Sunday, May 31, 2020

सहजोक्त.


*पीनो देवदत्तः दिवा न भुङ्क्ते।*
 लठ्ठ देवदत्त दिवसा जेवत नाही. शास्त्रग्रंथांमध्ये (न्याय-वैशेषिक-सांख्य) हे वाक्य सामन्यपणे वाचायला मिळते. अर्थापत्तीचे उदाहरण म्हणून या वाक्याचा उपयोग करतात.  ज्या अर्थी देवदत्त दिवसा जेवताना दिसत नाही तरीही लठ्ठ आहे म्हणजे तो रात्री भरपूर जेवतो , हा सरळ तर्क  आहे.
  वरील वाक्य प्रतिनिधिक आहे. 
    पैशांचा अपहर न करणारे (कोट्याधीश) , एकपत्नीत्व निष्ठेने पाळणारे (अनेक मानलेल्या राधा असणारे) , अतिशय कर्तव्यकठोर (कोणत्याही मार्गाने हवे ते पदरात पाडून घेतल्यावर) , सत्यासाठी झगडणारे (त्यांच्या सोयीचे सत्य)  असे नाना प्रकारचे देवदत्त (आणि हो ,देवदत्ती सुद्धा <महिला समानता>) अवती भवती सुखाने वावरत असतात. 
 आपल्याला   वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या स्तराचे अनेक देवदत्त अनुभवायला मिळतात. 
 आठवा बरे तुम्ही , तुमच्या माहितीतील देवदत्त ,
 अन्  *पीनो देवदत्तः दिवा न भुङ्क्ते।* या उदाहरणाची सत्यता पडताळून पहा.
 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Saturday, May 30, 2020

सहजोक्त.

#शब्दचिंतन
 "माझं झालं बर समाधान" ,  'आहे त्यात समाधान मानणे", "ठेविले अनंते तैसेचि रहावे चित्ती असू द्यावे समाधान"... वगैरे अनेक वाक्यांतून समाधान हा शब्द कानी पडतो.

 समाधान ही एक मनो-अवस्था आहे. तृप्त होणे , मनातून संतुष्ट होणे म्हणजे समाधान पावणे असे साधारण आपण समजतो. व्यवहारात ते बरोबर आहे .

"समाधान"  ह्या शब्दावर विचार करताना लक्षात आलं की सम+आधान  ज्याने मिळेल तेच समाधान .
आधान म्हणजे स्थान , ठिकाण , ज्याच्या आधाराने ठेवता येतं ती बाब . सम म्हणजे सारखे , समान वगैरे.
आधान कशाचे ?  तर आनंदाचे. जेव्हा आनंदाची अनुभूती देणा-याला न् घेणा-याला  सम प्रमाणात प्राप्त  होईल  तेव्हा ते खरे  "समाधान" होईल .

उदाहरणार्थ  लाडक्या मुलांसाठी आई अतिशय मायेने काही पदार्थ बनविते. मुलेही मनापासून खातात .  त्यांना  आनंदाने , पोटभरून  खाताना पाहून आईचे श्रम सफल होतात. मुले जेव्हा मनातून म्हणतात  , "किती छान झाला ग हा पदार्थ , वा मजा आली खाताना !" तेव्हा त्या पदार्थ निर्मिती पासून ते पदार्थ उपभोगापर्यंतच्या प्रक्रियेत सहभागी  झालेल्या प्रत्येकात त्या आनंदाचे सम+आधान होते .  त्यातून त्या सर्वांना  समाधान मिळाले.

समाधान ही एकेरी मानसिक अवस्था नसते. त्या प्रक्रियेत जे जे म्हणून सहभागी असतात ते सर्वच समान अनुभूतीच्या पातळीवर आले की खरे समाधान होते.

आणि एक  , समाधान ही जरी मानसिक  , भावनिक अवस्था असेल तरी तिची अभिव्यक्ती करणे हे सगळ्यांच्याच हिताचे असते.  त्याने आनंद शतपटीने पसरत जातो न् सुख वाढते. (सुख म्हणजे काय ?याचे चिंतन पूर्वीच केले आहे.)
सुरुवातीला तीन वाक्य उदाहरण म्हणून दिली आहेत . त्यातील पहिल्या दोन वाक्यात  समाधान शब्द जरी योजला तरी  तेथे समाधानाची पूर्ती नाही. कारण समाधान हे एकट्याचे नसतेच .
तिसरे वाक्य मात्र समाधानकारकच आहे!  कारण चित्ताच्या समाधानाच्या प्रक्रियेत अनंत म्हणजे ईश्वर आहे . तो  चांगले ठेवतो याची खात्री व अनुभव असल्यामुळे देव नि भक्त यांना "सम+आधान" असणारच.
तर अशा  ह्या  सम+आधानात जितके  वाटेकरी जास्त तितके त्याचे प्रमाण ही जास्त !  झाले ना समाधान ?
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.





Friday, May 29, 2020

#सहजोक्त.



नाति धैर्यं प्रदातव्यम्
नाति भीतिश्च रोगिणि ।
नैश्चिन्त्यानादिमे दानं
नैराश्यादेव  नाऽन्तिमे ॥
 कलिविडम्बनम् नावाचे एक रंजक-काव्य , महान संस्कृत कवी  निलकंठ दीक्षित यांनी रचले आहे.
या काव्यात विडम्बनातून सामाजिकवृत्तींवर  प्रहार केला आहे.

वरील श्लोकात कवी वैद्याला(डॉक्टरला)  सांगतो , की  , " रोग्याला अतिशय जास्त धीर देऊ नये. तसेच अतिशय जास्त निराशही करू नये . पहिल्या परिस्थितीत रोगी मनातून निश्चिंत होतो न् दान (फीज) देत नाही तर शेवटच्या परिस्थितीत रोगी जगण्याची उमेदच हरवून बसतो म्हणून दान (फीज) मिळत नाही.

