Thursday, December 6, 2018

#शब्दचिंतन.



कविता करणारा कवी ,
लेख लिहिणारा लेखक ,
कथा लिहिणारा कथाकार ,
नाटक लिहिणारा नाटककार ,
रचना करणारा रचयिता  .
असा साधारण अर्थ वरच्या शब्दांचा होतो व्यवहारात . पण खरोखर यांचा असाच अर्थ होतो कां ?
महाभारत हा ग्रंथ रचला  महर्षी व्यास यांनी तर त्यांना लेखनिक होते साक्षात् श्रीगणेश .म्हणजे व्यास कवी तर गणेश लेखक होते. रामायण हे आदिकाव्य वाल्मिकिंनी रचले.
कवी शब्दाचा अर्थ वर दिला इतका सीमित आहे कां ? तर नाही. जुन्या शब्दकोशात बघितला तर बुद्धिमान् ,जाणता ,द्रष्टा ,पुरोहित ,संत ,साधु ,तत्त्वज्ञ,विचारवंत,गायक,समजुतदार,प्रगल्भ इत्यादी असे अर्थ दिले आहेत. म्हणून तर वाल्मिकी ,कालिदास ,भास ,भारवी ,माघ अादींना कवी म्हणतात. यांनी पद्य ,गद्य ,मिश्र ,नाटक इत्यादी प्रकारचे साहित्य रचले आहे.  त्यांचे साहित्य समाजाला दिशा देते ,संस्कारित करते.जीवनाचे व्यवहारिक व आदर्श असे दोन्ही तत्त्व यांच्या साहित्यात दिसते. आजही  हे साहित्य कालबाह्य ठरले नाही. एकूणच उच्चकोटीचे साहित्य रचणारे हे कवी-महाकवी  आहेत.  साहित्य/ वाङ्मय रचणारा तो कवी असे संस्कृतमध्ये मानतात. कवी शब्द तेव्हा अतिशय व्यापक अर्थाने होता. कालौघात अर्थ संकोच होत होत  ,कविता करणारा कवी ,नाटक लिहिणारा नाटककार , गद्य/निबंध लिहिणारा लेखक , असे प्रकार वाढले.
प्राचीन भारतात "कवी"  या व्यक्तिमत्वाला फार मोठे वलय होते. कवीची दिनचर्या ,कवीचे राहाणीमान न् निवासस्थान याबद्दल दण्डी यांनी उत्तम मार्गदर्शन केले आहे. 
कवी शब्दाचा कलौघात अर्थसंकोच झाला तसाच प्रतिष्ठेचाही झाला असेल काय ??
©डॉ. प्रज्ञा देशपांडे

Tuesday, November 20, 2018

#सहजोक्त.


काही अक्षरवाङ्मय अजरामर असते.त्यातही कविता वर  त्या जर संगीतबद्ध गायलेल्या असतील तर .....? सोने पे सुहागा.
 दिनतीन दिवसांपूर्वी कधी नव्हे इतकी फुरसत न् रिकामा वेळ  अवचित गवसला. अंगणात पाळण्यावर झोके घेत होती. लहानपणी पाळण्यावर जोर जोरात झुलतांना त्या लयीने गाणं आपोआप फुटायचे. तसंच आताही सुरु झाले.  जरा वेळाने सूर्य मावळतीला जाऊ लागला.
 झोपाळ्यावर झुलतांना तसेही मन हिंदोळे घेतच असते. त्यात पूर्णपणे रिकापण. मग काय ? मन सुसाट पण लयीत सुरु झाले . झाडांच्या मध्ये त्या सूर्याचा रक्तिमा  पसरला होता. तसा उगवतीचा सूर्य अन् मावळतीचा सूर्य दिसायला  सारखाच  . "उगवतीचा सूर्य" हा एक शब्दप्रयोग प्रसिद्ध आहे.
 तो मावळतीचा  सूर्य बघून गाणं आठवलं . नुसतं आठवलंच नाही तर लहानपणी खेडेगावी आमचे  बाबा आम्हाला पाळण्यावर झोके घेत गाणे गायचे. बाबांची काही गाणी आवडती होती . बाबांची अजून एक सवय होती की ते गाण्याचा अर्थ उदाहरणा सह समजाऊन सांगायचे . तेव्हा बाबांनी सांगितलेलं  सगळं समजायचेच असे नाही पण छान वाटायचे.
 त्या दिवशी तो सूर्य पाहून ते गाणे आठवले.
 ते गाणे म्हणजे  भा.रा. तांबे यांची कविता आहे.  ती संपूर्ण कविता अशी..

मावळत्या दिनकरा अर्घ्य तुज
जोडुनि दोन्ही करा !॥धृ॥

जो तो वंदन करी उगवत्या,
जो तो पाठ फिरवि मावळत्या,
रीत जगाची ही रे सवित्या !
स्वार्थपरायणपरा ॥१॥

उपकाराची कुणा आठवण ?
‘शिते तोवरी भूते’ अशी म्हण;
जगात भरले तोंडपूजेपण,
धरी पाठिवर शरा !॥२॥

आसक्त परि तू केलीस वणवण,
दिलेस जीवन, हे नारायण,
मनी न धरिले सानथोरपण,
समदर्शी तू खरा !॥३॥

प्रभु-सचिवा विरही मुखधूसर
होति दयामृदु नयनिष्ठुर कर
टाकुनि कारभार चंद्रावर
चाललास तू खरा !॥૪॥

यातील पहिले तीन कडवे लता मंगेशकरांच्या आवाजात नेहमी ऐकल्या गेले आहे. शाळेत कविता सुद्धा तीनच कडव्यांची शिकविल्या गेली. शेवटचे कडवे मात्र अपरिचित आहे.
वर वर निराशावादी वाटणा-या   या गाण्यात एक वेगळेच आकर्षण आहे ,अोढ आहे . खोल खोल अंतर्मुख करण्याची ताकद आहे.
या गाण्यातला सूर्य खूप जवळचा , नेहमीचा वाटत राहतो. या सूर्याचे कर्तृत्व ,चांगुलपणा जवळून अनुभवलेला वाटतो. उगवत्याला सलाम ठोकणा-या समाजात मावळत्या सूर्याचे वंदन मनाला भिडणारे पण जरासा दिलासाही देणारे वाटते.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे
 

Monday, November 19, 2018

#सहजोक्त.


"तुझे आहे तुजपाशी परि तू जागा चुकलासी" असं प्रत्येकाच्याच जीवनात अनुभवायला  येतं. सगळं असतं तर वेळ नसतो ,वेळ असतो तेव्हा बळ नसतं , न् सर्व जुळून आलं तरी प्रत्यक्षात उतरतच नसते. काय कारण असावे ?? दैवात नसते कां मुळात मनातच नसते , ते सारं प्राप्त करणं ??
जन्माला आल्यापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत जगण्यासाठी , अस्तित्वासाठी वा कशाच्या तरी साठी प्रत्येकाचीच धडपड ,लढाई सुरुच असते.
जगाच्या दृष्टीने चारचौघांसारखे वा असामान्य असलेली व्यक्तिमत्वे अनेक बाबतील अतिशय दीनवाणे असतात. निसर्गातही बघा . एकीकडे डोंगर असेल तर दुसरीकडे गर्ता ही असणारच . इकडे वाळवंट तर तिकडे हिरवळ. सुंदर ,नाजुक मोराचे पाय बेढब ,अतिशय ठणक पाठीच्या कासवाचे काळीज अतिनाजुक. 
मानवी मन , मानवी मेंदू अन् मानवी सर्जनता ,हे सारं एका विशाल सागरासारखं आहे.
 असामान्य गुण अंगी बाळगणा-यांच्याही  व्यक्तिमत्वात विसंगती ,उणीव वा काळोख असतोच असतो .  त्या न्यूनाला कमीपणा म्हणून लपवावे वा मोकळेपणाने स्वीकारावे ? यावर त्या व्यक्तीचे खरे भोग ठरलेले असतात .
असं हे चमत्कारिक मानवी व्यक्तिमत्व , कितीही अोळखल्या सारखा भासू दे ,प्रत्येक वेळी काही तरी अनोखं ,नवंच रूप घेउन  समोर येते.
जगासमोर स्वतःला असामान्यता देणारा एखादा गुण प्रतिष्ठित झाल्यावर ती व्यक्ती सुद्धा त्याच पैलूच्या प्रेमात पडते न् बाकीचे न्यून लपवीते वा ते न्यून कसे अपरिहार्य आहे ,याचा मानसिक ढाल बनवून स्वतःचा बचाव करते. पण हे करणे गरजेचे आहे कां ?? बेढब पायामुळेच मोर वेगाने पळतो , त्याचे नाजूक सौंदर्य , जीव वाचवायला  कामी येत नाही. ,हे खरे ना ?
जगातले जेवढे म्हणून महान ,थोर व्यक्तिमत्वांच्या चारित्र्य चित्रणातून ही गोष्ट ठळकपणे  दिसून येते की त्यांचे वैगुण्य त्यांनी सहजतेने न स्वीकारल्यामुळे  बरेच महान् जणं शेवटी बिचारे ठरले.  उलट ज्यांनी स्वतःतील अलौकिक प्रतिभेचा ,स्वतःतील वैगुण्यासह सहज स्वीकार केला ; ते खरेखुरे चमकदार तारे ठरले. उदाहरणच द्यायचे तर
ज्ञानेश्वर माऊली ,यांचे आहे. समाजाने वाळीत टाकलेल्या मायबापाचे ते पोर होते. समाजाने  केलेल्या अवहेलना-वंचनेने आई-वडिलांना जीव द्यावा लागला . पोरके झाल्यावरही समाज बहिष्कार न् उपेक्षा कायमच होती. तत्कालिन समाजमान्य बुद्धिमंतांपेक्षा किती तरी बुद्धी असूनही ,समाजात प्रतिष्ठित ठरावे वा आईबाबांच्या मृत्यूचा बदला घ्यावा अशी कोणतीही इच्छा न बाळगता आंतरिक समाधान मिळवत जगत गेले ,पलायनवाद वा लोटांगणवाद न करता नित्यकर्म आचरत राहिले. शेवटी समाजाला त्यांचे मोठेपण स्वीकारावे  लागले कारण मुळातून स्वतः माऊलींनी स्वतःचा परिपूर्ण स्वीकार केलेला होता.
"पिण्डे पिण्डे मतिर्भिन्ना " , हे सत्य स्वीकारले तर "यथा मतिः तथा गतिः " हे सुद्धा स्वीकारावेच लागेल. प्रत्येकाने स्वतःचे स्वतःला पूर्णपणे स्वीकारले तर जगाने  डोक्यावर घेतले काय किंवा पायदळी तुडवले काय , त्याला फरक पडणार ??
जवळच्या समजल्या जाणा-या व्यक्तींच्याही प्रतिक्रिया ,प्रतिसाद वा प्रतिस्पंदांनी स्वतःतील "मी" वर परिणाम व्हायलाच नको. "तुम्ही करा वटवट ,माझा मी बळकट" हे कायमचे मनात ठेऊन चरैवेति चरैवेति करावे. असे वागले तर बाहेरची द्वंद्वे तर सोडा आतून पोखरणारी चिंता सुद्धा संपेल न् खरोखरचे महान् व्यक्तिमत्व आपले आपल्याला सहज गवसेल.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Thursday, November 15, 2018

#सहजोक्त.


मराठी ही अनेक आयामांनी समृद्ध भाषा आहे.
मराठी लोकांची भाषा म्हणजे मराठी भाषा. निव्वळ महाराष्ट्रात राहणारे ,येवढ्याच संकुचित परिघातील ही भाषा नाही. मराठी माणसं ज्या ही क्षेत्रात ,प्रांतात   जातात तेथे ते स्वतःच्या प्रतिभेने त्या क्षेत्राला वेगळीच उंची प्रदान करतात. हा मराठीचा गुण फार फार पहिले पासूनचा आहे. 
इतिहासावर नजर टाकली तरी मराठी लोकांनी  आपल्या प्रभावाने कितीतरी बाबी उजळवून टाकल्या हे सहज लक्षात येते. संपूर्ण भारत
एकीकडे अन् महाराष्ट्राचे वैशिष्ट्यपूर्ण योगदान एकीकडे ,असे म्हटले तरी अतिशयोक्ती नाही.

प्राचीन काळी संस्कृत ही अभिजात लोकांची भाषा होती. विद्वत्ता ,सभ्यपणा दाखविण्यासाठी तिचा उपयोग तत्कालिन मान्यवर करीत असत.संपूर्ण भारतात संस्कृतभाषेचा उपयोग सर्वमान्य होता.  विविध विषयांवर अनेकानेक ग्रंथ संस्कृतात रचले गेले. त्याकाळी संस्कृतभाषा मानवी भावभावनांचे प्रकटीकरण सक्षमपणे करीत होती. त्याकाळी भारतीय जनमानसावर संस्कृतचा जबरदस्त पगडा होताच ,तो पुढेही अनेक वर्ष कायम होता.
नंतरच्या काळात भारतात भाषिक विकासाच्या प्रक्रियेत अनेक भागात अनेक बोली विकसित होत होत नव्या  भाषा निर्माण झाल्या. तरीही त्या त्या भाषांवर संस्कृत प्रभाव होताच हे मान्य करावे लागतेच.  या नव्या भाषा एक प्रकारे संस्कृतची त्या त्या प्रांतातील ,त्या त्या काळातील रूपे होती ,असे म्हटले तर वावगे ठरू नये.
पुढे कालौघात मानवी व्यवहार व भावभावना व्यक्त करण्यासाठी या नव्या भाषांचाच वापर होऊ लागला. जी बोलल्या जाते तीच भाषा ठरते. या न्यायाने त्या काळात अाधुनिक भाषांची भरभराट झाली. संस्कृत ही मर्यादित उपयोगाची ठरली.
मानवी जीवन जसं जसे भौतिक सुखसोयींनी समृद्ध होत गेले तसं तसे या आधुनिक भाषाही अधिकाधिक बहरत गेल्या. मानवी जीवनातील प्रत्येक पैलूला स्पर्शणारे शब्द व शब्दकळा या भाषांत सहज तयार होऊ लागले. मूळ संस्कृत पासून शब्द घेऊन ,त्यात आपल्या भाषिक वैशिष्ट्यांची जोड देत नव्या भाषांनी स्वतःचे विपुल शब्दभंडार रचले . इतकेच नाही तर मधल्या काळात आलेली परचक्रांची भाषिक आक्रमणेही "दोन घे चार दे" या पद्धतीने पचवलीच नाही तर त्यांच्या भाषेला आपल्या भाषिक प्रवृत्तीने स्वीकारून स्वतःच्या भाषेला अजूनच वेगवान केले.
वर केलेले वर्णन भारतात आज बोलल्या
जाणा-या व प्रमुख म्हणविणा-या सर्वच भाषांना कमी अधिक प्रमाणात लागू पडते.
पण मराठी भाषेची गोष्टच न्यारी आहे.
अनेक आयाम असे आहेत की ज्याला मराठमोळ्या वेगळेपणाने अतिशय समृद्ध केले आहे.
अभंग ,
कीर्तन-प्रवचन ,संतकाव्य ,पंतकाव्य ,तंतकाव्य ,
नाट्यसंगीत ,संगीतनाटक ,
लोककला आदी सर्वांवर मराठी बुद्धिमत्तेचा प्रभाव ठळक दिसून येतो.
भगवद्गीतेहून सरस ज्ञानेश्वरी आहे यात जसे दुमत नाही तसेच एकनाथी भागवत ,आध्यात्मरामायण आदी ग्रंथ मूळ ग्रंथांचे निव्वळ भाषांतर नसून स्वतंत्र प्रतिभेचा सुंदर अविष्कार आहे.
मराठी संतवाङ्मय हे देखिल "पचवलेले ज्ञान" समर्थपणे देशी भावनांसह सोप्या शब्दात मांडल्या गेल्याचे उत्तम उदाहरण आहे.
 संस्कृतने उपनिषद काळात ज्या प्रमाणे जनसामान्यांच्या भावना समर्थपणे मुखर केल्या होत्या तशा , ती सद्यकालिन  समाजाच्या भावभावनांचे सर्व पदर उलगडून दाखवायला आज पूर्णपणे सक्षम नाही ;  हे मान्य करायलाच हवे.
 मानवी भावभावनांचे प्रगटीकरण सहज मराठी शब्दांतून साधते ,तितके शब्द ,अर्थच्छटा न् भाषेची श्रीमंती अन्यभाषेत नाहीच ,मराठी मातृभाषकाला तर नाहीच नाही.
खंत याचीच वाटते की सर्वार्थाने श्रीमंत अशी मराठी इंग्रजीच्या प्रभावी संकरातून स्वतःचे वैभव ढासळवत आहे.
आज गरज आहे ती रांगत्या बाळापासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांच्या तोंडी मराठी ,तिच्या सर्व बोलीभाषांसह , प्रतिष्ठित करण्याची.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Wednesday, November 14, 2018

#सहजोक्त.



