Saturday, December 30, 2017

सहजोक्त

#सहजोक्त .
श्रद्धा-अंधश्रद्धा
वेदांमध्ये *श्रद्धासूक्त* आहेत.
*श्रद्धया कृतम् इति श्राद्धम्* असे मानतात. शिष्याला उपदेश करतात पहिले *श्रद्धस्व* असे सांगतात. भग्वद्गीतेतही *श्रद्धावान् लभते ज्ञानम्* असे म्हटले आहे. *धम्मपदातही* श्रद्धेचे महत्व मानले आहे. श्रद्धा महत्वाचीच आहे. त्याचे आलंबन योग्य वा अयोग्य असू शकते. ते सापेक्षही असू शकते .पण श्रद्धेशिवाय ज्ञान अशक्यच.
*अंधश्रद्धा* हा शब्द मराठीत *लोकनायक बापुजी अणे* यांनी आणला म्हटले तर वावगे ठरू नये. *तिलकयशोर्णव*या त्यांच्या संस्कृत महाकाव्यात "अंधश्रद्धजना: एते नित्यं* *धूर्तै: वंचिता:*" असा उल्लेख आलाय.

श्रद्धा- अंधश्रद्धा ह्या भावनाच आहेत. बरेचदा एखाद्याची श्रद्धा दुस-यासाठी अंधश्रद्धा ठरू शकते. अनेकदा *आपला तो सोन्या दुस-याचा तो कार्टा* अशी अवस्था *श्रद्धा-अंधश्रद्ध* या बद्दल असते.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Monday, December 25, 2017

#सहजोक्त



अहंकार आपला असेल तर स्वाभिमान, जवळच्याचा असेल तर गर्व ,नावडत्याचा असेल तर माज ! अहं म्हणजे मी. मीपणा म्हणजेच अहंकार !
तसं बघितलं तर जन्माला आल्यापासून माणूस स्वतःच्या अस्तित्वाला जपत असतो.
 पहिले शरीरभान मग मनोभान मग पुढे वैश्विक भान . . !
 मी>माझं : आम्ही>आमचं मग आपण>आपलं असा उदार प्रवास सुरु होतो.
अहंभाव लहानपणीच असतो असं नाही. उलट लहानपणीचा अहंभाव निरागस, लवचिक असतो.
जसे जसे मोठे व्हावे (वय-अनुभव,पद,पैसा,सत्ता  इत्यादी कोणत्याही दृष्टीने ) अहंकाराची पुटंच्या पुटे चढत जातात. "मला कशाचाच अभिमान नाही" असाही अहंकर असतो.
मोठ्यांच्या अहंकारामुळे प्रत्येक वेळी घर ,समाज भरडल्या जातो. पुराणकाळापासून ते इतिहासापर्यंत येवढेच कशाला वर्तमानकाळातही याची अनेक उदाहरणे सगळ्यांना माहितच असतात. ही उदाहरणेही नेमकी  दुस-यांचीच असतात. "अापण"मात्र "तसे" अहंकारी अजिबातच नसतो!! हे म्हणजे अगदी फिरत्या चाकावरच्या स्थिर मुंगळ्यासारखं असतं !!
तसं बघितलं तर हे जग आणि आपण स्वत:  "मी"पणानेच जोडले आहोत ना ? "आप मर गये डूब गयी दुनिया " हे खरे नाही कां?
"मी" समजणे नि "मीपणा" मिरवणे यात फरक आहे. मीपणा सर्वसमावेशक व्यापक करीत समष्टीपर्यंत वाढविला तर . . .  . .  .. ..   .
तर जगात प्रश्नच उरणार नाहीत. मग जग तरी उरेल कां? हा "अहं"प्रश्न !!
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Sunday, December 24, 2017

#सहजोक्त.



मनात विचार येतात. बरेचदा कार्यकारण भाव नसतानाही वेगवेगळ्या विषयावर अवचित सुचते. त्या सुचलेल्यातील काही शब्दबद्ध होतात. काही नष्ट होतात. मनात शब्द जुळणी होऊन ती नोटपॅडवर टंकणे हा ही मोठा सुयोगच असतो.
मनाजोगा विषय, मनासारख्या शब्दांतून सहज उतरले की सहजोक्त होते. भगवान् गौतम बुद्धाच्या 'उदानापासून' प्रेरणा घेत  सहजोक्तचा  उगम झाला.
सहजोक्तात काय ?  त्यात एक लय असते ,गवसलेला सूर असतो ,सर्वांना जुळवणारा  ताल असतो. मनापासून उतरलेले ते शब्दचित्र असते. त्यात कोणताही रंग असू देत ,संगतीत कमी नसते. प्रत्येक रंग त्याच्या त्याच्या प्रमाणात सुसंगतच असतो. सरमिसळ करतानाही अतिक्रमण न होता एकरंग होतात.
असं सहज सुचलेलं ,आयास-सायास नसलेलं हे सहजोक्त. यातून कोणाला ज्ञान द्यावे ,कोणाला माहिती सांगावी ,मनातील बोच व्यक्त करावी वा कुठलीशी उणीव व्यक्त करावी असा कुठलाच उद्देश नसतो. इतकेच काय ? कुणाला आनंद द्यावा हा ही उद्देश नसतो. निव्वळ सहज ,अगदी सहज ,फक्त सहजच लिहिले असते. जसे झाड ,फुलांनी बहरते ते त्याच्याच विकासाचा ,व्यक्तिमत्त्वाचा भाग असते ;तसेच हे सहजोक्त.
म्हणून ते जेव्हा सुचते ,पूर्ण शब्दांकित होते व टंकल्या जाते तेव्हाच ते सर्वांसमोर प्रकाशित होते.
प्रत्येक विचारात, कृतीत, अभिव्यक्तीत हेतू असवाच ,हा आग्रह कां? मनाचे काही कप्पे निरपेक्ष ,निखळ , निरागस ,निस्संदिग्ध असयलाच हवेत. अन् तेच सहजोक्त मधून चितारते इतकंच.

©डॉ. प्रज्ञा देशपांडे

#चित्रकविता


Saturday, December 23, 2017

#कविता



#कविता
देवकी सारखा त्याग नाही जमणार मला ।
यशोदेचा वात्सल्यपान्हा कसा पाझरणार पुन्हा॥

राधेची रमणीयता कुठून बरे आणू ?
मीरेची भक्ती तरी कशी आंगी बाणू ?।

तू घडवलेस देवा ,तशीच मी आहे ।
तुझ्याशिवाय दुजा मला  ठाव नाही रे ॥

चराचरात तुझेच रूप सदा मी पाहते ।
तुझ्यातच सारं जग मला माझे मिळते ॥

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Friday, December 22, 2017

#शब्दचिंतन .



२२/१२/२०१७
आज जागतिक गणित दिवस . तसं कुठलेच गणित मला जमले नाही. शब्दावर अन् शब्दांमागे असलेल्या भावनांवरच माझं जास्त प्रेम. मग आज "गणित" या शब्दाचाच सांगोपांग विचार करवा असे वाटले म्हणून हा लेखनप्रपंच .
 दैनिक व्यवहारात आपण खालील शब्द सहज  वापरतो.
 जसे
 ‎गण = हा  शब्द ,समूह या अर्थाने प्रचलित आहे. ,
 ‎याच शब्दला जोडून  गणमान्य ,गणप्रमुख ,गणनायक असे
 ‎गणन = मोजण्याची प्रक्रिया  या अर्थाने  गणना = मोजदाद ,गनती(हिंदी शब्द)
 ‎गणित = मोजलेले या अर्थी मूळ शब्द . पण प्रचलित आहे तो गणित नावाची ज्ञानशाखा म्हणून .,
 ‎नगण्य = न मोजण्या योग्य, गण्य म्हणजे मोजण्या लायक . बरेचदा जनभाषेत नकारार्थी रूप जास्त प्रचलित होते.
 ‎गणनीय= मोजण्या लायक  ,
 ‎गणक = गणना म्हणजे मोजदाद करणारा .
 ‎संगणक = योग्य मोजदाद करणारा.
 ‎प्रगणक = वेगाने मोजणारा .
 ‎वरील सर्व शब्द  गण् =मोजणे या अर्थी असलेला हा मूळ धातूपासून तयार होतात.
 ‎या शिवाय "गणती नसणे " ," न गिनणे" , "खिजगणतीत नसणे " असे वाक्प्रचार पण ऐकण्यात असतात.
 ‎शब्द  निर्मितीचेही गणित समजणे गरजेचे आहे.
 ‎©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
 ‎
 ‎

Monday, December 18, 2017

#शब्दचिंतन


कधी कधी चूक काय नि बरोबर काय ,कळेनासे होते. बरेचदा भाषा-व्याकरणाचे नियम वेगळे असतात नि व्यवहारात वेगळाच शब्द असतो. मग गोंधळ होतो.
 "शास्त्रात् रूढिः बलीयसी" म्हणूनच म्हटले जाते.
काही प्रचलित शब्द   बघा . .
प्राथमिक ,निरलस दुरवस्था , अनसूया ,पारंपरिक .
अजून शोधले तर अजून सापडतील.
वर लिहिलेले हे शब्द व्याकरण दृष्ट्या निर्दोष आहेत. पण समाजात यांचे उच्चारण व लेखन बहुतांश वेळा अयोग्य केल्या जाते.पुढे निर्दोष शब्द दिला आहे व त्याच्या समोर प्रचलित दोष काय ते सांगितले आहे.
जसे
प्राथमिक = प्रार्थमिक ,इथे अकारण एक जास्त रफार उच्चारला जातो.
निरलस = निरालस , निर् +अलस =निरलस हे जरी खरं असलं तरी म्हणताना 'निरालस' म्हणतात.
अनसूया =अन्+असूया . पण बरेच जण अनुसया असेच म्हणतात. याला तद्भव म्हणावे की विकृत ??
पारंपरिक = 'इक ' प्रत्ययान्त शब्द भाषेत अनेक आहेत . हा प्रत्यय लागताना मूळ शब्दात काही बदल होतात पण ते समानच असतात. जसं इथेच पाहू.
परंपरा + इक= पअरंपरिक.
स्वभाव + इक= स्वाभाविक
प्रथम + इक = प्राथमिक
मध्यम +इक = माध्यमिक
परिवार +इक = पारिवारिक
वरील उदाहरणात मूळ शब्दातील सुरवातीच्या अकाराचा आ-कार झाला.
भूगोल +इत = भौगोलिक
भूमिती +इक = भौमितिक
भूति +इक = भौतिक
वरील उदाहरणात उकाराचा ओ-कार झाला.
इतिहास +इक = ऐतिहासिक
नीती + इक = नैतिक
इह +इक = ऐहिक
वरील उदाहरणात इकाराचा ऐ-कार झाला.
मूळ शब्द काय ? त्याचे परिवर्तन कसे ? हे जाणून घेतले तर दोषपूर्ण उच्चारण व लेखन टाळाता येऊ शकेल.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Saturday, December 16, 2017

#शब्दचितन

#शब्दचिंतन -वर्णविचार १

वर्णविचार . .म्हटलं की व्याकरणातील एक भाग वाटतो. किंवा भाषाविज्ञानातील प्रकरण. एकूणच  अभ्यासक्रमाशी संबंधित अध्येय घटक असंच मत होतं .ते स्वाभाविक आहे.
बोली ,भाषा कोणतीही असो  ; तिचे मूळ उच्चारातच असते. उच्चाराचे वेगवेगळे ध्वनी असतात. त्या ध्वनींना दर्शवणारे चिह्न असतात. त्या चिह्नांनाच लिपी म्हणतात. प्रत्येक भाषा लिपीतूनच लिहिल्या जाते. लिपीचं मूळ एकक म्हणजे अक्षर .  क्षर म्हणजे नाश ,लोप . अक्षर नष्ट होत नाहीत ,लुप्त होत नाहीत. उच्चारानंतर ध्वनी नष्ट होतात पण लिपीतील चिन्ह तेच तसेच राहतात.
प्रत्येक भाषेची लिपी वेगवेगळी असते.
ललितविस्तर नामक बौद्ध ग्रंथात ६૪ लिपींचा उल्लेख आहे. तर जैन साहित्यात १०० हून अधिक लिपींचा उल्लेख आहे.आज जगात लाखोंच्यावर बोली-भाषा आहेत. पण लिपींची संख्या शेकड्यांच्या अात आहे. भाषाविज्ञानात भाषेचे जसे परिवार आहेत तसे लिपीचेही आहेत.मूळ लिपी तीन प्रकारच्या आहेत.
१)चित्र लिपी = चिनी ,जपानी इत्यादी
२)ब्राह्मी लिपी =भारतीय लिपी व दक्षिण-आशियायी लिपी
३) फोनेशियन = युरोप  ,मध्य आशिया व उत्तर आफ्रिकेतील लिपी.
कोणतीही भाषा कोणत्याही लिपीतून लिहिल्या जाऊ शकते. उदाहरणार्थ मराठीची लिपी देवनागरी आहे पण ती इंग्रजी (रोमन) लिपीतून लिहिता येते. याला 'लिप्यन्तर' असे म्हणतात.
ब्राह्मी लिपीतून देवनागरी लिपी उत्क्रांत झाली. आज संस्कृत,पालि ,मराठी ,हिंदी ,नेपाळी ,कोंकणी ,सिंधी ,कश्मिरी ,डोगरी ,तमांग,बोडो, अंगिका,संथाली ,मैथिली ,मगही ,भोजपुरी,
गढवाली या भाषांसह काही प्रमाणात पंजाबी ,गुजराथी, विष्णुपुरिया ,मणिपुरी ,रोमानी ,उर्दू याही भाषा देवनागरी लिपीत लिहिल्या जातात.
स्पष्टोच्चारिता हे देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य आहे .
पाणिनींच्या अष्टाध्यायीत उच्चारणाचे बारकावे अतिशय काटेकोरपणे नोंदवले आहेत. प्रत्येक  स्पष्ट उच्चारणाचे स्वतंत्र चिन्ह  हे देवनागरीचे अजून एक वैशिष्ट्य होय.
आज जगामधे सर्वात जास्त लिहिल्या जाणारी लिपी ही देवनागरी आहे.
भाषा वाक्यांपासून तयार होते. वाक्य शब्दांचे तयार होते. शब्द अक्षरांपासून नि अक्षरे म्हणजेच विशिष्ट उच्चारांचे चिह्न .यांनाच वर्ण असेही म्हणतात .या वर्णांचे भेद असतात.
पुढल्या भागात वर्णां विषयी विचार करू.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे



Monday, December 11, 2017

#शब्दचिंतन

#शब्दचिंतन.
दैनंदिन बोलीत आपण गीता ,सीता ,बाला ,बालिका,आत्मजा ,शिवा ,वृद्धा ,युक्ती ,मुक्ती ,बुद्धी ,पार्वती ,सुंदरी
,स्वामिनी, माधवी असे अनेक नामं ,शब्द वापरतो. हे शब्द स्त्रीलिंगी आहेत.
स्त्रीप्रत्यय ,म्हणून व्याकरणात स्वतंत्र प्रकरण आहे. हे प्रत्यय लागले की स्त्रीलिंगी शब्द तयार होतात. साधारणपणे तीन प्रकारचे स्त्रीप्रत्यय भाषेत अधिकाधिक योजतात.
बहुतेक स्त्रीलिंगी शब्द आकारान्त , इकारान्त व ईकारान्त असतात. पुल्लिंगी पदापासून स्त्रीप्रत्यय लागून हे शब्द तयार होतात.
आकारान्त स्त्रीलिंगी शब्द होण्यासाठी "टाप्" हा स्त्रीप्रत्यय योजतात.
उदाहरणार्थ
गीत + टाप् = गीता
सीत  + टाप् = सीता
ज्येष्ठ  + टाप् = ज्येष्ठा
बाल +  टाप् = बाला
शिव + टाप् = शिवा
रसिक + टाप् = रसिका
सुरेख + टाप् = सुरेखा
आपल्या भाषेत साधारणत:  आकारन्त स्त्रीलिंगी जेवढी नावे आहेत ,ती याच प्रक्रियेनी तयार झालीत.
इकारान्त स्त्रीलिंगी शब्द तयार करण्यासाठी "क्तिन् " प्रत्यय जोडतात. हे प्रत्यय मूळ धातूला लागतात.
उदाहरणार्थ. (मूळ धातूंच्या आधी उपसर्ग वा शब्द  लावले की अजून वेगळे शब्द तयार होतात )
बुध् +  क्तिन् = बुद्धि ,सुबुद्धि ,दुर्बुद्धि
शक् + क्तिन् = शक्ति ,चित्शक्ति
भज् + क्तिन् = भक्ति ,श्रीमद्भक्ति ,पराभक्ति
युज् + क्तिन्  = युक्ति ,संयुक्ति
गम् + क्तिन् = गति, अधोगति ,प्रगति ,संगति
मन् + क्तिन् = मति ,सन्मति ,सुमति
मुच् + क्तिन् = मुक्ति,
कृ  +  क्तिन् = कृति, संस्कृति ,प्रकृति ,विकृति
अशा प्रकारे अनेक शब्द आपल्या व्यवहारात येतात. मराठीत हे सर्व शब्द दीर्घान्त होतात. संस्कृत  व हिंदीत वर लिहिल्या प्रमाणेच असतात.
आता शेवटचा स्त्रीप्रत्यय म्हणजे "ङीप् " प्रत्यय. या प्रत्ययामुळे ईकारान्त स्त्रीलिंगी शब्द तयार होतो.
उदाहरणार्थ
सुंदर + ङीप् = सुंदरी
स्वामिन् + ङीप्  = स्वामिनी
नद + ङीप्  = नदी
पर्वत + ङीप् = पार्वती
भैरव + ङीप्  = भैरवी
लेखन + ङीप् = लेखनी
मार्जन + ङीप् = मार्जनी
अशा प्रकारे या स्त्रीप्रत्ययांनी भाषेतील स्त्रीलिंगी शब्द तयार होतात.