श्लोक तसा वैद्यांना समुपदेशन आहे. रोग्याच्या मानसिकतेला जपूनच उपचार करावा जेणे करून सतत आवक र‍हील.
हीच बाब सर्वच क्षेत्राला लागू होते ना ?
"इतकेही ताणू नये की तुटून जाईल , नि इतकेही जुळू नये की अस्तित्वच र‍हणार नाही"
खयाल अपना अपना , नसीब अपना अपना ....
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Wednesday, May 27, 2020

सहजोक्त

शब्दचिंतन .
शब्दधन आम्हा शब्दचि साधन
शब्दांनीच होती जीवन अर्थपूर्ण ॥
शब्द अन् त्याचा अर्थ किंवा अर्थ न् त्यासाठीचे शब्द या दोहोंचे सुंदर नाते सांगणारा कालिदासाचा श्लोक आहे. वागर्थाविव संपृक्तौ वागर्थप्रतिपत्तये ।
जगतः पितरौ वन्दे पार्वतीपरमेश्वरौ । । १.१ । ।(रघुवंश-पहिल्या सर्गातील पहिला श्लोक) कलिदासासारखा सिद्धहस्त शब्दप्रभु म्हणतो की वाणी आणि अर्थ यांच्यासारखे एकमेकांत मिसळून गेलेल्या ,एकजीव झालेल्या शब्दसृष्टी व जीवसृष्टीचे जनक असे पार्वती-शंकर यांची वाणी व अर्थ यांच्या प्राप्तीसाठी प्रार्थना करतो .
तर असे हे शब्द न् त्याचे अर्थ जणु शिवपार्वतीसारखे एकजीव झाले आहेत. असे सार्थ-शब्द योग्य प्रकारे वापरले तरच हे अमोघ होतात ,नाही तर आहेच शब्दबंबाळलेपणा ! शब्द ही शक्ती अाहे ,असे साहित्यकारच नाही तर भौतिकशास्त्र देखिल म्हणते. साऊंड म्हणजे ध्वनी आणि शब्दाचे मूळ ध्वनीतच असते. शक्ती म्हणजेच ऊर्जा . ऊर्जा एका रूपातून दुसरे रूप सहज धारण करीत असते म्हणुन ऊर्जा सांभाळून वापरावी. मग शब्द देखील जपूनच वापरावेत , होय ना ?
शब्द नेहमी सार्थ म्हणजे अर्थपूर्ण असावेत , निरर्थ , व्यर्थ नकोत. त्यातल्या त्यात व्यक्ती , घर , वस्ती , गाव , पाळीव प्राणी इत्यादी इत्यादी यांची नावे सार्थच असायला हवीत.
जुन्या काळी देवादिकांवरून अपत्यांची नावे ठेवत .त्यात दोन हेतू असे , एक तर देवाचे मंगलमय नाव सारखे तोंडात येई , दुसरे नाव सार्थच असे.
आपल्या अोळखीच्या कितीतरी व्यक्तींची नाव राम , कृष्ण , राधा ,रमा , विष्णु , शंकर , महादेव , गंगा इत्यादी असतात. ही देवांची नावं आहेत ,हे खरेच पण त्यांना छान अर्थ आहे . जसे े ज्यात रममाण होते (मन) तो राम . (मन) आकर्षून घेतो तो कृष्ण , राध् म्हणजे ऐश्वर्य राधा म्हणजे ऐश्वर्यवती , रमा म्हणजे जिच्यातमन रमते अशी लक्ष्मी , विष्णु ,शिरण्याची /व्यापण्याची इच्छा असलेला , शंकर म्हणजे जो शम् (कल्याण) करतो , गंगा म्हणजे जी सारखी पुढे जाते.
शब्दकोशांमध्ये शब्दांचे अर्थ उलगडून दाखविले असतात , तसेच त्यांचा उपयोग कुठे ,कोणत्या संदर्भात केला याचेही सोदाहरण उल्लेख केला असतो. अापटें ,मोनारविल्यम इत्यादी आधुनिक कोश यासाठी उपयुक्त ठरतात. जुन्या शब्दांप्रमाणे आजकालचेही शब्द , शब्दकोशपद्धतीने मांडणे ,मोठा मनोरंजक उपक्रम ठरतो. संस्कृत मध्ये अमरकोशादी अनेक कोश उपलब्ध आहेत. त्यात शब्दांना पर्यायी शब्द दिले असतात. अमरकोशाच्या धर्तीवर मराठीतील खिडकी या शब्दाचे एक विडंबनपर उदाहरण असे , " विंण्डो-वातायनो-खिडकी-गवाक्षो-भोंक भिंतीचे !" असे मनोरंजनपर अाधुनिक कोश ,आपणही तयार करू शकतो.
शब्दांना मुळात काही अर्थ असतोच , तो समजून घेणे फारच रंजक आहे .काही शब्द आपण समानार्थी म्हणून योजतो . वरवर वाचताना ते समानार्थी वाटतातही .उदाहरण म्हणून झाड शब्दाचे समानार्थी शब्द बघू . जसे पादप (मुळांनी पाणी पिणारा ), महिरूह (जमीनीवर उगवणारा) , शाखी (फांद्या असलेला) , विटपी (कक्षीगत कोंब असलेला) , तरु ((जमीन फोडून बाहेर येणारा) , वृक्ष( छाटल्या जाणारा) . म्हणजे या प्रत्येक शब्दातून झाडाचा एकेक गुण दिसून येतो.
" शाखा " हा शब्द फांदी या अर्थाने आपण सहज वापरतो . शाखा शब्दाची उकल अशी करतात , "खे शयति इति (आकाशात झोपतात ) " , म्हणजे फांदी आकाशात पसरलेली असते ना म्हणून .
शब्दांची मुळापर्यंत अशी उकल करणे हे भाषेच्या श्रीमंतीचे लक्षण आहे. यास्काचार्य लिखित निरुक्त नामक ग्रंथात अशा कितीतरी शब्दांचे अर्थ उलगडून सांगितले आहेत. अर्थ उलगडून सांगण्याच्या निरुक्तातील पद्धतीला निर्वचने असे म्हणतात. जुन्या शब्दांची निर्वचने वाचून नव्या शब्दांना ती लावून पाहाणे , उत्तम चाळा ठरेल.
शब्दांशी , त्याच्या अर्थांशी अशी गट्टी झाली की पुढची पायरी आहे की इतर भाषांमधील त्याच अर्थाचे शब्द व आपल्या भाषेतील तो शब्द , यांच्यात झालेले परिवर्तन (खरे तर भाषा-अंतर) अोळखणे ,आपली भाषा व दुसरी भाषा यांच्या विकासाची पाऊलवाट अोळखणे इत्यादी होय.
एक उदाहरण बघू या. संस्कृत मध्ये "भ्रमर" हा शब्द आहे . विविध भारतीय भाषांमध्ये या अर्थाचे आलेले शब्द पाहू बरे !
भ्रमरः ( संस्कृतम् )
भमरो (पाली)
भँवरा ( हिंदी )
भुंगा ( मराठी )
ભમ્મર ( गुजराती - भम्मर )
ভ্রমর ( बांगला - भ्रॉमोर )
ਭਰਿਂਗ ( पंजाबी - भरिंग )
बुमरो (काश्मिरी)

