Saturday, May 30, 2020

सहजोक्त.

#शब्दचिंतन
 "माझं झालं बर समाधान" ,  'आहे त्यात समाधान मानणे", "ठेविले अनंते तैसेचि रहावे चित्ती असू द्यावे समाधान"... वगैरे अनेक वाक्यांतून समाधान हा शब्द कानी पडतो.

 समाधान ही एक मनो-अवस्था आहे. तृप्त होणे , मनातून संतुष्ट होणे म्हणजे समाधान पावणे असे साधारण आपण समजतो. व्यवहारात ते बरोबर आहे .

"समाधान"  ह्या शब्दावर विचार करताना लक्षात आलं की सम+आधान  ज्याने मिळेल तेच समाधान .
आधान म्हणजे स्थान , ठिकाण , ज्याच्या आधाराने ठेवता येतं ती बाब . सम म्हणजे सारखे , समान वगैरे.
आधान कशाचे ?  तर आनंदाचे. जेव्हा आनंदाची अनुभूती देणा-याला न् घेणा-याला  सम प्रमाणात प्राप्त  होईल  तेव्हा ते खरे  "समाधान" होईल .

उदाहरणार्थ  लाडक्या मुलांसाठी आई अतिशय मायेने काही पदार्थ बनविते. मुलेही मनापासून खातात .  त्यांना  आनंदाने , पोटभरून  खाताना पाहून आईचे श्रम सफल होतात. मुले जेव्हा मनातून म्हणतात  , "किती छान झाला ग हा पदार्थ , वा मजा आली खाताना !" तेव्हा त्या पदार्थ निर्मिती पासून ते पदार्थ उपभोगापर्यंतच्या प्रक्रियेत सहभागी  झालेल्या प्रत्येकात त्या आनंदाचे सम+आधान होते .  त्यातून त्या सर्वांना  समाधान मिळाले.

समाधान ही एकेरी मानसिक अवस्था नसते. त्या प्रक्रियेत जे जे म्हणून सहभागी असतात ते सर्वच समान अनुभूतीच्या पातळीवर आले की खरे समाधान होते.

आणि एक  , समाधान ही जरी मानसिक  , भावनिक अवस्था असेल तरी तिची अभिव्यक्ती करणे हे सगळ्यांच्याच हिताचे असते.  त्याने आनंद शतपटीने पसरत जातो न् सुख वाढते. (सुख म्हणजे काय ?याचे चिंतन पूर्वीच केले आहे.)
सुरुवातीला तीन वाक्य उदाहरण म्हणून दिली आहेत . त्यातील पहिल्या दोन वाक्यात  समाधान शब्द जरी योजला तरी  तेथे समाधानाची पूर्ती नाही. कारण समाधान हे एकट्याचे नसतेच .
तिसरे वाक्य मात्र समाधानकारकच आहे!  कारण चित्ताच्या समाधानाच्या प्रक्रियेत अनंत म्हणजे ईश्वर आहे . तो  चांगले ठेवतो याची खात्री व अनुभव असल्यामुळे देव नि भक्त यांना "सम+आधान" असणारच.
तर अशा  ह्या  सम+आधानात जितके  वाटेकरी जास्त तितके त्याचे प्रमाण ही जास्त !  झाले ना समाधान ?
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.





No comments:

Post a Comment