आता काही शब्द बघू.
सविता = सवितृ ,सूर्य या अर्थाच्या मुळ पुल्लिंगी शब्दाचे प्रथमा एकवचन आहे.
गरिमा = गरिमन् या मूळ पुल्लिंगी शब्दाचे प्रथमा एकवचन .
महिमा ,निलिमा ,रक्तिमा हे ही शब्द गरिमा प्रमाणेच .
याच प्रमाणे मानी ,यशस्वी ,तेजस्वी हे ही शब्द पुल्लिंगी आहेत.

मराठीत असे काही शब्द आहेत ,जे खरेतर पुल्लिंगी आहेत पण आपण ते स्त्रीलिंगी समजतो. .. . चालायचेच . . "शास्त्रात् रूढि: बलियसी ।"
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.






Sunday, December 10, 2017

#शब्दचिंतन.



#शब्दचिंतन
डॉ. प्रज्ञा देशपांडे

पैसा ,धन ,वित्त ,अर्थ ,रुपया ,कमाई ,आय-व्यय,श्री ,मूल्य ,संपत्ती ,ऐश्वर्य.....
पैसेवाले ,धनवंत ,वित्तकोष ,
रुपयेवाले ,आयकर ,धनी,
श्रीमान् ,श्रीमंत ,ऐश्वर्यवान् / ऐश्वर्यवती

साधारणत: पहिल्या ओळीतले -व्यवहारात उपयोगात येणारे ,जीवन सुखी होण्याचे साधन मानतात तर
 दुस-या ओळीत -उपरोल्लिखित साधनयुक्त व्यक्तिविशेषण आहेत.
मन,वन,जन,तन,गण अशाच प्रकारचा धन शब्द वाटतो.
तन म्हणजे वाढणारं .
गण म्हणजे मोजलेलं ,
मन म्हणजे  मनन करणारं.
मन हे क्रियात्मक नि संवेदनात्मक इंद्रिय आहे.
जन म्हणजे जन्माला आलेले ....
तसाच धन असेल कदाचित् .. . . संस्कृतात पाच हजाराहून जास्त मूळ धातू आहेत . प्रत्येक शब्द हा त्या मूळधातूंपासून वेगवेगळ्या प्रक्रियांतून तयार होत असतो. काळाच्या ओघात भाषा-अंतर होत गेले. मूळ धातूंचा अर्थ वा प्रक्रिया कळेनासी झाली.
 ( वेळ नाही ,ही अनध्यायाची मोठी सबब.) असो .
धन महत्वाचे , प्रक्रिया काही कां असेना!
वित्त म्हणजे प्राप्त केलेलं . इथे इच्छा व प्रयत्न दोन्ही अपेक्षित आहेत.
अर्थ म्हणजे इच्छित ,वांछित .
अर्थ् या मूळ धातूपेक्षा प्रार्थ् हा उपसर्गयुक्त धातू अधिक प्रचलित आहे.
 प्रार्थना म्हणजे प्रकर्षाने केलेली अर्थना ( इच्छा) .
ज्यात इच्छाच नाही त्यात "अर्थ" कसा??
रुपया हा शब्द अर्थविस्तार प्रकारात मोडतो.
रुप्यकचा रुपया झाला.
पूर्वी चांदीचा रुपया होता. पूर्वी म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी. मानवतेच्या अवमूल्यनासह रुपयाचेही झाले.
आज नाणं जरी चांदीचे नाही तरी रुपयाच म्हटले जाते. हेच अर्थविस्तार .
आय म्हणजे मिळकत.
वि+आय=व्यय म्हणजे गेलेली कमाई.
श्री म्हणजे लक्ष्मी.
संपत्ती -आपत्ती-विपत्ती हे विविध उपसर्गपूर्वक पत्ती कृदन्त होय. योग्य रितीने (भाळी) पडली तर संपत्ती .
उलटी पडली तर आपत्ती नि विरुद्ध झाली तर विपत्ती.
कमावणे पासून कमाई.
 कम्-काम म्हणजे भौतिक सुखाची इच्छा . इच्छा तेथे मार्ग. कमाई त्याचसाठी करतात अनेक जण.
ऐश्वर्य शब्दाचा ऐशशी सबंध नाही. ईश् = नियंत्रण ठेवणे,ईश्वर जो नियंत्रण ठेवतो तो. ईश्वराचे सारे ते ऐश्वर्य. असा तो मूळ अर्थ.
मग "तळे राखेल तो पाणी चाखेल" या न्यायाने ईश्वर म्हणजे सर्वशक्तिमान. अन् त्याचे हे ऐश्वर्य.
मूल्य म्हणजे मुळचे ,मूळयुक्त. मुळात असेल तरच  येणार नाही तर आडात नाही तर पोह-यात कुठून..
मूल्यच नाही ते सारं अमूल्य.
वाला/वाली ,वान्/ वती ,मान्/ मती हे सगळे प्रत्यय "ज्याच्या जवळ आहे ,असा जो तो/ ती".
या अर्थाने येतो.
कोष म्हणजे ज्यात गुंततो तो ,वित्त गुंतलेते वित्तकोष ( बँक)
एकंदरित वित्त नाही म्हणजे आपत्तीच.
 अर्थ नाही म्हणजे अनर्थ ठरलेला.
शब्द कोणताही वापरा  ,
माणुसकीचे अवमूल्यन होऊ नये इतके बघा.
असो......इतका अर्थ शब्दचिंतनाने केला.
©डॉ.प्रज्ञा देशपांडे.

#सहजोक्त


 आमचं गावं तसं छोटच पण  महत्त्वपूर्ण स्वातंत्र्यपूर्वकाळात  गावात तीन मालगुजारी घराणे सुखानी नांदणारे. प्रत्येकाची सत्तास्थाने श्रद्धास्थाने ,मिळकत स्त्रोत वेगळे तरी घरंदाजपणा ,शालीनता व दानत सारखीच जवळपास.
  माझी आजी जमीनदाराची मुलगी व  मालगुजाराची बायको. उन्हाळ्यात गावी गेलो की आजी रोज छान छान गोष्टी सांगायची. एकदा आजीने "दाखवणे व असणे" या आशयाचा किस्सा सांगितला. 
  ‎तेव्हा इंग्रजांचे राज्य होते . मालगुजार लोकांकडे अनेक दिवाणजी कारभार सांभाळायला असत. वायदे-कज्जे आदि साठी नेहमी तहसीलदाराकडे जावे लागे. स्वत: मालगुजार क्वचितच जात असे . ही कामं दिवाणजींचीच होती. मालगुजार गणपतराव देशमुख हे त्याकाळी आदरणीय व्यक्तिमत्त्व होते.  देशमुखांचे दिवाणजी नेहमी तहसीलदाराकडे जात असत. उची वस्त्रं अंगावर दागदागिणे घालणारे ,रुबाबात राहणी असा त्या  दिवाणजींचा वेष असे. तहसीलदार दिवाणजींना आदराने वागवत असत. एकदा  मालगुजार श्री. गणपतरावांना स्वत:ला तहसीलदाराकडे जाण्याचा प्रसंग आला.
  ‎गणपतराव कचेरीत गेले. जी मंडळी त्यांना अोळखत होती ,ती आदराने उभी राहिली. तहसीलदार उभा झाला नाही. थोडा मागाहून दिवाण आला. तहसीलदार मानाने उभा राहिला. गणपतराव तेथे वाट पहात उभेच होते. दिवाणाला लक्षात आले तो चपापला. त्याने सारवासारव करत गणपतरावांची अोळख करून दिली. खादीचे गुडघ्यापर्यंतचे धोतर ,वर बाराबंडी , गळ्यात असली तर एखादी साखळी एखादी अंगठी असा साधा वेष कायमच घालणारे हेच ते गणपतराव ,अतिश्रीमंत व प्रख्यात मालगुजार  आहेत असं कळल्यावर तहसीलदारही वरमला. शेवटी तहसीलदाराला रहावलं नाही . त्याने गणपतरावांना तसा प्रश्न विचारला. त्यावेळी ते सहज उत्तरले "दिवाणजीची इस्टेट ते अंगावर सांभाळतात. मी काय काय सांभाळू ?"
    ‎बावीस गावांची मालगुजारी असलेले गणपतराव नि त्यांचा नोकर यांचे राहणीमान --विचार व वर्तन  अनुक्रमे घरंदाज प्रगल्भता आणि उथळ खळखळाट दाखविणारे होते.
    ‎ आजकाल 'एक हात लाकूड व सात हात झिलपी' असाच जमाना आहे .   विचार न करता ,पात्रता न बघता स्वत:वर दिवे अोवाळून घेण्याची रीतच काही जणांनी सुरु केलीय.  मूळात आपण किती ? याचा विचार न करता इंप्रेशन मारण्याची एकही संधी  सोडत नाहीत.
   दाखवेगिरीच्या या जमान्यात ‎ हा किस्सा अवचित आठवला. अंगभूत मोठेपणा साधेपणानेच खुलतो हे कळायला पात्रता लागते ये-या गबाळ्याचे ते काम नोहे.
   ‎©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
    ‎
    ‎
    ‎

Friday, December 8, 2017

#शब्दचिंतन.



काल कोणीतरी  *स्वार्थी* शब्द कसा होतो ते विचारले. स्व+अर्थ+इन् = स्वार्थिन् या मूळ शब्दाचे पुल्लिंगी प्रथमा एकवचन आहे ते . स्वार्थ ज्याच्यात आहे तो स्वार्थिन् .
याच प्रकारचे कितीतरी शब्द आपण रोजच्या भाषेत बोलतो.
शब्द तयार होण्याची प्रक्रिया आनंददायी असते. एकदा ती कळली की शब्द लीलया साधतात.  मानी ,बली ,धनी ,विजयी ,वादी ,मूलगामी ,
दूरगामी, विद्यार्थी ,लाभी ,कृपाकांक्षी ,दर्शनाभिलाषी ,साक्षी ,त्यागी ,तारी,घनपाठी,दशग्रंथी,भाषी, भारी,याजी,दानी इत्यादी सगळे शब्द वर सांगितलेल्या प्रक्रियेने तयार झाले आहेत.

मानी =मानिन् ,
बली=बलिन्
धनी=धनिन्
विजयी =विजयिन्
वादी=वादिन्
मूलगामी = मूलगामिन् ,
दूरगामी=दूरगामिन् ,
यार्थी=विद्यार्थिन्  ,
लाभी =लाभिन् ,
कृपाकांक्षी=कृपाकांक्षिन्  ,
दर्शनाभिलाषी=दर्शनाभिलाषिन्  ,
साक्षी=साक्षिन् ,
त्यागी =त्यागिन्  ,
तारी=तारिन् ,
घनपाठी=घनपाठिन् ,
दशग्रंथी=दशग्रंथिन् ,
भाषी=भाषिन् ,
भारी=भारिन् ,
याजी=याजिन् ,
दानी=दानिन्
संचारी=संचारिन्
वैभवशाली= वैभवशालिन्
हे सगळे पुल्लिंगी शब्द आहेत. यांची स्त्रिलिंगी रूपे असतात.
मानी =मानिनी,
बली=बलिनी ,
धनी=धनिनी ,
विजयी =विजयिनी,
वादी =वादिनी,
मूलगामी =मूलगामिनी,
दूरगामी=दूरगामिनी, विद्यार्थी =विद्यार्थिनी,
लाभी =लाभिनी,
कृपाकांक्षी =कृपाकांक्षिणी,
दर्शनाभिलाषी =अभिलाषिणी,
साक्षी =साक्षिणी,
त्यागी =त्यागिनी,
तारी=तारिणी,
शाली=शालिनी
माली=मालिनी,
धारी=धारिणी ,
वारी= वारिणी,
मारी =मारिणी
शब्द व्याकरणाच्या अंगाने न शिकता असे शिकले तर सहज ,सोपे व रमविणारे ठरतात.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Tuesday, November 7, 2017

#सहजोक्त


आताशा मनाला हेच भावतं ,
कां तर कोण जाणे ?
फुलांनी लगडलेली झाडं बागेतच असू दे ,
घर मात्र सजवते मी प्लास्टिकच्याच फुलांनी
किती खरे वाटतात ना ,
अगदी झाडावरच्या ताज्या बहराचे !
शिवाय सुकणे ,कोमेजणे अन् त्यावर डास लागणे ,
अशा भानगडीपण नसतात या गुच्छांना ,
अजून मोठ्ठा फायदा त्यांचा सदा टवटवितपणा !
नसेना कां सुगंध त्यांना,
एअरफ्रेशनर लावलाय घरी ,तो काय शोभेला?

म्हणूनच आताशा मनाला हेच भावतं ,कां तर कोण जाणे ?
फेसबुक-व्हॉट्सॅप मधून मैफिली गाजवणे ,
लाईकवर लाईक मारत फ्रेंडलिस्ट वाढवणे,
चर्चांचे फड , चॅटिंगची झड उगा समोर रेटणे,
मन:पूत फोटो वा वाट्टेल ती बातमी जशी मला वाटेल तशी केव्हाही पोस्टणे,
अाताशा हेच सुखं वाटतं ,कां तर कोण जाणे ?

ती नातेवाईक मंडळी घरी येणार म्हणजे घराला पहिले आवरणे ,
खातीरदारी करता करता जिवाला उगाच थकवणे .
त्यांचे ते आंबट-तुरट-कडवट चेहरे नि तेच तेच पाल्हाळ बोलणे,
जरा म्हणून गोड कोणी भासातूनच मनात जपणे , हे सारं सारं कसं सिरियलमध्येच बरं वाटतं ,पण आताशा मला खरच वास्तवाहून आभास भावतो !
आताशा मनाला हेच भावतं ,कां तर कोण जाणे !
©डॉ.प्रज्ञा देशपांडे.
नागपूर

Thursday, October 26, 2017

#सहजोक्त

#सहजोक्त
पावलांना भार होईल येवढे नको वजन
प्रसादावर लक्ष जाईल नको लांबट भजन ॥
अडगळीत भर पडेल अशी नको साठवण
हृदयाला चरे पडेल तशी नको आठवण ॥
निराशमन पल्लवेल  असे असावे भाषण
प्रेरक -सन्मार्गदर्शक असे असावे वर्तन ॥
कोलाहलात स्वस्थ रहावे असे लागावे ध्यान
आपुलकीची ज्योत जागवी तो खरा सन्मान ॥
कायम मन प्रसन्न व्हावे असे असावे जगणे
सारं जग खुशीत रहावे हेच असावे मागणे॥
अवघ्या आयुष्याचे व्हावे परोपकारी चंदन
चराचरात परमेश दिसावा हेच खरे वंदन ॥
 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.




#सहजोक्तं संस्कृतेन ।


दृष्टान्तकथा ।
कस्मिञ्चित् नगरे
प्राचीन: देवालय: आसीत् ।
तस्य महिमा जनेषु ख्यात:। सर्वे भक्ता: तत्र गच्छन्ति स्म ।  नगरजना: सोत्साहं ,स्वयंप्रेरणया देवालये विविधान् भक्त्युपक्रमान्  प्रचालयन्ति स्म । न कोऽपि नेता आसीत् न वा अनुयायी तत्र । सर्वे समानत्वेन कार्यं कुर्वन्ति स्म । नगरजनानां निरपेक्षसेवया प्रसन्ना आसीत् देवता ।देवालयकारणात् नगरजनेषु एकता अवर्धत। सर्वे जना: श्रद्धावन्त: भूत्वा संघशक्तिमनुभूतवन्त:।नगरस्य कीर्ति: दिशि दिशि प्रसृता ।
एवं दिनानि व्यतीतानि ।
एकदा केचन परदेशीया: जना: नगरकीर्तिं श्रुत्वा नगरमागतवन्त:। तत्रत्यं वातावरणम् अनुभूय प्रभाविता: ते मनसि चिन्तितवन्त ,"कथम् एतस्य मंदिरस्य महत्वं न्यूनं भवेत् येन नगरस्य प्रसिद्धि: अल्पीभवेत् ।  जनेषु अस्माकं प्रभाव: वर्धेत ? "
नगरवासिन: तु तेषां हेतुं  न अवगतवन्त:।
नगरजनानां  प्रशंसां कुर्वन्त: ते देवालयं निरीक्षितवन्त: । ते दृष्टवन्त: केचन भक्ता: स्वमहिमानं वर्धयितुमिच्छन्ति । अवसरं प्राप्य परदेशीया: तान् भक्तान् तीर्थाटनार्थं तेषां नगरे आहूतवन्त:। तीर्थाटनात् प्रत्यागत्य स्वाभिमानवर्धिता: भक्ता: नूतनदेवालयं निर्मितवन्त:। अधुना नगरे द्वौ देवालयौ अभवताम् ।
अधुना जनानां पुरत: पर्याय: उपलब्ध:। केचन जना: पुरातनं देवालयम् एव  अगच्छन् । केचन तु नुतनं मंदिरम् एव  अगच्छन् । केचन तु द्वे स्थाने   अगच्छन्। स्वमहात्म्यं वर्धुकामा: नुतनदेवालयकारा: अधुना संतुष्टा:।
शनै: शनै: एकता क्षीणा जाता । एकमेवाद्वितीयदेवालयकारणात् लब्धा ख्याति: अपरदेवालयकारणात् अपगता । नगरस्य एकमेवाद्वितीयस्थानं तु लुप्तम् । यत्र संघे शक्ति: अनुभूता  जनै: तत्र भेदे नाश: अपि अनुभूत:। देवालयभेदत्वात् विभक्ता भक्ति: ।
घटनाक्रमं निरीक्षमाणा: सामान्यपर्यटका: मनसि चिन्तितवन्त: यत् ,
" सर्वे यत्र विनेतार:
सर्वे पण्डितमानिन:।
सर्वे महत्त्वमिच्छन्ति
राष्ट्रं तदवसीदति ॥  "
©डॉ. प्रज्ञा देशपांडे .
नागपूर .

#सहजोक्त

#सहजोक्त

कधी कधी काही सुचतं ,स्फुरतं नि शब्दबद्ध होतं , मग ते काव्य असो वा लेख. सहज ,सुप्त मनाच्या  तळाशी असले नसले काही भाव व्यक्त होतात. ते सारे अनुभूत वा अपेक्षित नसतात उलट बरेचदा  कल्पनारम्य असतात वा सहानुभूतीतून उमटलेले ईषत्स्फूट  असतात.
एकदा सहजोक्त मध्ये  काही लिहिले. नेहमी सारखे दोनशे-अडीचशे नियमित वाचकांना पाठवले. त्यातील एका सर्जक-कवी-लेखकाचा उत्स्फूर्त प्रतिसादाचा फोन  आला.  माझ्या कवितेतील अभिव्यक्तीवर  ते बराच वेळ बोलत होते. जे ही बोलत होते ते ऐकतांना मलापण माझ्या न कळत तो विचार,  विचारप्रवृत्त करीत होता.

भारतीय  संस्कृती पुरुषप्रधान आहे. त्यामुळे पुरुषांना बरेचदा अमर्याद स्वातंत्र्य सहज मिळते. पुरुषांना अनेक गोष्टी अनायास करायला मिळतात. भ्रमरवृत्ती ही पुरुषाच्या रसिकतेशी जोडली जाते. पूर्वी बहुपत्नीत्व हे मर्दपणाशी जोडले जायचे . आजही पुरुषाचे बाहेरख्यालीपण वा लफ़डेबाजपणा अपवादात्मक विकृती म्हणून पाहिली जाते , गुन्हा नव्हे. सौ चूहियाँ खाऊन समाजात स्वच्छ प्रतिमेने जगणारे अनेक बिल्ले आजूबाजूला सहज दिसतात. 'इज्जत ही स्त्रिलाच असते पुरुषांना नाही', असा सर्व समाजाचा सामान्यग्रह आहे. त्यामुळे महिलांना बंधने तर पुरुषांना मोकाटपणा अोघाने येतोच . पुरुषाचे  गंभीर गुन्हेही "भूल" ठरते. तर स्त्रीची अनवधानाने झालेली भूल मोठ्ठा गुन्हा ठरते.  याच सर्व पार्श्वभूमीमुळे स्त्री ही अबला ठरते.  बरेचदा बिच्चारी ठरते . नाते कोणतेही  असो -पत्नी, सवत ,रखेल ,आजकालचं गोंडस नाव गर्लफ्रेंड वा मैत्रीण - बरेचदा ती शोषित ठरते. समाजाची सहानुभूती तिला मिळतेच .
या अशाच विचारातून "रुक्मिणीभावातून" मी कविता लिहिली होती.
पण त्या वाचकांच्या फोनने मला वेगळा विचार करायला भाग पाडले.
रुक्मिणी-सत्यभामा यांना राधा-मीरा यांच्यामुळे अवहेलना सहन करावी लागली असेल. त्यांच्या सहनशीलतेवर व सत्शीलतेवर  अनेक साहित्य रचले गेले. कृष्णाचे राधेशी वा मीरेचे कृष्णाशी असलेले नाते कृष्ण पत्नींना बिचारेपणाच देणारं आहे. जगात साहित्यातून त्याांना तशी सहानुभूती मिळतेही.
पण त्याच वेळी राधेच्या पतीच्या मनाचा विचार कां कोणी करीत नाही? परस्त्रियांना लुटणारा नरकासूर जाणूनच  राक्षस होता. पण राधेच्या पतीचे नशीब किती खराब की त्याला देवापासून वाचवायचे होते स्वत:च्या पत्नीला ! काय मानसिक यातना होत असतील त्याला की आवडती पत्नी परपुरुषाच्या प्रेमात आकंठ बुडालीय ,तो पुरुष सामान्य नसून पुरुषोत्तम म्हणविणारा आहे! तीच बाब मीरेची . अनय राजा होता. समाजात त्याचे श्रेष्ठ स्थान होते. अनेक स्त्रियांना तो हवहवासाही असेल पण त्याची पत्नी कृष्णार्पण झालेली!
परस्त्रीशी संबंध ठेवणं जसे गृहस्त्रीशी प्रतारणा आहे व जे चूक आहे तसेच परपुरुषाची अभिलाषा ही स्वपुरुषाशी प्रतारणाच आहे नि तीपण  चूकच अाहे. होय ना? देव असो वा मानव ; पुरुषप्रधान असो वा स्त्रीप्रधान ! समाजात काय चालले आहे ते ज्याची त्याची मर्जी वा स्वातंत्र्य !  पण साहित्यचित्रण करतांना तरी किमान व्यक्तीच्या भावनांचा समतोलपणे विचार करावा ना? फसवले गेल्याचे ,वंचना झाल्याचे ,लुबाडल्या गेल्याचे दुःख  स्त्रीला जास्त नि पुरुषाला कमी असे कसे होईल ? 
किमान संवेदनशील ,सर्जक लेखन करतांना येवढे भान ठेवावे ना !
त्या वाचकाच्या मनापासून मांडलेल्या विचारांनी मी अंतर्मुख झाली. नेहमी व्यक्त होणा-या भावनांच्या पेक्षा अगदी वेगळा  दृष्टिकोण माझ्या समोर उघड झाला होता.

आता तरी मला भेदभावरहीत व्यक्तिवादी-समतोल विचार करता येईल काय ?  परंपरा-रुढींनी बनविलेले एक पक्के मत इतक्या लवकर तसे बदलेल कां?  समतोल मत संवेदनशीलपणे शब्दातून सहजोक्त मांडता येतील काय?
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Monday, October 23, 2017

#सहजोक्त



परवा खूप दिवसांनी लहानपणीची मैत्रिण दिवसभर रहायला आली . इतके वर्षांचे साठवलेले ,मनाच्या कोप-यातले अनेक विषय अलगद  निघत होते ,गप्पा रंगत होत्या . ती पत्रकार मी  शिक्षक .  त्यामुळे फंडू आदर्शवादापासून व्यवहारिक वास्तवापर्यंत सर्व स्तरावरील सर्व विषयांच्या सगळ्या पातळ्यांवर गप्पा हाणत होतो. अनायासे अद्वैत नि शरद बाहेर गेले होते. म्हणजे "होल वावर वॉज अवर्स "!   कोण कसे रिऍक्ट होतात.यावर गाडी आली. कोणी उगाच स्पर्धा करतात , अकारण  वैर करतात. कोणी अकारण मन दूषित करतात . कोणी टोळकं बनवून वाळीत टाकतात असे एक ना अनेक  विषयांवर मस्त मनमुराद चर्चा झाली.
 बोलतांना ती म्हणाली ,," अग ,आपण आपलं सरळ ल्यूडो खेळल्यासारखं  आयुष्यात आलेलं दान समजून ,स्वीकारून पुढे जात असतो. पण काही लोक ठरवून बुद्धिबळाचा पट मांडून प्यादे जमवतात , वजीर स्वत: होतात , कोणाला घोडा,कोणाला उंट ,कोणाला काय काय करून वापरतात नि आपल्याला टॅकल करून  संपवण्याचा डाव आखतात. आपण गाफिल कधी सापडतोच यांच्या कटात मग आपले अतोनात नुकसान होते ."
तिचे बोलणे ऐकून मी विचारात पडली. खरच कितीदा आपण असे अवचित फसलो ? याचा हिशेब करू लागली. लख्ख  दिसू लागले एकेक प्रसंग. खरोखर सगळ्यांना आपुलकीने ,समानतेने ,न्यायाने वागवतांना ,सांभाळून घेण्याच्या नादात आपण  स्वत:लाच कितीदा डावलले ? याची मोजदाद कठीण होऊन बसली. मी चिंतनात व्यग्र झाली. तशी ती परत  म्हणाली ,"काय मिळतं त्यांना असे वागून ?" "अ ? हो ना!,खरेय!" असं काहीतरी बोलली नि पुन्हा विचारविवर्तात गढून गेली.. . . . . . .      .
इतकी बुद्धिमत्ता, येवढं कर्तृत्व केवळ दुस-याची रेष कमी करायला वा त्याला अपमानित करायला किंवा स्वत:च्या जपणूकीसाठी दुस-याचा बळी द्यायला वापरतांना यांचे मन कसे धजावते ? इतकं कसं सरावतं निर्ढावलेपण कि संवेदनाच संपून जातात. कोणतं यश मिळतं असं दुस-याला असहाय, लाचार करून  स्वत:चा मोठेपणा मिरवण्यात?  खरच हीच कर्तृत्वाची परिसीमा आहे कि मानसिक विकृती ? ... .. . .  . .
पुन्हा तिने तंद्री भंग केली . "काय विचार करतेय?" तिने विचारले. मी म्हटलं ,"अगं प्रयत्न करूनही आपल्याला ते बुद्धिबळ जमेल कां? निरपेक्ष सर्जनशील मन असे कारस्थानं करेल तर सर्जनशीलता संपणार नाही कां? आपण आपलं आपल्या स्वभावानुसार  वागावं ग साधं सरळ ,सकारात्मक  . . त्यांचे संस्कार ,त्यांचे वर्तन ,त्यांचे डावपेच त्यांना लखलाभ .. .  त्यांनी कितीही मात दिली ,तात्कालिक फायदा लुटला . . सोड आपण त्यांचा विचारच करू नये. . आपण आपली मुंगीची गती नि प्रयत्नवाद कधीच सोडू नये. .  . . हे केवळ तत्त्वज्ञान नाही हं सांगत.  . .  अनेक प्रसंग आले नि गेले .  . मी याच पद्धतीने वागते. कधी मला पण  निराशा येते , सारं व्यर्थ आहे वाटतं मग .  मी मार्ग बदलवते नि पुन्हा ध्येयाकडे संथ-सातत्याने चालू लागते. . कोणी सोबत असो नसो .  कोणी मला हारवले याचा आनंद घेऊ दे वा मी संपल्याची खुशी मिळवू दे. . मी आधीपण तीच  होती ,आताही तीच आहे ,पुढेही तीच नि तशीच राहील. सरळ ,कार्यरत ,सकारात्मक. . .   बुद्धिबळाचा डाव मांडून विजयी होऊन एकटं उरण्यापेक्षा , एकट्यानेच ल्यूडोसारखं पाऊल पुढे पुढे टाकत आपल्यासह सगळ्या "आपल्यांना" घेत  समूहाने विजय साजरा करणं केव्हाही छानच ना !
नाही विजय मिळाला तरी समाधान नक्कीच मिळतं बघ. तीच तृप्ती चेहरा सांगतो ,तुमचं सहज वागणं समजतं जगाला . . कोणी कितिही लपवलं तरी तुमच्या सच्चेपणाचा धाक असतोच त्या तशा कर्तृत्ववान लोकांवर . .  . . कुणी निंदा कुणी वंदा आमुचा स्वहिताचा धंदा सोडू नये.  . .
..  . . .  मी स्वगत बोलत होती ,  ती ऐकत होती .  शेवटी म्हणाली ,"खरय ग तुझं .  . ज्ञानेश्वरांचे पसायदान ,शंकराचार्यांचे निर्वाणाष्टक म्हणूनच भावतात ,रुजतात मनात . .. . .  . . आपला सकारात्मकतेचा मूळ पिंड  सोडूच नये. हेच खरं . .

ही दिवाळी करोखर दिवा उजळून गेली अंतरीचा !
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

 ‎

Monday, October 2, 2017

सहजोक्त


#सहजोक्त

संक्रमण>संसर्ग>लागण
हे रोगराईाठी वापरलेले शब्द वाटतात.
पण तसं नाही.चांगल्या -वाईट, प्रवृत्ती-कृती यांचाही संसर्ग>संक्रमण>लागण होत असते ना !
आपण निराश असलो तर जगही निराश भासते.
आपण खुश असलो तर जग खुश दिसते.
निराशावादाने नकारात्मकता पसरते.
संशयीवृत्तीने पछाडले की संशयकल्लोळ होतो.
अहंकाराने व्यापले की सर्वत्र अहंकारच दिसतो.
जसे विचार तसे आचार.
जसा आचार तसा प्रभाव व परिणाम.
सकारात्मक रहाल तर तेच हजारपट होऊन तुमच्या जवळ येणार.
EVERY ACTION HAS EQUAL AND OPPOSIT REACTION.
जैसी करनी वैसी भरनी
पेराल तेच उगवेल.
करावे तसे भरावे.
हे सगळं सगळं माहितच आहे .मग मनात निराशाभाव कां???
निराशात्मक/कलुषित भाव तसेच प्रतिसाद देतील.
चला .
आज आत्ता ताबडतोप आपण आतून आनंदी होऊ या.आपला आनंद कोण्या व्यक्ती/ वस्तु/ बाह्यालंबनावर आधारित नको.

सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो.
कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो.
स्वतत्त्व हृदया कळो, दुरभिमान सारा गळो
पुन्हा न मन हे मळो, मती सदुक्त मार्गी वळो॥
..
मोरोपंतांच्या केकावलीचा अर्थ घेतांना "सुसंगती"म्हणजे चांगली संगत हा च घेतात साधारणपणे.
पण इथे सुसंगती = coordination >विसंगत नसलेले ,अनुरूप ,तर्कसंगत असा अर्थ जास्त प्रभावी वाटतो. आपल्या अवतीभवती कोणत्याही मनोवृत्तीचे लोकं असू देत ;त्यांची कृती मला सुसंगत ठरू दे, हे महत्वाचे.
"सुजनवाक्य कानी पडो"म्हणजे समोरच्याच्या मनात काहीही असो ,वाक्य सुजनच असावे.रामदास स्वामी म्हणतात "सर्वा मुखी मंगल बोलवावे ".
म्हणजे त्यांची इच्छा असो वा नसो ,वृत्ती असो वा नसो आपली प्रतिसादात्मक कृती इतकी प्रभावी असावी की त्यांच्या तोंडून "मंगलच" निघावे, सुजनवाक्यच कानी पडावे ,वाईट ऐकू नयेच.
मानवी बुद्धीला जन्मापासून नकारात्मकतेचीच सवय असते ,तोच बुद्धीचा कलंक होय.तो झडलाच पाहिजे.
विषय म्हणजे भौतिक सुखात लिप्त होणे ,त्याच आठवणींत रेंगाळणे.तोच चाळा बुद्धीला लागतो ,तो अावडेनासा होऊ दे."स्वतत्त्व" हृदयाला कळू दे.दुस-यांचा मोठेपणा सहज कळतो पण "आपण" कोण ते कळत नाही.आपण आपल्यावर मनापासून प्रेमच करीत नाही,दुस-याने प्रेम करावे असे अपेक्षितो . ~दुसरोंकी जय से पहले खुद की जय करे~ हे लक्षात ठेऊन आचरावे.स्वत:ला स्वत: स्वीकारणे फार अवघड.एक तर न्यूनगंडात जगतो वा अहंगंडात.कोणताही गंड न बाळगता 'मी' समजून घेत 'मी'शी एकरूप व्हावे ना !विपश्यनाच ना ती!!!
याच्या पुढची पायरी म्हणजे दुरभिमान गळून जाऊदे.जे क्षणभंगूर आहे ,पद-प्रसिद्धी-पैसा-सत्ता यांच्या पलीकडे माणुसकी .तीच चिरंतन.मग अभिमान कशासाठी??तोच दुरभिमान गळून जावा.गळणे स्वाभाविक प्रवृत्ती आहे."अति झालं न् उतू गेलं" असं व्हावं दुरभिमानाचही."मी दूर केला माझा अभिमान "म्हटले की कर्तृत्व आले आपल्या कडे. नकोच उपाध्या ,गळू दे सारे,सडके फ़ळ गळावे तसे.
एकदाचे हे सगळे करून मन निर्मळ झाले की पुन्हा मळू नयेच कारण स्वच्छ कपड्यावर डाग लवकर पडतात.निर्मळ मन सदुक्त मार्गावर चालू दे.
सत्+उक्त  . सद् म्हणजे चांगले /सत्य इतके नाही तर अस्तित्वात असलेले. जे जे उत्तम उदात्त मंगल तेच सत्  तेच टिकाऊ बाकी टाकाऊ.
तर मन सदुक्त मार्गावर चालू देत.
तर आजपासून आपण जगात वावरतांना सकारात्मक/मंगल विचारांचे संक्रामक बनून वागू या. आज आपण अल्पसंख्य असू कदाचित् पण नक्की बहुसंख्य होऊ लवकरच."एकोSहं बहुस्याम्" हे चिरंतन सत्य आहे.
चला तर संक्रमण करूया सद्विचारांचे , लगण करू मांगल्याची ;सद्विचारांचा संसर्ग वाढवू या.
 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Saturday, September 30, 2017

#सहजोक्त

#सहजोक्त

=शोध स्वत:चा=
कालचा दिवस जरा समाधान देऊन गेला.
आजही, याकाळातही उच्चशिक्षण सोपे नाही. पिएच्डी  करावे हे जुने स्वप्न होतं .त्यानुसार डॉ. स्मिता होटे यांच्या मार्गदर्शनाखाली नोंदणी केली २००८ मध्ये . झपाटून कामाला लागले. कॉलेज-घर-सामाजिक कार्य सारं करून  २०१०ला सादर केला प्रबंध . २०१२ला पदवी मिळाली.
आजकाल आनेकजण ही पदवी मिऴवतात . मग मी वेगळं काय केलं ? प्रबंधाचा समाजाला ,लोकांना उपयोग काय ? असे प्रश्न मनात येत होते. काल ईमेलवर पत्र आले नि मनाला  या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली  .
कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना पिएच्डी करण्यासाठी अभ्यास रजा देत नाहीत वरून अधिक कामे लादतात. शिवाय या पदवीमुळे इन्क्रिमेंट वगैरे मिळत नाही. उलट "आम्ही तुमच्यासारखे पिएच्डी नाही बॉ"! असे आपुलकीचे बोल कानी पडतात.

तरीही मी "ही पदवी मिळवायचीच " असे ठरविले होते. विषय होता ,"विभिन्न राज्यातील माध्यमिक स्तरावरील क्रमिक संस्कृत पाठ्यपुस्तकांचे तौलनिक अध्यायन" .
भारतातील १८ राज्यांची शालेय संस्कृत पुस्तके गोळा केली. यासाठी मदतीला धावले श्रीकांतजी देशपांडे काका ,विद्याभारती संघटन मंत्री. त्यांच्या नेटवर्क मुळे सगळी पुस्तके मिळाली.
आज माझा प्रबंध NCERTने संदर्भसाहित्य म्हणून मागवला. इतकी मोठी संस्था याच विषयावर शोधकार्य करीत आहे. त्यांच्या प्रकल्पाचा सगळा खर्च केंद्रशासन करते. यंत्रणा त्यांच्या दिमतीला अाहे.
 मी तेव्हा  स्वबळावर केलाय याचा आज आनंद आहे.
आज कृतकृत्य वाटत आहे.देवाची कृपा ,गुरुजनांचे आशीर्वाद,स्नेहींच्या सदिच्छा नि घरच्यांची भक्कम साथ यामुळेच  हे शक्य झाले.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे

Wednesday, September 13, 2017

#चिंतन.

#चिंतन.
          भाषा . अभिव्यक्तीचे साधन. व्यक्तिमत्त्वाचे अविभाज्य अंग. भाषा ही प्रवाही , कालौघानुसार परिवर्तनशील असते. काळ-समाज-व्यवसायावरून भाषेत अंतर पडते.
           भाषेचे मूळ अक्षरे आहेत. अक्षरांपासून शब्द तयार होतात. शब्दांचे वाक्य. वाक्यातून साहित्य. वाक्यातून व्यवहार. व्यवहार नि साहित्य दोन्ही ही भाषेला समृद्ध करतात.

     जगात अनेक भाषा आहेत. प्रत्येक भाषेचे स्वत:चे वैशिष्ट्य असतेच.भाषांच्या अभ्यासाला भाषाविज्ञान म्हणतात. भाषाविज्ञान ही पाश्चात्यांची देण आहे ,यात दुमत नाही.
     भाषाविज्ञानात ध्वनि ,रूप आदिंचा विचार केल्या जातो.विविध भाषांची समानस्थळे , विभिन्नता ,वैशिष्ट्य ,वैविध्य यांचा व्यवस्थित ,रितसर अभ्यास करण्याचे हे शास्त्र होय. भाषाविज्ञानाने मानवी दृष्टिकोण विशाल होण्यास मदत होते. तसे बघता हे शास्त्र बरेच अलीकडचे आहे.
     भारतीय ज्ञानपरंपरा अतिशय प्राचीन आहे. वेद व वेदवाङ्मय हे भारतीय ज्ञानाचे मूळ स्रोत आहेत.
     वेद चार भागात विभागले आहेत.  चारही वेद  पाठ असलेले चतुर्वेदी . तीन वेद पाठ असलेले त्रिवेदी ,दोन वेद पाठ असलेले  द्विवेदी.
आज ही केवळ अडनावे आहेत. वेद शिकण्यासाठी जे सहायीभूत विषय आहेत त्यांना वेदांगे असे म्हणतात.
 वेदांगे सहा आहेत.वेदांगात जो निष्णात तो मिश्र.
 मिश्र ही पदवी होती प्राचीन काळी ,आज अडनाव आहे. वेदांगे पुढील प्रमाणे.
     शिक्षा =उच्चारण शास्त्र
     कल्प = यज्ञ मांडणी करण्यासाठी मोजमाप
     छंद = वृत्त ,पद्य लयीत व सुरात म्हणण्यासाठी  रचनाशास्त्र
     ज्योतिष = काळ-वेळ ,ग्रह-तारे , भूगोल-खगोल ,यांचे गणित ज्यांच्या योग्य मेळातून यज्ञ निर्विघ्न व्हावा.
     व्याकरण =  शब्दानुशासन  . शब्दांचे नियमन ,संयोजन , आयोजन ज्यात केले जाते. ते व्याकरण.
     निरुक्त = शब्दव्युत्पत्ती शास्त्र.निरुक्त म्हणजे सोप्या भाषेत प्राचीन भाषाविज्ञान . निरुक्ताचे रचनाकार यास्काचार्य होय.
     ज्योतिष व व्याकरण तसे जनसामान्यांनाही माहित असलेले विषय.
मात्र निरुक्त तितके माहित नसते. खरं तर दैनंदिन जीवनात जे शब्द वापरतो त्यांचे मूळ शोधणे हा रंजक विषय होय. वेदांमधील शब्दांचे समानार्थी कोष निघंटू नावाने अोळखल्या जातो. हा जगातील प्राचीनतम कोश होय.
     निरुक्त हा विषय मोठा रंजक आहे.
     त्यात शब्द कसे तयार झाले ते उलगडून सांगितले आहे. वेदांगांवर सविस्तर लिहायला हवेच .या लेखात जस्ट ट्रेलर!
     काही शब्दांची व्युत्पत्ती पाहू.
     शाखा =  ख म्हणजे आकाश नि श म्हणजे झोपणारे.   आकाशात झोपतात त्या म्हणून  त्यांना श‍ाखा म्हणतात.

     हस्त =   कोणावर उगारायला वा कोणापासून वाचायला जो आड येतो तो हात.
     छात्र =  गुरुचे दोष जो झाकून नेतो तो छात्र.
  पुत्र =  पुम् नामक नरकातून पितरांना वाचवतो ,तो पुत्र.
  अन्य =न आनेय इति परक्याला आणू नये या अर्थाने मूळ शब्द आता अन्य ,दुसरा ,परका या अर्थाने रूढ आहे.
  कर्ण = कृन्त् नावाच्या मूळ धातू पासून तयअर झालेला हा शब्द. कानाचे द्वार कापलेले असते म्हणून.
  अक्षी = डोळे या अर्थी असलेला हा शब्द.चक्ष् या पाहणे अर्थी धातूपासून तयार झाला आहे.अजून एका मता नुसार हा शब्द अञ्ज् लेपणे या अर्थाच्या धातूपासून तयार झालाय कारण डोळा प्रकाशाने वस्तूला लेपतो मगच ती दिसते.
  हृद = हृद् ,आवाज करणे या अर्थी असलेल्या धातूपासून तयार झालेला शब्द . याचा अर्थ मोठी विहीर हा होतो.
  चित्त = चित् विचार करणे या अर्थी असलेल्या धातूपासूनथयार झालाय हा शब्द. चित्त नेहमी विचार करते.
  आदित्य = किरणांच्या द्वारे जो पृथ्वीवरील रस शोषून घेतो तो आदित्य.
  राजा = राज् ,सत्ता गाजवणे या अर्थी असलेल्या धातूपासून  हा शब्द तयार झाला.
  सेना =  स+इन . जिला स्वामी ,नेता आहे ती. किवा जी समान गतीने चालते ती.
   
असे अनेक शब्दांची व्युत्पत्ती निरुक्तात सांगितली आहे. एकूणच निरुक्त वाचणे म्हणजे भाषिक प्रगल्भता प्राप्त करणे होय.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
   
   
   
     

#सहजोक्त.

#सहजोक्त.
कालच्या उच्चांकाचा सतत ढिंडोरा पिटवून उद्याचा फायदा करून घ्यावा हे मला जमलेच नाही॥

सर्वांशी मनापासून समतेने वागण्यामुळे अनेक चढेल झालेत हे  कळतं पण माझा स्वभाव नाही वळत॥

सगळ्यांना भावनिक जपताना कित्तेकदा आतून  मन-भावना कोलमडून पडलेले असहायतेने  स्वत:ला अनुभवले ॥

मी नव्हे आपण हे तत्व रुजवताना सर्रास ढकलून निघून गेलेल्या आपल्यांना मी जवळून पाहिलय ॥

थोड्या पदासाठी वा महत्वासाठी सरळ सरळ प्रतारणा करणारे अनेक दिसले मला ॥

चालत्या गाडीला खीळ घालणारे   तोंडपूजे नि पायखिचे अनेक आलेत वाटेत ॥

उगाच जळणारे ,उगाच मरणारे , उगाच येलणारेही बहूत गवसले प्रवासात ॥

आपुलकी दाखवत  घंटोंशी गप्पा मारणारे, केसाने हळूच  गळा कापताना पाहिले ॥

दुनियेचे रंगढंग पाहिले , अनुभवले पण तसे व्हायचे कधीच जमले नाही ॥

माझ्या एकटीच्या मार्गावर पावला पुरता प्रकाश करीत संथ तटस्थतेने सहज चालतेय मी ॥

अशीच समोरही चालत राहील ही तर नियती माझी नि कृपा गुरुची ॥

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.





Wednesday, September 6, 2017

#चिंतन.

 #चिंतन.
आजचा विद्यार्थी -चक्रव्युहात फसलेला  अभिमन्यू .

अभिमन्यू  ,कोवळा पण उत्साहसंपन्न वीर योद्धा . अोढून आलेल्या प्रसंगाला धैर्याने सामोरे जातो . चक्रव्यूहात सगळ्या थोर महान् दिग्गज तेही जवळच्या नातेवाईकांविरुद्ध एकाकी लढत होता . मदत करणारे मार्गदर्शक जवळ नव्हते. पराक्रमाची शर्थ केली त्याने  , अनुभवाची कमी  , अपूर्ण ज्ञान पण ध्येयासक्ती अफाट . बरीच झुंज दिली पण शेवटी गारद झाला दुनियादारीच्या रगाड्यात .

हे सगळं आठवायचे कारण आजचीे शिक्षणव्यवस्था  , ट्युशनचे महाभारत नि आजचा अभिमन्यू विद्यार्थी .  कोणे एके  काळी सहायक , पूरक म्हणून सुरू झालेला हा उपक्रम संपूर्ण व्यवस्थेला गिळंकृत करणारा अमरवेल ठरत आहे .
 आजचा काळ प्रचंड संक्रमणाचा काळ आहे . सामाजिक , राजकीय ,  सांकृतिक , कौटुंबिक
 सा-यांचा परिणाम शिक्षणक्षेत्रावर होतांना दिसतो आहे . यातच शिक्षणक्षेत्राचे प्रचंड अपयश दडले आहे . ज्या क्षेत्राने समाजाला दिशा द्यायची तेच आज दिशाहीन वाटू लागले . जो तो घटक भाराभिभूत , संभ्रमित तात्त्विक आदर्शवादी होऊ पाहतो आहे . 'परोपदेशे पांडित्य' सुचविणारे अनेक सोकॉल्ड शिक्षणतज्ज्ञ , स्वनामधन्य मान्यवर आज या क्षेत्रात प्रचंड वाढले आहेतच.
 जागतिक स्पर्धा , वेगवान् परिवर्तने , नव्या युगाची आव्हाने नि वर्षानुवर्षांच्या रूढींवर चाललेले शिक्षण यांचा परिपाक म्हणजे आजची संक्रमणावस्था नि संभ्रमण . या सगळ्यांच्या गलबल्यात एकाकी लढणारा वा हारलेला अभिमन्यू रूपी आजचा विद्यार्थी .
 परिस्थिती गंभीर चिंतनीय आहेच . सुदैवाने शासनाने अनेक ठोस पावले भराभर उचलले आहेतच .  पण क्षेत्राच्या अंगी भिनलेले अनेक विकार सहज बदलतील असे नाही.  उलट  चांगल्या बदलांना स्वत:च्या क्षुद्र स्वार्थासाठी वाटेल तसे बदलतील . छोटं उदाहरण देऊन स्पष्ट  करते.  काही वर्षांपूर्वी सातत्यपूर्ण संर्वंकष मूल्यमापन पद्धत
  सा-या भारताप्रमाणे महाराष्ट्रात लागू केली होती .  मुलांचे दैनिक निरीक्षण करणे , त्यांच्या प्रगतीची नोंद ठेवणे , कलागुणांची नोंद करणे. जे कमी आहे ते योग्य रितीने वाढविणे इत्यादि बाबी अपेक्षित होत्या .
 पण इतके वर्षांचे फलित काय तर दैनिक बोंबाबोंब !
 शालेय शिक्षणाची ही अवस्था तर कनिष्ठ महाविद्यालय किंवा उच्चमाध्यमिक स्तराची त्याहूनही भयंकर गती आहे .
 मूळात ११ व  १२ वी  हा अत्यल्पसंख्याक घटक असून अतिदुर्लक्षित आहे.  यातही दोन प्रकार आढळतात. एक वरिष्ठ महाविद्यालयास जोडलेला तर दुसरा शाळेला जोडलेला . शिक्षणविभाग रूपी इंजिन समान असून एक एक्सप्रेस गाडी तर दुसरी मालगाडी इतका दोहोंशी वागण्यात भेदभाव आहे. काही वर्षांपूर्वीच्या माजी शिक्षणमंत्र्यांच्या कृपेने त्यात अजून एक वर्ग तयार झाला , तो म्हणजे कायमविना अनुदानित म्हणजे सामान्य भाषेत रोजंदारी शिक्षक . आधीच अल्पसंख्याक त्यात असंघटीत, मग काय ? मुका बिचारा कुणीही हाका !

 साधारणपणे १२वी नंतर विविध पदवी-अभ्यासक्रम असतात . म्हणजे ११ नि १२ हा शैक्षणिक स्तर शालेयशिक्षण व पदवीशिक्षण यांना जोडणारा दुआ आहे .  पण फार वर्षांपासून या स्तराकडे गांभीर्याने कोणीच पाहिले नाही.
  ना पेशा म्हणून लागलेल्या शिक्षकांनी , ना पालकांनी ना संस्थाचालकांनी , ना शिक्षण विभागाने  व वक्रदृष्टीने पाहिले ते अख्ख्या शिक्षण- यंत्रणेच्या मुळावर उठलेल्या ट्युशनच्या धंद्याने .
  शिक्षक ही वृत्ती नसून पेशा आहे हेच इतके वर्ष समाजाच्या अंगी भिनले आहे.  या सगळ्या कारणांमुळे सगळ्यात मोठे नुकसान विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे होते आहे.  पर्यायाने वर्तमान पालकांचेच आर्थिक स्वरूपात प्रत्यक्ष नुकसान होते आहे . या स्तराला शिकविणा-या शिक्षकांचा बौद्धिक  -हास होतोय तो वेगळा .
  आज या स्तरात शिकणा-या विद्यार्थ्याची अवस्था अभिमन्यू सारखी झाली आहे यात शंकाच नाही .
  क्लास ,कॉलेज ,करियर यांच्या चक्रव्यूहात तो पुरता अडकलाय. कित्तेक वर्षांपासून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे खच्चीकरण , अवमूल्यन , अवप्रतिष्ठा , उपेक्षा त्यांनी स्वत:  तर केलीच आहे  शिवाय शासनातील भ्रष्ट घटक , संस्थाचालक ,  माजलेले ट्युशनसम्राट  तसेच अधिकार व कर्तव्य यांची गफलत झालेला समाज  हेही घटक या अधोगतीला कारणीभूत आहेत .
 जेवढे जेवढे या चक्रव्यूहातून सुटण्याचा प्रयत्न करावा तितकं अधिक फसल्या जात आहे.

 आता एकेका घटकांचा विचार करू.

 शिक्षक =
 आज उच्चमाध्यमिक शिक्षक म्हणजे असून अडचण नसून खोळंबा झालाय. शिकवायची इच्छा आहे पण विद्यार्थी नाहीत . विद्यार्थी आहेत तर शाळा-कॉलेजने लादलेल्या शिक्षणेतर कामात गुंतलेला असतो .  त्यामुळे काम नाही नि पगार भरपूर म्हणून शाळेचे इतर घटक प्रचंड जळतात . इकडे विषय ज्ञान गंजते म्हणून शिक्षकांची तगमग होते . प्रवेशाच्या वेळीच पालक सांगतात , अमूक ट्युशन लावल्या आहेत तर कॉलेज नाही केले तर चालेल ना ?
 ट्युशन शिक्षक सांगतात , "कॉलेजच्या मास्तरला १२वीचे ही येत नाही . ते काय फक्त बोर्डाच्या पेपरापुरता कामाचे . तसेही त्यांना तुम्हाला पास करावेच लागेल , काही ऐकू नका त्यांचे ".
 अशा रितीने सारीकडून नडल्या गेलेला असतो या स्तरावरचा शिक्षक . खरे तर  पदव्युत्तर पदवी व शिक्षणशास्त्र पदवी ही किमान  अर्हता आहे या स्तरावर नोकरी मिळविण्याची . उलट ट्युशनच्या शिक्षकांच्या पदव्या नि अनुभव तपासायची गरज आहे .  पण. . .
 उच्चमाध्यमिक शिक्षकांनी उपलब्ध विद्यार्थ्यांना मनापासून शिकविले तर हळूहळू उपस्थिती सुधारेल .  हा सुखद अनुभव आजकाल येतो आहे .ही अच्छे दिनची सुरवात आहे .

 शासनातील भ्रष्ट घटक =

 "तळे राखील तोच पाणी चाखेल " या म्हणीची सत्यता पटवून देण्यासाठीच सरकारी कचेरीचा जन्म झाला कि काय असे सामान्यांना वाटते .  तरी बरे आजकाल तंत्रज्ञान व माहितीचा अधिकार आहे  . पूर्वी सुद्धा चांगले लोक होते , आताही आहेत . पण काही  निवडक नि नग मंडळींमुळे संपूर्ण यंत्रणेवर संशय येतो .
 स्थानिक शाळा-कॉलेजाची  अद्ययावत माहिती स्थानिक शासन प्रणालीला पुरेपुर माहित असते. तरी  देखिल भूगोल नसलेल्या,  सोय़ीसुविधा नसलेल्या संस्थेला मान्यता देणे , क्षमतेपेक्षा जास्त भरती झाली तरी तपासणीत पास करणे .  कोणी कोणाशी कितीत टायप केला ? हे माहित असून सहीसलामत सोडणे.  वृत्तपत्रांमध्ये राळ उडवली गेली किंवा वरून बडग्या आला तरी थातूतमारूर कारवाई करीत खाल्ल्या अन्नाला जागणे असे अनेक सुरस प्रकार या यंत्रणेत बघायला मिळतात . बरेचदा यांच्याच आशीर्वादाने स्थानिक ट्युशन लॉबी तणासारखी फैलते .

 संस्थाचालक =
 स्वातंत्रोत्तर काळात शिक्षण देणे हे व्रत होते आता हॉटधंदा आहे.  व 'धंदे में सब जायज है ' !  काही तुरळक शैक्षणिक संस्था सोडल्या तर सामान्यांना या धंदेवाईक शैक्षणिक संस्थानिकांचा अनुभव येतोच येतो .  सरकार कोणाचेही येऊद्या यांची स्वत:ची  दुकानदारी अभंग राखण्यात यश मिळवितातच ते . "महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे राहाती" हे वाक्य जणु नसानसातून भिनलेली ही जमात , शाळेतील शिक्षक-विद्यार्थी-पालक यांच्या पर्यंत शासनाच्या ख-या योजना , शासनाची खरी भूमिका पोहचूच देत नाहीत . सर्व लाभ वरचेवर लाटून बाकी घटकांना कसाबसा जिवंत ठेवतात . सुशिक्षित बेरोजगारांचे लाचार लोंढे यांचे सहज बळी ठरतात यांचे . विद्यार्थी तर आपण कोणत्या षडयंत्रात अडकलो आहे हे समजण्यापूर्वीच दुस-या मोठ्या (इंजिनिअरिंग/मेडिकल प्रवेश) वर्तुळात अलगद अडकला असतो. पालकांविषयी स्वतंत्र लिहावे लागेल.
 पैसा-सत्ता यांच्या जोरावर ही संस्थानिक मंडळी प्रभावशाली ठरतात . मग "बळी तो कान पिळी" होणारच .

 ट्यूशन सम्राट =
 आज नव्या व्यवसायाची भरभराट झाली आहे ती म्हणजे "ट्युशन"!   बिनाभांडवलाचा , विना खर्चाचा तरी १०० टक्के नफ्याचा  "दस उंगलीयाँ घी में।"  असा एकमेवाद्वितीय धंदा म्हणजे ट्यूशन .
" मिया का ही सर ,मिया का ही जुता " या न्यायाने विद्यार्थ्यांचेच पैसे , विद्यार्थ्यांचाच वेळ , विद्यार्थ्यांचेच प्रयत्न  मात्र यांचे  नाव-सत्ता-माज . हेच चित्र आजकाल जास्त दिसत आहे.    १०० ते २०० इतके विद्यार्थी एकेका बॅचमध्ये . दोन ते तीन लाख फी प्रत्येक विद्यार्थ्याकडून  अॅडमिशच्या वेळी अर्धी फी नि काहीच महिन्यात उरलेली फी . व्यवसायात पहिले माल व मग किंमत हे सूत्र असते . इथे म्हणजे सारं उलटच . विद्यार्थ्याचा निकाल नीट लागला नाही तर नालायकीचे खापर त्याच्यावरच अलगद फोडले जाते.  इतक्या मोठ्ठ्या समूहात सगळंच समजेल इतका प्रत्येक विद्यार्थी हूशार नसतो. शिवाय दोन वर्ष सतत आठाठ तास दडपणात अभ्यास करणे सा-यांनाच झेपत नाही . विद्यार्थ्यांच्या बौद्धिक कुवतीपेक्षा यांना आर्थिक कुवतच अपेक्षित असते.
 पूर्वी शाळा-कॉलेजाच्या वेळे नंतर क्लासेस चालायचे आता हेच ट्यूशनवाले शाळाकॉलेजला वेठीस धरून , त्यांच्याच वेळेत क्लासेस ठेवतात.
 मध्यंतरी एक किस्सा ऐकायला मिळाला . नागपुरातील ब-यापैकी डॉन क्लासशी नागपुरातील नामांकित हूशार कॉलेजने टायप केले.  समसमा संयोगाने दोघेही भरभरून फळले.  मग कॉलेजची खांदेपालट झाली.  नवे प्राचार्य काही डॉनच्या चरणी गेले नाही.  त्यांना वाटले आतापर्यंत आपला दबदबा होता नि आहे देखिल तर मग  डॉनला दुसरा पर्याय काय ? पण इथे अंदाज चुकला.  जे कॉलेज तिस-या वा दहाच्या पुढे होते त्यांनी मधल्या काळात डॉनची मर्जी संपादित केली . अन् नागपूरचे शैक्षणिक चित्र पालटले .  दहा-पंधरा वर्षे निर्विवाद नंबर एकवाले डाऊनमार्केट झाले नि ढप्पू-पप्पूची कॉलेजेस सरसर वर सरकली .  हा महिमा नि प्रभाव पाहून भल्या भल्यांनी नतमस्तक होणे पसंत केले.
 अशा अनेक सुरस कहाण्या शिक्षण क्षेत्रात मोठ्या भक्तिभावाने सांगितल्या जातात.
  ट्यूशनवाल्यांची कोटीच्या कोटी उड्डाणे हा स्वतंत्र लेखविषय आहे.  MBA फायनान्सची अॅडव्हांस ब्रांच म्हणून MBA ट्युशन अॅडमिनिस्ट्रेशन वा फायनान्स निघाले तर नवल वाटू नये इतके या क्षेत्राचे अमीट योगदान आहे.
  सपनों का सौदागर म्हणजेच ट्यूशन ! अनिर्बंध ,अमर्याद , अनियंत्रित या शब्दांनाही मर्यादा पडावी इतकं हे क्षेत्र खोल आहे .

  पालक =
  अत्यूच्चशिक्षित ते अशिक्षित पालक असो पाल्यांच्या बाबत सगळे एकजात असहाय नि अव्यवहारी होतात . इथेच शिक्षणक्षेत्राच्या ससेहोलपाटीला सुरवात होते . माझा पाल्य "मोठ्ठा" झाला पाहिजे म्हणजे भौतिक सुख संपत्तीयुक्त एवढेच स्वप्न त्यांचे ,चारित्र्यनिर्माण-सुदृढशरीर-राष्ट्रभक्ती वगैरे नंतर पाहू हीच मानसिकता.
  शाळा-कॉलेजात समजत नाही मग लाव ट्यूशन . तेथेही समजत नाही मग होमट्यूटर . तेही नाही झेपत तर  पुन्हा दुसरे दुकान शोधा.अोता पैसा नि करा हूशार ही मानसिकता !
  थोडा धीर धरणे , थोडा शालेयव्यवस्थेवर विश्वास ठेवणे नि त्यांच्याच कडून शिक्षण करवून घेण्याचा दबाव टाकणे या गोष्टी पालकांनी केल्या  ना तर आजच्या सगळ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळून समाज सुरळित होईल , शिक्षणक्षेत्रातील हे निराशाजनक चित्र पालटेल.
  पण सुरवात कोणी करावी ? हा मोठाच प्रश्न आहे.

  आजकालच्या शिक्षण समस्येकडे अजून म्हणावे तेवढे सजग व सक्रियतेने समाज पाहात नाही म्हणून समस्या सुटत नाही.
  या लेखातून समस्येविषयी फार सविस्तरपणे लिहिल्या गेले नाही. एका लेखात आटपेल इतकी सोपी ही समस्या नाही. पण किमान थोडी धूळ झटकावी हा या लेखाचा उद्देश.
  विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेयशिक्षण समृद्ध करून धनदांडग्यांची दुकाने बंद करण्याची नितांत गरज आहे.
  ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
  नागपूर.








Sunday, September 3, 2017

#कविता

#सहजोक्त - कविता.

नवा दिवस उगवला ,नवीन आस जागू दे
नव्या उेमेदीने पुन्हा नवेच स्वप्न पाहू दे
नवी दिशा नवा सूर्य नवेच ध्येय गाठू दे
नव्याच या जगामध्ये नवीनता बहरू दे ॥

नकोच वंचना ही ती नकोच ती याचना
नकोत भास-आभास हे भ्रमविलास ना
नकोच दैन्य, नको दु:ख, नको रे वल्गना
कल्पनेमधिल नको स्वर्ग वा लंका पु्न्हा ॥


अढळ अशा विश्वासाला अढळ श्रद्धा ठेऊ दे
अढळ अभंग अखंड संग नि:संगपणे लाभू दे
अढळ शांती चित्ती सदा अखंड ज्योत तेवू दे
अढळ ह्या जिजीविषेस  मुक्ततेने मुक्ती दे ॥

©डॉ.प्रज्ञा देशपांडे.

Saturday, August 26, 2017

कविता


#पाहूनि गवतफुलास .

निसर्गात अनेक रंगीबेरंगी  फुले आहेत.
आकार-प्रकारांनी ते किती श्रेष्ठ आहेत.
सुगंधाची पण दुनिया किती न्यारी आहे
आकार्षित करण्याची लकब प्यारी आहे ॥

कोणी शोभे ललनेच्या भाळी
आरास  करून मंदिरास मढवी
 कुणी शोभिवंत गृहास सजवी
 कुणी मानवी लोचनांस निववी  ॥

गवताचे हे फुल सानुले
तुलनेने तर गरीब बिचारे
उपवनास अनुपयोगी ते
जातिवंत ही नसे गोजिरे॥

तरी शिवाच्या मस्तकी राजे
वनकन्येच्या कायी विराजे
गिरिशिखरांची शोभा साजे
गवतकुलाचा महिमा गाजे ॥
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.









स्मरणचित्रे.










Saturday, August 19, 2017

#सहजोक्त - लेखांक ५

लेखांक ५
आरत्या म्हणून झाल्या कि शेवटी दोन कडव्यांची संस्कृत कर्पुरारती म्हणण्याचा प्रघात कुठे कुठे आढळतो.

कर्पुरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेंन्द्रहारं
सदा वसतं ह्रदयारविंदे भवं भवानीसहितं नमामि ॥

शेवटचे चरण "भवनी सहितं भवं  नमामि ।
म्हणजे भवानी (पार्वती) सह भवाला म्हणजे शंकराला मी नमस्कार करतो.आता वरच्या तीन अोळीत फक्त शंकराचे वर्णन अाहे. शेवटी मात्र हायकमांड सह आराध्याला नमस्कार केला आहे.
वरच्या तीन चरणांमध्ये शंकराची सर्व विशेषणे द्वितीया विभक्तीत योजली आहे कारण "नमामि" (मी नमस्कार करतो) या क्रियापदाला
कर्म द्वितीया विभक्तीत अपेक्षित आहे.  म्हणजे शंकराची सर्व विशेषणे द्वितीया विभक्तीत आहेत.
कर्पुरगौरम् =कापरा सारखा गोरा.
करुणावतारम् = करूणेचा अवतार.
संसारसारम् = संसाराचे, विश्वाचे सार /मर्म
भुजग इंद्र हारम् = भुजंग राजाचा हार धारण केलेला.
सदा वसन्तम् = नेहमी राहणारा /वसणारा
हृदयारविंदे = भक्तांच्य‍ा हृदयकमळात.
अशा शंकराला कवी पार्वतीसह नमस्कार करतो आहे.
आता दुसरे कडवे. . .

मंदारमालांकृतालकायै ,कपलमालांकितशेखराय
दिव्यांबरायै च दिगंबराय , नम: शिवायै च नमः शिवाय ॥

मंदर माला अलंकृत अलकयै = मंदारफुलांच्या माळांनी जिने केस (अलका) अलंकृत केले आहेत ,सजवले आहेत.  त्या पार्वतीला .

कपालमाला अंकित शेखराय = कपाल ( नरमुंड) माऴांनी युक्त शेखराला ,शंकराला .

दिव्य अंबरायै = दिव्य म्हणजे उची /भारी / महागडे  वस्त्र (अंबर) घातलेल्य पार्वतीला.

दिक् अंबराय = दिशा हेच ज्याचे वस्त्र आहे त्या शंकराला.

नम: शिवायै = शिवा म्हणजे शिवानी म्हणजे शिवशंकरची पत्नी ,तिला. नमस्कार असो.

नम: शिवाय =  शिवाला म्हणजे शंकराला नमस्कार असो.

नम: हे अव्यय असून त्याचा अर्थ "नमस्कार असो" हा होतो. या अव्ययाला चतुर्थी विभक्तीची  अपेक्षा असते.

या श्लोकात पार्वती व शंकर अशा दोहोंना ही त्यांच्या विशेषणांसह नमस्कार केला आहे.
पैकी पार्वतीची विशेषणे स्त्रीलिंगी चतुर्थी विभक्तीत तर शंकराची विशेषणे पुल्लिंगी  चतुर्थी विभक्तीत आहेत.

शिव-पार्वती या दंपतीच्या स्वभावात ,रहाणीमानात आमूलाग्र भेद आहे. तो इथे ठऴकपणे दाखविलाही आहे. तरीही सर्व देवांमध्ये ही "जोडी नंबर एकच" आहे. कारण त्यांचा बाह्य भेद त्यांच्य‍ा अंतरंगातील अद्वैताला छेद देत नाही. अंतरंग समन्वय फारच महत्वाचा . "जो अंदर फिट ,वो बाहर भी हिट"!.

पाच लेखांमधून मराठमोळ्या संस्कृतीला जपणा-या आरती नामक अक्षरवाङ्मयाचा वेध घेण्याचा यथाशक्ती प्रयत्न केला. या वाङ्मयाकडे भाषाभ्यासकांनी अधिक लक्ष द्यावे तसेच भाषेच्या विद्यार्थ्यांनी याही वाङ्नयाकडे अभ्यासविषय म्हणून पहावे ही विनंती.
सामान्य वाचकांनी अर्थ समजून आरतींचे उच्चार केले तरी हा वाग्यज्ञ सफल झाला हेच मी समजेन.
देवार्पणमस्तु ।
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
नागपूर.



Friday, August 18, 2017

#सहजोक्त .लेखांक४

#आरती. .  लेखांक ४
#लवथवती विक्राळा. .
शंकर एक आराध्य दैवत. विनाशकारक देव सृष्टीचा लय कर्ता पण शब्दसृष्टीचा कर्ता. त्याची ही आरती. हाच एकमेव देव ज्याची पत्नी ही अगदी
 प्रिय- प्राणेश्वरी-सहचरी-सहधर्मचारिणी आहे. म्हणून हा देव सर्वात जास्त आवडतो.  म्हणूनच याची पूजा कन्यकांनी करावी कि जेणे करून पती  शंकराप्रमाणे पत्नीची कदर करणारा , समानपणे वागणारा मिळेल.  असो.

लवथवती विक्रळा ब्रह्मांडी माळा ।
विषे कंठ काळा, त्रिनेत्री ज्वाळा ॥

तांडवनृत्य करणा-या , तिसरा डोळा उघडलेल्या रौद्ररूप शिवाचे हे वर्णन . तसे कर्मकांडानुसार उग्रदैवताची आराधना करू नये म्हणतात पण इथे तर पहिल्याच अोळीत देवतेचे उग्रभाव प्रगटले आहेत.  तांडवनृत्य करताना ज्याच्या गळ्यातील विकराळ , महाभयंकर नरमुंडमाळ हिंदकळत आहे . ज्याचा गळा विषामुळे निळा-काळा झालाय. ज्याच्या तिन्ही डोळ्यातून ज्वाळा निघत आहेत. शंकराच्या तीन डोळ्यांपैकी एक चंद्र ,एक सूर्य तर एक अग्नी आहे.
या अोळीत उग्र दैवताचे वर्णन तर घडले आता लगेच त्याला उतार.

लावण्यसुंदर मस्तकी बाळा
तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा ॥

शंकराच्या मस्तकावर लावण्यसुंदर अशी बाला आहे.
मराठीत 'ल' चा  'ळ' होतो. जसे. .  . .
कुल=कुळ
कला=कळा
निला=निळा
जल=जळ इत्यादी .
बाळा म्हणजे बाला.  म्हणजेच सौभाग्यकांक्षिणी स्त्री.  सोप्या शब्दात नवरा काय ,कशासाठी हवा हे समजू शकणारी सज्ञान तरूणी.  शंकराच्या डोक्यावर लावण्यवती गंगा आहे जिच्यापासून झुळझुळ, निर्मळ जळ वाहते .

सुंदरच रचना!
या दोन्ही अोळीत लवथवती , झुळझुळ  हे नादमय शब्द चपखल योजले आहेत . क्रोधात लवथवणारच .प्रेमात झुळझुळणारच . विसंगतीपूर्ण अर्थयुक्त शब्द ,वाक्य जवळ जवळ,  हा ही एक अलंकारच म्हणावा !
वर रौद्ररूपातील रौद्ररसयुक्त वर्णन तर
 दुसर्‍या अोळीत निर्मळ , प्रेमळ असे शांत, श्रुंगाररसयुक्त वर्णन!
  त्रिनेत्र ज्वाळा अोकत आहेत तर पाणी झुळझुळ वाहते आहे.


जयदेव जयदेव जय श्रीशंकरा
आरती  अोवाळू तुज कर्पूरगौरा ।

शंकराचा जयजयकार केला आहे.शंकर कापरासारखा गोरा आहे. फेअर अँड लव्हली न लावताही फेअर !!

कर्पूर गौरा भोळा नयनी विशाळा
अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा॥
विभुतीचे उधळण शितीकंठ निळा
ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा ॥

कर्पुराप्रमाणे गौरवर्णीय असलेला हा शंकर भोळा आहे.त्याचे डोळे विशाल, मोठे-मोठे आहेत. त्याची अर्धांगिनी (शब्दश:  पण आणि लक्षार्थाने पण) ;  पार्वती  मंदारपुष्पमालांनी सजून त्याच्या अर्धासनावर बसलेली आहे .
त्याच्या अंगावर  चिताभस्म विभूतीचे उधळण  आहे.
ज्याचा मूळातील पांढरा गळा आता विषप्राशनामुळे  निळा झाला आहे.  असा हा शंकर उमावेल्हाळ   आहे.
'वेल्हाळ' एक मस्तच मराठी शब्द . गोष्टीवेल्हळ, वेल्हाळगौर असे शब्द वापरतो आपण .
 वेल्हाळ म्हणजे दिवाना ,वेडा .  उमेचा म्हणजे स्वत:च्या पत्नीचा दिवाना . खरोखर सलाम आपल्या पुराणकथांना  ! गंगा कितीही डोक्यावर बसू देत ,हा मात्र उमेचाच दिवाना !
 "मान गये उस्ताद"!  म्हणूनच महादेव आहात.

देवी-दैत्यी सागरमंथन पै केले।
त्यामाजी अवचित हालाहल जे उठले।
ते त्वा असुरपणे प्राशन केले
नीलकंठ नम प्रसिद्ध झाले।।

या अोळीत जरा जुन्या मराठीच्या पाऊलखुणा आहेत. पै हे पादपूरणार्थ अव्यय आहे.
याला मुळचा अर्थ नाही.
देवी-दैत्यी या शब्दांत तृतीयेचा 'ई' प्रत्यय आहे.
त्वा हा ही तद्भव शब्द आहे. (सध्याच्या प्रचलित नागपुर ग्रामीण बोलीत "तुवा असं काहून मनलं ?" म्हणतात ना ? त्यातील हा त्वा  आहे .)
देवांनी आणि दानवांनी सागरमंथन केले , त्यातून अनपेक्षित , अचानक, एकाएकी , अवचित हालाहल नावाचे जहाल विष बाहेर पडले . इतर रत्ने घेण्यास सगळे समोर पण हे मात्र कोणीच स्वीकारले नाही. त्यावेळी असूरपणे म्हणजे अतिशय पराक्रमाने, उत्साहाने तू ते प्राशन केले .
असूर या शब्दाचा राक्षस हा अर्थ मागाहून  रूढ झाला. आधी त्याचा अर्थ पराक्रमी असा होता. तसेही राक्षस अफ़ाट पराक्रमी होते.
सामान्य देव मृत्यू पावले असते वा त्यांचे सर्वांग निळे झाले असते पण तुम्ही महादेव ! तुमचा गळा निळा झाला.  म्हणून तुमचे नाव निळकंठ पडले.

व्याघ्रांबर फणिवर सुंदर मदनारी
पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी
शतकोटीचे बीज वाचे उच्चारी
रघुकुळ टिळक रामदासा अंतरी ॥

शंकर गजाजीन घालतात वा व्याघ्रांबर  घालतात. येथे शंकराचे वर्णन करताना त्यांनी व्याघ्रांबर घातले आहे असे म्हणतात.  फणिवर म्हणजे श्रेष्ठ नाग धारण केलेला शंकर ,सुंदर असून मदन अरी आहे , म्हणजे मदनाचा शत्रु आहे. शंकराची पिंड म्हणजे पति-पत्नीच्या एकत्वाचे प्रतीक अन् तो मदनारी!! कसे शक्य आहे हे ? उमेचा वेल्हाळ ! तरी मदनरी?

 इथेच गंमत आहे.जीवनात सर्वच रंग हवेत, योग्य तेथे योग्य मात्रेत .  रंगांची सरमिसळ नको किंवा एका रंगातून दुसर्‍या रंगात शिरताना जुन्या रंगाची उजळणी नको.  हा तसाच आहे.  म्हणून तो मदनारी आहे.
 पंचानन म्हणजे सिंहासारखा पराक्रमी.
 मनमोहन म्हणजे मन मोहविणारा.
 मुनिजनांना सुखकारक ठरणारा ,
 असा हा शंकर रघुकुळाला भूषवाह असलेल्या रामदासाच्या अंतरंगात शतकोटीचे बीज वाचेतून प्रकटू दे .

 आता पर्यंत प्रचलित तीन आरतींचे रसग्रहण मला भावले तसे यथामती केले. "तेच बरोबर" असा माझा दावा नाही. यापेक्षा अधिक चिंतन करून कोणी मांडू शकतीलच अशी आशा नव्हे खात्री आहे.
 "देवार्पणमस्तु।"
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
नागपूर

Thursday, August 17, 2017

#सहजोक्त -३

लेखांक ३

देवीची आरती
आरत्यांचे सुद्धा वंदेमातरम ,जनगणमन सारखे असते पहा . एकट्याने म्हण म्हटले तर येत नाही , ही अोळ पुन्हा म्हण , सावकाश म्हण , लयीत बदल कर अशा सूचना केल्या कि पार सगळे विरून जायला होते.  कधी कधी या आरतीचे कडवे त्या आरतीत रिमिक्स होते तर कधी कधी तेच तेच पुन्हा पुन्हा म्हटले जाते . उच्चारण हा यर विवाद्य विषय . असो .
साधारणपणे  'दुर्गे दुर्घट भारी '  ही आरती 'सुखकर्ता दुखहर्ता'  या आरतीची जणु जोड-आरती समजून म्हटली जाते  . पण ही स्वतंत्र आरती असून नरहरी नावाच्या कवीने रचली आहे . संस्कृत काय किंवा मराठी काय प्राचीन  काळात  स्वत: बद्दल फारसं  सांगत नसत कविलोकं .
या लेखात देवीची ही आरती बघू .

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसरी =

या अोळीचा अर्थ असा की , "हे दुर्गे , तुझ्याशिवाय हे भारी दुर्घट संसरवणे कठिणच आहे" .  इथे दोन शब्द विशेष  लक्षात घेण्यासारखे आहेत . त्यातील पहिला म्हणजे दुर्घट = दुर् +घट हा शब्द .
'घटना'  हा सामान्य परिचित शब्द याच घट पासून तयार झाला आहे.
घट , घाट , घटनावळ , घडविला , घडी , घटिका असे अनेक शब्द व्युत्पन्न होतात . दुर्घट म्हणजे घडण्यास कठिण , होण्यास  कठिण . दुर्  हा उपसर्ग थोडा नकारात्मकच असतो .
जसे - दुर्दैव , दुर्भाग्य , दुर्लभ , दुष्कर्म इत्यादी.
आता दुसरा शब्द संसरी , संसारी नाही.
संसर =सर् म्हणजे योग्य गतीने सरकत रहाणे .
 जो योग्य गतीने सरकत असतो संसार.
 तो पुढे पुढेच जातो , परत येत नाही . 'संसार' हे नाम आहे तर संसर हे क्रियापद आहे.
 " हे दुर्गे तुझ्याशिवाय हे भारी दुर्घट पुढे सरकणे कठिणच आहे " असा एकूण अर्थ .

"अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी"=

हे अनाथांची नाथ असलेली आई . अंब ह्या संस्कृत शब्दाचा आई असा  अर्थ आहे.
या शब्दापासून  विविध भाषेत अम्मा , अम्मी  , अम्मा  , अंबा , आऊ , आई  असे शब्द दिसतात. नरहरी कवी म्हणतात ,  "आई अंबे , तू तुझी करूणा विस्तार , विस्तृत कर , वाढव. माझ्यावर कृपाकर .  जन्म-मरण यांचा फेरा हाच संसर. यापासून वारण कर  , वाचव .  इथे "वारी"  हा शब्द आहे .  निवारण करणे  , अनिवार असे शब्द आपण सामान्य भाषेत नेहमीच योजतो , त्यातील मूळ शब्द वृ (वर्)अडवणे या अर्थी आहे .  इथे आरतीत "वारी"  हे क्रियापद आहे .  तू अडव , तू निवारण कर हाच  अर्थ आहे.
आता पंढरपुरची वारी म्हणजे काय ?  तेथे हा शब्द क्रियापद म्हणून  नाही नक्की . तेथे परिक्रमा, यात्रा या अर्थाने आपण तो शब्द योजतो . " मूळात संसारापासून विरक्त , मुक्त करते ती यात्रा म्हणजे वारी "  असा अर्थ असेल ना ?
 तेथे वारी हे नाव आहे . असो.

"जयदेवी जयदेवी जय महिषासुरमथिनी सुरवर ईश्वरवर दे तारक संजीवनी"=

त्या दुर्गेचा जयघोष  केला आहे.  महिषासुराची मथिनी म्हणजे जिने  मथन केले आहे म्हणजे अगदी घुसळून टाकले  , आजच्या भाषेत  "पार लोळवलेच".  सुरवर म्हणजे श्रेष्ठ देवता  ,  ईश्वर  म्हणजे शंकर या सर्वांना वर देणारी ,  
जी तारणारी , संजीवन देणारी आहे .  अशी ही अफाट कर्तृत्ववान महिला शक्ती.

"त्रिभुवनी भुवनी पाहता तुज ऐसे नाही"=

त्रिभुवनी-भुवनी या शब्दरचना केवळ अनुप्रासाकरिता नसावेत.  स्वर्ग-मृत्यू-पाताळ असे तीन भुवन आहेत  आणि आज वर्तमानात जे घडत आहे ते भुवन .  दुर्गा ही अनादी-अनंत अाहे . कवीला तिची अनुभूती आज या भुवनात ,वर्तमानात आली.  असे बघा,  "अनेक वर्ष आपण एखाद्या व्यक्तिमत्त्वाला पाहात असतो पण अवचित प्रसंगाने क्षणात वीज चमकावी तसे  आपल्याला व्यक्तिमत्त्वाची थोरवी कळते "  तसे काहीसे या वाक्यात आहे.   "तुझ्यासारखे दुसरे कोणी या त्रिभुवनात नाही",  अशी अनुभूती कवीला झाली आहे.

"चारी श्रमले परंतु न बोलवे काही
साही विवाद करिता पडलो प्रवाही "=


चार आश्रम, चार युग असे जे काही  म्हणून चार असतील ते ते सर्व श्रमले,  तुझ्यापुढे अपुरे पडत आहेत ,  तोकडे पडत आहे , थकले बिचारे.
सहा वेदांग ,सहा शास्त्रं , सहा दर्शने आहेत.
 जे नेहमी एकमेकाचे खंडन-मंडन करीत असतात आणि त्यातून वाक्प्रवाहात पडतात .
 "वेद" म्हणजे ज्ञान परिपूर्ण-संपूर्ण झाले की बोलवत नाही मात्र विवाद आला की प्रवाहात पडणे आलेच, चिरंतन सत्य !

"ते तू भक्ता लागी पावसी लवलाही "=

ते म्हणजे तशी तू भक्तांसाठी लवकर ,क्षणाचाही विलंब न करता पाव, पावतेसच , हा विश्वास.

"प्रसन्न  वदने प्रसन्न होसी निजदासा "

निज , तुझा वैयक्तिक दास , निजदासावर तू प्रसन्न हो . हे  प्रसन्न वदना देवी ,  इथे "निजदासा" ही सप्तमी आहे.  'त ई आ' हे सप्तमीचे प्रत्यय . त्यातील "आ" हा प्रत्यय फार कमी ठिकाणी आढळतो .  तोच इथे आहे.
"क्लेशापासुनी सोडवी तोडी भवपाशा"
क्लेशांपासून सोडव आणि भवपाशांना तोड .
पाश तोडावेच लागतात. भव म्हणजेच संसार. भवपाशा इथे ही "आ" प्रत्यय आहे , पण सप्तमी नाही.

"अंबे तुज वाचोनि कोण पुरविल आशा "=

आईला लडिवाळ आळवणी कि ,'अग आई , प्लीज तुझ्याशिवाय  कोण ग करू शकेल ? तुझी नाही तर कोणाची खात्री देऊ सांग ना ?'

"नरहरी तल्लीन झाला पदपंकजलेशा" =

नरहरी कवी ,स्वत:त थोडाही  न उरता तुझ्या पदरूपी कमळामध्ये तल्लीन (तत् +लीन) लीन म्हणजे एकरूप होणे . त्यात एकरूप, कशात ?
 तर त्या तत्वात !

ही आरती म्हणजे उत्कट भक्तीची कविता आहे.कवीच्या अलौकिक प्रतिभेने जनमानसावर गारूड घातले आहे . भक्ती महत्वाची , तितकीच शब्दभक्ती नि अर्थभक्ती  देखील !
देवीची अनेक नावे आहेत पण येथे "दुर्गा" म्हटले आहे .  दुर् + ग = दुर्ग . दुर्ग म्हणजे जाण्यास कठीण. म्हणून तर पर्वताला दुर्ग म्हणतात.
 सहज झपझप नाही जाता येत तेथे.
  तशी ही देवी "दुर्गा"आहे.  कोणीही कधीही पटवावी अशी ती 'आशुतोष' , 'सुलभा' नाही .
  म्हणून  तिला  ही आळवणी.
 
दुर्गा-क्षमा-शिवा-धात्री-स्वहा-स्वधा नमोSस्तुते ।

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Wednesday, August 16, 2017

#सहजोक्त - लेखांक २

लेखांक 2

आरती
धार्मिक वाङ्मय म्हटले ,की त्याला एक वेगळे वलय चिटकवण्याची घाई , भक्त आणि निंदक दोघेही करतात . येथेच या वाङ्मयावर प्रचंड अन्याय होतो . साधे "आरती" प्रकार बघू या .
कर्मकांडानुसार षोडशोपचार विधीने पूजा केल्या जाते त्या सोळाही उपचारांमध्ये "आरती" हे नावच नाही. संस्कृतमध्ये याला आरातिक्य असे नाव आहे पण त्याचाही उल्लेख सोळा उपचारविधीत नाही .
 तरीही रूढीप्रिय समाजात "आरती" फारच प्रचलित आहे .  देवाची , गुरुची , संतांची आरती , इतकेच नाही तर वृक्षाची , नदीची ,पोथीची पण आरती आढळते . खरे तर आरती म्हणजे  पूर्णपणे
रत /रममाण होऊन केलेली शब्दस्तुती .
मूळात आरती ही पण एक कविताच असते ना !
 ती ती देवता हा त्या कवितेचा वर्ण्यविषय  असतो इतकेच . आपले मराठी वाङ्मय विशेषरित्या
 धार्मिक-वाङ्मय अतिशय सखोल , गंभीर  आणि चिंतनप्रवण आहे , यात शंकाच नाही .
ज्ञानेश्वरीत  कोणे एके ठिकाणी पार्वती शंकराला प्रश्न विचारते की, गीतेचा महिमा काय ?  त्यावर शंकर उत्तरतात , 'देवी ,जशी तू रोजच नित्यनुतन वाटते , कितीदा बघावे तरी दरवेळी नाविन्य जाणवते तसेच गीतेचे स्वरूप आहे ".
हाच दृष्टांत 'धार्मिक वाङ्मयाला  तंतोतंत  लागू होतो. जितके वेळा तुम्ही ते वाचाल, मनन कराल , चिंतन कराल ; तुम्हाला त्यातील खोल-खोल, वेगवेगळे अर्थ उलगडत जातील . जे जे तुम्ही अनुभवाल ते सारे इतरांना सांगावेच असे नाही .
"आपल्याला आलेली अनुभूती दुस-यात संक्रमित करायला 'बळकट गुरु' असावा लागतो"  असो.
भाषा अभ्यासकांनी टोकाचे अतिरेक सोडून निव्वळ भाषा म्हणून आरतीकडे पहावे . कवीचे काव्य , गीतकाराचे  गीत, तसे आरतीकाराची आरती .
इतके सोपे "ए फॉर अॅपल" सारखे असावे .
जसा जसा अभ्यासाचा स्तर, पोत  वाढेल तसे तसे
 "ए फॉर एनिथिंग" शिकवावे लागणार नाही ,
तर आपोआप समजेल !
आता पहिली आरती गणपतीची .

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची
 नुरवी , पुरवी प्रेम कृपा जयाची ॥

 सर्वांगी  सुंदर उटी शेंदुराची
 कंठी झळके माळ मुक्ताफ़ऴांची॥१॥

 जय देव जयदेव जय मंगलमूर्ती
 दर्शनमात्रे ,मन कामना पुरती ॥धृ॥

 रत्न खचित फरा तुज गौरीकुमरा
 चंदनाची उटी कुमकुम केशरा
 हिरेजडित मुकुट शोभतो बरा
 रुणझुणती नुपुरे चरणी घागरीया॥२॥

 लंबोदर पितांबर फणिवर बंधना
 सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना
 दास रामाचा वाट पाहे सदना
 संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ॥३॥


 अाता एकेक करून अर्थ बघू .
 "सुखकर्ता दुखहर्ता  "

  सुख करणारा , दु:ख हरणारा ; इथे अर्थ द्विरुक्ती आहे कां ? सुख मिळणे म्हणजे दु:ख नष्ट होणेच ना ? पण तसे नाही . एसीत बसलोय , थंडीचे सुख घेतोय पण वाढत्या बिलामुळे दु:ख पण वाढते आहे ना ! म्हणून सुख करणारा गणेश आणि दु:ख दूर करणारा दु:खहारक गणेश असे दोन्ही रूपे हवेच .
कर्तृ>कर्ता ;
हर्तृ>हर्ता ;
भोक्तृ>भोक्ता ;
वक्तृ >वक्ता
या पद्धतीने हे रूप सिद्ध होते .

 "वार्ता विघ्नाची नुरवी " =

 विघ्नाची , वि+घ्न म्हणजे विशेष रितीने नाश करणारे जे काही असेल ते ; त्या सर्वांची वार्ता म्हणजे प्रत्यक्ष संकटे , अडचणी , विघ्न येण्यापूर्वी जी सूचना वा संकेत मिळतात त्यांची वार्ता नुरविणारा .
नुरविणे  हा सुंदर सुंदर मराठी शब्द .
न उरविणे , खरे तर अ+उ बरोबर अो , होतो.
जसे गणेश+उत्सव =गणेशोत्सव,
प्रश्न+उत्तर=प्रश्नोत्तर .
पण नुरवणे शब्दात या संधिनियमाला अपवाद आढळतो . न+उरविणे=नुरविणे,पररूप संधी म्हणता येईल.

 पुरवी प्रेम कृपा जयाची =

 ज्याची कृपा प्रेम पुरविते . मुळात आपले अस्तित्व एक 'चैतन्यमय आनंद" असतो . तोच प्रत्येकाचा 'स्वभाव' असतो .  द्वेष , राग , मोह , मत्सर , अहंकार इत्यादी स्वत:वर लादलेल्या विकृती आहेत म्हणून गणेशाची कृपा झाली , खरे गणेशतत्त्व कळले की फक्त आणि फक्त 'प्रेमभाव' शिल्लक राहतो .
गणेश मूर्तीचे वर्णन करतांना रामदास स्वामी
 जिवंत मूर्ती डोळ्यासमोर उभी करतात .
सर्वांगाला शेंदुराची उटी लावली अाहे .
 गळ्यात मोत्यांची माळ घातली आहे.
ती माळ चमकते आहे झळकते आहे म्हणजे
दुस-यांच्या डोळ्यात तिचे तेजस्वी अस्तित्व जाणवतेय.
आता प्रत्यक्ष गणपती,  जो पार्वतीचा मुलगा ,
केशर-कुमकुम युक्त चंदन उटी लावतो .
आपण नाही का सन्स्क्रिन ,डिओ लावतो ?
 त्यावेळेचे ते इकोफ्रेंडली श्रुंगारसाधने.
हिरेजडित मुकुट, रत्नखचित फ़रा अशा अॅसेसरीज् , अॉर्नामेंट हे असणारच ना !
 यातही पहा ; रामदासस्वामी  गणपतीला शंकराचा पुत्र म्हणत नाही . कारण शंकर म्हणजे दिगंबर , चिताभस्म लावणारा चंद्रमौली पण पार्वती ही हिमालयाकन्या , दिव्यांबरा , छान राजस रहाणी असलेली ; तिचा हा वारस , मग तोही छानच रहाणार.

 लंबोदर पितांबर-फ़णिवरबंधना =

 गणेश कसा आहे तर लंब उदर ,पीत अंबर  घातलेला आणि 'फ़णिवर' म्हणजे बेल्ट घातलेला आजकाल पँटच्या पॅटर्न नुसार बेल्टची व्हेरायटी असते मग विचार करा ना ! पिवळ्या रेशमी धोतरावर श्रेष्ठ  नागाचे बंधन ! So cool ,No !

 सरळ सोंड -वक्रतुंडत्री नयना =

 गणेशाची सोंड सरळ पण सोंडीच्या भारामुळे तोंड थोडं वाकडे होणारच ना ! बाबांचा शंकराचा वारसा त्रिनेत्र रूपाने  मिळवला आहे.

 रामदासाचा वाट पाहे सदना
 संकटी पावावे ,निर्वाणी रक्षावे
 सुरवर वंदना  =

 रामाचा दास या गणेशाची सदनात , घरात म्हणजे
या शरीररूपी मंदिरात आर्ततेने वाट पाहतो आहे. गणेशा, संकटसमयी मला पाव रे .  वाण म्हणजे वासना , इच्छा .  सगळ्या संपल्यात  , निर्वाण झाले आहे ,आता रक्षण करा .
सुर वर म्हणजे ज्येष्ठ-श्रेष्ठ  देवांकडून वंदल्या जाणारा गणेश .

 दर्शन मात्रे मनकामना पुरती =

 हा ही सुंदर वाक्य प्रकार . तसे शब्दसिद्धी नुसार मनोकामना  व्हायला पाहिजे पण मन हे क्रियात्मक इंद्रिय आहे . त्यात कामना म्हणजे इच्छा असणारच. त्याची "पूर्ती" म्हणजे पूर्तता म्हटले नाही कारण मनाच्या इच्छा अनंत असतात , त्या पूर्ण होतच नसतात .
पण मंगलमूर्तीच्या दर्शनाने त्यांची "पुरती" होते . भर पासून भरती तसेच पुर पासून पुरती.
 म्हणजे इच्छेत गणेश/ मंगलमूर्तीच रहाते मग बाकी पूर्तीची गरज नाहीच !
 गणपतीची आरती अजून सखोल चिंतता येईल .
पण माझ्या तोकड्या ज्ञानाने मला सध्या इतकेच सुचले आहे . एकमात्र आवर्जून जाणवते कि , आपले अक्षर पासून वाङ्मयापर्यंत सगळे सगळेच कलासक्त , सौंदर्यासक्तच आहे.
     भद्रं कर्णेभि: श्रुणुयाम देवा :   . . . .  . . ।
     म्हणतात ते उगाच नाही .
"देवा , माझ्या नजरेला चांगलेच दिसू दे " याचा अर्थ "जगात चांगलेच असू दे अाणि चांगल्यातील चांगले बघण्याकडे माझी वृत्ती असू दे बाह्यंग-अंतरंग सुंदर असू दे ".
     हाच बोध प्रत्येक वाङ्मयातून असावा असे वाटते.
     एकूणच या गणपतीच्या आरतीतून रामदासस्वामींची तप:साधना आहेच.
या शिवाय इतक्या लीलया प्रासादिक रचना , अलंकारांचा वापर  साधणार नाही .
वानगीदाखल सुखकर्ता-दुखहर्ता-वार्ता  या रचनेत
'र्ता' या वर्णाची पुनरुक्ती करून वर्णानुप्रास साधलाय . तर विघ्नाची-जयाची येथे यमक आहे .
'फणिवरबंधन' येथे रूपक अलंकार आहे.
किती किती शोधावे ? एकेका शब्दातून  भाषिकसौंदर्य सौष्ठव भरभरून दिसते आहे .
     मुळात गणेश हा गोरा देव . त्याचे बाबा शंकर कर्पूरगौर आणि आई तर गौरीच !
 गोरा गणेश कुमकुम-केशर-चंदनाची उटी लावतो ,
पिवळे झळझळीत रेशमी धोतर घालतो.
गळ्यात चमकदार मोती ,नव्हे नव्हे  मुक्ताफ़ळ म्हणजे टपोरे मोती यांची माळ घालतो.
डोक्यावर हिरेजडित मुकुट , पायात रुणुझुणु नाद करणारे घांगरिया  असलेले नुपूर म्हणजे पैंजण.
     सौंदर्यासह पंचेंद्रियांनी ज्ञान ग्रहण करावे याचा वास्तुपाठच या आरतीतून मिळतो .
डोळ्यांना मंगलमूर्ती ,जी मूळात सुंदर आहे आणि वर जिने बाह्यरूप सुद्धा उटी-माळ-पैंजणादींच्या सहायाने सुंदर केले आहे .
     आपल्या कानांना यातील नाद ऐकू यावेत. माळ झळकतेय, तिचा नाद , नुपूरांची रुणझूुण ,
जिवंत फणिवर म्हणजे फणा उगारलेला श्रेष्ठ  नाग , त्याची सळसळ , पितांबराची सुळसुळ  असे अनेक नाद-लय कानांनी ऐकावे .
चंदन , केशर इत्यादींनी आपले घ्राणेंद्रिय म्हणजे नाक तृप्त व्हावे .
मनात गणेश पुरून उरला कि बाकी मंगलमय होणारच.
असे सर्व जिवंत सौंदर्य आपल्या वाणीतून उच्चारावे. हीच खरी पंचज्ञानेंद्रियांनी केलेली वाक् सेवा आहे .

     ©डॉ. प्रज्ञा शरद देशपांडे
     प्रोफ़ेसर्स कॉलोनी
     हनुमान नगर
     नागपूर.

Tuesday, August 15, 2017

# सहजोक्त.

#सहजोक्त

धार्मिक साहित्य.

भाषा म्हणजे संवाद साधण्याचे महत्त्वाचे साधन.
"पिंडे पिंडे मतिर्भिन्ना" असे म्हणतात.
म्हणजे प्रत्येक जीव हा त्याच्या त्याच्या नुसार वेगळा असतो. मग भाषा जिने संवाद साधायचा ती सुद्धा प्रत्येकासाठी  वेगळी होते ना !

 वाङ्मय (वाक्+मय) म्हणजे वाणीचे साम्राज्य .
जे जे म्हणून शब्द ,संकेत,चिन्ह,ध्वनी व्यक्त केल्या जातात ते सर्व वाङ्मयच होय . यालाच साहित्य असेही म्हणतात . साहित्य हे मौखिक  वा लिखित असते . ललित चे लालित्य तसे सहित चे साहित्य .
कशाच्या सहित तर संस्कार-संस्क्रृति-परंपरा-रूढी इत्यादिं सह असलेले ते साहित्य मानवी बुद्धी जशी विविधांगी असते तशीच त्याची अभिव्यक्तीही विविधांगी असते . समाजाचा अारसा म्हणजे साहित्य . साहित्यात नऊ रस असतात . मानवी जीवनातही
हे नऊ रस असतातच . रस उत्तम प्रकारे आस्वादणारे ते रसिक. हे नऊ रसही माझ्या जीवनात असावे असे कोणीही इच्छित नाही. तरी वाङ्मयात मात्र नऊ रस असायलाच पाहिजे . या सर्व रसांमध्ये सामान्यांना साधारणत: आवडीचा रस म्हणजे श्रुंगार . श्रुंगार रसाचा मूळ भाव रती हा आहे , हाच रतिभाव
 भक्ती-वात्सल्य या ही रसात आढळतो . जेव्हा देवता ,गुरुजन , देश इत्यादी ज्येष्ठ ,उदात्त,अमूर्त संकल्पनांवर रतिभाव जडतो तेव्हा तेथे भक्तिरस निर्माण होतो . या  भक्तिरसाचे प्रकटीकरण धार्मिक वाङ्मयातून लीलया होत असते. "भाव तसा देव" असे म्हणतात ते खोटे नाही . देवते विषयी भाव-भक्ती मनात ठेऊन निर्माण केलेले मोठ्ठे समृद्ध असे वाङ्मय दालन मराठी भाषेला . श्रीमंत करीत आहे , यात शंकाच नाही.
या वाङ्मयाकडे केवल भक्तिरस युक्त , श्रद्धायुक्त साहित्य अशा संकुचित दृष्टिकोणातून न बघता मानवी भावभावनांचे समृद्ध -निरागस-लाघवयुक्त लालित्यपूर्ण रूप म्हणून पहावे .
विपुल शब्दसंग्रह ,अलंकार ,भाषाशैली ,भावरस इत्यादींचा अगाध खजिना या साहित्यात आहे . मुळात हे साहित्य प्रासादिक शैलीत असल्यमुळे मनाला निर्मळ करते . असे म्हणतात ,
न कळता पाय अग्नीवर पडे
न करी दाह असे कधी न घडे
अजीत नाम वदो भलत्या भीसे
सकल पाप भस्म करितसे ॥

एकूणच धार्मिक वाङ्मय केवळ धार्मिक परिप्रेक्ष्यातून न बघता ,बोलीभाषांची समृद्ध अभिव्यक्ती मराठीची
अलौकिक श्रीमंती या ही दृष्टीने  त्याकडे पहावे .
या सर्व साहित्यात एक लय-ठेका-सहजता-लावण्य-लालित्य असते. हळूहळू व्यक्तीची भाषिक समज यातून वृद्धींगत होते यात दुमत नाही.

धार्मिक साहित्य आपण म्हणतो त्यात अनेक
प्रकार -उपप्रकार  आहेत. जसे कथा , कहाण्या, अभंग , अोवी , दोहे , आरती , शेजारती ,भूपाळी ,
पाळणा,भारूड ,पत्र, धार्मिक लावणी , गौळण , विरहिणी , स्तोत्र , मंत्र ,आळवणी,
श्लोक , पद , कवन ,पोथी ,गोधळ , विडा, नैवेद्याची आळवणी , विविध भक्तिगीते , भावगीते इत्यादी इत्यादी अनेक प्रकार त्यात येऊ शकतात . हे वाङ्मयाचे प्रकार व त्यांची नावे यांच्या नामकरणात एक मोठी संकल्पना ,सार्थभाव असतो . हे सर्व प्रकार  रचण्याचे अतिशय काटेकोर भेद वा नियम असतात असे नाही पण कळत नकळत ते प्रकारभेद आता विशिष्ट नियमांनी बांधले गेले अाहेत.

शब्द हे गणेशाचे रूप अाहे, असे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात . शब्द ही शक्ती आहे , ती व्यर्थ घालवू नये ; असेच आपले धार्मिक वाङ्मय आपल्याला सुचवते . म्हणूनच म्हटले आहे ,"एकेक अोवी अनुभवावी "।
आजकाल तंत्रज्ञानाची क्रांती झाल्यामुळे धार्मिक वाङ्मयाला मोठ्ठी "मार्केट व्हॅल्यू" पण लाभली आहे ,
हे ही विसरून चालणार नाहीय . आज बाजारात ना धार्मिक वाङ्मयाचे हजारो टंकित , मुद्रित , ध्वनिमुद्रित , दृक्श्राव्य मुद्रित असे अनेक प्रकार दिसून येतात. सोशलमिडिया हे सुद्धा मोठे व्यासपीठ आहे . साधी गणपतीची आरती म्हटली  तर उत्तमोत्तम
गायक-गायिका , वेदशास्त्रसंपन्न गुरुजन इत्यादींच्या अावाजात आज उपलब्ध  आहे .
या लेखमालेत मला आवडलेला  वाङ्मयप्रकार घेऊन त्याच्यातील मला भावलेले भाषिक भावभावनांची वैशिष्ट्ये वा स्पंद माझ्या आकलनानुसार टिपण्याचा प्रयत्न करणार आहे.ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलेच आहे ना !
          राजहंसाचे चालणे ,भूतळी जालिया शहाणे
          आणिक काय कोणे चालावेची ना ?
  भाषेचा अनमोल वारसा माझ्या परीने उलगडून दाखवीत भाषेच्या या ज्ञानकुंडात ही लेखमाला   रूपी वागाहूती अर्पण करते आहे.
डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Saturday, August 12, 2017

#सहजोक्त.

#सहजोक्त  
आज तंत्रज्ञानक्रांतीमुळे जग जवळ आलय .
 हो खरय.कितीतरी अपरिचित या तंत्रस्नेहामुळे चिरपरिचित झालेत.
पूर्वी लेख/निबंध/कविता/इत्यादी लिहिले की नियतकालिकातात द्या, ते छापतील की परत पाठवतील वाट बघा.असा सगळा "धीर धरी" कार्यक्रम. आलं काही छापून की कोण आनंद !
आता सट्ट लिहा पट्ट पोस्टा.... सोशलच झालाय मिडिया.लई सोस त्याला जग जोडायचा,अभिव्यक्ती जपण्याचा...
आता सगळ्या जगालाच वेगाचे वेड लागलेय. गाड्या/वाहने/नेटस्पीड/वागणे /बोलणे/मैत्री करणे/तोडणे .........सगळं वेगात / आवेगात .
ज्याला त्याला शिखर/कळस गाठायची घाई.जो तो टोक/शिखर/कळस गाठायचीच वाट बघतो.
यशच हवे ,अपयश नकोच . अपयश पचवायची ताकद या वेगवान घोडदौडीत संपलीय.
जग जवळ आलं ते ही आभासी.ना त्यात प्राण-रस-रूप-गंध ,पंचज्ञानेंद्रिय निववणारे सामर्थ्य  ना समाधान.
"बोलाचीच (लिहायची)कढी न् बोलाचाच (लिहायचा) भात"!
लहान-मोठा ,स्त्री-पुरुष ,गरीब-श्रीमंत ,जवळ-दूर सारे भेद अभेद झाले,समता-समानता आली. छानच.
 वास्तवात प्रतंयेकाच्या मनात "स्वतंत्र विश्व" तयार झालय.व्यक्तिस्वातंत्र्याची व्याप्ती इतकी मोठी झाली की जगद्व्याळ.
चालायचेच .
पूर्वी वेळ होता ,पैसा नव्हता.हायफायसुख नव्हते. आज सार आहे पण वेळ नाहीय. आभास जास्त भावतो वास्तवाला भेदायची शक्तीच नाही.
कालाय तस्मै नम:!!
©डॉ.प्रज्ञा देशपांडे.

Sunday, July 23, 2017

#सहजोक्त

#सहजोक्त.
ययातीचे वंशज.

संयम-नियम उरतात सारे शब्दात फक्त
मोह-मायाचे जंजाळ सुटता सुटत नाही.॥

उतार वयातही लवकर उतरत नाही
जवानीच्या जोशाचे हँगोव्हर सरता सरत नाही.॥

पहावे  तिकडे व्यापून आहे
तारुण्याच्या ज्वाळा
नवतरूणांनाही लाजवतात  या तारूण्यकळा ॥

विज्ञानयुगाने वाढविलेत ययातीचे वंशज
तारुण्य जपण्यात जो तो सजग ॥
 अनुभवाने आता केसही पिकत नाहीत.
प्रगल्भता तर कोर्स करूनही मिळत नाही ॥

सारी कडे नुसता जवानीचा जल्लोश
संस्कारानेच संभाळावा स्वत:चा होश ॥

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
नागपूर.





Saturday, July 15, 2017

#सहजोक्त.

#सहजोक्त
मन ! मणामणाचे अोझे लादणारं वा मनामनातून उमेद जागवणारं ,अजीवशास्त्रीय गात्र ! मन कुठे आहे हे कोणीच सांगू शकत नाही. शरीर-रचना-शास्त्रात मनाला स्थानच नाही. तरीही मनाचं अस्तित्व  कोणीही नाकारत नाही.
मन,मानस ,मानसिक,,मनोविकास,मनोविकार,मनोभूमिका ,मनोभावना,मनोवैज्ञानिक ,मनोकामना  मानसशास्त्र इत्यादी शब्दपसारा मनामुळेच निर्माण झालाय.
जगातील प्रत्येक भाषेत 'मन' या विषयावर भरपूर साहित्य निर्माण झाले आहे.
संस्कृतात वेदवाङ्मयात 'शिवसङ्कल्पसूक्त' आहे, ज्याच्या प्रत्येक ऋचेची शेवटची पंक्ती 'तन्मे मन: शिवसङ्कल्पमस्तु' ही आहे .या अोळीचा सरळ अर्थ 'ते माझे मन शिवसंकल्पाने युक्त असावे.' असे म्हटले आहे.
व्याकरणशास्त्रावर आधारित एक विनोदी श्लोक आहे.
      मनो नपुंसको मत्वा प्रियायै प्रेषितं मया
      तत्रैव अरमत तत् हता पाणिनिना वयम् ॥
      याचा भावार्थ असा कि ,मनाला नपुंसक समजून ('ते मन 'ना  म्हणून) मी प्रियेकडे पाठवले. ते मन तिच्यातच रमून गेले.पाणिनींनी आम्हाला फसवले.
      असे हे मन संकल्प-विकल्पाचे आगार आहे.
      ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ,मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण "
       रामदास स्वामी म्हणतात ,'अचपळ मन माझे नावरे आवरीता'
      या शिवाय त्यांनी मनाचे श्लोक लिहिले ज्यात ,
      "मना सज्जना भक्तिपंथेची जावे" म्हटले आहे.
      बहिणाबाई म्हणतात ,'मन वढाय वढाय उभ्या पिकातील ढोर ,किती हाकला हाकला फिरी येये पिकावर '।
      गौतमबुद्धांच्या  धम्मपदात ,
      "मनो पुब्बंगमा धम्मा मनो सेट्ठा मनोमया
      मनसा चे पदुठ्ठेन भासति वा करोति वा ॥ "
      हिंदी सिनेमा तर मनावरच जगतोय असे म्हटले तर वावगं ठरू नये.
      अगदी जुन्या काळापासून ते आतापर्यंत मन या विषयावर किती तरी गाणी आहेत.
      आठवता आठवता मन आनंदीत होतं नि न अाठवल्यामुळे निराश होतं.
      १)मेरे मन ये बता दे तू किस अोर चला है तू .
      २)मन तडपत हरि दरशन को आज
      ३) मन रे तू काहे न धीर धरे
      ४) इतनी शक्ति हमे देना दाता ,,मन का विश्वास          कमजोर हो ना ।
      ५)नाचे नम मोरा मगन . . .
      ६)ए मेरे उदास मन चल दोनो कही दूर चले.
      ७) मेरा मन कहने लगा पास आके न तू दूर जा
      ८) कोरा कागज था ये मन मेरा
      ९)मित ना मिला रे मन का
      असे हे मन वास्तवात असो अथवा नसो प्रभावी आहेच.मन नसेल तर विश्वच शून्य ठरते. मन असेल तर शून्यातून विश्व निर्मिते.
      हे मन शुभ संकल्पाने युक्त ,निरागस ,आनंदी असावं हीव मनोमन प्रार्थना  !
     ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
   
     
     
    

Saturday, July 8, 2017

#सहजोक्त.

#सहजोक्त.
🙏गुरुपोर्णिमा🙏

     सन्ति मे गुरवो राजन् बहवो बुद्धयुपाश्रिता:
     यतो बुद्धिमुपादाय मुक्तोsटामीह ताञ्छृणु॥ ३२॥
     पृथिवी वायुराकाशमापोsग्निश्चन्द्रमा: रवि:
     कपोतोsजगर: सिन्धु: पतङ्गो मधुकृद् गज:॥३३॥
     मधुहा हरिणो मीन: पिङ्गला कुररोsर्भक:
     कुमारी शरकृत् सर्प ऊर्णनअभि: सुपेशकृत् ॥३४॥
     एते मे गुरवो राजंश्चतुर्विंशतिराश्रिता:
     शिक्षा वृत्तिभिरेषामन्वशिक्षमिहात्मन:॥३५॥
     श्रीमद्भागवताच्या एकादश स्कंधाच्या सप्तमाध्यातील या ओळी आहेत. हा अध्याय "अवधूतोपाख्यान"  नावाने प्रसिद्ध आहे. यदुराजाने ज्ञानसंपूर्ण,तरूण,तेजस्वी ,त्रिकादर्शी अवधूताला निर्भय व मुक्तपणे वावरताना पाहून ," आपण विद्वान असून निष्पाप बालकासमान शुद्ध-सात्विक बुद्धी कुठून प्राप्त केली "?असे विचारले ,  त्यावरचे उत्तर म्हणजे वर दिलेले श्लोक अाहेत.
     याच अवधूताला पुढे दत्तोपासकांनी श्रीदत्तगुरू म्हटले. जगाचे गुरुतत्त्व म्हणजे श्रीगुरुदेवदत्त. त्यांना  ज्ञानप्राप्तिसाठी चोवीस गुरुंची गरज पडली.सारी सत्ता,ऐश्वर्य ,तारूण्य,शक्ती असून जगात अलिप्त-विरक्त -निरागसपणे निर्भय जगण्याचे ज्ञान त्यांना या गुरुंनी शिकविले. गुरुंनी शिकवले म्हणण्यापेक्षा अवधूत स्वयंप्रज्ञेने शिकले हे जास्त सयुक्तिक ठरेल.
     त्याकाळात (आपल्या आधुनिक नजरेने) जास्त विकास (भौतिक) नव्हता ,असे मानले तर ; आज सर्वच कक्षा रुंदावल्या आहेत हे स्वीकारणे गरजेचे आहे. "तंत्रविद्येचा सुकाळू" झालाय. वायफाय सगळीकडे हवेच स्टे कनेक्टेड साठी. मग ज्ञानप्राप्तिसाठी त्याचा मुक्त वापर करावा ना!
     जर श्रीदत्तात्रेयांना २४ गुरू लागले तर आपल्या सारख्या सामान्यांना किती ? सोपे त्रैराशिक मांड़ावे ज्याचे त्याने. क्षणाक्षणाने ज्ञानकण वेचावेत नि ज्या स्रोतापासून ते ग्रहण केले त्या गुरुतत्वाला मनोमन कृतज्ञतेने नमावे. हीच खरी गुरुदक्षिणा,शिष्यभाव.
     तेच खरे गुरुवंदन.
     ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
     नागपूर
     ९.०७.२०१७
     रविवार.

#शब्दचिंतन .

#शब्दचिंतन.
" तारतम्य" हा शब्द कानी आला नि विचारचक्र सुरु झाले. बोलताना सहज उपयोगात आणतात हा शब्द. तारतम्य म्हणजे पोच ,विवेक ,वागण्यातील समज ,प्रगल्भता  अशा अनेक अर्थच्छटा त्यातून अपेक्षिल्या जातात.
मुळात हा तद्धित प्रकारातील भाववाचक शब्द आहे. 'तर-तम' या दोनप्रत्ययांपासून  तो तयार झालाय.  तुलना करताना जो प्रत्यय योजतात तो "तर" प्रत्यय.
उदाहरणार्थ उत्तर ,अधिकतर ,उच्चतर,लघुतर ,
महत्तर ,प्रियतर हे मुळातील तत्सम शब्द तर पुढे मराठीकरणात तयार झालेले बद्तर ,बेहत्तर इत्यादी.
सर्वोच्चता दाखवणारा "तम" हा प्रत्यय आहे. उदाहरणार्थ उत्तम,सर्वोत्तम ,महत्तम ,लघुत्तम , प्रियतम,दीर्घतम इत्यादी .
याच दोन प्रत्ययांचे समानार्थी दोन प्रत्यय आहेत ;
तर =इयस्   नि तम=इष्ठ
दोन्हीची उदाहरणार्थ श्रेष्ठ ,ज्येष्ठ ,कनिष्ठ ,गरिष्ठ ,
श्रेयस् ,प्रेयस् कनियस्
मराठीकरण झालेले स्वादिष्ट ,चविष्ट ,गप्पिष्ट ,कोपिष्ट  इथे मुळातील प्रत्ययातही मराठीकरण केलेय.
तर हे दोन प्रत्यय "तर-तम" इंग्रजीतील " ER-EST" ( comparative & superlative degree)  आहेत.
"याहून अधिक चांगले नि सर्वात चांगले" हे कळून वागण्याची पात्रता म्हणजे तारतम्य .कोणत्याही परिस्थितींत स्वार्थापुरता नाही तर सर्वबाजूने अधिक चांगले काय? सर्वोत्तम काय?  हे कळण्याची लायकी विकसित करणे म्हणजेच तारतम्य !
©डॉ. प्रज्ञा देशपांडे
नागपुर.

Friday, July 7, 2017

#सहजोक्त

#सहजोक्त.

  माझा अद्वैत दोन-अडीच वर्षांचा असतानाचा किस्सा .
मी दुपारी शाळेत गेलेली ,शरद त्याच्या कामावर गेलेला. घरात आजी नि अद्वैत.
जेवणानंतर  दुपारचा आराम करून दोघेही  टिव्ही पहात बसायचे. मग आजी चहा करणार नि अद्वैतला बोर्नव्हिटा देणार. हे ठरलेलं .  आमचं घर किरायाचं , तीन खोल्या सरळ एका लायनीत ,समोर व मागे गच्ची ,अशी रचना. त्या दिवशी आजीने नेहमी प्रमाणे समोरचे दार बंद केले नि अद्वैतला घेऊन स्वयंपाक घरात गेल्या. त्याला बोर्नव्हिटा पाजला , स्वत: चहा पिला; मग त्या कपबश्या-भांडी धुवायला मागच्या गॅलरीत गेल्या.इकडे स्वयंपाक घरात बसलेल्या लहानग्या अद्वैतच्या डोक्यात खट्याळपणा आला.त्याने मागच्या  गॅलरीत उघडणारे स्वयंपाकघराचे दार आतून लाऊन घेतले.
आजीला  कळले नाही. काम करून त्या वळल्या बघतात तर अद्वैतने आतून कडी लावलेली.
त्या घाबरून गेल्या.त्या "अद्वैत ,दार उघड",असं जोरजोरात म्हणू लागल्या. आजी घाबरलीय ,अोरडतेय हे बघून अद्वैतला मजा वाटू लागली. तो आतमध्ये जोरजोरात हसत होता. आजीला काळजी वाटू लागली कारण आत छोटा अद्वैत अडकलाय ,त्याला कडी लावता येत होती पण उघता येत नव्हती.इकडे अद्वैतला वाटत होतं ,"मी अाजीला कोंडलं ".आजी अोरडतेय त्याचं गांभीर्य याला नव्हतं ,ह्याला गंमत वाटत होती.
बराच वेळ झाला .आजी अोरडलतेय आजूबाजूला सगळे कामावर गेलेले. आमची मागची गॅलरी तशी स्वतंत्र ,कुठून उतरणं शक्य नव्हतं .आजीसाठी तर रडकुंडीचीच वेळ होती.शेवटी माझा  बारावीत शिकत असलेला चुलतभाऊ अोरडण्याचा आवाज ऐकून मागच्या पाईपला धरून वर चढला .खिडकीतून अद्वैतशी बोलू लागला ,"अद्वैत ,दार उघड".
तर हा मामाला हासत हासत सांगू लागला ,"मामा ,मी आजीला कोंडलय तर आजी बघ कशी रडतेय !"शेवटी पियुष(माझा भाऊ) ने अवजारे आणली व बाहेरून कडी कापली. दार उघडले. दुपारी दोन तासापासून सुरू असलेला गोंधळ संपला. आजीला काही सुचत नव्हतं .पियुषने परिस्थिती नीट हातळली. संध्याकाळी मी आली. हा पठ्ठ्या धाव्वत येऊन मला बिलगला. हसून ,"मी आजीची गंमत केली" असं सांगू लागला. आजी अजून सावरली नव्हतीच.
शेवटी त्याला मांडीवर घेतलं ,लाड केला मग कलाकलाने समजावून सांगितले .मग त्याला कळले.
हा किस्सा तर लहान मुलं ,त्याचे छोटे आकलन नि त्यानुसार वर्तन यावरचा आहे.पण व्यवहारातही अशी अनेक (वयाने) मोठी नि आपल्याच समजूतीने स्वत:ला कोंडून घेणारी तरी "मी दुस-याची अडवणूक केलीय " असं समजणारी अनेक ‍आढळतात . होय ना!
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
नागपूर.

Tuesday, July 4, 2017

#सहजोक्त.

सप्तरंगी आयुष्य


04-07-2016
08:36


"मैंने तेरे लिए ही सात रंग के सपने चुने,सपने सुरिले सपने-------------"
मुकेशचे कातर,हळवे सुर कानी पडतच मनावर अलवार मोरपीस फिरू लागते.स्वप्नक्षणांतून अलगद, हळूच बाहेर आल्यावर विचारी मन विचारात पडते-------.सातरंगाचे स्वप्न म्हणजे काय? तानापिहिअनिजा या सातरंगाचे ? कसे? स्वप्न तर सोनेरी- रुपेरी-चंदेरी असते ना?बर ,निवडायचेच तर आयुष्य निवडावे ना,स्वप्न कशाला?स्वप्न जे सत्यात उतरत नाही अन् अवतरले तर स्वप्न उरत नाही! असे स्वप्न,तेही " इस्टमरकलरमध्ये"?कां?कशाला??
आयुष्य म्हणजे काय? कोणी म्हणतं" चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही ." कोणी सांगतात," आयुष्य हे चुलीवरच्या कढईतले कांदेपोहे" . तर कोणाच्या मते "
" एक धागा सुखाचा अन् चार धागे दु:खाचे
जरतारी हे वस्त्र मानवा तुझिया आयुष्याचे",
कोणी काहीही म्हणोत,जन्मापासून सुरु झालेले ते मृत्युपर्यंत चालणारे,एकेरी वाहतूक म्हणजे आयुष्य!आयुष्य प्रत्येकालाच असते .प्रत्येकाचे आयुष्य वेगळे असते.थोरमहात्म्यांपासून लहानसहानांपर्यंत ,नामदारांपासून ते इनामदारांपर्यंत सगळे जे जगतात ते आयुष्य! कोणाचे आयुष्य इतरांना प्रेरक ठरते तर कोणाचे इतरांच्या खिजगणतीतही नसते .थोरांचे आयुष्य"जीवनचरित्र्य " लिहिण्याजोगे तर कोणाचे किड्यामुंगीसारखे श्रेयहीन !आयुष्य आयुष्यच असते ना? एखाद्याचे सप्तरंगी तर एखाद्याचे गडद काळे असे का? पुन्हा तोच भुंगा--- सप्तरंगी म्हणजे??
सप्तरंगी आयुष्याचे स्वप्न सुंदर असेल काय? एका रंगाचे,एकसुरी आयुष्य नकोच ,यात दुमत नाही.कोणता रंग असावा ,ह्या निवडीची संधी प्रत्येक वेळी लाभतेच असे नाही. पण जो रंग समोर आला तो मनापासून उपभोगावा,हे मात्र अगदी खरं च।
तसे पहायला गेले तर " सप्तरंग" सुद्धा आभासच ना? पांढ-यारंगातून सात रंग निघतात,पुन्हा पांढ-यातच विलीन होतात .पांढ-या रंगाचा अभाव म्हणजे काळा रंग !चैतन्यरूपी पांढरा रंग प्रत्येकाला जन्मत: मिळालाय .प्रत्येकाचे विचार म्हणजे त्याचा प्रिझम. विचारांच्या प्रिझममधून ज्याच्या त्याच्या कलानुसार ,कोणांनुसार पांढरारंगरूपी चैतन्य परावर्तित होते.आणि कमी -अधिक,घट्ट- विरळ,दीर्घकालिक - अल्पकालिक असे सात रंग तयार होतात. शेवटी पुन्हा पांढ-यारंगात एकवटतात.
आपण दुस-याच्या आयुष्यातील सप्तरंगी क्षणांचे छायाचित्र डोळ्यात ठसवतो,वर विचार करतो ," व्वा,काय सप्तरंगी आयुष्य आहे याचे ! माझे मात्र -----)".। फोटोअल्बममध्ये हसरी स्मरणचित्रे असतात.नेमके हसरे क्षण कॅमेरात बद्ध केलेले असतात फोटोरूपाने !ते कितीही वेळा पाहिले तरी हसरेच असतात. पण आयुष्य म्हणजे फोटो नाही ना !दुस-याचे क्षणिक हसरे फोटो पाहून आपले आयुष्य नीरस वाटते. Others garden are always green. ही मानवी प्रवृत्ती स्वाभाविक आहे.
पण " विचार बदला,जीवन बदलेल". हे त्रिकालाबाधित सत्य आहे. आपण स्वत: प्रिझम आहोत,देवाने चैतन्य रूपी पांढरा किरण दिलाय .सकारात्मक दृष्टिकोणातून तो किरण शरीररूपी प्रिझममधून परावर्तित होऊ द्यात .बघा आपले आयुष्य कसे सप्तरंगी बहरते ते !दुस-याकडून सप्तरंगाच्या स्वप्नाची अपेक्षा करायची गरजच पडणार नाही. मन सहज गुणगुणेल ,
" मैंने मेरे लिये ही सात रंग का जीवन चुना, जीवन सुरीला जीवन -----।
© डॅा प्रज्ञा  देशपांडे।