भँहर (ऊडिया ) 

Bumblebee ( इङ्ग्लिश)
उच्चारणाचे मुख्य साधन म्हणजे "मुख" होय. भौगोलिक परिस्थिती ,मुखवैविध्य यामुळे भाषांमध्ये बदल दिसून येतो. वरचे एक उदाहरण बघून ठळकपणे लक्षात येते. भारतीय भाषांमध्ये परस्पर साहचर्य व स्नेह टिकून राहण्यासाठी असे भाषा-अंतर समजून घेणे काळाची निकड आहे.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

सहजोक्त..

हंसान्योक्ति
कस्त्वं लोहितलोचनास्यचरणः हंसः कुतो मानसात् । किं तत्रास्ति सुवर्णपङ्कजवनान्यनम्भः सुधासन्निभम् ।
रत्नानां निचयाः प्रवालमणयो वैदूर्यरोहाः क्वचित् । शम्बूका अपि सन्ति नेति च बकैराकर्ण्य हीहीकृतम् ।।
शार्दुलविक्रीडित वृत्तातील ही अन्योक्ती. यात बगळे व हंस यांचा संवाद आहे.
बगळे= लाल डोळे ,तोंड ,पाय असलेला तू रे कोण ?
हंस = मी हंस .
बगळे = कुठून आलास ?
हंस = मानस सरोवराहून ....
बगळे = तिथे काय असतं ?
हंस = सोनेरी कमळांची वने आणि अमृतासम स्वच्छ पाणी ,रत्न -प्रवाळ-मणी यांचे ढिगंच्या ढिगं ,क्वचित वैदुर-पर्वतावरील दुर्मिळ वनस्पती सुद्धा असतात तिथे.
बगळे = तिथे शिंपले असतात कां पण ?
हंस = नाही
बगळे = ही ही ही...!!
बगळ्यांचे आकलनच कमी हंसाने तरी काय करावे ?
आपल्यापेक्षा श्रेष्ठ असलेल्याची खिल्ली उडवावी ,असे कायमच वाटणारे अनेक हीनजन असतात. अनेक अद्वितीय गोष्टी त्यांच्या आकलनाच्या पलीकडे असतात , ज्या त्यांना साधारणपणे खोट्या वा काल्पनिक वाटतात म्हणून कितीही उत्तमपणे समजावून सांगितले तरी त्यांना त्या कळूच शकत नाही. त्यांच्या दृष्टीने उपयुक्त असलेली क्षुद्र बाब तुमच्या जवळ नाही , हे कळल्यावर ते तुमची यथेच्छ टवाळी करतात न् तुम्ही श्रेष्ठ होण्यास कसे नालायक आहात ,हे बहुमताने सिद्ध करतात.

सोने मोजायच्या तराजूने कोळसे मोजयला जावे न् "छे ,उपयोगी नाही", असे म्हणून फेकून द्यावा ,असे आहे.
बगळा-हंस या रूपकातून मानवी मनोव्यापार समजतो.

Monday, May 25, 2020

सहजोक्त.

#दृष्टांत कथा.
आकाशाशी स्पर्धा करणा-या , मोठ्या झाडावर  एक बांडगुळ उपजलं होतं . आपल्या सावलीने इतर झाडांना वाढूच न देण्याचा दोष होताच वृक्षाचा . बांडगुळाना पोसण्याच त्याला धन्यता होती. मोठ्या झाडामुळे त्या  बांडगुळाचाही विहार कायम उंच आकाशातच असे. वाणाचा प्रश्नच नव्हता , गुण मात्र घेतला त्याने.  झाडावर आयते पोसल्या जाणा-या त्या  बांडगुळाने एकदा चुकून खाली पाहिले.

जरा दूर रखरखत्या उन्हात ,  कोणाच्याही मदतीशिवाय जगणारे छोटे गवती झुडूप होते. उन्हामुळे न् मोकळ्या वा-यामुळे जरासे म्लान , सुकले होते ते .
मिळणा-या   आयत्या  पोषणाने बांडगुळ बाळसेदार , तजेलदार होते.

दूरच्या त्या झुडूपाला बांडगुळाने तुच्छ नजरेने बघितले. न् कुजबुजला की ,' छी काय हे क्षुद्र जीव देव निर्माण करतो ना उगाच  ?'
झाड होते मोठे विशाल न् फारच जुने . फांद्यांची जोरजोरात हालचाल करताना ,  कधी कधी दाणकन फळे पाडताना कधीच झुडुपाचा विचारही त्याच्या मनात येत नसे. ते जुडूप कितीदा फांद्यांच्या भाराने , फळांच्या तडाख्याने दबायचे , वाकायचे , झुकायचे. बांडगुळाला यात फारच मजा यायची. 'आपल्या समोर सर्वच झुकतात , आपण ग्रेट ' ,असा त्याचा समज दिवसागणिक वाढायचा.
झुडुपाला खंत वाटायची पण त्याला जगण्यासाठी हे सर्वच सहन करणे भाग होते.