सा रम्या नगरी महान् स नृपतिः सामन्तचक्रं च तत्
पार्श्वे तस्य च सा विदग्धपरिषत् ताः चन्द्रबिम्बाननाः ।
उद्वृत्तः स च राजपुत्रनिवहः ते वन्दिनः ताः कथाः
सर्वं यस्य वशात् अगात् स्मृतिपथं कालाय तस्मै नमः॥
कधी तरी हा श्लोक अध्यापनाला होता . तेव्हा हा तितकासा भावला नाही. पण काळाच्या अोघात याची सत्यता पटू लागली आहे.
"कालाय तस्मै नमः" ही तर सर्वसामान्यांच्या नेहमीच्या वापराची आहे.
शेवटची अोळ तर त्रिकालाबाधित सत्य आहे .पण ते सत्य समजावून सांगणारा दाखला ,जो वरच्या श्लोकात आला आहे ,तो सुद्धा अतिशय ताकदीचा आहे.
श्लोकाचा अर्थ असा , ती अतिशय रमणीय नगरी होती. तो सम्राट राजा देखील महान होता.राजाचे सामंतराजे (मांडलिक राजे)  देखील आहे. राजाच्या पाठीमागे ती विद्वत्परिषद् शोभून दिसतेय. (पलीकडे) त्या सुंदर राजस्त्रिया , बाजूला (तारुण्य न् सत्तेमुळे सार्थ अभिमान असलेला) राजपुत्रांचा समूह आहे. ते बन्दी म्हणजे राजाची स्तुती करणारे चारण-भाट आहेत नि त्यांच्या त्या राजाची स्तुती करणा-या कथा सुद्धा आहेत. 
हे सर्वच्या सर्व कालौघात स्मृतिपथातून गेले ; त्या काळाला नमस्कार असो.
नांदत्या साम्राज्याचा तो महान सम्राट ,त्याचे ते ऐश्वर्य  ,त्याची सत्ता ,त्याचे बळ ,त्याचा त्या काळावर असलेला प्रभाव इत्यादी सारे काळाच्या उदरात गडप झाले.
तारुण्य ,सौंदर्य ,पैसा ,सत्ता सारे सारे नश्वर असूनही याच गोष्टींचे भांडवल करून कितेक लोक ,
दुस-यांना अगदी खेळवत राहतात. याचे आश्चर्य वाटते !
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Tuesday, November 13, 2018

#सहजोक्त.


दिवाळीच्या सुट्ट्या न् घरी तपासायला पेपरचे गठ्ठे ,  दिवाळीची कामं . रेडिअो लाऊन कामं करायला आवडतं . रेडिअोवर अचानक  उडत्या चालीवरचं गाणं लागलं : "छोड दो आँचल , जमाना क्या कहेगा.."   गाणं ऐकलं न् युट्यूबवर पुन्हा  पाहून ऐकलं. जुन्या काळातील काही युगलगीत कायम मनाला रमवतात ,त्यातील हे एक गाणं.
पेईंगगेस्ट पिच्चरमधलं किशोरकुमार न् आशाभोसलेंच्या नटखट आवाजातल , निरागस श्रुंगारीक गाणं . देवआनंद न् नुतनने मोहक प्रणयी अदांनी चिरस्मरणीय केलेय. अचानक ,गार न् सुगंधी झुळूक यावी न् ताजे करून जावी ,असे झाले.
पेपर तपासणे , घरातली नेहमीची कामें अगदी लयीत होत होती न् बॅगराऊंड मध्ये सहजोक्त सुचत होते.
"हिंदी सिनेमा न् हिंदी गाणं " तसं म्हटलं तर ज्ञानभांडारच आहे. समाजमिती समजून घ्यायचे साधन आहे.  हे गाणे देखील त्याकाळातील समाजाचे चित्रण दाखवतेच ना ! गाण्यातील शब्दसंवाद न् चित्रित अभिनय  बघून लक्षातच येते ते.
काळ बदलतो ,बदल होतोच होतो मग व्यक्ती असो की समाजमान्यता !
गाण्याच्या रसापासून ते चित्रण नि शब्दापर्यंत विचारचक्र पुढे गेलें न् "आँचल"  इथे अडकले.
"आँचल" म्हणजे पदर . पण फक्त पदर हा शाब्दिक अर्थ न रहाता संस्कार मर्यादा ,शालीनता ,सुशीलता ,घरंदाजपणा,वात्सल्य  इत्यादींचा समुच्चय एका पदरातून सुचवला जातो. नववार लुगडं असो की साडी की अातच्या सलवारवरच्या दुपट्ट्याचा ,पदर असणारच मग त्यावर "जरतारी नाचरा मोर" असो किंवा नसो !
मेंढीच्या शेपटी सारखा असो वा जमीन झाडणारा, आईचा स्नेहाळ वात्सल्य पाजळणारा पदर असो वा प्रिय पत्नीचा मार्दव जपणारा पदर असो ; पदराला असे भावनेचे कितीक पदर असले तरी पदर म्हणजे पदरच  असतो.
आँचल ,पदर या शब्दावरून किती तरी गाणी आठवली.
• काटों से खीच के ये आँचल.
• सारा प्यार तुम्हारा मैने बांध लिया है आँचल में
• बादल में क्या जी ...आँचल में क्या जी...अजबसी धडकन..
• हुजू्र इस तरहा ना लहराके चलिये ,खुले आम आँचल ना लहराते चलिये.
• चाँद छुपा है आँचल में ..
अजून बरेच काही गाणे न् त्यावरची दृश्य भरभर डोळ्या समोरून गेले.
खरोखर एक शब्द ,एक संस्कार न् एक जमाना दर्शवणारा असतो.
• ती आई , चुलीवर स्वयंपाक करतेय न् तिचा लहानगा तिला पाठीमागून बिलगतो ,तितक्या  धांदलीतही ती डोईवरचा पदर सावरत  पदराने त्याचा चेहरा पुसते.
• पदराचा अोचा करून मुलांसाठी ,घरासाठी रानमेवा ,खाजं(म्हणजे खाऊ) आणणारी सुगृहिणी आई.
• नंतरच्या काळात शिवणयंत्रावर आई शिवतेय न् पदर लोंबतोय स्टूलावरून ,रांगतं बाळ ते धरून अोढतंय.
• पदराने मुलाची दृष्ट काढणारी प्रेमळ आई.
पुढे अोट्याशी उभी राहून आई स्वयंपाक करतेय न् नवतरूण तिचा मुलगा तिच्या पदराने , अोला चेहरा पुसतोय.न् तीही कृतक कोपाने टॉवेल घे ना रे..म्हणून अोरडतेय.
ही झाली आईची  माया.
आता पत्नी वा प्रेयसी च्या पदराची कथा.
• हिरोला पाहून उगाच स्वतःच्या  पदराशी चाळा करीत पायांच्या बोटांनी जमीन उखरणारी.
• हिरोच्या अचानक धसमुसळेपणाने हृदयाचा ठोका चुकतोय न् पदर लयीत खालीवर होतोय.
• दोन्ही खांद्यांवर  पदर घेऊन अदबीने अहोंचा मान सांभाळणारी घरंदाज कुलवधू.
• पदर खोचून शेजारणीशी भांडणं करणारी गृहिणी
नळावर पाण्यासाठी शेजारणीचा पदर,झिंझ्या अोढून  लढणारी मर्दानी.
• अचानक आलेल्या पावसात भिजू नये म्हणून जोडीदारा सह पदराने दोघांना झाकणारी ..
इत्यादी इत्यादी...
असे  व्यक्त अव्यक्त प्रसंगांचे पदर उलगडण्याचा प्रयत्न केला इथे.
आता जमाना बदलला आहे. सबलीकरणाने महिला सक्षम झाल्या आहेत. सामाजिक परिवर्तनाच्या या झंझावातात जुनी वहिवाट मोडून नवे पायंडे स्थापित होऊ पहात आहेत.
या सगळ्या सव्यापसव्यात "पदराचे" महत्त्व तितकेसे उरले नाही, हे वास्तव आहे ,पदरची माहिती नाही. लुगड्यावरून साडी , साडीवरून सलवार ,सलवार वरून पाश्चात्य पेहराव 
यावर कधी विकास प्रक्रिया  पोहचली ते कळलेच नाही. आता ब-याचश्या महिला ,मुली बिना अोढणीचे वेष परिधान करतात. अशा परिस्थितीत आचल , पदर न् पदराचे चाळे ,त्यावर आधारित नर्म श्रुंगारिक वा अोल्या वात्सल्याचे गाणे बाद ठरतात ना !
कालाय तस्मै नमः।
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.







Wednesday, November 7, 2018

#सहजोक्त.


काल हनुमाननगरच्या बगीच्यात १० वर्षांहून अधिक काळ काम करणा-या घरेलु-कामगारांचा सत्कार झाला. दिवाळीपहाट अंतर्गत एक स्तुत्य उपक्रम घेतला. संयोजकांचे विशेष आभार.
काल माझ्या घरी काम करणा-या तीनही बायांचा तेथे सत्कार झाला.
 लीलाबाई माझ्याकडे २૪ वर्षांपासून आहे. ती माझ्या माहेरी,  मी सहावीत होती तेव्हापासून काम करायची . तिच्या बद्दल माझ्या "अभितः-परितः " पुस्तकात सविस्तर लिहिलेच आहे.
 सुशीलाबाई ,माझ्याकडे २३ वर्षांपासून काम करीत आहेत. कालच्या कार्यक्रमात सर्व बायांमधून त्या एकट्याच सत्काराला उत्तर देण्यासाठी उभ्या झाल्या. इतक्या लोकांमध्ये न घाबरता बोलल्या. पण संयोजकांकडे वेळेची कमी असल्यामुळे दोनतीनच वाक्य त्या बोलू शकल्या. आज सकाळी नेहमी प्रमाणे कामासाठी आल्या न् माझ्या जवळ मनमोकळ्या व्यक्त झाल्या.  माझ्या घरी मी एकटीच महिला. दरदिवाळीला त्या न चुकता मला अोवाळतात. आज इतके वर्ष झालीत पण त्यांनी शालीनता सोडली नाही. त्यांच्या वागण्यातून कोरडा व्यवहार नसून घरांतील माणसांना जपण्याची कसोशी दिसते. 
 ज्यांचा सत्कार करायचा अशा पात्रमहिलांचे नाव ,त्या ज्यांच्या घरी काम करतात त्या घरातील व्यक्तीने फॉर्म भरून द्यावे हे आठ दिवसांपूर्वी संयोजकांकडून कळले. त्याप्रमाणे शरद फॉर्म भरून आले. आपला फॉर्म भरला , हे कळल्यापासून सुशीलाबाईंच्या डोक्यात भावनांचे काहूर माजले.फॉर्म भरल्यापासून  सकाळी सातला माझ्याकडे आल्यावर रोजच त्या प्रोफ़ेसर कॉलोनी न् त्यांचा ऋणानुबंध यावर बोलायच्या. आपण यांच्याकडे काम करतो, हे लोकं आपल्याला अतिशय आत्मियतेने ,आदराने वागवतात याविषयी त्या अतिशय कृतज्ञ आहेत. आज त्यांचा मी फोटो काढला. त्यांचे मनोगत व्हिडिअो केले .त्यांना अश्रु अनावर झाले ,भावनांना त्यांनी मोकळी वाट करून दिली.
 जातांना म्हणाल्या ,"प्रज्ञा मला नाही वाटत मी आता जास्त जगीन ,तू मला माझ्या घुसमटीतून मोकळं केलस  , अगं मला माझ्या नव-याने २८ वर्षांची असताना ,दोन लहानग्यांसह मुशाफिरखान्यात सोडून दिले होते .कधीतरी सांगीन तुला, आजवर कोणापाशीच बोलली नाही. तू लिहितेस ना ? मग सांगीन तुला  माझी कहाणी ,  सिनेमाला शोभेल अशीच आहे. मी अडानीबाई. तुमच्या सारख्या चांगल्या लोकांच्या सहवासात माझं आयुष्य चांगलं  गेलं हे सुदैव समजते ,नाहीतर काय संकटं आली असती ,सांगता येत नाही."
 सुशीलाबाई-लीलाबाई-मायाबाई यांची ही एकेक कहाणी आहे.  त्यांच्या जगण्यातून त्यांचे एक तत्वज्ञान तयार झालेय.
 पुस्तके वाचून माणूस शहाणा होत असेलही पण या जिवंत ,व्यवहारज्ञानाने संपन्न महिलांच्या आचार-विचारांतून नक्कीच संवेदनशील मानव घडतो हे निश्चितच .
माझ्या घरी काम करणा-या  या बाया म्हणजे माझ्या गृहस्वामिनी आहेत. होय , गृहस्वामिनीच.  आज जे मी घडली आहे , ती यांच्या मदतीनेच . त्या येतात . काम करतात. नियमाने पैसे घेतात.सणवारी विशेष काम करितात व जास्ती पैसे घेतात. हा व्यवहार झाला तरी ,"रिडिंग बिट्विन द लाईन" सारख्या या घरातील सुखदुःखात  , भावनांमध्ये  सहभागी होतात. कधीतरी स्वतःचे अंतरीचे गुज व्यक्त करतात , स्वतःच्या आचरणातून जीवनाचा पाठ शिकवतात.
 सोशलवर्क ,एन्जिअो गरजेचे आहेत ,तेथे श्रेयस्कर काम पण होत असतात ,पण दैनंदिन जिवनात आपल्या अवतीभवती असलेल्या कष्टकरी लोकांशी कौटुंबिक जिव्हाळा जपत ,"मी >ते > आम्ही" असा विश्वास जागवणं आत्मिक समाधान देणारं ठरतं ,नाही कां ?
 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.



Friday, October 12, 2018

#सहजोक्त.


अलक म्हणजे अति-लघू-कथा . हा नवा वाङ्मयप्रकार काही दिवसांपूर्वी व्हॉट्सॅपवर पाहिला.
हे नाव नक्कीच नवे आहे. पण हा प्रकार खरोखर नवा आहे कां ?
तान्हं मूलं लयीत बोलते. गद्य वाक्यापेक्षा पद्य त्याला अती भावते. रसाळ ,पुनरुक्त ,अभ्यस्त शब्दांनी युक्त शब्दप्रधान व कथेच्या बाजाचे पद्य मुलांना अधिक आवडते.
मध्यंतरी एका समूहावर "अलकची काही उदाहरणं देऊन  असे संस्कृत-अलक तयार करा " , हे आवाहन वाचले. सदस्यांनी प्रतिसाद दिला. मी ते सारं आवडीने वाचलं .
सुभाषितवाङ्मय हा संस्कृतातील अगाध ज्ञानसागर आहे. यात किती वेळा बुड्या मारा , नेहमी काही नवे नवे हाती पडतेच पडते.
अलक न म्हणताही ,छंदोबद्ध सरल ,सरस पद्य या वाङ्मयात मला आढळले. असे अनेक सुभाषित असू शकतात. मी निवडक श्लोकांचे विवेचन येथे करणार आहे.
सर्वांना वाचता यावे म्हणून श्लोक संधिविग्रह करून देत आहे.
(१) रात्रिः गमिष्यति ,भविष्यति सुप्रभातम् ।
भास्वान् उदेष्यति ,हसिष्यति चक्रवालम् ।
इति एव चिन्तयति कोशगते द्विरेफे ।
हा हन्त हन्त ! नलिनीं गज उज्जहार ॥
अर्थ = रात्र सरेल. सकाळ होईल. सूर्य उगवेल ,आसमंत हसेल ;  कमलकोशातील भूंगा असा विचार करीत असतानाच .......;  अरेरे ,अरेरे , त्या कमलिनीलाच हत्तीने उपटून टाकले.
स्पष्टीकरण = मानवाचेही असेच नाही कां ? काय काय स्वप्न रंगवतो बिचारा ! अन् घडतं काय ??

 प्रासंगिक कथेसह जीवनसार समोर उलगडण्याची क्षमता असलेले हे सुभाषित ,अलक नव्हे कां ?
 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
 नागपूर.

Thursday, September 13, 2018

#सहजोक्त.



आज वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळे साहित्य वाचायला व पहायला मिळाले. अर्थात ते साहित्य संस्कृत  नि मराठी या भाषांतील होते. ते वाचल्यावर मनात अनेक विचारतरंग उमटले.
चौदा विद्या व चौसष्ट कला यांची यादी वाचायला मिळाली. ती यादी अधिकृत असेलच असे नाही .पण त्यातील चौसष्ट कलांची सूची पाहिल्यावर जाणवले की या कला तत्कालिन समाजजीवन सहज-सुंदर जगण्याचे हमखास साधन असाव्यात. इतकेच नाही तर मानवी जीवनातील ऐहिक सुखसोयी व भावनिक गरजा पूर्ण करणाचेही साधन ठरत असाव्यात. अर्थात तो काळ कोणता ?  हेही निश्चित सांगता येत नाही . पण इसवी सनाच्या सुरवातीची काही शतके नक्कीच असू शकतो. त्यावेळच्या समाजरचनेला पोषक -पूरक-सहायक अशाच त्या कला होत्या.
 ६४ कला यांचा अधिपती म्हणजे  विघ्नहर्ता श्री गणपती अशी श्रद्धा आहे.. या चौसष्ट कला  पुढील प्रमाणे.

१. पानक रस तथा रागासव योजना - मदिरा,रसायन व पेय तयार करणे.
२. धातुवद- कच्चा धातू पक्का व मिश्रधातू वेगळा करणे.
३.  दुर्वाच योग- कठीण शब्दांचा अर्थ लावणे.
४. आकर ज्ञान - खाणींविषयी अंतर्गत सखोल ज्ञान असणे.
५. वृक्षायुर्वेद योग- उपवन, कुंज, वाटिका, उद्यान बनविणे.
६. पट्टिका वेत्रवाणकल्प- नवार, सुंभ, वेत इत्यादींनी खाट विणणे.
७. वैनायिकी विद्याज्ञान- शिष्टाचार व विनय यांचे ज्ञान असणे.
८.  व्यायामिकी विद्याज्ञान- व्यायामाचे शास्त्रोक्त ज्ञान असणे.
९.  वैजापिकी विद्याज्ञान- दुसऱ्यावर विजय मिळविणे.
१०. शुकसारिका प्रलापन- पक्ष्यांची बोली जाणणे.
११. अभिधान कोष छंदोज्ञान- शब्द व छंद यांचे ज्ञान असणे.
१२. वास्तुविद्या- महाल, भवन, राजवाडे, सदन बांधणे.
१३. बालक्रीडाकर्म- लहान मुलांचे मनोरंजन करणे.
१४. चित्र शब्दापूपभक्षविपाक क्रिया- पाकक्रिया, स्वयंपाक करणे.
१५. पुस्तकवाचन- काव्यगद्यादी पुस्तके व ग्रंथ वाचणे.
१६. आकर्षण क्रीडा- दुसऱ्याला आकर्षित करणे.
१७. कौचुमार योग- कुरुप व्यक्तीला लावण्यसंपन्न बनविणे.
१८. हस्तलाघव- हस्तकौशल्य तथा हातांनी कलेची कामे करणे.
१९. प्रहेलिका - कोटी, उखाणे वा काव्यातून प्रश्न विचारणे.
२०. प्रतिमाला - अंत्याक्षराची योग्यता ठेवणे.
२१. काव्यसमस्यापूर्ती - अर्धे काव्य पूर्ण करणे.
२२. भाषाज्ञान - देशी-विदेशी बोलींचे ज्ञान असणे.
२३. चित्रयोग - चित्रे काढून रंगविणे.
२४. कायाकल्प - वृद्ध व्यक्तीला तरुण करणे.
२५. माल्यग्रंथ विकल्प - वस्त्रप्रावरणांची योग्य निवड  करणे.
२६. गंधयुक्ती - सुवासिक गंध वा लेप यांची निर्मिती करणे.
२७. यंत्रमातृका - विविध यंत्रांची निर्मिती करणे.
२८. अत्तर विकल्प - फुलांपासून अर्क वा अत्तर बनविणे.
२९. संपाठ्य - दुसऱ्याचे बोलणे ऐकून जसेच्या तसे म्हणणे.
३०. धारण मातृका - स्मरणशक्ती वृद्धिंगत करणे.
३१. छलीक योग- चलाखी करून हातोहात फसविणे.
३२. वस्त्रगोपन- फाटकी वस्त्रे शिवणे.
३३. मणिभूमिका - भूमीवर मण्यांची रचना करणे.
३४. द्यूतक्रीडा - जुगार खेळणे.
३५. पुष्पशकटिका निमित्त ज्ञान - प्राकृतिक लक्षणाद्वारे भविष्य सांगणे.
३६. माल्यग्रथन - वेण्या, पुष्पमाला, हार, गजरे बनविणे.
३७. मणिरागज्ञान - रंगावरून रत्नांची पारख करणे वा ओळखणे.
३८. मेषकुक्कुटलावक - युद्धविधी- बोकड, कोंबडा इ.च्या झुंजी लावणे.
३९. विशेषकच्छेद ज्ञान - कपाळावर लावायच्या तिलकांचे साचे करणे.
४०. क्रिया विकल्प - वस्तूच्या क्रियेचा प्रभाव उलटविणे.
४१. मानसी काव्यक्रिया - शीघ्र कवित्व करणे.
४२. आभूषण भोजन - सोन्या-चांदी वा रत्नामोत्यांनी काया सजवणे.
४३. केशशेखर पीड ज्ञान - मुकुट बनविणे व केसात फुले माळणे.
४४. नृत्यज्ञान - नाचाविषयीचे शास्त्रोक्त सखोल ज्ञान असणे.
४५. गीतज्ञान - गायनाचे शास्त्रीय सखोल ज्ञान असणे.
४६. तंडुल कुसुमावली विकार - तांदूळ व फुलांची रांगोळी काढणे.
४७. केशमार्जन कौशल्य - मस्तकाला तेलाने मालीश करणे.
४८. उत्सादन क्रिया - अंगाला तेलाने मर्दन करणे.
४९. कर्णपत्र भंग - पानाफुलांपासून कर्णफुले बनविणे.
५०. नेपथ्य योग - ऋतुकालानुसार वस्त्रालंकाराची निवड करणे.
५१. उदकघात - जलविहार करणे. रंगीत पाण्याच्या पिचकारी करणे.
५२. उदकवाद्य - जलतरंग वाजविणे.
५३. शयनरचना - मंचक, शय्या व मंदिर सजविणे.
५४. चित्रकला - नक्षी वेलवुट्टी व चित्रे काढणे.
५५. पुष्पास्तरण - फुलांची कलात्मक शय्या करणे.
५६. नाट्यअख्यायिका दर्शन - नाटकांत अभिनय करणे.
५७. दशनवसनांगरात - दात, वस्त्रे, काया रंगविणे वा सजविणे.
५८. तुर्ककर्म - चरखा व टकळीने सूत काढणे.
५९. इंद्रजाल - गारुडविद्या व जादूटोणा यांचे ज्ञान असणे.
६०. तक्षणकर्म - लाकडावर कोरीव काम करणे.
६१. अक्षर मुष्टिका कथन - करपल्लवीद्वारे संभाषण करणे.
६२. सूत्र तथा सूचीकर्म - वस्त्राला रफू करणे.
६३. म्लेंच्छीतकला विकल्प - परकीय भाषा ठाऊक असणे.
६४. रत्नरौप्य परीक्षा - अमूल्य धातू व रत्ने यांची पारख करणे.
जीवन सुसह्य करणा-या तर या कला आहेतच. कलांची नावे लक्षात घेतली न्  भाषिक अंगाने विचार केला तर या कला समाजात रुजून सुस्थापित होण्याच्या प्रदीर्घ काळात नक्कीच संस्कृत ही सर्वसामान्यांचीही बोलीभाषा असावी ; असा निष्कर्ष काढला तर वावगे ठरू नये.
कोणतीही भाषा निवळ प्रमाण ,व्याकरणनिष्ठ असून चालत नाही तर ती जनसामान्यांच्या दैनंदिन व्यावहारिक-सामाजिक-भावनिक गरजांची पूर्ताता करणारी असेल तरच ती जिवंत भाषा ठरते. या अर्थाने विचार केला तर वरील कलांच्या नामोल्लेखांतून त्या काळात संस्कृत निश्चितच बोलीभाषा होती ,हेच म्हणावे लागेल.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
नागपूर.

Sunday, September 9, 2018

#सहजोक्त.

#स्तोत्रचिंतन .
स्तोत्र ,मंत्र हे असे साहित्य आहे की जे श्रद्धेने वाचले ,उच्चारले तर फायदा होतो. नेटवर काही शोधत होती न् बरेच दिवसांनी एक स्तोत्र हाती लागलं. माझा मुलगा लहान असताना ते मी म्हणायची. व्यर्थ बडबड करण्यापेक्षा काही चांगले म्हटले तर चांगलेच असते. शिवाय स्तोत्रांमुळे जिभेला वळण लागते. उच्चारणदोष कमी होतात.
हे स्तोत्र वासुदेवानंदसरस्वती विरचित आहे.  यथामती अन्वयासह  सार्थ-बालाशिष-स्तोत्रम् देत आहे. त्याच खाली नागपुरातील विद्वान् डॉ. के. रा. जोशी यांनी केलेला श्लोकात्मक अनुवादही देत आहे.
स्वांशेनेदं ततं येन स त्वमीशात्रिनन्दनम् ।
मुञ्च मुञ्च विपद्भ्योऽमुं रक्ष रक्ष हरे शिशुम् ॥१॥
अन्वय = हे अत्रिनन्दन , येन इदं (जगत्) स्व-अंशेन ततं  (विस्तारितम्) सः त्वम्  अमुं शिशुं विपद्भ्यः मुञ्च ,हे हरे ,अमुं शिशुं रक्ष ॥
अर्थ = हे अत्रिनंदना ,ज्या तू हे जग स्वतःच्या अंशाने  विस्तारिले (त्या तू) ह्या बालकाला विपत्तींपासून वाचव ,हे हरे (विशेषण ) या बालकाचे रक्षण कर.

प्रातर्मध्यंदिने सायं निशि चाप्यव सर्वथा ।
दुर्दृग्गोधूलिभूतार्तिर्ग्रहमातृग्रहादिकान् ॥
अन्वय= (हे देव ,अमुं शिशुं त्वं)  प्रातः-मध्यंदिने-सायं ,च निशि  ; दुर् दृक् -गो-धूलि-भूत-अर्तिः-ग्रह-मातृग्रह-आदिकान् सर्वथा अपि अव ।
(हे देवा ,या शिशुला तू) दिसावयास कठिण अशी गोधूली,भूत-दुःख -नवग्रह-मनाचा कारक चंद्र-आदीं पासून सकाळ-दुपार-सायंकाळ-रात्र (या सर्व काळात) सर्वप्रकारे रक्षण कर .
छिन्धि छिन्ध्यखिलारिष्टं कमण्डल्वरिशूलधृक् ।
त्राहि त्राहि विभो नित्यं त्वद्रक्षालंकृतं शिशुम् ॥
अन्वय= हे कमण्डल्वरिशूलधृक् ,अखिलं अरिष्टं छिन्धि ,हे विभो त्वत् रक्ष-अलंकृतं शिशुं नित्यं त्राहि ॥
हे कमण्डलु-अरिशूलधृक् (दत्तगुरुंचे विशेषण) (या शिशुचे) संपूर्ण  अरिष्ट (संकट)  छिन्न करून टाक.,हे शक्तिमान् देवा ,तुझ्या रक्षणाने अलंकृत अशा या बालकाला नेहमी (संकटांपासून) वाचव .
सुप्तस्थितं चोपविष्टं गच्छन्तं क्वापि सर्वतः।
भो देवावश्विनावेष कुमारे वामनामयः॥
अन्वय = हे देवाश्विनावेष ,अस्मिन् कुमारे वामनामयः सुप्तं स्थितं च उपविष्टं ,गच्छन्तं  क्वापि सर्वतः ।
अश्विनीकुमारांच्या वेषातील हे देवा ,झोपलेल्या ,बसलेल्या ,थांबलेल्या ,कुठेही जात असलेल्या या बालकाच्या सगळी कडल्या  पीडा कमी कर ,(नष्ट कर) .
दीर्घायुरस्तु सततं सहअोजोबलान्वितः ॥
या मुलाचे सतत अोज-बलयुक्त दीर्घ अायुष्य असू द्या.
इतिश्री प.प. वासुदेवानन्दसरस्वतीविरचितं बालाशिषस्तोत्रम् ॥
अशा प्रकारे परमपूजनीय  श्री. वासुदेवानंद विरचित बालाशिष स्तोत्र समाप्त.
डॉ. के. रा. जोशीकृत श्लोकात्मक अनुवाद.

तुझ्याच अंशे बाल निर्मिला अत्रिनंदना परमेशा !
सर्व संकटे दूर करोनी रक्ष रक्ष रे जगदिशा !! १!!

प्रातःकाली सायंकाली दिवसा रात्री केंव्हाही !
शिशुवरी तव कृपा असू दे चिंता त्याची तू वाही !!२!!

दुष्ट नजर त्य कधी न लागो ग्रहादि पीडा तू तोडी !
गोरजपीडा भूतप्रपीडा तोडी, फोडी तू मोडी !! ३ !!

त्रिशूलधारी हे परमेशा सर्व अरिष्टा छेदोनी !
तुझ्या रक्षणे अलंकारिले बालक तू ही पाहोनी !! ४!!

अश्विनीवेषा हे जगदिशा कुमार माझा तू रक्षी !
झोपी जावो उभा असो वा असो कुठेही तू साक्षी !! ५ !!

दीर्घायु हे बालक होवो ओजबलने युक्त असो !
मुमुक्षत्व तू मला देउनी बालकचिंता तुला असो !! ६ !!
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Friday, September 7, 2018

#सहजोक्त.


स्तोत्रचिंतन -भाग ५
आपत्सु मग्नः स्मरणं त्वदीयं
करोमि दुर्गे करुणार्णवेशि |
नैतच्छठत्वं मम भावयेथाः
क्षुधातृषार्ता जननीं स्मरन्ति ||१०||
हे करुणेचा सागर असेली दुर्गामैय्या ,दुःखात चूर असलेला मी (निव्वळ स्वार्थाने) तुझे स्मरण करतो याला माझी लबाडी समजू नकोस कारण तहानभूक लागलीकीच आईची  आठवण येते ना !

जगदम्ब विचित्रमत्र किं
परिपूर्णा करुणास्ति चेन्मयि |
अपराधपरम्परापरं
न हि माता समुपेक्षते सुतम् ||११||
हे जदगम्बे ,माझ्यावर तुझी परिपूर्ण करुणा आहे तर यात काय विचित्रपणा आहे सांग बरे ,अपराध परंपरा असलेल्या मुलाला आई उपेक्षित नाही ना !!

मत्समः पातकी नास्ति
 पापघ्नी त्वत्समा न हि |
एवं ज्ञात्वा महादेवि
यथायोग्यं तथा कुरु ||१२||
हे महादेवी ,माझ्या सारखा पातकी दुसरा कोणीच नाही आणि तुझ्या सारखी पाप नष्ट करणारी दुसरी कोणी नाही . हे सारे जाणून ये योग्य असेल तेच कर.
शंकराचार्यांनी रचलेले हे स्तोत्र खरोखर मानवी भावना स्पष्ट करणारे आहे.
शेवटच्या श्लोकात याचना ,प्रार्थना ,मागणी न मागता जे तुला योग्य वाटेल ते तू कर असे म्हणतात कारण मुलाला खात्री असतेच की आई अयोग्य करणारच नाही.
इति "देव्यपराधक्षमापनस्तोत्र" संपूर्ण.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

#सहजोक्त .



#सहजोक्त - कविता.
बाईचे शिक्षण म्हणजे काय असते ?
खुलभर दुधाची कथा असते
कारल्याच्या वेलाची पेरणी असते
चांगला नवरा गटवायची सोय असते
सावित्रीच्या वस्याची व्यथा असते ॥ १॥
बाईचे करियर म्हणजे काय असते ?
यश मिळाले तर सर्वांचे त्यात श्रेय असते
अपयश  तिच्या मनमानीचे फळ असते
पद मिळाल्यास कर्तृत्वाहून जोरात नशीब असते
पदानुसार वागली तर गची म्हणे बाधा असते ॥ २॥
बाईची नोकरी म्हणजे काय असते ?
पूर्ण संसार पेलून संसाराला हातभार ठरते
उगाच षौक करण्याचे साधन असते
पैसा मिळविताना घराकडे दुर्लक्ष असते
असून अडचण न् नसून खोळंबा असते ॥३॥
बाईचे जीवन नेमकं काय असते ?
ऐकण्यात असेल तर कुलीन असते
नाठाळ असेल तर उठवळ असते
स्वतःला समर्पून सगळ्यांना सांभाळणे असते
आखलेल्या चौकटीत जगण्याचा आभास असते॥ ૪॥
एकूणच बाई म्हणजे काय असते ?
संसार चक्राची जननी असते
पुस्तकात गायची महती असते
प्रत्यक्षात ती दुय्यम नागरिक असते
तरी ती तिच्यावर संतुष्ट असते ॥५॥
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.








कविता.
बाईचे शिक्षण म्हणजे काय असते ?
खुलभर दुधाची कथा असते
कारल्याचा वेलची पेरणी असते
सावित्रीच्या वस्याची व्यथा असते ॥ १॥
बाईचे करियर म्हणजे काय असते ?
यश मिळाले तर सर्वांचे त्यात श्रेय असते
अपयश  तिच्या मनमानीचे फळ असते
पद मिळाल्यास कर्तृत्वाहून जोरात नशीब असते
पदानुसार वागली तर गची म्हणे बाधा असते ॥ २॥
बाईची नोकरी म्हणजे काय असते ?
पूर्ण संसार पेलून संसाराला हातभार ठरते
उगाच षौक करण्याचे साधन असते
पैसा मिळविताना घराकडे दुर्लक्ष असते
असून अडचण न् नसून खोळंबा असते ॥३॥
बाईचे जीवन नेमकं काय असते ?
ऐकण्यात असेल तर कुलीन असते
नाठाळ असेल तर उठवळ असते
स्वतःला समर्पून सगळ्यांना सांभाळणे असते
आखलेल्या चौकटीत जगण्याचा आभास असते॥ ૪॥
एकूणच बाई म्हणजे काय असते ?
संसार चक्राची जननी असते
पुस्तकात गायची महती असते
प्रत्यक्षात ती दुय्यम नागरिक असते
तरी ती तिच्यावर संतुष्ट असते ॥५॥
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.








Thursday, August 30, 2018

#सहजोक्त.


स्तोत्रचिंतन  - भाग ૪

चिताभस्मालेपो गरलमशनं दिक्पटधरो
जटाधारी कण्ठे भुजगपतिहारी पशुपतिः
कपाली भूतेशो भजति जगदीशैकपदवीं
 भवानि त्वत्पाणिग्रहणपरिपाटीफलमिदम् ||७||
 शंकराचे वर्णन करतांना शंकराचार्य म्हणतात की , चिताभस्मलेपन करणारा ,विषभक्षण करणारा, दिगंबर  ,जटाधारी ,गळ्यात भुजगेंद्रहार धारण करणारा ,पशुपतिनाथ ,कपालधारी भूतनाथ असा शंकर जगदीश्वर ही पदवी धारण करतो ते केवळ तुझे पाणिग्रहण केले म्हणूनच  बरे ,हे भवनी !

 न मोक्षस्याकांक्षा भवविभववाञ्छापि च न मे
न विज्ञानापेक्षा शशिमुखि सुखेच्छापि न पुनः |अतस्त्वां संयाचे जननि जननं यातु मम वै
मृडानी रुद्राणी शिव शिव भवानीति जपतः ||८||
चंद्रानने (चंद्रा सारखे सुंदर मुख असलेली ) ना मला मोक्षाची इच्छा आहे , ना भौतिक सुखांची ; ना मला विज्ञानाची (मोक्ष प्राप्तीचे विशेष ज्ञान)  ना सुखाची इच्छा आहे.म्हणूनच हे आई , मी  विशेष मागणी मागतो की (इथे संयाचना हा फार सुंदर शब्द योजला आहे, याचना म्हणजे मागणी न् संयाचना म्हणजे योग्य प्रकारची विशेष मागणी ) मृडानी ,रुद्राणी ,शिवा ,शिवानी ,भवानी असे तुझे नाम  जपण्यातच माझा जन्म जाऊ दे.

नाराधितासि विधिना विविधोपचारैः
किं रुक्षचिन्तनपरैर्न कृतं वचोभिः |
श्यामे त्वमेव यदि किञ्चन मय्यनाथे
धत्से कृपामुचितमम्ब परं तवैव ||९||
हे श्यामे (देवीला गौरीही म्हणतात न् श्यामाही )
रुक्षचिंतनपर वाणीने ,विविध विधींच्या उपचारांनी तुझी आराधना केली नाही.तरी तुझीच कृपा आहे की माझ्यासारख्या अनाथावर तू कृपाछत्र धरतेस.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Wednesday, August 29, 2018

#सहजोक्त.


स्तोत्रचिंतन -भाग ३
 आईने मातृभावाने पुत्राचे अपराध पोटात घ्यावे त्याला क्षमा करावी हे मागणे या स्तोत्रातून श्रीमद्शंकराचार्य व्यक्त करीत आहेत. एखादं चुकार मुलं मोठी चूक करतं न् मग आईचा अनुनय करीत तिच्याशी लाडीगोडी करतो तसे हे श्लोक आहेत.

जगन्मातर्मातस्तव चरणसेवा न रचिता
 न वा दत्तं देवि द्रविणमपि भूयस्तव मया |
तथापि त्वं स्नेहं मयि निरुपमं यत्प्रकुरुषे
 कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ||४||
  शंकराचार्य म्हणतात , हे जगदंबे ,जगज्जननी ना मी तुझी सेवा केली ना तुला माझं बरेच धन अर्पिले तरीही तू माझ्यावर निरुपम (म्हणजे ज्याची तोडच नाही ,अतुलनीय ) प्रेम करते. कारण मुलगा भलेही वाईट निपजेल पण आई कधीच वाईट नसते. .

परित्यक्ता देवा विविधविधसेवाकुलतया
मया पञ्चाशीतेरधिकमपनीते तु वयसि |
इदानीं चेन्मातस्तव यदि कृपा नापि भविता निरालम्बो लम्बोदरजननि कं यामि शरणम् ||५||
बाबा कोपले तर बचावाचे एकच माध्यम म्हणजे आई. बाबांकडून काही मोठं मिळवून घ्यायचे असेल तर आई मध्ये हवीच . हेच याही श्लोकात दिसते.
जीवन जगतांना विविध भोगात लिप्त झालो, सारे देव विस्मरणात गेले माझ्या. यातच  वयाची पंच्यांशीही उलटून गेली ,(आयुष्याचे फार कमी दिवस राहिले.) गणेशजननी ,आता जर तुझे सहाय (आधार) मिळाला नाही तर निराधार असा मी (या विशाल जगात) कोणाला  बरे शरण जाऊ ? सांग ना ! (तुझ्याशिवाय आता मला कोणीच वाचवू शकत नाही. )

श्वपाको जल्पाको भवति मधुपाकोपमगिरा निरातङ्को रङ्को विहरति चिरं कोटिकनकैः |
तवापर्णे कर्णे विशति मनु वर्णे फलमिदं
 जनः को जानीते जननि जननीयं जपविधौ ||६||
 कुत्र्याचे मांस भक्षण करणारा (ज्ञानोपासक नसलेला) सुद्धा (तुझ्या कृपेने) मधाळ गोड वाणीने बहुभाषक होतो.दरिद्रीसुद्धा (तुझ्या कृपेने) निर्भय होऊन कोट्याधिशासारखा वावरू लागतो. हे अपर्णे, हे सारे ,तुझे नाव कानावर पडल्याचेच  (कानातून मनात भिनल्यामुळे ) फलित आहे. हे जननी तुझ्या जपामुळे  काय काय सुपरिणाम होतात ,हे कोण बरे जाणू शकेल ? (अशक्यप्राय गोष्टी तुझ्या जपाने सहजशक्य कशा होतात हे कोण जाणू शकेल ?)
 जप करणे म्हणजे केवळ वाणीने तो शब्द उच्चारणे नव्हे तर सदा सर्वकाळ तेच रूप व शब्द ध्यानी मनी स्वप्नी रुजवणे हे होय. इतक्या तीव्रतेने अखंड ईशस्मरण केले की जीवनाचे कल्याण होणारच ना ?
 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Wednesday, August 22, 2018

#सहजोक्त.


स्तोत्रचिंतन -भाग २
 देवीला मातृरूपाने पूजणे हे स्वाभाविक आहे. जगात आई एवढा लाड दुसरे कोणीच करीत नाही. आई एवढी सत्ता कोणावरच गाजवता येत नाही. म्हणूनच आदिशंकराचार्यांनी देव्यपराधक्षमापन स्तोत्र रचले.या स्तोत्राचे  पहिले तीन श्लोक असे

 न मन्त्रं नो यन्त्रं तदपि च न जाने स्तुतिमहो न चाह्वानं ध्यानं तदपि च न जाने स्तुतिकथाः |
न जाने मुद्रास्ते तदपि च न जाने विलपनं
परं जाने मातस्त्वदनुसरणं क्लेशहरणम् ||१||
हे आई ,मी मंत्र (विशिष्ट  शब्दोच्चार ) ,यंत्र (विशिष्ट आकार),स्तुती (शब्दस्तुती), आवाहन(भावनिक साद) ,ध्यान(देविरूपाचे सतत स्मरण) ,स्तुतिकथा ,मुद्रा (हातांचे वा अंगांचे विशिष्ट आकार),विलपन(कारुण्य प्रदर्शक मंत्र) इत्यादि पूजाविधी मी जाणत नाही.  पण आई मी हे (नक्कीच) जाणतो की तुझे अनुसरण करणे ,क्लेश दूर करणारे आहे.
दक्षिणतंत्र पद्धतीत अनेक मुद्रा-भाव आहेत. ते काहीही  न जाणता मी इतकेच जाणतो की तुझेच अनुसरण करणे हेच खरे सुखाचे आधान आहे.

विधेरज्ञानेन द्रविणविरहेणालसतया विधेयाशक्यत्वात्तव चरणयोर्या च्युतिरभूत् |
तदेतत् क्षन्तव्यं जननि सकलोद्धारिणि शिवे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ||२||
पूजापद्धती विषयक अज्ञानामुळे ,धनलोभाने ,आळसामुळे वा नियतीच्या शक्याशक्यतेमुळे हे आई तुझ्या चरणांपासून मी
ढळलो  तरी ; जगाचा उद्धार करणारी ,कल्याण करणारी हे आई माझा अपराध पोटात घाल.
पुत्र वाईट निपजू शकतो पण आई कधीच वाईट नसते.
जीवन जगण्याच्या रगाड्यात नेमकं वर्मच हरवून बसतो आपण . जन्मताच जसे निरागस असतो ते मन हळू हळू जनरहाटीत प्रदूषित होते. परतीच्या प्रवासात हे लक्षात येते.लेकरू चुकतेच पण आईने सांभाळावे ना त्याला सर्व परिस्थितीत !

पृथिव्यां पुत्रास्ते जननि बहवः सन्ति सरलाः
परं तेषां मध्ये विरलतरलोऽहं तव सुतः |
मदीयोऽयं त्यागः समुचितमिदं नो तव शिवे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ||३||
आई ग ,पृथ्वीवर  तुझे अनेक पुत्र आहेत पण त्यामध्ये माझ्यासारखा एखादाच विरळातील विरळ आहे. (विषयासक्त झालेल्या )माझा हा (तुझ्यापासून दूर जाण्याचा ) त्याग योग्य नाहीच . हे शिवे(शिवाची पत्नी ) ,मुलगा वाईट निपजू शकतो पण आई कधीच वाईट नसते.
निसर्गचक्रानुसार आई होणं हे स्वाभाविक आहे पण "आईपण" एकदा समजलं की कोणतीच आई  कुमाता होऊच शकत नाही.
मुलगा कितीही मोठा झाला तरी  आईसाठी तो लहानच असतो.आईला अनेक मुलं असली तरी तिचा प्रत्येकाशी स्वतंत्र व विशेष अनुबंध असतोच .प्रत्येक मूल वेगळं असतं.
"कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति" ही काही श्लोकात समान अोळ आहे. ती एक प्रकारची टॅगलाईनच आहे या स्तोत्राची.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.



Saturday, August 18, 2018

#सहजोक्त.


आज दोन लेख वाचले. एक मराठी व दुसरा हिंदी.
दोन्ही लेखांचा मूळ हेतू मातृभाषेतून शिक्षणाची महती हाच आहे.
दोन्ही लेख छान व विषयाला पूर्ण न्याय देणारे होते.
शिक्षणात मातृभाषेचे स्थान अनन्यसाधारण आहे यात शंकाच नाही.
या दोन्ही लेखाची सुरुवात एकाच संस्कृत श्लोकाने झाली हा योगायोग. नेमकं दोन्ही लेखात तो श्लोक निर्दोष दिलेला नाही. संस्कृत ही मायबोली नाही त्यामुळे  असो. त्यावर मी रचना केली.
मातृभाषा महती ।
मातृभाषां परित्यज्य भाषामन्यामुपासते ।
ते चक्रासन्दमासाद्य
स्वपादहीनपङ्गवः ॥
©डॉ.प्रज्ञा देशपांडे
भारत हा बहुभाषिक देश आहे. बहुभाषिकत्व हे भारताचे बलस्थान आहे.भारतीय शिक्षणात भाषा हा महत्वाचा घटक आहे. भाषावार प्रान्त रचनेमुळे प्रादेशिक ,भाषिक अस्मिता वाढणे नैसर्गिक आहे. आजकाल कुठेतरी ही अस्मिता व राष्ट्रियता  यांच्यात उगाच दावा उभा केल्या जातोय की काय असे वाटते. या प्रकारांमुळे भारताचे बलस्थानच कमकुवत होते आहे असे वाटते.
सर्व भारतीय ,राष्ट्रियत्व जपणा-या सुजाण नागरिकांनी भाषा शिक्षणाकडे डोळसपणे बघणे ही काळाची गरज आहे.
 परिसरबोली ,मातृभाषा ,राजभाषा,राष्ट्रभाषा ,
 जागतिकभाषा  यांच्या गलबल्यात शिक्षण अडकवण्यापेक्षा  भाषिकसामंजस्य ,भाषाशिक्षण या विषयाला गांभीर्याने घ्यायला हवे.
 भाषा ही संस्कृतीचे वहन करते न् भारतीयांची विशिष्ट संस्कृती आहे असे जर अभ्यासकांना वाटत असेल तर भारतीय भाषांचे वैविध्य व परस्पर पूरकता ,अंतर्गत साम्य नव्या पिढीला सोदाहरण समजावून देणे हे त्यांचे महत्वाचे कर्तव्य आहे.
 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Friday, August 17, 2018

#सहजोक्त.


स्तोत्रचिंतन.भाग १
"आई" या नावातच सारे विश्व सामावले आहे. सर्जन , समर्पण ,संवेदना ,सहनशीलता ,क्षमाशीलता ,वात्सल्य यांचे मूर्तरूप म्हणजे आई . म्हणूनच भारतीय संस्कृतीत आईला सर्वोच्च स्थान दिले आहे. इतकेच नाही तर जे जे उत्तम ,उदात्त ,मंगल त्या सगळ्यांना मातृभाव दिल्या जातो , हे  पृथ्वी ,नदी ,गाय ,भाषा , जन्मस्थान इत्यादींवरून सहज लक्षात येते.
देव ,ईश्वर ,ईश ,परमेश ,जगन्नियंता ,पिता ,
सर्वशक्तिमान   वा इतर कोणत्याही स्वरूपात  त्या मंगलोर्जेची जग उपसना करते त्याचेच स्त्रीरूप सुद्धा जगात वंदनीय आहे. या स्त्रीरूपाला देवी म्हणतात. देवीची सुद्धा मातृरूपाने पूजा करण्याचा प्रघात आहे.
एकदा त्या अमोघ शक्तीला "आई" म्हटले की ,
आई-लेकराचे नाते निर्माण होतेच . मानवी नात्यात जसे भावभावनांची तरलातितरल स्तरं असतात तसेच नाते देवी व तिच्या भक्तात तयार होते.
राग-लोभ,चीड,रुसवा ,प्रसन्नता आदी सारे भाव मग या नात्यात अोघाने येतातच.
स्तोत्रवाङ्मय हा भारतीय साहित्याचा अद्वितीय खजिना आहे. स्तोत्र म्हणजे स्तुती करण्याचे शब्दरूपी साधन . हा एक काव्यप्रकारच आहे. यात शुद्ध भक्ती ,भाव-रस असतोच शिवाय प्रासादिकताही असते.
श्रीमद् शंकराचार्यांची स्तोत्रे विशेष उल्लेखनीय आहेत.
या लेखमालेचा विषय "देव्यपराधक्षमापनस्तोत्र" हा आहे.
स्तोत्राच्या नावातच त्याचा वर्ण्यविषय स्पष्ट लक्षात येतो. देवी म्हणजे मातृरूपाने पूजिली जाणारी सर्वोच्च शक्ती ,अपराध म्हणजे कळत-नकळतपणे  केलेले मान्यतांच्या विरुद्ध वर्तन ,क्षमापनस्तोत्र म्हणजे क्षमा मागण्यासाठी केलेले स्तुतिकाव्य.
या स्तोत्रात एकूण बारा श्लोक आहेत. ते पुढील प्रमाणे.
(©डॉ.प्रज्ञा देशपांडे)
न मन्त्रं नो यन्त्रं तदपि च न जाने स्तुतिमहो न चाह्वानं ध्यानं तदपि च न जाने स्तुतिकथाः |
न जाने मुद्रास्ते तदपि च न जाने विलपनं
परं जाने मातस्त्वदनुसरणं क्लेशहरणम् ||१||
विधेरज्ञानेन द्रविणविरहेणालसतया विधेयाशक्यत्वात्तव चरणयोर्या च्युतिरभूत् |
तदेतत् क्षन्तव्यं जननि सकलोद्धारिणि शिवे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ||२||
पृथिव्यां पुत्रास्ते जननि बहवः सन्ति सरलाः
परं तेषां मध्ये विरलतरलोऽहं तव सुतः |
मदीयोऽयं त्यागः समुचितमिदं नो तव शिवे
कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ||३||
जगन्मातर्मातस्तव चरणसेवा न रचिता
 न वा दत्तं देवि द्रविणमपि भूयस्तव मया |
तथापि त्वं स्नेहं मयि निरुपमं यत्प्रकुरुषे
 कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ||४||
परित्यक्ता देवा विविधविधसेवाकुलतया
मया पञ्चाशीतेरधिकमपनीते तु वयसि |
इदानीं चेन्मातस्तव यदि कृपा नापि भविता
निरालम्बो लम्बोदरजननि कं यामि शरणम् ||५||
श्वपाको जल्पाको भवति मधुपाकोपमगिरा
 निरातङ्को रङ्को विहरति चिरं कोटिकनकैः |
तवापर्णे कर्णे विशति मनु वर्णे फलमिदं
 जनः को जानीते जननि जननीयं जपविधौ ||६||
चिताभस्मालेपो गरलमशनं दिक्पटधरो
जटाधारी कण्ठे भुजगपतिहारी पशुपतिः
कपाली भूतेशो भजति जगदीशैकपदवीं
 भवानि त्वत्पाणिग्रहणपरिपाटीफलमिदम् ||७||
न मोक्षस्याकांक्षा भवविभववाञ्छापि च न मे
न विज्ञानापेक्षा शशिमुखि सुखेच्छापि न पुनः |अतस्त्वां संयाचे जननि जननं यातु मम वै
मृडानी रुद्राणी शिव शिव भवानीति जपतः ||८||
नाराधितासि विधिना विविधोपचारैः
किं रुक्षचिन्तनपरैर्न कृतं वचोभिः |
श्यामे त्वमेव यदि किञ्चन मय्यनाथे
धत्से कृपामुचितमम्ब परं तवैव ||९||
आपत्सु मग्नः स्मरणं त्वदीयं
करोमि दुर्गे करुणार्णवेशि |
नैतच्छठत्वं मम भावयेथाः
क्षुधातृषार्ता जननीं स्मरन्ति ||१०||
जगदम्ब विचित्रमत्र किं
परिपूर्णा करुणास्ति चेन्मयि |
अपराधपरम्परापरं
न हि माता समुपेक्षते सुतम् ||११||
मत्समः पातकी नास्ति
 पापघ्नी त्वत्समा न हि |
एवं ज्ञात्वा महादेवि
यथायोग्यं तथा कुरु ||१२||

पुढील भागांपासून  या श्लोकांचे यथामती ,यथाक्रम रसग्रहण करील.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे. 

Sunday, August 5, 2018

#सहजोक्त.

#सहजोक्त.
आज एक शब्द पहिल्यांदाच  वाचण्यात आला.छान वाटला. दोन तीनही शब्दकोशात आढळला नाही. अॉनलाईन शब्दकोशात आढळला पण वेगळ्या अर्थाने.आज छान वाटलं ,रविवारचा सदुपयोग झाला.
"यस्य पर्णमयी जुहूर्भवति न स पापं श्लोकं शृणोति "।  (तैतिरीय संहिता३/५/७/२) अर्थ असा की , "जुहू(चमचा) जर पर्णमय (पळसाचा) बनवला ,तर त्यामधून एक विशिष्ट अपूर्व निर्माण होते.
वेगळ्या संदर्भाने काही वाचत होती न् शब्द दिसला. शब्द तसेही आवडतात.
जुहू हा शब्द मुंबईचे एक उपनगर म्हणून परिचित आहेच . पण आजवर हा शब्द संस्कृत मध्येही आहे ,हे माहित नव्हते.
वरील वाक्यात जुहू शब्द चमचा या अर्थाने आला आहे. तर अॉनलाईन शब्दकोशात जीभ,ज्योत , ब्रह्मदेवाची पत्नी ,पळी असे अनेक अर्थ दिले आहेत.
जुहू म्हणजे चमचा , पळी (ज्याला संस्कृतात दर्वी म्हणतात ) असा अर्थ कळला आणि छान वाटले.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Saturday, July 21, 2018

#चित्रकविता.

*बीजाच्या अंतातून महावृक्ष अंकुरतो*
*निराशेच्या मळभातून आस जागवतो*
*अंधाराच्या गर्भातून रविकिरण डोकावतो*
*अंतातूनही आरंभाची देव पेरणी करतो ॥१॥*
*©डॉ. प्रज्ञा देशपांडे.*

Sunday, July 15, 2018

#चित्रकविता.

#चित्रकविता.
वेदनेला आज माझ्या अर्थ नवा लाभला
शब्द ही अव्यक्तसे नि सूर कंठी दाटला
हाय ती उमले कळी अन् भ्रमर कोठे गुंतला
असूनिही सागरकिनारी जीव हा तृषार्तलेला ॥१॥
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Saturday, July 14, 2018

#सहजोक्त.


झाडाख्यान .........
"निसर्ग लहरी झाला आहे ,बदलला आहे" ; अशा आशयाची वाक्य  जेव्हा कानावर पडतात तेव्हा मी त्यांना "चेतनगुणोक्तिची" उदाहरणे मानते. मानवी भावभावनांचे आरोपण निर्जीव वस्तु वा निसर्गावर करणे म्हणजे चेतनगुणोक्ती.
निसर्ग कधीच बेभरोश्याचा ,लहरी नसतो.  ही गुणवैशिष्ट्ये मानवाची असतात अन् तेच निसर्गावर अारोपित होतात.
"मानव हा बुद्धिमान प्राणी आहे ,निसर्गाची श्रेष्ठ  कलाकृती आहे",असे म्हणत  मानवच स्वतःची पाठ थोपटून घेतो कारण बाकी चराचर सृष्टी स्वसर्जनात इतकी मग्न आहे की मानव काय विचार करतो हे त्यांच्या गावी पण नसते.
किती तरी गुणं निसर्गाकडून आत्मसात करायला पाहिजेत. पहिले म्हणजे नैसर्गिक वागणे. शरीरधर्माला अनुसरून कुठेही दांभिकता ,वंचकता न करता सरळ सरळ जगणे.वाघ न्  हरिणाचा भक्षक-भक्ष्य संबंध आहे . पण म्हणून वाघ चोवीसतास खायखाय करीत नाही ना सुटत ? किंवा दिसलं हरीण की खा ,असेही करीत नाही.
मुंगस न् साप यांचे हाडवैर आहे.  क्षणोक्षणी वैरातून हिंसा वा कायम द्वेष यांच्यातही पहायला मिळत नाही.
"तडजोड तीही स्वतःला त्रास न करून घेता", हा ही मोठा गुण निसर्गाकडून शिकण्यासारखा आहे.
मानवी हव्यासापोटी जंगलकटाई,नद्या अडवून बांध वा धरणे बांधणे इत्यादी मानवी उपक्रमांमुळे खरे तर प्राणी ,झाडे निर्वासित होतात ,नद्यांची स्वाभाविक स्थिती बदलते. तरी तो निसर्गच आहे म्हणून पूर्ववत नाही पण प्राप्त परिस्थितीतही स्वधर्म (म्हणजे स्वाभाविक वर्तन ) न सोडता वागतो.
माझ्या अंगणात जुई (हिंदीत जुही) चा वेल आहे. अंगण छोटेच आहे न् त्यात जाई-मोगरा यांची कमान केली आहे. चमेलीचा वेल काढून टाकला ,गुलाबाचा वेल खुरटला होता म्हणून काढला. मात्र हा जुईचा वेल वाढवायला तशी जागा अपुरीच पडत होती. मग तो झाडासारखा कंपाऊंडच्या जाळीशी झुपका करून वाढू दिला. सहज कालपरवा पाहिले तर त्या नाजुक वेलाने सर्व अडथळे दूर करून भिंतीचा आधार घेत वरच्या गॅलरीवर स्वतःला प्रस्थापित केले. वा-याच्या झुळुकी सरशी छान डोलणारा तो वेल ,कालियामर्दनानंतर वेणु वाजवत निरागस हसणा-या बालमुकुंदाप्रमाणे वाटला मला !
वेलाला ना हात ना पाय ना डोळे तरी त्याची ती जिजीविषा (जगण्याची इच्छा)  व विजिगिषा (जिंकण्याची) पाहून भारावल्या सारखे झाले.
बर ; जिंकण्याची इच्छा करत असतांना कोणालाही नमवावे ,हरवावे ही वृत्ती त्या वेलात दिसली नाही. हा वेल बहरला ,उंच झाला ,समोर गेला अशी असूया बाजूच्या मोठ्या जास्वंदीलाही वाटली नाही.
खरोखर झाडे ,पशुपक्षी ,एकूणच निसर्ग यांच्याकडून किती शिकण्यासारखे आहे ना ?
मानवाला उगाच वाटते की तोच चराचरातील सर्वोत्तम घटक आहे !
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Saturday, July 7, 2018

#सहजोक्त.


पुन्हा झाडाख्यान ...
माझ्या कॉलोनीतच माझे घर न् माझं माहेर आहे. त्यामुळे जन्मापासून मी इथेच राहाते. माझ्या लहानपणापासून आठवते की माझ्या माहेरी अंगणात पारिजातक ,लालचाफ़ा ,पांढरा देवचाफा ,आईस्क्रिम फ्लॉवर ,बटमोगरा , लाल एक्झोरा ,पिवळा एक्झोरा ,गुलबाक्षी ,काटेकोरांटी,अबोली ,चमेली ,
मोगरा ,गुलाब ,शेवंती ,मधुमालतीचे मोठे झाड तर मागच्या अंगणात जास्वंद ,अडुळसा ,शेवगा (मुंगणा) ,बेल ,डाळिंब ,स्वस्तिक अशी झाडं होती.
उन्हाळ्यात मी ,मीरा ,अपू मागच्या अंगणात स्वस्तिक व जास्वंदाच्या झाडाखाली खेळायचो.
वेग-स्पर्धा याचा स्पर्शही आमच्या बालपणी आम्हाला नव्हता. श्रावणापासून ते अश्विन महिन्यातील भुलाबाई पर्यंत या फुलझाडांची फुले व पत्र्या म्हणून पाने सतत लागायची. ही झाडं छान परिचयाची झाली आहेत लहानपणापासून !
आज आठवायचे कारण ,बरेच दिवसांनी आईकडे फुरसतीत गेली होती.
दाराजवळ असलेले डेरेदार मधुमालतीचे झाड बहरून आले आहे. दार उघडून आत शिरतांना ते झाड
 येणा-या  जाणा-यांवर फुलं उधळते. पांढरी नाजुक फुले ,त्याचा मस्त-धुंद सुगंध अन् त्या फुलांवर दिवसभर रुंझी घालणारे भुंगे नि फुलपाखरे  !
आज ते झाड  तसेच बहरलेले पाहिले अन् बालपण आठवले.
  • ©डॉ. प्रज्ञा देशपांडे. 

Thursday, July 5, 2018

#सहजोक्त..


मय्या मोरी....२
बाळकृष्ण ,नटखट कन्हैय्या ,यशोदेचा कान्हा म्हणजे जनमानसावर गारूड करणारं दैवत. कृष्ण देव आहे ,कृष्णकथा धार्मिक वाङ्मय आहे ; इत्यादी सारे मान्य वा अमान्य  केले तरी ; त्याचे प्रत्येक वयातील वेगवेगळे वर्तन ,त्याच्या बद्दलच्या कथा मनाला प्रभावित करतातच. कृष्णाचे बाळरूप तर मनमोहक ,आल्हादक वाटते. कृष्णाचे बाळरूप इतके लोकप्रसिद्ध आहे की त्याच्या कथेवर टिव्ही मालिका ,चित्रपट इतकेच नाही तर सोशलमिडिया ,युट्य़ूब आदी सगळी कडे कृष्णाचे आख्यान ,कथा , विविध रूपात दिसत असतात.
कृष्णाच्या त्या बाललीला कितीही वेळा ,कोणत्याही स्वरूपात ऐकल्या वा पाहिल्या तरी आवडतातच .
कृष्णाच्या बाललीलांवर प्रत्येक भाषेत ,विपुल साहित्य निर्माण झाले आहे.
कृष्ण एक सावळा , चंचल , हजरजबाबी व बुद्धिमान  बालक आहे. तो तसा वसुदेव-देवकी यांचा मुलगा ;यशोदा-नंद यांनी त्याला वाढवले.
लहानसा कृष्ण, गायी चरायला ,आपल्या सवंगड्यांना घेऊन  वनात जात असे. गरीब घरातले न् कृष्णावर अतोनात विश्वास असलेले ते बाळगोपाल ,कृष्णाला तारणहार समजून  सगळ्या अडचणी ,दुःख त्याला सांगत. तोही यांच्यासाठी  क्षमतेहून जास्त प्रयत्न करी न् त्यांचा विश्वास अबाधित ठेवी.
प्रत्येकालाच हवीहवी अशी अवखळ ,निरागस ,उत्साही बाल्यावस्था कृष्णचरित्रात अनुभवायला मिळते.



काल ऐकलेले कृष्ण भजन ,कृष्णलीलांसाठी तर आहेच पण मानवी भावभावनांचे मनोमय वर्णन यात केले आहे.

मैया मोरी मै नहि माखन खायो
मैया मोरी मै नहि माखन खायो |
भोर भयो गैयन के पाछे, मधुवन  मोहे पठायो ।
चार पहर बंसीबट भटक्यो, साँझ परे घर आयो ॥
मैं बालक बहियन को छोटो,छींको किहि विधि पायो ।
ग्वाल-बाल सब बैर परे हैं,बरबस मुख लपटायो ॥
तू जननी मन  की अति भोरी, इनके कहि पतिआयो ।
जिय तेरे कछु भेद उपजिहै है, जानि परायो जायो ॥
यह लै अपनी लकुटि कम्बलिया, तुने बहुतहि नाच नचायो ।
'सूरदास' तब हँसी जसोदा, लै उर कंठ लगायो ॥

कृष्ण व बाळगोपाळांच्या खोड्यांनी बेजार गोपिका ,यशोदेला येऊन त्याच्या कागाळ्या सांगतात. वैतागलेली ,चिडलेली यशोदा बाळकृष्णाला रागावते ,शिक्षा करते. या भजनात  ती त्याला ,"तू लोणी कां चोरलेस ?" विचारते. खरे तर त्याने चोरी केली आहेच . पण तरी तो म्हणतो ,"मी चोरी केली नाही "!
मग काय ? आपले निर्दोषत्व सिद्ध करायला लहानसा ,गोजिरा ,निष्पाप  चेह-याचा बाळकृष्ण एकटाच स्वतःची वकिली करतो आहे.
पहिला तर्क देतो की ,"मला भल्या पहाटेपासून गायी घेऊन तू मधुवनात पाठवते ,पूर्ण चार प्रहरभर  वंशीवटाच्या जवळ मी भटकतो.अगदी सायंकाळी घरी परततो. (प्रहर म्हणजे साधारण तीन तास . दिवसरात्र म्हणजे अष्टोप्रहर त्याला अर्धावेळ म्हणजे चारप्रहर  )
इथे कृष्ण सहानुभूती  मिळविण्याचा प्रयत्न करतो आहे की मी बिचारा ,प्रचंड कष्ट करतो ,राबराब राबतो ,मला वेळच कुठे आहे ,भानगडी करायला ? .
पहिला लाडीगोडीचा प्रयत्न यशोदेला तितकासा प्रभावित करीत नाही.
मग दुसरा डाव वकिली डावपेचाप्रमाणे ,अधिक भावनिक.  "अग आई ,मी वयाने लहान ,माझे बाहू छोटे-छोटे  ,उंच लटकवलेल्या शिंक्यतलं लोणी मी कसं बरं काढू शकणार  ? अग ही बालगोपाल मंडळी माझा राग करतात ,वैर धरतात ; बघ ना माझं तोंड त्यांनी उगाच लोण्यानी माखलं ,मला फसवायला. "
प्रत्यक्ष तोंडाला लोणी लागले आहे ,चोरी तर केलीच आहे पण एकदा "नाही केली" म्हटले ना ; मग तेच खरे करून दाखवायचे !  "मी बिचारा साधाभोळा ,छोटासा ,निरागस !बाकीची मित्रमंडळी जळतात बघ  ! उगाच फसवतात ग "!
पुन्हा य़शोदेला भावनिक साद . तरी 'बात कुछ बनी नही ।'
मग तिसरी चाल ! आता आईला पटवायचेच !! म्हणतो कसा ,"आई ,तू ना मनाची फारच भोळी आहेस . कोणाच्याही म्हणण्यात लगेच येते" असं बोलूनही आई हवी तशी पटली नाही. मग काय ? सरळ वारच ! "जाऊ दे ,तुझ्या मनात माझ्यासाठी प्रेमच नाही आहे ,तू मला तुझा सख्खा समजत नाहीच ;तसाही मी तुला परकाच आहे ,जा !!!"
इतके बोलून थांबला नाही तर पुढे अजून म्हणतो कसा ? "जा मग ,घे परत ; तू दिलेली काठी नि घोंगडी !  आजवर फार नाचवलस तू तुझ्या तालावर !!"
अन् ते गोड-गोजिरं बाळ फुरंगटून बाजूला उभं राहिलं !!
स्वतःचे निर्दोषत्व सिद्ध करायला निघालेला कान्हा तिच्या ममतेवरच प्रश्न चिह्न लावतो आहे ,वर बालसुलभ भोळेपणाचा आव !
 खरं काय आहे ? हे जाणणारी  मातृहृदयी यशोदा हसली न् त्याला आपल्या कुशीत घेऊन गळ्याशी बिलगून घेतले .आपल्या कृतीतून त्याच्या सगळ्या आरोपांचे खंडण केले तिने.
 हे भजन कृष्णाच्या बाळलीलेवर आधारित आहे .पण मानवी स्वभावाचे कंगोरे चपखल दर्शवणारे आहे. लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सारेच जण कधी ना कधी स्वतःला वाचविण्यासाठी असे बहाणे ,कांगावे ,हतखंडे ,डावपेच वापरतात तेव्हा मनात येते ,"मैय्या मोरी......मै नही माखन खायो !"
 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Wednesday, July 4, 2018

#सहजोक्त.


मय्या मोरी -१
आज सकाळी एफेमबँडवर अनुप जलोटाच्या आवाजातील भजन ऐकायला मिळाले. अनुप जलोटाचे गाण्याच्या मध्ये मध्ये कडव्यांबद्दल
निवेदन . आहहा सकाळ  छानच उगवली म्हणा .
गाण्यातील भाव ,सूर-ताल तर उत्तमच आहे. तो तर आवडतोच मला; पण
 "शब्द धन आम्हा शब्दची सामर्थ्य ।
 शब्दांनीच होई जीवन हे सार्थ "॥
 अशी वृत्ती असल्यामुळे ; शिवाय कोणत्याही काव्यातून ध्वनित होणारे अर्थ शोधण्यात मौज वाटते. मग काय ? सकाळी सकाळी आवडतं गाणं न् दिवसभर चिंतायला नवा विषय ! आज "मजा आ गया।"
मैया मोरी मै नहि माखन खायो
मैया मोरी मै नहि माखन खायो |
भोर भयो गैयन के पाछे, मधुवन  मोहे पठायो ।
चार पहर बंसीबट भटक्यो, साँझ परे घर आयो ॥
मैं बालक बहियन को छोटो,छींको किहि विधि पायो ।
ग्वाल-बाल सब बैर परे हैं,बरबस मुख लपटायो ॥
तू जननी मन  की अति भोरी, इनके कहि पतिआयो ।
जिय तेरे कछु भेद उपजिहै है, जानि परायो जायो ॥
यह लै अपनी लकुटि कम्बलिया, तुने बहुतहि नाच नचायो ।
'सूरदास' तब हँसी जसोदा, लै उर कंठ लगायो ॥

सूरदासाची ब्रजभाषा आहे. मराठीची जशी प्रमाण मराठी न् व-हाडी , खानदेशी ,बंजारा बोली असातात तशी हिंदीसुद्धा आपण ऐकतो ,बोलतो ती प्रमाण हिंदी-खडीबोली तर अवधी ,ब्रज,मैथिली या तिच्या बोली भाषा आहेत. बोली भाषेला एक प्रकारचा ठसका न्  गोडवा असतो. या गाण्यातही तो जाणवतो.  यातले काही शब्द तर संस्कृतशी साधर्म्य बाळगणारे दिसतात ठळकपणे.
 जसे
  >पाछे
 पश्चात् (संस्कृत ) > पच्छ (अपभ्रंश) >पाछे (ब्रज) पिछे (हिंदी)
 किहि >
 किं हि (संस्कृत )>  किहि (ब्रज)> किस(हिंदी)
 पतिआयो>
 प्रत्यय= विश्वास (संस्कृत )> पत्यय (अपभ्रंश) पतिआय (ब्रज)
 उपजिहै >
 उपजायते (संस्कृत ) > उपजिहै (ब्रज) >उपजा  है (हिंदी) >उपजला (मराठी )
 लकुटि>
 लकुटः (संस्कृत )> लकुटि (ब्रज)> लाठी (हिंदी/मराठी)
भाषा-अंतर काळाच्या अोघात होत जाते ; काळाच्या अोघात मधल्या कड्या लुप्त होतात. कालाय तस्मै नमः।
हे भजन आवडायचं अजून एक कारण म्हणजे त्यातील  मानवी भावनांचा मनोव्यापार ! त्यावर पुढच्या भागात लिहीन .
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.


Tuesday, June 26, 2018

#सहजोक्त.


सोशल मिडियावर खुसखुशीत मेसेज येतात .कोण कर्ता ,कोणाची रचना हे कळायला मार्ग नाही.पण खरोखर त्या अज्ञात कर्त्यांना सादर नमन !
इकडे घटना घडली न् घडली लगेच समर्पक व अत्यल्प शब्दात प्रतिक्रिया तयार.
कालचेच बघान‍ा ! प्लास्टक बंदी झाली नि मेसेजेस इकडून तिकडे हास्य लकेर फैलावत दरवळू लागले.
स्थान -काळ-वेळ-जनमानसाची पूर्ण जाणीव ठेवणारे हे संदेश खरोखर मार्मिक असतात. कोल्हापुरच्या नावाने गाडीला कॅरीबॅग अडकविण्याचा धमकीवजा संदेश तर पुण्याच्या नावाने प्लास्टिकवर कापडीपिशवी कव्हर शिवून देण्याचा संदेश !
वडसावित्री निमित्त नवरा-बायको नावाच्या एव्हरग्रीन नात्यावर तिरकस संदेश !
दहावी-बारावीच्या वाढीव गुणवत्तेवर स्तुतिपर वा व्यंगात्मक संदेश ; जसे ,आमच्या काळी इतका ताप यायचा ,आता परसेंट मिळवतात.  जुने पैसे जसे आज रुपये तसे आमचे जुने मार्क आज भारी समजा !!इत्यादी.
मध्यंतरी भारतीय चलनात पहिल्यांदाच दोनशेची नोट आली . त्यावर खासच मिश्किल विनोद ,की जुन्या जावायांसाठी विशेष व्यवस्था केलीय. शंभर देणे बरे दिसत नाही न् पाचशे देणे बरे वाटत नाही !!
असे अनेक  विषयांवरचे विविध संदेश निनावी इकडून तिकडे पाठवले जातात.
थोडेही बरे केले की हातभर  श्रेय घेण्याची अहमहमिका असलेल्या या प्रसिद्धिलोलुप जगात स्वतःचे नावही न सांगता लोकरंजन ,प्रबोधन करणारे असे निनावी संदेश वाचले की मनापासून आनंद होतो.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे. 

Monday, June 18, 2018

#सहजोक्त.


आमच्या लहानपणी सगळ्या घरांच्या कुंपणाला हिरवीगार , कडवट वासाची बागड  ऊर्फ मेंदी असायची. भींतीसारखी जाड ,हिरवीकंच राखण्यात गृहस्वामीचे कौतुक असे . सरसकट सगळ्यांचे जीवन सायकल सारखे विना प्रदूषण ,विना आवाजाचे अन् स्वतःच्या कुवतीच्या गतीने पुढ सरकणारेे होते. कुठेच कर्णकटू भोंगे वा अोव्हरटेक नव्हते. वेगाचा उन्माद नव्हता.
जाड भींतीसारख्या बागडीतून अंगणातले
आवाज ,अंधूक दृश्य रस्त्याहून दिसे न् घराच्या अंगणातून रस्त्यावरचे सारे दिसे.लाकडी फाटकाशी उभे राहिले तर सरळ मागच्या अंगणात काय सुरु आहे हे दिसणार ! इतकी सरळ ,पारदर्शी गृहरचना सगळ्यांचीच होती.  न मागता सर्वत्र  ट्रांसपरेंसी हेच त्याकाळाचे व्यवच्छेदक लक्षण .  सायंकाळी उन्हं  उतरल्यावर अंगणात पाणी शिंपडतांना मेंदीवरही शिंपडायचे. गार झुळूक अोघाने यायची.
दुपारी बक-या पाळणारे कळप घेऊन समोरच्या मैदानात येत. बक-यांना ,गाई-म्हशींना ही बागड खाद्य म्हणून चालत नसे कदाचित तिचे वेगळे कडवटपण कारण असावे. मग असे मेंढपाळ त्या मेंदीवर पिवळ्या रंगांचे वायर सारखा  वाढणारा पशुखाद्य असा  अमरवेल टाकायचे. त्या हिरव्याकंच बागडीवर पिवळाजर्द तो वेल ; रंगसंगतीनुसार तसा छानच दिसत असे. आम्ही वायर म्हणून अोढून खेळायचो त्याच्याशी. या हिरव्या बागडीला उग्रवासाची पांढरी फुले यायची . त्या फुलांचा गजरा कोणीच घालत नसे कारण त्या फुलांमुळे डोक्यात उवा होतात असा समज! या पिवळ्या वायरवेलालाही पांढरट तुरा येऊन बहार यायचा.
या पिवळ्या वेलीमुळे बागड सुकते ,पिवळीवेल परजीवी तर आहेच पण ज्यांच्या जिवावर जगते त्यांना जगू देत नाही ,त्यांचा जीवनरस शोषून घेते असा अनुभव आहे. म्हणून मोठी जाणती माणसं या पिवळ्या वायरीला खेचून काढायचे.
बरेच दिवसांनी बाळपणीचा हा अनुभव  दृष्टांतासारखा सुचला काही प्रसंगावरून  ! चालायचेच  !!!
बागड ,अमरवेल , मेंढपाळ ,गृहस्वामी , रंगसंगतीने डोळ्यांना सुख वाटणारे आमच्या सारखे दर्शक  आदी सगळे *जीवो जीवस्य जीवनम्।* साधणारे घटक
 होय ;  हे मात्र निर्विवाद !
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Friday, June 15, 2018

#चित्रकविता.


खरे तर तू भासच असावा
जरी  जाणवतो सर्वत्र मला
प्रत्यक्ष आहे कुठे  ठिकाणा
म्हणवीशी तरी अंतरात्मा ॥
 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे

Wednesday, June 6, 2018

#चित्रकविता.


किती बरे करावा मनापासून धावा?।
कधी पावशील सांग ना मला तू देवा ?।

श्रद्धेमध्ये खोट नाही ,नाही खंड तपात।
सातत्याने ध्यानीमनी मग्न मी जपात ॥

तुझेच काय चुकते जरा  बघ बरं एकदा
किती काळ तिष्ठवशील असे तू अनेकदा ?।

देव आहे ठिक ,मान्य पसारा तुझा मोठा ॥
सावरता ही येत नाही  तर मिरवतो कां ताठा ?।

कां म्हणून भान दिले जगण्याचे आम्हाला ?।
तुझ्याविना जगण्यापेक्षा मरण धाड मला ॥

चराचरात व्यापला आहेस ,सांगू नकोस मला ।
असशील खरा देव  प्रकटून सोबत कर आम्हाला ॥

@डॉ.प्रज्ञा देशपांडे.

Tuesday, May 29, 2018

#सहजोक्त.


ये नाम केचिदिह न प्रथयन्त्यवज्ञां
जानन्ति ते किमपि तान् प्रति नैष यत्नः।
उत्पत्स्यते तु मम कोऽपि समानधर्मा
कालो ह्मयं निरवधिः विपुला च पृथ्वी।।
भवभूतीच्या उत्तररामचरितम् मधील हा श्लोक निराश परिस्थितीतही आशावाद जागवणारा विचार मांडतो. श्लोकाचा अर्थ असा की जे कोणी आमचा अवमान करतात त्यांनी हे समजून घ्यावे की त्यांच्यासाठी आम्ही हे करीतच नाही अाहोत. काळ अनंत आहे न् पृथ्वी विपुल आहे.नक्कीच माझ्या सारखा समानधर्मी उत्पन्न होईलच.
 भवभूती सारख्या महाकवीला असं कां म्हणावेसे वाटले असेल ??
नागपुरात जुन्या पिढीत डॉ.ब.स.येरकुंटवार नावाचे प्रखर विद्वान होते. विद्वत्ता न् लोकप्रियता नेहमीच समप्रमाणात असेल असे नाही . किंबहुना व्यस्तप्रमाणात अधिक असते. ब.स. येरकुंटवारांच्या विद्वत्तेच्या पासंगालाही न पुरणारे अनेक जण त्याक‍ाऴी विद्वत्प्रिय होते.
अंबादास शास्त्री पांडे म्हणजे पांडे गुरुजी,गाढे वैय्याकरणी. कोणत्याही संस्कृत विद्वानाने नतमस्तक व्हावे असे व्यक्तिमत्व. विद्यादान(कोणतेहि  शुल्क न घेॆता) करण्याचे व्रत त्यांचे. सायंकाळी चार ते सहा कोणीही विद्यार्थी आला तर त्याला समभावाने शिकवणार. नुकतेच संस्कृत  शिकणा-या लहानग्यापासून तर सेवानिवृत्तीला आलेल्या प्राध्यापकांपर्यंत कोणीही आले तरी तितक्याच जिव्हाळ्याने शिकवणार. निस्पृह न् प्रसिद्धी पराङ्मुख ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व . कधीच कोण्या विद्वत्सभेत वा चर्चासत्रात गेले नाहीत.
असे अनेक सरस्वतीपुत्र अज्ञात राहून ,लक्ष्मीकडे पाठ करून केवळ ज्ञानसाधना करीत असतील ; माहित नाही.
आज सोशलमिडियामुळे व्यासपीठांचा सुकाळू झाला आहे. जेवढे बहुसंख्य व्यासपीठं त्याहून अधिक शब्दप्रभू ,महाकवी ,रससिद्ध लेखक ,युगातील थोर कलाकार ,नटसम्राट वगैरे वगैरे निर्माण झाले आहेत.अनेक समूह ,मंच ,संस्था सुरू होऊन सुजाण ,संवेदनशील ,रसिक ,दर्दी श्रोते ,प्रेक्षक  ,प्रोत्साहन देणारे ,दाद देणारे आश्रय दाते तयार झाले आहेत. हे सारे असून देखील काही तरी  कमी आहे.
गट-तट ,कळप-कोंडोळे करून ,"अहो रूपम् अहो  ध्वनिः ।" करत असतात. अशा व्यासपीठांच्या ठेकेदाराशी जुळून घेतले तर मग तुम्ही  महान् ! नाही तर कस्पटासमान !! मानव हा सामुहिक प्राणी आहे. त्याचा हा परिणाम असेल काय ? ठेकेदारांना अमान्य असलेल्यांमध्ये प्रतिभेचा दुष्काळ असतो कां? सतत झगमगाटच दिपवण्यास हवा कां ? संथ ,सोज्वळ,मंद ज्योत कुचकामीच ठरावी कां ? प्रश्न.प्रश्न .प्रश्नमालिका !!!
भवभूतीच्याही वेळी असेच असेल कां ??
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

#शब्दचिंतन .

आज लिहिता लिहिता "सोज्वळ"शब्द आला.
हा शब्द मला खूप आवडतो. मराठमोळा सात्विक शब्द . सोज्वळ म्हटलं की घरंदाज ,नीटस ,शालीन असे व्यक्तिमत्व डोळ्यासमोर येते.
सोज्वळ शब्द कसा तयार झाला असेल ? विचार करु लागली. सोप्पा शब्द आहे तसा हा.
स+उज्वळ  असा मूळ शब्द . उज्वळ हा उज्ज्वल शब्दाचे मराठी रूप. उद्+ज्वल् असा मूळ धातू. उज्ज्वल शब्दाचे अजून एक मराठी रूप म्हणजे "उजळ". "ती रूपाने उजळ आहे",या वाक्यातील उजळ शब्द बरं ! 'उजळल्या खूप ज्योती' मधले क्रियापद नाही.
तर सोज्वळ म्हणजे उज्ज्वलते सह ; असा मूळ शब्दानुसार अर्थ होईल . पण रूढार्थ जास्त प्रभावी आहे म्हणून मराठीच्या सोज्वळतेला बाधा नको. सोज्वळ शब्द उजळपणे वापरायला हरकत काय ?
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Sunday, May 27, 2018

#सहजोक्त.



बरेच वर्षांनी बाबांसह प्रवासाचा योग आला. विमानतळावर प्रतीक्षारत होतो. बाबा सांगू लागले की लहानसा सिद्धू (त्यांचा नातू ,प्रबोधचा मुलगा ) सहज सराईतपणे विमान प्रवास करतो. त्याला बेट्याला सवय झालीय ,आमच्या वेळी नव्हतं असं . विषय निघाला ,गप्पा सुरु झाल्या. म्हटलं ,"बाबा  ,आजकाल विमान ,हॉटेल फारच कॉमन आहे . आमच्या लहानपणी तुम्ही आम्हाला रेंगीतून प्रवास करवायचे ,छकड्यातून गावी न्यायचे हेच सुख आज पारखे झाले आहे. आताशा हवेत कोणीही उडू शकतात पण किती जणांना जमिनीवर पाय रोवून चालण्याचे सुख मिळालेय ,मिळतय ,तेच खरे नशीबवान  होय."
बाबा म्हणाले ,"खरय ,जेही समोर आहे त्याचा समाधानाने उपभोग घेणे हेच खरे जीवन!"
त्यांना मग मिलर अॉफ द डे कविता आठवली . ती त्यांनी म्हणून दाखवली. या वयातही बाबांचे पाठांतर आश्चर्यकारक आहे. ती कविता अशी

The Miller of The Dee :
There dwelt a miller, hale and bold,
Beside the river Dee ;
He worked and sang from morn till night-
No lark more blithe than he ;
And this the burden of his song
Forever used to be :
“I envy nobody no, not I -
And nobody envies me !"
“Thou’rt wrong, my friend," said good King Hal,
“As wrong as wrong can be ,
For could my heart be light as thine,
I’d gladly change with thee.
And tell me now, what makes thee sing,
With voice so loud and free,
While 1 am sad, though 1 am king,
Beside the river Dee?"
The miller smiled and doffed his cap,
“I earn my bread," quoth he ;
“I love my wife, I love my friend,
I love my children three ;
1 owe no penny 1 cannot pay,
1 thank the river Dee,
That turns the mill that grinds the corn
That feeds my babes and me."
“Good Friend," said Hal, and sighed the while,
“Farewell, and happy be ;
But say no more, if thoud’st be true,
That no one envies thee ;
Thy mealy cap is worth my crown,
Thy mill my kingdom’s fee ;
Such men as thou are England's boast.
O Miller of the Dee.

या कवितेच आशय कळून मला भर्तृहरीच्या नीतिशतकातील  पुढील श्लोक आठवला .

वयमिह परितुष्टा वल्कलैस्त्वं दुकूलैः
सम इह परितोषो निर्विशेषो विशेषः।
स तु भवति दरिद्रो यस्य तृष्णा विशाला
मनसि च परितुष्टे कोऽर्थवान् को दरिद्रः॥

खरच या जगात श्रीमंत-गरीब ,
स्टँडर्ड-फालतू ,हायफाय-बेकार असे भेद वरपांगी आहेत .  खरा भेद एकच ! मनातून  तृप्त-शांत  अाणि मनातून अतृप्त-बेचैन .
बाकी मिलर अॉफ द डी काय किंवा वल्कलातील संन्यासी काय ? राजाहून तेव्हाही श्रीमंत होते ,आहेत न्  कायमच रहातीलही.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Saturday, May 26, 2018

#चित्रकविता.

#चित्रकविता.
असे दूर तेथे भुईचा किनारा
नभाला उरी जेथ कवळी धरा
तसा स्पर्श तुझा बिलगी मनाला
नसूनि समीप जिवीच्या साजणा॥१॥
रात्रीतूनि ज्या ऊषःकाल समया
कळ्यांचे उमलून फूलांमध्ये ह्या
हळुवार स्पर्शे रविकिरणांच्या
हलकेच  रूपांतर होई पहा ॥२॥
तसे माझिया  रे मनमोग-याला
खुलवी इशारा तुझा राजसा हा
गंधाळूनि मग त्या अंतःकुपीला
स्मृतिगंध दरवळे आसमंता ॥३॥
तुझे माझिया सवे नित होता
मनोमिलन जे स्वप्नीलसे 
धरेच्याही अंगी दिसे तृप्तता
अन् नभाच्या मनाला असे पूर्णता ॥૪॥

©डॉ.प्रज्ञा देशपांडे


Thursday, May 24, 2018

#चित्रकविता.

#चित्रकाव्य.
श्रद्धायुक्त जगण्या इतका  विश्वास देशील ना ?

अंतर्मन तृप्त होईल इतका  घास देशील ना ?

 नित्यानंदे उपभोगावा इतका  श्वास देशील ना ?

 तुझेच नाव शेवटी येईल ,इतका  ध्यास देशील ना ?

सर्व मागण्या पूर्ण करशील इतका  त्रास मी देऊ ना ?।१॥
© डॉ. प्रज्ञा देशपांडे. 

Monday, May 21, 2018

#चित्रिविता.

#चित्रकविता.
हळु मिटावे डोळे ,तुला साठवून या  हृदयात
मुखातून ते नाव स्फुरावे अंगी भिनल्या श्वासात
देहाचे या चंदन व्हावे  झिजूनी तव स्मरणात
तुझ्यामध्ये मी विलीन व्हावे सहज या रमणात ॥१॥
©डॉ. प्रज्ञा देशपांडे

Wednesday, May 16, 2018

#चित्रकविता.

#चित्रकविता.

जेव्हा कधी कानी अंतरीची साद येते
 हृदयातील शब्दसुम अोठातून  उमलते  ॥
रचणे नसते  केवळ, ते तर स्फुरणे असते
हळूवारपणे  चिरंतनाक्षरातून उरणे असते ॥
निमित्त टिकावू नसेल तर शब्दांना  सूज येते
अद्वैतचिंतनाने मात्र शब्दमधुर बाळसे धरते ॥
काव्य-साहित्य सारं काही त्याचेच रूप असते
स्वतःहून स्वतः गवसल्याची ती  खूण असते ॥
खुशाल म्हणोत बापडे कोणी साहित्यरचना त्याला 
पण तो असतो प्रतिसाद दिलेला सादेला आतल्या ॥ 
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Saturday, May 12, 2018

#चित्रकविता


तू-तूू-मी -मी

तू म्हणजे फ़ॅक्टचा पुतळा
तू म्हणजे वास्तवाचा मेळा
मी काय फँटसीची माळा
मी स्वप्नांचा पसारा ॥१॥
तू अफाट कर्तृत्ववान्
तू आहेस रे महान्
मी फावल्या वेळेचा मान
मी रिकामी नि लहान॥२॥
तू अथांग आकाश अनंत
तू दयाळू कृपावंत
मी क्षणिक सुखाची उसंत
मी शांत ,निवांत ,संथ ॥३॥
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.
नागपूर

#सहजोक्त.

#शब्दचिंतन.
बरेच दिवसात खरे तर शब्दचिंतन केलेच नाही. वेगवेगळ्या कामात गुंतले असल्यामुळे डोक्यात आलेल्या शब्दांवर विचार करायला जमतच नव्हते.
माझ्या ब्लॉगचे नियमित व चिकित्सक वाचक डॉ.राहुल यांच्याशी बरेचदा शब्दांबद्दल चर्चा होते. अशाच एका चर्चेतून आजचे शब्दचिंतन करीत आहे.
'ख' हा  एकाक्षरी शब्द आहे.  शब्दकोशात त्याचे अनेक अर्थ दिले आहेत. जसे सूर्य, आकाश,   स्वर्ग,   ज्ञानेंद्रिय , नगर , क्षेत्र , अनुस्वार ,बिंदु , शून्य , छिद्र ,    पोकळ ,  मानवी शरीराची नऊ द्वारं , जखम ,   आनंद , ज्ञान ,  ब्रह्मा इत्यादी.
वर दिलेले अनेक अर्थ असूनही ख म्हणजे आकाश हेच जास्त प्रचलित आहे.
खग  = आकाशात गमन करणारा
खेचर = चआकाशात फिरणारा
इत्यादी शब्द प्रसिद्ध आहेतच.
शंख ,सुख,दुःख  या शब्दात येणा-या 'ख'चा अर्थ काय ?  हे शब्द कसे तयार झाले असतील ?
डॉ.राहुल   त्यांनी सुख-दुःख या शब्दां विषयी  त्यांचे विचार मांडले . त्यांच्या मते सुख म्हणजे आपल्या भोवती  सकारात्मक आकाश तयार होणं तर त्याच्या विपरीत दुःख होय. आपल्या भोवतीचे आकाश शमन (शांत) करणारा  तो शंख.
मी वैय्याकरणी नाही. तसेच शब्दकोशात अशा व्युत्पत्त्या दिसत नाहीत. त्यामुळे खरोखर या शब्दांची व्युत्पत्ती काय असावी बरे ? हा प्रश्न अजून मला अनुत्तरीतच आहे.  शिवाय राहुल यांचे मत  आशयाच्यानुसार एकदम नकारण्या योग्य वाटले नाही.
या त्यांच्या मतामुळे " ख" बद्दल सखोल विचार करावा असे निश्चितच वाटले.

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Friday, May 11, 2018

#सहजोक्त.


कोण कोणापासून काय प्रेरणा घेईल ,हे सांगता येत नाही. गेले अनेक वर्षे मी लिहिते आहे. खरं मी आधी लिहीत नव्हते. एक दिवस अचानक मराठी भाषा या विषयावर लिहून काढलं . तरूण भारतात पाठवलं . चक्क छापून आलं . डॉ. के.रा.जोशींसारख्या विद्वानांनी कौतुक केलं ,हुरुप वाढला न् लिहिती झाली. बरेच वर्षे व विविध नियतकालिकांतून दैनिकातून लेखन केले आहे ,करते आहे. संस्कृतची पुस्तके लिहिली.
एक दिवस सागरने मला ब्लॉग सुरु करून दिला न् मी ब्लॉग लेखक झाले. दैनिकात देण्यापेक्षा ब्लॉगवर प्रकाशित करणं सुटसुटीत वाटू लागले.
सहजोक्त , शब्दचिंतन ,चिंतन ,चित्रकविता या अशा शीर्षकांतर्गत लेखन करू लागले.
लेखन ही माझी ऊर्मी आहे. जेव्हा जसं सुचलं तसं लिहिते. फार ठरवून नसते. अगदी सहज ,आतून आलं की लिहिते.
माझ्या लेखनाने मला तर अभिव्यक्त होण्याचा आनंद मिळतो. वाचकांनाही लेख वाचून आनंद होतो. माझं लेखन वाचून अनेक जणं लिहिती झाली ,ही गोष्ट अधिक आनंद देणारी आहे. काही  जणं ब्लॉगही लिहू लागले. काही जणांनी ते मोकळेपणाने मान्य केले .तो त्यांच्या मनाचा मोठेपणा. मला आनंद यातच की लेखन-वाचन संस्कृतीला जरा हातभार लावण्याचे भाग्य मला मिळाले.
काल सुखद धक्का मिळाला ;जेव्हा मी फेसबुक बघत होते...सहजोक्त शीर्षक दिसले !!! माझी मैत्रिण न् नियमित वाचक सुनिता  हिने छोटंसं ललित मनोगत लिहिलं ; तेही सहजोक्त शीर्षकाने ! कॉमेंटमध्ये तिने सांगितलेही की तुमच्याच प्रेरणेने !!!
कल्पकतेचे,शैलीचे ,आशयाचे ,विचारांचे,लेखनाचे ,शीर्षकाचे , कौतुक होणं  ,प्रसार होणं ,अनुकरण होणं  ही खचितच गौरवास्पद बाब आहे.
अन् याबाबतील मी फारच सुदैवी आहे.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे. 

Thursday, May 10, 2018

#सहजोक्त.

#सहजो्क
तीन सव्वातीनची वेळ.नागपुरी उन्हाळ्याची टळटळीत दुपार. कॉलेज संपवून मी शांयपणे कारने घराकडे यायला निघालेली. सवयीचा रस्ता. उन्हामुळे वर्दळ कमी. गाणे ऐकत सावकाश गाडी चालविण्याचा माझा शिरस्ता.  जाटतरोडी भागातील बुद्धविहारापाशी चारपाच गावराणी कुत्रांचा गोंगाट सुरु होता. मला वाटलं ,आपापसात भांडत असतील. पण बघितलं तर ते सगळे मिळून एका बकरीच्या छोट्या पिल्लाच्या मागे लागले होते. न् ते पिल्लू जिवाच्या आकांताने अोरडत पळत होते. कुत्रे त्याच्या मागेच. माझी कार जरा समोर गेलेली. मी करकचून ब्रेक दाबले. कार बंद केली. बघते तर समोर एक व्यक्तीही बाईक वळवतच होता त्या पिलाच्या केविलवाणा अावाज ऐकून . तोच म्हणाला ,"ताई ,थांबा तुम्ही ,मी बघतो".
मी थांबून बघतेय.
 ते दोन ते तीन मिनिटं .....माझा थरकाप उडालेला. भयंकर क्रौर्य दिसलं त्या जनावरांमध्ये... .बघवत नाही असं अमंगळ, हिंसक दृश्य....
 मी थांबलेलीच होती. वस्तीतले काही जण धावले न् कुत्रांना पिटाळून लावले. ते बघीतले न् मी परत निघाली माझ्या घराकडे.
 माझ्या साठी हे सारं अकल्प ,अघटितन् आकस्मिकच होते. अजूनही त्या पिलाचा भेदरलेला चेहरा डोळ्यासमोर येतो न् भयग्रस्त ,असहाय वाटतं......
 कोणत्याही निरागस जीवाला सुखाने जगता यावे हीच नियंत्याला प्रार्थना !
 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

#सहजोक्त.

#सहजोक्त.
केवढे हे क्रौर्य! - ना.वा.टिळक
मला जे काही मोजके कवी आवडतात ,
त्यात ना. वा. टिळक हे एक आहेत.
 संस्कृतप्रचूर शब्द असूनही कविता बोजड न होता तरल संवेदनशील असणं हे त्यांचं वैशिष्ट्य. टिळकांच्या काही कविता मनाला भिडतात. टिळकांच्या कवितांशी परिचय झाला तो माझ्या बाबांमुळे. त्या कवितांचे रसग्रहण न् बाळपणीच्या आठवणी हे एक अतुट मिश्रण आहे.

आमच्या लहानपणी  टिव्ही ,सोशलमिडिया नव्हते हे आमचं सुदैवच !  उन्हाळ्यात परीक्षा संपल्यावर आम्ही भावंड खेड्यावर जात असू. तिथे  वीजही अनियमित असे. सकाळ ,संध्याकाळ  (दिवेलागणी पर्यंत ) आम्ही ,गावात ,देवळात ,शेतात मनसोक्त हुंदडायचो. पण दुपारी मात्र आई घरातच ठेऊन घेत असे. मग अष्टाचंगापो ,व्यापार ,पत्ते असे खेळ घरबसल्या खेळायचे. गाण्याच्या ,गावांच्या नावांच्या भेंड्या खेळायचे. नाव-गाव-वस्तु-प्राणी-अडनाव हा खेळ खेळायचा. कधी कधी बाबा गोष्ट सांगायचे.
घरात एका अोसरीत ,शेतातील आमराईतील आंब्यांचा माच पसरलेला असे; तर एका बाजूनी कांदे पसरलेले असे. माचातून आज रस करण्या योग्य आंबे वेगळे काढणे हे ही मुलांची सकाळची कामं .  तसेच कांदे फेरणे ,म्हणजे खालचे वर करुन जास्तीची साल काढणे हे दुपारचे काम. वेळ जात नाही ,बोअर होतं ; हे शब्दच आमच्या गावी नव्हते.
एकदा आंब्याचा रस ,बटाटेवडे ,वरणभात , भाजीपोळी असं मनाजोग  जेवण झाल्यावर आम्ही तिघं भावंड ,बाबांच्या कुशीत अोसरीत दुपारी पाळण्यावर आडवे झालो. बाबांना त्यादिवशी काय सुचलं ,माहित नाही .त्यांनी टिळकांची एक कविता म्हणून दाखवली.ती कविता इतकी भावस्पर्शी होती की ती ऐकून आम्ही रडायलाच लागलो. पुढे दोनतीन दिवस त्या कवितेचा प्रभाव मनावर होता.
 बाबांची ती स्पष्ट आवाजातली वृत्ताच्या चालीतील  कविता आजही कानात जशीच्या तशी जाणवते.

क्षणोक्षणी पडे, उठे, परि बळे, उडे बापडी,
चुके पथहि, येउनी स्तिमित दृष्टिला झापडी.
किती घळघळा गळे रुधिर कोमलांगातुनी,
तशीच निजकोटरा परत पातली पक्षिणी.

म्हणे निजशिशूंप्रती, अधिक बोलवेना मला,
तुम्हांस अजि अंतीचा कवळ एक मी आणला,
करा मधुर हा! चला, भरविते तुम्हा एकदा,
करी जतन यापुढे प्रभु पिता अनाथां सदा!

अहा! मधुर गाउनी रमविले सकाळी जना,
कृतघ्न मज मारतील नच ही मनी कल्पना,
तुम्हांस्तव मुखी सुखे धरुन घांस झाडावरी
क्षणैक बसले न तो शिरत बाण माझ्या उरीं

निघुन नरजातिला रमविण्यांत गेले वय,
म्हणून वधिले मला! किती दया! कसा हा नय!
उदार बहु शूर हा नर खरोखरी जाहला
वधुनी मज पाखरा निरपराध की दुर्बला!

म्हणाल, भुलली जगा, विसरली प्रियां लेकरां
म्हणून अतिसंकटे उडत पातले मी घरा,
नसे लवहि उष्णता, नच कुशीत माझ्या शिरा,
स्मरा मजबरोबरी परि दयाघना तो खरा.

असो, रुधिर वाहुनी नच भिजो सुशय्या तरी
म्हणून तरुच्या तळी निजलि ती द्विजा भूवरी.
जिवंत बहु बोलकें किति सुरम्य ते उत्पल,
नरे धरुन नाशिले, खचित थोर बुध्दिबल.

मातीत ते पसरिले अतिरम्य पंख,
केले वरी उदर पांडुर निष्कलंक,
चंचू तशीच उघडी पद लांबवीले,
निष्प्राण देह पडला! श्रमही निमाले!

शालेय शिक्षणात  ही कविता आम्हाला नव्हती. पण यातील कही कडवे स्वभावोक्ती,यमक ,वृत्ताचे उदाहरण म्हणून काही कडवे मात्र चाफेकर बाईंनी शिकवले होते.
नेटवर काही संदर्भ शोधताना अवचित ही कविता दिसली अन्  डोळ्यासमोर सारं तराळले.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Sunday, May 6, 2018

#चित्रकविता.

#चित्रकविता

*दगडाला देव मानलं*
तरी  ठेच लागणं नाहीच सुटणार .

कधी पाझरला जर तो
.तृषा अनेकांची शमवणार

कोरले त्याला छिन्नी हातोड्याने
तर सुबक मूर्ती  घडेलही

पण दगडाचेच हृदय त्याचे
कधीच  धडधडणार नाही
कधीच स्पंदणार नाही....?


© डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Saturday, May 5, 2018

#चित्रकविता.

#चित्रकविता.

मिलन अपुले अजून स्मरते
 आजच घडले असे भासते
स्मृतीतुनि नि भासातूनि जे
मनःपटलावर चिर कोरले

 सारे विश्वही शून्य जाहले
निराकार जे आकारी आले
संसार म्हणा वा माया असू दे
भास हा जरी, वास्तव वाटे

क्षणी विश्व हे हरवून गेले
नवे असे जे काही गवसले
तू-मीपण  ही लयास गेले
जेथ मनांचे मिलन घडले

बीज नुरोनि वृक्ष होतसे
थेंबातून जलाशय साचे
तैसे मीपण त्वात मिळाले
द्वैतातुन अद्वैत जाहले

©डॉ. प्रज्ञा देशपांडे.








Sunday, April 29, 2018

#सहजोक्त.

#सहजोक्त.
आज बुद्धपोर्णिमा. सिद्धार्थ गौतमाला संबोधी प्रप्त झाली ती वैशाख पोर्णिमेला. म्हणून तिला बुद्ध पौर्णिमा म्हटले जाते.
बुद्धाची शिकवण ज्यात संग्रहीत केली आहे ते त्रिपिटक होय त्रिपिटक . त्रिपिटकाची भाषा रसाळ असून त्यात वास्तवाचा गंध आहे.मला त्रिपिटकाचे सुत्तपिटक  जास्त भावते. धम्मपद माझा आवडता ग्रंथ.
बुद्धाच्या जीवनात अनेक पाडाव आले. त्या त्यावेळी ते कसे वागले हे चिंतनीय व अनुकरणीय आहे. बुद्धाच्या अनेक जीवनकथा मला आवडतात. त्यातील एक येथे सांगते.

सिद्धार्थ गौतम जेव्हा बुद्ध झाले तेव्हा त्यांनी पंचवर्गीय भिख्खूंना प्रथम बौद्ध धर्माची दीक्षा दिली. तेच पहिले धम्मचक्कपवत्तन होय.  त्यांचा प्रभाव महान होता. मग जगाला उपकारक असा हा धर्म वाढविण्यासाठी भगवान फिरू लागले.
एके ठिकाणी दोन काश्यप भाऊ नदीच्या वरच्या व खालच्या भागात  आश्रम करून रहात होते. एकाचे ३०० शिष्य होते तर दुस-याचे २००. भगवान ३०० शिष्य असलेल्या भावाकडे गेले. त्याला भगवन्तांचा महिमा माहीत होता. पण त्याला ते उघड मान्य करायचे नव्हते.आपल्या शिष्यांना भगवन्तांच्या प्रभावात येऊ द्यायचे नव्हते. आलेल्या अतिथींचा सत्कार करणे तर कर्तव्यच होते. मग या काश्यपाने भगवंतांना  रात्री अशा ठिकाणी झोपायला  पाठवले जेथे महाभयंकर सर्पराज येत असे व झोपलेल्या व्यक्तीला मारून टाकत असे.
काश्यपाला वाटले की परस्परच गौतमाचा डाव संपेल . त्याचे विचार जाणून भगवान मनात हसतात. रात्री त्यांच्या प्रभावाने सर्पराज शरण येऊन नमन करून कायमचा ते स्थान सोडून गेला. तीन दिवस तेथे राहूनही भगवंतांना काहीही झाले नाही हे पाहून तो मनात चरकला . विचार करू लागला ,"नक्कीच हा मामुली माणूस नाही पण माझ्या इतका मोठाही नाही ". याचे मनातील भाव जाणून भगवान फक्त हसले.  मग भगवान ध्यान करण्यासाठी नदीवरून चालत जाऊन शिळेवर जात असत. हाही चमत्कार पाहून काश्यप मनात म्हणतो ,"नक्कीच हा मामुली माणूस नाही पण माझ्या इतका मोठाही नाही ".भगवान पुन्हा मूक हसतात.
अशा प्रकारे भगवान त्याला अजून चमत्कार दाखवतात पण तो मनातून भगवंतांना थोर मानतच नाही.
शेवटी भगवान मनात ठरवतात की "मूर्खाला त्याच्या मूर्खपणाची जाणीव करून द्यायची वेळ आली आहे." मग  त्याच्या सर्व शिष्यांसमोर त्याची कान-उघाडणी करतात.  मग तो काश्यप त्याच्या ३०० शिष्यांसह बौद्ध धर्माचा स्वीकार करतो.

ही कथा मला आवडते कारण आहिंसावादी भगवान बुद्धसुद्धा काश्यपाला स्पष्ट  सुनवतात .
कधी कधी समोरच्याला त्याची पायरी  वेळीच जाणवून द्यावी . पुढील अनर्थ त्यातून टळतात.
आजच्या दिखावू जगात ही शिकवणूक फारच उपयुक्त आहे.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे

#सहजोक्त.

#सहजोक्त.
झाडाख्यान..३.

आजी (पितामही) लहानपणी एक गोष्ट सांगायची.
फार फार पूर्वी एक राजा होता. तो सगळ्या प्रजेसाठी अतिशय आदराचे व जिव्हाळ्याचे स्थान होता. त्याचा एक शाही हज्जाम म्हणजे राज-नाभिक म्हणजे राजाचा न्हावी होता.  दर आठ दिवसांनी तो न्हावी राजाकडे येई आणि अगदी एकांतात त्या राजाचे केशकर्तन-दाढी-मिशी आदी कार्य करीत असे.
पुढे तो न्हावी मरण पावला. वंशपरंपरे नुसार त्याचा मुलगा ,घनु वडिलांचे काम सांभाळायला आला. राजाने त्याला एकांतात बोलावले. राजाने जसा फेटा काढला तस्सा घनु भीतीने अोरडला कारण राजाला दोन शिंग होते.इतके दिवस हे गुपित राजा व घनुचे बाबा यांच्यातच होते. आता ते घनुला
कळले  होते. राजाने त्याला धमकी दिली की ,'जर गुपित उघड झाले तर  मृत्यूची शिक्षा देईल'.
घनु आधीच बोलघेवडा . सगळ्या गोष्टी भडभड सा-यांना सांगणारा. आता त्याला हे गुपित पोटात ठेवणे भाग पडले. पण या दबावामुळे तो झुरू लागला. हळुहळू तो सुकू लागला. त्याचे आप्तगण काळजीत पडले. पण घनू कोणाच काही सांगे ना . शेवटी उन्हाळेपावसाळे पाहिलेला एक ज्येष्ठ आप्त म्हणाला "गड्या  ,तुझ्या मनात काहीतरी सल आहे,जो तू उघड करू शकत नाहीस. त्याचमुळे तुझी प्रकृती खालावली. असे कर ,एखाद्या जंगलात जा नि तुझी खंत एखाद्या झाडाला सांग.मग तू मोकळा होशील." घनुला ते पटले. तो गेला . एका झाडाला सांगितले. परतला. ताण उतरलेला घनु पूर्वीसारखा पुन्हा हसरा व बोलका झाला. सगळे आप्तेष्ट आनंदले.
इकडे ते झाड झुरु लागले. हळुहळू ते वाळून गेले. एकदा त्या जंगलातून बजय्ये (वाद्य निर्मिती करणारे) कलाकार जात होते. त्यांना जंगलात सरळसोट पण पार वाळलेेले झाड दिसले. त्यांनी ते नीट कापले. त्यातून त्यांनी ढोलकी-पेटी-सारंगी बनवली. मग त्यांनी वाजवून पाहिली .पेटी वर काहीही  वाजवलं की सुरावट यायची ,राजा को दो सिंग फुटे।" सारंगी वाजवली की आवाज यायचा ,"किन्ने बताया ,किन्ने बताया"। ढोलकीवर थाप पडली की बोल उमटायचे,"घनुनाईने बताया, घनुनाईने बताया."। सगळे कलाकार आश्चर्यचकित झाले.त्यांना कळेच ना ,हे असे कां झाले? आजवर इतकेदा वाद्य बनवून विकले पण असे कधीच अनुभवले नव्हते त्यांनी. ही अजब वाजणारी वाद्य घेऊन ती गावोगाव ,शहरशहर फिरू लागले. लोकांना ती विचित्र वाद्य वाजवून दाखवू लागले. फिरत फिरत त्या राजाच्या राजधानीत आले. वाद्यांतून येणारा स्पष्ट आवाज एकून राजाचे बिंग फुटले. आता ही गोष्ट सा-यांच्या तोंडी झाली. शेवटी राजाने घनुला बोलावले. घनुने हकिकत सांगितली.
आता राजा काहीही करू शकत नव्हता कारण यात घनुचा दोषच नव्हता. .
झाडाला जीव असतो हे तर सिद्धच झालय विज्ञानाने . झाडाला भावना असतात कां?
झाडांना सुख-दुःख ,आपुलकी ,एकाकीपणा असतो कां?
मौखिकवाङ्मयात झाडांच्या मानवी भावनांविषयी कथा आहेत पण प्रमाणसाहित्यात असेच मानतात कां? झाडांना भावना असतात ही कल्पना आहे कां वास्तव ?
"तृण-कोटरात चिमण्यांची शाळा घेऊन निजला अौदुंबर" अशी उदाहरणे काव्यात चेतनगुणोक्ती अलंकाराची मानतात. म्हणजे मानवी भावना झाडांमध्ये नसतात कां?
सकाळी फिरताना एकमेकाला सावरून धरल्या सारखे झाड नजरेला पडले अन् विचार अाले तेच वर मांडले.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

#सहजोक्त.

 #सहजोक्त.
झाडाख्यान.....२
काल शिरीष वृक्ष पाहिला. अन् अनेक आठवणींची मालिका सुरु झाली.
आमच्या कॉलोनीतील घरासमोरच्या मोकळ्या पटांगणात अनेक वृक्ष होते आमच्या लहानपणी. आता मोजके शिल्लक आहेत.काही वर्षांपूर्वी  कॉलोनीत प्रवेश करताच नजेत भरत असे, ते शांत वातावरण ,ती पटांगणातली वृक्षराजी अन् भान हरपून पटांगणात खेळणारे बालगोपाल.
काळाच्या अोघात भरपुर बदल झाले कॉलोनीत पण पटांगणाच्या दोन टोकाला दोन डेरेदार ,घनदाट शिरीष वृक्ष म्हणजे कॉलनीची शानच; आजही तसेच आहेत .
दोन टोकांना असूनही सख्ख्या-मित्राच्या गळ्यात गळा घालून फिरणा-या आनंदी बालका सारखे हे दोन वृक्ष एकमेकांत गुरफटून गेल्यासारखेे . दोघांच्याही फांद्या एमकेकात गुंतल्या आहेत . दोघांचेही आकार ,वाढ साधारणपणे समानच आहे.
लहानपणी झाडाच्या खाली सावलीत तर खेळत असूच आम्ही. पण झाडावर चढून शिवाशिवी खेळाचो. म्हणजे एकदोन साडेमाडे तीन म्हणायच्या आधी  बाकी सगळ्यांनी झाडावर चढायचे न्    एकदोन साडेमाडे तीन म्हटले की राज्य देणा-याने झाडावर चढून पकडायचे. एका झाडावरून चढायचे आणि दुस-या झाडावरून उतरायचे. आजही ही झाडं पाहून ते सगळं आठवतं . अन् आता आश्चर्य वाटतं की आमचे पालक रागवत नव्हते ,अोरडत नव्हते की पडाल ,लागेल वगैरे. मग वाटतं आमची मुलं याच कॉलनीत मोठी झाली पण या पिढीने तसे एंजॉय केले नाही.कारणं काहीही असो.
साधारणपणे दुसरीत असतानाचा किस्सा. एकदा माझा  मावसभाऊ राजेशदादा  त्याच्या मित्रांना सांगत होता की माझी छोटी भावंडहीं या झाडावर चढतात. मग त्यांच्या समोर प्रात्यक्षिक दाखवायला म्हणून मला चढायला सांगितलं  .मी चढून झाडाच्या टोकावर गेली .अन मग  या झाडाच्या फांदीवरून त्या झाडाच्या फांदीवर चढत होते .अचानक् मध्येच मी विचित्र फसली. मला पुढेही जाता येईना न् मागेही. इतक्या टोकावर मी लटकून होती. मला रडायला येत नव्हते. पण खाली जमलेले बघे अोडायला लागले न् मला भीतीने रडू यायला लागले. तितक्यात खालून राजेशदादा अोरडला ,'घाबरू नको मी येतोय.'. आमचा राजेशडदादा म्हणजे आमच्यासाठी त्या बालवयातील निर्भीड लिडर ,कॉलनीतला दादा माणुस!! मग राजेशदादा सरसर वर चढला न् मला नीट सावरलं आणि हळूहळू झाडावरून उतरायला मदत केली. तेवढ्यावेळात मावशी व बाजूचे काही मोठीमंडळी जमली. मावशीने जवळ घेतले. राजेशदादाला रागावली की ,'मुली नाजूक असतात . तिला काही झालं असतं तर ?,तुम्हाला तुमची बहिण नकोशी झालीय कां?' वगैरे.
आजही तो प्रसंग बारकाव्यांसह आठवतो. "डिझास्टरमॅनेजमेंट" पुस्तकात न शिकताही लहानपणी वागण्यातून उमजत होते.
इतका प्रसंग होऊनही लहानपणी ते झाड कशाचे हे ठाऊक नव्हते. बरेच वर्षांनी हे झाड शिरीषचे ते कळले. साधारण एप्रिलमध्ये या झाडाला फुले येतात. य़ाची फुलं पण वैशिष्ट्यपूर्णच. आमच्या परिसरात गुलाबी फुलांचे  शिरीषवृक्षं आहेत. लहानपणी आम्ही फूलं गोळा करायचो. त्यांना एकत्र बाधायचो. आणि दाढीचा ब्रश म्हणायचो.   लक्ष नसलेल्या मित्रमंडळींच्या कानात वा नाकात     या फुलांनी स्पर्श करून गुदगुल्या करायचो.
 फुलं संपली की झाडाला शेंगा धरतात. शेंगा वाळल्या की त्या दूरदूर पसरतात. असे हे झाड.
 हीच झाडं मेडिकल परिसरात प्रचंड संख्येने आहेत. भर उन्हाळ्यात घनदाट सावली हे तर त्यांचं वैशिट्य आहेच . शिवाय आयुर्वेदात या वृक्षाला 'महाविषघ्न" म्हटले आहे. या झाडाच्या परिसरात संसर्ग पसरवणारे विषाणु वाढत नाहीत असे एकदा आयुर्वेदाचार्य असलेली शुभदावहिनी म्हणाली होती.
 आमची कॉलोनी मेडिकलकॉलेज परिसराच्या जवळ ! आमच्या परिसरासह मेडिकलपरिसरात  शिरीषवृक्षांचे प्राबल्य. आणि मेडिकल म्हणजे रोगराईचे उपचारकेंद्र !
 "योजकस्तत्र दुर्लभः" ही उक्ती या झाडांकडे पाहून खरी वाटते. ज्या कोणी ही झाड लावली असतील व ज्यांनी या झाडांना जगू दिलं असेल त्या सर्वां प्रति मनापासून कृतज्ञता.
 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.

Saturday, April 28, 2018

#सहजोक्त.


#सहजोक्त.
झाडाख्यान ...१
काय बघितल्यावर कोणते विचार मनात यावेत याचा काही नेम नसतो. गोष्ट कुठून सुरु होते न् कुठे जाऊन ठेपते हे सांगताच येत नाही. आजच पहा ना ! जवळ जवळ पंधरा दिवसांनंतर सक्काळी फिरायला गेली. नेहमीच्या बास्केटबॉल ग्राऊंडवर प्रातःस्मरण करीत फिरत होते. सहज नजर गेली झाडाकडे. खरे तर रोजच्या परिचयाचा पायाखालचा तो परिसर ! पण आज लक्ष वेधलं ते शिरीषवृक्षाने . खूप आठवणी आहेत या वृक्षाच्या ! पुढची सहजोक्त या विषयावर सहज लिहिता येणार हे नक्की.
माझ्या घरा समोरही मोठमोठी झाडं आहेतच . पण हे पटांगण त्यापेक्षा विशाल असल्यामुळे यावर जास्त झाडं आहेत. मग सगळी झाड मोजली. दहा झाडं शिरीष ,नऊ सिसवाची झाडं ,चार कडुलिंबाची झाडं ,दोन गुलमोहोराची झाडं , नावे माहित नसलेली चारपाच झाडं ,एक रुईचे झाड,अन् हो ,एक वडाचं झाड ,ज्याला त्या परिसरातून जाणारे येणारे नमस्कार करतात  ; ..असे अनेक झाडं आहेत तेथे .
शिवाय एक बोराचं झाड होतं जे कोणीतरी छाटलेलं दिसतय सध्या . चांगली चवदार बोरं यायची त्याला.छाटलेलं ,केविलवाणं झाड पाहून रोज मन खंतवायचं . "काय माणसं असतात ना ! फळं खातात ,सावली उपभोगतात ,पाणीही देत नाहीत  किंवा काळजीही घेत नाहीत ,तसं हे झाड यांच्या अायुष्यात अडचणीही आणत नाही ; तरी त्या बिच्च्या-या झाडाला छाटून टाकलं !" असा विचार यायचा मनात. आज जरा जवळ जाऊन त्या झाडाला निरखून पाहिलं तर एक कोवळे कोंब त्याच्या छाटक्या बुध्यावर रसरसून वाढताना दिसले. ते पाहून उगाच मीच जिंकल्याचा आनंद झाला. "कितीही विपरीत परिस्थिती राहो ,अापलीच मंडळी मुळावर उठली तरी जिद्दीने पुन्हा तगवायचेच स्वतःला !" हीच शिकवण देतात कां झाडं? न कळे !

लहानपणी उन्हाळ्यात सुट्ट्यांमध्ये खेड्यात रहायचो आम्ही भावंड. बाबांची शेती होती ना ! तेथे दुपारभर खेड्यातील सवंगड्यांसह मनसोक्त उंडारत खेळायचो आम्ही.
"अत्ती लाव ,पत्ती लाव"असा एक खेळ होता.

¥(हे नाव शुद्ध मराठी आहे कां आमचे नागपुरी हिंदीयुक्त मराठी , हे अजून कळलं नाही. लाव म्हणजे लावणे की लाव म्हणजे घेऊन ये ? यावर कंफ्यूजन आहे कारण खेळताना दोन्हींची गरज आहे पण स्टाईलमध्ये रुबाब झाडायचा तर मध्येच हिंदी झळकलेच पाहिजे असा संस्कार हिंदी सिनेमांनी केला आहे ना....'बचेंगे तो अौर भी लडेंगे..'किंवा 'मेरी झाशी नही दूंगी'! सारखं ......इति विषयांतर .) ¥
 ज्याच्यावर राज्य आलं त्याला "अत्ती लाव पत्ती लाव ..अमुक झाड" असं सांगायचं . मग त्याने ते झाड जेथे असेल तेथे जाऊन पानं तोडून आणायची मग त्या पानांनी
दुस-यांना आऊट करायचे. मग जो बाद झाला त्याला नवे झाड सांगायचे अन् असा हा खेळ सगळे  थकत   पर्यंत चालायचा पण संपायचा नाही.
 या खेळामुळे चपळता ,लवचिकता , सांघिकभावना तर वाढलीच शिवाय झाडांची नावे (अर्थात मराठीत) कळली. शिवाय गावाच्या भूगोलाची माहिती व्हायची हा फायदा.
 आज ही झाडं पाहून लहानपणचे झाडांचे नाव व रंगरूप लक्षात ठेवण्याचे संस्कार आठवले एकदम.
 बाकी झाडांविषयी पुढल्या भागात. ......
 ©डॉ. प्रज्ञा देशपांडे.