#सहजोक्त.
केवढे हे क्रौर्य! - ना.वा.टिळक
मला जे काही मोजके कवी आवडतात ,
त्यात ना. वा. टिळक हे एक आहेत.
संस्कृतप्रचूर शब्द असूनही कविता बोजड न होता तरल संवेदनशील असणं हे त्यांचं वैशिष्ट्य. टिळकांच्या काही कविता मनाला भिडतात. टिळकांच्या कवितांशी परिचय झाला तो माझ्या बाबांमुळे. त्या कवितांचे रसग्रहण न् बाळपणीच्या आठवणी हे एक अतुट मिश्रण आहे.
आमच्या लहानपणी टिव्ही ,सोशलमिडिया नव्हते हे आमचं सुदैवच ! उन्हाळ्यात परीक्षा संपल्यावर आम्ही भावंड खेड्यावर जात असू. तिथे वीजही अनियमित असे. सकाळ ,संध्याकाळ (दिवेलागणी पर्यंत ) आम्ही ,गावात ,देवळात ,शेतात मनसोक्त हुंदडायचो. पण दुपारी मात्र आई घरातच ठेऊन घेत असे. मग अष्टाचंगापो ,व्यापार ,पत्ते असे खेळ घरबसल्या खेळायचे. गाण्याच्या ,गावांच्या नावांच्या भेंड्या खेळायचे. नाव-गाव-वस्तु-प्राणी-अडनाव हा खेळ खेळायचा. कधी कधी बाबा गोष्ट सांगायचे.
घरात एका अोसरीत ,शेतातील आमराईतील आंब्यांचा माच पसरलेला असे; तर एका बाजूनी कांदे पसरलेले असे. माचातून आज रस करण्या योग्य आंबे वेगळे काढणे हे ही मुलांची सकाळची कामं . तसेच कांदे फेरणे ,म्हणजे खालचे वर करुन जास्तीची साल काढणे हे दुपारचे काम. वेळ जात नाही ,बोअर होतं ; हे शब्दच आमच्या गावी नव्हते.
एकदा आंब्याचा रस ,बटाटेवडे ,वरणभात , भाजीपोळी असं मनाजोग जेवण झाल्यावर आम्ही तिघं भावंड ,बाबांच्या कुशीत अोसरीत दुपारी पाळण्यावर आडवे झालो. बाबांना त्यादिवशी काय सुचलं ,माहित नाही .त्यांनी टिळकांची एक कविता म्हणून दाखवली.ती कविता इतकी भावस्पर्शी होती की ती ऐकून आम्ही रडायलाच लागलो. पुढे दोनतीन दिवस त्या कवितेचा प्रभाव मनावर होता.
बाबांची ती स्पष्ट आवाजातली वृत्ताच्या चालीतील कविता आजही कानात जशीच्या तशी जाणवते.
क्षणोक्षणी पडे, उठे, परि बळे, उडे बापडी,
चुके पथहि, येउनी स्तिमित दृष्टिला झापडी.
किती घळघळा गळे रुधिर कोमलांगातुनी,
तशीच निजकोटरा परत पातली पक्षिणी.
म्हणे निजशिशूंप्रती, अधिक बोलवेना मला,
तुम्हांस अजि अंतीचा कवळ एक मी आणला,
करा मधुर हा! चला, भरविते तुम्हा एकदा,
करी जतन यापुढे प्रभु पिता अनाथां सदा!
अहा! मधुर गाउनी रमविले सकाळी जना,
कृतघ्न मज मारतील नच ही मनी कल्पना,
तुम्हांस्तव मुखी सुखे धरुन घांस झाडावरी
क्षणैक बसले न तो शिरत बाण माझ्या उरीं
निघुन नरजातिला रमविण्यांत गेले वय,
म्हणून वधिले मला! किती दया! कसा हा नय!
उदार बहु शूर हा नर खरोखरी जाहला
वधुनी मज पाखरा निरपराध की दुर्बला!
म्हणाल, भुलली जगा, विसरली प्रियां लेकरां
म्हणून अतिसंकटे उडत पातले मी घरा,
नसे लवहि उष्णता, नच कुशीत माझ्या शिरा,
स्मरा मजबरोबरी परि दयाघना तो खरा.
असो, रुधिर वाहुनी नच भिजो सुशय्या तरी
म्हणून तरुच्या तळी निजलि ती द्विजा भूवरी.
जिवंत बहु बोलकें किति सुरम्य ते उत्पल,
नरे धरुन नाशिले, खचित थोर बुध्दिबल.
मातीत ते पसरिले अतिरम्य पंख,
केले वरी उदर पांडुर निष्कलंक,
चंचू तशीच उघडी पद लांबवीले,
निष्प्राण देह पडला! श्रमही निमाले!
शालेय शिक्षणात ही कविता आम्हाला नव्हती. पण यातील कही कडवे स्वभावोक्ती,यमक ,वृत्ताचे उदाहरण म्हणून काही कडवे मात्र चाफेकर बाईंनी शिकवले होते.
नेटवर काही संदर्भ शोधताना अवचित ही कविता दिसली अन् डोळ्यासमोर सारं तराळले.
©डॉ. प्रज्ञा देशपांडे.