एकदा जोराचे वादळ आले. सारा परिसर वादळाच्या तडाख्याने अस्ताव्यस्त झाला. बांडगुळ आपल्याच भाराने धाडकन कोसळले. जमिनीवर पडल्या पडल्या त्याने परत झुडूपाकडे पाहिले . वादळाने झुकविलेले ते झुडूप आता परत उभे झाले होते.

तेव्हड्यात परत दुप्पट वेगाने वादळी पाऊस आला. जुने मोठे झाड काडकन आवाज करीत अर्धे दुभंगले , अर्धे तुटले न् थोडेसे शिल्लक राहिले . तुटलेला भाग बांडगुळावर कोसळला न्  बांडगुळाचे शकलं शकलं झाली.

इकडे हे झुडूप पार  जमिनदोस्त झाले . वारा-पाणी-गारा यांच्या मा-याने गतप्राण झाल्यासारखे निपचित पडून राहिले.
काही काळाने वादळ शांत झाले . भयंकर पडझडी नंतर झाड कसेबसे सावरले. त्याची मुळे खोल खोल जमिनीत रुतलेली असल्यामुळे  पुन्हा त्याने जीव धरला न् आता ते आता जमिनीशी घट्ट रुजून  जगू  लागले.
बांडगुळाचे अस्तित्व संपले होते . झुडूप मात्र परत पहिले सारखे  जगत होते.

# द्राष्टांतिक = ? तुम्हीच विचार करा न् सुचवा.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.


Sunday, May 24, 2020

सहजोक्त

चकवा
आमच्या लहानपणी खेड्यातल्या स्त्रिया , उन्हाळ्यात शेतावरची कामे कमी झाल्यामुळे, जंगलातील र‍ानमेवा गोळा करायला  जायच्या .  उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यामुळे आम्ही देखील खेड्यात असायचो.
एखाद वेळेस त्यातील एखादी बाई घरी यायची आईशी गप्पा मारायला किंवा काही विचारपूस करायला.
नव्वद टक्के आदिवासी गाव ते. भुताखेत , करणी , जादुटोणा , आग्यावेताळ  अशा गोष्टी खुप सांगायच्या तेव्हाच्या खेड्यातल्या म्हाता-या आजीबाई.
जंगलात जाणा-या या मध्यमवयीन बाया देखील 'जंगलात चकवा आहे' , असं सांगायच्या.  त्या गोष्टी  ऐकताना मजा वाटायची पण भयंकर भीतीही वाटायची.  आईला सांगत असलेले किस्से आम्ही पूर्ण कान देऊन ऐकायचो.  एखादा शब्द कळाला नाही की  मध्येच विचारायचो. आई खूपदा रागवायची की मोठ्यांमध्ये बसू नये. पण परत आईच्या पदराशी बसून ऐकत रहायचे , हीपण करमणूकच होती.
एका बाईने सांगितले की ," जंगलात एका जणाला चकवा लागला न् तो त्याच्या मागेच जाऊ लागला . मग तो गायब झाला . काही दिवसांनी तो माणूस पांढराफट्ट होऊन जंगलात मेलेला दिसला ".
हे सगळं ऐकल्यानंतर आईला विचारलं की चकवा काय असतो ? आईने त्यावेळी काही तरी उत्तर दिले. पुढे शाळेत गेल्यावर पुस्तकं वाचू लागले अर्थात अभ्यासाचे नाहीच . कथा-कादंब-यांतून चकवा , भुलवा वगैरे गोष्टी वाचू लागली. न् या अज्ञात गोष्टींची अनामिक भीती सुप्त मनात बसून गेली.
पुढे शिक्षण , संसार , नोकरी यांच्या चक्रात आकंठ बुडले न् तो  अज्ञात भीतीचा चकवा बाजूला पडला , असं वाटलं. सध्या मनन-चिंतन करण्यासाठी वेळच वेळ आहे. मग "खाली दिमाख शैतान का  घर ", धावू लागले.

वास्तवात चकवा असतो कां , याची कल्पना नाही. पण मानवी मनात अत्यंत गुंतागुंतीच्या भावभावना सतत उलथापालथ करीत असतात. आयुष्य कधी सरळ सरळ समोर जाते. तर कधी आडवळणं , खाजखळगे घेत समोर जाते. कधी कधी जायचे एका मार्गाने असते , ध्येय ठरलेले असते मात्र जराश्या  अनवधानाने भलत्याच मार्गाला लागतो. परतीचा मार्ग विसरतो . चुकीच्या कां होईना रस्त्यावरून सतत पुढे गेले की काही तरी प्राप्त होतंच , फरक इतका की ते इप्सित असेलच असे नाही.


पण आयुष्यात चकवा लागला तर ?? .  मुळात चकवा हा भास असतो वास्तव नाही . त्यामुळे त्याच्या मायाजालात अडकल्यावर सुटकेचा मार्ग सापडणं अवघड. पण आपलं पुण्य बलवत्तर असेल , पूर्वसुकृत चांगलं असेल न् गुरुबळ पाठीशी असेल  सुटका होते त्यातून .  अन्यथा आयुष्यातील चकव्यात ऊर फाटेस्तोवर गुरफटून शेवट होतो जीवनाचा. माणूस संपून जातो पण नेमका चकवा कुठे लागला ? केव्हा लागला ? कशाने लागला ? समजत नाही. न् त्यामुळे "पुढच्यास ठेच मागचा शहाणा " असेही घडत नाही.
चकवाग्रस्त माणूस धावधाव धावतो पण (मंझिल ) ध्येय साध्यच होऊ शकत नाही न् शेवटी संपतो.
संसारात काही व्यक्ती  , काही प्रसंग , काही लालसा  मानवापुढे "चकवा" बनून येतात. पार त्यांच्यात गुरफटून टाकतात. एकामागून एक टकळी सुरूच राहाते . धापा टाकत धावत माणूस मेतकुटीला येतो पण चकवा सोडत नाही. न् हाच तो चकवा हेही कळत नाही.
अशा वेळी लॉकडाऊन (म्हणजे सर्व व्यवहार बाजूला ठेवून 'स्व' वर केंद्रित करावं )   किंवा  विपश्यना  करावी त्याने  मन तटस्थ होते न् सूर्यप्रकाशासारखं वास्तव समोर येतं .
त्यावेळी मात्र ,"हुआ सो हुआ"  किंवा "आता काय होणार , जे आहे तेच समोर रेटू" असा विचार न करता त्या त्या चकव्यातून बाहेर पडावे . आपल्या मागे लागलेल्या चकव्यात दुस-याला अोढू नये.  चकव्यातून सुटण्यासाठी जराशीही दया-माया-खंत  बाळगू नये. अन्यथा आयुष्य संपूनही साफल्य , श्रेय मिळणार नाही.
तर असा हा असतो आयुष्याचा चकवा.
ज्याने त्याने शोधावा न् भेदून  बाहेर यावे सहीसलामत त्यातून .
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Thursday, May 21, 2020

