वेगवेगळ्या स्वभावांचे लोक जगात आहेत
म्हणूनच जग जगत आहे , नाहीतर साचेबद्धच असते ना !
मी स्वीकारतेही मनापासून
ज्याचे त्याचे वेगळेपण.
जपते ज्याचे त्याचे अस्तित्व त्याच्या त्याच्या परी.
बघून जवळच्यांचे वागणे , क्वचित निराशा येते मनात .
वेगळेपण स्वीकरणं तर दूर त्यांच्यासारखं करण्याचा घाट .
मी माझ्यासारखी न रहाता मिसळून जावी त्यांच्यात .
असेच अखंड प्रयत्न सुरूच असतात दिनरात .
जरा त्यांना समजावून घेत वागले मनासारखे त्यांच्या
की लगेच कौतुकाने , थोपटतात पाठीला स्वतःच स्वतःच्या.
'बघ कसं वागवतो आम्ही छान ',
लादतात स्व-अपेक्षा कुरवाळत स्वतःचा अभिमान .
आश्चर्यच वाटतं मग त्यांच्या अशा वागण्याचं ,
खुमखुमी जपत सगळ्यांना एकाच मर्जीने वागविण्याचं .
स्वतःवर संतुष्ट नसलेले व दुस-याला समजतात साधन
विविधतेत भर टाकण्याचे ठरतात आधान .
आत्मविश्वासहीन हे लोकं साशंक स्वतःवरही
दुस-याच्या सच्चेपणावर विश्वास कसा बाळगतील ?
उणे शोधणारे अतृप्त जीव सतत, असमर्थ परिपूर्ण संचासही ठरतात .
कळतं त्यांना की दोष आहे स्वतःत ,
कबुलीचे प्राजळ धैर्यच नसते त्यांच्यात.
'आम्ही असेच' याचेही भूषण बाळगतात काही जण.
तर दुस-यावरच खापर फोडतात काही जण.
'या पार या त्या पार ' हीच गतानुगतिक सवय .
मोडायची हिंमत नसते त्यांच्या मनात .
तत्वतः विभिन्नता मानणे न् व्यवहारात जपणे ,
यात अंतर आहे जमीन अस्मानाचे .
अशांसह जगताना असते खरी कसोटी आपल्याच तत्वाची न् आपल्याच जगण्याची .
विभिन्नतेसह जगताना पडझडच होणार
जिवंत चैतन्यांश आपण यातूनही निखरून बहरणार .
यातूनही निखरून बहरणार .
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
No comments:
Post a Comment