Tuesday, May 19, 2020

सहजोक्त.

#शब्दचिंतन.
काही काही शब्द  ऐकून ऐकून  सरावाचे होतात की तेच मूळ शब्द वाटू लागतात. आज प्रचलित असलेला शब्द , निर्मितीच्या वेळी तसाच असेल असे नाही. कितीतरी बदल घडत घडत आजचा शब्द तयार होतो. ही बदल घडण्याची प्रक्रिया दीर्घकालीन असते तशी रंजकही असते.
शब्दांचा हा रम्य प्रवास  नक्कीच जाणून घ्यायला पाहिजे. त्यामुळे मूळ शब्द , त्याची स्थित्यंतरे  , वर्तमान रूप नि भविष्यवेधही लक्षात येतो. शिवाय त्या शब्दावर उभारलेला भाषिक व्यापार न् त्याला चिकटलेला सामाजिक प्रभाव , हा देखिल समजायला मदत होते.

"नारळ" , हा शब्द आपण सामान्य जीवनात वापरतोच . आज या शब्दाची जन्मकथा बघू.
नारळ हा शब्द मूळात दोन शब्दांपासून तयार झाला आहे.
नाल  म्हणजे नळी , (मूळांची  वा देठाची वा खोडाची )  उदा . कमलनाल = कमळाची दांडी .
केर म्हणजे म्हणजे पाणी . पाण्यासाठी अनेकानेक शब्द आहेत. 'क' म्हणजेही पाणी . जसे  'ख' म्हणजे आकाश , 'मा' म्हणजे लक्ष्मी इत्यादी. आयुर्वेदीय शब्दकोशात 'क' , केर म्हणजे पाणी म्हटले आहे. केरल  याही शब्दात केर  आहेच . जसं स्नेह चे स्नेहल  तसंच  हेही. तसेही केरळ प्रांतात पाणी जास्त आहे.
कफ या शब्दासाठी आयुर्वेदात   केन (जलेन) फलति इति म्हणजे पाण्याने जो वाढतो तो कफ , असं म्हटलं आहे.

नालिकेर म्हणजे  नालीने म्हणजे मुळ्यांच्या , बुंध्याच्या नळीने  (समुद्राचे)  केर म्हणजे पाणी पिणारा ; असा मूळ अर्थ झाला.
आता या नालिकेर चे वर्णविपर्यस्त होऊन झाले नारिकेल . अनेक बदल होत होत नारियल /नारळ झाले.

आता नारळ या शब्दावरून व्यवहारात कितेक म्हणी न् वाक्प्रचार तयार झाले आहेत.
नारळ देणे  ,  नारळासारखं व्यक्तिमत्व , नारळ फुटणे  , देवाची करणी आणि नारळात पाणी वगैरे वगैरे .  या म्हणी न् वाक्प्रचाराच्या मागेही काही कथा , संकेत , रूढी वगैरे असतात.

भाषेमध्ये असे अनेक शब्द आहेत.
त्यांचा जन्मप्रवास उलगडून दाखवणारं एखादं पुस्तक लिहावं , असे वाटते . मग विचार येतो की असे पुस्तक लोकांना उपयुक्त ठरेल काय ? छपाईचा खर्च तरी निघेल काय ?   असे विचार आले की लेखन थांबून जाते.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.




4 comments:

  1. अश्या महितीची आवश्यकता आहे. आणि हे बदल आपल्याच स्थानिक भाषांमध्ये होतात, त्यामुळे ते आपलेसे असतात.

    पुस्तकाचा खर्च निघेल का हा देखील वास्तववादी प्रश्न आहे..त्याचे उत्तर कदाचित ब्रह्मदेवालाही ठाऊक नसते.

    ReplyDelete
  2. पौराणिक ग्रंथात असे अनेक शब्द आहेत, ज्यांचा योग्य अर्थ आपणास उमगत नाही. म्हणून आपल्या ज्ञाना प्रमाणे अर्थ लावून त्या सर्व गोष्टीतील तत्थ आपण नाकारीत आलो आहोत. यामुळे समृद्धीतून अज्ञानाकडे आपली वाटचाल सुरु आहे. तुकाराम महाराजांची गाथा ही आपल्याला वाचता येणार नाही. आणि वाचली तरत समजणार नाही. म्हणून अशा माहितीची आवश्यकता आहे. चांगल्या गोष्टींना निधी कमी पडत नाही.फक्त सुरुवात हवी असते. हा माझा अनुभव आहे. धन्यवाद!

    ReplyDelete
  3. धन्यवाद काका
    नक्की लिहीन.

    ReplyDelete