#सहजोक्त.


#सकाळची पुण्यकमाई !😊
माझ्या घरासमोर कॉलोनीचा रस्ता आहे न् रस्त्यापलीकडे वॉकिंग ट्रॅक नि ट्रॅकच्या पार मैदान.
लॉकडाऊनमुळे मी घरासमोरच्या ट्रॅकवर  सकाळी फिरते.
 घराच्या प्रवेशदारावर कमान आहे न् कमानीवर एका बाजूने वेल्या मोगरा तर दुसरी कडून दुहेरी-जुई असे वेल आहेत. सध्या मोगरा बहरलाय. (लॉकडाऊन दुसरा बहार!) मोग-याचा वेल जरासा कमानीतून उतरला आहे. सध्या फुलावर असल्याने कटिंगही शक्य नाही. खाली अोघळणा-या वेलींवरही फुले लगडतात.

आज एक गंमतच झाली. चांगल्या कपड्यातील मध्यमवयीन टापटिप मॅड्डम  आमच्या दाराशी उभ्या राहून वेलीला खाली अोढून फूले तोडत होत्या. (अशा प्रकारे फुले तोडण्याला आमच्याकडे फूलं बुरणे म्हणतात!)  मी समोरच रस्त्यापलीकडून ट्रॅकवरून पहात होती.
हाताला घड्याळ  , कानाला ईअरफोन ,खांद्यावर  छोट्या पर्समध्ये लटकलेला  मोबाईल न् या ताई फुले तोडत होत्या. स्वाभाविक मी घराच्या दिशेने चालू लागली. त्या बाईंना मीही त्यांच्याच जमातीतील एक वाटून प्रभात-संवाद घडला .😀
ती = फुलं , देवाला लागतात ना , म्हणून नेतेय.
मी = होय कां ? आमच्याकडेही देव आहे.
ती = इकडले नका घेऊ मीच घेणार ते , तुम्ही त्या बाजूचे अोढा ...
मी = अहो हे घर माझंच आहे.
ती.= मग तुम्हाला बाहेच्या फुलांचं काय करायचंय ? आतले पुरे होतात की .
मी= ??!!! 🙄
ती= देवाला फुलं दिली तर पुण्यच मिळेल ना तुम्हाला.
मी= असं कां !
ती = जरा मन मोठं ठेवावं हो माणसानी !
तुमच्या घरी आहे तर आमच्याही घरी देवच आहे ना !
मी = 🙏 धन्यवाद . पुण्य मिळवून दिल्या बद्दल.

मला कौतुक वाटते या फुलचोर न् पुण्यदायक मंडळींचे. झाडं तुमची , वर्षभर तुम्ही निगा राखा न् अशाना संधी द्या , ती झाडांना वाकवतील , अोरबाडतील , फुले चोरतील तरी मन मोठं करून  पुण्य कमवा. 
किती कमाल आहे ना ?
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.


Tuesday, May 19, 2020

सहजोक्त.

#शब्दचिंतन.
काही काही शब्द  ऐकून ऐकून  सरावाचे होतात की तेच मूळ शब्द वाटू लागतात. आज प्रचलित असलेला शब्द , निर्मितीच्या वेळी तसाच असेल असे नाही. कितीतरी बदल घडत घडत आजचा शब्द तयार होतो. ही बदल घडण्याची प्रक्रिया दीर्घकालीन असते तशी रंजकही असते.
शब्दांचा हा रम्य प्रवास  नक्कीच जाणून घ्यायला पाहिजे. त्यामुळे मूळ शब्द , त्याची स्थित्यंतरे  , वर्तमान रूप नि भविष्यवेधही लक्षात येतो. शिवाय त्या शब्दावर उभारलेला भाषिक व्यापार न् त्याला चिकटलेला सामाजिक प्रभाव , हा देखिल समजायला मदत होते.

"नारळ" , हा शब्द आपण सामान्य जीवनात वापरतोच . आज या शब्दाची जन्मकथा बघू.
नारळ हा शब्द मूळात दोन शब्दांपासून तयार झाला आहे.
नाल  म्हणजे नळी , (मूळांची  वा देठाची वा खोडाची )  उदा . कमलनाल = कमळाची दांडी .
केर म्हणजे म्हणजे पाणी . पाण्यासाठी अनेकानेक शब्द आहेत. 'क' म्हणजेही पाणी . जसे  'ख' म्हणजे आकाश , 'मा' म्हणजे लक्ष्मी इत्यादी. आयुर्वेदीय शब्दकोशात 'क' , केर म्हणजे पाणी म्हटले आहे. केरल  याही शब्दात केर  आहेच . जसं स्नेह चे स्नेहल  तसंच  हेही. तसेही केरळ प्रांतात पाणी जास्त आहे.
कफ या शब्दासाठी आयुर्वेदात   केन (जलेन) फलति इति म्हणजे पाण्याने जो वाढतो तो कफ , असं म्हटलं आहे.

