Saturday, March 18, 2017

#स्तोत्रचिंतन-૪

१८.३.२०१७
#स्तोत्रचिंतन-૪
अहं निर्विकल्पो निराकाररूपो
विभूत्वाच्च सर्वत्र सर्वेंद्रियाणाम्
न चासङ्गतं नैव मुक्तिर्न मेय:
चिदानन्दरूप: शिवोSहं  शिवोSहं ॥६॥
श्रीमच्छंकराचार्य विरचित आत्मषटकम् मधले हे शेवटचे पद्य.
या आधीच्या पाच श्लोकांमध्ये "मी" कोण नाही? हे सांगितले आहे.
आता या श्लोकात नेमका "मी" कोण ? हे सांगितले आहे.
शंकराचार्य म्हणतात....मी निर्विकल्प आहे. मनाचे दोन गुण असतात ,(१)संकल्प (२)विकल्प. मनात ही दोन द्वंद्वे सतत सुरु असतात.ईशभावनेने संकल्प वाढीला लागतो.
समाधीपण दोन प्रकारच्या असतात ,(१)सविकल्प समाधी (२)निर्विकल्प समाधी
तत् त्वमसि। (ते परम तत्त्व म्हणजे तू आहेस)।अयमात्मा ब्रह्म।(हा आत्मा म्हणजे ब्रह्म होय )
प्रज्ञानं ब्रह्म। (ब्रह्म जाणून घ्यायला हवे )
अहं ब्रह्मास्मि ।(मी ब्रह्म आहे )
या चार वाक्यांना महावाक्य म्हणतात.
पैकी पहिले तीन उपदेशपर म्हणजे गुरुने शिष्याला सांगितलेले आहेत.तर शेवटचे अनुभूतिपर वाक्य आहे.जेव्हा निर्विकल्प समाधीतून वा आत्मसाक्षात्काराने खरे ज्ञान होते तेव्हा
"मी निर्विकल्प ,निराकाररूप आहे" हे समजते.
विभूत्वामुळे ,(विभू म्हणजे शक्तिशाली) सर्व इंद्रियांमध्ये सर्वत्र आहे.
आणि मी असंगत नाही. नेहमी सुसंगत आहे.म्हणजे "मी" उगाच,अकारण नाही .नेहमी योग्यच आहे.वरवर जरी व्यर्थ-फालतू वाटले तरी त्यात संगती आहे.
मला मुक्ती नाही. (जसे ऊर्जा नित्य व स्थिर असते तसेच ब्रह्म स्थिर असते.म्हणून त्याला जन्म-मृत्यू-मोक्ष-मुक्ती नसते.)
मी मेय नाही ,अमेय आहे. जगात ज्या ज्या प्रकारे मोजदाद करतात त्या कोणत्याही  परिमाणाच्या बाहेर मी आहे.
 मेय म्हणजे मोजण्या योग्य . अमेय म्हणजे अगणित,अमर्याद ,अनादि-अनंत .
 मी चित् आनंद रूप शिव आहे.शिव आहे .शिव आहे.
असे हे निर्वाणषटकम् किंवा आत्मषटकम्  यथामती इथे मांडले.🙏🙏🙏
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

1 comment: