिजे असतो .सिंहाला याची कल्पनापण नसते.
जंगलातील काही ज्येष्ठ मात्र  याचा मूळ वकूब  अोळखून असतात .पण याच्या विरुद्ध कोणीच बोलत नाही. उलट काही जण त्याला प्रोत्साहित करतात. त्यामुळे हा स्वत:ला अनभिषिक्त स्वामी समजू लागतो.
एक दिवस कोल्हा त्याला सल्ला देतो ,"लोकं तुला समोर राजा म्हणतात पण जो पर्यंत सिंह आहे तो पर्यंत तू खरा राजा ठरणार नाही. तू तर पराक्रमी आहेस . सिंहालाच आव्हान दे . हरव त्याला नि हो राजा."! यालाही हे पटते.
हा दुसरे दिवशी सिंहाच्या गुहेसमोर जातो. जोरात अोडून सिंहाला आव्हान देतो ,"खरा राजा असेल तर बाहेर ये ,माझ्याशी युद्ध कर ."
सिंह शांतपणे बाहेर येतो ,पाहतो  की  रानडुकर नि भोवताल अनेक प्राणी झुंडीने आले आहेत.
सिंह त्याला अतिशय शांतपणे म्हणतो ,"गच्छ सुकरं भद्रं ते.... रानडुकरा ,तुझे कल्याण होवो. तू जा . सगळ्यांना सांग की मी सिंहाला आव्हान दिले नि त्याला जिंकले. "
स्वत्वशाली, अनभिषिक्त सिंहराजाने अशा कमी दर्जाच्या प्राण्याशी युद्ध खेळणे हीच त्या सिंहला कमीपणा आणणारी बाब आहे  ,हे सिंह जाणत असतो.  जसे सोन्याला मोजल्या जाण्याचे दु:ख नसते तर गुंजेसोबत तोलल्याचे जास्त वाईट वाटत असते.
त्यामुळे सिंह न युद्ध करतातच " जा रे डुकरा मी हारलो असे सांग सगळ्यांना "! असे म्हणतो. ज्यांना सिंहाची गुणवत्ता माहित आहे ते विश्वास ठेवणार नाहीत. नि जे विश्वास ठेवतील त्याने सिंहाला फरकही पडणार नाही .सिंह सिंहच असतो.
 नेहमी  तुल्यबळ विरोधकाशीच विरोध करावा ,कच्च्याबच्च्यांशी नाही.....
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

No comments:

Post a Comment