नालिकेर म्हणजे  नालीने म्हणजे मुळ्यांच्या , बुंध्याच्या नळीने  (समुद्राचे)  केर म्हणजे पाणी पिणारा ; असा मूळ अर्थ झाला.
आता या नालिकेर चे वर्णविपर्यस्त होऊन झाले नारिकेल . अनेक बदल होत होत नारियल /नारळ झाले.

आता नारळ या शब्दावरून व्यवहारात कितेक म्हणी न् वाक्प्रचार तयार झाले आहेत.
नारळ देणे  ,  नारळासारखं व्यक्तिमत्व , नारळ फुटणे  , देवाची करणी आणि नारळात पाणी वगैरे वगैरे .  या म्हणी न् वाक्प्रचाराच्या मागेही काही कथा , संकेत , रूढी वगैरे असतात.

भाषेमध्ये असे अनेक शब्द आहेत.
त्यांचा जन्मप्रवास उलगडून दाखवणारं एखादं पुस्तक लिहावं , असे वाटते . मग विचार येतो की असे पुस्तक लोकांना उपयुक्त ठरेल काय ? छपाईचा खर्च तरी निघेल काय ?   असे विचार आले की लेखन थांबून जाते.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.




Saturday, May 16, 2020

सहजोक्त

#चिंतन .

संत तुकाराम महाराज म्हणजे एक विश्वविद्यालयच होय. त्यांची अभंग गाथा म्हणजे अनेकानेक ज्ञानप्रकारांचा खजिनाच होय. मानवी स्वभावाचे हुबेहूब वर्णन करणारे , मानवी मनाचे शब्दचित्र रेखाटणारे , न् वर्तनवादाची नुसती व्याख्या न करता सोदाहरण मांडणारे तुकोबा , अद्वितीय संत आहेत.

आजकाल अलक नावाचा साहित्य प्रकार आलाय. छानच आहे तो.
जुन्या वाङ्मयात जरा वेगळ्या प्रकाराने यायचा हा प्रकार .तुकोबांचे कित्तेक अभंग असे अलक प्रकारात मोडतात.
 दोन उच्च शिक्षित , लबाड , प्रचंड स्वार्थी  न् र‍ाजकारणी माणसं एकमेकांसमोर आले तर  त्यांचा संवाद  कसा असेल ? कोण माघार घेईल ? कोण पुरून उरेल ? त्या लबाडांमुळे इतर सामान्यांचे काय होईल ? आदी   याचे सुंदर चित्र तुकोबाच्या या अभंगातून मांडले आहे.

वाघें उपदेशिला कोल्हा । सुखें खाऊं द्यावें मला॥1॥
अंतीं मरसी तें न चुके । मज ही मारितोसी भुके ॥ध्रु.॥
येरू ह्मणे भला भला । निवाड तुझ्या तोंडें जाला ॥2॥
देह तंव जाणार । घडेल हा उपकार ॥3॥
येरू ह्मणे मनीं । ऐसें जावें समजोनि ॥4॥
गांठी पडली ठका ठका । त्याचा धर्म बोले तुका ॥5॥

तत्त्त्वज्ञान निव्वळ डोक्यात ठेवले न्  त्याचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी केला तर काय घडते ?  हेच   वाघ-कोल्ह्याच्या रूपकातून ( अभंगातून)  कळते.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

सहजोक्त

#कविता= वेदना
 वेदना आणिक अश्रू , सर्जनाची साधने ।
 उत्तमातील उत्तमाच्या निर्मितीची कारणे ॥
 अंतरीची वेदना जी हृदयी मीरेच्या उपजली ।
कृष्णभक्तीच्या रूपाने वाणीतुनी अोथंबली ॥
 वेदना शिरली उरी त्या गौतमाच्या तेधवा
अहिंसा आणिक समता नांदती जगती पहा ॥
ज्ञानदेवाच्याही झाली वेदनांची परिसीमा ।
वर्षिला कारुण्यपान्हा पसायदानरूपी अहा ॥
गाथा तुक्याची वेगळी कां वेदनेची मूर्ती जी ।
चराचराच्या संवेदनांची जणू स्पंदने हो जागती ॥
वेदनांची ढाल करुनी वार छातीवर झेलतो
 मायभूमी रक्षिण्याला वीर तो बलिदान देतो ॥
 वेदना परदास्यामुळे भाळी बळे जी लादली  ।
 वाग्यज्ञ दाहक पेटविला त्वाचि रे विनायकी ॥
  हीच ईशा विनवणी की वाहती दे वेदना ।
  फुलविण्या आनंद जगती जागवी संवेदना ॥
  ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Thursday, May 14, 2020

सहजोक्त.

#चिंतन.
महाराष्ट्रात कुठे कुठे "मराठी भाषा चळवळ"  वेगाने सुरु आहे. चळवळ मग ती कशाहीसाठी असेना कां ? तिला जिवंत न् प्रवाही धार असते.  संघटनेसारखी खोली न् स्थैर्य तिच्यात नसते. चालायचेच , प्रत्येकात गुणदोष असणारच .
मध्यंतरी  सोशल मिडियावर "आत्म निर्भर" या शब्दावरून चर्चा झाली. मराठी चळवळीचे खंदे कार्यकर्ते असलेल्यांनी , "हा शब्द मराठी नाही" असं ठरवून मोकळे झाले.
त्यावर मी जरासा प्रतिवाद केला .
"मराठीला असं संकोचित कां करता ?
निर् +भर  =  भरणे , भरण , भरणी 
हे शब्द याच मूळधातूपासून आहेत...
मराठीने  तत्सम शब्द स्वीकारणे बंद करणे योग्य नाही. आत्म +निर्भर  , आत्मनिर्भरता असे हे दोन्ही शब्द मराठीच आहेत.
 पण त्यांच्या मते हा संस्कृत वा हिंदीच शब्द आहे म्हणून मराठीत तो त्याज्य ठरतो.
 मग मी प्राचीन मराठी साहित्याचा दाखला दिला . सद्गुरु पासष्टी नावाचा लघुग्रंथ  (श्री गुरु चरित्रातील निवडक ६५ अोळी ) मराठीत आहे , अशी सर्व वाचकांची समजूत आहे .
त्यातील एक श्लोक असा ,
"ऐसे ऐकतां राजपुत्र ।
हर्षे झाला निर्भर।
सांगतसे विस्तार ।
शिवलीला तेधवा ॥" {३५।२०६}
या श्लोकात निर्भर शब्द आला आहे , हे निदर्शनास आणून दिले.
त्यावर त्यांचे एकच तुणतुणे होते की कवितेत स्वातंत्र्य असते.
शेवटी मीच माझ्या कडून चर्चा संपवली. पण मनात चिंतन सुरू झाले.

भाषा हा एक समृद्ध  मानवी वारसा असतो. अनेक शतकांचा प्रवास करून भाषेचे रूप वर्तमानात दिसत असते. मराठी ही एक भारतीय-भाषा आहे . जन्मभूमी ,जन्मभाषा यांचा अभिमान प्रत्येकाला असतो. तो असणं चूक नाही.

प्रत्येक भाषेचे काही स्तर असतात , प्राथमिक पासून प्रगल्भ , विद्वज्जड  पर्यंत. प्रत्येक स्तरातील भाषा ही आपल्याच  मूळ-भाषेचे रूप असते . त्यामुळे ती आपलीच भाषा असते.

दैनंदिन जीवनात सामान्य माणूस साधारणपणे प्रथम स्तरातील भाषा बोलतो.  तर साहित्यानुरूप भाषेचे विविध नमुने आढळतात. हे वैविध्य म्हणजे भाषेचे दूषण नसून भूषण असतात.  प्रत्येक स्तरातील भाषेचा स्वीकार व विकास करण्याची जाण असणे म्हणजे खरा  भाषा-कार्यकर्ता होय.
कधी कधी एक भाषिक भूभाग दुस-या भाषिक भूभागाशी जुळलेला असतो . तेथे जरासा भाषा-संकर होतो. ते स्वाभाविक व  योग्यही आहे.
मूळ भाषिक वैविध्यात अजूनच भर पडते . ' हे सर्वच वैविध्य माझ्याच भाषेचे आहे ' ,  हे समजणं म्हणजे भाषिक-आत्मभान होय.
भाषेच्या सर्व आवर्त-प्रत्यावर्त न् वर्तमान स्वरूपांसह  तिचा अंगीकार करणं म्हणजे भाषा-प्रेमी असणं होय.
भाषेच्या विविध स्तरांचा आदर राखणे , ते स्तर समजून शिकणे ,  आज जास्त जरूरी आहे.
शिवाय एक मुद्दा प्रकर्षाने नमूद करावासा वाटतो की चळवळीतील भाषिकांचा भाषा-अभ्यास हवा तितका पक्का नाही. त्यांच्या बौद्धिक शब्दकोशात जे शब्द असतील तीच खरी भाषा , हा  त्यांचा दुरभिमान कोणत्याही भाषेची पातळी खालवणारा ठरतो.
शिवाय शब्द-व्युत्पत्तीचे ज्ञानच नसणे , इतर भाषांचा दुस्वास करणे आदी दुर्गुण  म्हणजे तर कुपमंडुकवृत्तीच होय . अशाने भाषा-सागर न होता भाषा-डबके तयार होईल की काय अशी शंका येते.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.











सहजोक्त

#चित्रकविता.
आज परत ते फूल तसंच उमलले
पांढ-या जास्वंदीला  गुलाबी एकटे ॥
कौतुक नव्हते कौतुकाचेही
उपेक्षेचीही खंतच नव्हती ॥
उमललं एकटं , त्याच्या स्वभावाने
झुललं जरा वेळ वा-याच्या झोक्याने॥
कोणी लक्ष दिले म्हणून शेफारले नाही
दखल घेत नाही म्हणून दुखावलं नाही ॥
फूलच ते , त्याला नसेल कां भावना ?
उलगडून सांगायला मनाच्या जखमा?।
द्वंद्वात आवर्तातही निरालस उमलणे
फूलाकडूनही मानवाने नक्कीच शिकणे ॥
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Thursday, May 7, 2020

#सहजोक्त.


वेगवेगळ्या स्वभावांचे लोक जगात आहेत
म्हणूनच जग जगत  आहे , नाहीतर साचेबद्धच असते ना !

 मी स्वीकारतेही मनापासून
ज्याचे त्याचे वेगळेपण.
जपते ज्याचे त्याचे अस्तित्व त्याच्या त्याच्या परी.

बघून जवळच्यांचे वागणे , क्वचित निराशा येते मनात    .
वेगळेपण  स्वीकरणं तर दूर त्यांच्यासारखं करण्याचा घाट .

मी माझ्यासारखी न रहाता मिसळून जावी त्यांच्यात .
असेच अखंड प्रयत्न सुरूच असतात दिनरात .

जरा त्यांना समजावून घेत वागले मनासारखे त्यांच्या
की लगेच कौतुकाने , थोपटतात पाठीला   स्वतःच स्वतःच्या.

'बघ कसं वागवतो आम्ही छान ',
 लादतात स्व-अपेक्षा कुरवाळत स्वतःचा अभिमान .

आश्चर्यच वाटतं मग त्यांच्या अशा वागण्याचं ,
खुमखुमी जपत सगळ्यांना एकाच मर्जीने वागविण्याचं .

स्वतःवर संतुष्ट नसलेले  व दुस-याला समजतात साधन 
 विविधतेत भर टाकण्याचे ठरतात आधान .

 आत्मविश्वासहीन हे लोकं साशंक स्वतःवरही
दुस-याच्या सच्चेपणावर विश्वास कसा बाळगतील  ?

 उणे शोधणारे अतृप्त जीव सतत, असमर्थ परिपूर्ण संचासही ठरतात  .

कळतं  त्यांना की दोष आहे स्वतःत  ,
कबुलीचे प्राजळ धैर्यच नसते त्यांच्यात.

'आम्ही असेच' याचेही भूषण बाळगतात काही जण.
तर दुस-यावरच खापर फोडतात काही जण.

 'या पार या त्या पार ' हीच गतानुगतिक सवय .
मोडायची हिंमत  नसते त्यांच्या मनात .

तत्वतः विभिन्नता मानणे न् व्यवहारात  जपणे ,
यात   अंतर आहे जमीन अस्मानाचे .

अशांसह जगताना असते खरी कसोटी  आपल्याच तत्वाची न् आपल्याच जगण्याची .

 विभिन्नतेसह जगताना पडझडच होणार
 जिवंत चैतन्यांश आपण यातूनही निखरून बहरणार .
 यातूनही निखरून बहरणार .
 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.


Wednesday, May 6, 2020

सहजोक्त.

#यशोधरा.
लिच्छवींची कन्या मी लाडाकोडात वाढलेली
शांत सुशील सुंदर तरीही निरागस आणि लाघवी ॥१॥
उपवर होऊन  झाले तेव्हा शाक्यांची  कुलवधू
सिद्धार्थाची अर्धांगिनी मी  सुदैवास कैसे वर्णू ॥ २॥
यशोधरासिद्धार्थाची जोडी अनुपम नि अनुरूप
पाहून दोहोंचे युगल देखणे चराचराला वाटे अप्रूप ॥३॥
शिवसौंदर्याची , ऐश्वर्याची वर्षा बरसे नीत अाता
कपिलवस्तूही तृप्त तेधवा , सौख्याला नसे तोटा ॥૪॥
अशा सुखाच्या वेली वरती फूल उमलले स्नेहाचे
राहूल त्याचे नाव ठेवले प्रतीक तयांच्या प्रेमाचे ॥५॥
सत्य आणिक निर्वाणाचे ध्येय त्याने चेतविले
संसाराची रेशिमबंधने सहज त्याने  तुडवीले ॥६॥
काय बिनसले , नजर लागली कशी नकळे  संसारी
माया समजून सिद्धार्थाने सोडून दिधले अधांतरी ॥ ७॥
गौतम सिद्धार्थाचा झाला जगासाठी भगवान बुद्ध
शाक्यवधू ,पुत्रवती मी कशी त्यजू  पत्नीपदा  शुद्ध ॥८॥
जगास दाखवून  मध्यममार्ग तू उद्धरले चराचरा
सप्तजन्मीची सहचरिणी मी काय दोष  माझा ?।९॥
निर्वाणास्तव सर्व जगाच्या जन्म तुझा झाला
साधन आणि साधना माझी तूच तूच झाला ॥१०॥
राजकुलवधू ,यशोधरा मी परित्यक्ता जाहली
प्रवज्जित अहा राहुल होता राजमातृपदा मुकली ॥११॥
जन्म माझा केवळ झाला त्यागमूर्ती व्हावया
यशोधरा ही कारण झाली बुद्ध घडविण्याला ॥१२।।
सर्व जगाचा तथागत तू , गतानुगतिका मी
असो सुखाचा बुद्ध जगाचा यशोधरेचा पती ॥१३॥
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.










Friday, May 1, 2020

सहजोक्त.

#शब्दचिंतन.
आज शेमारू-मराठीवर , 'भाई-व्यक्ती न् वल्ली'  सिनेमा पाहिला. त्यात कुमार गंधर्वांचे " ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी ,भेटीत तृष्टता मोठी"
हे गाणे ऐकले.

कुमार गंधर्व न् वाणी जयराम यांच्या आवाजातील हे गाणे . गीतकार  बाळ कोल्हटकर यांनी रचलेले हे गीत पहाडी रागात  संगीतबद्ध केले आहे वसंत देसाई यांनी .

तसे हे गाणे लहानपणापासून ऐकले आहेच. शरदचा व्हिडिअो-शुटिंग /फोटोग्राफीचा तीस वर्षांहून अधिक वयाचा व्यवसाय . पूर्वी लग्नांच्या व्हिडिअो कॅसेटला हमखास हे गाणं तो डब करून टाकायचा.

गाणं अतिशय अर्थपूर्ण न् विचार करायला भाग पाडणारं आहे. तसेही मला शब्दांवर विचार करायला आवडते.

या गाण्याच्या ध्रूवपदात 'तृष्टता' असा  एक शब्द आला आहे.  गाणे ऐकताना तो शब्द जरा अस्पष्ट वाटतो.
 तृप्तता (समाधनीपणा ) , तुष्टता (संतोषिता) , रुष्टता (नाराजगी)   हे शब्द  मराठीत अधिक प्रचलित आहेत.

 गाण्यात मात्र  "तृष्टता" हाच शब्द आहे. अनेकांना तो शब्द चुकीचा  वाटतो.  पण  तेथे प्रिंटिंग मिस्टेक वा स्लीप अॉफ टंग नाहीय.
  बुद्ध्या    'तृष्ट +ता = तृष्टता' हा शब्द अतिशय समर्पकपणे गाण्यात योजला शब्द  आहे. गीतकारांच्या शब्द-व्यासंगाचा अतिशय आदर वाटतो. आजकाल किमान शब्दात कमाल (सर्वार्थाने) गाणी पाडली जातात , असो.  "तृष्टता" हा काहीसा अनवट , अप्रचलित पण त्या गाण्यासाठी अत्यंत मार्मिक असा हा शब्द. तृष्टता म्हणजे कठोरपणा , कोरडेपणा , उद्धटपणा , तुटकपणा इत्यादी.
खरे तर पूर्ण गाणंच साऽर्थ समजून घ्यायला हवे. तरच त्या गाण्याची , जगातील ऋणानुबंधांची गोडी कळते.
पण पहिल्याच अोळीतील शब्दांचा नेमका योग्य अर्थ घेतला नाही तर बाकी गाणे मनाला भिडेलच कसे ? म्हणून हे छोटसे  शब्दचिंतन.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.